गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि जिनिव्हा कन्व्हेन्शन

फोटोत डावीकडे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि उजवीकडे माय लाई नरसंहारातील बळी    

१९४६ मध्ये अमेरिकन युद्धकैद्यांची रोममधून खुली परेड काढून इटालियन वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करणाऱ्या जर्मन लेफ्टनंट जनरलने जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील युद्धकैदीविषयक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप अमेरिकन सैनिकी आयोगाने केला होता. मात्र व्हिएतनाममध्ये जेंव्हा युद्धबंदयांसोबत अमेरिकन सैन्याने केलेले दुर्व्यवहार समोर येऊ लागले तसतशी नैतिकतेचे ढोल पिटणारी अमेरिका बॅकफूटवर गेली होती. इथे एक उदाहरण व्हिएतनाममधील माय लाई नरसंहाराचे देतोय. व्हिएतनाममधील सोन मई खेड्यानजीक असलेल्या माय लाई आणि माय खे या दोन वस्त्यांवर अमेरिकन सैन्याच्या कंपनी सी मधील पहिली बटालियन, विसावी इन्फंट्री रेजिमेंट, २३ व्या इन्फंट्री डिव्हिजनमधील ११ वी ब्रिगेड यातील हजारहून अधिक शस्त्रसज्ज सैनिकांनी हल्ले केले. लोकांना ताब्यात घेऊन पाशवी नरसंहार केला. ३४७ ते ५०४ च्या दरम्यान मृतांची संख्या होती (अनेकांचे मृतदेह अखेरपर्यंत न मिळाल्याने ही संख्या नेमकी ठरवली गेली नाही) यावरून हा नरसंहार किती मोठा होता याची कल्पना यावी. या नरसंहाराचे फोटो अमेरिकन सैन्याने काढले जे नंतर प्रकाशित केले गेले. मारले गेलेल्यात बहुसंख्य बालके आणि स्त्रिया होती. नरसंहार घडवून आणणाऱ्या सैनिकांची संख्याही अफाट होती. काही स्त्रियांवर बलात्कार केले गेले होते, काहींना अमानवी मारहाण झाली होती, काहींचा पाशवी छळ केला गेला होता. काही मृतदेहांची विटंबना केली गेली होती. यातील काही सैनिकांवर जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील तरतुदींचा भंग केल्याचा खटला चालवला गेला. इतक्या मोठ्या संख्येने हिंस्त्र नरसंहार करणाऱ्या सैनिकापैकी विल्यम केली हा एकच सैनिक दोषी सिद्ध झाला. प्रारंभी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली. नंतर ती बदलून दहा वर्षे कारावास अशी केली गेली. प्रत्यक्षात मात्र फक्त साडेतीन वर्षेच त्याला बंदिवास झाला तो ही त्याच्याच घरात नजरकैद करून ! या शिक्षेला कसलाच अर्थ नव्हता की कोणती नैतिक मुल्ये अमेरिकेने इथं जपली नव्हती ! शेवटी या घटनेचा जेंव्हा बभ्रा झाला जेंव्हा जगभरातून संतापाची लहर उमटली पण अमेरिकेच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. हा नरसंहार घडत असताना हयू थॉम्पसन, ग्लेन अँड्रीयोट आणि लॉरेन्स कोलबर्न या तीन अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून जखमींची मदत करण्याचा व त्यांच्यावरील अत्याचारापासून सैनिकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्यांना अमेरिकन संसदेची कठोर टीका सहन करावी लागली. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. घटनेनंतर ३० वर्षांनी अमेरिकन सरकारला उपरती झाली आणि या अधिकाऱ्यांना गौरवलं गेलं. यातून बोध मिळतो की जिनिव्हा कन्व्हेन्शन ही नामधारी गोष्ट आहे, जिचा वापर केवळ दबाव टीका यासाठी होतो त्यातून फारसं काही हाती पडत नाही. युद्धे वाईटच असतात त्यातून येणारा निष्कर्ष मानवतेला मागे नेणारा आणि विकासाला खीळ घालणारा येतो. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे पाकच्या तावडीत असलेले आपल्या वायूसेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान.


पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात कोसळलेल्या मिग २१ विमानाचे पायलट वर्थमान यांनी विमानातून पॅराशुटद्वारे लँड केलं, त्यावेळी त्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली. पॅराशुटचा पाठलाग करत आलेल्या पाक लष्करी जवानांनी विंग कमांडर वर्थमान यांच्यावर हल्ला करणाऱ्या जमावास पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लष्करी तळावर नेतानाचे फोटो प्रसिद्धी माध्यमांना दिले. त्यानंतर विंग कमांडर वर्थमान यांना इस्पितळात (ठिकाण अज्ञात) नेण्यात आलं, त्यांची ओळख जाहीर करून घेतली. त्याचाही व्हिडीओ बनवला गेला, तो तत्काळ पाकिस्तानी वृत्त वाहिन्यांनी व्हायरल केला. या नंतर बंधक बनवून आणलेल्या वर्थमान यांचे हात खुले करून, चेहरा स्वच्छ साफसुफ करून त्यांना चहा देण्यात आला व चहा पिताना पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधला गेला, ज्यात ते पाकिस्तानी लष्कराने चांगली वर्तणूक दिल्याचे सांगतात. हा व्हिडीओ देखील पाकिस्तानी लष्कराने व्हायरल केला. या सर्वांचा अतिरेक तेंव्हा झाला जेंव्हा पाकिस्तानी लष्कर प्रवक्त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा संपूर्ण व्हिडीओच ट्विट केला गेला. हे ट्विट दुपारचे होते.

युद्धबंदयांसोबत कसा व्यवहार करायचा याची जागतिक मापके असलेल्या जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील आर्टिकल १३ नुसार युद्धबंदयाची सार्वजनिक ओळख जाहीर करण्यास सक्त मनाई आहे. असे करणे 'अपमानजनक व सार्वजनिक जीवनातील अनुत्सुकता' वाढवणारे ठरते जे त्या सैनिकाच्या उर्वरित आयुष्यात त्रासदायक ठरू शकते. द्विपक्षीय चर्चेनंतर पूर्वपरवानगी नुसार फोटो / व्हीडीओ यांची देवाणघेवाण करून नंतर ते सार्वजनिक करता येतात पण इथे तसे घडलेलं नाही.त्यामुळे युद्धबंदयाचा व्हिडीओ प्रसारित करणे हा जिनिव्हा कन्व्हेन्शचा भंग ठरतो जो गुन्हा आहे. साऊथवेस्टर्न लॉ स्कूलमध्ये कार्यरत असणारे अमेरिकन न्यायतज्ज्ञ रॅशेल व्हॅनलँडीगहॅम यांनी असं कृत्य म्हणजे आर्टिकल १३ चा भंग असल्याचं म्हटलंय. आपल्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पाकने व्हिडीओ शेअर केल्याचे प्रतिपादन केले तेंव्हाही हे ट्विट अस्तित्वात होते, मात्र असं करणं जिनिव्हा कन्व्हेन्शनचा भंग होऊ शकतो हे ध्यानात येताच पाकने ते ट्विट चक्क डिलिट केलं. भारत आणि पाकिस्ताननेही जिनिव्हा करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत हे महत्वाचे आहे. भारतीय विदेश मंत्रालयाच्या वतीने विंग कमांडर वर्थमान यांना सुखरूप ताब्यात देण्याची मागणी करताना त्यांची ओळख सार्वजनिक करण्याबाबत निषेध नोंदवला गेलाय तर पाकने यावर संध्याकाळी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की वर्थमान यांना लष्करी नियमांनुसार वागणूक देण्यात येतेय.

सेंटर फॉर द स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे सुरक्षाविषयक तज्ज्ञ अँथनी कॉर्डसमन यांच्या मते जिनिव्हा कन्व्हेन्शन खूपच विस्तारपूर्वक लिहिलं असल्या कारणाने अशा स्पेसिफिक घटनेत त्याची अंमलबजावणी कठीण होऊन बसते. वर्थमान यांच्या बाबतीत त्यांना ताब्यात घेण्यापासून ते त्यांचा अखेरचा व्हिडीओ शेअर केला जाईपर्यंत ज्या काही घडामोडी त्यांच्यासोबत घडल्या आहेत त्या सर्व कृती लॉज ऑफ वॉरचे उघड व्हायोलेशन आहे. वर्थमान यांची ओळख पटावी आणि आपलं म्हणणं सत्य मानलं जावं यासाठी व्हिडीओ बनवला गेल्याचं पाक सिद्ध करू शकला तर ही घटना जिनिव्हा कन्व्हेन्शनचा भंग ठरू शकणार नाही. मात्र इथं तसं न घडता वर्थमान यांचा केवळ ओळख पटवतानाचा व्हिडीओ व्हायरल करण्याऐवजी त्यांना अपमानजनक वाटेल वा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा मानभंग करणारे ठरेल अशा प्रकारचे फोटो व व्हिडीओ पाककडून आधी व्हायरल केले गेलेत. यावर भारत सरकारकडून कठोर आक्षेप घेतला गेला असेल अशी अपेक्षा.

२००३ मध्ये इराकी सैन्याने ताब्यात घेतलेले अमेरिकन युद्धकैदी टीव्हीवर दाखवण्यात आले होते तेंव्हा तत्कालीन अमेरिकन संरक्षण सचिव डोनल्ड रम्सफिल्ड यांनी ही बाब नजरेस आणली होती मात्र पुढे जाऊन अमेरिकन सैनिकांनी सर्व हद्दी पार करत इराकी युद्धकैद्यांचा अतोनात अमानुष छळ केला, त्याचे फोटो काढले, व्हिडीओ बनवले. नंतर ते व्हायरल केले गेले. व्हिएतनाम युद्ध, इराण इराक युद्ध, जस्मीन क्रांती, इजिप्तमधील गृहयुद्ध, सोमालिया युद्ध, युगांडा टांझानिया युद्ध, इस्त्राईल पॅलेस्टाईन युद्ध, अफगाण रशियन युद्ध, कोसोवो क्रायसिस, सर्बियन युद्ध, चेचेन्या रशिया युद्ध, आताचे सीरियन युद्ध अशा अनेक घटनात जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या चिंधड्या उडाल्या पण त्यावरून कुठे फारशी कठोर कारवाई झाली नाही.

विंग कमांडर वर्थमान यांच्या घटनेबाबत देखील भारताने जास्तीत जास्त दडपण दबाव आणण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करायला हवा अन्यथा कुलभूषण जाधव भाग दोनची सुरुवात पाक करू शकतो !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा