शुक्रवार, २८ मार्च, २०२५

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..


आमच्या भागात उन्हाळा संपेपर्यंत पारा आता चाळीस डिग्रीहून खाली येत नाही. आणखी अडीच महीने सूर्य आग ओकत राहतो. दुपारी रस्ते ओस पडतात. गावाकडे शेतशिवारं रखरखीत वाटू लागतात. ज्यांची बागायत असते तेही घायकुतीला येतात, काही तालेवार यातही हात मारतात! जिरायतवाल्यांच्या तोंडाचे पाणी पळते. रान भुसभुशीत होऊन जातं. खुरटी झुडपंही मान टाकतात. दूरवरच्या माळांनी सगळं गवत शुष्क पिवळं करडं होऊन जात. बांधावरच्या बोरी बाभळी मौन होतात. शेतांच्या कडेने असणाऱ्या वडाच्या झाडांपाशी सावल्यांची झिल्मील अव्याहत जारी राहते.

आओगे जब तुम साजना..


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत 'आओगे जब..' हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.
 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!

मंगळवार, २५ मार्च, २०२५

माती आठवणींच्या थडग्याची!


लिंगायत समाजाचा मित्र आहे. त्याच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. विधिवत घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मल्लिकार्जुन मंदिराला वळसा घालून अंतिम दर्शन घेऊन लिंगायत स्मशानभूमीत दाखल झाली. तिथं आधीच निर्धारीत केलेल्या जागी खड्डा खोदून ठेवला होता. अखेरचे विधी सुरु झाले नि मित्र कासावीस झाला. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या अपरोक्ष आईने लहानाचे मोठे केले होते. तिच्या परीने तिने सर्वोच्च योगदान दिले होते. तिचे आता कुठे सुखाचे दिवस आले होते नि ती चटका लावून निघून गेली. उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्राचं लग्नही उशिरा झालं नि अपत्य व्हायलाही बराच वेळ लागला. परिणामी अंगणात सानुली पाऊलं खेळण्याची त्या वृद्ध माऊलीची इच्छाही विलक्षण लांबली. मित्राची मुलगी जस्ट पाच वर्षांची. तिची आणि आज्जीची दोस्ती जिवाशिवासारखी! आज्जी गेली नि ती पोरगी पार हबकून गेली. स्मशानभूमीत ती टक लावून म्हाताऱ्या शेवरीला पाहत होती! मांडी घालून बसलेल्या अवस्थेत त्यांना माती देण्यात आली. दफनविधी पूर्ण झाल्यानंतर सारे आप्त स्नेही पुन्हा कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळा झाले. तिथे महंत गुरव लोकांची काही बोलणी झाली. काहींनी श्रद्धांजली वाहिली. हे सर्व होत असताना त्या चिमुरड्या मुलीचे लक्ष आज्जीला जिथे दफन केलं होतं त्याच जागेकडे होते. खरेतर बहुतांश मंडळी इथे लहान मुलांना आणत नाहीत मात्र मित्राचं म्हणणं असं आलं की मुलीच्या मनात आज्जीच्या अंतिम स्मृती खोट्या वा लपवलेल्या स्थितीतल्या नसलेल्या बऱ्या, तिच्या आज्जीचा एकेकाळी शेतीवाडीवर फार जीव होता अखेर ती मातीतच विलीन झाली हे तिला कधीतरी योग्य पद्धतीने आकळण्यासाठी तिला तो तिथे घेऊन आला होता. आता आणखी काही वर्षे तरी ही जागा आणि ही वेळ त्या मुलीच्या विस्मरणात जाणं शक्य नाही. मात्र कधी कधी या गोष्टींचा त्रासही होतो. 

गुरुवार, २० मार्च, २०२५

होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!

 

   

काल धुलिवंदनानिमित्त शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमातील कार्यक्रमास गेलो होतो. बऱ्याच मोठ्या संख्येत वयोवृद्ध तिथे वास्तव्यास आहेत. तिथल्या काहींची देहबोली अगदी हतबलतेची तर काही चेहरे पूर्णतः निर्विकार, टोटल ब्लॅंक! तर काही चेहऱ्यांवरती उसन्या अवसानाची ग्वाही देणारं केविलवाणं हास्य तर काही मात्र रसरशीत वार्धक्यास संघर्षासह सामोरे जाणारे नितांत प्रसन्न चेहरे! तरीही एकुणात ते सारे ओकेबोकेसे लोक ज्यांना त्यांच्याच कुणीतरी जिवलगाने तिथं भरती केलेलं कधी काळी. कुठल्या तरी दिवशी आणून सोडलं असेल.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.

मंगळवार, ११ मार्च, २०२५

शौचालयाचे नागरिकशास्त्र!

समीरगायकवाड समीर गायकवाड
जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! 


शिकागोहून दिल्लीला नॉनस्टॉप येणारे एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरवावे लागल्याची लाजिरवाणी घटना काल उघडकीस आली. या विमानातील १२ टॉयलेट्सपैकी अकरा टॉयलेट्स / कमोड चोकअप झाल्याने विमान माघारी फिरवावे लागल्याने ही घटना अत्यंत लज्जास्पद म्हणावी लागेल. या टॉयलेट सीट्समध्ये प्रवाशांनी पॉलिथिन बॅग्ज, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरविअर्स आणि बॉटल्स टाकल्याचे उघड झालेय. या घटनेमुळे आपल्याकडील काही लोक एअरइंडियाला ट्रोल करत आहेत. खरेतर अपवाद वगळता समग्र भारतीय माणूसच यासाठी ट्रोल व्हायला हवा! कारण आपल्याकडील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स मधील टॉयलेट्स अत्यंत गलिच्छ घाण अवस्थेत असतात. चुकून कधी अशा ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तर केवळ दरवाजा उघडून पाहिला तरी माणूस ओकारी करेल असे दृश्य दिसते. इतकेच नव्हे तर अशा कमालीच्या घाणेरड्या ठिकाणी गेल्याची एक घृणास्पद स्मृती मनात अकारण ठासून राहते त्याचा पुनर्स्मरण देखील शरमेने मान खाली घालायला लावते!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२५

आनंदाची एक्सप्रेस..

क्रांती महिला संघाच्या स्नेह मेळाव्याचे बॅनर  

घटना काही दिवसांपूर्वीची आहे मात्र सोशल मीडियावर त्याविषयी लिहिण्यासाठीची औपचारिक अनुमती उशिराने मिळाली, सबब आज लिहितोय. विख्यात वाहिनीच्या निर्मितीप्रक्रियेत सामील असणाऱ्या सुजाण सहृदयी मित्राच्या पत्नीस कर्करोगाचे निदान झाले. कुटुंब काहीसे विस्कळीत झाले. नोकरी सोडून पत्नीला वेळ देणे क्रमप्राप्त ठरले. यात काही वर्षे गेली. डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि उभयतांच्या जिद्दीला यश आले. त्यांची पत्नी यातून बरी झाली. आपण आजवर खूप कामावले आहे आता समाजासाठी काहीतरी केले पाहिजे नि आपल्याला लाभलेले उर्वरित आयुष्य समाजकारणी लावले पाहिजे असा निर्धार त्यांनी मनोमन केला. यातून काही समाजोपयोगी उपक्रमही राबवले. तरीही ते सॅटीसफाइड नव्हते. मग त्यांनी एक नवा मार्ग निवडला.

ज्या लोकांच्या आयुष्यात आनंद नाही त्यांना एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती द्यायची. ज्यांना प्रवास करता आला नाही, पर्यटन करता आलं नाही, हॉटेलिंग करता आले नाही, विविध स्थळांना वा शहरांना भेटी देता आल्या नाहीत अशांना त्यांनी प्राधान्य दिले. विविध सामाजिक स्तरावरील गांजलेल्या, पिचलेल्या, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना या आनंदाची अनुभूती ते मिळवून देऊ लागले. मजूर, ओझी उचलणारे हमाल, वंचित शोषित घटक, कामवाल्या स्त्रिया, हातावर पोट असणारे गरीब यांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे काही क्षण भरले! काही दिवसापूर्वी त्यांचा माझा संवाद झाला तेव्हा त्यांनी सेक्सवर्कर महिलांना मुंबईवारी करवून आणण्यासाठी मध्यस्ताचे काम करण्याबाबत विचारले. मी तत्काळ होकार दिला.

रविवार, १९ जानेवारी, २०२५

अलेक्झांडरच्या वंशाची भुरळ!


सध्या कुंभमेळयाविषयी अनेक प्रकारच्या चर्चां सुरू आहेत, त्यातलीच एक माध्यमाकर्षण असणारी गोष्ट म्हणजे मोनालिसासारखी दिसणारी भारतीय मुलगी! या मुलीच्या पार्श्वभूमीचा धांडोळा घेताना हिमाचल प्रदेशमधील मलाना या खेड्यातील बायकापोरी आठवल्या. कारण ही कथित मोनालिसा आणि या मुलींमध्ये खूप साम्य आहे. मात्र याची मूळे थेट महान योद्धा अलेक्झांडरपर्यंत जाऊन पोहोचतात! थोडे विषयांतर वाटेल मात्र यातही एक कथा, एक आख्यान आणि एक आसक्ती दडून आहे!

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

वक्त ने किया क्या हसीं सितम..

गुरुदत्तच्या 'कागज के फूल'मध्ये 'वक्त ने किया क्या हसीं सितम हम रहे ना हम...' हे निहायत देखणं अर्थपूर्ण गाणं आहे. हे लिहिलंय कैफी आजमी यांनी. हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. सिनेमा शूट झाला होता 1954 मध्ये. अप्रतिम छायाचित्रणाचे वेधक उदाहरण म्हणून या गीताकडे पाहता येईल. गुरु दत्तकडे कैफींनी गाणं दिलं तेव्हा त्यांचं वय होतं तेहतीस वर्षांचं! हे गाणं त्यांनी कागज के फूल साठी लिहिलं नव्हतं. ती त्यांची वैयक्तिक दर्दभरी कैफियत होती.