शनिवार, ३१ मे, २०२५

एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा - 
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'

शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

सोमवार, १९ मे, २०२५

गोष्ट, सरहद्दीची सीमा नसणाऱ्या नद्यांची आणि स्त्रियांची!


हा फोटो आज रात्रीचा आहे, बांगलादेशातील मित्राने पाठवला आहे. भारतीय सीमेलगतच्या बांगलादेशमधील 'राजशाही' या शहरालगत पद्मा नदी वाहते. फोटोमध्ये हिरव्या रंगात दिसणारे राजशाही शहर आहे, त्याच्या पुढे काळसर करडे दिसणारे पद्मा नदीचे विशाल पात्र आहे आणि नदी पात्रापलीकडे एका रेषेत दिसत असलेले फ्लड लाइट्स असलेला भाग म्हणजे भारतीय हद्दीचा भूभाग आहे. राजशाहीच्या टेकडीवरून हा फोटो घेतलाय आणि भारतीय हद्दीत चमकत असणाऱ्या वीजा त्यात कैद झाल्या आहेत.

शुक्रवार, १६ मे, २०२५

लेट नाइट मुंबई ..

'लेट नाइट मुंबई'चे मुखपृष्ठ 

लेखक प्रवीण धोपट यांच्या 'लेट नाइट मुंबई' या देखण्या आणि आगळ्यावेगळ्या विषयाच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही नेमकी आहे - "सूर्य मावळल्यानंतर ज्यांचा दिवस उजाडतो त्या प्रत्येकाला...."
या देखण्या पुस्तकातले हरेक पान याला अनुसरूनच आहे हे विशेष होय! मुंबई शहराविषयी आजवर विविध भाषांमधून पुष्कळ लेखन केलं गेलंय, मुंबईच्या भौगोलिक महत्वापासून ते इतिहासापर्यंत आणि राजकीय वजनापासून ते मायानगरीपर्यंत भिन्न बिंदूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेखन संपन्न झालेय. मुंबईविषयी एक आकर्षण देशभरातील सर्व लोकांना आहे, इथल्या माणसांची ओळख बनून राहिलेल्या मुंबईकर स्पिरीटवर सारेच फिदा असतात. मुंबईची आपली एक बंबईया भाषा आहे जी मराठी तर आहेच आहे मात्र हिंग्लिशदेखील आहे! मुंबईच्या बॉलीवूडी स्टारडमपासून ते धारावीच्या विशालकाय बकालतेविषयी सर्वांना जिज्ञासा असते. इथल्या डब्यावाल्यांपासून ते अब्जाधिश अंबानींच्या अँटॅलिया निवासस्थानापर्यंत अनेक गोष्टींचे लोकांना कुतूहल असते. स्वप्ननगरीचा स्वॅग असो की मंत्रालयाचा दबदबा, दलालस्ट्रीटची पॉवर असो की गेट वे ऑफ इंडियाचा भारदस्त लुक चर्चा तर होतच राहणार! अशा सहस्रावधी अंगांनी सजलेल्या, नटलेल्या मुंबईच्या रात्रींची शब्दचित्रे प्रवीण धोपट यांनी चितारलीत. यात रात्रीची मुंबई कैद झालीय असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल मात्र वास्तव काहीसे तसेच आहे. फुटपाथच्या कडेला तसेच फ्लायओव्हरखालच्या अंधारल्या जागी पडून असणारी जिवंत कलेवरे यात आहेत आणि लखलखीत उजेडात न्हाऊन निघालेलं नाइट लाईफही यात आहे. मुंबईवर प्रेम असणाऱ्यांना हे आवडेल आणि ज्यांना रात्रीच्या मुंबईचं रूप ठाऊक नाही त्यांनाही हे पुस्तक आवडेल.

गुरुवार, १५ मे, २०२५

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.

गुलमोहर आणि डियर बाओबाब – वेध एका रंजक गोष्टीचा!

डियर बाओबाबचे मुखपृष्ठ   

आईवडिलांपासून, मायभूमीपासून दुरावलेल्या एका मुलाची आणि एका निहायत देखण्या झाडाची ही गोष्ट..
गुलमोहराला बंगाली, आसामीमध्ये कृष्णचुर म्हटले जाते! कृष्णाच्या मस्तकावरचा मुकुट या अर्थाने हे नाव आहे. तर उडीयामध्ये नयनबाण असं नाव आहे. इंग्लिशमध्ये याची पुष्कळ नावे आहेत, त्यातले mayflower नाव सार्थ आहे. तीव्र उन्हाने बाकी सगळी फुले अवघ्या काही दिवसांत तासांत कोमेजून जात असताना ऐन वैशाखात, लालबुंद गुलमोहोर अक्षरशः दहा दिशांनी बहरून येतो!

रविवार, ११ मे, २०२५

हॅरी ट्रूमन, अणूबॉम्ब आणि विनाशकाची प्रतिमा!

राष्ट्राध्यक्ष ट्रूमन  

हॅरी ट्रूमन हे अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रूमन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्याचा ऐतिहासिक विनाशकारी निर्णय त्यांनी घेतला, ज्यामुळे युद्ध संपले पण मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

ट्रूमन यांच्या डेस्कवर एक पाटी असायची, ज्यावर "The Buck Stops Here" लिहिले होते. याचा अर्थ असा की अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे. हा वाक्प्रचार त्यांच्यामुळे प्रसिद्ध झाला. वास्तवात ते एक साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म मिसूरीतील एका शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांनी लहानपणी शेतात काम केलेलं, औपचारिक कॉलेज शिक्षणही ते पूर्ण करू शकले नाहीत, तरीही ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले.

1947 मध्ये त्यांनी ट्रूमन डॉक्ट्रिन जाहीर केले, जे कम्युनिझमचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने इतर देशांना मदत करावी, असा विचार मांडते. यामुळे शीतयुद्धाला सुरुवात झाली. राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर ट्रूमन आपल्या मिसूरीतील घरी परतले आणि सामान्य जीवन जगले. त्यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, आणि त्यांनी स्वतः आपली पेन्शन मिळावी यासाठी कायदा मंजूर करवला (!)

गुरुवार, ८ मे, २०२५

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स

कॉफी ब्लॅक - डॉन विल्यम्स 

दरवर्षी सुट्ट्या लागल्या की त्या ब्रिटिश महिलेचा पती न चुकता भारतात यायचा. नंतरच्या काळात मात्र कैक वर्षे अंथरुणाला खिळून त्याचे देहावसान झाले. त्याच्या स्मृती जागवण्यासाठी ती वृद्धा गोव्यात टिटो बार्डेसला (दशकापूर्वी) आली होती. तिने डॉन विल्यम्सचं एक गाणं असं काही गायलं होतं की जमलेल्या तरुणाईला कावरंबावरं व्हायला झालं, ते गाणं होतं "कॉफी ब्लॅक.."

नॉर्थईस्टमधील डाऊन स्ट्रीट म्युझिक कॅफेज असोत की गोव्यातील फेरीबोट्स, वा मेट्रो सिटीमधली पंचतारांकित हॉटेल्स असोत, डॉन विल्यम्सची गाणी मंद स्वरांत कानी पडतात! 
विशेषतः केरळच्या बॅकवॉटर्समधील हाऊसबोट्स आणि गोव्यातले नाईट पब्ज रोज रात्रीस भरात येण्याआधी म्हणजे अंधार गडद होण्याआधी जी शांतशीतल  गाणी वाजवतात त्यात डॉनची गाणी आवर्जून असतात. 
गतपिढीतला कुणी दर्दी रसिक तिथं असला तर मग तो एखादा खंबा ज्यादा रिचवतो. एखाद्या कमनीय ललनेला जवळ बोलवून ओलेत्या डोळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तिच्या कपाळाचे चुंबन घेऊन चिल्ड 'पॉल जॉन' वा  तत्सम स्कॉचचे सिप घेत राहतो! 
रम्य भूतकाळ त्याच्या भवती घुमू लागतो! 
हे गारुड विलक्षण असतं.

बुधवार, ७ मे, २०२५

'बांगलादेश ए ब्रूटल बर्थ' आणि व्हायरल फोटोचे सत्य!

हेच ते छायाचित्र ज्याच्या आधारे खोटी द्वेषमूलक माहिती पसरवली जात आहे.

सोबतच्या छायाचित्राचा वापर अत्यंत बेमालूमपणे द्वेष पसरवण्यासाठी होत असल्याने त्यातले सत्य समोर आणण्यासाठीची ही ब्लॉगपोस्ट!

याची सत्यता जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. हे छायाचित्र ज्यांनी काढले आहे ते किशोर पारेख हे भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भावनगरचा. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांनी चित्रपट निर्मिती आणि माहितीपट छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेलं. विद्यार्थीदशेत केलेल्या प्रोजेक्टमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1960 ला ते भारतात परतले आणि हिंदुस्तान टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार बनले. तिथं काम करताना त्यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाचे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान संघर्षाचे वार्तांकन केले. युद्धाच्या समाप्तीच्या वेळी झालेल्या ताश्कंद शिखर परिषदेच्या वार्तांकनासाठी त्यांना तत्कालीन सोव्हिएत लँडने सुवर्णपदक प्रदान केले. त्यांनी 1966 - 1967 च्या बिहारमधील दुष्काळाचे टोकदार कव्हरेज केले. या विषयावरील त्यांच्या छायाचित्रांचे अमेरिकेत प्रदर्शन भरवण्यात आलेलं.

मंगळवार, ६ मे, २०२५

तू रूह है तो मैं काया बनूँ..

तू रूह है तो मैं काया बनूँ

प्रियदर्शिनी अकॅडमीच्या कार्यक्रमासाठी ट्रेनने मुंबईला गेलो होतो. ट्रेन पुण्यात थांबल्यानंतर एक अत्यंत तरुण उमदं कोवळं पोरगं ट्रेनमध्ये चढलेलं. त्याचं नेमकं माझ्या समोरचं बुकिंग होतं. रात्रीची वेळ होती. काही वेळात ट्रेन निघाली. त्याचे डबडबलेले डोळे एसी कोचच्या फिकट निळ्या उजेडात स्पष्ट दिसत होते. मधूनच तो ग्लासविंडो मधून बाहेर पाहत माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने मीच नजर हटवली. त्याच्या मोबाईलवर एकच गाणं शफल मोडमध्ये प्ले होत होतं.

गोष्ट रामकेवलच्या पराक्रमाची!

डोळ्यात आनंदाश्रू आलेला रामकेवल!

काहींचं जगणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. ही उक्ती युपीच्या रामकेवल या मुलाने सार्थ करून दाखवली आहे. 1947 नंतर म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या गावातला तो पहिला विद्यार्थी आहे जो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्याचा सन्मान केला आहे ही देखील एक चांगली गोष्ट! रामकेवल हा केवळ विद्यार्थी नसून त्याच्या घरातला कमावता मुलगा आहे. युपीमध्ये सलग सहा महीने लग्न सराईचा मौसम असतो त्यानंतर तीन महीने ब्रेक घेऊन पुन्हा तीन महिने लग्ने होत राहतात. तर हा लहानगा मुलगा वरातीत डोक्यावर पेट्रोमॅक्स घेऊन चालायचे काम करायचा. रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी उठून 6 किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत जायचा!

सोमवार, ५ मे, २०२५

गुनाहों का देवता – त्यागाच्या मर्यादा सांगणारी गोष्ट..




त्याग करावा, मात्र त्याचा अतिरेक करू नये. काहींचा त्याग इतका मोठा असतो की त्यांचे अस्तित्व मिटून जाते. त्या त्यागाचीही किंमत राहत नाही आणि त्यांचे मूल्य तर त्यांनी स्वतःच गमावलेले असते. परिचयातील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी युपीमधील वृंदावन इथे निधन झाल्याचं तिच्या घरच्या लोकांना आठवड्यापूर्वी कळलं. मला मात्र आज समजलं. तिच्या घरी तिची आठवण काढणारं मायेचं माणूस देवाघरी जाऊन तीन दशके लोटलीत. तिच्या असण्या नसण्याने कुणालाच काही फरक पडला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे, ती गेली इतकाच त्रोटक निरोप मिळाला. एकांतातलं अतिशय रुक्ष मरण तिच्या वाट्याला आलं आणि तिच्या जाण्याचा तितकाच रुक्ष निरोप मिळाला. जीव हळहळला. तिच्या जाण्याने मला चंदर आठवला.