सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !



‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !



"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......" 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

रेड लाईट डायरीज - शिल्लक



गिलटाचे वाळे, चांदीचे पाणी दिलेलं काळपट पैंजण
आणि बेन्टेक्सचे खोटे दागिने.
छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या
पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्या.
डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले
नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर.
समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले,
वीण उसवलेले दोन ब्लाऊज.
एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण
ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडी.
गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला,
पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो.
कुठली तरी जुन्या जमान्यातली
बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर.
हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी.
स्पंज निघालेली बेरंग झालेली राखी.
ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया,
मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी.
काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम,
बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे.
कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती.
वरचे अस्तर खरवडून गेलेली,
पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स.
फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी.
मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे.
इतकं सारं सामावून घेणारी कडी कोयंडा मोडलेली, गंजून गेलेली, फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची संदूक.
देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं, चहा कँटीनची किरकोळ उसनवारी.
करपून गेलेल्या इच्छा, चक्काचूर झालेली स्वप्ने,
मरून गेलेल्या वासना, घुसमटुन गेलेलं मन,
खंगलेलं कलेवर.

बुधवारातली शांताबाई
वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत
तडफडून मरून पडली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती...

- समीर गायकवाड.