साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
साहित्य रसास्वाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन


इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

अभिव्यक्तीचे विद्रुपीकरण करणारे 'अनसोशल' अल्गोरिदम...

इथे सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱ्या मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षात अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. तुम्हीदेखील केवळ नि केवळ राजकीय भूमिका इथे मांडत असाल वा तुमच्या मित्रयादीत केवळ राजकीय पालख्या उचलणारे भोई असतील तर तुम्ही हे वाचावं.

इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते.

सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र

या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.

*** *****

सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी



अलेक्झांडर पुश्किन

अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

प्रेमचंदांची फाटकी चप्पल...



तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ? 
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो. 
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ? 
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो.. 

ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. 
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते. 
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं. 
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.

सोमवार, २ मार्च, २०२०

मणिकर्णिकेच्या घाटावरच्या स्मृती...


गंगेच्या काठी असलेल्या मणिकर्णिकेच्या घाटावरती मृतदेहांवर अंतिम संस्कार करताना त्यांच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मानेवर ठोकतात. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मस्तिष्कात कोणत्याही आठवणी राहू नयेत. त्याचे माइंड ब्लॅन्क राहिलं की त्याचा अंतिम प्रवास कमी यातनादायी होईल असं त्यांना सुचवायचं असतं. तर काहींना भीती वाटते की मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा भटकू नये, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये याकरिता त्याच्या स्मृती पुसलेल्या बऱ्या ! खरं तर देह अचेतन झाला की सगळं संपून जातं.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

बदनाम गल्ल्यांचा 'अक्षर फरिश्ता' - मंटो !



सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...



आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ?

सोमवार, १० जून, २०१९

विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ - गिरीश कार्नाड


आपल्या जन्मदात्या वडीलांच्या वंशातून न जन्मलेल्या पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱ्या आपल्या सावत्र भावास आपल्याच वडीलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकट्या भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का ?
नाही ना ?
पण एक माणूस होता असा.
त्याची ही दास्तान.
गिरीश कार्नाड  त्याचं नाव.

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

जगभरातील प्रतिभावंतांनी झापडबंद चौकटी मोडल्यात, आपले काय ?


वर्ष संपत आलं की विविध क्षेत्रातील लोक सरत्या वर्षात त्यांच्या प्रांतात झालेल्या घडामोडींचा आढावा मांडू लागतात आणि त्यातील तपशीलवार निष्कर्षावरून हे वर्ष त्या क्षेत्रास कसे गेले याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. यातली व्यक्तीसापेक्ष मतभिन्नता वगळल्यास अनुमान बहुतांश समान येते. सर्वच क्षेत्रातील वर्षभराच्या आलेखाचे एकत्रीकरण केल्यास जगभराच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि पारलौकिक कलाचे एकसंध चित्र समोर येते. लोकांच्या मनात नेमके काय चालले आहे याचे हे प्रतिबिंब असते. यंदाच्या वर्षी साहित्य- चित्रकृतींच्या प्रतिभाविष्कारात जगभरातल्या विविध भाषांतून मर्मभेदी विषयांवर नेटके भाष्य केलं गेलंय. अडगळीत पडलेले वस्तूविषय केंद्रस्थानी आणण्याचे श्रेय यामागच्या प्रतीभावंताना द्यावे लागेल. मानवी जीवनाच्या विस्तृत पटात रोज नजरेस पडणारे तरीदेखील दखल न घेतले गेलेले अनेक घटक, घटना आणि विषय अत्यंत भेदक पद्धतीने यात मांडले गेलेत.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...




भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.

शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

महादेवी वर्मा यांची कविता - ठाकुरजी !

वय जसजसे वाढत जाते तसतशी मानसिकता बदलत जाते. विचारधारा प्रगल्भ होत जाते. जीवनाकडे आणि सकल चराचराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. काही 'दिव्य' लोक याला अपवाद असू शकतात. पण ज्यांच्यात संवेंदनशीलता आणि आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती असते त्यांचे विचार सातत्याने बदलत जाऊन विरक्तीच्या डोहाशी एकरूप होत चाललेल्या एका धीरगंभीर औदुंबरासारखी त्यांची अखेरची अवस्था होते. ज्ञानपीठसह असंख्य पुरस्कार -गौरव विजेत्या महादेवी वर्मा यांना गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. २६ मार्च १९०७ चा त्यांचा जन्म. त्यांच्या जन्मानंतर वडील बांके बिहारी यांना हर्षवायू होणं बाकी होतं, कारण त्यांच्या कुटुंबात तब्बल २०० वर्षांनी मुलगी जन्मास आली होती. ते ज्या देवीचे साधक होते तिचेच नाव त्यांनी तिला दिले, 'महादेवी' !

मंगळवार, १२ जून, २०१८

जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !



#ओवी_गाथा - १

पंढरीची वाट ओली कश्यानं झाली,
न्हाली रुखमीण केस वाळवीत गेली..

पांडुरंगाची भक्ती अत्यंत साध्या सोप्या शब्दात व्यक्त करताना त्याच्यासोबत असणारी आपुलकी आणि जवळीक खूप देखण्या रूपकात रंगवली आहे. भक्तांच्या आनंदरसात रुक्मिणी अशी काही न्हाऊन निघाली आहे की त्यात ती नखशिखांत ओली झाली. मग या ओलेत्या रुक्मिणीचे केस पंढरपूरच्या भक्तीमार्गावरूनच सुकत गेले, त्यामुळे पंढरपूरचा रस्ता शोधताना कुणाला तसदी होणार नाही कारण या रस्त्याला रुक्मिणीच्या केसांचा सुगंध आहे जो भक्तांच्या भक्तीने भरून पावला आहे.

शनिवार, २ जून, २०१८

दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....



'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'


काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली. 

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

स्तनदायिनी ...


१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या 'स्तनदायिनी'ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी. कांगालीचरण हा देवभोळा ब्राम्हण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रम्हच अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं हे ही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीपरमेश्वर समजणारया यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण सहन करू शकते की नाही याचादेखील ती कधी विचार करत नाही. पुढे जाऊन तिचं मातृत्व व्यावसायिक होऊन जातं इतकं जीवघेणं आईपण तिच्या नशिबी येतं आणि ते ती स्वीकारते.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...


लग्नाआधी नोकरी करणाऱ्या स्त्रिया लग्न झाले की थोड्याशा धास्तावतात. मातृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात आणखी घालमेल सुरु होते. तर प्रसूतीपश्चात येणाऱ्या कोंडमारयाच्या दिवसात तिला नोकरीविषयक निर्णय घेणं खूप कठीण वाटू लागतं. नोकरी करावी की नोकरी सोडून दयावी ह्या विचारांच्या चक्रात त्या पुरत्या गुरफटल्या जातात. काही स्त्रिया हल्ली सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गरोदरपणातील हक्काची रजा वापरून वेळ मारून नेतात पण पुढे काय करायचे याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नसते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तिथे कर्त्या पुरुषासोबत घरातील स्त्रीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसते. तिथे स्त्रियांकडे कुठलाच पर्याय उरत नाही. तर कधी विपरीत परिस्थिती असते. काही स्त्रियांना विश्रांती हवी असते, सध्याची नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दयावे असा त्यांच्या अंतरात्म्याचा सूर असतो. पण त्या हुंकाराला त्या आतच दाबतात. तर काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना लग्नाआधीही नोकरी करण्याची इच्छा असते मात्र माहेरच्या प्रतिगामी लोकांनी काहीशी आडकाठी केलेली असते त्यामुळे त्या माहेरी असताना नोकरी करू शकत नाहीत.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......


पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्याच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...  

मराठी रंगभूमीने कात टाकली होती तेंव्हाच्या एका नाटकाची ही गोष्ट आहे. 
सत्तरचे दशक होते.
‘सखाराम बाईंडर’मधील सखारामचे काम निळू फुले करायचे.
यातील सखारामची एण्ट्री अंगावर काटा आणणारी अशी असायची.
सत्तरीच्या दशकात निळू फुुलेंनी त्यांच्या मुरब्बीपणाने व  इरसाल आवाजात केलेली ती संवादफेक अन त्यात घेतेलेले पॉझेस अगदी प्रेक्षकाचा कलेजा खलास करणारे होते. “हा राजाचा महाल नाही हे सखाराम बाईंडरचे घर आहे” अशी सुरुवात होऊन हा सखाराम प्रेक्षकाच्या डोळ्यातून मेंदूत उतरायचा. 
नाटक पुढं सरकत रहायचं. सखाराम आणि त्याच्या एकापाठोपाठ त्याच्या आठ बायका रंगमंचाचा नव्हे तर नाट्यगृहातील प्रेक्षकांचा ताबा घेत. त्याच्या घरात या सगळ्या बायका राहून मागे पुढे होत निघून जातात अन एक गेली की दुसरी असं चालत राही. लक्ष्मी ही त्याची सातवी आणि चंपा ही आठवी बायको !
ज्या ज्या वेळी घरात सखारामच्या घरात नवीन स्त्री येते किंवा आणली जाते तेव्हा तो तिला या घरात राहताना काय आहे, काय नाही, याची स्वच्छ शब्दांत कल्पना देतो.

सखाराम तिला सांगतो म्हणण्यापेक्षा सुनावतोच - "तोंड शिवराळ आहे. परिस्थिती जेमतेम, पण दोन वेळा खायला नक्की मिळेल. दोन पातळं सुरुवातीला, मग वर्षाला एक. ते पण भारी नाही. मग तक्रार चालणार नाही. घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल. गलथानपणा घडायला लागला की बाहेरची वाट. गय होणार नाही. नंतर दोष देता कामा नये. आपल्या घरात आपण राजे असतो. गावात जोड्याशी उभे न का करीनात, घर कसं घरासारखं हवं आपल्याला. काय?..."
नाटक पाहताना अडीच तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन राहायचा. नाटकाला तुफान व्यावसायिक यश मिळाले अन तितकीच वादग्रस्त लोकप्रियता देखील मिळाली. हे यश फक्त त्यातल्या निव्वळ भाषेमुळे, अभिनयामुळे नव्हते तर सखारामचे पुरुषीपण आणि त्याला शांतपणे आव्हान देणाऱ्या लक्ष्मीच्या बाईपणाची शरीर-भाषा यांचे होते. हे द्वंद्व नाटकाला अविस्मरणीय करून गेलं. वासना समजून घेण्यासाठी ही शरीर-भाषा सजगतेने पाहावी आणि ऐकावी लागते.

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक श्रेष्ठ नाटक. सखाराम बाईंडरमध्ये हाताळलेला स्फोटक विषय रसिकांपर्यंत पोहचविण्यास दिग्दर्शकाला कंबर कसूनच काम करावे लागते. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ केला होता. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेतही याचे भाषांतर झाले. न्यूयॉर्क शहरातही  दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले. 

नाटकाचा विषय असलेला बाईंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकडयातुकडयांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाईंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. 

त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला. सखाराम बाईंडरमधे प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे. निळू फुल्यांच्या आवाजातलं हे स्वगत मेंदूला पोखरण्यास पुरेसं होतं. 'बाईंडर'चं नाट्य त्या स्वगतामध्ये नाही. नाटक पाहिल्यानंतर त्या सुरुवातीच्या स्वगताविषयी विचार केला, तर हे लक्षात येतं की त्या स्वगतात अर्थ नाही. म्हणजे, आपण कसे आहोत ह्याविषयी बाईंडरला जे वाटतं ते वेगळं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका त्याचं जे काही करतात ते वेगळं. आणि हे कुणी समजावून सांगत नाही, तर आपलं आपण समजून घेतो. तेंडुलकरांच्या अनेक नाटकांमध्ये सुरूवातीला 'मी कोण' हे सांगणारी स्वगतं असतात. 'शांतता कोर्ट चालू आहे' मध्येही बेणारेबाई मी अमुक मी तमुक असं सांगते. अनेक पात्रं घटना सांगतात. पण ते काहीसं नैसर्गिक वाटावं म्हणून आख्ख्या नाटकालाच एका खोटया खोटया वाटणाऱ्या पण तरीही खरोखर समाजात चालणाऱ्या कोर्ट केेसचं स्वरूप दिलेलं आहे.

बाईंडरच्या आधी निळूभाऊंचे देखील फारसे नाव नव्हते. अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरवातीच्या काळात त्यांनी माळी म्हणून पुण्यातील एका मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी केली होती. “कथा अकलेच्या कांद्याची” हे भाऊंचे पहिले नाटक. या नाटकाचे निळू भाऊंनी जवळ जवळ २००० प्रयोग केले. या नाटकामुळेच भाउंना त्यांचा पहिला सिनेमा “एक गाव बारा भानगडी” मिळाला होता. 'एक गाव बारा भानगडी'च्या झेलेअण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली. त्यानंतर निळूभाऊंना 'सखाराम बाईंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना 'सखाराम' पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना 'कथा'चा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. 'बाईंडर' आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. 'कथा अकलेच्या कांद्याची', 'सखाराम बाईंडर', 'सूर्यास्त', 'जंगली कबुतर' या सर्वाचे त्यांनी जवळपास दहा एक हजार प्रयोग केले. त्यातही 'कथा'चे दोनेक, 'जंगली कबूतर'चे दीडेक हजार, 'सखाराम'चे आठशे प्रयोग केले. 

'सखाराम बाईंडर’ या नाटकामध्ये निळूभाऊसोबत १९७२ मध्ये चंपाचे काम लालन सारंग यांनी असं काही साकारलं की त्यांचं सार्वजनिक जीवन ढवळून निघालं. हे त्यांचं पहिलं मराठी नाटक होतं. त्यात वेगळेपणाही होता अन्‌ भूमिका साकारण्यासाठी त्यांना स्वातंत्र्यही दिलं होतं. खरंतर ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविरुद्ध होती. त्यांना स्वतःला त्या चंपाची भूमिका इतकी दर्जेदार करतील अन्‌ हे नाटक खूप गाजेल, विशेष म्हणजे हे नाटक इतिहास घडवेल होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. मात्र ही भूमिका सगळ्याच दृष्टिकोनातून वेगळी ठरली. असो...बाईंडरची कथा हा या नाटकाचा प्राण होता... 

एका झोपडपट्टीत बाईंडर राहतो. तो आपल्या घरी बायका आणतो. अशा सात बायका त्यानं ठेवलेल्या असतात. त्यातल्या काही जणी निघून जातात, तर काहींना त्यानं सोडून दिलेलं असतं. या नाटकातील चंपा त्याची आठवी बायको असते. चंपा म्हणजे सखारामाच्या आयुष्यात आलेलं एक वादळच. त्यालाही चक्रावून टाकणारं. चंपा बिनधास्त आहे. बेफिकीर आहे. आपण आकर्षक आहोत, याचं तिला भान आहे. पुरुष आपल्याकडे आकृष्ट होतात हेही तिला ठाऊक आहे. तिनं जीवनातले बरेच अनुभव घेतले आहेत. 
नवरा नपुंसक असल्यानं तिनं त्याला सोडलं आहे. तीही गरज म्हणूनच सखारामाकडे आलेली असते. त्याच्या अटी ऐकूनही न ऐकल्यागत करते. अरेरावी करणारा, आक्रमक असणारा सखारामही चंपाचं वागणं पाहून अवाक होतो. सखाराम आणि दाऊद, दोघंही चंपावर भाळतात. 
सखारामाला शरीरसुख देण्यास ती नाखुष असते. डोक्यावर छप्पर हवं असेल, तर कोणत्यातरी पुरुषाला शरीर द्यावं लागणारच, या हिशोबानं दारू प्यायल्यानंतरच ती सखारामच्या अधीन होते. खरं तर ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून सखारामच्या आश्रयाला आलेली असते. ती तिथ मुक्तपणे जगण्यासाठी धडपड करते. चंपावर फिदा झालेला बाईंडर तिला आपल्या घरी कायमचे 'ठेवतो'. ती घरात येताच त्याची आधीची बाई लक्ष्मी घरी परत येते.

ही लक्ष्मी सुरुवातीला सदाचरणी, भाबडी, सहृदय आहे. तिला मूलबाळ नाही, आणि म्हणून पहिल्या नवऱ्यानं तिला टाकलं आहे. सासरी आणि माहेरी तिला कोणी विचारत नाही. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. ती देवावर उत्कट प्रेम करते. देवानं निर्माण केलेल्या जीवांवरही प्रेम करते. कावळा, मुंगी-मुंगळ्याशी बोलते. त्यांना खायला देते. ती घरात आल्यापासून देवपूजा, निरांजन लावणं वगैरे गोष्टी गृहिणीप्रमाणे करत असते. आपण गरजू असल्यानं सखारामाकडे राहायला आलो आहोत, याची तिला जाणीव असते. पण त्याचबरोबर आपली व्यक्तिगत जीवनमूल्यं, निष्ठा जपण्याचाही ती प्रयत्न करत असते. गणपतीच्या आरतीला सखारामाचा मित्र असलेला दाऊद तिला नको असतो. हे सारं सखारामाच्या जगण्याला, दृष्टिकोनाला छेद देणारं आहे. सखाराम तिच्यात गुंततो आहे, असं वाटत असतानाच तो तिला हाकलून देतो. लक्ष्मी आपल्या पुतण्याकडे राहायला जाते. मात्र चंपा सखारामच्या घरी येताच तीही तिथं परतते.  

सखारामाच्या घरी परतल्यावर लक्ष्मीला आधी चंपाचा सामना करावा लागतो. 
'चंपा सखारामाच्या शारीरिक मागण्या पुर्‍या करत राहील आणि लक्ष्मी घरातली पडतील ती कामं विनातक्रार करेल', या अटीवर चंपा लक्ष्मीला निवारा देते. 
खरं तर दोघींचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. बर्‍यावाईटाच्या दोघींच्या व्याख्याही अगदीच विरुद्ध आहेत. चंपाला सखारामबद्दल अजिबात प्रेम नाही. त्याच्याशी शरीरसंबंधही ती दारू प्यायल्यावरच ठेवू शकते. तिला सखारामाचा केवळ आसरा हवा आहे. लक्ष्मी मात्र सखारामबद्दल सकारात्मक  आहे. पण तरीही चंपा लक्ष्मीचा स्वीकार करून तिला घरात घेते.
लक्ष्मीनं घरात राहणं सखारामाला अजिबात मंजूर नाही. पण चंपापुढे त्याचं काही चालत नाही. लक्ष्मीच्या येण्यानं सखारामामध्ये हळूहळू बदल होत जातो. 
तिला, तिच्या देवांना तो घाबरू लागतो. चंपाशी संबंध ठेवण्यासही तो घाबरू लागतो. चंपा दाऊदशी संधान बांधते. चंपाचे हे बाह्यसंबंधच तिच्या जीवावर येतात. लक्ष्मी सखारामला सावध करू पाहते पण यातच तिच्या हातून चंपाचा खून होतो.    

प्रेमळ असणारी लक्ष्मी शेवटी चंपाचा आपल्या हातून झालेला खून थंडपणे पाहते. चंपा मेल्यावर तिला आनंद होतो. तिचं प्रेत पुरायला ती लगेच जमीन खणू लागते. इतकी क्रूरता तिच्या अंगी कुठून येते? 
लक्ष्मी अशिक्षित आहे. कर्मठ, सनातनी आहे. पहिल्या नवर्‍यानं घरातून हाकलून दिल्यावर सखाराम हाच लक्ष्मीच्या दृष्टीनं तिचा पती. तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि अशा आपल्या नवर्‍याच्या घरात आपलं स्थान बळकावून आलेली चंपा, दाऊदासारख्या ’मुसलमाना’बरोबर अनैतिक संबंध ठेवते? 
प्रत्यक्ष देवाशी बेईमानी! 
चंपाच्या या कृत्याला लक्ष्मीच्या जगात क्षमा नाही. 
लक्ष्मी धूर्त आहे. असुरक्षिततेचा भयगंड तिला ग्रासतो आहेच. अशा तणावाच्या अवस्थेत ती ते गुपित सखारामाला सांगते. स्वत:च्या बचावासाठी पशू असाच प्राणांतिक झुंज देतो. 
चंपाचा खून झाल्यावर तिची प्रतिक्रिया : "नाही तरी पापीच होती ती, नरकात जाईल'. तिच्या हिशेबी या बेईमानीला हीच शिक्षा." 
आता पोलादी, कणखर सखाराम हातून पाप घडल्याची जाणीव झाल्यावर संपतो. पार निर्जीव होतो. आणि आतापर्यंत मार खाऊन निर्जीव झालेली लक्ष्मी आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी चंपाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड ताकदीने, धैर्याने उभी राहते.

नाटकाच्या शेवटी सखाराम पूर्णपणे पराभूत होतो. मात्र चंपाला मारून मिळवलं काय? रागाच्या भरात चंपाचा खून होतो खरा पण चंपाच्या खुनानंतर लक्ष्मी त्याचा ताबा घेते आणि मनानं, शरीरानं तो सपशेल खचून जातो. 
कावळ्याशी, मुंगळ्याशी बोलणारी लक्ष्मी, त्याची मारझोड सहन करणारी लक्ष्मी आता त्याचा खरडून खरडून होणारा अंत शांतपणे बघते. आपली चूक झाल्याची त्याला कल्पना येते पण आता हताश होण्यापलीकडे त्याच्या हाती काहीच नाहीये.  

'बाईंडर'मधली सखारामची भुमिका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची भूमिका चंपाची आहे. या भूमिकेच्या मागणीनुसार त्यासाठी लालन सारंगना गावरान अन्‌ शिवराळ भाषा शिकावी लागली. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी त्यांनी कधीच केली नसूनही ही भूमिका त्या अक्षरशः जगल्या. 

नाटकाचे जेव्हा राज्यभरात प्रयोग सुरु झाले तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला अन तितकेच तथाकथित संस्कृतीरक्षकांचे अरण्य रुदन वाढू लागले. कल्याणच्या साहित्य संमेलनात रणजित देसाईंनी या नाटकावर बहिष्काराचा ठराव मांडला. प्रस्तावावर एका शब्दाची चर्चा न होता केवळ आवाजी मतदानाने या नाटकावर बंदी घालण्याची मागणी मराठीतील थोर साहित्यिकांनी केली. मजा म्हणजे त्यांपैकी अनेकांनी हे नाटक बघितलंच नव्हतं. नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. 
ज्या काळात रंगभूमीला अतिशय पवित्र मानलं जायचं त्या काळात अखेर पडती भूमिका घेऊन सेन्सॉरला हे नाटक बंद करणं भाग केलं गेलं. 
अर्थातच हे आंदोलन शिवसेनेनं  केलं होतं. 
राज्यभरात अनेक वाद झाले, न्यायालयात खटले दाखल केले गेले. तेव्हा लालन सारंग यांचे पती कमलाकर सारंग जे या नाटकाचे दिग्दर्शकदेखील होते त्यांनी न्यायालयीन लढा दिला. हा लढा सहा महिने सुरू होता. 
त्याच दरम्यान इतर नाटके 'बाईंडर'पायी सोडून दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली असूनही लालन 'बाईंडर' मधून बाहेर पडल्या नाहीत हे विशेष.मात्र या लन्यायालयीन लढ्याला यश आलं. 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, शिवसेनेने झुंडशाहीच्या जोरावर काही प्रयोग बंद पाडले. 
शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक 'संमत'(!) करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. हा सगळा त्रास सहन केल्यानंतरच त्यातून धडा घेत लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी मिळून ‘कलारंग’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. अनेक नाटकं गाजलीही. त्यात ‘बेबी’, ‘कमला’, ‘पोलिसनामा’, ‘जंगली कबुतर’ यांसह अनेक नाटकांचा समावेश होतो. 
'बाईंडर'मधल्या कुठल्याच कलावंताने पैसा हे कधीच इप्सित मानले नाही त्यामुळेच की काय बाईंडरमधल्या कुठल्याच कलावंताला कधी कामाची ददात पडली नाही. या नाटकाचा हा सर्व भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाईंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ नी मराठी मध्यमवर्गीय माणसाची मूल्यचौकटच मोडून टाकली. त्यांनी ‘लग्न’ या सामाजिक संस्थेलाच प्रश्नांकित केले. सखाराम बाईंडरचे तत्त्वज्ञान हे ‘लग्न’ या संस्थेसंबंधी चिरकालीनत्वाच्या सामाजिक समजाला छेद देणारे तत्त्वज्ञान आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यापलीकडचं जग तेंडुलकरांनी या नाटकाच्या निमित्तानं मध्यमवर्गीय माणसाच्या जाणिवेत आणून सोडले. मराठी नाट्यपरंपरेला अपरिचित असलेलं जग तेंडुलकरांनी मराठी रसिकाच्या जाणीवेत आणले याला त्यांची प्रायोगिकता म्हणता येईलच, परंतु परंपरेला माहीत असलेला ऐवजही तेंडुलकरांनी प्रायोगिक केला. ज्या नाटकाने तेंडुलकरांना भारतीय स्तरावर नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली, ते नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. मराठी रंगभूमीच्या इतिहासाला वळण देणारे हे अनैतिहासिक नाटक होते. लोकसंगीत हा ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा आत्मा आहे. कीर्तन, तमाशा, लावणी, मुजरा आदी लोककलांच्या वापरातून या नाटकाने हे दर्शवून दिले की, लोकनाट्य आणि वास्तववादी नाटकाच्या सरमिसळीतून समकालीन नाट्य घाटाची निर्मिती होऊ शकते. या नाटकाने हे देखील दर्शवून दिले की, ऐतिहासिक ऐवजातून अनैतिहासिक नाटक घडविता येते. या नाटकातून उपहास, विनोद, हिंसा आणि करुणा यांचा एकत्रित प्रत्यय येतो. लोकरंगभूमीच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर करणारे ते आधुनिक संवेदनांचे नाटक आहे. लोकरंंगभूमीवरील लवचिकता, ऊर्जा आणि कल्पकता यांचा वापर करून आधुनिक आशय मांडण्यात हे नाटक यशस्वी ठरले आहे. म्हणून हे नाटक मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेे. घाशीरामने पुण्यातील ब्राम्हणी संस्कृतीवर हल्ला केला असे ब्राम्हणांचे म्हणणे तर सखारामने नवी नैतिक अधोगतीची पातळी (हिला खालची सीमा नसते बहुतेक, कारण कितीही पडली तरीही तिला परत अजून खाली पडायला जागा उरलेली असते) गाठली असे काहींचे म्हणणे. दोन्हीही नाटकात स्त्रीपात्रे अगदी पॉवरफुल होती आणि माणसाच्या (पुरुषांच्या?) कामुकतेचे बहुतेक सर्वांना पटणारे दर्शन त्यात होते.  घाशीराम मधली गौरी आणि बाईंडर मधल्या लक्ष्मी आणि चंपी, त्याचप्रमाणे बाईंडरची कामुकता बेडरपणा, आणि नाना फडणविसाचे "ते तुम्ही म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्या मुलींसारख्या" उद्गार अगदी अंगावर काटा आणतात आणि विचार करायला लावतात, की माझ्यात पण एक बाईंडर आणि नाना आहे का? 
मी असा विचार करू आणि वागू शकतो का? 
कामुकता आणि हिंसाचार अंगावर सर्र्कन्न काटा आणणारा आणि वाचल्यानंतर/ नाटक बघून महिने झाले तरी चटका लावणारे. हे असले लिखाण सोपे नाही किंबहुना अशक्यच आहे. अनंत वेलणकरची तो भीषण मानसिक कुतरओढ, तो त्याचा जमादार बाप आणि शेट्टी आणि त्याचे हसणे. हे राम! 

अर्थात बाईंडर गाजले ते लालन सारंग कशी स्टेजवर लुगडे बदलते, आणि सखारामच्या शिव्या आणि त्याच्या मित्र्याशी "पक्षी" ह्या अर्थाने बायकांचा उल्लेख करून केलेली चर्चा ह्या असल्या गोष्टींमुळे गाजला. 
तर घाशीराम त्यात ब्राह्मणांवर टीका आहे त्यामुळे जास्त वादग्रस्त ठरला, नाना फडणवीस हे असे  नव्हतेच असा प्रतिवाद केला गेला. 
असल्या टीकेमुळे आणि दोन्ही नाटकांवरच्या बंदीमुळे गाजली. सध्याच्या काळात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुद्दाम कॉंट्रोव्हर्शीयल गोष्टी आणि रिएलिटीमधला विटून गेलेला मसाला घातलेला असतो. विविध खानांच्या माकडचाळयांपेक्षा अन चिंधीभर कपडे अंगावर घालून पडद्यावर मिरवणाऱ्या  बाजारू अभिनेत्र्यांच्या हिडीसपणापेक्षा तो काळ कलात्मकदृष्ट्या निश्चितच उजवा होता. मात्र दुर्दैव असं की अशा नाटकांना रंगभूमीवरचं आगमन सुसह्य व्हावं म्हणून स्थापन झालेली 'थियेटर अकेडमी' पुढे जाऊन बंद पडली, काही लोकांनी त्यात बराच आर्थिक तोटा सोसला. त्यापैकीच एक धगधगत्या प्रतिभेचे ज्वालाग्राही लेखन करणारे तेंडुलकर होते. पुढील काळात त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लोकमान्यता मिळाली. महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढून, देशाच्या रंगभूमी आणि कला ह्या प्रांतात मराठी कलेला अटकेपार घेऊन जाण्याचे काम या दोन्ही तेंडुलकरी नाटकानीच केलं होतं.

मराठी रंगभूमीवर प्रायोगिकतेचे पितृत्व विजय तेंडुलकरांना सार्थपणे बहाल केले जाते. त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मराठी रंगभूमीवर एक नवी रंग-परंपरा निर्माण केली. समाजातील सुप्त स्वरूपाची हिंसा आणि लैंगिकता त्यांनी रंगभूमीच्या चव्हाट्यावर मांडली. त्यांना विरोध पत्करावा लागला. अपमान सहन करावे लागले. त्यांच्या नाटकांनी अनेक विवाद निर्माण केले. परंपरावाद्यांनी तेंडुलकरांना नेहमीच असहिष्णूपणे वागवले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी व्यवस्थेसमोर शरणागती पत्करली नाही. त्यांच्या वृत्तीप्रवृत्तीला मानवेल तेच आणि तसेच ते लिहीत राहिलेत. नभोनाट्य, एकांकिका, निमव्यावसायिक नाटक आणि काही प्रमाणात व्यावसायिक नाटक असा तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा जवळ जवळ पाच दशकांचा कालखंड आहे. परंतु नाटक कुठल्याही वर्गातले असले तरी प्रत्येक नाटकातून तेंडुलकरांची प्रायोगिकताच प्रकर्षाने जाणवली. पारंपरिकरीत्या जे मराठी रंगभूमीवर दाखवले जात होते ते सारेच त्यांनी नाकारले. त्यांनी नव्यानव्या विषयांना हात घातला आणि नाटकासारखे कृतिप्रधान माध्यम आशयगर्भ केले.

कमीत कमी शब्द, कोर्‍या जागा, टिंबांचा विपुल वापर आणि विरामचिन्हें यातून तेंडुलकरांनी एका वेगळ्याच रंगभाषेची निर्मिती केली. त्यांनी नाटकातून कधीच गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या नाटकांनी नेहमीच अंतर्मुख करणारा नाट्यानुभव दिला. ते आरंभापासूनच प्रयोगशील राहिले. मध्यमवर्गीय जीवनातील वासनेची, हिंसाचाराची, त्यातून येणार्‍या उद्ध्वस्ततेची गाज त्यांच्या नाटकांतून ऐकू येत राहिली. माणसाला येणार्‍या एकाकीपणाचे भकास-विदीर्ण अनुभव त्यांच्या नाटकांतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत राहिले. पन्नास वर्षे ते सातत्याने नाटकाच्या रचनेत विविधांगी प्रयोग करीत राहिले. त्यांच्या नाटकांची सर्व भारतीय भाषांत भाषांतरे झालीत. देशभरात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सातत्याने झालेत. देशातील महत्त्वाच्या रंगकर्मींना तेंडुलकरी नाटक नेहमीच मोह घालीत राहिले. ते केवळ मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार नाहीत, तर भारतीय रंगभूमीवरचे अतिशय महत्वाचे नाटककार आहेत. माणसाच्या मनातील आदिम भाव-भावनांचा शोध तेंडुलकरी नाटक सातत्याने आणि अथकपणे पन्नास वर्षे घेत राहिले. त्यांच्या नाटकातील अनुभवांच्या पृथगात्मतेमुळेच त्यांना मळलेली वाट नाकारावी लागली. परंतु त्यामुळे मराठी रंगभूमीवर एक वेगळी वाट निर्माण झाली. याच वाटेवर तेंडुलकरोत्तरी प्रायोगिक नाटक निर्माण झाले आणि बहरलेही.

यंदाच्या दोन फेब्रुवारीला 'सखाराम बाईंडर'ची पन्नास वर्षे पूर्ण झाली . 'सखाराम...' च्या पहिल्या तीन आवृत्त्या कमलाकर सारंग यांनी १९७२ ते १९९५ पर्यंत रंगमंचावर सादर केल्या. हे नाटक पहिल्यांदा वाचल्यानंतर डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांनी त्याचं दिग्दर्शन करण्याची इच्छा तेंडुलकरांकडे व्यक्त केली होती. कमलाकर सारंग तर ते नाटक अगदी आपल्याचसाठी असल्याचा हट्ट तेंडुलकरांकडे करून बसले होते. शेवटी तेंडुलकर, डॉं.लागू आणि देशपांडे यांना म्हणाले की, 'सारंग व्यावसायिक रंगभूमीवर नवा असला तरीही मी हे नाटक त्याला दिलं आहे. तो करणार नसेल तरच तुम्ही ते करा.' या नाटकाचा इतिहास सारंगच्या हातूनच घडावा ही निर्मिकाची इच्छा असावी. तेंडुलकर लोकनिंदेत होरपळलेले, तर लालन आणि कमलाकर सारंग मानसिक, आर्थिक त्रासाने त्रस्त होते. पण यांच्यापैकी कोणीही डगमगलं नाही आणि नाटकाचे प्रयोग अनेक अडथळे पार करत होतच राहिले. या संचांनंतरही पुढच्या दशकात प्रयोग होतच राहिले. अनेक नाट्यसंस्थांना याची भुरळ पडली. विविध संस्थांकडून प्रयोग होतच राहिले; पण त्याची दाहकता संपली होती. पहिल्या शिल्पाची दाहकता सहन करणारे जवळजवळ सगळेच आज हयात नाहीत. मात्र आजही मराठी नाट्यरसिक बाईंडरच्या आठवणीने भरून पावतो.

यातील सखाराम हा पुरुषी वासना विकृतीचं शिसारी आणणारं प्रतिक आहे, जोवर पुरुषी विकृत वासना विकार असतील तोवर सखाराम असणार आहे. आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर या वासना पुरुषाच्या मनाचा ताबा घेतातच. मध्यमवर्गी पांढरपेशी माणूस हे सत्य कधीच स्वीकारत नाही, तो दांभिकपणे तो आपला 'विश्वामित्री' पवित्रा सुरूच ठेवतो. सखारामसारखे काही पुरुष आपल्या वासना खुल्लेपणाने बायका ठेवून शमवत राहतात तर बहुतंशी पुरुष वासनेमुळे हिंसेच्या आहारी जातात. घरच्या बायकांना मारणे, कार्यालयातील सहकारी महिलेचा छळ करणे, सार्वजनिक ठिकाणी केवळ नजरेने स्त्रियांचे शोषण करणे, गरिबी आणि अडचणी याच्या दैन्यचक्रात अडकलेल्या महिला तर सर्वात सॉफ्ट टारगेट ठरतात, लहान बालिकांपासून ते जरठ वृद्धेपर्यंत यांच्या तावडीतून कुणीच सुटू शकत नाही. वासनापासून दूर पळून गेलेले देखील कुठल्या न कुठल्या मार्गे वासनांचे शमन करताना आढळतात. पुरुषांची लैंगिक अतृप्तता अन लैंगिक हिंसा जेंव्हा सर्व सीमा पार करते तेंव्हा त्या पुरुषाचा अंत समीप येतोच. मात्र हे सर्व सहन करणारी स्त्री जोवर पुरुषाला आव्हान देत नाही, त्याच्या समोर उभी ठाकत नाही तोवर ती पिचलेली राहते, तिचे स्थान दुय्यमच राहते.पुरुषी वासनांचे अंतरंग असे ढवळून काढून गेलेल्या सखाराम बाईंडरसारख्या नव्या कलाकृती जोवर लिहिल्या,वाचल्या, पाहिल्या जात नाहीत अन त्यावर साधक बाधक खुली चर्चा होऊन ह्या नागड्या गोष्टीवर मनमोकळे संवाद होत नाहीत तोवर ही पुरुषी वासनांध श्वापदे असहाय स्त्रियांचा छळ करत राहणार हे स्पष्ट आहे. कारण या पुरुषी विकार वासनांना माझ्या मते तर अंत नाही कारण त्या मानवी मनाचा एक भाग आहेत म्हणूनच सखाराम अमर आहे.....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'बाईंडरचे दिवस' : लेखन - कमलाकर सारंग 

गुरुवार, १६ जून, २०१६

आता वंदू कवीश्वर ..



अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)        

सुरेश भट -

क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !

मंगळवार, १० मे, २०१६

स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ...



"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

रविवार, १० एप्रिल, २०१६

'पंत गेले, राव चढले' आणि नाट्यछटाकार 'दिवाकर' - एक आकलन...



नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. हा साहित्यप्रकार मराठीत दिवाकरांनी ईतका समर्थपणे हाताळलाय त्याला तोड नाही. 'पंत मेले, राव चढले' ही दिवाकरांची एक प्रसिद्ध नाट्यछटा आहे.