सोमवार, २८ एप्रिल, २०२५

महादेव देवानूर - मी शिरच्छेद करेन त्यांचा, जे देवाच्या नावावर..

महादेव देवानूर  
राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि एक दलित व्यक्ती टिकाराम जुली यांनी अलवर मंदिरास देवदर्शन घेण्यासाठी भेट दिली होती. जुली यांच्या भेटीनंतर ७ एप्रिल रोजीरामगडचे माजी आमदारा आहुजा यांनी अलवर येथील राम मंदिराचे शुद्धिकरण केले होते. त्यासाठी त्यांनी गंगाजल शिंपडले होते. उत्तरेकडील बहुतांश राज्यात, विशेषतः ग्रामीण भागात आजही दलित तरुण घॊड्यावरून वरात काढू शकत नाही, वाद्ये वाजवू शकत नाही, मिशी ठेवू शकत नाही. लग्नानंतर मंदिरात जाऊ शकत नाही हे वास्तव आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून आहुजा यांच्या अगोचरपणाची दखल घेत त्यांना पक्षातून काढून टाकले गेलेय हे बरेच झाले. यातून कठोर संदेश जायला हवा. जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.

या घटनेवरून विख्यात कन्नड साहित्यिक महादेव देवनूर या लेखकाची आणि त्यांच्या गाजलेल्या कादंबरीची आठवण झाली. 
कुसुमाबळे  
 'कुसुमाबळे' हे त्या कादंबरीचे नाव. 1990 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला होता. या कादंबरीचा शेवट महत्वाचा वाटतो. होलेया (holeya आपल्याकडील चांभार) या दलित जातीतली कुसुमा या कादंबरीची नायिका आहे. तिच्यासह तिच्या समुदायातील व्यक्तींना एका धार्मिक विधीच्या वेळी मंदिरात प्रवेश नाकारला जातो, ज्यामुळे तणाव निर्माण होतो. यातून हिंसक संघर्ष होतो, जिथे दलित समाज आपला राग आणि प्रतिकार व्यक्त करतो. कुसुमा या संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावते. ती मंदिरात प्रवेशाचा आग्रह सोडून देते. आपल्या मुलांना आणि समुदायाला एक नवीन दिशा देते — शिक्षण, एकता, आणि आत्मसन्मानाच्या मार्गाने लढण्याची. हा प्रसंग प्रतीकात्मक आहे, जो दलित समाजाच्या सततच्या लढ्याला आणि त्यांच्या भविष्याच्या आकांक्षांना दर्शवतो. रुढ अर्थाने जसा सुखद वा शोकांतिका स्वरूपाचा शेवट असतो तसा शेवट त्यांनी केलेला नाही. ज्याप्रमाणे फॅन्ड्रीमधला जब्या सिनेमाच्या शेवटी दगड मारतो आणि सिनेमा तिथेच संपतो तसे महादेव देवनूर त्यांच्या या कादंबरीला एन्डलेस ठेवतात. कुसुमाने जो मार्ग दाखवलाय त्याने काय होईल हे वाचकांनी निवडायचेय असं देवानूर म्हणतात.

देवानूर यांना साहित्यिक वर्तुळात विद्रोही साहित्यिक म्हणून ओळखले जाते, सामाजिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच आवाज उठवलाय. आपले साहित्य आणि सार्वजनिक जीवन यांचा उपयोग दलित समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी केलाय. त्यांची जीवनशैली अत्यंत साधी आहे, त्यांनी स्वतःला सामाजिक कार्याला वाहिलेय. त्यांनी आपल्या लेखनात आणि मुलाखतींमध्ये नेहमीच ग्रामीण आणि दलित समाजाच्या वास्तवाला प्राधान्य दिलेय. ते स्वतःदेखील holeya जातीमधूनच येतात. १९९०च्या दशकात त्यांना राज्यसभेवर नामांकन ऑफर केलं गेलेलं मात्र त्यांनी ते विनम्रपणे नाकारलेलं! इतकेच नव्हे तर कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी नाकारलं होतं! असा बाणा असणारे साहित्यिक आता विरळच!

'कुसुमाबळे'मध्ये कुसुमा आणि तिच्या समुदायाचे चित्रण करताना, देवानूर महादेव यांनी कर्नाटकातील मलनाड भागातील दलित 
माजी आमदार ज्ञानदेव आहुजा - ज्यांनी जातीभेद जोपासला  
समाजाच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेय. होलेया समुदायाला कर्नाटकात ऐतिहासिकदृष्ट्या अस्पृश्य मानले गेले आणि त्यांना मंदिर प्रवेश, पाण्याच्या स्रोतांचा वापर, आणि इतर सामाजिक हक्कांपासून वंचित ठेवले गेले. कादंबरीत कुसुमा आणि तिच्या समुदायाला अशाच भेदभावाचा सामना करावा लागतो, जे होलेया समाजाच्या वास्तवाशी सुसंगत आहे. जातीभेद, धार्मिक दांभिकता, आणि पितृसत्ताक व्यवस्थेच्या शोषणाला तोंड देते. तिचे पात्र दलित स्त्रियांचे, समाजाच्या संघर्षांचे आणि प्रतिकाराचे प्रतीक आहे. दलित समुदायाबद्दचे जातीभेद, एकंदर समाजामधली धार्मिक दांभिकता, पितृसत्ताक पुरूषी व्यवस्था आणि आर्थिक शोषण या सगळ्यांना ही कादंबरी स्थान देते.

कादंबरीत कुसुमा आणि तिच्या समुदायाला उच्चवर्णीय समाजाकडून होणाऱ्या भेदभावाचा सामना करावा लागतो. मंदिरात प्रवेश 
टिकाराम जुली - राजस्थान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते  
नाकारला जाण्यापासून ते सामाजिक बहिष्कारापर्यंत अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते. धार्मिक कट्टरता आणि जातीभेद यांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला ती एक्सपोज करते. आपली अस्मिता आणि हक्कांसाठी लढण्याचा निर्धार गावातला संपूर्ण समुदाय करतो मात्र त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग अनुकरणीय आणि चिंतनीय होय. देवानूर यांनी कादंबरीत विशिष्ट जातीला थेटपणे केंद्रस्थानी ठेवण्यापेक्षा दलित समाजाच्या एकूण अनुभवांवर आणि त्यांच्या प्रतिकारावर भर दिला आहे. कुसुमच्या वैयक्तिक जातीपेक्षा दलित अस्मितेच्या व्यापक लढ्यावर कादंबरी लक्ष केंद्रित करते. दयेची भीक मागत बसण्यापेक्षा, ज्या गोष्टींनी समाजाची उन्नती होणार नाही अशा गोष्टींसाठी झगडा करत बसण्यापेक्षा त्या टाळून मनात आत्मसन्मानाची जाणीव होणं हाच विजय असं कादंबरी सूचित करते!

देवानूर महादेव यांची कविताही अशाच प्रकारचे टोकदार भाष्य करते. त्यांच्या कवितांमध्ये दलित समाजाच्या वेदना, संघर्ष आणि विद्रोह यांचे तीव्र चित्रण आहे. त्यांच्या "ನಾನು ಒಡಲಾಳದವನು" (Naanu Odalaladavanu, अर्थात "मी आतून खचलेला") या कवितेने कन्नड साहित्यात विलक्षण खळबळ माजवली. ही कविता सामाजिक आणि धार्मिक दांभिकतेवर प्रखर हल्ला करते. या कवितेत त्यांनी, जातीभेद आणि धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीय. समाजातील दूषित वातावरणावरही भाष्य केलेय.
या कवितेमधील काही पंक्तींचा स्वैर मराठी अनुवाद -

मोडून पडणाऱ्या माणसांपैकी मी नाही 
मी शिरच्छेद करेन त्यांचा
जे देवाच्या नावावर पत्थरबाजी करतात.
मंदिराची दारे बंद असतील
तर मोडतोड न करता उघडेन,
मी खुले करेन माझे विशाल अंतःकरण
जे प्रत्येकासाठी खुले असेल!

या कवितेचा कालखंड १९८० च्या सुमाराचा आहे आणि 'कुसुमबळे'चे प्रकाशन वर्ष १९८८ चे आहे. त्यानंतर चार दशके उलटली असली तरी परिस्थिती बरीचशी तशीच आहे हे खेदाने नमूद करावे वाटते. अशा घटना घडल्या आणि त्यावर माध्यमांत पुरजोर विरोध केला गेला तरच त्यावर कारवाई होते अन्यथा अशा अनेक घटना घडत असतील ज्या समोर येतच नाहीत. सामाजिक समतेच्या वाटेवरचे हे अडथळेच होत. याच्या मुळाशी असणाऱ्या जातश्रेष्ठत्वाच्या अभिनिवेशाला खतपाणी घालणं बंद होत नाही तोवर बदल दृष्टीक्षेपातही येणार नाहीत.

महादेव देवानूर यांच्या बाबतीत सांगण्याजोगी आणखीन एक गोष्ट म्हणजे लिंगायत धर्म विचारांचे अभ्यासक आणि व्यासंगी विवेकी व्यक्तिमत्व म्हणून ख्यातनाम असणाऱ्या एम. एम. कलबुर्गी यांच्या नृशंस हत्येनंतर देशभरात अनेक विचारवंतांनी,  लेखकांनी, कलावंतांनी त्यांना मिळालेले शासकीय पुरस्कार परत केले होते. कन्नड लेखक उदय प्रकाश यांनी सर्वात आधी ही कृती केली होती. महादेव देवानूर यांनी त्यांना समर्थन देत आपला साहित्य अकादमी पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार परत केले होते. 2022 साली त्यांनी आरएसएसच्या अनेक धोरणांचा, विचारधारेचा समाचार घेणारे पुस्तक लिहिले होते तेव्हा ते उजव्या विचारांच्या लोकांच्या रडारवर आले होते. 

महादेव महानूर यांना दृढनिश्चयी आणि सच्चे आंबेडकरवादी म्हणून ओळखले जाते त्यामागची ही पार्श्वभूमी विलक्षण बोलकी आणि दाहक आहे! एक प्रकारचे तेजाबच त्यांच्या धमन्यामधून वाहत असावे!

- समीर गायकवाड                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा