गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - वेश्याव्यवसाय : इतिहास ते आस



ऋषी आणि नदीचे मूळ शोधू नये असे म्हणतात, याची व्यक्तीशः अनुभूती मी तरी घेतलेली नाही मात्र हे विधान अनेक ठिकाणी प्रमाण म्हणून स्वीकारल्याचे वाचनात आले आहे. याच्या जोडीला वेश्यांचा समावेश व्हायला हवा असे वाटते कारण वेश्यांचे मूळ शोधणे हे एक अत्यंत जिकीरीचे आणि कष्टप्रद कठीण काम आहे. या लेखात यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला अनेक कंगोरे आहेत जे कुणाला आवडतील तर कुणाला याचा तिरस्कार वाटू शकेल.

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - वेश्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज



एकीकडे काही लोक आहेत जे झपाटल्यागत रेड लाईट एरियातील प्रत्येक मुलीस वाचवण्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी देशविदेशातून भारतात येऊन इथल्या दलदलीत रुतलेल्या मुलींना बाहेर काढण्यासाठी कंबर कसून आहेत आणि एकीकडे आपले काही कायद्याचे सुव्यवस्थेचे रक्षक आहेत ज्यांचे या क्षेत्रातले खबरी दिवसागणिक घटत चाललेत. कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही, धूसर भविष्याकडची ही हतबल वाटचाल आहे. वेश्यांकडे पाहण्याच्या मानवी दृष्टीकोनाच्या काही विशिष्ठ बंदिस्त भूमिका आहेत. त्या उध्वस्त होऊन मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्याकडे बघितले पाहिजे. पण असे होताना दिसत नाही. तीन भिन्नकालीन आणि भिन्न तऱ्हेच्या घटनांचा उल्लेख करतो जेणेकरून लेखाचा मतितार्थ उमगायला मदत होईल.

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

इम्रानचे एका दगडात दोन पक्षी...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान आपल्या पश्तून मित्रांसोबत ...
   
पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या 'द डॉन' या राष्ट्रीय वर्तमानपत्रात दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजीच्या मुखपृष्ठावर एक ठळक बातमी होती. त्याचं शीर्षक होतं की 'केपी सरकारद्वारे आदिवासी भागात ७००० विविध पदांची निर्मिती होणार !'. यातली केपी सरकार ही संज्ञा पाकिस्तानमधील खैबर पश्तूंवा या प्रांतासाठीची आहे. ज्या भागात नवीन पदांची निर्मिती होणार असा उल्लेख आहे तो भूभाग म्हणजे या खैबर पश्तूनी भागाला लागून असलेला सलग चिंचोळा भूप्रदेश जो अफगानिस्तानच्या सीमेला लागून आहे,  पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरलेल्या बलुचबहुल प्रांताला तो भिडतो. हा सर्व इलाखा पाकिस्तानमधील आजच्या काळातील अन्य जाती जमातींच्याहून अधिक मागासलेल्या इस्लामिक आदिवासी जाती जमातींनी ठासून भरलेला आहे. १९ डिसेंबरच्या बातमीनुसार पाकिस्तान इथं आता प्रशासनाचे सुशासन राबवण्यासाठी उत्सुक आहे. वरवर ही एक अंतर्गत घडामोड वाटेल पण बारकाईने पाहिल्यास याला एक मोठा इतिहास आहे. या बातमीचा नेमका अर्थ कळण्यासाठी थोडंसं इतिहासात जावं लागेल.

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

'बदनाम' गल्लीतला ऐतिहासिक दिवस...



तेरा डिसेंबर २०१८ च्या सांजेचा हा क्षण अभूतपूर्व म्हणावा असाच होता.
सोबतच्या छायाचित्रातले घर असे आहे की जिथे सभ्य पांढरपेशी लोक नाकाला रुमाल लावतात. इथल्या लोकांचा तिरस्कार करतात. सामान्य लोकं यांच्याबद्दल अत्यंत घृणा बाळगतात. इथे 'त्या' राहतात.
ही अख्खी वस्तीच 'त्यां'ची आहे. इथे सगळ्या गल्ल्यात 'त्यां'चीच घरे आहेत.
रात्र झाली की इथे पाय ठेवायला जागा नसते, 'यां'ची शरीरे उफाणली जातात आणि त्यावर स्वार होतात तेच लोक जे दिवसाढवळ्या सभ्यतेच्या मुखवट्याआड जगत असतात.

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जगभरातील प्रतिभावंतांनी झापडबंद चौकटी मोडल्यात, आपले काय ?


वर्ष संपत आलं की विविध क्षेत्रातील लोक सरत्या वर्षात त्यांच्या प्रांतात झालेल्या घडामोडींचा आढावा मांडू लागतात आणि त्यातील तपशीलवार निष्कर्षावरून हे वर्ष त्या क्षेत्रास कसे गेले याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. यातली व्यक्तीसापेक्ष मतभिन्नता वगळल्यास अनुमान बहुतांश समान येते. सर्वच क्षेत्रातील वर्षभराच्या आलेखाचे एकत्रीकरण केल्यास जगभराच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि पारलौकिक कलाचे एकसंध चित्र समोर येते. लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे याचे हे प्रतिबिंब असते. यंदाच्या वर्षी साहित्य- चित्रकृतींच्या प्रतिभाविष्कारात जगभरातल्या विविध भाषांतून मर्मभेदी विषयांवर नेटके भाष्य केलं गेलंय. अडगळीत पडलेले वस्तूविषय केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय यामागच्या प्रतीभावंताना द्यावे लागेल. मानवी जीवनाच्या विस्तृत पटात रोज नजरेस पडणारे तरीदेखील दखल न घेतले गेलेले अनेक घटक, घटना आणि विषय अत्यंत भेदक पद्धतीने यात मांडले गेलेत.

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

टुमारो नेव्हर कम्स अनटील इट्स टू लेट ! - 'सिक्स डे वॉर' बाय 'कर्नल बॅगशॉट'...




'सिक्स डेज वॉर' - एका ऐतिहासिक लढाईवरचे अर्थपूर्ण गाणे.... 

जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्त्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं आणि अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात रोज चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. ज्यूंना कधी काळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका आकृतीबंधातून आकारास आली होती. या भूमीचा इतिहास सांगतो की कधी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. विशेष म्हणजे दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम. आताच्या स्थितीत ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या अविरत संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. असो. तर इस्त्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिक (आताचे ईजिप्त, सिरिया आणि जॉर्डन) यांनी कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.

सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

ठगांच्या दडपलेल्या इतिहासाचे तथ्य...


नुकताच 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सपशेल कोसळला. त्याच्या यश अपयशावर आणि निर्मितीमुल्यांवर खूप काही लिहून झालेय आणि आणखीही लिहिले जाईल. मात्र ठग म्हणजे नेमके कोणते लोक आणि इतिहासात त्यांची दखल कशी घेतली गेलीय यावर पुरता प्रकाश अजूनही टाकला जात नाहीये. याआधी हॉलीवूडनेही 'कन्फेशन ऑफ ठग' या पुस्तकाचा आसरा घेत काही भूमिका चितारल्या होत्या. ब्रिटिश सैन्यातला अधिकारी विल्यम हेन्री स्लीमनने १८३५ मध्ये चतुर्भुज केलेल्या ठग राजा सईद आमीर अली उर्फ 'फिरंगिया' याच्या कबुलीजबाबावर हे पुस्तक आधारले होते. फिलिप मिडोज टेलरने लेखन केले होते. आजवर ठगांवर आलेले चित्रपट पाहिल्यास आपल्याला ते अतिरंजित आणि भडक, बीभत्स वाटू लागतात.

रविवार, २ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - सोय ..



कौरव पांडवांच्या द्यूतात बोली लागलेल्या 
द्रौपदीसारखे भाग्यही काहींना नसते,  
कपडे उतरवण्यासाठीच जिथे जन्म घ्यावा लागतो,  
तिथे श्रीकृष्ण कायमस्वरूपी रजेवर असतात. 
देवांच्या भाकडकथा विरल्या की 
भयाण वास्तवातून प्रसवतो वेदनांचा कभिन्न काळ.
जिथे उस्मरत्या दिशांच्या भिंतीत देहाची कलेवरे 
राजरोसपणे चिणली जातात 
पंक्चरल्या अवयवांवर मेकअपचे भडक लेप थोपतात  
धगधगते जिवंत शरीर त्यात गोठत जाते...

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

तुम एक अजनबी - फरिदा शादलु : इराणी कविता


इराणमधील गृहयुद्धाच्या दरम्यान कुठेही कबरी खोदल्या गेल्या, माणसं शक्य तशी दफन केली गेली. त्यात अनेक मृतदेहांची हेळसांड झाली. जमेल तिथं आणि जमेल तेंव्हा कबरी खोदणे हे एक काम होऊन बसले होते. त्या मुळे या कबरी अनेक सार्वजनिक ठिकाणी देखील आढळून येतात. ख्रिश्चनांच्या कबरी जशा मातीवरती उभट आकाराच्या चौकोनी बांधीव असतात तशा या इराणी कबरी नाहीत. या कबरींचा पृष्टभाग सपाट असून जमीनीलगत आहे. क्वचित त्यावर काही आयत लिहिलेल्या असतात. सुरुवातीस नातलग कबरीपाशी नित्य येत राहतात पण गोष्ट जशी जुनी होत जाते तेंव्हा कबरीची देखभाल कमी होते आणि युद्धात, चकमकीत मारल्या गेलेल्या लोकांच्या कबरी असतील तर असला काही विषयच येत नाही. लोक अशा कबरी सर्रास ओलांडत फिरतात, कारण पायाखाली काय आहे हे उमगतच नाही.

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

सोशल मीडियावरील अनसोशल तथ्ये...


राजकारण आणि समाजकारण यासाठी सोशल मिडीया किती वाईट ठरतो आहे हे आजकाल जग अनुभवते आहे. एखाद्या राष्ट्राचा निवडणुकीच्या निकालाचा कल बदलवण्यापासून ते विविध जाती धर्मात तेढ माजवून बेबंदशाहीचं वातावरणास यामुळे चालना मिळाली. सोशल मिडिया किती चांगला वा वाईट आहे यावर आजही मतमतांतरे आहेत. काहींना त्यापासून वैयक्तिक, आर्थिक वा सामुदायिक लाभ झालेत तर काहींना त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळालेत जसे की लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्यापासून ते कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची हक्काची व स्वतःची स्पेस मिळाली आहे. सार्वजनिक जीवनात देखील सोशल मिडीयाने चांगले वाईट प्रभाव दाखवले आहेत. मनोरंजन आणि दळणवळणाचे साधन म्हणून सामान्य लोकांच्या आयुष्यात दाखल झालेल्या सोशल मिडीयाचं रुपांतर आता व्यसनात झालेय आणि लोक दिवसेंदिवस त्याच्या खोल गर्तेत लोटले जाताहेत. राजकीय सामाजिक परिमाणे वगळता सोशल मिडीयाचा आणखी एक भयावह चेहरा अलीकडे समोर येऊ लागलाय. तो काळजात धडकी भरवणारा आणि धोक्याची घंटी वाजवणारा आहे. त्यातून मानवता लोप पावून मानवी मुल्यांचा ऱ्हास घडवून आणणारी अनैसर्गिक आणि धोकादायक चिन्हे दिसत आहेत.

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

लेस्बियन महिलांचं क्रूर शोषण - इक्वेडॉरमधली छळ केंद्रे !

'कौन्सिल ऑफ हेमिस्फेरिक अफेअर्स'मध्ये १६ जून २०१७ रोजी मार्टिना गुलीमोन यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता तेंव्हा काही मोठ्या जागतिक वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत इक्वेडोर सरकारचा निषेध नोंदवला होता. या संशोधन अहवालात अनेक धक्कादायक बाबी लेखिकेने उघडकीस आणल्या होत्या.

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

सत्तेच्या विरोधातील आवाजाच्या दडपशाहीचे नवे स्वरूप



'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

ग्लोबल वॉर्मिंग : अर्थकारणात नव्या संकल्पना

ग्लोबल वॉर्मिंग - अर्थकारणात नव्या संकल्पना

दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नवनव्या विषयावरील चर्चांना वाव मिळतो वा कधी कधी वादाला नवा विषय मिळतो. यंदा साहित्यातील कामगिरीबद्दलचा नोबेल जाहीर झालेला नाही हा वादाचा विषय होता होता राहिला तर यंदाच्या अर्थशास्त्रातल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे वाचून काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी समाधान व्यक्तवले. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज' नावाने ओळखला जातो. यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम नॉर्डस, पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांत विभागून दिला जाणार आहे. पुरस्काराच्या रुपाने त्यांना ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळतील. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेत्यात अमेरिकनांचा दबदबा कायम राहिलाय, हे वर्षही त्याला अपवाद नाही. विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर हे दोघेही प्रज्ञावंत अमेरिकन आहेत. नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही त्यांनी येल विद्यापीठातूनच घेतले आहे. तसेच प्रतिष्ठित मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी पीएचडी केली आहे. तर पॉल रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक आहेत. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो या विषयावरती संशोधन केलं आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले आहेत. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्या नावाची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रस्तावना महत्वाची आहे. त्यात म्हटलंय की, "जगापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या या जटील आणि महत्वाच्या प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. सर्वंकष व्यापाराच्या बाजाराचं आर्थिक आकलन आणि निसर्गाचे स्वरूप यांच्यातल्या पूरक नात्याचा आर्थिक सूत्रांचा आराखडा यांनी मांडला आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निर्दालन करताना शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...



राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो..

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

रेड लाईट डायरीज - झोपेतून जागे होणार तरी कधी ?


रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते.
युनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका - कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे.
त्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग हे मुख्य पुरवठादार जिल्हे आहेत आणि मुंडा, संथाल व ओरावो या आदिवासी जमातीतील बायका मुली प्रामुख्याने खरीद फरोक्त केल्या जातात.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

#रेड लाईट डायरीज - मुन्नीबाई ...


अशीच एक दास्तान मुन्नीबाईची आहे. ती मराठवाडयातल्या नांदेडची. बाप लहानपणीच मेलेला. पाच भावंडे घरात. चुलत्याने आईला मदत केली पण रखेलीसारखं वागवलं. चार पोरी आणि एक अधू अपंग मुल यांच्याकडे बघत ती निमूट सहन करत गेली. माहेरची परिस्थिती इतकी बिकट की तेच अन्नाला महाग होते. मग ही पाच तोंडे घेऊन तिकडे जायचे तरी कसे. त्यापेक्षा मिळेल ते काम करत देहाशी तडजोड करत मुली मोठ्या होण्याची वाट बघण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. एकदा चुलत्याने आईपाठोपाठ मुलीवरही हात ठेवला.

ती अजून न्हाती धुती देखील झाली नव्हती. घाबरलेल्या आईने त्याला हाकलून दिले. पण हे मरणच होते केंव्हा न केंव्हा येणारच होते. मग मुन्नीनेच यातून मार्ग काढला. ती घर सोडून पळून आली. तिने मुंबई गाठली. मुंबईने तिला धंद्याला लावले.

रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

बदनाम गल्ल्यांचा अक्षर'फरिश्ता' - मंटो !


सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...




भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कैफ...



ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..



जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !

वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

'परमाणू' - पोखरणच्या अणूचाचणीचा सोनेरी इतिहास..



बरोबर २० वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. याच घटनेवर आधारित 'परमाणू' या चित्रपटाचे 'झी सिनेमा'वर आज स्क्रीनिंग आहे. #indiblogger

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

रेड लाईट डायरीज - नवरा की दलाल ?


दिल्लीच्या जी.बी.रोडवरील रेड लाईट एरियातली आजची घटना. (अकरा ऑगस्ट २०१८)  
पानिपतमध्ये राहणाऱ्या सद्दाम हुसेन याने पहिली पत्नी हयात असताना धोकाधडी करत गुपचूप दुसरा निकाह केला होता. तिच्याशी पटेनासे झाल्यावर तिला फिरायला नेतो असं सांगत त्याने थेट जी.बी.रोडवर आणलं. तिथल्या चलाख दलालांनी त्याला बरोबर हेरलं. त्याच्याबरोबरचं 'पाखरू' काय किंमतीचं आहे हे त्यांना नेमकं ठाऊक होतं पण सद्दामला बाई किती रुपयात विकायची हे माहिती नव्हतं. त्यानं बायकोची किंमत दिड लाख रुपये सांगितली. दलाल मनातल्या मनात खूप हसले असतील. काहींनी त्याच्याशी बार्गेन करून पाहिलं. पण सद्दाम आपल्या 'बोली'वर ठाम होता. शेवटी त्याच्यामुळे नसते वांदे होतील म्हणून काही दलालांनी त्याला हुसकावून लावले.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

करुणानिधी - द सुपर थलैवा...


दोन दिग्गज फलंदाज प्रदीर्घ वेळापासून क्रीझवर असतील व त्यांनी मोठी भागीदारी रचली असेल आणि त्यांच्यातला एकजण बाद झाला की दुसरा देखील फार काळ तग धरू शकत नाही. तो देखील काही वेळातच बाद होतो असं एक गृहीतक आहे. असंच काहीसं राजकारणातही होत असतं. एकमेकाशी प्रदीर्घ वैर असणारे दोन दिग्गज तमिळ राजकारणी एका पाठोपाठ एक गेले. दोघांनी एकमेकांना इतके पाण्यात पाहिले होते की सत्तेचा लंबक आपल्या बाजूला कलल्यावर त्यांनी परस्परास अत्यंत अपमानास्पद व धक्कादायक पद्धतीने अटक केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांनी जे सुडाचे राजकारण केले ते इतके टोकाचे होते की अनेक सामान्य लोकांनीही त्यात उडी घेत एकमेकांची डोकी फोडली होती. राजकारण ही एक विचारधारा न राहता सत्ताकेंद्रित द्वेषमूलक प्रवृत्ती म्हणून दक्षिणेत रुजवण्यात या दोहोंनी समान हातभार लावला होता.

पिशवीसूत्र



खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

नव्या युरेशियाची रचना कितपत शक्य ?


अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, लहरी, एककल्ली आणि मुजोर स्वभावाचे असून त्यांची विचारधारा उजवीकडे कललेली आहे असं वॉशिंग्टन पोस्टने त्यांची उमेदवारी पक्की होताच म्हटले होते. काहींनी हे टीकेचे सुरुवातीचे स्वर कायम ठेवले तर काही ट्रम्प यांच्यासमोर नमले. आपल्यावर टीका करणाऱ्या मिडीयाचा समाचार घेताना तोल ढासळलेल्या ट्रम्प यांनी हे सर्व लोक ‘देशद्रोही’ असल्याची टीका नुकतीच केलीय. ट्रम्प यांचा तीळपापड होण्याचे ताजे कारणही तसेच आहे. ‘द्वेषमूलकतेने ठासून भरलेल्या तथाकथित राष्ट्रवादी लोकांच्या पाशवी समर्थनाच्या आधारे सत्तेत आलेल्या अमेरिकेच्या उद्दाम नेतृत्वास तुम्ही नमवू शकत नसाल तर तुम्ही त्यांचे जागतिक राजकीय महत्व कमी करून त्यांना शह दिला पाहिजे’ अशा अर्थाचे लेख मीडियात साधार मांडणीतून प्रसिद्ध केले जाऊ लागलेत. यातीलच एका लेखात ट्रम्प यांची दादागिरी कमी करण्यासाठी चीन आणि युरोपने एकत्र येऊन नव्याने युरेशियाची सूत्रे जुळवण्यावर प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे 'द इकॉनॉमिस्ट'नेही यावर भाष्य केलंय. या विचारांची ट्रम्प प्रशासनाने सवयीप्रमाणे टवाळी केली. पण यामुळे एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आला ज्याची सुरुवात रॉबर्ट कॅपलेनयांच्या एका पुस्तकाने केली होती.

शनिवार, २१ जुलै, २०१८

जागतिक खाद्यसंस्कृतीत कृत्रिम मांसाची भर....


जगभरात मोठ्या प्रमाणात वाचल्या जात असलेल्या ‘द अटलांटीक’ या लोकप्रिय नियतकालिकाच्या १३ जुलै २०१८ च्या आवृत्तीत साराह झांग यांचा ‘द फार्सियल बॅटल ओव्हर व्हॉट टू कॉल लब ग्रोन मीट’ हा लेख प्रसिद्ध झाला आणि जगभरातील मीडियाने कान टवकारले. कारण आतापर्यंत जी गोष्ट कपोलकल्पित म्हणून दुर्लक्षिली गेली होती, त्याबाबतीतचा हा जगासाठीचा वेकअप कॉल होता. १२ जुलै रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने(FDA) एक लोकबैठक बोलावली होती. विषय होता, ‘प्रयोगशाळेत कृत्रिम रित्या वाढवल्या गेलेल्या टेस्ट-ट्यूब मांसाचा’. या बैठकीत FDAने उपस्थित लोकांना आणि संशोधकांना पृच्छा केली की, 'या मांसास काय संबोधायचे ?' क्लीन मीट (स्वच्छ मांस), कल्चर्ड मीट (प्रक्रियान्वित मांस), आर्टिफिशियल मीट (कृत्रिम मांस), इन व्हिट्रो मीट (बाह्यांगीकृत मांस), सेलकल्चर प्रॉडक्ट (कोशिकाप्रक्रियाधारित उत्पादन), कल्चर्ड टिश्यू (प्रक्रियाकृत उती-अमांस) अशी नावे यावेळी सुचवली गेली. खरे तर ही केवळ नामाभिधानाची प्रक्रिया नव्हती. हे उत्पादन स्वीकृत करून त्याला बाजारात आणण्याची परवानगी देत आहोत याची ही चाचणी होती.

गुरुवार, १९ जुलै, २०१८

रेड लाईट डायरीज - पांढरपेशींच्या दुनियेतला ऑनलाईन रेडलाईट 'धंदा' ..


पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील गणेश मंदिरानजीकच्या एका उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये अठरा जुलै २०१८ रोजी पोलीसांनी रेड टाकून सात मुलींची सुटका (?) केली आणि पाच जणांना अटक केली, दोघे फरार (!) होण्यात यशस्वी झाले. हे रॅकेट व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवरून चालत होते. आयटी पार्क मधले रॅकेट असल्याने याचे सर्व्हिस प्रोव्हायडींग फंडे ही डिजिटल आणि आधुनिक होते. ही माहिती स्टेशन डायरीतून येते. मी याही पुढची माहिती देतो. या गोरखधंद्याची व्याप्ती पुणे शहरात वा संपूर्ण महाराष्ट्रात वा अखिल देशात किती आणि कशी असावी याची झलक तुम्हाला यातून मिळेल.

शनिवार, १४ जुलै, २०१८

नासाची सूर्यावर स्वारी ...


आकाशांत सर्वत्र तारे व तेजोमेघ अव्यवस्थित रीतीनें पसरलेले दिसतात. जिथे ते दाट दिसतात त्या भागाच्या दिशेनें विश्वाचा विस्तार अधिक दूरवर असतो. तर ज्याला आपण दीर्घिका म्हणतों तो सर्व आकाशास वेष्टणारा, काळोख्या रात्रीं फिकट ढगाप्रमाणें दिसणारा पट्टा होय. हा असंख्य तारे, तारकापुंज व तेजोमेघ यांची बनलेला आहे. तेजोमेघ म्हणजे आकाशांत दुर्बिणींतून अंधुकपणें प्रकाशणारा वायुरूप ढगासारखा पदार्थ. आपली सूर्यमाला मिल्की-वे(आकाशगंगा) नावाच्या दिर्घिकेत आहे. सूर्यमाला सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. यानुसार एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली. भोवतालच्या तारकासमूहातील ताऱ्याच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या प्रघाती तंरंगांमुळे सूर्य तयार झाला.

''सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च'' अशी जी ॠग्वेदांत सूर्याची थोडक्यांत महति गायिली आहे ती यथार्थ नाहीं असें कोण म्हणेल ! सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. सूर्य हा G2V या वर्णपटीय विभागात (spectral class) मोडतो. G2 म्हणजे त्यच्या पृष्ठभागाचे तापमान जवळपास ५५०० केल्व्हिन असून त्याचा रंग पिवळा आहे. सूर्य त्याचे हायड्रोस्टॅटिक संतुलन सांभाळून असल्याने तो प्रसरणही पावत नाही किंवा आकुंचनही पावत नाही. सूर्यामध्ये स्फोट होण्याइतके वस्तुमान नाही. त्याऎवजी ४०० ते ५०० कोटी वर्षांनी तो लाल राक्षसी ताऱ्याच्या अवस्थेत जाईल. या अवस्थेनंतर तीव्र तापमान स्पंदनांमुळे सूर्याचे बाह्य आवरण फेकले जाईल व प्लॅनेटरी नेब्युला तयार होईल. शेवटी सूर्य श्वेत बटूमध्ये रुपांतरित होईल. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.

सोमवार, ९ जुलै, २०१८

'त्या' फोटोच्या निषेधास असलेली इतिहासाची झालर...



काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख यांनी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांच्यासह रायगडावरील मेघडंबरीत सिंहासनाधिष्टीत शिव छत्रपतींच्या मूर्तीसमोर बसून फोटो काढले आणि ते सोशल मिडियावर पोस्ट केले. यावरून त्याच्यावर प्रखर टीका झाली, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी देखील त्यांच्यावर टीका केली. रितेश देशमुख यांनी लोकांच्या नाराजीचे उग्र स्वरूप पाहून तत्काळ माफी मागत ते फोटो डिलीट करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरे तर रायगडावरील मेघडंबरीच्या नजीक जाण्यास कुणालाही परवानगी नाही, दुरूनच दर्शन घेऊन लोक परत फिरतात. मग हे लोक तिथे आत कसे काय गेले, आत गेल्यानंतर मेघडंबरीवर चढताना त्यांना कुणीच कसे अडवले नाही, दडपणापायी अडवले नाही असे समजून घेतले तरी महाराजांच्या मूर्तीसमोर पाठमोरे बसण्यास तरी त्यांना मज्जाव का गेला नाही हा प्रश्नही अनुत्तरितच राहतो. याच्या चौकशा वगैरे होतील, पुढचे सोपस्कार पार पडतील. पण सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे तळवे चाटणारा एक वर्ग आहे, त्यातील काहींनी खोचक शब्दाआडून छुपा सवाल केला की, "हे सर्वजण बसलेलेच होते, उभे नव्हते ; शिवाय इतका गहजब करायचे काही कारण नव्हते कारण शिवछत्रपतींवरील चित्रपटाच्या होमवर्कसाठीच हे तिथे गेले होते.' अशी मल्लीनाथीही करण्यात आली. न जाणो असा विचार आणखी काहींच्या मनातही आला असेल, पण त्यांना या वर्तनाच्या निषेधामागील कारण माहिती नसेल यावर खरंच विश्वास बसत नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

सोशल मीडिया कोणी भरकटवला ?



व्हॉटसऍपवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे काही दिवसापूर्वीच्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात भिक्षुकी करणाऱ्या भटक्या जमातीच्या पाच निरपराध लोकांना शेकडो लोकांच्या बेभान जमावाने क्रूरपणे ठेचून मारले. या नंतर सरकारने जागे झाल्याचे सोंग केले. यंत्रणांनी कारवाईचे देखावे सुरु केले. ४ जुलैला व्हॉट्सऍपने देखील खेद व्यक्त करण्याची औपचारिकता पार पाडत 'यावर अधिक सजगता बाळगली जाईल' अशी हवा सोडली. मुळात हा प्रश्न असा एका दिवसाचा वा एका घटनेचा नाही. याला प्रदीर्घ पूर्वनियोजित गैरवापर कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे तसा वापर करताना खोटे व्हिडीओ पाठवणे, खोट्या आकडेवारीवर आधारित माहितीचा डोंगर उभा करणे, प्रतिस्पर्ध्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे याचे राजकारण्यांना काहीच वाटले नाही. आधी विरंगुळा म्हणून हाती आलेला सोशल मीडिया नंतर व्यसनात रुपांतरीत झाला आणि सामान्य माणूस देखील आपली विकृती यातून खुलेआम व्यक्तवू लागला. त्यामुळेच धुळ्याच्या घटनेला अनेक पैलू आहेत. याला केवळ घटनासापेक्ष पाहून चालणार नाही तर याच्या मुळाशी जाणे अपेक्षित आहे.

रविवार, १ जुलै, २०१८

फेअरवेल टू आर्म्स'चा रम्य इतिहास..


मध्यंतरी सोशल मीडियावर 'सिक्स वर्ड स्टोरी'चा ट्रेंड भलताच व्हायरल होता. सहा शब्दांमध्ये जमेल ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न अनेकजण करत होते . या ट्रेंडचा नेमका अर्थ खूप कमी लोकांना ज्ञात होता ! या ट्रेंडला एक मोठा इतिहास आहे, विख्यात अमेरिकन लेखक, साहित्यातील नोबल पुरस्कार विजेता अर्नेस्ट हेमिंग्वेला याचं श्रेय जातं. १९३२ ते १९४५ या काळात त्याचं लेखन इतके गाजलं होतं की त्यावर तिकीट बारीची मोडतोड करणारे सिनेमे तयार झाले ! हेमिंग्वेचे सुरुवातीचे दिवस आणि नंतरचे दिवस यात जमीन अस्मानचा फरक असल्यानं त्याला लेखक म्हणून जी आयडेंटीटी हवी होती ती मिळाली नव्हती. एकदा तो आपल्या लेखक मित्रांसोबत चर्चा करत होता. मित्रांशी बोलताना आपल्यातल्या सिद्धहस्त लेखणीची ताकद सांगितली. यावर त्याच्या मित्रांनी आव्हान दिलं की ‘तो जर इतकाच भन्नाट लेखक असेल तर केवळ सहा शब्दात गोष्ट लिहून दाखवावी !' त्यांचं हे आव्हान जिव्हारी लागलेला हेमिंग्वे हळवा झाला. त्यानं तत्काळ गोष्ट लिहिली ! हेमिंग्वेनं लिहिलं होतं - 'न वापरलेले, तान्हुल्याचे बूट विक्रीला आहेत......' ( For Sale: Baby shoes, Never worn...) हेमिंग्वेचे हे शब्द खूपच लोकप्रिय झाले कारण त्यात अनेक गूढ, करूण आणि मृदू रंग भरले होते. हेमिंग्वेने मित्रांचे आव्हान स्वीकारून पैज जिंकली खरी मात्र इथून त्याची जगभरात ख्याती वाढली. लोकांनीही हा प्रयत्न करून पाहिला ! १९९० च्या दशकात युरोपात या गोष्टीचे पुन्हा पेव फुटले. सोशल मिडियावर दरवर्षी जून जुलैमध्ये Six Word Stories हा ट्रेंड आघाडीवर राहू लागला ! हा ट्रेंड याच काळात झळकतो कारण दरवर्षी २ जुलैला अर्नेस्ट हेमिंग्वेचा स्मरणदिवस साजरा होतो. विसाव्या शतकातील अमेरिकेचा सर्वश्रेष्ठ लेखक अन Six Word Storiesचा जनक असणारा अर्नेस्ट हेमिंग्वे एक अफलातून आयुष्य जगला अन एक दुर्दैवी शेवटाने गेला ! त्याच्या ५८ व्या स्मरणदिनाच्या औचित्याने हा लेख.

शनिवार, २३ जून, २०१८

निर्वासितांच्या प्रश्नावरील विनाशकारी मौन..


यंदाच्या जूनमध्ये जागतिक स्थलांतरितांच्या विश्वात दोन महत्वाच्या घटना घडल्या. बेकायदेशीर मार्गाने युरोपात घुसखोरी करण्याच्या एका प्रयत्नांत स्थलांतरितांची एक बोट भूमध्य समुद्रात उलटली. त्यात जवळपास ५०  लोकांना जलसमाधी मिळाली. त्यातील ४७ मृतदेह ट्युनेशीयाच्या किनाऱ्यावर आढळून आले आहेत. ६८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेतील सर्व मृत अस्थिर असलेल्या आखाती देशातील होते. बोटीत नेमके किती लोक होते याची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. या नंतरची दुसरी घटना जीवितहानीची नव्हती पण त्याने जगाचे लक्ष वेधले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आपल्या आईची झडती घेताना भेदरलेल्या अवस्थेतील रडणाऱ्या बालिकेच्या फोटोला जगभरातील माध्यमांनी प्रसिद्धी दिली. टर्कीच्या सीमेवर वाहत आलेल्या चिमुकल्या सिरीयन मुलाच्या मृतदेहाच्या फोटोने जगात जशी खळबळ उडवून दिली होती तशीच खळबळ याही घटनेने उडाली. या दोन घटनांमुळे जगभरातील स्थालांतरितांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले. विशेष म्हणजे मागचं वर्ष याच मुद्द्यावर एक निराशाजनक नोंद करून गेलं. गतवर्षीची जगभरातील निर्वासितांची संख्या तब्बल सोळा दशलक्षाहून अधिक झाली. ही आकडेवारी जाहीर व्हायला आणि या दोन घटना एकाच वेळी  समोर आल्याने यावर सुंदोपसुंदी सुरु झालीय.

मंगळवार, १२ जून, २०१८

जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !



#ओवी_गाथा - १

पंढरीची वाट ओली कश्यानं झाली,
न्हाली रुखमीण केस वाळवीत गेली..

पांडुरंगाची भक्ती अत्यंत साध्या सोप्या शब्दात व्यक्त करताना त्याच्यासोबत असणारी आपुलकी आणि जवळीक खूप देखण्या रूपकात रंगवली आहे. भक्तांच्या आनंदरसात रुक्मिणी अशी काही न्हाऊन निघाली आहे की त्यात ती नखशिखांत ओली झाली. मग या ओलेत्या रुक्मिणीचे केस पंढरपूरच्या भक्तीमार्गावरूनच सुकत गेले, त्यामुळे पंढरपूरचा रस्ता शोधताना कुणाला तसदी होणार नाही कारण या रस्त्याला रुक्मिणीच्या केसांचा सुगंध आहे जो भक्तांच्या भक्तीने भरून पावला आहे.

सोमवार, ११ जून, २०१८

लालूप्रसाद यादव - बिहारी बाबूंचा जिव्हाळयाचा माणूस ...


वक्त का पता नही चलता अपनों के साथ,
पर अपनों का पता चलता हैं वक्त के साथ…

बिहारी जनता अजूनही लालूंवर प्रेम करते. 
हा माणूस सगळीकडे आपल्या बोलीत, आपल्या लेहजात बोलतो. साधं राहतो याचंसगळं दिनमान आपल्यासारखं आहे याचं बिहारच्या ग्रामीण जनतेस अजूनही अप्रूप आहे. बिहारी माणूस लालूंचा अजूनही पुरता द्वेष करत नाही, कुठे तरी सिम्पथी अजूनही आहे. लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ चा. आपल्या भावाबहिणींत सर्वात लहान असलेले लालू लहानपणीही गोलमटोल होते, यामुळेच घरच्यांनी त्यांचे नाव लालू ठेवले होते.

मंगळवार, ५ जून, २०१८

जुना पाऊस..


प्रत्येक पावसाळा तिची आठवण घेऊन येतोच.  
खिडकीतून दिसणारया शाममेघांत तिचा भास  होतोच......
"भिजलेली ती आणि तिला भिजवण्यात आनंद मानणारा रमत गमत पडणारा पाऊस. 
रुणझुणत्या पावसात छोट्याशा हातगाड्यावर सुगंधी चॉकलेटी वाफाळता चहा
पिताना तिच्या किनकिणाऱ्या बांगड्या, तिनें मान डोलवली की हेलकावे खाणाऱ्या इअररिंग्ज.
ओलेते कपडे नीटनेटके करताना कपाळावर पुढे येणाऱ्या कातिल बटा.

शनिवार, २ जून, २०१८

रक्त पेटवणारा कवी – नामदेव ढसाळ



विश्वाला कथित प्रकाशमान करणाऱ्या दांभिक सूर्याची खोट्या उपकाराची किरणे नाकारून आपल्या सळसळत्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात अगणित सुर्य प्रज्वलित करून क्रांतीची मशाल पेटवित सर्वत्र विद्रोहाची आग लावण्याची भाषा कुणी कवी जर करत असेल तर त्या कवीच्या धगधगत्या प्रतिभेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जातेच. अशा कवीची आणि त्याच्या कवितांची दखल घेणे अनिवार्य ठरते. किंबहुना कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही या उक्तीनुसार अशा कवितेस प्रस्थापितांनी डावं ठरवण्याचा यत्न केला तरी व्हायचा तो परिणाम होतोच. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातली 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.....' ही कविता असाच इतिहास मराठी साहित्यात घडवून गेली. या कवितेसकट समग्र 'गोलपिठा'वर आजवर अनेकांनी चिकित्सा, टीकासमीक्षा केली आहे. रसग्रहण केले आहे. तरीही व्यक्तीगणिक वैचारिक बदलानुसार त्यात नित्य नवे काहीतरी तत्व सत्व सापडतेच. त्यात ही छोटीशी भर ठरावी. विद्रोही कवितांचा विषय निघावा आणि कविवर्य नामदेव ढसाळांचा उल्लेख त्यात नसावा असं होऊ शकत नाही. ढसाळ हे या विद्रोही कवींचे शीर्षबिंदू ठरावेत आणि त्यांचा 'गोलपिठा' हा या कवितांचा प्रदिप्त ध्वजा ठरावा इतपत या विद्रोही काव्यात नामदेव ढसाळांच्या कवितेचा ठसा उमटला आहे.

दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....



'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'


काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली. 

गोष्ट आधार कार्डच्या मृत्यूची ...

अन्नावाचून मेलेली बुध्नी  

अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या व मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणारया 'द न्यूयॉर्कर' या नियतकालिकाच्या १६ मे च्या आवृत्तीत एक लेख प्रकाशित झालाय. 'हाऊ इंडियाज वेल्फेअर रिव्हॉल्युशन स्टार्व्हिंग सिटीझन्स' असे त्याचे शीर्षक आहे. यात झारखंडमधील उत्तम कुवर महतोच्या आईच्या मृत्युच्या घटनेचा हवाला देऊन अनेक गंभीर आरोप केले गेलेत. लेखातील काही बाजू महत्वाच्या आहेत पण लेखाचा मुख्य आधार असणारी घटना काही अंशी आपला रंग बदलत गेली. त्यामुळे यावर प्रकाश टाकणे हिताचे ठरते. भारतातील धान्य वितरण व्यवस्थेतील साठेबाजी, काळा बाजार आणि दडपशाही यावरही या लेखात प्रकाश टाकला गेलाय.

बुधवार, ३० मे, २०१८

लेफ्टनंट कर्नल ते शायर ....फैज अहमद !



रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात फ़ैज उभे होते. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर फ़ैज तल्लखतेने उत्तरले - "सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे ( प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा - सुन्नाह sunnah ) त्यामुळे तुम्ही इथे जे काही खोटेनाटे पसरवत आहात ते तर खूप गैर आहे !" फ़ैज यांनी केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले. बरेच दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं मात्र अखेरीस रिहा करावंच लागलं. फ़ैज अहमद फ़ैज यांची शायरी उस्फुर्त अशा प्रकारची होती !

भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने फ़ैज यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तंब्बल पंचवीस वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले. लष्करात राहूनही कवीहृदय असणाऱ्या या कमालीच्या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले. तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले. सहा भाषा अवगत असलेल्या, कर्नलच्या हुद्द्यावर काम केलेल्या या शायरला १९६२ मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे फ़ैज सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना फ़ैज भारतीय हेर असल्याचा संशय होता. फ़ैज यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला. अनेक वर्षे कारावासात झिजवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि १९९० मध्ये कर्नल फैज अहमद फैज यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. काहींची खरी कदर त्यांच्या मरणानंतर केली गेलीय अशा लोकांत दुर्दैवाने फ़ैज यांचेही नाव आहे ही मोठी क्लेशदायक बाब होय.

नशा आणणाऱ्या 'कैफी" गीतांचा इतिहास...



दुपारचे चार वाजले होते. फतेह हुसेन रिझवी आपले मित्र बाबू खान यांच्याशी गप्पा मारत बसले होते. फतेहचा मुलगा अतहर, बाहेरून खेळत थेट घरात आला. बाबू खान गप्पा मारून निघून गेले. फतेह रिझवींनी अतहरला हाक मारून विचारले, ‘‘ बाबू खान यांना सलाम न करता तू थेट आत कसा काय गेलास?’’ अतहरने डोके खाजवत म्हटले, ‘‘अब्बा, मी त्यांना पाहिलेच नाही.’’ अब्बा म्हणाले, ‘‘ आता असं कर, समोर जी ताडाची झाडं दिसतात ना त्या प्रत्येकाला ‘सलाम’ करून ये.’’ बिचारा लहानगा अतहर नावाप्रमाणे खूपच पवित्र आणि निरागस होता. तो गेला आणि प्रत्येकाला सलाम ठोकत बसला. ताडाची झाडं किती होती ? दीडशेपेक्षा जास्त !

मंगळवार, २९ मे, २०१८

प्रणवदांच्या भेटींचे अन्वयार्थ...


राजकारण करताना अनेक बाबी मुद्दाम दुर्लक्षिल्या जातात तर जाणीवपूर्वक काही बाबींचे चुकीचे चित्र निर्माण केले जाते. एखाद्याचा वापर करायची वेळ येते तेंव्हा अनेक घटकांचं विस्मरण केलं जातं. आरएसएस आणि त्यांचे समर्थक कायम आणीबाणी काळातील घटनांवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजरयात उभं करण्याची संधी शोधत असतात.

शनिवार, २६ मे, २०१८

गर्भपाताचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या धोरणाबद्दल नुकतेच एक विधान केले आहे.  डोनल्ड ट्रम्प यांनी जेंव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता तेंव्हा त्यांनी काही महत्वाची आश्वासने देताना तीच आपली मुलभूत धोरणे आणि विचारधारा असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यात 'अमेरिका फर्स्ट' अग्रस्थानी होते, इस्लामी मुलतत्ववाद्यांना लगाम घालणे हे दुसऱ्या क्रमांकाचे धोरण होते आणि तिसरा मुद्दा होता गर्भपातांना रोखण्याचा. मागील कित्येक टर्मपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत गर्भपाताच्या मुक्त धोरणाला विरोध वा पाठिंबा आणि विनापरवाना बंदुका बाळगण्यास विरोध वा पाठिंबा हे दोन मुद्दे कायम चर्चेत असतात. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आलटून पालटून या मुद्द्यांवर फिरून फिरून येतात. पण किमान या धोरणात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. वारंवार अज्ञात माथेफिरू बंदूकधाऱ्याने गोळीबार करून अनेकांच्या हत्या केल्याच्या बातम्या येतात. त्रागा व्यक्त होतो पण धोरण बदलले जात नाही. गर्भपाताचेही असेच होते. पण डोनल्ड ट्रम्प हे हेकट, हट्टी स्वभावाचे आणि धोरणांचे दूरगामी परिणाम काय होतील याकडे लक्ष न देता आपल्या विचारांना साजेशा धारणांची पाठराखण करतात.

शुक्रवार, २५ मे, २०१८

अनुवादित कविता - ओबेदुल जाबिरी : इराक, उर्दू कविता

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.

शनिवार, १२ मे, २०१८

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

राजसत्तेवरचा अंकुश !


मागील काही काळापासून आपले राजकीय नेते निवडणूकांचा मौसम जवळ आल्यावर विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना, मठांना, पूजास्थानांना भेटी देतायत. विविध जाती धर्माचे बाबा, बुवा, महाराज यांच्या चरणी लोटांगण घालताहेत. धर्मखुणा अंगावर वागवाताहेत. याला हरकत असायचे कारण नाही, असं करणं ही त्यांची अपरिहार्यता असू शकते. पण एकाही राजकीय पक्षाचा नेता ज्या शहरात धर्मस्थळांना भेटी देतो तिथल्या मोठ्या वाचनालयास, शास्त्र प्रयोगशाळेस वा संशोधन केंद्रास भेट देत असल्याचे कुठे दिसले नाही. बाबा, बुवा, महाराज यांच्या पायाशी बसून चमकोगिरी करणारे नेते त्या शहरातील एखाद्या शास्त्रज्ञास, सामाजिक विचारवंतास, तत्ववेत्त्यास भेटल्याचे औषधालाही आढळले नाही. असे का होत असावे यावर थोडासा विचार आणि निरीक्षण केलं तर एक तर्कट समोर आलं. मुळात लोकांनाच या गोष्टींची किंमत नाही. शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, समाजसुधारक हवेत कुणाला ? लोकांनाच बुवा, बाबा, महाराज यांचे इतके वेड लागलेय की अमुक एक नेता आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला भेट देऊन आला, तमक्या बाबाच्या चरणी लीन झाला याचे लोकांना कमालीचे अप्रूप असते. असं न करणारा आता मागास ठरतो की काय अशी विदीर्ण स्थिती आपल्याकडे निर्माण झालीय.