गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि जिनिव्हा कन्व्हेन्शन

फोटोत डावीकडे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि उजवीकडे माय लाई नरसंहारातील बळी    

१९४६ मध्ये अमेरिकन युद्धकैद्यांची रोममधून खुली परेड काढून इटालियन वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करणाऱ्या जर्मन लेफ्टनंट जनरलने जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील युद्धकैदीविषयक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप अमेरिकन सैनिकी आयोगाने केला होता. मात्र व्हिएतनाममध्ये जेंव्हा युद्धबंदयांसोबत अमेरिकन सैन्याने केलेले दुर्व्यवहार समोर येऊ लागले तसतशी नैतिकतेचे ढोल पिटणारी अमेरिका बॅकफूटवर गेली होती. इथे एक उदाहरण व्हिएतनाममधील माय लाई नरसंहाराचे देतोय. व्हिएतनाममधील सोन मई खेड्यानजीक असलेल्या माय लाई आणि माय खे या दोन वस्त्यांवर अमेरिकन सैन्याच्या कंपनी सी मधील पहिली बटालियन, विसावी इन्फंट्री रेजिमेंट, २३ व्या इन्फंट्री डिव्हिजनमधील ११ वी ब्रिगेड यातील हजारहून अधिक शस्त्रसज्ज सैनिकांनी हल्ले केले. लोकांना ताब्यात घेऊन पाशवी नरसंहार केला. ३४७ ते ५०४ च्या दरम्यान मृतांची संख्या होती (अनेकांचे मृतदेह अखेरपर्यंत न मिळाल्याने ही संख्या नेमकी ठरवली गेली नाही) यावरून हा नरसंहार किती मोठा होता याची कल्पना यावी. या नरसंहाराचे फोटो अमेरिकन सैन्याने काढले जे नंतर प्रकाशित केले गेले. मारले गेलेल्यात बहुसंख्य बालके आणि स्त्रिया होती. नरसंहार घडवून आणणाऱ्या सैनिकांची संख्याही अफाट होती. काही स्त्रियांवर बलात्कार केले गेले होते, काहींना अमानवी मारहाण झाली होती, काहींचा पाशवी छळ केला गेला होता. काही मृतदेहांची विटंबना केली गेली होती. यातील काही सैनिकांवर जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील तरतुदींचा भंग केल्याचा खटला चालवला गेला. इतक्या मोठ्या संख्येने हिंस्त्र नरसंहार करणाऱ्या सैनिकापैकी विल्यम केली हा एकच सैनिक दोषी सिद्ध झाला. प्रारंभी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली. नंतर ती बदलून दहा वर्षे कारावास अशी केली गेली. प्रत्यक्षात मात्र फक्त साडेतीन वर्षेच त्याला बंदिवास झाला तो ही त्याच्याच घरात नजरकैद करून ! या शिक्षेला कसलाच अर्थ नव्हता की कोणती नैतिक मुल्ये अमेरिकेने इथं जपली नव्हती ! शेवटी या घटनेचा जेंव्हा बभ्रा झाला जेंव्हा जगभरातून संतापाची लहर उमटली पण अमेरिकेच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. हा नरसंहार घडत असताना हयू थॉम्पसन, ग्लेन अँड्रीयोट आणि लॉरेन्स कोलबर्न या तीन अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून जखमींची मदत करण्याचा व त्यांच्यावरील अत्याचारापासून सैनिकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्यांना अमेरिकन संसदेची कठोर टीका सहन करावी लागली. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. घटनेनंतर ३० वर्षांनी अमेरिकन सरकारला उपरती झाली आणि या अधिकाऱ्यांना गौरवलं गेलं. यातून बोध मिळतो की जिनिव्हा कन्व्हेन्शन ही नामधारी गोष्ट आहे, जिचा वापर केवळ दबाव टीका यासाठी होतो त्यातून फारसं काही हाती पडत नाही. युद्धे वाईटच असतात त्यातून येणारा निष्कर्ष मानवतेला मागे नेणारा आणि विकासाला खीळ घालणारा येतो. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे पाकच्या तावडीत असलेले आपल्या वायूसेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान.

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

इराण भारतासाठी 'होप विंडो' ठरेल ? - इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या चाळीशीचा अन्वयार्थ


इराणमधील अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या तेहरान टाईम्समध्ये ११ फेब्रुवारीच्या दिवशी एक बातमी ठळकपणे छपून आलीय. बातमीचा मथळा होता - 'फेक इमाम डार्लिंग ऑफ झिऑनिस्ट्स अँड हिंदू फॅनॅटीक्स'. ऑस्ट्रेलियात आश्रयास असलेल्या स्वतःला इमाम म्हणवून घेणाऱ्या इमाम त्वाहीदी यांच्याबद्दलची ती बातमी होती. आपल्याकडे 'सामना'मध्ये ज्या खरपूस भाषेत उल्लेख केले जातात त्या शैलीतच त्वाहीदी यांचा यात उद्धार केला गेलाय. सोबतच झिऑनिस्ट्स आणि हिंदुत्व ब्रिगेड यांना कानपिचक्याही देण्यात आल्यात. त्वाहिदी यांनी इस्लामची प्रतिमा किती वाईट पद्धतीने डागाळली आहे आणि त्यांच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहेत यावर त्यात भर देण्यात आलाय. इराणी माध्यमांना या बातम्या पर्वणी ठरतात आणि तिथले जनमत ते आपल्याबाजूने दृढ करण्यासाठी त्याचा वापर करतात. विशेष म्हणजे इराणच्या इस्लामिक क्रांतीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा दहा दिवसीय सोहळाही याच दिवशी सुरु झाला. राजधानी तेहरानमधील आझादी स्क्वेअरमध्ये लाखोंच्या संख्येत जमलेल्या इराणी नागरिकांनी आझादी मार्च काढला. देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने आखाती देशासह जगाचाही लक्ष इकडे वेधले गेले.

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक.



सोबतच्या पत्रात शिवाजी राजांनी एक अद्भुत निर्णय केला आहे.
सर्रास असं दृष्टीस पडत असतं की एखाद्या व्यक्तीने जीवापाड मेहनत करून आपल्यासाठी एखादी अजरामर कृती निर्मिली असेल तर त्याच्या समर्थनार्थ त्याच्या हातून कळत नकळत काही चुका त्रुटी झाल्या तर त्याकडे कुणीही कानाडोळाच करतो. ही वृत्ती सार्वत्रिक आणि सर्वकालीन आहे. इथं शिवाजीराजे त्याला अपवाद आहेत.

हिरोजी इदलकर आणि रायगड यांचे नाते मायलेकरासारखे आहे. हिरोजींनी आपलं सर्वस्व पणाला लावून जीवापाड मेहनत करून रायगड घडवला हे सर्वश्रुत आहेच. ६ जून १६७४ रोजी जेंव्हा शिवबांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा छत्रपतींचा हिरोजींशी झालेला संवाद इतिहासात अजरामर झाला. त्याचीच फलश्रुती म्हणून रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरास असणाऱ्या पायरीवखाली ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इदलकर’ हा शिलालेख दिसतो.
तर त्या स्थापत्यप्रभू हिरोजींनी कीकवी (आताचे मु.पो.किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे) या गावची पाटीलकी मल्हार निगडे देशमुख यांच्याकडून विकत घेतली.
वस्तुतः ती पाटीलकी मंडाजी निगडे यांची होती. मल्हारजीने मंडाजीच्या परस्पर ही पाटीलकी हिरोजींना विकली होती.
ही माहिती मिळताच शिवाजीराजांनी हिरोजींना ती पाटीलकी परत करण्यास फर्मावले.
मल्हार निगडेने पाटीलकी विकून हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत द्यायला लावली.
शिवाय मंडाजी निगडे यास त्याची पाटीलकी पुन्हा बहाल केली.

याहीपुढे जाऊन महाराजांनी आणखी अचूक व संपूर्ण न्याय केला - हा व्यवहार केल्याबद्दल मल्हारजीची देशमुखी काढून घेतली, त्याला त्या जबाबदारीतून मोकळं केलं. देशमुखीच्या बदल्यात त्याने भरलेली अमानत रक्कम देखील जशीच्या तशी(बजिन्नस) दप्तरदखल करून घेतली. त्याचा करार रद्द केला.

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

'निसर्ग'सत्व...


हिरवी पिवळी पानं असलेल्या निंबाच्या साली वाळून खडंग झाल्यात. कोवळ्यापिवळ्या उन्हाच्या माऱ्याने सालं दिवसागणिक फाकत चाललीत, त्यात बारीक फिकट तांबड्या चिकट मुंग्यांची रांग शांततेत एका तालात जातेय. दोन रांगा आहेत एक फांद्यांकडे जाणारी आणि एक बुंध्याकडे जाणारी. काही वेळापूर्वी एका अजस्त्र तेलमुंगळयाचे कलेवर त्यांनी खाली नेलंय. वीसेक मुंग्यांनी आपली ताकद, आपलं कौशल्य पणाला लावत त्याला अलगद आपल्या अंगाखांदयावर उचलून खालच्या दिशेने नेलंय. बुंध्यापासून वावभर अंतरावर त्यांचे घर असणार. दूर असलेला पावसाचा मौसम सुरु व्हायच्या आधी आपल्या खाण्याच्या चीजांची त्यांना बेगमी करायची आहे. त्या सतत वरखाली करताहेत आणि जमेल तितका साठा करताहेत. एक सूत्रात त्यांचे काम सुरु आहे. शेजारच्या झाडावरून टिकटॉक आवाज करत त्यांच्याकडे बघत अचानक वेगाने येणारया खारूताईची त्यांना खूप भीती आहे पण तरीही ते कामात गर्क आहेत. फांदीच्या तोंडाशी असलेल्या फुगीर गाठी खुल्या होऊन त्यातून बाहेर येणारया लालसर काळया डिंकात एका मुंगीचे इवलेसे पाय अडकलेत, काही क्षणात ती थिजेल किंवा मरेल. तिने त्यांच्या भाषेत काही इशारे केलेत. त्या सरशी वीसेक मुंग्या रांग मोडून तिच्या भोवती गोळा झाल्यात. अत्यंत वेगाने त्यांच्या हालचाली सुरु झाल्यात. काहींची डोकी एकमेकाला धडकताहेत, बहुधा त्या संदेश देत असाव्यात. पसरत चाललेल्या डिंकाच्या स्त्रावात त्यांनी एक नवी रांग कडेने बनवलीय आणि बाजूने अडकलेल्या मुंगीच्या मागच्या बाजूने स्त्राव अडवलाय. आणखी काही क्षणात तिचे सुईसारखे पाय वाळले तर ती हलू शकते. नव्हे तिला हलावेच लागेल. कारण मागच्या मुंग्यांनी अडवलेला स्त्राव त्या सगळ्यांना अडकवू शकतो आणि परिणामी त्या सगळ्यांचा जीव जाऊ शकतो. पाय गुंतून बसलेल्या मुंगीने आता निकराने पाय हलवलेत, तिच्या हालचाली सरशी तिच्या मागे शिरलेल्या मुंग्या एका झटक्यात बाजूला झाल्यात. त्यांच्या डोक्यांची भेंडोळी हलवत सगळ्या मुंग्या मूळ रांगात परत गेल्यात. रुतून बसलेली मुंगी काही क्षण सालीच्या एका तंतूला धरून शांत बसली आणि निमिषार्धात ती ही रांगेत सामील झालीय. ही सगळी कसरत दुरून पाहणारं लाल करड्या रंगावर पांढरे ठिपके असणारं एक फुलपाखरू यानं आनंदून गेलं आणि आपल्या पंखांना फडफडवत हसतमुखाने उडून गेलंय. सालीच्या सांदीत अडकून बसलेलं एक पिवळं पान डोळे पुसत खाली घरंगळलंय आणि बुंध्याच्या मुळाशी झेपावलंय. वरून खाली येऊ लागलेल्या त्या पिवळ्या पानाला घेऊन वारा त्याला अखेरची सैर घडवून आणायला चिंचेच्या पट्टीत शिरलाय, निंबाच्या पिवळट जीर्ण पानास बघून मातीवर लोळत पडलेल्या चिंचेच्या गुंजपत्त्यासारख्या पानांनी एकच फेर धरून निरोपगाण्यावर नाच सुरु केलाय. चिंचेच्या फांद्यातील घरटयातून डोकावणारया होल्यांच्या पिलांनी डोळे मोठे करत पानांच्या लयीवर ठेका धरलाय. इकडे निंबाच्या शेंडयावर सकाळी उगवलेल्या पालवीची मिटलेली घडी उघडलीय आणि सूर्याच्या कडकडीत किरणांना डोक्यावर घेत एक अवखळ स्मितहास्य केलंय. उन्हांना नावे ठेवत सावलीत बसलं की सकल चराचराच्या अद्भुत नादात सामील होता येतं. किती ही कडक ऊन पडलं तरी झाडांच्या कोवळ्या पानांना कान लावले तर त्यांच्या कन्हण्याचा आवाज ऐकता येईल. काही दिवसांपूर्वी पानगळ सुरु झाली होती तेंव्हा झाडावरच्या जुन्या पानांनी नव्या कोवळ्या पानांना जगण्याचा मंत्र शिकवलाय तो ऐकता येईल. 'पावसाची आर्जवं करायची नाहीत की त्याला भ्यायचंही नाही, आणि त्याच्या कुरवाळण्यालाही नाही भुलायचं. आपलं काम चोख करत राहायचं, मातीच्या वचनाला जागायचं.' हाच तो मंत्र.

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - बुधवारातील हसीना


बुधवारपेठेतली हसीना
ओठ चिरेपर्यंत लालबुंद लिपस्टिक लावून
दारे उघडी टाकून, खिडकीच्या तुटक्या फळकुटाला टेकून
खोटेखोटे हसत मुद्दाम उघडी छाती वाकवून उभी असते
तेंव्हा सभ्यतेचे अनेक छर्रे टराटरा फडफडवणारा शुभ्रपांढरा कावळा
तिच्याकडे पाहत शहाजोग गांडूळासारखा आत शिरतो.
आत जाताच कावळ्यातला नर कन्व्हर्ट होतो चिंधाडलेल्या लिंगपिसाटात
फाटून गेलेल्या बेडशीट अन कापूस निघालेल्या गादीवर झेपावून,
भिंतीवर लावलेल्या इम्रान हाश्मीच्या पोस्टरकडे बघत
तो तिच्या अचेतन देहावर स्वार होतो गिधाडांसारखा !

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१९

धर्मराज...


तिच्या काळ्या पाठीवरचे
सिग्रेटचे जांभळेकाळे व्रण पाहायचे होते
करकचून चावलेला मांसल दंडाच्या
मागचा भाग बघायचा होता
दात उमटलेलं कोवळं कानशील
चाचपायचं होतं
उपसून काढलेल्या डोक्यातल्या केसांच्या बटांना
स्पर्शायचं होतं
ब्लीड झालेल्या पलंगाच्या
कन्हण्याचा आवाज ऐकायचा होता.
वळ उमटलेल्या गालाचा
फोटो हवा होता
बुक्की मारून फाटलेल्या
ओठांचे रक्त पुसायचे होते
जांघेत आलेले वायगोळे
मुठी वळून जिरवायचे होते
पिरगळलेल्या हातांची
सोललेली त्वचा निरखायची होती
घासलेल्या टाचांच्या छिललेल्या कातड्यावर
फुंकर मारायची होती
छातीवरच्या चाव्यांना
जोजवायचं होतं
थिजलेल्या अश्रूंचे कढ प्यायचे होते.
या सर्वांची तिला असीम आस होती.
आता ती जून झालीय,
सरावलीय.