वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..


मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!
की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?

रविवार, १० जुलै, २०२२

बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.

गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !

मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

रविवार, २६ जून, २०२२

खऱ्या समानतेच्या शोधात..


'जातीसाठी माती खावी' किंवा 'जात नाही ती जात' ह्या आपल्याकडच्या पॉप्युलर टॅगलाईन्स आहेत. एकीकडे सातत्याने जातीयवादाविरुद्ध कंठशोष करायचा आणि त्याचवेळी हस्ते परहस्ते आपल्या जातीच्या 'अहं'ला गोंजारत रहायचं ही भारतीय माणसाची खासियत बनून गेलीय. सद्यकाळात आपले विचार आपल्या व्यक्तीमत्वाइतके दुभंगत चाललेत हे कटूसत्य आहे, गतशतकातली जातीनिर्मूलनाची साधीसोपी चळवळ आपण पूर्णतः स्वीकारू शकलो नाही हे वास्तव आहे. मागील आठ शतकांत अगदी संतपरंपरेपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंत अनेकांनी यावर प्रबोधन केले आहे मात्र आपल्यावर त्याचा परिणाम शून्य झालाय. गत शतकात वा अगदी या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत लोकांच्या वागणुकीत जातीयता स्पष्ट दिसून यायची, त्यावर प्रहार करणं सोपं असायचं. लोक याची दखल घेत असत, अगदी राजसत्तेपासून ते मीडियापर्यंत याची नोंद घेतली जायची. परिणामी जे जातीभेद करत असत ते अगदी उघडे पडत असत, अशांची बाजू घ्यायला फार कुणी पुढे येत नसत. अर्थातच अशांना समर्थन देण्याची खुमखुमी काहींच्या ठायी असायची मात्र लोकलज्जेस्तव तसेच वाढत्या सामाजिक दबावापुढे असे लोक वचकून राहत आणि जातीभेद करणाऱ्याला खुले समर्थन मिळत नसे.

मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.

मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

'अल-अक्सा'च्या संघर्षाची रक्तरंजित पार्श्वभूमी...


‘अल-अक्सा’ मस्जिदीवरून उद्भवलेला संघर्ष जाणून घेण्याआधी तिथला इतिहास जाणून घेणं अनिवार्य आहे. या भूमीचा इतिहास सांगतो की ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. गत दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी ज्यू ! सद्यकाळी ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात नित्य चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. मुस्लिमांनी ज्यूंना कधीकाळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका ठाशीव आकृतीबंधातून आकारास आली होती. तर इस्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिकने (आताचे ईजिप्त, सीरिया आणि जॉर्डन) कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

राजपक्षे प्रायव्हेट लिमिटेड'स् श्रीलंका !


आपल्या देशाच्या शेजारील काही देशांत बऱ्याच दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे लोकनियुक्त सरकार उलथवून तिथे लष्कराने कमांड सांभाळलीय. बांग्लादेशमध्ये हिंसक कारवायांना ऊत आलाय, नेपाळमधील राजकीय अस्थिरता कधीही देशाला गर्तेत नेऊ शकते, मालदीवमधले संकट काहीसे निवळताना दिसतेय तर पाकिस्तानमध्ये अकस्मात सत्तांतर झालेय आणि श्रीलंकेमधील विविध स्तरावरची अनागोंदी दिवसागणिक वाढतेय. याचे परिणाम दक्षिण आशियाई देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्तरांवर होणार आहेत. चीनसह अमेरिकेचेही या भूभागावर लक्ष असल्याने इथल्या अस्थिरतेला खूप महत्व आहे. पाकिस्तानमधली समस्या जुनाट व्याधीसारखी आहे ती सातत्याने अधूनमधून तोंड वर करते, तिथे लोकशाही नावालाच आहे प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप ठरलेला आहे. अन्य देशांतली स्थिती आगामी काळात पूर्वपदावर येईल, अपवाद श्रीलंकेचा आहे ! कारण इथले संकट न भूतो न भविष्यती असे आहे. जगभरातील आर्थिक राजकीय घडामोडींवर 'इकॉनॉमिस्ट'मध्ये काय भाष्य केले गेलेय हे पाहून आपली विचारधारा ठरवणारे देश आहेत यावरून या नियतकालिकामधील मांडणीचे महत्व कळावे. यंदाच्या इकॉनॉमिस्ट'च्या आवृत्तीत आशिया विभागात श्रीलंकेवर जळजळीत लेख प्रकाशित झालाय ; हे संकट राजकीय, मानवनिर्मित असल्याचे ताशेरे त्यात ओढलेत.

बुधवार, ३० मार्च, २०२२

एक देश ..आनंदाच्या शोधात !


‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...’ जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग ठाऊक नसेल असा रसिक, भाविक मराठी माणूस नसेल. आनंदाचं इतकं श्रेष्ठ वर्णन, इतकी सुंदर व्याख्या खचितच कुणी केली असेल. तुकोबांना जो आनंद अभिप्रेत आहे तो अंतर्मनाचा आहे. या अनुभूतीसाठी आपण आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोह व्हायचं म्हणजे त्यात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. यातून जे काही सुख लाभतेय ते काहीच्या बाही अफाट आहे. त्याचे कसे वर्णन करता येईल ? कारण ब्रम्हानंदाच्या ओढीने इतर लोभ लोप पावतात. पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. आनंदानुभवाचा ठसा अंत:करणात उमटायला पाहिजे मग तो वाणीद्वारे प्रकट होतोच ! आनंदाचे हे सूत्र त्रिकालाबाधित आहे.

"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे" बालकवींच्या या कवितेविषयी अखिल मराठी जनमानसात अपार प्रेम आहे. आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी अगदी ताल लावून ही कविता कधीतरी म्हणवून घेतलेली असतेच. किशोरवयात गायलेले बडबडगीत 'चला चला, गाऊ चला आनंदाचे गाणे !' हे आपल्या सर्वांच्या आनंदी बाल्यावस्थेचे साक्षीदार आहे. म्हणजेच आनंदी असण्याचे वा राहण्याचे संस्कार शिशुअवस्थेतील बडबडगीतापासून ते थेट पोक्तपणी येणाऱ्या विरक्तिअवस्थेपर्यंत संतांच्या अभंगांपर्यंतच्या रचनांमधून झाले आहेत. इतकेच नव्हे तर फिल्मी गांधीगिरी करणारा मुन्नाभाई देखील आपल्याला सांगतो की, "टेन्शन नही लेने का, बिंधास रहने का !" तरीदेखील आपण आनंदी राहण्यात जगाच्या तुलनेत खूपच मागे पडत आहोत. काय झालेय आपल्याला ? नेमकं कुठं बिनसलंय ? खरे तर स्वातंत्र्योत्तर काळखंडातला हा असा डिजिटल काळ आहे जो सर्वाधिक भौतिक साधनांनी, सुख सुविधांनी लगडलाय. कुठली इच्छा करायचा अवकाश वा कुठले नवे साधन संशोधित करण्याची मनीषा जरी व्यक्त केली तरी ती लगेच पुरी होते इतका हा अधिभौतिक समृद्ध काळ आहे. सुखसाधने वारेमाप झालीत, फुरसतीच्या काळापासून ते रुक्ष दैनंदिन जीवनापर्यंतच्या गरजेच्या, चैनीच्या वस्तूंनी अवघा भवताल सजला आहे. रोजच मानवी सर्जकतेचे नवनवे परिमाण दिसताहेत. सातही खंडांत हे परिवर्तन वेगाने होतेय त्यानुरूप तिथे सुख समाधानही नांदतेय. तुलनेने आपल्याकडेही खूप सारे बदल झालेत, बरंच भलंवाईट घडून गेलंय त्याला आपणही टक्कर दिलीय, तुलनेने अन्य राष्ट्रांपेक्षा आपण अनेक पातळ्यांवर पुढारलेले असूनही आनंदी वृत्तीविषयी मात्र खूप पिछाडलेले आहोत.

मंगळवार, २९ मार्च, २०२२

हाँगकाँगला काय झालेय ?


'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. ‘नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन’, ‘क्वार्ट्झ’ आणि ‘गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह’ ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकतंच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना विकलीय. तेंव्हापासून तर यातील निर्भीड आणि लोककल्याणकारक भूमिकेस धार आलीय. यातील हाँगकाँगविषयीच्या आर्टिकलने चीनमध्ये मोठी खळबळ माजवून दिली. याद्वारे तिथे सर्व काही आलबेल असल्याच्या चिन्यांच्या दाव्याच्या पार ठिकऱ्या उडाल्या. टिमोथी मॅक्लॉफ्लिन हे ऍटलांटिकसाठी लेखन संशोधन करतात त्यांनी हे आर्टिकल लिहिले आहे. मागील तीन आठवड्यात हाँगकाँगमध्ये काय घडलंय याचं हृदयद्रावक चित्र त्यांनी जगापुढे आणलं.

फेब्रुवारी संपला आणि हाँगकाँगचे दिवस फिरले. कोरोना व्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हाँगकाँगमधली खेळाची मैदाने दक्षतेचा इशारा करणाऱ्या लाल-पांढऱ्या टेपमध्ये गुंडाळली गेली, मुलांना इथे येण्यास मज्जाव करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंपणाने बॅरिकेड उभारण्यात आले. कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने मनोरंजनाचे कसलेही कार्यक्रम होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी स्विंग क्रॉसबार वापरण्यात आले. संभाव्य लॉकडाऊनबद्दल सरकारच्या विनाशकारी सार्वजनिक संदेशामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट उडून प्रचंड खरेदी केली गेली. सर्व रेस्टॉरंट्स संध्याकाळी 6 वाजता बंद होत होती. बार अजिबात उघडले जात नव्हते. काही रेस्टॉरंट्स हॅप्पी-अवर डील ऑफर करत होती. जिम, चित्रपटगृहे, कॅम्पसाइट्स आणि समुद्रकिनारे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. देशातील एखाद्या दुर्गम उद्यानात फिरायला जायचे असल्यास सर्व नियमांचे कठोर पालन अनिवार्य होते. 2020 च्या सुरुवातीला हाँगकाँग कोविड लाटेत संक्रमण दरात मागे होते मात्र चौथ्या लाटेतील रहस्यमय विषाणूची बातमी येताच मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन सुरु झाले तरीदेखील अघटीत घडलेच !

मंगळवार, १५ मार्च, २०२२

युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमागचे मिडल ईस्टचे नेक्सस...


रशियाने युक्रेनवर हल्ला करून जगातली शांतता धोक्यात आणली या घटनेला आता आठवडा पूर्ण होईल. मागील कित्येक दिवसा ज्या शक्यतांचे अनुमान लावले जात होते ते यामुळे खरे ठरले. या युद्धात जे देश प्रत्यक्षात सहभागी असतील ते याचे थेट परिणाम भोगतील आणि युद्धात थेट भाग घेत नसूनही जगभरातील विविध खंडातील अनेक देशांना याची झळ पोचणार आहे हे देखील एक वास्तव आहे. कारण निव्वळ जागतिकीकरणाचे नसून परस्परावलंबित्व, विविध गरजांची पूर्तता, भवतालातील राजकीय भौगोलिक सामाजिक आणि धार्मिक समीकरणे या सर्व बाबींपायी याची झळ कुठल्या न कुठल्या प्रकारे सर्वच देशांना बसणार आहे. युरोपीय देश, अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचे युक्रेन रशिया युद्धाकडे पाहण्याचे दृष्टीकोन तीव्र निषेधाचे, प्रतिकाराचे व युक्रेनच्या समर्थनाचे आहेत हे सर्वश्रुत आहेच. याच्या उलट भारतासह काही देशांनी सावध पवित्रा घेत कोणतीही ठोस भूमिका घेणं टाळलं आहे, तर चीनने रशियाचे छुप्या पद्धतीने समर्थन केलं आहे कारण चीनचा अमेरिकेस कडवा विरोध आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे तर युद्ध सुरु होतानाच्या दिवशी पुतिन यांच्या भेटीस गेले होते. हे असं काहीसं धूसर आणि काहीसं ठळक विरोधाचं चित्र समोर असताना केवळ सीरियाने रशियाला सक्रिय  पाठिंबा देत युक्रेनची कठोर शब्दात निर्भत्सना केली हे विशेष होते. जगभरातील माध्यमांनी याची आपआपल्या परिप्रेक्ष्यातून दखल घेतली, आशियाई देशात तुलनेने यावर कमी लिहिले गेले. सिरियन मीडियामध्ये या दृष्टीकोनाविषयी दुमत नाही, मात्र एकवाक्यता असणारे समर्थनही आढळत नाही.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

द ब्लड इन द बॅरल्स – दशकांच्या इस्त्राईली भ्रमकथांचा भंडाफोड..

हत्याकांडाआधीचे  टँतुरा गावाचे दृश्य 


'द पॅलेस्टाईन क्रॉनिकल'हे लोकवर्गणीद्वारा चालणारं न्यूजपोर्टल आहे. इस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षाची धग किती ज्वलंत आहे हे यातील बातम्या वाचून उमगते. आपल्याकडे ज्याप्रमाणे उजव्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून वर्षानुवर्षे काही कंड्या पिकवल्या जातात नि त्याआधारे बुद्धीभेद करत जनतेमध्ये भ्रम पैदा करून आपली राजकीय पोळी भाजून घेत वर्चस्व वाढवायचं असा फंडा राबवला जातो. याला प्रत्युत्तर देताना समोरून देखील नेमकी माहिती दिली जात नाही. सत्य शोधायची जबाबदारी अर्थातच व्यक्तिसापेक्ष उरते. यातून समाजाच्या शोषणाचे सत्तासारीपाट मांडले जातात. वर्णजातधर्म यांचे वर्चस्ववादी आणि सत्तातुर राजकारणी यांचे साटेलोटे वाढते. एकच कोहराम माजून राहतो. मात्र या सर्व गदारोळात सत्याचा गळा घोटला जातो. सत्य वा शोध पत्रकारिता करणाऱ्या लोकांवर या पाखंडाचा मुखभंग करण्याची जबाबदारी येते. अलीकडे देशोदेशीच्या राजकीय पटलांवर हे चित्र पाहावयास मिळतेय. राजरोस युद्धाच्या झळा सोसणारे पॅलेस्टाईन याला अपवाद कसे असेल ? तिथे वर्षानुवर्षे पेश केल्या जाणाऱ्या एका मोठ्या असत्याचा पर्दाफाश केला गेलाय. त्याची ही बिटवीन द लाईन न्यूज.

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...



आजपावेतो परवीन नावाच्या तीन स्त्रियांनी मनावर भुरळ घातली होती. पहिली होती पाकिस्तानची प्रसिद्ध कवयित्री शायरा परवीन शाकीर, दुसऱ्या म्हणजे विख्यात भारतीय गायिका परवीन सुल्ताना आणि तिसरी म्हणजे आयुष्याची वीण विस्कटून गेलेली प्रेमभुकेली अभिनेत्री परवीन बाबी. या तीन नावांत गत सप्ताहात भर पडली त्या म्हणजे परवीन रहमान. पाकिस्तानच्या कराचीमध्ये परवीन रहमान या नागरी हक्क चळवळीविषयी जितक्या ओळखल्या जातात. त्याहून अधिक त्यांची ओळख शहर टाऊनप्लॅनर अशी होती. परवीन रहमान यांचा जन्म बांग्लादेशमधला. बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला. परवीन यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन त्यावर नंतर बरेच लेखन केले गेलेय. बांग्लादेशच्याही आधी फाळणीपूर्व ब्रिटीश राजवटीत त्यांचे कुटुंब प्रगत विचारसरणीचे होते आणि कट्टरतावादापासून काहीसे अलिप्त राहण्याकडे त्यांचा कल होता. कालपरत्वे भारतीय उपखंडात भौगोलिक राजकीय बदल होत गेले तरीही त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाले नाहीत. भारताची फाळणी झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रत्यक्ष फाळणीनंतर भारत पाक यांच्यात झालेलं नागरी स्थलांतर याविषयी आपल्याकडे खूप काही लिहिलं गेलेलं आहे. तद्वतच पूर्व पाकिस्तानचा बिमोड करून तेथे बांग्लादेशची निर्मिती झाली. १९७१ च्या या अस्वस्थ कालखंडात काही महत्वाची स्थलांतरे पूर्व पाकिस्तान ते पाकिस्तान अशी झाली. याच रेषेचा एक बिंदू म्हणून बांग्लादेश निर्मिती दरम्यान रहमान कुटुंबियांस ढाक्यात असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी पाकिस्तानात आपल्या आप्तेष्टांकडे जाण्याचे निश्चित केले. कराची मधली त्यांची सुरुवातीची काही वर्षे हलाखीत गेली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. किंबहुना अशाच लसलसत्या जखमा भारताने फाळणी आणि बांग्लादेश निर्मितीवेळीही झेलल्या आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा भागात याची झळ अधिक प्रमाणात बसली. आजही भारतीय राजकारणात आणि समाजकारणात या मुद्द्यांचे प्राबल्य टिकून आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या साहित्यांत यावर नाट्यमय लेखन आढळते.

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

डेथ ऑफ गॉडमदर


जगभरात रोज इतक्या घटना घडत असतात की त्यांचा आवाका कळून येत नाही. खेरीज आपल्यापर्यंत बातम्या घटना पोहोचवणारी माध्यमे आपल्या सोयीच्या आणि समविचारी धारणेच्या अनुषंगाने काम करतात त्यामुळे गाळणी लागते. परिणामस्वरूप आपण ज्या माध्यमांवर अवलंबून असतो ती माध्यमे आपल्याला ज्या घटना दाखवतात वा ज्या बातम्या सांगतात तेव्हढाच आपला स्त्रोत मर्यादित होतो. त्या परिघा पलीकडच्या बातम्यांना, घटनांना आपण मुकतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेशी आपला तसा थेट संबंध नसतोच मात्र कुठे तरी त्यांचा संदर्भ रोजच्या जगण्याशी कधीतरी निगडीत असतो. रोजच्या घटनांच्या गदारोळात तळाशी जाऊन एखादी घटना निवडून आपल्या जीवनाशी असणारा तिचा संदर्भ खऱ्या अर्थाने उमगतो तेंव्हा आपण थक्क होतो. अशी अज्ञात असणारी घटना आपल्याला कळली नाही तरी फारसे बिघडत नसते मात्र आपल्या जाणीवा समृद्ध होण्यात यांची जी मदत असते त्यापासून आपण वंचित राहतो हे नक्की ! अशीच एक घटना गत महिन्यात घडून गेली जी भारतीय प्रसारमाध्यमात औषधाला देखील आढळली नाही. माफिया जगताची पहिली लेडी बॉस असंता मारेस्का हिचे निधन झाले. तिच्या निधनाची दखल युरोपियन देशातील माध्यमांनी घेणं साहजिक होतं. मात्र मेक्सिकोसह अन्य काही लॅटिन अमेरिकन देशांतही त्याची दखल घेतली. याखेरीज इंडोनेशिया, सोमालिया या देशांनीही दखल घेतली कारण ड्रगतस्करीशी असलेलं या देशांचं नातं. भारतीय माध्यमांत कोणत्या बातम्यांना स्पेस द्यायची याची गणिते ठरलेली आहेत त्यात ही बातमी बसत नसावी सबब आपल्याकडे ती सर्वदूर पोहोचली नाही. असंता मारेस्काचं आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं होतं. तिच्या राईज अँड फॉलची कहानी अगदी फिल्मी आहे.

रविवार, १६ जानेवारी, २०२२

समानतेच्या वाटेवरचा पाकिस्तान...

समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान #sameergaikwad #sameerbapu #समीरगायकवाड
न्यायमूर्ती आयेशा मलिक   

पाकिस्तानबद्दल आपल्या समाजमनात तिथल्या सर्वंकष जाणीवांप्रती एक विशिष्ट द्वेषमूलक प्रतिमा आहे ; तिला बळकटी देण्याचे काम आपली प्रसारमाध्यमे आणि आपला सोशल मीडिया इमानेइतबारे करत असतो. पाकला शत्रूराष्ट्र समजण्यास कुणीच हरकत घेणार नाही मात्र तिथे सारंच प्रतिगामी आणि बुरसटलेलं आहे, तो देश मध्ययुगाहून मागे जातोय, तिथे कमालीची धर्मांधता सर्वच क्षेत्रात नांदते असं चित्र आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. हे खरं वाटण्याजोग्या काही घटना तिथे अधूनमधून घडतही असतात हे नाकारून चालणार नाही मात्र हेच बारोमास असणारे एकमेव सत्य नाहीये हे देखील मांडायला हवे. तिकडे काही सकारात्मक घटना घडली तर आपल्या माध्यमांचा कल ती बातमी लपवण्याकडे असतो. या गृहितकाला बळ देणारी एक विलक्षण मोठी घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडलीय. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायमूर्तींना मंजुरी लाभलीय हीच ती सकारात्मक घटना होय. या अभूतपूर्व घटनेनंतर पाकिस्तानी सोशल मीडिया त्या न्यायमूर्तींच्या कौतुकाने ओसंडून वाहत होता हे विशेष होय !

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

इर्शाद आणि विषाद ..




सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..

इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...

सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल. 

सोमवार, २२ मार्च, २०२१

जीवनमूल्यांच्या लढ्याचा नवा चेहरा -


या आठवड्यामध्ये एक विलक्षण घटना घडली तिची नोंद पाश्चिमात्य माध्यमांनी निवडक पद्धतीने घेतली तर अन्य काही देशात त्याबद्दल क्वचित चर्चा झडली. अमेरीकेच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या घोषणापत्राला (डिक्लेरेशन ऑफ इंन्डीपेंडन्स) अनन्यसाधारण महत्व आहे. थॉमस जेफरसन हा विचारवंत राजकारणी त्या घोषणापत्राचा जनक होय. अमेरिकेत असलेल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वसाहती आणि त्याआडून सुरु असलेलं शोषण यांच्याविरुद्ध जेफरसनने आवाज उठवला होता. लोकशाही, संघराज्यवाद, व्यक्तिगत अधिकारांचे रक्षण यांचा तो खंदा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद देखील जेफरसनने भूषवले होते. अमेरिकेत त्याला जनकाची (फाउंडीग फादर) उपमा बहाल केली गेलीय. या थॉमस जेफरसनच्या पत्नीचे नाव होते मार्था वेल्स. तिला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली होती. ती वंशवेल यथावकाश वाढत राहिली. दरम्यान मिश्र वर्णीय संबंधातून जन्माला आलेली सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम स्त्री जेफरसनच्या पदरी होती. या स्त्रीला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली. सुरुवातीची काही दशके या अपत्यांना नाकारलं गेलं होतं ही वस्तुस्थिती होती. मात्र नंतरच्या पिढ्यात जैवशास्त्रीय आधारांच्या बळावर सॅली हेमिंग्जला झालेल्या अपत्यांचे पितृत्व थॉमस जेफरसनकडेच होते हे स्वीकारावे लागले. अर्थात उदारमतवादी आणि खुल्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असणाऱ्या अमेरिकन जनतेने खळखळ न करता हे सत्य स्वीकारले. मागील वर्षी विख्यात अमेरिकन छायाचित्रकार ड्र्यू गार्डनर यांनी काही ख्यातनाम व्यक्तींच्या स्मृतीघटकासह त्यांच्या नव्या पिढीची तसबीर पेश केली होती. याच शृंखलेतले एक पोर्ट्रेट होते थॉमस जेफरसनचे आणि त्याच्या सहाव्या पिढीतील नातवाचे. शेनॉन लेनिअर हा जेफरसनचा सहाव्या पिढीतला बंदा. त्याची वंशवेल ही सॅली हेमिंग्जच्या शृंखलेतील होती. थॉमस जेफरसनसारखी वेशभूषा केलेल्या शेनॉनचे पोर्ट्रेट खूप काही चर्चिले गेले नव्हते. काही निवडक पोर्टल्सवर याविषयी अल्पकालीन चर्चा झाली आणि विषय मागेही पडला. मात्र या आठवड्यातील टॉप ट्रेंडींग फोटोजमध्ये ही तसबीर आली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला पार्श्वभूमी होती ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी सम्राज्ञी मेगन मार्कल यांनी केलेल्या खळबळजनक विधानांची. त्यामुळेच हा पोर्ट्रेटवजा फोटो इतका चर्चेत आला की त्याखालच्या कमेंट्सवरून वादविवाद झडू लागले. यात नेटिव्ह अमेरिकन विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांनी कोणत्याही देशाचे प्रवासी वा परकीय नागरीक आमचा हिस्सा असूच शकत नाही या ट्रम्पवादी भूमिकेचा पुनरुच्चार केला तर उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी हीच खरी अमेरिकेची ओळख असल्याचं म्हटलं. कारण थॉमस जेफरसन श्वेतवर्णीय होते, सॅली हेमिंग्ज मिश्रवर्णीय होती तर शेनॉन लेनिअर हा देखील मिश्रवर्णीय शरीर लक्षणे असणारा आहे. त्याचं मूळ दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन असं असल्याने त्यात समावेशकता दिसते. श्वेतवर्णीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्याने ब्रिटिश वसाहतवादाचे जोखड फेकून दिले होते त्याच्या नव्या पिढीचं तुलनात्मक वैचारिक उदात्तीकरण करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्यातील राजपुत्र आणि स्नुषा यांचं सनसनाटी विधान पूरक ठरलं हे विशेष होय.

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

'मंडूवाडीह'च्या आडचे वास्तव ...


अलाहाबादचे प्रयाग नामकरण होऊन आता बरेच दिवस उलटून गेलेत. याच अलाहाबादमध्ये मीरगंज मोहल्ला नावाचा एक छोटासा भाग आहे. इथे वेश्यावस्ती होती आणि अजूनही आहे. याच मीरगंज मोहल्ल्यात पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला होता. जन्मानंतर नेहरू इथेच दहाच दिवस होते. १९३१ मध्ये त्यांचा जन्म झालेली इमारत पाडली गेली. तरीदेखील या भागातील वेश्या वस्ती हटवण्यासाठी नेहरूंच्या नावाचा सतत आधार घेण्यात येत होता. या बायका बधत नाहीत हे लक्षात आल्यावर इथून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेचा आधार घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणारे धनंजय चंद्रचूड तेंव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयातले मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी कायद्यावर बोट ठेवत मार्च अखेर पर्यंत ही वस्ती हटवण्यात यावी असा आदेश दिला. मात्र यासोबतच मीरगंजमध्ये चालणाऱ्या सज्ञान नसलेल्या कोवळ्या मुलींच्या विक्री व्यवहाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तेंव्हा उत्तरप्रदेश सरकारने मीरगंज मोहल्ला ही बेकायदेशीर वेश्यावस्ती असल्याचं शपथपत्र न्यायालयात दाखल केलं. वस्ती थोडीफार हटली. मात्र तिथल्या घरात बायका शोधणारी गिधाडं फिरू लागली. बायका पुन्हा आल्या. त्यांचे पत्ते बदलले मात्र व्यवसाय तोच राहिला. नंतर अलाहाबादचं प्रयाग झालं मात्र शहराचं काय ? शहरांतल्या लोकांचं काय ? लोकांच्या मानसिकतेचं काय ? असो. हे प्रश्न विचारायचे नसतात. हे सर्व आता इतक्या दिवसानंतर उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मंडूवाडीह !