वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्तमान घडामोडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

'नारी आत्मसन्मान' खरेच हवाय का ?..


विख्यात मानसशास्त्रज्ज्ञ सिग्मंड फ्रॉईड यांनी एकदा मनोविश्लेषणाच्या अभ्यासासाठी समान वयाच्या, समान सामाजिक श्रेणीच्या पुरुषांचे दोन गट केले होते. त्यांच्या समोरील स्क्रिनवर काही वाक्ये दाखवली जातील आणि त्यांनी ती वेगाने वाचून दाखवायची असा तो प्रयोग होता. फ्रॉईडनी प्रयोगाचा हिस्सा म्हणून पुरुषांच्या एका गटात अग्रणी (मॉनिटर) म्हणून साजशृंगार केलेल्या एका देखण्या तरुण स्त्रीला अत्यंत उत्तान वेषभूषेत पाठवलं. वाचनाचा प्रयोग सुरु झाला. अगदी साधी वाक्ये त्यांनी दिली होती. जसे की एक गोड केक, आम्ही केस धुतो, वेगाने जाणारी कार इत्यादी. मात्र यांचं वाचन करताना बऱ्याच जणांनी चुका केल्या. काहींनी सांगितलं की एक गोड स्तन, एक गोड लिंग, आम्ही नग्न होतो, वेगाने जाणारी तरुणी इत्यादी. पुरुषांच्या ज्या गटात ललना शिरली नव्हती तिथेही काही चुका झाल्या होत्या मात्र त्या सेक्सशी वा स्त्रीजाणिवा विषयक नव्हत्या हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या पुरुषांनी उच्चारात चुका केल्या होत्या त्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की काहींच्या स्त्रीविषयक जाणीव सन्मानजनक नाहीत तर काहींच्या स्त्रीविषयक जाणिवा सेक्सपुरत्या मर्यादित आहेत तर काही पुरुष केवळ स्त्रीलंपट होते, तर काही खरेच प्रेमळ होते. यात ज्यांनी हिंस्त्र शब्द वापरले त्यांचं वैयक्तिक मानसिक आरोग्य ठीक नव्हतं आणि सामाजिक परीघ विस्कटलेला होता. फ्रॉईडचा हा प्रयोग आजही बोलका आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे आजची एक घटना.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

वाहिन्या आणि समाजमाध्यमांच्या ट्रेंडमागचे गणित...



देशभरात जेंव्हा फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाच्या केसेसचे हॉटस्पॉट झाले होते, करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता तोपर्यंत हिंदी, इंग्रजी आणि मराठी (होय मराठीही) वृत्तवाहिन्यांच्या स्क्रीनवर चोवीस तासाची स्पेस केवळ आणि केवळ करोनाच्या बातम्यांना होती. अन्य बातम्यांना अगदी नगण्य स्थान होते.
देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि वाहिन्यांचं विशेष प्रेम असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये 5 मार्च ते 11 जून या 99 दिवसात करोनाच्या केवळ 12088 केसेस होत्या. दिवसाला सव्वाशे अशी याची सरासरी होती. 12 जूनला यूपीमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले. त्यानंतर हा आलेख चढता राहिला.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय...


सध्या जगभरातल्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सरकारांची वैचारिकता पाहू जाता अर्धवट सोफिस्टांचं जोरदार पुनरागमन होताना दिसतं. फॅसिझमच्याही आधीचा हा जीवनविचार जाणून घेण्यासाठी इसवीसनपूर्व कालखंडात जावे लागेल.
सोफिस्टपासून विस्तारित झालेल्या सोफेस्टिकेटेड या शब्दाचा आपण सर्रास उल्लेख करत असतो.
सोफेस्टिकेटेडचा आपला प्रचलित अर्थ 'सुसंस्कृत सवयी व अभिरुची असलेला' असा आहे.
सोफिस्ट म्हणजे कोण ? तर याचे उत्तर जाणताच आपल्या अवतीभवती अशी अगणित माणसं आढळतील.

सोमवार, ६ जुलै, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार


हा फोटो एका अत्यंत असहाय हतबल बापाचा आहे...
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"

रविवार, ५ जुलै, २०२०

करोनाबाधेतील एक दुजे के लिये...

curtis and betty tarpley
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले  

अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...  
    
चीनमधल्या लॉकडाऊन  स्टोरीज आता एकेक करून समोर येताहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनी दैनिकात एक कथा प्रसिद्ध झालीय. आशियाई देशात ती खूप व्हायरल झाली. पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्या व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध करायचं ठरवलं जेणेकरून लोकांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी. ही दास्तान आहे फेंग ली या तरुणाची. सहा महिन्यापासून आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं त्याच्या मनात घाटत होतं. कामाचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. वुहानला जायची सवड काही केल्या मिळत नव्हती. अखेर योग जुळून आला. डिसेंबरच्या मध्यास त्यानं वुहानला आपल्या आईवडिलांकडे यायचं नियोजन पक्कं केलं. तो घरी येताच त्याच्या मातापित्यांना प्रचंड आनंद झाला. दरम्यान शहरात एकेक करून करोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. लीच्या घरीही याची दहशत जाणवत होती. मात्र पुढे जाऊन इतकं कठोर लॉकडाऊन होईल आणि आपलं आयुष्य त्यात गोठून जाईल याची त्याच्या कुटुंबातील कुणीच कल्पना केली नव्हती. जानेवारीत वुहानच्या सगळ्या सीमा सील करण्यात आल्या. लॉकडाऊन फारतर दोनेक आठवडे चालेल असा त्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. काळ जसजसा पुढं जात होता तसतसं लॉकडाऊनचा फास घट्ट आवळत होता. कसलीही दयामाया नव्हती की कुणाला त्यात सूट सवलतही नव्हती. पहिल्या दोन आठवड्यात भाजीपाला आणि जरुरी अन्नधान्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्यास अनुमती होती. सुपरमार्केटस त्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. सर्वांच्या घराच्या दरवाजांवर सील लावण्यात आलं.

शनिवार, २१ मार्च, २०२०

करोना व्हायरसवर मात करणारं प्रेम - टफर दॅन द रेस्ट


काल रात्री रशिया टुडे (RT) वाहिनी पाहत असताना करोना व्हायरसच्या जागतिक विध्वंसाच्या बातम्यांची मालिका सुरु होती. मात्र त्यात आपल्याकडील 'टॉप फिफ्टी बातम्या सुपरफास्ट' असा भडक मामला नव्हता. एका बातमीपाशी वृत्तनिवेदिकेने आवंढा गिळल्याचे स्पष्ट जाणवले. बातमी इटलीच्या करोनाबाधितांच्या मृत्यूची होती. ब्रिटिश, स्पॅनिश सरकारांनी देखील इटलीप्रमाणेच मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची त्यांच्या नातलगांशी अखेरची भेट स्काईपद्वारेच करून दिली जावी, त्यांना इस्पितळात येण्यास सक्त मनाई करावी असा नियम जारी केल्याची ती बातमी होती.

शनिवार, ३० मार्च, २०१९

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव..

आयसीसच्या कथित नायनाटाचे वास्तव पूर्वप्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी दि.३०/०३/१९  

२१ मार्च रोजी 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया' 
(आयसीस) या जहाल अतिरेकी संघटनेचा नायनाट झाल्याची बातमी जगभरात झळकली आणि उजव्या विचारसरणीच्या अनेक पाठीराख्यांनी सर्वत्र आनंद व्यक्त केला आणि इस्लामी मुलतत्ववादावर विजय मिळवल्याची भावना जाणीवपूर्वक दृढ केली गेली. अनेकांना 'आयसीस'च्या कथित पराभवापेक्षा इस्लामी कट्टरतावादयांना परास्त केल्याचं समाधान अधिक सुखावून गेली. आता इस्लामी मुलतत्ववाद आटोक्यात आणण्यास वेग येईल अशी भावना पसरवली जाऊ लागली, भाबड्या समर्थकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तशा कंड्या पिकण्यास सुरुवात केली. याला जगभरातल्या माध्यमांनी खतपाणी घातले. या सर्व आनंदावर विरजण घालणारे वृत्त 'द ऍटलांटिक' या नियतकालिकाने दिले आहे.

रविवार, १० मार्च, २०१९

तुमचं आमचं (!) 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' आणि फेसबुक ....


विख्यात अमेरिकन चित्रकार अँड्रयू वाईथ याने काढलेल्या 'ख्रिस्टीना'ज वर्ल्ड' या पेंटींगसारखी फेसबुकची अवस्था झालीय. या पेंटींगला एक अर्थ आहे, याच्यामागे एक ट्रॅजेडी आहे. एक करुण कथा आहे. एक सत्यघटना आहे. लेखाच्या अखेरीस ती नमूद केलीय. पण त्याआधी खालील परिच्छेद वाचले तर या ब्लॉगपोस्टचा अर्थ कळेल.

शनिवार, २ मार्च, २०१९

माध्यमांतला युद्धज्वर - सारेच दीप मंदावले नाहीत !



पुलवामा हत्याकांडाच्या संतप्त प्रतिक्रिया देशभरात उमटल्या. जवानांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून देश शोकाकुल झाला. सर्व पक्ष, संघटना सरकारच्या पाठीशी उभ्या राहिल्या. सामान्य नागरिक आपला क्रोध, शोक मिळेल त्या स्पेसमध्ये व्यक्त करू लागला. अशा नाजूक, गंभीर आपत्तीकाळात नागरिकांच्या आणि व्यवस्थेच्या संतापाचे, शोकाचे, प्रतिशोधाच्या भावनेचे नेटके, संयत प्रकटन माध्यमातून होणं नितांत गरजेचे असते पण दुर्दैवाने आपल्या माध्यमांच्या अकलेचे दिवाळे निघालेलं असल्यानं याही वेळेस त्यांनी माती खाल्ली. यात वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियाच्या खांद्यास खांदा भिडवून आपल्या अपरिपक्वतेचे दर्शन घडवताना लाजिरवाणा पोरखेळ केला.

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

इराण भारतासाठी 'होप विंडो' ठरेल ? - इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या चाळीशीचा अन्वयार्थ


इराणमधील अग्रगण्य वृत्तपत्र असणाऱ्या तेहरान टाईम्समध्ये ११ फेब्रुवारीच्या दिवशी एक बातमी ठळकपणे छपून आलीय. बातमीचा मथळा होता - 'फेक इमाम डार्लिंग ऑफ झिऑनिस्ट्स अँड हिंदू फॅनॅटीक्स'. ऑस्ट्रेलियात आश्रयास असलेल्या स्वतःला इमाम म्हणवून घेणाऱ्या इमाम त्वाहीदी यांच्याबद्दलची ती बातमी होती. आपल्याकडे 'सामना'मध्ये ज्या खरपूस भाषेत उल्लेख केले जातात त्या शैलीतच त्वाहीदी यांचा यात उद्धार केला गेलाय. सोबतच झिऑनिस्ट्स आणि हिंदुत्व ब्रिगेड यांना कानपिचक्याही देण्यात आल्यात. त्वाहिदी यांनी इस्लामची प्रतिमा किती वाईट पद्धतीने डागाळली आहे आणि त्यांच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहेत यावर त्यात भर देण्यात आलाय. इराणी माध्यमांना या बातम्या पर्वणी ठरतात आणि तिथले जनमत ते आपल्याबाजूने दृढ करण्यासाठी त्याचा वापर करतात. विशेष म्हणजे इराणच्या इस्लामिक क्रांतीला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा दहा दिवसीय सोहळाही याच दिवशी सुरु झाला. राजधानी तेहरानमधील आझादी स्क्वेअरमध्ये लाखोंच्या संख्येत जमलेल्या इराणी नागरिकांनी आझादी मार्च काढला. देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याने आखाती देशासह जगाचाही लक्ष इकडे वेधले गेले.

सोमवार, ७ जानेवारी, २०१९

नयनतारा सहगल यांच्या निमित्ताने....

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 
मन उचंबळून यावं वा अंतःकरण भरून यावं असं काही साहित्य संमेलनांतून घडत नसतं. तिथं जे होतं तो एक 'इव्हेंट' असतो, ज्यात असते कमालीची कृत्रिमता, अनावश्यक औपचारिकता आणि आढ्यताखोर ज्ञानप्रदर्शनाची अहमहमिका ! यातूनही अध्यक्षीय भाषण, स्वागत भाषण, समारोपाचे भाषण अशी तीनचार मनोगते कधी कधी वेगळी वाटतात अन्यथा त्यांचीही एक ठाशीव छापील चौकटबंद आवृत्ती दरसाली पुनरुद्धृत होत असते. ही भाषणे देखील बहुत करून रटाळ असतात हे मान्य करायला हवे. साहित्य संमेलनात नावीन्याचा पुरता अभाव आढळतो हे देखील खरे. लिखितमुद्रित माध्यमाव्यतिरिक्त अन्य माध्यमे आहेत हे या संस्थेने या डिजिटल काळात अजूनही पुरते स्वीकारलेलं नाही.

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

सोशल मीडियावरील अनसोशल तथ्ये...


राजकारण आणि समाजकारण यासाठी सोशल मिडीया किती वाईट ठरतो आहे हे आजकाल जग अनुभवते आहे. एखाद्या राष्ट्राचा निवडणुकीच्या निकालाचा कल बदलवण्यापासून ते विविध जाती धर्मात तेढ माजवून बेबंदशाहीचं वातावरणास यामुळे चालना मिळाली. सोशल मिडिया किती चांगला वा वाईट आहे यावर आजही मतमतांतरे आहेत. काहींना त्यापासून वैयक्तिक, आर्थिक वा सामुदायिक लाभ झालेत तर काहींना त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळालेत जसे की लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्यापासून ते कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्याची हक्काची व स्वतःची स्पेस मिळाली आहे. सार्वजनिक जीवनात देखील सोशल मिडीयाने चांगले वाईट प्रभाव दाखवले आहेत. मनोरंजन आणि दळणवळणाचे साधन म्हणून सामान्य लोकांच्या आयुष्यात दाखल झालेल्या सोशल मिडीयाचं रुपांतर आता व्यसनात झालेय आणि लोक दिवसेंदिवस त्याच्या खोल गर्तेत लोटले जाताहेत. राजकीय सामाजिक परिमाणे वगळता सोशल मिडीयाचा आणखी एक भयावह चेहरा अलीकडे समोर येऊ लागलाय. तो काळजात धडकी भरवणारा आणि धोक्याची घंटी वाजवणारा आहे. त्यातून मानवता लोप पावून मानवी मुल्यांचा ऱ्हास घडवून आणणारी अनैसर्गिक आणि धोकादायक चिन्हे दिसत आहेत.

शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

सत्तेच्या विरोधातील आवाजाच्या दडपशाहीचे नवे स्वरूप



'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

ग्लोबल वॉर्मिंग : अर्थकारणात नव्या संकल्पना

ग्लोबल वॉर्मिंग - अर्थकारणात नव्या संकल्पना

दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नवनव्या विषयावरील चर्चांना वाव मिळतो वा कधी कधी वादाला नवा विषय मिळतो. यंदा साहित्यातील कामगिरीबद्दलचा नोबेल जाहीर झालेला नाही हा वादाचा विषय होता होता राहिला तर यंदाच्या अर्थशास्त्रातल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे वाचून काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी समाधान व्यक्तवले. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज' नावाने ओळखला जातो. यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम नॉर्डस, पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांत विभागून दिला जाणार आहे. पुरस्काराच्या रुपाने त्यांना ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळतील. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेत्यात अमेरिकनांचा दबदबा कायम राहिलाय, हे वर्षही त्याला अपवाद नाही. विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर हे दोघेही प्रज्ञावंत अमेरिकन आहेत. नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही त्यांनी येल विद्यापीठातूनच घेतले आहे. तसेच प्रतिष्ठित मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी पीएचडी केली आहे. तर पॉल रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक आहेत. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो या विषयावरती संशोधन केलं आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले आहेत. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्या नावाची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रस्तावना महत्वाची आहे. त्यात म्हटलंय की, "जगापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या या जटील आणि महत्वाच्या प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. सर्वंकष व्यापाराच्या बाजाराचं आर्थिक आकलन आणि निसर्गाचे स्वरूप यांच्यातल्या पूरक नात्याचा आर्थिक सूत्रांचा आराखडा यांनी मांडला आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निर्दालन करताना शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...



राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो..

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..



जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

'परमाणू' - पोखरणच्या अणूचाचणीचा सोनेरी इतिहास..



बरोबर २० वर्षांपूर्वी भारताने संपूर्ण जगाला आपली ताकत दाखवून दिली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या त्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते. ११ मे १९९८ रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने केलेल्या अणूस्फोट चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. ११ मे च्या दुपारी ३.४५ च्या सुमारास तीन त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे रोजी दोन अशा एकूण पाचही अणूस्फोटाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या. भारत अणवस्त्र संपन्न देश बनल्याचा संदेश या चाचण्यांमधून जगभरात गेला. याच घटनेवर आधारित 'परमाणू' या चित्रपटाचे 'झी सिनेमा'वर आज स्क्रीनिंग आहे. #indiblogger