बुधवार, ३० मे, २०१८

लेफ्टनंट कर्नल ते शायर ....फैज अहमद !



रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात फ़ैज उभे होते. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर फ़ैज तल्लखतेने उत्तरले - "सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे ( प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा - सुन्नाह sunnah ) त्यामुळे तुम्ही इथे जे काही खोटेनाटे पसरवत आहात ते तर खूप गैर आहे !" फ़ैज यांनी केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले. बरेच दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं मात्र अखेरीस रिहा करावंच लागलं. फ़ैज अहमद फ़ैज यांची शायरी उस्फुर्त अशा प्रकारची होती !

भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने फ़ैज यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तंब्बल पंचवीस वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले. लष्करात राहूनही कवीहृदय असणाऱ्या या कमालीच्या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले. तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले. सहा भाषा अवगत असलेल्या, कर्नलच्या हुद्द्यावर काम केलेल्या या शायरला १९६२ मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे फ़ैज सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना फ़ैज भारतीय हेर असल्याचा संशय होता. फ़ैज यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला. अनेक वर्षे कारावासात झिजवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि १९९० मध्ये कर्नल फैज अहमद फैज यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. काहींची खरी कदर त्यांच्या मरणानंतर केली गेलीय अशा लोकांत दुर्दैवाने फ़ैज यांचेही नाव आहे ही मोठी क्लेशदायक बाब होय.

नशा आणणाऱ्या 'कैफी" गीतांचा इतिहास...



दुपारचे चार वाजले होते. फतेह हुसेन रिझवी आपले मित्र बाबू खान यांच्याशी गप्पा मारत बसले होते. फतेहचा मुलगा अतहर, बाहेरून खेळत थेट घरात आला. बाबू खान गप्पा मारून निघून गेले. फतेह रिझवींनी अतहरला हाक मारून विचारले, ‘‘ बाबू खान यांना सलाम न करता तू थेट आत कसा काय गेलास?’’ अतहरने डोके खाजवत म्हटले, ‘‘अब्बा, मी त्यांना पाहिलेच नाही.’’ अब्बा म्हणाले, ‘‘ आता असं कर, समोर जी ताडाची झाडं दिसतात ना त्या प्रत्येकाला ‘सलाम’ करून ये.’’ बिचारा लहानगा अतहर नावाप्रमाणे खूपच पवित्र आणि निरागस होता. तो गेला आणि प्रत्येकाला सलाम ठोकत बसला. ताडाची झाडं किती होती ? दीडशेपेक्षा जास्त !

मंगळवार, २९ मे, २०१८

प्रणवदांच्या भेटींचे अन्वयार्थ...


राजकारण करताना अनेक बाबी मुद्दाम दुर्लक्षिल्या जातात तर जाणीवपूर्वक काही बाबींचे चुकीचे चित्र निर्माण केले जाते. एखाद्याचा वापर करायची वेळ येते तेंव्हा अनेक घटकांचं विस्मरण केलं जातं. आरएसएस आणि त्यांचे समर्थक कायम आणीबाणी काळातील घटनांवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजरयात उभं करण्याची संधी शोधत असतात.

शनिवार, २६ मे, २०१८

गर्भपाताचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या धोरणाबद्दल नुकतेच एक विधान केले आहे.  डोनल्ड ट्रम्प यांनी जेंव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता तेंव्हा त्यांनी काही महत्वाची आश्वासने देताना तीच आपली मुलभूत धोरणे आणि विचारधारा असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यात 'अमेरिका फर्स्ट' अग्रस्थानी होते, इस्लामी मुलतत्ववाद्यांना लगाम घालणे हे दुसऱ्या क्रमांकाचे धोरण होते आणि तिसरा मुद्दा होता गर्भपातांना रोखण्याचा. मागील कित्येक टर्मपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत गर्भपाताच्या मुक्त धोरणाला विरोध वा पाठिंबा आणि विनापरवाना बंदुका बाळगण्यास विरोध वा पाठिंबा हे दोन मुद्दे कायम चर्चेत असतात. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आलटून पालटून या मुद्द्यांवर फिरून फिरून येतात. पण किमान या धोरणात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. वारंवार अज्ञात माथेफिरू बंदूकधाऱ्याने गोळीबार करून अनेकांच्या हत्या केल्याच्या बातम्या येतात. त्रागा व्यक्त होतो पण धोरण बदलले जात नाही. गर्भपाताचेही असेच होते. पण डोनल्ड ट्रम्प हे हेकट, हट्टी स्वभावाचे आणि धोरणांचे दूरगामी परिणाम काय होतील याकडे लक्ष न देता आपल्या विचारांना साजेशा धारणांची पाठराखण करतात.

शुक्रवार, २५ मे, २०१८

अनुवादित कविता - ओबेदुल जाबिरी : इराक, उर्दू कविता

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.

शनिवार, १२ मे, २०१८

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.