मंगळवार, ३ मे, २०१६

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !

कंदहारपासून दक्षिणपूर्वेस २७ किमी अंतरावर दमोर्सी घुंद (deh morasi ghundai) या स्थळी ७००० ते ५००० वर्षापूर्वीचे अख्खे खेडे सापडले होते. या स्थळापासून जवळ असणारया सईद क़ला घुंद(Said Kala Ghundai) या भागात ताम्र युगातले खेडे सापडले होते. ख्रिस्तपूर्व दोन सह्स्त्रकाहून अधिक जुनी अशी पितळी, तांब्याची भांडी तिथे सापडली होती. अनेक खोल्यांचे विटांचे पक्के बांधकाम असणरी घरे या दोन्ही गावात सापडली होती. तर कंदहारच्या दक्षिण पश्चिम भागात असणारया सियास्ताननजीकच्या शम्शीर घौर भागात देखील अशीच भांडी अन घरे सापडली होती. ह्या भागातील भांडी, वस्तू आणि घरांची रचना यांची स्थापत्य - निर्मितीशैली ही सिंधूपूर्व संस्कृतीतील स्थळांचे उत्खनन केल्यावर आढळून आलेल्या शैलीशी खूपच मिळतीजुळती होती. ड्यूप्रे लुईस या पुरातत्व अभ्यासकाने हे उत्खनन केले होते.

अतिप्राचीन इतिहासात या भौगोलिक भागाचा उल्लेख अरकोसिया नावाने आला आहे. दक्षिण, मध्य अन दक्षिणपश्चिम आशियाला जोडणारा भाग साम्राज्यवाढीसाठी अन मार्गक्रमणासाठी तेंव्हाही महत्वाचा होता आणि आजही आहे. हा भाग अकेमेंडीसकडून अलेक्झांडरच्या(सिकंदर) ताब्यात येईपर्यंतचा सर्व इतिहास रक्तरंजित आहे. त्यानंतरच्या काळात सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली हा भाग आला होता. सिमेटीक उपवंशजाच्या अर्मैक भाषेत आणि ग्रीक भाषेत कोरलेले स्तंभ अशोकाने कंदहारमध्ये उभारले होते. त्यानंतर झुबिल्सांचे तेथे राज्य होते. यानी अरबांना इसवीसनपूर्व सातव्या शतकापर्यंत झुंझवले, त्या नंतर अरब आक्रमकांनी इथे उम्मायद खलिफाची राजवट अमलात आणली. हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूपश्चात इथे उम्मायादांनी राज्य केले, पण तत्पूर्वी इथल्या स्थानिकांचा कडवा प्रतिकार त्यांना मोडून काढावा लागला.

इस्लामी धर्मप्रसारण आणि साम्राज्यवाद यांनी पछाडलेल्या अरब आक्रमकांना ज्या झुबिल्सांनी लढा दिला त्याची माहिती इथे सर्वात महत्वाची आहे. या (कंदहार) भागात तत्कालीन कालखंडात झमिनदावर (जमीन + दतबार = न्याय किंवा जामीन किंवा जमीन देणारा, वाटणारा ) आणि झाबुल (जबाला, कपिश = कपि + ईश ?- किया पी शी असं त्यांचं विविध उच्चारण होते) या लोकांनी काबुलमध्ये असणारया तत्कालीन शाह लोकाशी रोटी बेटी व्यवहार केले आणि बुद्धिस्ट-शाही अशी वेगळीच राजवट तिथे काही वर्षे नांदवली. नवव्या शतकापर्यंत यांनी पर्शियन आक्रमकांना इथे थोपवून धरले होते, दरम्यान यांनी मात्र तत्कालीन सिंधू खोऱ्यात आक्रमणे केली होती. शाह आणि झुबिल्स यांनी केलेल्या या बांधणीमुळे तत्कालीन अरब आक्रमकांनी इथल्या राजांसाठी अल- हिंद हा शब्द वापरलेला आढळतो ! हिंद !! या झुबिल्सांचे जे राज्य होते त्याला जाबुलीस्तान असाही शब्द आढळतो. नवव्या शतकात इथे धूळधाण उडाली आणि सफारीद साम्राज्यकांनी या प्रांतावर त्यांचा ताबा मिळवला, जेंव्हा अफगाण आक्रमकांच्या टोळ्या एकमेकावर शिरजोर झाल्या, त्यातही गझनीच्या आक्रमकांनी ताकदीचे हल्ले या भागात चढवले. विशेषतः मुहम्मद या सुलतानाने (जो आपल्याकडे गझनीचा मुहम्मद या नावाने प्रसिद्ध आहे) १० शतकात इथे आपले पाय पसरले अन इथे ठाण मांडून बसलेल्या घौरी आक्रमकांना पिटाळून लावले. इस ९९८ ते १०३० या कळात इथे गझनवींचे साम्राज्य होते, या काळात तिथे असणाऱ्या हिंदू आणि बौद्धांची गच्छंती झाली, शिरकाण झाले ! पुढे तैमूरच्या वंशजांनी देखील इथे हात मारला. १३८३ ते १४०७ या काळात इथे पीर मुहम्मद ह्या तैमूरच्या नातवाचे राज्य होते. १३ व्या शतकाच्या सुरुवातीस चेंगीझखानाने हे शहर पूर्ण बेचिराख केले होते. ते तैमुरच्या वंशजांनी पुनःनिर्मित केले.

१६ व्या शतकात हा भाग बाबराच्या ताब्यात होता. पुढे हा प्रांत शिया सफवैद टोळ्यांच्या हाती होता, मात्र यांचे सुन्नी मुघलांशी हाडवैर होते. त्यामुळे इथे सतत लढाया होत राहिल्या. १७०९ मध्ये मीर वैस होटक याने इथे होटक साम्राज्याचा झेंडा रोवला. १७२९ पर्यंत ही एक ताकदवान अफगाण सत्ता होती, मात्र #नादिरशहाने गील्झाई टोळ्यांशी युद्ध पुकारून इथपर्यंत धडक मारली. यामध्ये शाह हुसेन हा शेवटचा होटक राजा पराभूत झाला.

अफगाणीस्तानचा स्थापक अहमदशहा दुराणीने इथे १७४७ मध्ये ताबा मिळवून कंदहारला त्याच्या काळातील अफगाणीस्तानची राजधानी केलं. १७७० मध्ये कंदहारवरून राजधानी काबुलला हलवण्यात आली, तोपर्यंत कंदहार हेच या भागातील सर्वोच्च महत्वाचे शहर होते. यावरून कंदहारचे प्रदीर्घ ऐतिहासिक आणी भौगोलिक महत्व ध्यानात यावे. १८३२ ते १८४० आणि १८७८ ते १८८० या काळात इथे ब्रिटीशांच्या अधिपत्त्याखालील भारतीय सैन्याने अफगाणी आक्रमकांशी युद्धे केली होती. त्यानंतर जवळपास १०० वर्षे हा इलाखा शांत होता, ही शांती १९७९ मध्ये जी भंग पावली ती कधी पुनस्थापित झाली नाही. आता तर ती एक खदखदणारी रक्तरंजित जखम बनून राहीली आहे. सोविएत युनियनच्या शीतयुद्धाचा तो काळ होता. या सोविएत सैन्याशी टक्कर देण्यासाठी तिथे मुजाहिदीन टोळ्या उगम पावल्या. १९९४ मध्ये सोविएत युनियन बरोबरचे युद्ध संपले, रशियनांनी तिथून काढता पाय घेतला. आणि हा भाग तालिबानी हुकुमतीखाली आला. तेंव्हा इथला म्होरक्या होता, गुल अझा करझाई. पुढे त्याच्याजागी युसुफ पठाण आणि असदुल्लाह खालेद आले. दरम्यानच्या काळात अमेरिकेने इथे शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली सैनिकी तळ बनवले ! तालिबानी, आयसीसचे अतिरेकी आणि मुळचे अफगाण मुजाहिदीन यांची या अमेरिकन सैनिकांशी धुमश्चक्री व्हायची....

कंदहारचा इतिहास अभ्यासताना हिंदूकुश पर्वताचा उल्लेख न केल्यास तो पूर्णत्वास जाणार नाही. गझनी हे शहर आताच्या काबुल कंदहार हायवेवर असणारे शहर आहे. इसपूर्व सातव्या शतकात इथे बौद्धांचे प्राबल्य होते. तैपेई सरदार या प्रचलित नावाने असणारया भागात निद्रावस्थेतील बुद्धांची मूर्ती सापडली होती. महायान शैलीतले इथले स्थापत्य आणि नालंदामधले स्थापत्य यात बरेचसे साम्य आहे. तत्कालीन कंदहार आणि गझनी यांच्या मधोमध मध्यअफगाणीस्तान ते उत्तर पाकिस्तानच्या दरम्यान असणाऱ्या ९०० किमी लांबीच्या ज्या पर्वतरांगा आहेत ते म्हणजे हिंदूकुश पर्वत होत. हिंदूकुश हिमालयन भाग असाही याचा भौगोलिक उल्लेख होतो. प्राचीन ग्रीक इतिहासात याचे उल्लेख ईंडीकस (INDICUS - Caucasus Indicus) या नावाने आहेत. ग्रीक इतिहासात नोंद असणारया ओक्सोस (OXOS) नदीचे (जिचे संस्कृत इतिहासात वक्षु असे उलेख आहेत) आणि सिंधू नदीचे खोरे या हिंदूकुश पर्वत रांगांनी छेदले आहेत आणि तिचे दोन भाग केले आहेत. कुशचे शब्दार्थ पाहिले तर कुस म्हणजे जिथून निर्मिती होती ती असा अर्थ इथे घेता येतो. सिंधू ( INDUS) ची कूस जिथून उगवते तो पर्वत असाही याचा अर्थ काही अभ्यासक लावतात. या हिंदूकुश पर्वत रांगातील सर्वात उंच शिखराचे नाव आहे तिरीच मीर ! आणि हिंदूकुशचा मूळ उच्चार कुश नसून काश असल्याचे दाखले देताना काश मीर (काश्मीर) हा उल्लेख आपसूक येतो ...

एकंदर बारकाईने निरीक्षण केलं तरी हा संपूर्ण भूभाग पूर्वी हिंदू, नंतर बौद्ध अन पुढे इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात होता इतके अनुमान तरी नक्कीच काढता येते. कंदहारचा इतिहास असा रंजक आहे. ज्या देशातले लोक आपला इतिहास विसरतात तिथला भूगोल निश्चित बदलला जातो याची आठवण लोकांना कुणी अन कशी करून द्यावी म्हणजे लोक जागे होतील याचे उत्तर कुणाजवळच नाही...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा