शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

सय ....



गेल्या दोन तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं ? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभे केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाच वेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधून मधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं ह्या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाऱ्या प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आईवडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन अश्रुंचे पाझर लागून राहावेत तसं ह्या पावसाचं झालंय.

महिनाभर काबाडकष्ट करून कशीबशी सुट्टी मिळवून गावाकडे जाताना बस चुकावी अन रात्रभर वाट बघत बसल्यावर घरातले अणुरेणू डोळ्यापुढे फेर धरून नाचत राहावेत तसे ह्या पावसाने फेर धरलेत. मायाबापापासून फारशी कधी विलग न झालेली एखादी हरीणडोळ्याची हळदओली नवविवाहिता पहिल्यांदा माहेरी जाताना तिला प्रवासातली रात्र मोठी वाटत जाते आणि भवतालचा काजळअंधार अधिक गहिरा वाटत जातो, नकळत एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून येत राहते अन माहेरची ओढ अधिकच तीव्र होत जाते. कधी एकदा दिवस उजाडेल आणि घराच्या उंबरठ्यावर जाऊन धडकेन असं होऊन जाते तसं ह्या रात्रभर कोसळणारया पावसाचे झालंय. उद्या गणिताचा पेपर असावा मात्र त्याचा अभ्यास काहीच झालेला नसावा, मग रागावलेल्या वडिलांचे आणि त्यांना आणखी भरीस घालणाऱ्या गुरुजींचे चेहरे रात्रभर सारखे तरळत राहावेत तसेच ह्या पावसाचे ढग रात्रभर घराबाहेर तरळत आहेत.....

ज्यांचे कुणाचे छत्र नुकतेच हरवलेले असते त्यांना रात्रीचा पाऊस गुदमरून टाकतो, मेघांच्या अभ्र्यात त्यांना मायबाप कधी दिसू लागतात अन डोळ्यातला पाऊस कधी कोसळू लागतो काही केल्या उमगत नाही. जन्मदाते गेल्यानंतरची पहिली पाऊसरात्र कशी वाटते ते सांगता येत नाही. रात्रीच्या पावसात एका मोठ्या वटवृक्षाखाली उभं असताना एखादी लकाकणारी वीज यावी अन तिने अख्खं झाड आपल्यासोबत घेऊन जावं, आपण तसंच हतबल होऊन तिथंच त्यांची वाट बघत रात्रभर रडत उभं राहावं. त्यांची आठवण येत रहावी. त्यांनी ज्या करंगळीला धरून आपल्याला चालवलं तिला रात्रभर शहारे येत राहावेत, त्यांनी थोपटलेल्या पाठीवर रात्रभर काटे येत राहावेत, त्यांनी आपल्या भल्यापोटी कधी हातावर पट्ट्या मारल्या असतील त्या हातावरच्या त्या वळांनी पुन्हा उमटत जावं, आपल्याला सायकल वरून शाळेत सोडताना त्यांनी हात हलवून आपल्याला धीर देत राहावं अन तो त्यांचा हात त्या रात्रभरच्या पावसात तरळत रहावा. कधी आजारपण आलं तर त्यांनी रात्रभर माथ्यापाशी बसून राहावं आणि आपण डोळेभरून त्यांच्याकडे पाहत राहावं. जगाशी कधी भांडण झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्याला हत्तीचे बळ देणाऱ्या त्या जन्मदात्याने हळूच आपल्यासाठीही कधी अश्रू ढाळावेत आणि आपली चुकून त्याकडे नजर जावी, त्यांनी म्हणावं 'काही नाही डोळ्यात जरा धूळ गेली होती रे !'. त्यांच्या या बोलण्याने आपल्या डोळ्यांना अश्रूंची धार लागावी अन आपण आयुष्यात एकदाच त्यांच्या छातीवर डोकं टेकवून मनसोक्त रडावं तसं ह्या पावसाचं झालंय.

आठवणींचे अनेक श्याममेघ एकत्र आणून नुसती काळीजवीणा झंकारत रहावी तसं ह्या पावसाचं झालंय. रात्रभर कुणीतरी आपलंच पण अनामिक असं माणूस उंबरठयापाशी आलंय असं वाटत राहावं असं या रात्रभर दाराशी लगटून राहिलेल्या पावसाचं झालंय. त्याच्याही मनात तेच आलंय जे आपल्या मनात आलंय, त्याच्या आठवणींना उधाण आलंय कारण त्याने आपल्याला प्रतिक्षेत बरंच ताठकळवलंय ! दार उघडून बाहेर बघा त्याला तेच सांगायचेय जे तुम्हाला बोलायचेय. पाऊस तल्लीन होऊन पडतोय, स्वर्गस्थ बळीराजाची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी उतावीळ झालेल्या नभाची घालमेल ऐकायची असेल तर जरा पावसात भिजावं लागेल. संततधार लागलेल्या या पावसाचे हे असं गारुड झालंय ! पावसालाही काही दुःखं असतात त्याला ती आपल्याला ऐकवायची असतात, ज्यांचे मन हळवं असतं त्यांना त्याची भाषा कळते. पाऊस घराबाहेर कोसळत असताना त्यांच्याही अंतरंगात रिमझिम सुरु असते. कालिदासाने रचलेल्या मेघदूताला जाणून घ्यायचं असेल तर साक्षर व्हावं लागतं, मात्र पावसाचं काळीज जाणून घ्यायचं असेल तर पर्जन्योत्सुकच व्हावं लागतं. मग त्यांचे सुक्त निसर्गच रचतो !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा