रविवार, १९ जून, २०१६

विठ्ठलभक्तीची पाऊसवारी...


आषाढी वारीतलं कुंद पावसाळी वातावरण, टाळमृदंगाचा तालबद्ध नाद, वारकऱ्यांची एका लयीत पडणारी पावले आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्षेत तिकडे पंढरपुरात कंबरेवर हात टेकवून विटेवर उभं असलेल्या विठ्ठलाच्या जीवाची होणारी तगमग हे सारंच अद्भुत असतं. याचा सर्वात मोठा आणि सर्वकालीन साक्षीदार असतो तो पाऊस. या पावसाचं आणि आषाढीचं नातं मायलेकरासारखं आहे. हा पाऊस पेशाने शेतकरी असलेल्या वारकऱ्याच्या जीवनांत अनन्यसाधारण स्थानी आहे. कारण त्याचं अवघं जीवन त्याच्याभोवती गुंफलेलं आहे. कदाचित यामुळेही ऐन पावसाळ्यातल्या आषाढी वारीस दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येतेय.

निसर्गचक्रातील तीनही ऋतू मानवी जीवनासाठी महत्वाचे आहेत पण त्यातही पावसाळ्याचे अप्रूप जास्ती आहे कारण पाऊस समाधानकारक बरसला तरच जीवनचक्र सुरळीत चालते. ग्रामीण जीवनांत तर पावसाचे महत्व श्वासाइतके आहे. त्यामुळे मनामनात पावसाला अनन्यसाधारण स्थान आहे. मानवी जीवनाच्या प्रारंभापासून ते प्रचलित लोकसाहित्यापर्यंत पावसाचे प्रकटन आढळते. त्यातून पावसाविषयीची आस्था आणि पावसाचे महत्व अधोरेखित होते. 'मृगाची पडली झड...गुराख्याच्या पोराची मोडली खोड,' 'लागल्या उत्तरा...तर भात खाईल कुत्रा,' 'नाही लागल्या मघा...तर ढगाकडे बघा,' 'लागला हत्ती तर...पाडील भिंती,' 'पडल्या स्वाती तर पिकतील मोती,' अशा काही म्हणी ग्रामीण भागात प्रसिद्ध आहेत. या गोष्टीही भारतीय शेतीचे आर्थिक गणित मोसमी पावसावर अवलंबून आहेत, हे दर्शवतात...'मृगाची पेरणी...धनधान्य देई...' या परंपरागत समजुतीसोबत 'सत्ताविसातून नऊ वजा केले तर शून्य येते,' असेही म्हटले जाते. शेतकऱ्यांचे हे पारंपरिक गणित अगदी अचूक आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक समजुतीनुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे कोरडी गेली, तर दुष्काळ पडतो. याउलट हीच नऊ नक्षत्रे व्यवस्थित बरसली, तर मात्र अन्नधान्याची संपन्नता येते.

साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात मान्सून दाखल होतो आणि तो दाखल झाल्यावर भारतभरात आनंदाचे वातावरण होते. एप्रिल-मेमध्ये उन्हाच्या तडाख्यातही शेतकरी शेतजमिनीची मशागत करून तयार असतात. मृग नक्षत्राचा पाऊस चांगला झाल्यास मृगातच म्हणजे साधारण वीस जूनपूर्वी पेरण्या होतात. जूनच्या पाहिल्या पंधरवड्यात पेरण्या झाल्यास चांगल्या उत्पादनाची हमी असते. मृगाचा पाऊस चांगला झाल्यानंतर (मान्सून नियोजित वेळेत आल्यास) पुढील नक्षत्रांचा पाऊसही साधारणपणे समाधानकारक होतो, आणि खरीप हंगाम चांगला जातो. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या पाहिल्या पंधरवड्यापर्यंत प्रत्येक गावात सुतार शेतीची अवजारे तयार करण्यात मग्न असतो. सुताराच्या दारात तिफन करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसते. त्यासाठी लागणारे साहित्य लोहाराकडून आणले जाते. गावातल्या मातंगवाड्यात दोरखंड वळण्याचे काम जोरात सुरू असते. ही सगळी कामे फक्त मान्सूनच्या आगमानावर अवलंबून असतात. गावगाडा चालतो तो मान्सूनच्या जोरावर अवलंबून असतात. बी-बियाणांसाठी खेडोपाडी भरणारे आठवडा बाजार गजबजून जातात. त्यामुळे बलुतेदारांसह, बाजारहाट, अलीकडे औषधांची- खतांची दुकानेही गजबजून जातात.

दमदार पावसाच्या जोरावरच खरीप हंगामातील पिकेही जोमदार येतात. उत्पादनही चांगले होते. पर्यायाने जनावरांना चारा-आणि अन्नधान्यांची मुबलक उपलब्धता होते. शेतकरी चांगले उत्पादन निघाल्यास अतिरिक्त उत्पादन विक्रीला काढतो. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्रीची साखळी तयार होते. त्याला दुग्धउत्पादनाची जोड मिळते. अलीकडे झपाट्याने वाढलेल्या फळबागाही मान्सूनच्याच पावसावर अवलंबून असतात.जसे की डाळिंबाचा 'मृगबहार' प्रसिद्ध आहे. शेतीचे उत्पन्न चांगले मिळाले तरच शेतकर ट्रॅक्टर, शेती अवजारे, बी-बियाणे, खते, फवारणीचे पंप, पाणी उपसा करण्याचे पंप आदींची खरेदी करतो. त्याद्वारे शेतीची प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते. पिके चांगली आल्यास शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत असतो. शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामुळेच विविध सणही उत्साहात साजरे केले जातात. शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी शेतकरी बैल पोळा सण साजरा करतात. मग पाठोपाठ आपले विविध सण येतात. त्या दरम्यान शेतीचे उत्पन्न चांगले झाल्याने खरीप आणि रब्बी पिकांचे पैसे शेतकऱ्यांकडे आलेले असतात. मान्सूनची समाधानकारक हजेरी लागली नाही, तर मात्र शेतकरी चिंतातूर होतो. दुष्काळाचे सावट गडद होते. खरिपाच्या पेरण्या होत नाहीत, राने कोरडी पडतात. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न भेडसावायला लागतो. पाणीटंचाई गंभीर रूप धारण करते. अन्नधान्याचे दर वाढतात. शेतीचे एक उत्पन्न गेले तर शेतीचा खर्च भागविणे शेतकऱ्याच्या हाताबाहेर जातात.

गावगाडा ठप्प होतो. छोटा शेतकरीच नाही तर अगदी मोठी शेती, बागायत असणारा शेतकरीही अडचणीत येतो. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होतात, अशा अवघड परिस्थितीतच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी व्हायला लागते. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागतात. त्यामुळे खेड्यापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या म्हणजे मान्सून लांबल्याने गेलेले बळीच आहेत. मान्सून ठीक तर गावगाडा नीट आणि गावगाडा नीट तर आर्थिक गणित व्यवस्थित असेच म्हणायला हवे. त्यामुळे मान्सून वेळेत आणि चांगला झाला तरच शेतकरी, खेडी, आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला हत्तीचे बळ मिळते. हीच इच्छा मनी धरून शेतकरी वारीला जातो.

महाराष्ट्रात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो विठ्ठलभक्त पंढरपूरला जातात. या यात्रेला वारी म्हटले जाते कारण वारी करणारे वारकरी नेमाने पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या कृषिपरंपरेचा वारीवर मोठा प्रभाव आहे. सर्वसाधारणपणे आषाढ महिन्यात खरिपाची पेरणी करून आणि कार्तिक महिन्यात रब्बीची पेरणी करून वारकरी पंढरपूरला जातात. आषाढी यात्रेत पश्चिम महाराष्ट्रातील आणि खान्देशातील वारकरी पंढरपूरला येतात, तर कार्तिकी एकादशीला विदर्भ व मराठवाड्यातील यात्रेकरू बहुसंख्य असतात. वारीचं आणि पावसाचं एक खास नातं आहे. आषाढात नभी सर्वत्र श्याममेघ दाटून आलेले असतात, आता काही क्षणात पाऊस पडतो की काय असं वाटत राहतं. भूतलावरचा वारकरयांचा जत्था जिथून मार्गक्रमण करत असतो तिथे वरुणराजा त्याची त्रेधातिरपीट उडवत नाही. त्याच वेळी राज्यात अन्यत्र मात्र तुफान पाऊस कोसळत असतो, असं कसं काय होतं हे न उकलणारं कोडं आहे. विठ्ठल आणि त्याचे वारकरी भक्त यांच्यातले पावसाचे हे कनेक्शन अद्भुत आहे. कारण पेरणी केलेली शेतं तशीच टाकून हे पंढरीस आलेले असतात आणि तिकडे पाऊस कधी हवा तसा वेडावाकडा नाचतो तर कधी ढगाआड रुसून बसतो. पण वारकरी कधी त्याची फिकीर करत नाही. तो भक्तीभावाने आणि पूर्ण विश्वासाने आपली वारी पुरी करतो. एका अर्थाने ही विठ्ठलभक्तीची पाऊसवारी असते. कारण येथून परतल्यानंतर वारकरी पुन्हा त्याच्या शेतीच्या मशागतीत व्यग्र होतो आणि विठ्ठलाने दिलेलं दान आनंदाने स्वीकारतो.


आज आषाढी एकादशी आहे. पंढरीत आज वारकऱ्यांच्या उत्साहास उधाण आलेलं असतं आणि सारा भवसागर भक्तिरसात चिंब झालेला असतो. विठूरखुमाईच्या पुढ्यात उभं राहणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनास तृप्तता लाभते. तो विठ्ठलाला काही मागत नाही पण त्याच्या मनात काय आहे हे विठ्ठलास नक्की उमगते. खरं बघायला गेलं तर आजचा शेतकरी चौदिशांनी नागवला गेलाय, त्याची दुःखे नेमकी काय आहेत हेच कुणी समजून घ्यायला तयार नाही. अलीकडील काळात जग स्वतःच्याच तालात मग्न होऊ लागलेय. त्याला इतरांची फारशी तमा नाही. तर इकडे बळीराजा मात्र काट्या कुट्यांनी भरलेल्या आयुष्यात आणि कष्टाच्या ओझ्यातही सुखी आहे. आजच्या जगात सर्वत्र शोषक धनिकांचे वर्चस्व दिसून येतेय आणि शेतकरी हा वंचित, शोषितच राहू लागलाय. असं असूनही विठ्ठलाच्या चरणी लीन होताना सगळी दुःखे विसरत तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. विठ्ठलाने त्याची दुःखे जाणावित, त्याचं ओझं हलकं करावं. आत्महत्यांच्या विचारापासून त्याला परावृत्त करावं, संघर्षाच्या जीवनालाच आपला गुरु मानत त्याने काळ्या आईच्या कुशीत समाधानात जगावं इतकं वरदान तरी त्याला द्यावं. अलीकडे सातत्याने रिती राहत असलेलीं बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठलभक्तीची पाऊसवारी मनसोक्त बरसावी आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या जीवनवेलीला सुखानंदाची अगणित फुले यावीत..

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा