`माझीया जातीचे मज भेटो कोणी,
ही माझी पुरवून आस,
जीवीचे जिवलग असे भेटला की
दोघांचा एकच श्वास'
कवितेवर अशी जीवश्च निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात. बालवयापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांच्या १९५२ सालातील 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'सेतू', 'अकरावी दिशा', 'सकीना', 'मानसी' हे त्यांनंतरचे काव्यसंग्रह होत . त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी वाचली अनुभविली. पुढे 'तेजसी' व 'राजसी' हे दोन काव्य संग्रह ना. ग. गोरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. 'चंगा मंगा', 'अबडक तबडक', 'आम्ही', 'गरगर गिरकी', 'फिरकी', 'फुलराणीच्या कविता' आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. लहान मुलामध्ये मूल होऊन जगण्याची कला बापटांना नक्कीच अवगत असावी असे त्यांच्या बालकाव्यसंग्रहांच्या नावावरून वाटते. त्याच बरोबर 'बालगोविंद' हे त्यांचे बालनाट्य विख्यात आहे. पौराणिक एतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली `केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची 'सकीना' उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि, `तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा,कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा' असं व्यक्त होत त्यांच्या लेखन किमयेची कमाल सांगून गेली.