मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

नागरिकत्वाबद्दलची अनास्था...



संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरु आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट बिल. (CAB)
हे विधेयक म्हणजे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात म्हणजे एनआरसी आहे( नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद)
हे कसे ते पाहुयात -
आपल्या देशाचे नागरीकत्व कुणाला द्यायचे याच्या मसुद्यात सुधारणा करणारं विधेयक असं या CAB बद्दल ढोबळमानाने म्हणता येईल.

देशाचे नागरीकत्व मिळवण्यासाठी काही अटी आहेत जसे की त्या व्यक्तीचा भारतात जन्म झालेला असावा वा त्याच्या जन्मदात्यापैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा ज्याचा सामान्यतः अकरा वर्षांचा रहिवास पूर्ण असावा. या खेरीज फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या लोकांसाठी काही उपकलमे आहेत.
आता या महत्वाच्या विधेयकात दुरुस्ती केली जातेय.
काय आहे ही दुरुस्ती -
या दुरुस्तीनुसार देशात त्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले असतील. या खेरीज ११ वर्षे रहिवासाची अट शिथिल करून ६ वर्षे करण्याची शिफारस यात आहे.
आता यात केवळ मुस्लिमांना सरकारने वगळले आहे.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

बदनाम गल्ल्यांचा 'अक्षर फरिश्ता' - मंटो !



सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

रेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...



सोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने काढला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील..
श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली.
तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडिया, आसामी, मल्याळी, मराठी, हिंदी अशा बहुतेक सर्व भाषेच्या कन्या इथं राहतात. एके रात्री ईरोडेमधून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने भारतीला ओळखलं. खातरजमा करून तिची माहिती तिच्या घरी कळवली. काही दिवसात तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरची मंडळी कामाठीपुऱ्यात आली. ती ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिला झोडपायला सुरुवात केली. तिला मारहाण होऊ लागल्यावर बाकीच्या बायका मध्ये पडल्या आणि त्यांनी तिच्या नातलगांना पिटाळून लावलं.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...



आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सौंदर्यवती दुर्गांची कर्तृत्ववान गाथा...


आजचा रंग हिरवा... 
ही पोस्ट वाचण्याआधी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय, द्याल का प्रॉमिस ? 
खूप काही मागत नाही मी. फक्त तुमची छोटीशी साथ हवीय, मला खात्री आहे पोस्टच्या अखेरीस तुम्ही होकार द्याल. ताजमहाल पाहायला जाल तेंव्हा माझी पोस्ट विसरू नका एव्हढी विनंती लक्षात असू द्यात. 
फोटोत दिसणाऱ्या तरुणीचं नाव आहे शबनम, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. 

शबनमवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की 
एका प्रसन्न क्षणी शबनम 
इतक्या भयानक ऍसिड हल्ल्यानंतर शबनम मरून जाईल किंवा विद्रुपतेच्या भीतीने घरात बसून राहील, तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण होईल याची त्याला खात्री होती. हल्ला झाल्याला आता काही वर्षे उलटून गेलीत पण त्या दिवसानंतर शबनमच्या आयुष्यात काहीच भयप्रद वा दुःखद घडलेलं नाही.

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...



धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९
सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...
नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,
हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.
फोटोतल्या सगळ्याच जणी देवदासी आहेत...
परंपरा, प्रथा हे आपले दाखवायचे दात आहेत, खरे दात तर मनमुराद शोषणाचे आहेत.

टिप - माझे मत अनेकांना अमान्य असू शकते, त्यात वावगं काही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! .. असो .. मुळात नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्यांची कल्पना हीच बाजारू दृष्टीकोनातून माथी मारली गेलीय परंतु त्या फोल कल्पनेने आता रूढीचे स्थान मिळवले आहे ही बाब भूषणावह खचितच नाही...

________________________________________




सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

गडकोटांच्या संवर्धनासाठी लक्षावधींचं आर्थिक नियोजन करणारे शिवराय...


ब्लॉगपोस्ट नीट वाचल्याशिवाय कमेंट करू नयेत.

किल्ल्यांनो, गडकोटांनो तुम्ही तेंव्हाच बेचिराख व्हायला हवं होतं कारण ... कारण... तुमचा पोशिंदा आता हयात नाहीये..     
त्यांचे पोशिंदे असलेले शिवबाराजे आपल्या किल्ल्यांची किंमत जाणून होते. किल्ल्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. .
शिवराय म्हणजे गडकोट, स्वराज्य म्हणजे गडकोट आणि गडकोट म्हणजे रयत !
हे समीकरण इतिहासाने आपल्या सर्वांच्या मस्तकात असं भिनवलंय की गडकोट हा शब्द उच्चारताच शिवराय आठवतात, झुंजार रणमर्द मावळे आठवतात ! लढाऊ मराठ्यांचा तेजस्वी इतिहास डोळ्यासमोर येतो.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...


सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     
लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. तयार होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा झालेला.

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

दुर्गापूजा आणि वेश्या - एक अनोखा संबंध ..

आतल्या खोलीचा मुख्य भाग ज्यात दुर्गा प्रतिष्ठापना केली गेली होती..

दुर्गापूजेचा वेश्यावस्तीशी संबंध आहे हे आपल्याला  ठाऊक नसते ! हे लिहिण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. तुम्ही म्हणाल गणेशोत्सवाचा याच्याशी काय संबंध ?
आहे, संबंध आहे. खास करून पुण्या, मुंबईतील गणेशोत्सवाचा तर नक्कीच आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ज्या परिसरात आहे तिथून वेश्यावस्ती असलेली बुधवार पेठ खूप जवळ आहे ! केवळ एव्हढ्या एका गोष्टीसाठी मी सुतावरून स्वर्ग गाठत नाहीये.....

गुरुवार, २५ जुलै, २०१९

जगणं ...

तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...

बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"

अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.

वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !

- समीर गायकवाड

मंगळवार, २५ जून, २०१९

झोएशा इराणी ते केतकी चितळे : ट्रोलच्या बळी


काळ मोठा महान असतो तो सर्वांना पुरून उरतो. तो कोणाला कसा सामोरा येईल हे कुणी सांगू शकत नाही. आपल्या कर्मानुरूप त्याचं प्रत्यंतर येत राहतं. आपण जे पेरतो तेच उगवत जातं हे सूत्र सर्वंकष लागू पडतं आणि ते ही सर्व बाबतीत ! अगदी सोशल मीडियावरच्या ट्रोलराक्षसाच्या बाबतीतही ! मुद्दा ट्रोलचा आहे म्हटल्यावर कालपरवा घडलेली एक महत्वाची घटना चक्षुसमोर येणं साहजिक आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी इन्स्टाग्रामवर टाकत असलेल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना भाजपच्या रणरागिणी असंही म्हटलं जातं. विरोधी पक्षाचा हल्ला आक्रमकपणे परतावून लावण्यात त्यांचं विशेष कसब आहे. सोशल मीडियावर त्या बऱ्यापैकी सक्रीय असतात. अनेक नेत्यांसोबत झडलेली ट्विटरवॉर्स विशेष स्मरणीय आहेत. फाडून काढणे किंवा धूळ चाटायला लावणे यासाठी त्यांची खासियत आहे. त्यांनी केलेल्या पोस्टच्या वा प्रत्युत्तराच्या समर्थनार्थ आयटी सेलची भली मोठी फौज काम करत असते. आयटीसेलचे नेटकरी म्हटले की त्यात ट्रोल आलेच. ट्रोल म्हटलं की जे जे वाईट आणि अश्लाघ्य आहे ते ते सर्व आलेच. पण 'छु' म्हणून दुसऱ्याच्या अंगावर सोडलेलं श्वान कधी कधी आपल्याही अंगावर येऊ शकतं. याचं प्रत्यंतर बऱ्याच जणांना येऊ लागलंय, राहिलेल्या उत्साही आणि उतलेल्या नेटकऱ्यांनाही येईलच. कारण ती निसर्ग नियमानुसारची बात आहे.

सोमवार, १७ जून, २०१९

दहावी निकाल : ‘सर्वाना शिक्षणा’चे अपयश



या आठवड्यातील एक महत्वाची घटना म्हणजे दहावीचे निकाल होय. आपल्या कालविसंगत शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत दहावी व बारावी इयत्तांच्या परीक्षांचे अवाजवी स्तोम माजवले गेलेय, त्यांची मांडणी व मुल्यांकन दोन्हीही गचाळ पद्धतीने होतेय. दहावीच्या परीक्षेत साठोत्तर काळात फर्स्ट क्लास मिळाला तरी विद्यार्थी हुशार समजला जायचा. ऐंशीच्या दशकानंतर या गृहितकावर बोळा फिरवत मुलांची टक्केवारी ऐंशी ते नव्वदच्या घरात पोहोचली तेंव्हा मुलं हुशार म्हणून ओळखली जाऊ लागली. यावर कडी करत २००८ मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने एक आमुलाग्र बदल घडवत नवं धोरण आणलं. त्याची फलश्रुती त्याच वर्षी समोर आली.

रविवार, १६ जून, २०१९

मोळीवाला - एक आठवण वडीलांची...



'फादर्स डे'निमित्त सकाळी सोशल मीडियावर माझ्या वडीलांचा फोटो पोस्ट करताना विख्यात शायर, कवी निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. त्या पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. त्या अनुषंगाने पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना आपण नेहमीच हात आखडता घेतो हे सत्य स्वीकारत वडीलांची एक आठवण इथे लिहावीशी वाटतेय.

गुरुवार, १३ जून, २०१९

रेड लाईट डायरीज - दाखले


धगधगत्या दुपारच्या असह्य उकाडयातच,

मी तान्हुल्याच्या वाटयाला येते.

कवटाळताच उराशी गच्च त्याला,

रंडक्या भिंतींतले आभाळ गदगदून येते.

 

कुणास ठाऊक, मातृवत्सल स्तनातील,

दुध किती त्याच्या ओठांत झिरपते!

चिल्बटलेल्या बिछान्यावर उन्मळून पडताच,

माझ्यातली माय अश्रू छातीतून ढाळते.

सोमवार, १० जून, २०१९

विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ - गिरीश कार्नाड


आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ?
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड  त्याचं नाव.

गुरुवार, ६ जून, २०१९

ग्रामीण मतदाराचा बदलता कौल -



सतराव्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागून आता दहाएक दिवस झालेत. निकालातले औत्सुक्य संपलेय. अनेक राजकीय अभ्यासकांद्वारे, विचारवंतांद्वारे आपआपल्या परीने या निकालाचे अन्वयार्थ लावून झालेत. काही ठिकाणी ही प्रक्रिया अजूनही सुरु आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्या विजयाचे, पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केलीय, विजेत्यांनी विजयोत्सव साजरे करण्यास सुरुवात केलीय तर पराभूतांनी जमेल तितकं आणि झेपेल तितकं आत्मचिंतन सुरु केलंय. विविध माध्यमं आपआपल्या कुवतीनुसार या निकालांचे मतितार्थ शोधत आहेत, आपले अंदाज चुकुनही आपणच किती नेमकं भाष्य केलंय हे सांगण्याची अहमहमिका सुरु झालीय. तसं पाहता अगदी मोजक्या लोकांचे अंदाज बरोबर आलेत, अन्य सर्वांचे अंदाज चुकलेतच. अंदाज चुकण्यास अनेक घटक कारणीभूत होते. सरकारबद्दलचा कथित असंतोष, कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या लोकांची संख्या, विविध धोरणात झालेली फसगत आणि त्यातून झालेली जनतेची फरफट, जातीय धार्मिक ध्रुवीकरणावरची नाराजी, शेतकरी वर्गाबद्दलची अनास्था, वर्तमानाचे काटे मागे फिरवून देशाला मध्ययुगाकडे नेण्यासाठी सुरु असलेली सनातनी कसरत आणि कट्टरतावाद्यांचा वाढता प्रभाव इत्यादी घटक आणि त्याविषयी सोशल मीडियात सुरु असलेली चर्चा यामुळे अनेकांचे अंदाज चुकण्यास मदतच झाली. विशेष बाब म्हणजे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच्या काळात सोशल मीडियावर पूर्णतः काँग्रेसविरोधी वातावरण होते पण मागच्या तीन वर्षात मोदीविरोधी लेखनास सोशल मीडियात बऱ्यापैकी धार चढली होती. विशेषतः मागच्या वर्षात याचं प्रमाण जाणवण्याइतकं होतं. याचा प्रभाव अंदाज वर्तवण्यात झालेल्या चुकात दिसून येतो. पण ढोबळ मानाने हे सर्व घटक शहरी, निमशहरी, नागर भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील कक्षेशी निगडीत होते, ग्रामीण भागाचं प्रतिबिंब यात नव्हतं, किंबहुना ग्रामीण जीवनाचा या घडामोडीशी फारसा संबंध नव्हता. उलट गावजीवनाशी संलग्न असलेल्या प्रश्नांवर अनेकांची नाराजी स्पष्ट दिसत होती तरीदेखील ग्रामीण भागातही निवडणुक निकालांचे तेच चित्र दिसले जे शहरी भागातल्या मतदानातून समोर आले होते. असं का घडलं असावं याची अनेक कारणे असतील. देशभरातील विविध राज्यात याची कारणे थोडीफार वेगळी असतील, पण त्यांचा पिंड एकच असणार. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास निवडणुकीआधी दोन महिनाभरच्या काळात राज्याच्या विविध ग्रामीण भागात फिरता आलं,लोकांशी मनमोकळं बोलता आलं, त्यांच्या मनात डोकावता आलं त्यातून काही गोष्टी जाणवल्या त्या काँग्रेसला उभारी घेण्यास अडवून गेल्या हे नक्की. त्याचा हा गोषवारा.

शनिवार, १ जून, २०१९

महात्मा गांधींनी हिटलरला लिहिलेलं पत्र..

जितिश कल्लाट या भारतीय कलाकाराने निर्मिलेले बापूंनी हिटलरला पाठवलेल्या पत्राचे डिजिटल कव्हरींग लेटर 

सोशल मीडियावरती अनेक लोक गरळ ओकत असतात. अश्लील, अर्वाच्च शिवीगाळ करत असतात. राजकीय पोस्टवर याचा सुकाळ असतो. विशेषतः असे लोक ज्यांचे समर्थन करत असतात त्यांचे नेतेही अशीच भाषा वापरत असतात, एनकेन मार्गाने हनन सुरु असते ज्याच्या पातळीस आता कुठलाही स्तर उरलेला नाही.
आपण म्हणतो, जाऊ द्या ! कशाला शहाणपण शिकवायचे ? घाणीत दगड टाकला की काही शिंतोडे आपल्याच अंगावर उडतील !
ही माणसं बदलणार नाहीत तेंव्हा आपली डोकेफोड का करावी या विचाराने आपण मुकाट बसून राहतो.
आपल्या डोळ्यादेखत सभ्यतेचं वस्त्रहरण सुरु असते आणि आपण आपल्याशी घेणंदेणं नाही या वृत्तीने मूक राहतो.

तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे ?
असाच प्रश्न गांधीजींना पडला होता.

शुक्रवार, ३१ मे, २०१९

शुगर अँड ब्राऊनीज - दारिया कोमानेस्क्यू (रोमानिया)


जेंव्हा कधी 'टिकटॉक' ओपन केलेलं तेंव्हा तेंव्हा हे गाणं कानावर आलेलं. आपली जिज्ञासा मूलतःच चौकस असल्यानं सवयीनं या गाण्याचा पिच्छा पुरवला.
मग हाती लागली एक सुंदर प्रेम कविता आणि एक संवेदनशील प्रतिभाशाली तरुण गायिका, कवयित्री.
दारिया कोमानेस्क्यू तिचं नाव. धारिया हे तिचं निकनेम.

शनिवार, २५ मे, २०१९

हुस्न, इश्क और बदन : गुजरी हुई जन्नत...

नवाबाच्या दरबारातलं पण आम आदमीसाठी खुलं असलेलं गाणं बजावणं 
मागे काही दिवसापूर्वी मुजरेवाल्या तवायफांवर एक लेख लिहिला होता. त्यातला एक संदर्भ लागतच नव्हता. लखनौमधील एक मित्र योगेश प्रवीण यांनी तो संदर्भ मिळवून दिला. एका जमान्यात बनारस हे तवायफ स्त्रियांचं मुख्य शहर होतं. सुरुवातीच्या काळात लोक त्यांच्याकडे लपून छपून जायचे. बाकी अमीरजादे या गल्ल्यात पाय ठेवत नसत कारण कैकांनी आपल्या बगानवाडीत अशा खंडीभर बायका ठेवलेल्या असत. या बायकांकडे जायचं म्हणजे पुरुषांना खूप कमीपणा वाटायचा. शिवाय लोकलज्जेचा मुद्दाही होता. पण हे चित्र एका माणसामुळे बदलले. त्याचं नाव होतं सिराज उद्दौला. आपल्याला सिराज उद्दौला म्हटलं की फक्त प्लासीची लढाई आठवते. मात्र या खेरीजही या माणसाचं एक सप्तरंगी चरित्र होतं.

शनिवार, ११ मे, २०१९

गुलकी बन्नो आणि जग्गी ...


विख्यात हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत. त्यांची 'गुलकी बन्नो' नावाची एक कथा आहे. गुलकी नामक एका कुबड्या मध्यमवयीन स्त्रीचं भावविश्व त्यात रेखाटलं आहे. घेघाबुवाच्या ओसरीवर बसून भाजीपाला विकून गुलकी आपला चरितार्थ चालवायची. आपल्या पित्याच्या मृत्यूच्या पश्चात ती पूर्णतः एकाकी झालेली. तिचा नवरा मनसेधू यानं दुसरं लग्न केलेलं. खरं तर गुलकीला कुबड येण्यास मनसेधूचं वागणंच अधिक कारणीभूत असतं. गुलकी अल्पवयीन असतानाच मनसेधूसोबत तिचा विवाह झालेला असतो. खुशालचेंडू मनसेधूच्या संसाराचं ओझं उचलताना गुलकी दबून जाते. अतिकष्ट आणि शरीराची झिज यामुळे तिच्या पाठीवर कुबड येतं. वयाच्या पंचविशीत तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळं पसरतं. ती कंबरेत वाकते. देहाने आणि मनाने खचून जाते. घेघाबुवाच्या कट्ट्यावरल्या तिच्या भाजीपाल्याच्या दुकानाभवती गल्लीतली सगळी पोरंठोरं दंगामस्ती करत असतात. त्यांच्या खेळण्याचा तो ठिय्या असतो. ही पोरं तिथं खेळतही असतात आणि जोडीनंच गुलकीची यथेच्छ टिंगलही करत असतात. त्यांच्या दृष्टीने ती टवाळीचा विषय असते. या मुलांत जानकी उस्तादाची मिरवा आणि मटकी ही बहिण भावंडं सामील असतात. जानकी उस्ताद अज्ञात रोगानं मरण पावल्यानंतर ही भावंडं रस्त्यावर आलेली, त्यांना कुणी वाली नव्हता पण त्यांचं अल्लड बालपण अजून पुरतं सरलेलं नसल्यानं परिस्थितीच्या झळा त्यांना बसल्या नव्हत्या. ही भावंडंही रोगग्रस्त आणि अपंग होती. गोड गळ्याच्या बोबड्या मिरवाला गायला खूप आवडायचं. गुलकीच्या दुकानाजवळ बसून तो गायचा. गल्लीतल्या पोरांना रागे न भरणाऱ्या गुलकीचा मिरवा आणि मटकीवर विशेष जीव होता. मिरवा गाऊ लागला की त्याच्यासाठी ती मटकीपाशी खाण्याची जिन्नस देई. मिरवा आणि मटकीच्या कंपूत झबरी नावाची कुत्रीही सामील होती.

रविवार, २१ एप्रिल, २०१९

न्यायाच्या प्रतिक्षेतला इतिहास...



दक्षिणपूर्व इंग्लंडमधील केंट येथील एका पबमध्ये एके दिवशी लेखक किम वॅग्नर यांना शोकेसमध्ये ठेवलेली एक कवटी दिसली. कुतुहलापोटी त्यांनी ती उचलून घेतली. कवटीच्या आतल्या बाजूस एक हस्तलिखित चिठ्ठी होती. चकित झालेल्या वॅग्नरनी ती चिठ्ठी वाचली. त्यावरील मजकुरानुसार ती कवटी ब्रिटीश सैन्यात सेवेस असलेल्या आलम बेग या भारतीय जवानाची होती. ४६ व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचा तो शिपाई होता. १८५७च्या बंडानंतर झालेल्या कारवाईत त्याला ठार मारण्यात आलं होतं. भारतात वास्तव्यास असलेल्या काही ब्रिटीश नागरिकांची हत्या केल्याचा आरोप ठेवून त्याला तोफेच्या तोंडी देऊन मारण्यात आलेलं. त्यावेळी तिथं तैनात असलेल्या आयरिश सैन्य अधिकाऱ्यानं त्याचं शीर इंग्लंडला आणलं. जणू काही ट्रॉफीच आणली असा अविर्भाव त्यामागे होता ! ती कवटी पाहून अस्वस्थ झालेल्या वॅग्नरनी यावर संशोधन करायचे ठरवलं आणि त्यातून जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. त्यांनी त्यावर झपाटल्यागत काम केलं, त्यातून एक शोधकादंबरी प्रसवली.

रविवार, ७ एप्रिल, २०१९

झाडांची अज़ान..


गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिमांचे उंबरठे होते. त्यातला एक उंबरा मकबूल हुसैन यांचा होता. बाकीची घरं त्यांच्या जामातमधली, रिश्तेदारीतली होती. काही दिवसापूर्वी साठीतले मकबूलचाचा गाव सोडून थोरला मुलगा मोहसीनकडे हवापालटासाठी गेले तेंव्हा रणरणत्या उन्हात त्यांना निरोप द्यायला अख्खं गाव सडकेवर लोटलेलं. तेंव्हा ताठ कण्याचा तो डेरेदार पिंपळ माणसांच्या गर्दीने गलबलून गेला. "जिंदगी में हज जा न सका लेकीन विदाई तो उससे भी बेहतरीन मिल गयी, न जाने अब ये मिट्टी नसीब में गंवारा होगी की नही.." असं म्हणत चढलेल्या बसमधून खाली उतरून त्यांनी मातीचं चुंबन घेतलं तेंव्हा आयाबायांनी डोळयाला पदर लावला. वाकताना त्यांच्या पांढूरक्या दाढीला माती चिकटली, ती त्यांनी पुसलीदेखील नाही. तसेच स्तब्ध होऊन उभं राहिले. त्यांच्या भावूक अवस्थेनं गलबलून गेलेल्या गावातल्या जुन्या खोंडांनी मोहसीनला हक्कानं फर्मावलं, "मकबूलकडे लक्ष दे बाबा, त्याला काय पाहिजे काय नको याची वास्तपुस्त कर. तब्येतीकडं ध्यान दे.." मोहसीन मान हलवत होता. इकडे मकबूलचाचांना लोकांच्या नानाविध सूचना सुरु होत्या. काहींनी त्यांना खाण्यापिण्याच्या जिनसा दिल्या, कुणी पायजमा बंडीचं कापड दिलं, तर कुणी पानाची चंची दिली. तेव्हढ्यात मध्येच सवाष्ण बायका पोरी त्यांच्या पायावर डोकी टेकवत होत्या. ते उदार अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. काही लोक दुआ मागायला आलेले. मकबूलभाई त्यांच्या मस्तकावर हात ठेवून डोळे मिटत आकाशाकडे बघत तीन वेळा 'बिस्मिल्लाह' म्हणून दुआ पुटपुटायचे. यामुळे सडकेवरची गर्दी काही केल्या कमी होईना तसं आत बसलेल्या मोहसीनसह बसमधले बाकीचे प्रवासी वैतागले, कंडक्टरने घंटी वाजवायचा सपाटा लावला. अखेर गावकरी मागे हटले पण मकबूलचाचांचे पाय काही केल्या उचलत नव्हते.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

रेड लाईट डायरीज - अधम

काचेच्या तावदानातून खाली पाहताना
तिला रस्त्यावरचे जथ्थे दिसायचे

गर्दीला चेहरा नसतो असं कोण म्हणतं?
इथे तर चेहरा आहे कराल, अक्राळ विक्राळ वासनेचा !

घरी नातवंडे असलेली
कंबरेत पोक आलेली माणसे सुद्धा इथे आलीत,
वर्षाकाठी कित्येक पोरींशी अफेअर करणारी पोरंही आहेत,
वळवळ वाढली आहे त्यांच्या डोक्यात.

ढेरपोटे आहेत, बरगडया मोजून घ्याव्यात असेही आहेत,
भुकेकंगालही आले आहेत आणि
लॉकेट ब्रेसलेटानी मढलेलेही आलेत.

शनिवार, ३० मार्च, २०१९

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव..

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव पूर्वप्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी दि.३०/०३/१९  

२१ मार्च रोजी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया' 
(आयसीस) या जहाल अतिरेकी संघटनेचा नायनाट झाल्याची बातमी जगभरात झळकली आणि उजव्या विचारसरणीच्या अनेक पाठीराख्यांनी सर्वत्र आनंद व्यक्त केला आणि इस्लामी मुलतत्ववादावर विजय मिळवल्याची भावना जाणीवपूर्वक दृढ केली गेली. अनेकांना 'आयसीस'च्या कथित पराभवापेक्षा इस्लामी कट्टरतावादयांना परास्त केल्याचं समाधान अधिक सुखावून गेली. आता इस्लामी मुलतत्ववाद आटोक्यात आणण्यास वेग येईल अशी भावना पसरवली जाऊ लागली, भाबड्या समर्थकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तशा कंड्या पिकण्यास सुरुवात केली. याला जगभरातल्या माध्यमांनी खतपाणी घातले. या सर्व आनंदावर विरजण घालणारे वृत्त 'द ऍटलांटिक' या नियतकालिकाने दिले आहे.

सोमवार, २५ मार्च, २०१९

'विथड्रॉइंग अंडर फायर' - धर्मवादी फुटीरतावाद्यांसोबतच्या लढ्याचे मर्म



'विथड्रॉइंग अंडर फायर : लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज' हे जोशुआ ग्लेस यांचे पुस्तक आहे. डिसेंबर २०११ मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. सप्टेंबर २०११ च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील इस्लामिक मुलतत्ववाद्यांचा सिनेरिओ कसा बदलला आणि इस्लामिक विद्रोही फुटीरतावादी यांचा आकृतीबंध कसा बदलत गेला याविषयीचं भाष्य यात आहे. शस्त्रसज्ज इस्लामी विद्रोही (इन्सर्जन्ट) संघटनांशी लढताना जगभरात विविध ठिकाणी कशी आणि का माघार घ्यावी लागली या अनुषंगाने हे भाष्य येते. या संदर्भातल्या जगातील मुख्य सहा मुख्य घटनांचा आढावा त्यांनी पुस्तकात घेतला आहे. १९२० मधली ब्रिटीशांची इराकमधली माघार, १९६२ मधील फ्रेंचांची अल्जेरियातील माघार, १९८९ अफगाणीस्तानातून रशियाची माघार, १९९४ मधली अमेरिकन सैन्याची सोमालियातून माघार, २००० साली इस्राईलची लेबॅनॉनमधून माघार आणि २००५ सालची इस्त्राईलची गाझा पट्टीतली माघार यावर सटीक विवेचन आहे.

रविवार, १० मार्च, २०१९

तुमचं आमचं (!) 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' आणि फेसबुक ....


विख्यात अमेरिकन चित्रकार अँड्रयू वाईथ याने काढलेल्या 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' या पेंटींगसारखी फेसबुकची अवस्था झालीय. या पेंटींगला एक अर्थ आहे, याच्यामागे एक ट्रॅजेडी आहे. एक करुण कथा आहे. एक सत्यघटना आहे. लेखाच्या अखेरीस ती नमूद केलीय. पण त्याआधी खालील परिच्छेद वाचले तर या ब्लॉगपोस्टचा अर्थ कळेल.

बुधवार, ६ मार्च, २०१९

रेड लाईट डायरीज - सुटका


नित्य सराईतपणे रखेलीकडे यावं तसं
चंद्र रात्रीच्या दारापाशी येतो,
सोबतीला कधी चांदण्यांचा चमेली गजरा आणतो
तर कधी तारकांचा गुच्छ !

चंद्रवेडी रात्र तासकाटयाच्या चौकटीवर एका हाताने रेलून
क्षितिजाच्या तोरणाखाली उभी असते.
इच्छा असो, नसो
आपल्या बिजवर देहाला तिला सजवावं लागतं,

शनिवार, २ मार्च, २०१९

माध्यमांतला युद्धज्वर - सारेच दीप मंदावले नाहीत !



पुलवामा हत्याकांडाच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. जवानांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून देश शोकाकुल झाला. सर्व पक्ष, संघटना सरकारच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सामान्य नागरिक आपला क्रोध, शोक मिळेल त्या स्पेसमध्ये व्यक्त करू लागला. अशा नाजूक, गंभीर आपत्तीकाळात नागरिकांच्या आणि व्यवस्थेच्या संतापाचे, शोकाचे, प्रतिशोधाच्या भावनेचे नेटके, संयत प्रकटन माध्यमातून होणं नितांत गरजेचे असते पण दुर्दैवाने आपल्या माध्यमांच्या अकलेचे दिवाळे निघालेलं असल्यानं याही वेळेस त्यांनी माती खाल्ली. यात वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियाच्या खांद्यास खांदा भिडवून आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवताना लाजिरवाणा पोरखेळ केला.

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि जिनिव्हा कन्व्हेन्शन

फोटोत डावीकडे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि उजवीकडे माय लाई नरसंहारातील बळी    

१९४६ मध्ये अमेरिकन युद्धकैद्यांची रोममधून खुली परेड काढून इटालियन वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करणाऱ्या जर्मन लेफ्टनंट जनरलने जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील युद्धकैदीविषयक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप अमेरिकन सैनिकी आयोगाने केला होता. मात्र व्हिएतनाममध्ये जेंव्हा युद्धबंदयांसोबत अमेरिकन सैन्याने केलेले दुर्व्यवहार समोर येऊ लागले तसतशी नैतिकतेचे ढोल पिटणारी अमेरिका बॅकफूटवर गेली होती. इथे एक उदाहरण व्हिएतनाममधील माय लाई नरसंहाराचे देतोय. व्हिएतनाममधील सोन मई खेड्यानजीक असलेल्या माय लाई आणि माय खे या दोन वस्त्यांवर अमेरिकन सैन्याच्या कंपनी सी मधील पहिली बटालियन, विसावी इन्फंट्री रेजिमेंट, २३ व्या इन्फंट्री डिव्हिजनमधील ११ वी ब्रिगेड यातील हजारहून अधिक शस्त्रसज्ज सैनिकांनी हल्ले केले. लोकांना ताब्यात घेऊन पाशवी नरसंहार केला. ३४७ ते ५०४ च्या दरम्यान मृतांची संख्या होती (अनेकांचे मृतदेह अखेरपर्यंत न मिळाल्याने ही संख्या नेमकी ठरवली गेली नाही) यावरून हा नरसंहार किती मोठा होता याची कल्पना यावी. या नरसंहाराचे फोटो अमेरिकन सैन्याने काढले जे नंतर प्रकाशित केले गेले. मारले गेलेल्यात बहुसंख्य बालके आणि स्त्रिया होती. नरसंहार घडवून आणणाऱ्या सैनिकांची संख्याही अफाट होती. काही स्त्रियांवर बलात्कार केले गेले होते, काहींना अमानवी मारहाण झाली होती, काहींचा पाशवी छळ केला गेला होता. काही मृतदेहांची विटंबना केली गेली होती. यातील काही सैनिकांवर जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील तरतुदींचा भंग केल्याचा खटला चालवला गेला. इतक्या मोठ्या संख्येने हिंस्त्र नरसंहार करणाऱ्या सैनिकापैकी विल्यम केली हा एकच सैनिक दोषी सिद्ध झाला. प्रारंभी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली. नंतर ती बदलून दहा वर्षे कारावास अशी केली गेली. प्रत्यक्षात मात्र फक्त साडेतीन वर्षेच त्याला बंदिवास झाला तो ही त्याच्याच घरात नजरकैद करून ! या शिक्षेला कसलाच अर्थ नव्हता की कोणती नैतिक मुल्ये अमेरिकेने इथं जपली नव्हती ! शेवटी या घटनेचा जेंव्हा बभ्रा झाला जेंव्हा जगभरातून संतापाची लहर उमटली पण अमेरिकेच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. हा नरसंहार घडत असताना हयू थॉम्पसन, ग्लेन अँड्रीयोट आणि लॉरेन्स कोलबर्न या तीन अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून जखमींची मदत करण्याचा व त्यांच्यावरील अत्याचारापासून सैनिकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्यांना अमेरिकन संसदेची कठोर टीका सहन करावी लागली. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. घटनेनंतर ३० वर्षांनी अमेरिकन सरकारला उपरती झाली आणि या अधिकाऱ्यांना गौरवलं गेलं. यातून बोध मिळतो की जिनिव्हा कन्व्हेन्शन ही नामधारी गोष्ट आहे, जिचा वापर केवळ दबाव टीका यासाठी होतो त्यातून फारसं काही हाती पडत नाही. युद्धे वाईटच असतात त्यातून येणारा निष्कर्ष मानवतेला मागे नेणारा आणि विकासाला खीळ घालणारा येतो. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे पाकच्या तावडीत असलेले आपल्या वायूसेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान.

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

इराण भारतासाठी 'होप विंडो' ठरेल ? - इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या चाळीशीचा अन्वयार्थ


इराणमधील अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या तेहरान टाईम्समध्ये ११ फेब्रुवारीच्या दिवशी एक बातमी ठळकपणे छपून आलीय. बातमीचा मथळा होता - 'फेक इमाम डार्लिंग ऑफ झिऑनिस्ट्स अँड हिंदू फॅनॅटीक्स'. ऑस्ट्रेलियात आश्रयास असलेल्या स्वतःला इमाम म्हणवून घेणाऱ्या इमाम त्वाहीदी यांच्याबद्दलची ती बातमी होती. आपल्याकडे 'सामना'मध्ये ज्या खरपूस भाषेत उल्लेख केले जातात त्या शैलीतच त्वाहीदी यांचा यात उद्धार केला गेलाय. सोबतच झिऑनिस्ट्स आणि हिंदुत्व ब्रिगेड यांना कानपिचक्याही देण्यात आल्यात. त्वाहिदी यांनी इस्लामची प्रतिमा किती वाईट पद्धतीने डागाळली आहे आणि त्यांच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहेत यावर त्यात भर देण्यात आलाय. इराणी माध्यमांना या बातम्या पर्वणी ठरतात आणि तिथले जनमत ते आपल्याबाजूने दृढ करण्यासाठी त्याचा वापर करतात. विशेष म्हणजे इराणच्या इस्लामिक क्रांतीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा दहा दिवसीय सोहळाही याच दिवशी सुरु झाला. राजधानी तेहरानमधील आझादी स्क्वेअरमध्ये लाखोंच्या संख्येत जमलेल्या इराणी नागरिकांनी आझादी मार्च काढला. देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने आखाती देशासह जगाचाही लक्ष इकडे वेधले गेले.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक.



सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे.
सर्रास असं दृष्टीस पडत असतं की एखाद्या व्यक्तीने जीवापाड मेहनत करून आपल्यासाठी एखादी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ त्याच्या हातून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कुणीही कानाडोळाच करतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. इथं शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.

हिरोजी इदलकर आणि रायगड यांचे नाते मायलेकरासारखे आहे. हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करून रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. ६ जून १६७४ रोजी जेंव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली.
वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती.
ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली.
शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली.

याहीपुढे जाऊन महाराजांनी आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करून घेतली. त्याचा करार रद्द केला.

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

'निसर्ग'सत्व...


हिरवी पिवळी पानं असलेल्या निंबाच्या साली वाळून खडंग झाल्यात. कोवळ्यापिवळ्या उन्हाच्या माऱ्याने सालं दिवसागणिक फाकत चाललीत, त्यात बारीक फिकट तांबड्या चिकट मुंग्यांची रांग शांततेत एका तालात जातेय. दोन रांगा आहेत एक फांद्यांकडे जाणारी आणि एक बुंध्याकडे जाणारी. काही वेळापूर्वी एका अजस्त्र तेलमुंगळयाचे कलेवर त्यांनी खाली नेलंय. वीसेक मुंग्यांनी आपली ताकद, आपलं कौशल्य पणाला लावत त्याला अलगद आपल्या अंगाखांदयावर उचलून खालच्या दिशेने नेलंय. बुंध्यापासून वावभर अंतरावर त्यांचे घर असणार. दूर असलेला पावसाचा मौसम सुरु व्हायच्या आधी आपल्या खाण्याच्या चीजांची त्यांना बेगमी करायची आहे. त्या सतत वरखाली करताहेत आणि जमेल तितका साठा करताहेत. एक सूत्रात त्यांचे काम सुरु आहे. शेजारच्या झाडावरून टिकटॉक आवाज करत त्यांच्याकडे बघत अचानक वेगाने येणारया खारूताईची त्यांना खूप भीती आहे पण तरीही ते कामात गर्क आहेत. फांदीच्या तोंडाशी असलेल्या फुगीर गाठी खुल्या होऊन त्यातून बाहेर येणारया लालसर काळया डिंकात एका मुंगीचे इवलेसे पाय अडकलेत, काही क्षणात ती थिजेल किंवा मरेल. तिने त्यांच्या भाषेत काही इशारे केलेत. त्या सरशी वीसेक मुंग्या रांग मोडून तिच्या भोवती गोळा झाल्यात. अत्यंत वेगाने त्यांच्या हालचाली सुरु झाल्यात. काहींची डोकी एकमेकाला धडकताहेत, बहुधा त्या संदेश देत असाव्यात. पसरत चाललेल्या डिंकाच्या स्त्रावात त्यांनी एक नवी रांग कडेने बनवलीय आणि बाजूने अडकलेल्या मुंगीच्या मागच्या बाजूने स्त्राव अडवलाय. आणखी काही क्षणात तिचे सुईसारखे पाय वाळले तर ती हलू शकते. नव्हे तिला हलावेच लागेल. कारण मागच्या मुंग्यांनी अडवलेला स्त्राव त्या सगळ्यांना अडकवू शकतो आणि परिणामी त्या सगळ्यांचा जीव जाऊ शकतो. पाय गुंतून बसलेल्या मुंगीने आता निकराने पाय हलवलेत, तिच्या हालचाली सरशी तिच्या मागे शिरलेल्या मुंग्या एका झटक्यात बाजूला झाल्यात. त्यांच्या डोक्यांची भेंडोळी हलवत सगळ्या मुंग्या मूळ रांगात परत गेल्यात. रुतून बसलेली मुंगी काही क्षण सालीच्या एका तंतूला धरून शांत बसली आणि निमिषार्धात ती ही रांगेत सामील झालीय. ही सगळी कसरत दुरून पाहणारं लाल करड्या रंगावर पांढरे ठिपके असणारं एक फुलपाखरू यानं आनंदून गेलं आणि आपल्या पंखांना फडफडवत हसतमुखाने उडून गेलंय. सालीच्या सांदीत अडकून बसलेलं एक पिवळं पान डोळे पुसत खाली घरंगळलंय आणि बुंध्याच्या मुळाशी झेपावलंय. वरून खाली येऊ लागलेल्या त्या पिवळ्या पानाला घेऊन वारा त्याला अखेरची सैर घडवून आणायला चिंचेच्या पट्टीत शिरलाय, निंबाच्या पिवळट जीर्ण पानास बघून मातीवर लोळत पडलेल्या चिंचेच्या गुंजपत्त्यासारख्या पानांनी एकच फेर धरून निरोपगाण्यावर नाच सुरु केलाय. चिंचेच्या फांद्यातील घरटयातून डोकावणारया होल्यांच्या पिलांनी डोळे मोठे करत पानांच्या लयीवर ठेका धरलाय. इकडे निंबाच्या शेंडयावर सकाळी उगवलेल्या पालवीची मिटलेली घडी उघडलीय आणि सूर्याच्या कडकडीत किरणांना डोक्यावर घेत एक अवखळ स्मितहास्य केलंय. उन्हांना नावे ठेवत सावलीत बसलं की सकल चराचराच्या अद्भुत नादात सामील होता येतं. किती ही कडक ऊन पडलं तरी झाडांच्या कोवळ्या पानांना कान लावले तर त्यांच्या कन्हण्याचा आवाज ऐकता येईल. काही दिवसांपूर्वी पानगळ सुरु झाली होती तेंव्हा झाडावरच्या जुन्या पानांनी नव्या कोवळ्या पानांना जगण्याचा मंत्र शिकवलाय तो ऐकता येईल. 'पावसाची आर्जवं करायची नाहीत की त्याला भ्यायचंही नाही, आणि त्याच्या कुरवाळण्यालाही नाही भुलायचं. आपलं काम चोख करत राहायचं, मातीच्या वचनाला जागायचं.' हाच तो मंत्र.

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - बुधवारातील हसीना


बुधवारपेठेतली हसीना
ओठ चिरेपर्यंत लालबुंद लिपस्टिक लावून
दारे उघडी टाकून, खिडकीच्या तुटक्या फळकुटाला टेकून
खोटेखोटे हसत मुद्दाम उघडी छाती वाकवून उभी असते
तेंव्हा सभ्यतेचे अनेक छर्रे टराटरा फडफडवणारा शुभ्रपांढरा कावळा
तिच्याकडे पाहत शहाजोग गांडूळासारखा आत शिरतो.
आत जाताच कावळ्यातला नर कन्व्हर्ट होतो चिंधाडलेल्या लिंगपिसाटात
फाटून गेलेल्या बेडशीट अन कापूस निघालेल्या गादीवर झेपावून,
भिंतीवर लावलेल्या इम्रान हाश्मीच्या पोस्टरकडे बघत
तो तिच्या अचेतन देहावर स्वार होतो गिधाडांसारखा !

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

धर्मराज...


तिच्या काळ्या पाठीवरचे
सिग्रेटचे जांभळेकाळे व्रण पाहायचे होते
करकचून चावलेला मांसल दंडाच्या
मागचा भाग बघायचा होता
दात उमटलेलं कोवळं कानशील
चाचपायचं होतं
उपसून काढलेल्या डोक्यातल्या केसांच्या बटांना
स्पर्शायचं होतं
ब्लीड झालेल्या पलंगाच्या
कन्हण्याचा आवाज ऐकायचा होता.
वळ उमटलेल्या गालाचा
फोटो हवा होता
बुक्की मारून फाटलेल्या
ओठांचे रक्त पुसायचे होते
जांघेत आलेले वायगोळे
मुठी वळून जिरवायचे होते
पिरगळलेल्या हातांची
सोललेली त्वचा निरखायची होती
घासलेल्या टाचांच्या छिललेल्या कातड्यावर
फुंकर मारायची होती
छातीवरच्या चाव्यांना
जोजवायचं होतं
थिजलेल्या अश्रूंचे कढ प्यायचे होते.
या सर्वांची तिला असीम आस होती.
आता ती जून झालीय,
सरावलीय.

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

प्रिय जॉर्ज फर्नांडीस ..



तर जॉर्ज अखेर तुम्ही गेलातच.
आता सगळीकडे तुम्हाला घाऊक श्रद्धांजल्या वाहिल्या जातील.
त्यात ते सुद्धा सामील असतील ज्यांनी तुम्हाला शहिदांचा लुटारू म्हटलं होतं !
जॉर्ज तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असं त्यांना का वाटलं असावं ?
सैनिकांच्या शवपेट्यांत तुम्ही पैसा खाल्ला असा बेफाम आरोप तुमच्यावर झाला होता.
मरतानाही तुम्हाला त्याच्या वेदना जाणवल्या का हो जॉर्ज ?
तुम्ही तर तेंव्हाच मरण पावला होतात जेंव्हा तुमची तत्वे मरून गेली होती, किंबहुना समाजवादयांचे वारसदार म्हणवल्या गेल्या बाजारू नवसमाजवादयांनीच त्याची हत्या केली होती.
जॉर्ज तुम्ही त्यांना आवरलं का नाही कधी ?

शनिवार, २६ जानेवारी, २०१९

मोदी, रॅमाफोसा आणि प्रजासत्ताक दिन.


आपला देश आज ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्रपती मॅटामेला सिरील रॅमाफोसा हे प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य दिव्य सोहळयाचे यंदाचे मुख्य अतिथी आहेत. परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०१८ रोजी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये आयोजित केलेल्या १३ व्या जी २० देशांच्या बैठकीत रॅमाफोसांना प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख अतिथीपदाचे निमंत्रण दिले. भारत सरकार यंदाचं वर्ष महात्मा गांधीजींची १५० वी जयंतीवर्ष म्हणून साजरं करणार असल्याने रॅमाफोसा यांना निमंत्रित केलं गेल्याची पार्श्वभूमी विशद केली गेलीय. गांधीजींचे आफ्रिकेशी असणारे गहिरे नाते आणि तिथला प्रेरणादायी सहवास इतिहास सर्वश्रुत आहे, त्यास उजाळा देण्यासाठी सरकारने रॅमाफोसांना बोलवल्याचं म्हटलं जातंय. मोदीजींनी यावर वक्तव्य केलं होतं की रॅमाफोसांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशाचे संबंध अधिक दृढ होतील. या सर्व बाबी पाहू जाता कुणासही असं वाटेल की गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावरून सध्याचे सरकार मार्गक्रमण करतेय आणि त्याच भावनेने सर्व धोरणे राबवतेय. पण वास्तव वेगळंच आहे.

रविवार, २० जानेवारी, २०१९

'अक्षर' कहाणी...


‘वपुर्झा’मध्ये व. पु, काळे लिहितात की, “एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमीनीवरच आहोत.“

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

हॅलो..


आपण एखाद्याचं हृदय घायाळ करायचं, त्याच्या काळजाला जखमा द्यायच्या, नंतर त्याच्यासाठी एकाकीपणे झुरत राहायचं, त्याची क्षमा मागण्यासाठी जगत रहायचं, त्याच्या आवाजासाठी तडफडत राहायचं, एका क्षमायाचनेसाठी हजारो फोन कॉल्स करायचे पण पलीकडून कुणीच आपला आवाज ऐकण्यासाठी नसणं या सारखा दैवदुर्विलास कोणताच नाही.
याच थीमवर एक प्रसिद्ध काव्य रचले गेले आणि त्याचं रुपांतर गीतात झाल्यावर त्याला २०१७ मध्ये 'सॉन्ग ऑफ द इअर'चे ग्रामी ऍवार्ड मिळाले !
जिने काव्य रचले तिनेच ते गायले. ऍडेल तिचे नाव.
माझी आवडती गायिका आणि आवडते गाणे.
ऍडेलच्या 'हॅलो' या कवितेचा मराठीतील स्वैर अनुवाद खाली दिलाय.

बुधवार, ९ जानेवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - करुणा


तुमच्या दुःखांची मी भग्न आरास मांडतो
लोक त्याचीही वाहवा करतात,
कुणीएक सुस्कारेही सोडतात
पण जिवंत तुम्ही जळताना राजरोस चितेवर
लोक ढुंकूनही बघत नाहीत,
'रंडी तो थी कुत्ते की मौत मर गयी' म्हणतात
तरीही मी जिवंत कलेवरांच्या राशी उलथत राहतो,
तुम्ही नित्य नवे पत्ते पुरवत राहता.
गावगल्ल्या, वस्त्या, मेट्रोपॉलिटन शहरे,
पाण्याच्या पाईपलाईनपासून ते
फ्लायओव्हरच्या पुलाखाली गलितगात्र होऊन
ओघळलेल्या स्तनांना फाटक्या वस्त्रांनी झाकत
काळवंडलेल्या चेहऱ्याने तुम्ही पडून असता.

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

नयनतारा सहगल यांच्या निमित्ताने....

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 
मन उचंबळून यावं वा अंतःकरण भरून यावं असं काही साहित्य संमेलनांतून घडत नसतं. तिथं जे होतं तो एक 'इव्हेंट' असतो, ज्यात असते कमालीची कृत्रिमता, अनावश्यक औपचारिकता आणि आढ्यताखोर ज्ञानप्रदर्शनाची अहमहमिका ! यातूनही अध्यक्षीय भाषण, स्वागत भाषण, समारोपाचे भाषण अशी तीनचार मनोगते कधी कधी वेगळी वाटतात अन्यथा त्यांचीही एक ठाशीव छापील चौकटबंद आवृत्ती दरसाली पुनरुद्धृत होत असते. ही भाषणे देखील बहुत करून रटाळ असतात हे मान्य करायला हवे. साहित्य संमेलनात नावीन्याचा पुरता अभाव आढळतो हे देखील खरे. लिखितमुद्रित माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमे आहेत हे या संस्थेने या डिजिटल काळात अजूनही पुरते स्वीकारलेलं नाही.