शनिवार, २४ जून, २०२३

त्यांच्यासाठी एक खिडकी खुली राहूद्यात!

श्रद्धा वालकर या तरुणीचे दिल्लीत झालेले हत्याकांड असो वा अल्पवयीन साक्षीचे अघोरी हत्याकांड असो किंवा नुकतीच झालेली सरस्वती वैद्य या प्रौढ महिलेची निर्घृण हत्या असो. अशा हत्याकांडामधून काही गोष्टी कॉमन जाणवतात.
एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री घर सोडून निघून जाते अथवा घरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध तिच्या इच्छेने कुणासोबत तरी राहू लागते तेव्हा घरातील बहुतांश लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत, हिंसक नकारात्मक आणि विरोधाच्या असतात.
खूप कमी लोक असे असतात की जे आपल्या मुलीच्या/ बहिणीच्या किंवा घरातल्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा समजून घेतात.
बहुतेकांना मात्र आपल्याच इच्छा आपल्याच अपेक्षा तिच्यावर लादायच्या असतात.
यातून मुलगी आणि तिच्या कुटुंबियांमध्ये एक ज्वलंत संघर्ष जन्म घेतो.

आपल्या मुलीने आपल्याच मर्जीप्रमाणे राहावे, आपण सांगू तेच ऐकावे त्याचबरोबर आपण ज्याच्याशी तिचे लग्न ठरवू त्याच्यासोबतच तिने लग्न करावे यासाठी अनेक पालक हट्ट धरतात. तिच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही.
परिणामी मुलीला असे वाटते कि आपले कुणीच ऐकून घेत नाही.