गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - वेश्याव्यवसाय : इतिहास ते आस



ऋषी आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात, याची व्यक्तीशः अनुभूती मी तरी घेतलेली नाही मात्र हे विधान अनेक ठिकाणी प्रमाण म्हणून स्वीकारल्याचे वाचनात आले आहे. याच्या जोडीला वेश्यांचा समावेश व्हायला हवा असे वाटते कारण वेश्यांचे मूळ शोधणे हे एक अत्यंत जिकीरीचे आणि कष्टप्रद कठीण काम आहे. या लेखात यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला अनेक कंगोरे आहेत जे कुणाला आवडतील तर कुणाला याचा तिरस्कार वाटू शकेल.

वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहायला गेलं तर जगातला हा एक प्राचीन उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे हे तत्व सर्वत्र लागू होते. याला आपला देशही अपवाद नाही. मराठी भाषा कोषात याची व्याख्या केली गेलीय. चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय. वेश्याव्यवसाय प्रामुख्याने स्त्रियाच करतात. परंतु प्राचीन काळापासून पुरुषांचाही यासाठी वापर झाल्याचा आढळतो मात्र त्याला व्यवसायचे स्वरूप मिळाले नाही. हल्ली मात्र 'जिगोलो'च्या रूपाने पुरुष वेश्यावृत्ती पहावयास मिळते. त्याच बरोबर किन्नरांचाही देहविक्री व्यवसाय जारी असल्याचे दिसून येतेय. वेश्याव्यवसाय हा जगातला सर्वात प्राचीन व्यवसाय आहे’ हे वाक्य घासून गुळगुळीत झालेलं आहे. तरीही, हा प्राचीन व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या इतिहासाबद्दल अनेक गोष्टी आजही लोकांना माहीत नसतात. अनेकांच्या मते ह्या व्यवसायातल्या स्त्रिया शोषितच असतात आणि त्या नेहमीच शोषित होत्या; किंवा, हा व्यवसाय जाणूनबुजून पत्करणं म्हणजे नैतिक अध:पतनच, असं मानणारे लोकही पुष्कळ आहेत. नाही तर ‘ही आमची बावनखणी, काय तिथल्या लावण्यखणी'; 'गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी' अशा प्रकारचे उमाळे काढणारे लोकही खूप असतात. वेश्याव्यवसायाचा इतिहास पाहिला, तर त्यात शोषण आणि शौक दोन्ही आढळतात हे खरंच आहे; पण सांगण्यासारखं आणखी वेगळं त्यात काही सापडेल का ?

वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. स्त्रियांनी पैसे मोजून पुरुष वेश्यांकडून लैंगिक सुख घेण्याचा प्रकार अस्तित्वात असला, तरी तो अल्प प्रमाणात आढळतो. वेश्याव्यवसायातील व्यक्तीची मोबदला देणाऱ्या अनेक व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवण्याची तयारी असते. पण क्वचित आपल्या ग्राहकाची निवड त्याचे वय, आरोग्य, वंश वा जात असे निकष लावून करणाऱ्या वेश्याही आढळतात.

वेश्याव्यवसाय हा जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. इतर अनेकविध कारणांप्रमाणेच काही अनिष्ट अशा धार्मिक व सामाजिक रूढी-परंपरांतूनही या व्यवसायाला चालना मिळाली. आपल्याकडची देवदासींची प्रथा याच वर्गात मोडते. वेश्या व्यवसायाचा इतिहास मानव जेंव्हापासून समूह करून राहू लागला तेंव्हापासूनचा आहे. केतकर ज्ञानकोशात याची तपशीलवार व्याख्या देण्यात आलीय. त्यातील काही मजकूर इथे देतोय. मानवसमाज जेव्हा वसाहती करून स्थिर, सामुदायिक जीवन जगू लागला, तेव्हा लैंगिक संबंधांवर अनेक प्रकारचे नीतिनियम व निर्बंध लादण्यात आले. प्रस्थापित कुटुंबसंस्था व त्यासाठी रूढ अशी विवाहसंस्था ही सामाजिक स्थैर्यासाठी आवश्यकच होती. त्यामुळे काही प्रकारचे लैंगिक संबंध हे समाजमान्य व प्रतिष्ठेसाठी अनिवार्य ठरले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील निकटवर्ती नात्यागोत्यांतील व्यक्तींना परस्परांत लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त करण्यासाठी कठोर नियमने अस्तित्वात आली. उदा. आई-मुलगा, वडील-मुलगी, बहिण-भाऊ अशा निकटच्या नात्यांतील अगम्य आप्तसंभोग सर्वच समाजांत निषिद्ध मानला जातो. प्रत्येक समाजात विवाहसंस्था भक्कम राखणे, औरस संततीचे संगोपन व कुटुंबसंस्थेचे संवर्धन करणे, ही सामाजिक व्यवस्थेची अविभाज्य अंगे मानली जात. मात्र अनिर्बंधिक लैंगिक संबंध ठेवण्याबाबत सामाजिक नियम नेहमी संदिग्ध राहिले. विशेषत: पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्या-व्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. वेश्यावृत्तीला एका बाजूने निषिद्ध मानले जाते व वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीदेखील वेश्याव्यवसाय प्रत्यके समाजव्यवस्थेत, प्रत्येक काळात पाय रोवून उभा राहिलेला आढळतो.

मानवाचे लैंगिक जीवन हे साधारणत: संस्कार व रूढी यांनुसार आकारित होते. स्त्री-पुरुष संबंधांना सहजप्रवृत्तीनुसार किंवा वैयक्तिक इच्छेनुसार व्यक्त करण्याची पूर्ण मुभा प्रगत मानवी समाजांत नाही. कायद्याने व सामाजिक रूढींमुळे विवाहाखेरीज लैंगिक संबंध ठेवणे अमान्य ठरते, तरीदेखील वेश्याव्यवसायाचे प्रचलन टाळता येत नाही. ह्याला विविध कारणे संभवतात ; लैंगिक संबंध केव्हाही व वेगवेगळ्या रूपात ठेवणे फक्त मानवालाच शक्य असते. वैयक्तिक शारीरीक सुखासाठी तसेच विशिष्ट हेतू साधण्याच्या दृष्टीनेही लैंगिक संबंधांचा उपयोग होऊ शकतो. जेव्हा लैंगिक संबंध आर्थिक मोबदल्याकरिता अथवा इतर प्रकारचे हेतू साध्य करण्याकरिता (शारीरिक गरज व प्रजनन सोडून) ठेवले जातात, तेव्हा वेश्यावृत्तीची व वेश्याव्यवसायाची सुरुवात होते. मानवी व्यवहार हे सहज प्रवृत्तीपेक्षा बुद्धिपुरस्सरतेवर अवलंबून असल्याचा हा परिणाम आहे. विशेषत: ज्या समाजात लैंगिक संबंधांवर फारशी बंधने नाहीत, तेथे वेश्याव्यवसायाची सामाजिक प्रश्न म्हणून तीव्रता कमी असते, तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या समस्याही सौम्य असतात. उदा. नेदरलँडसमध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो व त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध स्वखुषीने ठेवण्याच्या व्यवहाराला जरी समाजमान्यता नसली, तरी त्यात आर्थिक मोबदल्याची देवाणघेवाण नसल्याने ती वेश्यावृत्ती ठरत नाही. वेश्याव्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुतांश समाजामध्ये हेटाळणीचा असला, तरीदेखील एक सामाजिक वस्तुस्थिती या दृष्टीने ते मानवी व्यवहाराचे अविभाज्य अंग बनले आहे, असेही मत आढळते. मात्र व्यक्तिगत कल्याणाच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. कारण हे मत जर योग्य आणि नैतिक मानले तर ठराविक स्त्रियांच्या शोषणाचा अधिकार समाजाला आपसूक प्राप्त होतो आणि त्याला अधिष्ठान दिल्यासारखे होईल.

वेश्याव्यवसाय जगभरात कशा पद्धतीने अस्तित्वात होता याची माहिती वेधक आहे. प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पत्करावा लागे. बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये विवाहपूर्वी मुलींना इश्तार या देवतेला अर्पण करीत व तेथील राजपुरोहिताबरोबर संबंध आल्यानंतर ती विवाहयोग्य समजली जाई. इश्तार ही सुफलतेची देवता मानली होती व तिच्या मंदिरात धार्मिक मान्यतेने वेश्याव्यवसाय चाले. प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती स्वतंत्र व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे व नवविवाहित दांपत्याबरोबर अनेक रखेल्या (कॉंक्यूबाइन्स) पाठवल्या जात. रूढी व परंपरेमुळे ही प्रथा समाजात दृढमूल झाली. जपानी संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाला अतिशय महत्त्व होते. आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला 'जोरो' असे संबोधले जाई व तिची प्रतिष्ठा कमी होत नसे.

प्राचीन ग्रीक समाजात 'हिटायरा' (चांगल्या मैत्रिणी) हा उच्चवर्गीय वेश्यांचा प्रकार होता. रोमन संस्कृतीतही प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि बहुश्रुत गणिका आढळत. त्यांपैकी थिओडोराची कहाणी विलक्षण आहे. तिच्या सौंदर्यावर आणि बुद्धिमत्तेवर रोमन राजपुत्र पहिला जस्टिनिअन भाळला. रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती, पण त्यांना विशिष्ट कपडे वापरावे लागत आणि केस तांबूस, पिंगट रंगात रंगवावे लागत. तसेच वेश्यांना गावातील विशिष्ट भागात वास्तव्य करावे लागे, वेश्याव्यवसायासाठी परवाना घ्यावा लागे व वेश्यांच्या उत्पन्नावर कर आकारला जाई. ग्रीसमधील अतिशय सुशिक्षित स्त्रियात वेश्यापैकींच काही असत. तर रोममध्ये अत्युच्च दर्जाच्या स्त्रिया आपली वेश्यावर्गांत गणना करून घेत असत. ग्रीक संस्कृतीत वेश्यांचे जे विविध प्रकार होते, त्यांत भारतीय गणिकांप्रमाणे ‘हिटायरा’ (hetaíra) हा वर्ग अतिशय प्रतिष्ठित होता. त्या सुशिक्षित असत. त्यांना आपली मालमत्ता राखण्याचं स्वातंत्र्य होतं. (वेश्यांना किंवा गरती स्त्रियांना हे स्वातंत्र्य नव्हतं.) त्यांची राहणी विलासी असे. डिमॉस्थिनीझ (इसवीसन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस कालखंड ) ह्या अथेनियन वक्त्याचे उद्‌गार असे होते - 'हिटायरा ह्या आपर सुखाच्या अपेक्षेने पदरी बाळगतो, रखेल्या ह्या आपल्या दैनंदिन व्यक्तिगत देखभालीसाठी असतात, तर पत्नी वैध संतती देण्यासाठी व इमानेइतबारे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असते'. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात अथेन्समधल्या ऍस्पेझिया नावाच्या हिटायराकडे विविध क्षेत्रांतले महत्त्वाचे लोक येत असत. सुशिक्षित असल्यामुळे ती सार्वजनिक वादविवादांत भाग घेत असे. पेरीक्लीज ह्या अथेन्समधल्या एका महत्त्वाच्या मुत्सद्दयाची ती सखी होती. ज्या काळात स्त्रियांचं समाजातलं स्थान फारसं महत्त्वाचं नव्हतं, अशा काळातही पेरीक्लीजसारख्या प्रभावशाली माणसावर तिच्या विचारांचा प्रभाव होता. तत्त्वज्ञ सॉक्रेटिस आणि नाटककार सोफोक्लीजही तिच्याकडे चर्चेसाठी येत असत. तिचं घर हे अथेन्समधलं एक प्रमुख सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्र होतं. त्या काळात अथेन्समधल्या प्रतिष्ठित स्त्रियांनाही एक ‘पालक’ असणं बंधनकारक होतं; इतर अनेक स्त्रिया तर गुलामच असत. त्यामुळे ऍस्पेझिया अशा काळातली एक स्वतंत्र स्त्री होती हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे. मध्ययुगीन युरोपातल्या प्रतिष्ठित वेश्यांना Courtesan ही संज्ञा रूढ होती. सोळाव्या शतकात व्हेनिसमधली व्हेरोनिका फ्रँको ही कूर्तिझान विशेष प्रसिद्ध होती. भोगविलासाचं शहर म्हणूनही पॅरिसची ख्याती होती. पॅरिसच्या प्रसिद्ध नाईटलाईफच्या जडणघडणीत अनेक घटकांचा सहभाग होता. ‘पॅरिसच्या सम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कूर्तिझान स्त्रियांचाही त्यात समावेश होता.

वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्याविषयी बायबलच्या 'जुन्या करारा' त निर्देश आढळतात. पेगन वेश्या ज्यू समाजाला धोकादायक असल्याची समजूत होती. ज्यू पित्यांनी आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करावे, असे निर्बंध होते. आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य असे दुष्कृत्य मानले. सेंट ऑगस्टीनने (इसवीसन पूर्व तीनशे चोपन्न ते चारशे तीस) म्हटले आहे, की मानवी वासनेला वेश्यांनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील. मध्ययुगात युरोपमध्ये सर्वच मोठ्या नगरांतून सार्वजनिक वेश्यागृहे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यांना कायद्याचे संरक्षण व आधार होता आणि वेश्याव्यवसायाला परवानाही दिला जात असे. सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये वेश्याव्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा वाटा मोठा होता. सोळाव्या शतकात गुप्तरोगाची संसर्गजन्य साथ सर्वत्र पसरली; तेव्हा वेश्याव्यवसायावर कडक नियंत्रणे लादली गेली. धर्मसुधारणा आंदोलनामुळे (सोळावे शतक) लैंगिक वर्तनासंबंधीचे नवे नीतिनियम प्रस्थापित झाले व त्यातूनही वेश्याव्यवसायाला पायबंद बसला. परिणामी युरोपमधील अनेक वेश्यागृहे बंद पडली. गुप्तरोगाच्या बळींची संख्या जशी वाढत गेली, तसे या व्यवसायावरचे निर्बंध जास्तच कडक झाले. स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करण्यात आले.

रेड लाईट एरियाचा इतिहास अभ्यासताना हा शब्द कोठून आला याची माहिती मतमतांतराने युक्त आहे पण रंजक आहे. रेड लाईट डिस्ट्रिक्टस् वा प्लेजर डिस्ट्रिक्ट हा शब्द पाश्चिमात्य देशातून आलाय. वेश्यावृत्ती वा सेक्ससंबधित व्यवसाय असा याचा मोघम अर्थ अपेक्षित आहे. यात सेक्सशॉप्स, स्ट्रिप क्लब्ज आणि प्रौढांकरिताची थियेटर्स याचा समावेश होतो. जगभरातील मोठ्या शहरात असे रेड लाईट डिस्ट्रिक्टस अस्तित्वात आहेत. 'रेड लाईट' ही संज्ञा अस्तित्वात येण्याचं कारण म्हणजे त्या काळात कुंटणखाण्यांवर टांगलेले लाल दिवे. जेणेकरून तिथे काय चालते याचा होरा लोकांना यावा. 'वुमन्स ख्रिश्चन टेम्परन्स युनियन'च्या अठराशे ब्याऐंशी सालीच्या बैठकीच्या मिनटसमध्ये ही संज्ञा लेखी स्वरुपात सर्वात आधी आढळली. तर ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार याचे पहिले अवतरण अठराशे चौऱ्यान्नव मध्ये प्रकाशित झालेल्या ओहिओ प्रांतातील सॅण्डुस्की शहरातल्या 'सॅण्डुस्की रजिस्टर' नामक वृत्तपत्रात आहे. लेखक पॉल वेलमन सुचवतात की, हा उल्लेख आणि अमेरिकन ओल्ड वेस्टशी संबंधित याच अर्थाचे अन्य उल्लेख कन्सास प्रांतातील डॉज शहरातील संदर्भाशी संलग्न आहे. एकोणीसाव्या शतकात इथे रेड लाईट हाऊस सलून्स होते. पण याची खातरजमा अद्यापही झालेली नाही, हा तेथील लोककथांचा लोकोपवाद असू शकतो असं काहींचं मत आहे. यानुसार प्रारंभीच्या काळातील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या कारागिरांना सुरक्षिततेचे साधन म्हणून दिलेले लाल प्रकाशाचे कंदील दिलेले असत. मुक्कामाच्या वेळी ते या सलून्समध्ये जात आणि आपल्या क्रूमधील अन्य सदस्यांना आपण कुठे आहोत हे लक्षात यावं म्हणून ते त्या सलून्सवर कंदील टांगून ठेवत. त्यांच्या सहकाऱ्यांना कळावं म्हणून त्यांनी ही युक्ती वापरली पण कालांतराने सर्वच लोक या लाल दिव्यांच्या घरांना वेश्यावृत्ती चालणारी घरे म्हणून ओळखू लागली आणि तेथूनच 'रेड लाईट एरिया' हा शब्द अस्तित्वात आला.

रेड लाईट डिस्ट्रिक्टस् पौर्वात्य देशात 'आकासें' (akasen) या जपानी संज्ञेने ओळखले जाते. याचा जपानी भाषेतला अर्थ 'लाल रेषा' असा होतो. जपानी प्रशासनाने जेंव्हा प्राथमिक शहरी नकाशे बनवले होते तेंव्हा वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या भागाला लाल रेषेत वेगळे दाखवले होते, तेथून या भागास हे नाव रूढ झाले. त्याच वेळी या नकाशांत काही भाग निळ्या रेषातदेखील दर्शवला होता ज्याचा अर्थ बेकायदेशीर भाग (aosen) असा होता. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात 'स्पोर्टिंग डिस्ट्रिक्टस्' ही संज्ञा खूप लोकप्रिय झाली होती पण तिचा अर्थ वैध 'रेड लाईट डिस्ट्रिक्टस्' असा होता. त्या त्या शहरातील महापालिका प्रशासनांना या व्यवसायाच्या नियमनाचे अधिकार दिलेले होते. आताच्या नेदरलँड्समधील डी वॉलेन हे शहर असो की जर्मनीमधील रिपेरबान शहर असो, तिथे वैध वेश्यावृत्ती नियमनाची हीच प्रशासकीय पद्धत आजही अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेल्या हेग शहरात रेड लाईट डिस्ट्रिक्टसचा पूर्ण इलाखा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत आहे.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत युरोपात, अमेरिकेत कुंटणखाणे व वेश्यावस्ती प्रत्येक मोठ्या शहरात होती. युद्धकाळात वेश्याव्यवसायाला चालना मिळाली. मात्र युद्धोत्तर काळात बदलत्या नीतीमूल्यांमुळे तेथील समाजांतील लैंगिक निर्बंध हळूहळू सैल होत गेले आणि स्वैर, अनिर्बंध व मुक्त लैंगिक संबंधांचे प्रमाण खूपच वाढले. विवाहपूर्व तसेच विवाहबाह्य संबंध, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेचे विघटन या सर्व घडामोडींमुळे वेश्यावृत्तीचे स्वरूप पालटले. उच्चवर्गीय, नोकरदार स्त्रियांमध्येही `कॉलगर्ल' म्हणून पैसे कमावण्याची प्रवृत्ती काही प्रमाणत वाढीस लागली. तसेच वेश्याव्यवसायाशी निगडित इतर अनैतिक व्यवहार व अंमली पदार्थांच्या व्यापारासारखी गुन्हेगारी कृत्ये वाढीस लागली. मद्यपानगृहाच्या माध्यमातून वेश्या पुरवल्या जाऊ लागल्या. एड्‌ससारख्या भयंकर रोगाचा फैलाव झाला. पश्चिमी जगातल्या बहुतेक मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसाय खपवून घेतला जात असला, तरी या व्यवसायाशी निगडित असलेल्या गुन्हेगारीवर मात्र कायद्याने कडक कारवाई केली जाते. ब्रिटिश संसदेने एकोणीसशे एकोणसाठमध्ये केलेल्या कायद्यानुसार वेश्यांना उघडपणे खुल्या जागी गिऱ्हाईके पटवण्यावर मनाई आहे; मात्र त्यांना घरबसल्या हा व्यवसाय चालवता येतो. तथापि ज्यांना या व्यवसायातून बाहेर पडावयाचे आहे, त्यांना पुनर्वसनासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले जाते. स्कॅंडिनेव्हियन देशांतले (मुख्यत: डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन) या व्यवसायावरचे निर्बंध हे मुख्यत्वे आरोग्यविषयक बाबींसंबंधी आहेत. अमेरिकेत सर्व राज्यांत कायद्याने वेश्याव्यवसाय निषिद्ध ठरविला असला, तरीदेखील वेश्यावृत्तीला बांध घालणे तेथेही अशक्य ठरले आहे.

वेश्याव्यवसायास कारणीभूत ठरणारे घटक : कोणत्याही समाजात वेश्यावृत्ती व वेश्याव्यवसाय निर्माण होण्यास व फोफावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेकविध घटकांमध्ये मुख्यत्वे पुढील बाबींचा समावेश होतो - वेश्याव्यवसायास चालना देणाऱ्या प्रेरक घटकांमध्ये स्त्रियांची कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची ठरते. आईवडीलांमधील सततचे तणाव व संघर्ष, व्यसनाधीन वडील किंवा वेश्याव्यवसाय करणारी आई-बहीण असणे, अशा परिस्थितीमुळे स्त्रीवर ही आपत्ती ओढवू शकते. स्त्रीला वेश्याव्यवसायाकडे आकृष्ट करणारे घटक मुख्यत: आर्थिक स्वरूपाचे असतात. दारिद्रय व उपासमारीमुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना फसवून, नोकरीची वा विवाहाची खोटी आमिषे दाखवून कुंटणखान्यात आणून विकले जाते. अनाथ तसेच परित्यक्ता स्त्रियांना कधीकधी शरीरविक्रयावाचून इलाज उरत नाही. त्याचप्रमाणे चंगळवादी शहरी संस्कृतीमुळे अधिक पैसा कमविण्याकरिता काही स्त्रिया 'कॉलगर्ल' चा व्यवसाय पत्करतात. यांतील काही नोकरीच्या व्यतिरिक्त कमाईसाठी कुमार्गाला वळतात. शहरातील हॉटेले, क्लब व इतर मनोरंजनाच्या ठिकाणी या स्त्रियांचे दलाल गिऱ्हाईक पटवितात व अनैतिक व्यवहारांना संघटित स्वरूप प्राप्त होते. वेश्याव्यवसाय पत्करण्यामागचे निर्णायक घटक (प्रिसिपिटेटिंग फॅक्टर्स) हे प्रामुख्याने निराधार व फसविल्या गेलेल्या स्त्रियांच्या बाबतीत बलवत्तर ठरतात. कुमारी मातांना कुटुंबातून बहिष्कृत केले गेल्यास त्यांची दयनीय परिस्थिती होते. अशिक्षित व गरीब मुलींना असाहाय्यतेमुळे वेश्याव्यवसाय करावा लागतो.

समाजात वेश्याव्यवसाय फैलवण्यामागे आणखीही काही निर्णायक घटक कार्यरत असतात. विवाह हा लैंगिक गरजा भागविण्याचा रीतसर मार्ग असला, तरी त्याद्वारे समाजातील सर्वच स्त्रीपुरुषांच्या सर्व प्रकारच्या शारीरिक गरजा भागवल्या जातातच, असे नाही. अनेक कारणांनी विवाहासारखा पर्याय काही व्यक्तींच्या बाबत कधी दुर्लभ, तर कधी असफल ठरतो. अशा परिस्थितीतील पुरुषांना विवाहबाह्य संबंध ठेवणे शक्य होत नाही. वेश्यांबरोबर संबंध ठेवणे सोपे जाते, कारण तेथे परस्परांबद्दलचे भावनिक आकर्षण, प्रेम, बांधिलकी, निष्ठा यांचा पूर्ण अभाव असतो. पैशाच्या मोबदल्यात शारीरिक गरज भागू शकते. अनेकवेळा विकृत किंवा अनैसर्गिक गरजा भागविण्यासाठी वेश्यांचा उपयोग घेतला जातो. शहरीकरणामुळे व दारिद्र्यामुळे शहरात कामासाठी एकटे राहणाऱ्याची संख्या वाढते. हुंड्यासारख्या प्रश्नांमुळे विवाहित स्त्रीला छळ व अवहेलना सोसावी लागते व स्वत:चा बचाव करण्याकरिता कधीकधी घर सोडावे लागते. या निराधार स्त्रियांची विटंबना टळू शकत नाही व त्यांना अनिच्छेने या व्यवसायात ओढले जाते. लैंगिक संबंधांविषयीचे अज्ञान तसेच संपर्कमाध्यमांतून दाखविले जाणारे अश्लील व बीभत्स स्त्री-पुरुष संबंध यांचा प्रभाव तरुण अजाण मुलामुलींच्या अध:पतनास कारणीभूत होतो. तरुण मुलींच्या वाट्याला अकाली मातृत्व व बहिष्कार आल्यामुळे त्या या व्यवसायात पडतात.

वेश्याव्यवसायाचे काही सामाजिक दुष्परिणाम संभवतात. वेश्याव्यवसायाच्या आडोशाने संघटित गुन्हेगारीचे एक अधोविश्व फोफावण्याचीही शक्यता असते. महानगरांतील भरमसाट वाढत जाणारी लोकसंख्या, नोकरीधंद्यानिमित्ताने शहरांकडे धाव घेणाऱ्या बेकार व एकाकी तरुणांचे तांडे, त्यांच्या लैंगिक गरजा भागविण्यासाठी व दारिद्र्यापोटी वेश्याव्यवसाय पतकरणाऱ्या असहाय्य, अनाथ, दीनदुबळ्या तरुणींची वाढती संख्या इ. कारणांस्तव संघटित गुन्हेगारी फोफावते व अनैतिक व्यवहारांचे जाळेही पसरत जाते. वेश्यावृत्तीला संघटित स्वरूप आल्यामुळे अनेक प्रकारच्या गुन्हेगारी व्यवहारांचा तो अड्डा बनतो. अंमली पदार्थांचा व्यापार, हातभट्टीचे व मद्यपानाचे अड्डे, नृत्यशाला, मसाज पार्लर इ. व्यवहार ह्या व्यवसायाच्या अवकाशात चालतात.

सर्व पुरुषप्रधान समाजव्यवस्थांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्यांबाबत दुटप्पी धोरण आढळून येते. स्त्रियांचे पावित्र्य व चारित्र्य यांसंबंधी काटेकोर नीतिनियम असले, तरी पुरुषांच्या बाबतीत मात्र नैतिक मूल्ये शिथिल होतात. ह्या भेदभावामुळे वेश्याव्यवसाय करणारी स्त्री कलंकित ठरते आणि समाजातून बहिष्कृत होते; पण वेश्यांची विक्री करणारे दलाल व कुंटणखाना चालविणारे चालक यांच्यावर मात्र सहसा कारवाई केली जात नाही. अनेक गुप्तरोगांची तसेच एड्‌ससारख्या जीवघेण्या रोगांची लागण व फैलाव वेश्यांमध्ये आणि त्यांच्यामार्फत समाजात होतो. वेश्यांचे वय वाढल्यावर त्यांना विपन्नावस्था येऊन आधार उरत नाही. कलंकित व शारीरिक व्याधींनी आणि विकृतींनी पछाडलेल्या स्त्रियांचा एक वेगळाच उपवर्ग तयार होतो. एकमेकींना आधार देऊन त्या जगतात, कारण बाह्य जगाशी त्यांचा संबंध तुटून जातो. मुंबई, पुणे, कोलकाता यांसारख्या महानगरांत वेश्यावस्तीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अशा वस्तीमध्ये अनेक प्रकारचे अनैतिक व बेकायदेशीर व्यवहार चालतात. बँकॉकसारख्या जागतिक पर्यटनकेंद्र असलेल्या शहरामध्ये वेश्याव्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो. मोठमोठ्या हॉटेलांमध्ये दलाली चालते व गिऱ्हाईकांना मुली पुरवण्याचा जोडधंदा चालतो. विकसनशील व गरीब असलेल्या देशांमधील बेकारी, दारिद्रय व गुन्हेगारी यांचे वाढते प्रमाण, तसेच भोगवादी संस्कृती व स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा हे घटक वेश्याव्यवसायाच्या वाढीला कारणीभूत ठरतात. या प्रश्नाच्या मुळाशी दारिद्रय व शोषण आहे. जोपर्यंत 'मागणी तसा पुरवठा' हे तत्त्व लैंगिक संबंधांबाबत राबविले जाते, तोपर्यंत या व्यवसायाला पूर्ण आळा घालणे कठीण आहे. वेश्याव्यवसायात अनेक व्यक्तींचा व संस्थात्मक रूढींचा सहभाग असतो. देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, कुंटणखाने चालविणाऱ्या कुंटिणी, दलाल इत्यादींचा मिळून एक भिन्न प्रकारचा गट तयार होतो. सर्वसाधारण समाजापासून हा समुदाय विलग्न असतो आणि उपेक्षा व शोषण यांचे लक्ष्य ठरतो.

जगभरातील वेश्याव्यवसायाची स्थिती अभ्यासताना आपल्याकडील अवस्थेवर देखील प्रकाश टाकल्यास नेमकी परिस्थिती कळते. भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. वेदवाड्:मयांत देखील वेश्याव्यापाराविषयीं उल्लेख आढळतात. पुंश्चली, महानग्नी, रामा वगैरे शब्द वेश्या अर्थाचे होत. वाजसनेयी संहितेत हा एक धंदा म्हणून उल्लेखिला आहे. ऋग्वेदात अशा स्त्रीला 'साधारिणी' म्हणून संबोधले जाई. पुरुषांना, विशेषत: धनिकांना, अमीर-उमरावांना कामवासनेच्या पूर्तीसाठी रखेल्या ठेवण्याची किंवा वेश्यांकडे जाण्याची मुभा होती. 'धर्मसूत्रां'त वेश्यांसंबंधी अनेक विचार प्रकट केलेले आहेत. गौतम धर्मसूत्रात वेश्याव्यवसायाबद्दल माहिती आहे. अशा स्त्रियांच्या दयनीय अवस्थेबद्दल उल्लेख करून त्यांच्या विविध स्तरांची कल्पना धर्मशास्त्रात दिलेली आहे. गौतम ऋषींनी 'दासी', गणिका' व 'पण्य स्त्री' असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे. दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई. नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई. 'मृच्छकटिक' या संस्कृत नाटकातील नायिका वसंतसेना ही गणिका सुसंस्कृत व कलावती म्हणून वर्णिली आहे.

महाभारत काळात, राजाच्या दरबारात नृत्यगायन क्षेत्रातील कलावंतिणी राजाच्या छत्राखाली आपली कला जोपासून दरबारात मनोरंजन करीत. महाभारताच्या 'आदिपर्वा'त गांधारीच्या अनुपस्थितीत, धृतराष्ट्राची सेवा अशा दासींकडून होत असल्याचे म्हटले आहे. 'उद्योगपर्वा'त देखील कौरवांच्या दासींचा उल्लेख आहे. या स्त्रिया राजदरबारातील नर्तिकाही असत व राजघराण्यातील पुरुषांच्या रखेल्याही असत. मत्स्यपुराणात वेश्यांची विविध कर्तव्ये नमूद केली आहेत. बौद्ध काळात ( इसवीसन पूर्व सातशे ते पाचशे वर्षे ) अनेक धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरे घडली. बौद्ध मठांमध्ये गणिकांना प्रवेश दिला जात असे. जातककथांमध्ये तसेच अन्य बौद्ध वाङ्‌मयातही 'आम्रपाली' या नृत्यनिपूण गणिकेसंबंधीचे उल्लेख आढळतात, जिला नगरवधू घोषित केले गेले होते. सुमारे पाचशे वर्षे बौद्ध धर्माचा अंमल भारतीय समाजावर राहिला, त्या काळात वेश्येला बहिष्कृत केले जात नसावे. गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा होती. गणिकेला राजाकडून सन्मान व गुणीजनांकडून प्रशंसा लाभत असे, असा उल्लेख नाट्यशास्त्रात आढळतो. ती अभिगमनास व चिंतन करण्यास योग्य अशी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

कौटिलीय अर्थशास्त्रात (इसवीसन पूर्व चौथे शतक) वेश्यांचे नऊ वर्ग वर्णिले आहेत. तसेच वेश्याव्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली दिली आहे. वेश्यांच्या उत्पन्नावर करवसुलीचा अधिकार राजाला असल्याचे नमूद केलेले आहे. राजदरबारात वेश्यांना असलेल्या प्रतिष्ठेचा उल्लेख कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात केला आहे. वात्स्यायनाने रचलेल्या कामसूत्र (इ. स. तिसरे वा चौथे शतक) ग्रंथातील 'वैशिक' या अधिकरणामध्ये विविध प्रकारच्या वेश्यांसंबंधी माहिती आली आहे. या काळात वेश्यागमन जरी समाजमान्य असले, तरी विविध जातींच्या वेश्यांना वेगवेगळे स्थान असावे. कामसूत्रामध्ये कुंभदासी, परिचारिका, स्वैरिणी, कुलटा, नटी, शिल्पकारिका, रूपाजीवा व गणिका असे वर्ग नमूद केले आहेत. ज्या वेश्येला चौसष्ट कला अवगत आहेत. ती 'गणिका' होय. भारतात गणिकांची मोठी परंपरा आहे. त्या सुशिक्षित असत. काव्य-कला-शास्त्रादि विद्यांत त्या निपुण असत. त्यामुळे निव्वळ देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा त्या वरच्या दर्जाच्या असत. त्यांना समाजात प्रतिष्ठा होती. मंगल कार्यं, सणसमारंभ अशा प्रसंगी त्यांची उपस्थिती शुभ मानली जाई. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र परतले आणि भरताला भेटले, तेव्हा ‘घोडे, हत्ती आणि गणिका ह्यांचा क्रिडेकरिता वापर करत होतास किंवा नाही?’ असा प्रश्न त्यांनी भरताला विचारला होता (संदर्भ : ‘बावनखणी’ – द. ग. गोडसे). रतिक्रीडा ही अखेर क्रीडा असे ; त्यामुळे त्यात काही वावगं समजलं जात नसे. पुरुषांना वश करण्याच्या गणिकांच्या क्षमतेमुळे गुप्तचर म्हणूनही त्यांचा वापर केला जाई. कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार हा व्यवसाय वंशपरंपरागत नव्हता ; तर त्यात प्रवेश करण्याआधी पुष्कळ प्रशिक्षण घ्यावं लागत असे. गणिकांच्या वर्तनावर शासकीय नियंत्रण असे. त्यांनी नियमबाह्य वर्तन केलं तर त्यांना कठोर शिक्षा किंवा दंड होई. एखाद्या पुरुषाला रिझवण्याविषयीच्या राजाज्ञेविरोधात जाऊन गणिकेनं जर ते करायला नकार दिला, तर तिला शिक्षा होई. गणिकांना कर भरावा लागे. थोडक्यात, इतर स्त्रियांपेक्षा त्या स्वतंत्र आणि प्रतिष्ठित होत्या, तरीही त्या राजसत्तेच्या अधीन होत्या. तत्कालीन सत्ताधारी वर्गाच्या मर्जीनुसार वेगवेगळ्या काळांत भारतीय गणिका कमीअधिक प्रमाणात स्वतंत्र होत्या.

या काळातील समाजव्यवस्थेत वेश्याव्यवसायाला विशिष्ट स्थान व दर्जा दिलेला आहे. समाजाचे ते एक अविभाज्य अंग असावे. जैन राजांच्या कारकीर्दीमध्ये (इ. स. दुसरे शतक) राजदरबारातील कलावंतीण ही राजाची रखेली असे व तिने इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे निषिद्ध होते. मात्र सामान्यजनांना रिझविणाऱ्या 'सामान्य वेश्या' इतर वर्गांतील पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकत. मात्र काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट होऊन त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर-उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला. चाणक्यनीतीसार या ग्रंथात सामान्य वेश्यांची दयनीय अवस्था वर्णिली आहे.

भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही 'अखंड सौभाग्यवती' म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. लैंगिक संबंधाचे नियमन करताना पारंपरिक समाजात विविध रूढी-परंपरेमुळे काही प्रमाणात विवाहबाह्य संबंधांना मान्यता होती. भारतातील रूढी - परंपरांनुसार काही धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा देवदासी प्रथेला पोषक ठरल्या. तिसऱ्या शतकातील धार्मिक ग्रंथांत व साहित्यामध्ये या प्रथेचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदामध्ये देवदासींना 'गंधर्व गृहिता' असे म्हटले आहे. कालिदासाच्या 'मेघदूत'मध्ये देवदासींचे काव्यात्म वर्णन आढळते. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथात सातव्या शतकापासून ही प्रथा उत्तर भारतात रूढ असल्याचे म्हटले आहे. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात नृत्यनिपुण देवदासी होत्या. महाराष्ट्रातही खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पत्करत. मुरळीचे जीवन थोडेफार सुकर होऊ शकले पण देवदासींना ते सुख अजूनही पुर्णत्वे मिळालेलं नाही. सहवीस फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस रोजी देवदासीच्या नांवाखालीं होणारा वेश्याव्यापार बंद करण्याच्या दुसर्‍या कायद्याचा ठराव लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सर माल्कम हेले यांनी आणला होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाराला शिक्षा करण्याची तरतूद पीनल कोडांत पूर्वीच केलेली होती. तशा कृत्याला मदत करणाराला शिक्षा करण्याचा या विधेयकाचा हेतु होता. हा मुद्दा विशेष आहे. यात आपला देहविक्रय करण्यास कबुली देण्याच्या बाबतीत स्त्रीचे वय कमींत कमी सोळा वर्षाचे असावे असे त्यांनी सुचविले होते. अब्रूच्या बाबतींत निर्णय करण्यास हे वय निदान अठरा तरी असावें अशी नी. म. जोशी यांनी सूचना आणली होती ती शेवटी मंजूर झाली पण या ठरावाची अमंलबजावणी सरकारने आपल्या हाती घेतली.

भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर या व्यवसायाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले, उदा. कोलकाता व मुंबई येथील यूरोपीय व्यापाऱ्याच्या सोयीसाठी, ब्रिटीश सैन्याच्या शारीरिक सुखासाठी कुंटणखाणे निर्माण झाले. कोलकाता शहरातील कलिंगा बाजार व चितपूर येथील वेश्यावस्तीसंबंधीचे उल्लेख तत्कालीन जनगणनेत सापडतात. बंगालमध्ये 'कुलीन' पद्धतीमुळे ब्राह्मणांना बहुविवाह करण्यास मुभा होती. कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी अनेक आईबाप भरमसाट हुंडा देऊन आपली मुलगी उच्चजातीय ब्राह्मणांना देऊ करीत. जरठ पतीच्या निधनामुळे अनेक अश्राप मुली बालविधवा होत. ज्या सती जात नसत, त्यांची अवहेलना होई व त्यामुळे त्यांना कुंटणखान्यात आश्रय घ्यावा लागे. तत्कालीन बंगाली साहित्यातदेखील कलानिपुण वेश्यासंबंधी उल्लेख आढळतात. शरत्‌चंद्र चतर्जींच्या 'श्रीकांत', 'देवदास' कादंबऱ्यामधून या स्त्रियांची संस्कृती व पिळवणूक यांचे चित्रण आढळते. श्रीमंत जमीनदार व व्यापारी रखेल्या ठेवणे ही प्रतिष्ठेची बाब समजत. रखेल्यांना 'बंधा' वेश्या म्हणत. त्यांना घरदार व दागदागिने दिले जात.

वेश्या ही कलंकित समजली जात असली, तरीदेखील या पेशासंबंधी परस्परविरोधी व संदिग्ध मतप्रणाल्या प्रचलित आहेत. स्त्रियांचे अपहरण करणे, कुंटणखाने चालविणे इ. कायद्याने निषिद्ध ठरविलेले असले, तरी या कायद्यांचा अंमल मर्यादित प्रमाणात आढळतो. एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतरच्या स्त्रीमुक्तिवादी चळवळीच्या प्रवर्तकांनी वेश्याव्यवसाय ‘अत्यंत हीन व स्त्रियांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व आणि आरोग्यास बाधक ठरलेला धंदा' असे म्हटले आहे. पितृसत्ताक विचारसरणीमुळे ही विदारक वस्तुस्थिती समाजात मान्यता पावते व केवळ कायद्याने तिचे निर्मूलन होऊ शकत नाही, या बाबीला या चळवळीच्या नेत्यांनी प्राधान्य दिले.

अलीकडील काळात या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय सामाजिक संस्थांचा (NGO) वाटा मोठा आहे. मुंबई शहरातील कुंटणखान्यांमधील बळजबरीने डांबलेल्या मुलींसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करतात. 'संवेदना' व 'समर्थन' या संस्थांतर्फे नेपाळ व इतर राज्यांतून फसवून आणलेल्या मुलींना साहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे 'प्रयास' ही संस्था महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी कार्यरत आहे. 'लालबत्ती' विभागात काम करणाऱ्या विविध संघटनांनी मुंबईच्या 'प्रेरणा' या संघटनेमार्फत 'नॅकसेट' कार्यजाळे सक्रिय केले आहे. कुंटणखान्यातील शोषित महिला व मुलींसाठी पुनर्वसनाचे काम यांद्वारे चालते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभागांत 'नॅकसेट' च्या सहयोगी संस्था आहेत. नगर जिल्ह्यातील 'स्नेहालय' ही अशीच एक सदस्य - संस्था आहे.

महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'संवेदना' ही संस्था एकोणीसशे ऐंशी सालापासून मुंबईतील कामाठीपुरा परिसरात अनेक उपक्रम राबविते. वेश्यांना आरोग्य, कायदेविषयक साहाय्य व पर्यायी रोजगाराबाबत मदत केली जाते. 'नारी संघर्ष पंचायत' या नावाने येथील वेश्यांनी स्वत:च संघटित होऊन स्वत:चे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. 'आशा' हा प्रकल्प मुंबई महापालिकेतर्फे, एडस्‌ व इतर यौन कर्माशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढविणे व उपचार करण्याबाबत ठोस काम करीत आहे. वरील प्रकल्पाशी संलग्न अशा तब्बल तीसेक संस्था वेश्यांमध्ये एडस्‌बाबत जागृती आणणे, ऐच्छिक रक्ततपासणी मोहिमा व निरोध (कंडोम) वापराबाबत माहिती देणे. इ. कामे करतात. मुंबईखेरीज इतर शहरांमध्येही स्वयंसेवी संस्थांचे कार्य चालते. नेटवर्क अगेन्स्ट कमर्शिअल सेक्स्युअल एक्सप्लॉयटेशन अँड ट्रॅफिकिंग ही नगरमधील स्वयंसेवी संस्था, लालबत्ती विभागात शरीरविक्रय व लैंगिक शोषणाविरुद्ध कार्य करीत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी वेश्यावस्ती कोलकत्यातील सोनागाची या भागात आहे. उत्तर कोलकत्यातील शोभा बाजारजवळील चित्तरंजन अव्हेन्यू येथे हा भाग आहे. तिथे नोव्हेंबर दोन हजार साली वारांगनांची परिषद झाली. या परिषदेस आशिया खंडातील अनेक देशांतील वेश्या उपस्थित राहिल्या. 'माणूस' म्हणून वेश्यांचे हक्क जपण्यासाठी व समाजात मिळणारी उपेक्षा कमी करण्यासंबंधी या परिषदेत आवाज उठविण्यात आला. या परिषदेचे संयोजन दुर्बार महिला समन्वय समिती या बंगालमधील महिलांच्या संस्थेने केले. येथील 'सोनागाची' प्रकल्पाद्वारे वेश्यांना एड्‌सबाबत माहिती मिळते. पुणे शहरामधील वंचित विकास ट्रस्टतर्फे 'निहार' हा एक लक्षणीय प्रकल्प चालविला जातो. एकोणीसचे एकोणनव्वद सालापासून येथे वेश्यांच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालविले जाते. या मुलांना पालनपोषण, शिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे कार्य चालू आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. स्त्रियांच्या प्रश्नावर विचार व कृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व पोलीस विभागाने सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. महिला व बालकल्याण संचालनालयातर्फे निराश्रित महिलांना नारी निकेतन संस्थातर्फे साहाय्य मिळते. मात्र सरकारी योजनांना जोड म्हणून स्वयंसेवी संस्थांचे या क्षेत्रातील कार्य अनिवार्य आहे.

कोलकता - सोनागाची, मुंबई - कामाठीपुरा, दिल्ली - जी.बी.रोड, मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर येथील रेशमपुरा, उत्तरप्रदेशच्या मेरठमधील कबाडी बाजार हे देशातील पाच सर्वात मोठे रेड लाईट एरिया आहेत. याखेरीज पुण्यातील बुधवार पेठ, वाराणसीमधील दालमंडी, युपीच्या सहारनपूरमधील नक्कास बाजार, बिहारच्या मुजफ्फरपूरमधील रेड लाईट एरिया आणि नागपूरमधील गंगा जमुना हे भाग देखील याचसाठी कुख्यात आहेत. पैकी कामाठीपुरा हा इंग्रजांनी वसवला होता. या माहितीतही एकमत नाही. सतराशे पंच्यान्नवमध्ये येथे आंध्रप्रदेशातून आलेल्या कामाठी महिलांनी देहविक्रयास प्रारंभ केला होता असेही सांगितले जाते तर अन्य माहितीनुसार अठराशे ऐंशीमध्ये ब्रिटिशांनी अधिकृत रित्या येथे चौदालेनमधून कामाठी वेश्यांना वसवले आणि ब्रिटीश सैनिकांच्या देहभुकेची तजवीज केली. यामुळेच या भागाचे नाव कामाठीपुरा पडले असेही सांगितले जाते. तर दिल्लीमधील गारस्टीन बस्टीन रोड(जीबी रोड)चे आधीचे नाव एकोणीसशे पासष्टमध्ये बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग असे ठेवण्यात आले होते पण ते नाव कधीच वापरात आले नाही. याच भौगोलिक भागात मुघल काळात पाच मोठे कोठे होते, जिथे जिस्मफरोशीचा धंदा चाले. ब्रिटिशांनी त्याचे संयुक्तिक स्वरूप बनवून त्याला स्वतंत्र वसाहतीत परिवर्तित केले. जीबी रोडचे वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेश आणि नेपाळमधून आणलेल्या मुलींचा इथे जास्ती भरणा असतो.

लेखाच्या अखेरीस थोडीशी आकडेवारी - यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य समजण्यास मदत होईल.
२००७ मधील आकडेवारीनुसार महिला व बाल विकास मंत्रालयाने भारतातील २.८ दशलक्ष सेक्स वर्कर्सची संख्या नोंदवली, त्यापैकी ३५.४७ टक्के स्त्रिया अठरा वर्षांआधीच्या वयात या व्यवसायात प्रवेश करतात. अलीकडील दशकात वेश्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
संपूर्ण भारतातील हजारपेक्षा जास्त रेड लाईट डिस्ट्रिक्टस असल्याचं यात म्हटलंय. वेश्यांच्या एकूण प्रमाणात एक तृतीयांश संख्या अज्ञान व कुमारिका मुलींची आहे.
दररोज भारतात सुमारे दोनशेहून अधिक मुली व महिला वेश्याव्यवसायात येतात. त्यांच्यापैकी ऐंशी टक्के मुली त्यांच्या इच्छेविरुद्ध ( संदर्भ- CEDPA आणि PRIDE, 1997) या व्यवसायात येतात.
मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की वेश्याव्यवसाय करणाऱ्या अल्पवयीन मुलींपैकी एकट्या कोलकाता शहरात ४.९% वेश्या शहरातच जन्माला येतात.
देशातील आणखी एक सर्वात मोठा चमडीबजार असलेला मुंबईतला रेड लाईट एरिया दीड लाख वेश्यांच्या संख्येवर जाऊन पोहोचलाय. (संदर्भ - फॅक्ट्स अँड फिगर्स अबाऊट प्रॉस्टिट्युशन). मुंबईतील विशिष्ट रेड लाईट एरियात पंच्याहत्तर हजार वेश्या आहेत, ज्यापैकी पन्नास टक्के एचआयव्ही बाधित आहेत.
'एशियन एज'च्या एकोणीसशे चौऱ्यान्नवच्या अहवालानुसार दिल्ली, मद्रास, कोलकाता, बंगलोर आणि हैदराबादमध्ये कमीतकमी सत्तर हजार सेक्स वर्कर्स होत्या. यापैकी तीस टक्के महिला वीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. तर चाळीस टक्के वेश्या वीस ते तीस वर्षे वयोगटाच्या होत्या. आणि अंदाजे एकूण वेश्यांपैकी पंधरा टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात बारा वर्षांखालील मुली वेश्या बनल्या.
दर वर्षी सुमारे सात हजार सेक्स वर्कर्स मुली नेपाळहून भारतात आणल्या जातात. पैकी सहासष्ट टक्के मुली ह्या अशा कुटुंबातून येतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ पाच हजार रुपयेच्या आसपास आहे. या मुली त्यांच्या पालकांकडूनच विकल्या जातात. जोडीनेच विवाहाच्या वादामुळे किंवा आकर्षक नोकरी किंवा अपहरण करून या मुलींना कुंटणखाण्याच्या मालकांना विकल्या जातात. यातील चाळीस ते पन्नास टक्के मुली अठरा वर्षाखालील असतात. धक्कादायक बाब अशी की पालकांच्या सहमतीने काही ठिकाणी नऊ किंवा दहा वर्षे वयोगटातील मुलींनाही वेश्याव्यवसायात ढकलले जातेय. भारतात आजवर सापडलेल्या केसेसमध्ये सहा वर्षे वयाच्या चाईल्ड सेक्स वर्कर मुलीचा समावेश आहे. जमीनीखालील बंकर्समध्ये या मुलींना दडवले जाते.

यात बेकायदेशीर कारवाया करण्यास प्रतिबंध करण्यापासून सरकारने कायदे केलेत. वेश्याव्यवसायाचा सामाजिक आलेख मांडताना याविषयीच्या कायदेशीर तरतुदींचा उल्लेख अनिवार्य ठरतो. मुंबई वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये (१९२३) वेश्येच्या उत्पन्नावर जगणे, हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यांपैकी देवदासीच्या नांवाखाली होणारा वेश्याव्यापार बंद करण्याच्या दुसर्‍या कायद्याचा ठराव तारीख सहवीस फेब्रुवारी एकोणीसशे तेवीस रोजी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सर माल्कम हेले यांनी आणला होता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाराला शिक्षा करण्याची तरतूद पीनल कोडमध्ये पूर्वीच केलेली होती. तशा कृत्याला मदत करणाराला शिक्षा करण्याचा या बिलाचा हेतू होता. हा यातील फरक लक्षांत ठेवण्यासारखा आहे. यात आपला देहविक्रय करण्यास कबुली देण्याच्या बाबतीत स्त्रीचे वय कमीत कमी सोळा वर्षाचे असावे असे त्यांनी सुचविले होते. अब्रूच्या बाबतीत निर्णय करण्यास हे वय निदान अठरा तरी असावे अशा नी. म. जोशी यांना सूचना आणली होती ती शेवटी पास झाली पण या ठरावाची अमंलबजावणी सरकारने आपल्या हातीं घेतली. भारतातील वेश्याव्यवसाय व अनैतिक व्यापारबंदी आणि अजाण मुलींचे संरक्षण या दृष्टीने झालेले कायदे पुढीलप्रमाणे आहेत : (१) वेश्या - व्यवसाय - प्रतिबंधक कायदा, मुंबई (१९२३) व सौराष्ट्र (१९५२); (२) अनैतिक व्यापारनिर्मूलन कायदा, मद्रास (१९३०), बंगाल (१९६३), उत्तर प्रदेश (१९३३), पंजाब (१९३५), बिहार व मध्य प्रदेश (१९५३), म्हैसूर (१९३०) व हैदराबाद (१९५२); (३) अजाण मुली संरक्षण कायदा, उत्तर प्रदेश (१९२६); (४) नाईक मुली- संरक्षण कायदा (१९९०); (५) देवदासी- प्रतिबंधक कायदा, मुंबई (१९३४) व चेन्नई (१९४७). संपूर्ण भारतासाठी १ मे १९५६ रोजी स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास बंदी करणारा कायदा (प्रिव्हेन्शन ऑफ द इम्मोरल ट्रॅफिकिंग ऍक्ट् - पीटा) लागू करण्यात आला. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन भारतीय पतित उद्धारण संघटना यांसारख्या बिगर शासकीय संस्थांनी जी पाहणी केली आहे (१९९३), तीनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वांत अधिक, म्हणजे साडेतीन लाख वेश्या होत्या. या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये अकराशे रेडलाईट क्षेत्रे असून सुमारे २३,८८,३३० वेश्या या धंद्यात आहेत. आजघडीला हा आकडा साठलाखाहून अधिक असल्याचे बोलले जाते. सरकारी व बिगरसरकारी पातळ्यांवरून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येतात. महिला व बालकल्याण संचालनालयामार्फत मुलींसाठी प्रमाणित शाळा तसेच महिला संरक्षण गृहे स्थापन केली आहेत. या ठिकाणी सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन व नवजीवन उभारणीचे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून असे प्रयत्न करण्यात येतात.

कायद्यांचा उल्लेख आलाय तर एका खटल्याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. बीबीसी मराठीच्या संकेतस्थळावर ही माहिती अधिक विस्तृत प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याचे लघुरूप करून येथे देतोय. अलाहबादच्या कोर्टात एक मे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दिवशी एका तरूण स्त्रीवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. चोवीस वर्षांच्या हुसेनबाईंनी न्यायाधीश जगदीश सहाय यांना सांगितलं की, त्या एक वेश्या आहेत. मानवी तस्करीवर बंदी आणणाऱ्या एक नव्या कायद्याच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. हा कायदा घटनाबाह्य आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. बाईंचं म्हणणं होतं की, उपजीविकेच्या साधनांवर हल्ला करणारा हा कायदा घटनेतल्या कल्याणकारी राज्याच्या उद्देशालाच हरताळ फासत होता. हुसेनबाईंनी, एका गरीब मुस्लीम वेश्येने, सामजिक संकेतांच्या विपरीत जाणारं पाऊल उचललं होतं. भारतीय समाजाने वेश्यांना गावकुसाबाहेर ठेवलं होतं तेव्हा त्यांनी न्यायधीशांना या रस्त्यावरच्या महिलांकडे बघायला भाग पाडलं होतं. अधिकृत आकड्यांनुसार वेश्यांची संख्या १९५१ मध्ये ५४ हजारावरून २८ हजार झाली होती. तसं व्हावं ही समाजाचीही इच्छा होती. जेव्हा वेश्यांनी काँग्रेस पक्षाला वर्गणी दिली तेव्हा गांधीजींनी ती वर्गणी स्वीकारायला नकार दिला होता. पण तरीही वेश्यांना मतदानाचा अधिकार होता कारण त्या पैसे कमावत होत्या, टॅक्स भरत होत्या आणि त्यांच्याकडे स्वतःची संपत्ती होती.

हुसेनबाईंच्या खाजगी आयुष्याविषयी फारशी माहिती अस्तित्वात नाही. कोणत्या आर्काइव्हमध्ये त्यांचा फोटोही नाही. त्यांच्याविषयी फक्त एवढंच कळतं की त्या आपली चुलत बहिण आणि दोन भावांबरोबर राहायच्या. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी हुसेनबाईंवरच होती. त्यांच्या याचिकेनंतर लोकांमध्ये चिंता आणि उत्सुकता दोन्हीही वाढल्या. नोकरशहा आणि राजकीय नेत्यांनी यावर बराच वाद घातला. कागदपत्रांच्या थप्प्यांच्या थप्प्या बनल्या. अलाहबादच्या वेश्यांचा एक गट आणि नाचणाऱ्या मुलींची एक युनियन या याचिकेच्या समर्थनार्थ पुढे आल्या. दिल्ली, पंजाब आणि बॉम्बेच्या (आताचं मुंबई) कोर्टांमध्येही अशा प्रकारच्या याचिकांची संख्या वाढायला लागली. बॉम्बेत राहाणाऱ्या एक वेश्या बेगम कलावत यांना शहराबाहेर हाकलून दिलं कारण त्या शाळेजवळ आपला व्यवसाय करत होत्या. त्या हायकोर्टात गेल्या आणि त्यांनी म्हटलं की त्यांचा समानतेचा हक्क तसंच व्यवसायचा आणि कुठेही ये-जा करण्याच्या हक्कांची पायमल्ली झालेली आहे. नव्या कायद्याने वेश्यांना आपलं भविष्य संकटात दिसायला लागलं. त्यांनी या कायद्याविरूद्ध न्यायलयीन लढाई लढण्यासाठी त्यांचे ग्राहक आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून पैसे जमवले. व्यावसायिक गायक आणि नर्तक संघटनेच्या असोसिएशनच्या सदस्या आहोत असं सांगणाऱ्या जवळपास पंच्याहत्तर महिलांनी राजधानी दिल्लीत संसदेबाहेर निदर्शनही केली.

त्यांनी खासदारांना सांगितलं की त्यांच्या व्यवसायावर हल्ला केला तर हा व्यवसाय इतर क्षेत्रांमध्ये आपले पाय पसरेल. काही गायक, नर्तिका आणि 'बदनाम' समजल्या जाणाऱ्या काही महिलांनी या कायद्याविरूद्ध लढण्यासाठी एक युनियन बनवली. अलाहबादमध्ये नर्तिकांच्या एका गटाने घोषणा केली की या कायद्याविरूद्ध त्या निदर्शन करतील, कारण हा कायदा 'राज्यघटनेने दिलेल्या व्यवसाय निवडीच्या अधिकारावर' गदा आणत होता. कलकत्त्यातल्या सोनागाची रेड लाईट भागातल्या तेरा हजार सेक्सवर्कर्सनी उपजीविकेला पर्यायी साधन दिलं नाही तर सूरतमध्ये उपोषणाला बसायची धमकी दिली. पोलीस आणि सरकारने हुसेनबाईंच्या याचिकेवर चिंता दर्शवली. या याचिकेवर महिला खासदार आणि मानवी तस्करीविरूद्ध मोहीम चालवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं. यात काही नवल नव्हतं.

हुसेनबाईंची आणि त्यानंतर आलेल्या अनेक याचिका म्हणजे नव्या प्रजासत्ताक राज्याच्या सुधारणावादी उद्देशाला हरताळ फासणाऱ्या आहेत, असं दाखवलं गेलं. घटना समितीमध्ये अनेक महिला सहभागी होत्या. त्या महिलांच्या ज्ञानावर आणि अनुभवांवर साऱ्यांनाच विश्वास होता. त्यांच्या मते कोणतीही स्त्री स्वखूशीने वेश्या बनत नाही. परिस्थिती त्यांना तसं करायला भाग पाडते. म्हणूनच या याचिका पाहून त्यांना आश्चर्य वाटलं असेल कारण या वेश्यांनी आपला व्यवसाय चालू राहावा म्हणून तसंच आपलं आयुष्य जसं चालू आहे तसंच चालू राहावं म्हणून आपल्या मुलभूत हक्कांचा मुद्दा उचलला. थोडं खोलात जाऊन अभ्यास केला तर लक्षात येतं की हा कायदेशीर लढा म्हणजे कोणा एका व्यक्तीचं धाडसी पाऊल नव्हतं तर संपूर्ण देशात देहव्यापारात गुंतलेल्या लोकांच्या गटाने दिलेल्या सामूहिक लढ्याचा एक भाग होता. जे लोक देहव्यापारात गुंतले होते ते आधीपासूनच आपला व्यवसाय धोक्यात आहे असं समजत होते. या नवीन कायद्याने त्यांच्यावरचा दबाव अधिकच वाढवला. हुसेनबाईंच्या याचिकेला तांत्रिक बाबींचं कारण देत दोन आठवड्यात फेटाळून लावलं. या कायद्याने त्यांच्या अधिकारांना इजा झाली नाही असं कोर्टानं म्हटलं कारण त्यांना ना कोणी काम करण्यापासून रोखलं होतं ना त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन न्यायाधीश सहाय म्हणाले की ही याचिका फेटाळून लावण्याचा निर्णय योग्य होता, पण त्यापुढे ते काही म्हटले नाहीत. सरतेशेवटी सुप्रीम कोर्टानं वेश्याव्यवसायाविरोधी कायद्याला घटनात्मक ठरवलं आणि म्हटलं की वेश्या आपल्या व्यवसायनिवडीच्या स्वातंत्र्याचा सामुहिक उपयोग करू शकणार नाहीत.

अमेरिकेसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांनी या बाबतीत पुष्कळच सुधारणा केली आहे. त्या देशांत या धंद्यांतील अपराध्यांना दंड किंवा शिक्षा न करता ते सुधारावे म्हणून त्यांना विशिष्ट संस्थांतून ठेवण्यांत येते. तथापि हा धंदाच असा आहे की, काही केल्या हा अजीबात नष्ट होणार नाही. समूल निर्मूलन करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रच्छन्न रूपाने सर्व समाजांत पसरेल व एकंदर समाजाची अधोगती होईल याची जाणीव पाश्चात्त्य राष्ट्रांना पुरी असल्याने केवळ हा धंदा सुधारण्याचाच तिकडे प्रयत्न चालू आहे. गरीब लोकांची स्थिती सुधारणे; मुलांना नीतीचे पाठ शाळेतून शिकवणे व या धंद्याच्या अनिष्टतेची योग्य जाणीव करून देणे, अनाथ मुलींचे व बायकांचे संगोपन व संरक्षण करणार्‍या संस्था काढणे वेश्याव्यवसाय सोडू इच्छिणार्‍यांना मदत देऊन त्यांना पुढील आयुष्यक्रमणाचा मार्ग दाखविणे इत्यादी अप्रत्यक्ष उपाय केल्यास या धंद्यामुळे समाजावर ओढवणारी आपत्ती कमी होईल.

आज एकट्या दिल्लीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायात होते, कोलकत्यात त्याहून अधिकचे व्यवहार होतात, देशभरात करोडो रुपये दिले घेतले जातात. याची न कुठली नोंद न कुठला हिस्सा वाटप ! मात्र या बायकांच्या कमाईवर डोळा असणारे गुंड मवाली खुनी मसल मनी पावरवाले गबरगंड आणि सफेदपोश राजकारणी यांनी मात्र यातला पैसा अक्षरशः शोषून घेतला आहे. अवैध असूनही याला वैधतेचे स्वरूप देऊन त्यावर आपलं घरदार भरणाऱ्या पोलीस आणि समाज यंत्रणेलाही याची शरम नाही. इतके सारे भवताली घडत असूनही नाकाला रुमाल लावून या वस्त्यातून जाणाऱ्या पांढरपेशी माणसांना या बायका जागल्या काय किंवा मेल्या काय याचे सुतक नसते. अशा सर्व बाबींमुळे या धंद्यांचे अनभिषिक्त मालक सुखैनैव जगत असतात शिवाय त्यांना राजसत्तेचे आणि प्रशासनाचे वरदहस्तही प्राप्त असतात. वेश्याव्यवसाय अनंत काळापासून सुरु असून मानवी भावभावनांच्या अंतापर्यंत चालेल अशा स्वरूपाचा असला तरी त्याला मानवतेच्या चौकटीत बसवून समाजाने त्यांचा तिरस्कार न करता त्यांना न्याय्य मानवी हक्क देत त्यांचा स्वीकार करून आपल्यातलाच एक घटक मानायला हवं इतकी मागणी तरी किमान आपण सर्वांनी केलीच पाहिजे. मग कुठे त्यांना न्याय मिळेल.

समीर गायकवाड.

(संदर्भ - "वेश्या व वेश्याव्यवसाय"- पु.गो. नाईक ; 'दि सोशल इव्हल'- अमॉस- ; 'हिस्टरी ऑफ प्रॉस्टिट्यूशन' - सँगर)

२ टिप्पण्या: