मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.
औरंगजेब धाडसी, शूर, कर्तबगार, बुद्धिमान असूनही अत्यंत संशयी व निर्दयी होता. औरंगजेबने भारतीय उपमहाद्वीपांवर जवळपास पन्‍नास वर्षांहून अधिक वर्ष शासन केले. औरंगजेबाच्‍या कार्यकाळात मुघल शासन मोठ्या प्रमाणावर विस्‍तारले होते. तत्‍कालीन वेळी सर्वांत श्रीमंत आणि शक्‍तीशाली शासक म्‍हणून त्‍याची ओळख निर्माण झाली होती. त्‍याने जगाच्‍या एक चतुर्थांश लोकांवर राज्‍य केले. त्‍याच्‍या प्रजेची संख्‍या सुमारे १५ कोटी होती. लहानपणापासून त्याला कपट-कारस्थाने, दगाबाजी, भाऊबंदकी, जनानखान्यातील राजकारण वगैरेंचा अनुभव मिळाला. वयाच्या आठव्या वर्षी त्याला नूरजहाँकडे ओलीस म्हणून राहावे लागले. ही राजकीय कैद सुमारे २० महिने चालली. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने सेनापतीपद गाजवले. उझबेग लोकांचे बंड मोडताना रणांगणावरच तो शांतचित्ताने नमाज पढला. त्याचे हे नैतिक धैर्य म्हणजे अल्लाहचा आशीर्वाद होय, असे वाटल्याने शत्रूने पळ काढला. कडवा सुन्नी म्हणून त्याचे नाव झाले व त्याच्या सत्तेला उलेमांचा पाठिंबा मिळाला. त्याचा बराच काळ दक्षिणेची जबाबदारी सांभाळण्यात गेला. औरंगाबाद ही त्याची न पुसली जाणारी आठवण होय.

मुघलांच्‍या प्रथेनुसार शाहजहाँने १६३४ मध्‍ये औरंगजेबला दख्‍खनची सुभेदारी बहाल केली. जेव्‍हा औरंगजेब खडकी (औरंगाबाद) येथे आला तेव्‍हा त्‍याने खडकीचे नाव ‘औरंगाबाद’ असे ठेवले. औरंगजेबच्‍या नेतृत्‍वाखाली ‘निजाम-उल-मलिक अं‍बर’ने औरंगाबादची नगररचना केली. औरंगाबादला त्‍यांनी राजाधानीचे रुप दिले. नंतर दुस-या निजाम-अली खान असफ जहॉं याने हैदराबादला राजधानी स्‍थलांतरीत केली. १६५७ सप्टेंबरमध्ये शाहजहाँचा आजार सुरू झाला. दाराशुकोह वर सर्व सूत्रे सोपवून तो आग्य्राला गेला. शाहजहाँच्या दृष्टीने दारा वारसदार होता; पण इतर तीन पुत्र बंड करून उठले. सर्व राजकारणाचा सूत्रधार औरंगजेब बनला. २१ जुलै १६५८ रोजी त्याने दिल्लीत साधा राज्याभिषेक करून स्वत:ला बादशहा घोषित केले नंतर लगेच शाहशुजा या त्याच्यापेक्षा मोठ्या असणारया भावाचा अंत केला. शिवाय आग्य्रात प्रवेश करून प्रथम शाही खजिना ताब्यात घेतला व बापाला अटकेत टाकले. आता आपली सत्ता निर्धोक झाली, हे ओळखून पाच जून १६५९ रोजी दिल्लीत दिवाण-ए-आममध्ये एका भव्य सोहळ्यात दुस-यांदा राज्याभिषेक करून घेतला. मुघलांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा नेत्रदीपक समारंभ होता. बाकी राहिलेल्या भावांपैकी दाराला अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आले, तर मुरादला फसवून मारण्यात आले. तीन भावांना क्रूरतेने संपवण्याच्या या शोककथा म्हणजे मानवजातीला व इस्लामला काळिमा फासणारे कृत्य होते. औरंगजेब शूर होता ; पण त्याचे आचरण शूराला शोभणारे नव्हते. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा औरंगजेब नौरंगजेब (नवरंगी) म्हणून ओळखला जाई. बापाचा त्याने खून केला नाही एवढेच; पण त्याचे जिणे हराम करून टाकले. शाहजहाँला दक्षिणेतून भेट म्हणून आलेल्या आंब्याच्या पेटय़ा त्याने स्वत:साठी ठेवून घेतल्या. किल्ल्याला यमुनेतून होणारा पाणीपुरवठा बंद केला. विहिरीतल्या दूषित कडवट पाण्यावर अखेरचे दिवस काढणे बापाला भाग पाडले. बंदिवासाच्या काळात आपल्या प्रिय पत्नीच्या मकबरयाकडे ताजकडे बघत बघत झिजत चाललेला, हतबद्ध झालेला शाहजहाँ भयाण एकांतवासातील मृत्यूला सामोरा गेला. औरंगजेबाला हे दुष्कृत्य शिकवणारा सुफी संत कय्यूम त्याचा गुरू होता. त्याला संत म्हणावे का ? हा ही प्रश्नच आहे...

बादशहा होताच त्याने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व 'गाझी' म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी इस्लामी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले. इस्लामी सत्ताधीशांनी दोस्तीचा हात पुढे करण्यासाठी राजदूत पाठवले. या विदेशी दूतांकरवी औरंगजेब त्यांना डोळे दिपवून टाकणारे नजराणे पाठवत असे. त्यामुळे आलमगीरची कीर्ती युरोपात पसरण्यास मदत झाली.

एक गोष्ट खरी की, भारताच्या इतिहासातील पहिले मोठे एकछत्री साम्राज्य फक्त औरंगजेबाचे होते. मौर्य साम्राज्यसुद्धा वाटते तसे एकछत्री नव्हते. मुघल साम्राज्याचा खरा संस्थापक अकबर असला तरी दक्षिणेत राज्यविस्तार होऊ लागला तो जहांगीर व शाहजहाँ यांच्या काळात. त्यात विजापूर (१६८६) व गोवळकोंडा (१६८७) भर टाकून औरंगजेबाने आपले महासाम्राज्य सिद्ध केले. मराठे, राजपूत वगैरेंनाही मुघलांचे मांडलिकत्व मान्य करणे भाग पडले. औरंगजेबाने आपल्‍या साम्राज्‍यामध्‍ये फतवा-ए-आलमगीरी (शरियत किंवा इस्लामी कायद्यांवर आधारीत) लागू केले. ज्‍याद्वारे गैर मुस्‍लीमांना अतिरिक्‍त कर लागु केले. अनेक हिंदू देव-देवतांची मंदिरे नष्‍ट केली. गुरु तेग बहादुर यांची हत्या त्याने केली होती. औरंगजेब जरी धर्मांध शासक असल्‍याचे नमुद असले तरी, त्‍याच्‍या दरबारी मोठ्या प्रमाणावर हिंदू , राजपूत अधिकारी होते. त्‍याचे अंगरक्षकसुध्‍दा हिंदू होते. मिर्झाराजे जयसिंग हे त्‍यामधील मुख्‍य नाव आहे. उपखंडाचा सर्वात मोठा भाग समान प्रशासनाखाली आल्यामुळे अधिका-यांच्या बदल्या एका सुभ्यातून दुस-या सुभ्यात होऊ लागल्या. विदेशी व्यापारी, प्रवासी, राजदूत यांची ये-जा वाढली. युरोपीय गोलंदाज चाकरीसाठी येथे येत. बाहेरील जगाशी हिंदुस्थानचा संपर्क प्रस्थापित झाला. औरंगजेब समकालीन जगातील सर्वात बलाढय़ सम्राट सिद्ध झाला.

पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे राजपूत जाट, बुंदेले, सतनामी, सीख, मराठे व आसामातील आहोम यांच्यात असंतोष खदखदू लागला. मेवाड व मारवाड एक झाले. ते जिंकले नाहीत तरी त्यांना मुघलांचे अतोनात नुकसान केले. राजपुत्र अकबरसुद्धा त्यांना सामील झाला. शिवाजी महाराजांच्या युक्तीशक्तीच्या ताकदीचा अंदाज औरंगजेबाला आला नाही. जयसिंगाच्या मध्यस्थीने पुरंदरचा तह घडून आला. शिवाजी राजे आग्य्राला गेले. १२ मे १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसाच्या दिवशी ही भेट झाली. त्यावेळी निडर आत्मसन्मान व राष्ट्राभिमान म्हणजे काय, ते त्यांनी बादशहाला सुनावले.शिवाजीराजांनी भर दरबारात औरंगजेबाला सुनावलेले खडे बोल हा सर्वांनाच एक अनपेक्षित धक्का ठरला. औरंगजेब यामुळे आतून विचलित झाला व राजपूत, जाट, बुंदेले यांची मने शिवाजीराजांनी जिंकली.औरंगजेबासारखा क्रूर, कपटी माणूस अशा कृत्याबद्दल त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देऊ शकला असता. पण असे कृत्य केले तर ते आपल्याच मुळावर येईल हे त्याने ताडले. त्यासाठी तो वेगळे कारस्थान रचत होता, पण त्यापूर्वीच 'आग्र्याहून सुटका' हे थरारनाटय़ घडले. शिवाजीराजे निसटले. हा प्रसंग इतिहासाला कलाटणी देणारा होता. ही घटना जिव्हारी लागल्यामुळे औरंगजेब मराठ्यांचा नायनाट करण्याचे त्याच्या मनात घाटत होते. दरम्यान दक्षिणेमध्‍ये मराठेशाही विस्तार पावू लागली त्याकरिता मराठीशाहीचा नायनाट करण्‍यासाठी औरंगजेबने मोठ्या प्रमाणावर सैन्‍य पाठविले परंतु त्‍यात त्‍याला यश येत नव्‍हते. अशा वेळी स्‍वत: १६८३ मध्‍ये तो लढाईत उतरला. मराठे त्याच्याशी नव्या दमाने लढू लागले. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतरही त्यात फरक पडला नाही. मराठे ख-या अर्थाने ‘पीपल्स वॉर’ लढले. मुघल आणि मराठे यांच्‍यामध्‍ये तत्‍कालीन वेळी सत्‍तासंघर्ष सुरु होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजे संभाजी महाराजांची त्‍याने हत्‍या केली. औरंगजेबाने त्यांना बहादूरगड (धर्मवीरगड) येथे आणले. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची अपमानास्पद मिरवणूक काढली. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम पुणे जिल्ह्यातील तालुका शिरूर येथील ‘‘तुळापूर'' येथे हलवला. तिथे तुळापूरला भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर या महान तेजस्वी राजाच्या शरीराची अक्षरश: चाळण करून अमानुषपणे हत्या केली. पण हा सह्याद्रीचा छावा धर्मवीर संभाजी जराही डगमगला नाही की थोडा ही बिचकला नाही. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत औरंजेबापुढे आपली मान झुकवली नाही. यानंतरच्या काळात ताराराणीपुढे त्याची डाळ शिजली नाही. दख्खन काबीज करण्याचे स्वप्न बघणारा औरंगजेब मराठयांशी लढताना दख्खनेतच मरण पावला. ३ मार्च १७०७ रोजी अहमदनगर येथे त्याचा मृत्‍यू झाला. त्‍याला दौलताबादच्‍या फ़कीर बुरुहानुद्दीन क़ब्रस्‍तानामध्‍ये दफण करण्‍यात आले. औरंगजेबाच्या धर्मवादी मानसिकतेतच त्याचा पराभव साठवलेला आहे. मराठय़ांचा तो उपकारक शत्रू ठरला. कारण दोन दशके राजाशिवाय रयत कशी लढू शकते आणि जगू शकते हे मराठयांनी जगाला दाखवून दिले !

औंरगजेबने पत्‍नी रबिया दुर्रानीच्‍या स्मृतीपित्‍यर्थ १६७८ मध्‍ये औंरगाबाद येथे बीबी का मक़बरा बांधला होता. राबिया-उल-दौरानी ही औरंगजेबची आवडती राणी होती. दिलरास बानो बेगम या नावाने ती प्रसिद्ध होती. तिच्या हयातीतच मकबर्‍याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. दिलरास बानो शिवाय औरंगजेबच्या तीन बेगम होत्या. त्यातील दुसरी होती रहेमत उन्निसा बेगम. ही नवाबाई या नावाने प्रसिद्ध होती. तिसरी औरंगाबादी महेल आणि चौथी उदयपुरी महेल. उदयपुरी ही मुळची जॉर्जियाची होती. या चार राण्यांमध्ये दिलरास बानो ही औरंगजेबची लाडकी होती. औरंगजेबाचे दख्खनेतील वास्तव्य अनागोंदीचे आणि नियोजनाचा अभाव असणारे ठरले. मुघलांचे दौरे फिरत्या शहरांसारखे असत. त्याची आधीपासूनची वर्णने उपलब्ध आहेत. औरंगजेबाच्या कारकिर्दीत दिल्लीचे संपूर्ण प्रशासकीयसरकार २४ वर्षे सतत फिरतीवर होते. असे दुसरे उदाहरण नसेल. पडदानशीन स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे व स्नानगृहे असलेल्या खास वॅगन्स असत. औरंगजेबाचा वजीर असदखान याला तीस भार्या व ८०० रखेल्या होत्या. तो नेहमी मद्य, मदिराक्षी व संपत्ती यात हरवलेला असे. औरंगजेब त्याला आळा घालू शकत नव्हता. सैन्यात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता. लाच देऊन काही बातम्या बादशहापर्यंत पोहोचणार नाहीत, अशी व्यवस्था करता येई. लहर लागेल त्याप्रमाणे तो तळ हलवण्याचे हुकूम सोडी. सर्वात आधी बादशहाचा तंबू गुंडाळला जाई. त्याचे दोन नग असत. पुढच्या मुक्कामावर बादशहा लवाजम्यासह पोहोचण्यापूर्वी सर्व व्यवस्था तयार असे. औरंगजेब साध्या राहणीसाठी प्रसिद्ध होता. या सर्वांच्या वैयक्तिक सामानासाठी हत्ती, उंट व बैलगाड्या लागत. केवळ त्याच्या गाद्या, गिरद्या, उशा म्हणजे आठ हत्तींचा भार असे. त्याला मौल्यवान हिरे, माणके, रत्ने साठवण्याचा हव्यास होता. हा सर्व खजिना बरोबर असे. औरंगजेबाचा स्वत:चा जनानखाना नव्हता. स्वत:च्या हाताने विणलेल्या टोप्या व हस्तलिखित केलेल्या कुराणाच्या नकला विकून तो स्वत:चा खर्च भागवत असे. राज्याच्या खजिन्यातून त्यासाठी एकही पैसा घेत नसे, असे सांगितले जाते.

औरंगजेबाने केलेल्या दानधर्माने शेतक-याचे कोणतेच प्रश्न सुटत नव्हते तरीही त्याने स्वतःच्या अत्याचाराचे समर्थन त्याने केलेल्या दानधर्माशी जोडून पोकळ युक्तिवाद केल्याचे आढळते. उलट २४ वर्षाच्या त्याच्या प्रदिर्घ मोहिमेत फौजांच्या हालचालींचा सर्व खर्च जनतेच्या पैशातून होत होता. जंगलतोड, शेतांची नासाडी, लूटमार, अराजक यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मिळाले ते उपासमारी आणि दैन्य. जोडीला अवर्षण व दुष्काळ सोबतीला होतेच ! या काळात १७०३ मध्ये औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाला निर्भीडपणे लिहिलेले एक पत्र औरंगजेबाच्या भवितव्यावर प्रकाश टाकते. यात लिहिले आहे की, "पूर्वी फौजेत राजपूत पाहिजे असले म्हणजे एकाचे ठिकाणी शंभर उमेदवार येत. हल्ली तुम्ही तीन तीन वर्षे डांगोरा पिटूनही दहा-पाच माणसे जमा होत नाहीत. हा प्रभाव कशाचा ? फौजेतील लोक दरिद्री झाले. एकही कवी, ग्रंथकार तुमच्या राज्यात निपजला नाही. व्यापा-यांची व धनिकांची लूट होते. रयत धुळीस मिळाली. दक्षिणचा स्वर्गतुल्य प्रदेश ओसाड, निर्धन, निर्जन झाला. तुमच्या राज्यात सर्वत्र लुच्च्यांचा बुजबुजाट झाला आहे. हातात जपमाळा, काखेत कुराण व डोक्याला मोठे पागोटे असले म्हणजे तुमचा त्याच्यावर पूर्ण भरवसा व अशी मंडळी तुमच्या राज्याचे आधारस्तंभ !"

काही अभ्यासकांच्या मते आपल्या मृत्यूपूर्वी औरंगजेबाला आपल्या दुष्कृत्यांचा पश्चात्ताप झाला होता. हे सत्य मानले तरी त्यात त्याने मुस्लिमेतर रयतेवर केलेल्या अन्यायाची खंत कुठेच दिसत नाही. मुघल साम्राज्य लोप पावले. इंग्रज आपल्या देशाचे मालक झाले. पण मुघल सम्राटांनी पेरलेल्या जहाल धर्मवादाने आपले रंग नंतर सातत्याने दाखवले. आपल्या देशातील मागील कित्येक दशकातील इतिहास याच दिशेने घडत गेला आहे. कडव्या धर्मवेडाला आळा घालून हिंदू-मुसलमानांना सहजीवन शिकवण्याचे अनेक प्रयत्न यामुळे धुळीस मिळाले. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीचे संस्थापक सर सय्यद अहमद हिंदुस्थानला ‘दार-उल-इस्लाम’ म्हणत. मुसलमान हे स्वयंभू संपूर्ण राष्ट्रनिर्मिक आहेत. इतर कुणाचे वाटेकरी नाहीत, असा त्यांचा दावा होता. १९४० साली मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्रवादाचे हेच शस्त्र बाहेर काढले. बहुसंख्य मुसलमानांना जे हवे होते ते मिळवून देणारा नेता अशी प्रतिमा तयार झाल्याने त्यांच्या मागे अनेक मुस्लीम धावत गेले. आजही अनेक आघाडयांवर कडव्या धर्मवादी प्रवृत्ती आक्रमक असल्याचे दिसून येते त्याचे बरयापैकी श्रेय मुघल सम्राट औरंगजेबाला जाते. त्याची असहिष्णू, अमानुष दुष्कृत्ये असो वा जिनांचे इस्लामविरोधी तथाकथित सेक्युलर आचरण असो. अशी कृत्ये ‘फर्जे ऐन’पुढे क्षम्य ठरतात काय यावर कुणी फारसा प्रकाश टाकल्याचे आढळत नाही.

संदर्भ - 'शिवकालीन पत्रसार संग्रह खंड' १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
'शिवाजी व शिवकाल' (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
'अहकामे आलमगिरी' - औरंगजेबाची आज्ञापत्रे, सेतू माधवराव पगडी.

1 टिप्पणी: