ओवीगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ओवीगाथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

गुरुवार, १५ मे, २०२५

खडीच्या चोळीवर ..

खडीच्या चोळीवर 

जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.