शनिवार, १३ जानेवारी, २०१८

पांथस्थांचा विसावा ...


रांजणातले पाणी आणि लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता असते. पोटातली आग आणि  चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी असते. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा आणि पितळी तांब्यातलं थंडगार पाणी कुणाचीही तहानभूक भागवण्यास समर्थ असते. यांच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नसतो. निवांत गप्पा मारताना मार्क्स ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासम  गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी गंभीर चर्चाही इथं नसते.

इथे आपण काही वेळासाठी थांबलो तरी इथल्या निसर्गखुणा आपल्यासोबत येतात ! वाऱ्याच्या झुळुकेनं गळून पडणारी पानं स्वतःभोवती गिरक्या घेत आपल्या पुढयात येऊन पडतात, उन्हाचे कवडसे लपाछपीचा खेळ खेळतात अन परसात बांधलेल्या गाई हंबरून आपले स्वागत करतात ! झाडाच्या बुंध्यावर संसार थाटून बसलेल्या खारुताई आपल्याकडे डोळे भरून पाहतात, झाडांच्या फांद्याआडून वारा पानापानातून आपल्यासाठी वेणुनाद करतो ! तेंव्हा इथल्या मऊशार वाकळीवर आणखी थोडा वेळ बसावेसे वाटते. मग अंगातला आळस आपसूक निघून जातो. काचांचे टवके उडालेल्या चष्म्याआडचे विझत चाललेले यांचे डोळे आपल्याला घडीभरच न्याहाळतात आणि आपल्या काळजात सुरु असलेली घालमेल अचूक ओळखतात....

इथे कुणीही येऊन कितीही वेळासाठी बसू शकतो, पटलं तर इथल्या चवदार शिदोरीचे दोन घास खाऊही शकतो. आपली सुखदुःखं यांना सांगून मनातलं मणामणाचं ओझं अलगदपणे हलकं करू शकतो. यांच्या  सुखाचं हसू यांच्याआपल्या ओठी उमटतं आणि आपल्या दुःखात यांचे डोळं ओले होतात. घराच्या चार भिंतीतल्या संसाराच्या खऱ्या आनंदाचे अस्सल रुपडं आपल्याला या चंद्रमौळीत नक्कीच दिसते. इथल्या जीर्ण दंड घातलेल्या धडूत्यात मखमलीची ऊब मिळते. 

यंदा ऊन जरा जास्त आहे तेंव्हा वाटंनं पुढं जाताना आमच्या पडवीत येऊन घडीभर बसा अन् ताजंतवानं व्हाशांतशीतल सावलीचा मनसोक्त आनंद घ्या. घरासमोरून जाणाऱ्या अनाम वाटसरूसाठी वाटेवरल्या केलेली आर्जवं फार प्रेमाची असतात. गावाकडचं हे आदरातिथ्य निरपेक्ष आणि सच्चे असते त्याची आठवण सदैव मनात राहते. घडीभरासाठी इथं थांबलं तरी मनावर त्याचं गारुड होतं. 

इथं वाऱ्यासोबत सांगावा धाडता येतो नि सावलीला कान देऊन ऐकतानाच थोडी पाठही टेकवता येते. प्रेमाच्या दोन गुजगोष्टी करता येतात. मनातलं मळभ निघून गेलं की यांचा हळवा निरोप घेणं सोपं जातं. यांच्याशी बोलायला कुणालाही ओळखीची गरज पडत नाही ! सगळे वाटसरू यांचे सोयरेच असतात ! त्यासाठी नात्यागोत्याची गळ लागत नाही. गावाकडच्या वाटंवरची ही पिकली पानं असतात. तरीही यांचं जिणं कसं बहारदार असतं हे एकदा डोळे भरून बघितलंच पाहिजे. नावंआडनावंनातीगोती काहीही कशीही असली तरी त्यांना त्याचा फरक पडत नाही. यांच्या घरात टीव्हीफ्रीजएसी असलं काही नाही. अशा वस्तू ज्यांच्या घरात असतात त्यांच्याइतकंच यांचंही मन मोठं असतं. 

आपण जर अंतःकरणापासून यांच्या काळजात डोकावलंत तर मात्र यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांत दिसतील सुकून गेलेल्या आसवांचे झरेबोथट झालेले अठरापगड दुनियादारीचे टोकदार सलआयुष्याच्या गाथेत कोरलेल्या ओव्यासटवाईच्या दैन्य भाष्यास खोटे ठरवणाऱ्या सुखाच्या बदललेल्या व्याख्या आणि कपाळावरच्या आठ्यात विरघळून गेलेला अबीर गोपीचंद !

ते आपल्याकडून चार नव्या गोष्टी शिकून घेतील, ऐकून घेतील आणि जोडीने आपणही त्यांच्या दोन जुन्या गोष्टी शिकू शकतो. ते आपल्याला डोळ्यात साठवतील. आणि इच्छा असली तर त्यांना आपण मनात साठवू शकतो. माणसाने जगायचं तरी कशासाठी आणि चिंता नेमकी कशाची करायची हे यांच्याडून शिकण्यासारखं आहे. यांच्या हातून मातीच्या गर्भात माणुसकीचे कोवळे अंकुर उगवतातत्याची पेरणीही दिव्य असते अन त्याचं उगवणंही भव्य असतं !
 

गाईचं हंबरणं ऐकून इथल्या भिंतीही कान टवकारतातटाळ मृदंगाचे नाद ऐकून वृक्षवल्ली इथल्या डुलतात. इथे नांदतो पांडुरंगइथे गातो तुक्याचा अभंगइथे घुमते ज्ञानियाची विराणीइथे रमते मुक्ताईचे आख्यान अन पाझरते निवृत्तीची विरक्तीइथे रुळतो जनीचा सेवाभावइथे दिसते नाम्याची आपुलकीइथे फुलतात सावत्याचे मळेइथे साकारतात गोरोबाची मडकीइथे रंगते एकनाथी भागवताचे गारुडइथे निनादते सेनाचे भजनइथे भुलवते चोख्याचे किर्तन ! इथला एकएक जीव जणू मायबापाच्या चरणीचा नतमस्तक पुंडलिक.

इथल्या मातीत आपल्याला दिसेल स्वतःचे सच्चे प्रतिबिंब जे दुसऱ्या कुठल्याच आईन्यात दिसणार नाही नि कुठल्या पोथ्यापुराणातूनही उलगडणार नाही ! तेंव्हा इथे यायला हवं आणि स्वतःला ओळखायला हवं. इथे थोडा विसावा घेऊन पुढे मार्गस्थ झालं की जीवनाचे जणू मर्म गवसेल !

२ टिप्पण्या: