शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जातात, जणू सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी सगळी पाने गळून पडतात...
झाड निष्पर्ण होऊन जाते आणि उरते त्याचे अस्सल देहमूळ !
आपल्या विचारांच्या पुनर्विलोकनात दंग असणारे खोड राहते.
थंड वाऱ्यास आपला पूर्वेतिहास विचारणाऱ्या, टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या फांदया विचार करायला भाग पाडतात.
'वर्षा' झाडांच्या तृषार्तमुळांना तृप्त करून गेलेली असते,
पानझडीमुळे शिशिरात झाडांना पाणी कमी लागते त्यामुळे शिशिरात झाडे जणू उपवासाची तपश्चर्या करतात.
शिशिरातल्या झाडांना रंग, गंध, आकार आणि स्पर्श यातील कशाचेही अप्रूप नसते. जणू ध्यानस्थ ऋषी मुनीच !