ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

केरसुणी...

गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.

केरसुणी तयार करण्यासाठी शिंदीची पानं नाहीतर मोळाचं गवत वापरलं जातं.
आमच्या सोलापूर जिल्ह्यात मायबाप पुढाऱ्यांच्या कृपेने काही अधिकृत तर मोकार वावरभरून अनधिकृत शिंदीची झाडं आहेत.
आमच्याकडं मजूर मंडळी आणि विडी कामगारांसाठी शिंदी आणि ताडी अजूनही फर्स्ट प्रेफरन्सवर आहे.
शिंदी चवीला आंबूस लागते, रिकाम्या पोटी ढोसू नये लागते. पोट डरंगळतं. ढंढाळ्या लागतात.
स्वस्तातली नशा म्हणून लोक शिंदी पितात, आजकाल केमिकल वापरून खोटी बनावट शिंदी विकली जाते. खिसे हलके झालेले आणि जिन्दगानी हरलेले लोक त्यातदेखील अमृत शोधतात.
त्याच शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करतात.
आज तिची पूजा होते. मात्र वर्षभर गावाकडे केरसुणी हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.
"कुठं गेली ती केरसुणी गतकाळी ? " असा उध्दार होत असतो.

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

मुक्या लेकीचं दुःख...



कालपरवाच्या पावसात जगूनानाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली.
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चित्रीचं वासरू



चित्रीचं वासरु पोटातच मेलं.
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

गावाकडच्या पाऊसम्हणी...


गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल...
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

दाढीपुराण...

दाढीपुराण समीर गायकवाड

गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

कृष्णशोध...



रामायणात एक कथा आहे. श्रीराम आणि लक्ष्मण गंगा नदी पार करतात तेंव्हाचा तो प्रसंग आहे. नदी पार करून नावेतून उतरल्यावर नावाड्याच्या लक्षात येतं की रामचंद्रांच्या स्पर्शाने आपली नाव सोन्याची झाली आहे. तत्क्षणीच त्याच्या मनात एक विचार येतो. तो धावतच आपल्या घरी जातो. काही वेळातच आपल्या पत्नीसह घरातल्या सर्व लहान मोठ्या जिनसा तिथे घेऊन येतो आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की त्यांनी त्या वस्तूंना स्पर्श करावा. श्रीराम त्याच्या इच्छेचा आदर करतात आणि स्पर्श करतात. त्या सर्व वस्तू सोन्याच्या होतात. हे पाहून लक्ष्मणास विस्मय वाटतो. काहीशा विशादानेच तो त्या नाविकास म्हणतो, तुला त्यांच्या स्पर्शाचा खरा अर्थच कळला नाही, नाहीतर तू त्यांना आपल्या घरी नेलं असतंस आणि आपलं घरच त्यांच्या स्पर्शाने पावन करून घेतलं असतंस. तात्पुरत्या भौतिक सुखाचीच तू अपेक्षा केलीस आणि महत्वाचं सुख तू गमावून बसलास !

रविवार, २८ जून, २०२०

पोशिंद्याचा धनी...


घरोघरच्या अंगणातली सकाळची कळा अजून पुरती सरली नव्हती तोवरच गुबुगुबूचा आवाज करत नंदीबैलवाला दाखल झाला. भाऊसाहेब गोंडे त्याचं नाव. गल्लीच्या तोंडावरच असणाऱ्या रुख्माआत्याच्या दारापुढं येताच थरथरल्या आवाजात बोलला,
"दुसऱ्याचं घर भरवणाऱ्या बाप्पा तुझं घर उसवू नकोआत्महत्या करू नकोस !"
भाऊसाहेब असं का म्हणतोस रे बाबा म्हणून खोदून खोदून विचारल्यावर तो बोलला की, “गावात शिरताच पोलीस पाटलाचं घर गाठलंआमी आल्याची अन शंभूचा खेळ करणार आसल्याची वर्दी त्यास्नी दिली. नावपत्तानिशाणी लिहून झाल्यावं परवांगी गाव्हली. तिथून पारापाशी येण्याधी पैल्या गल्लीला लक्षिमण रावताचं घर लागतं. तिथं ढोलकी घुमवलीशंभूच्या पायातली घुंगरं थिरकली. वाड्याचं दार कराकरा वाजवत उघडलं आणि आतून बोडख्या कपाळाची सारजाकाकू सूप हातात घेऊन आल्या. त्यास्नी तसं बगुन काळीज करपलं. बाई ईधवा झाली म्हंजीच लई वंगाळ झालं असं न्हवं. पर ज्या हातानं सोनं पिकवलंजगाला घास भरवला त्याच हातानं फास लावून घ्यायचा. घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्बती करायचं म्हंजे वाईच इस्कोट... बंद्या रुपयागत कुक्कु कपाळाला लावणारी घरची लक्षुमी अशी कपाळावर बुक्का लावून बघितली की पोटात कालिवतं. तिच्या कपाळावरलं काळं ठिक्कर पडलेलं गोंदण बगवत न्हाई. तिच्या हातनं पसाभर जुंधळा सुपातून घ्यायचा म्हंजे झोळीदिकून म्होरं करूशी वाटत न्हाई. सारजाकाकूच्या मोत्याच्या दाण्यांना न्हाई म्हणता आलं नाई. तवा जाऊन रुख्माआत्याच्या दाराम्होरं आल्यावर त्यास्नी भायेर यायच्या आदी आमीच बोल लावलं. आमचं चुकलं का बापू तुमीच काय ते सांगा ! आमी पडलो अनपड अडाणी. .. 
भाऊसाहेबाने माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं. मी कसला बोलणार ! माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील तर तोच होता.

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

ऋतूचक्र...


आपल्याकडे हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूमध्ये हिवाळा विभागलाय. गुलाबी थंडीचं हवामान ज्याला म्हटलं जातं तो हेमंत आणि कडाक्याच्या थंडीत जीवसृष्टी गोठून जाते, पानगळीने झाडं मोकळी होऊन जातात तो शिशिर !
इथं काही कवी मंडळी याची गल्लत करताना दिसतात म्हणून हे ज्ञानकण !
विशेष म्हणजे दिवाळसणाच्या आधी असणारा अश्विन मास शरद ऋतूत येतो, शरदाचं चांदणं खुल्या आभाळाखाली अनुभवल्या नंतर हेमंतातील रजईमधलं गुलाबी चांदणं अनुभवावंसं वाटणं ही या ऋतूची खासियत !
शृंगारासाठीच्या सर्वोत्तम रात्रवेळा हेमंत ऋतूत येतात.
आरोग्य, मन आणि शरीर या सगळ्यांची प्रसन्नता हेमंत ऋतूत कमाल असते.

गुरुवार, २५ जुलै, २०१९

जगणं ...

तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...

बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"

अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.

वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !

- समीर गायकवाड

रविवार, १६ जून, २०१९

मोळीवाला - एक आठवण वडीलांची...



'फादर्स डे'निमित्त सकाळी सोशल मीडियावर माझ्या वडीलांचा फोटो पोस्ट करताना विख्यात शायर, कवी निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. त्या पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. त्या अनुषंगाने पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना आपण नेहमीच हात आखडता घेतो हे सत्य स्वीकारत वडीलांची एक आठवण इथे लिहावीशी वाटतेय.

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

'निसर्ग'सत्व...


हिरवी पिवळी पानं असलेल्या निंबाच्या साली वाळून खडंग झाल्यात. कोवळ्यापिवळ्या उन्हाच्या माऱ्याने सालं दिवसागणिक फाकत चाललीत, त्यात बारीक फिकट तांबड्या चिकट मुंग्यांची रांग शांततेत एका तालात जातेय. दोन रांगा आहेत एक फांद्यांकडे जाणारी आणि एक बुंध्याकडे जाणारी. काही वेळापूर्वी एका अजस्त्र तेलमुंगळयाचे कलेवर त्यांनी खाली नेलंय. वीसेक मुंग्यांनी आपली ताकद, आपलं कौशल्य पणाला लावत त्याला अलगद आपल्या अंगाखांदयावर उचलून खालच्या दिशेने नेलंय. बुंध्यापासून वावभर अंतरावर त्यांचे घर असणार. दूर असलेला पावसाचा मौसम सुरु व्हायच्या आधी आपल्या खाण्याच्या चीजांची त्यांना बेगमी करायची आहे. त्या सतत वरखाली करताहेत आणि जमेल तितका साठा करताहेत. एक सूत्रात त्यांचे काम सुरु आहे. शेजारच्या झाडावरून टिकटॉक आवाज करत त्यांच्याकडे बघत अचानक वेगाने येणारया खारूताईची त्यांना खूप भीती आहे पण तरीही ते कामात गर्क आहेत. फांदीच्या तोंडाशी असलेल्या फुगीर गाठी खुल्या होऊन त्यातून बाहेर येणारया लालसर काळया डिंकात एका मुंगीचे इवलेसे पाय अडकलेत, काही क्षणात ती थिजेल किंवा मरेल. तिने त्यांच्या भाषेत काही इशारे केलेत. त्या सरशी वीसेक मुंग्या रांग मोडून तिच्या भोवती गोळा झाल्यात. अत्यंत वेगाने त्यांच्या हालचाली सुरु झाल्यात. काहींची डोकी एकमेकाला धडकताहेत, बहुधा त्या संदेश देत असाव्यात. पसरत चाललेल्या डिंकाच्या स्त्रावात त्यांनी एक नवी रांग कडेने बनवलीय आणि बाजूने अडकलेल्या मुंगीच्या मागच्या बाजूने स्त्राव अडवलाय. आणखी काही क्षणात तिचे सुईसारखे पाय वाळले तर ती हलू शकते. नव्हे तिला हलावेच लागेल. कारण मागच्या मुंग्यांनी अडवलेला स्त्राव त्या सगळ्यांना अडकवू शकतो आणि परिणामी त्या सगळ्यांचा जीव जाऊ शकतो. पाय गुंतून बसलेल्या मुंगीने आता निकराने पाय हलवलेत, तिच्या हालचाली सरशी तिच्या मागे शिरलेल्या मुंग्या एका झटक्यात बाजूला झाल्यात. त्यांच्या डोक्यांची भेंडोळी हलवत सगळ्या मुंग्या मूळ रांगात परत गेल्यात. रुतून बसलेली मुंगी काही क्षण सालीच्या एका तंतूला धरून शांत बसली आणि निमिषार्धात ती ही रांगेत सामील झालीय. ही सगळी कसरत दुरून पाहणारं लाल करड्या रंगावर पांढरे ठिपके असणारं एक फुलपाखरू यानं आनंदून गेलं आणि आपल्या पंखांना फडफडवत हसतमुखाने उडून गेलंय. सालीच्या सांदीत अडकून बसलेलं एक पिवळं पान डोळे पुसत खाली घरंगळलंय आणि बुंध्याच्या मुळाशी झेपावलंय. वरून खाली येऊ लागलेल्या त्या पिवळ्या पानाला घेऊन वारा त्याला अखेरची सैर घडवून आणायला चिंचेच्या पट्टीत शिरलाय, निंबाच्या पिवळट जीर्ण पानास बघून मातीवर लोळत पडलेल्या चिंचेच्या गुंजपत्त्यासारख्या पानांनी एकच फेर धरून निरोपगाण्यावर नाच सुरु केलाय. चिंचेच्या फांद्यातील घरटयातून डोकावणारया होल्यांच्या पिलांनी डोळे मोठे करत पानांच्या लयीवर ठेका धरलाय. इकडे निंबाच्या शेंडयावर सकाळी उगवलेल्या पालवीची मिटलेली घडी उघडलीय आणि सूर्याच्या कडकडीत किरणांना डोक्यावर घेत एक अवखळ स्मितहास्य केलंय. उन्हांना नावे ठेवत सावलीत बसलं की सकल चराचराच्या अद्भुत नादात सामील होता येतं. किती ही कडक ऊन पडलं तरी झाडांच्या कोवळ्या पानांना कान लावले तर त्यांच्या कन्हण्याचा आवाज ऐकता येईल. काही दिवसांपूर्वी पानगळ सुरु झाली होती तेंव्हा झाडावरच्या जुन्या पानांनी नव्या कोवळ्या पानांना जगण्याचा मंत्र शिकवलाय तो ऐकता येईल. 'पावसाची आर्जवं करायची नाहीत की त्याला भ्यायचंही नाही, आणि त्याच्या कुरवाळण्यालाही नाही भुलायचं. आपलं काम चोख करत राहायचं, मातीच्या वचनाला जागायचं.' हाच तो मंत्र.

रविवार, २० जानेवारी, २०१९

'अक्षर' कहाणी...


‘वपुर्झा’मध्ये व. पु, काळे लिहितात की, “एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमीनीवरच आहोत.“

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कैफ...



ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

पिशवीसूत्र



खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं.

मंगळवार, ५ जून, २०१८

जुना पाऊस..


प्रत्येक पावसाळा तिची आठवण घेऊन येतोच.  
खिडकीतून दिसणारया शाममेघांत तिचा भास  होतोच......
"भिजलेली ती आणि तिला भिजवण्यात आनंद मानणारा रमत गमत पडणारा पाऊस. 
रुणझुणत्या पावसात छोट्याशा हातगाड्यावर सुगंधी चॉकलेटी वाफाळता चहा
पिताना तिच्या किनकिणाऱ्या बांगड्या, तिनें मान डोलवली की हेलकावे खाणाऱ्या इअररिंग्ज.
ओलेते कपडे नीटनेटके करताना कपाळावर पुढे येणाऱ्या कातिल बटा.

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...



आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

पांथस्थांचा विसावा ...


रांजणातले पाणी आणि लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता असते. पोटातली आग आणि  चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी असते. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा आणि पितळी तांब्यातलं थंडगार पाणी कुणाचीही तहानभूक भागवण्यास समर्थ असते. यांच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नसतो. निवांत गप्पा मारताना मार्क्स ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासम  गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी गंभीर चर्चाही इथं नसते.

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

पावसाचा सांगावा.....



उन्हाळा जसजसा संपत यायचा तसे कधी कधी आभाळ दाटून येई अन वडिलांची ओढ त्या आभाळाकडे असे. आभाळ थोडे जरी झाकाळून आले तरी ते गावाकडे शेतात असणाऱ्या गडयाला फोन करत. तिकडे काय हालहवाल आहे याची चौकशी करत त्यातूनही त्यांना समाधान मिळत नसे. मग ते गावाकडे असणाऱ्या त्यांच्या लहान भावंडाना म्हणजे सदाशिव काका किंवा नेताजी बाबा नाहीतर क्वचित बापूकाकांकडेही ते विचारणा करत. शेतातला गडी नानू राठोड हा अक्कलकोट तालुक्यातल्या कडबगावचा होता, त्याचं मराठी अगदी तिखट शेंगाचटणी सारखं तरतरीत आणि लवंगी फटाक्यासारखं कुरकुरीत होतं. सोलापुरात थोडा जरी पाऊस झाला तरी वडील त्याला विचारत, "काय नानू पाऊस आहे का रे गावाकडे ?". थोडाफार पाऊस जर झालेला असेल तर त्याचे उत्तर असे - "तात्या ह्यो कसला वो पाऊस ? पाखराची पखं सुद्धा भिजली नाहीत बगा, उगं रडणारयाचे डोळे पुसून गेलाय !", आमचं सारं घरदार, गणगोत अन गाव शिवार माझ्या वडिलांना तात्या या नावानेच हाक मारी. पण नानूचं ‘अवो तात्या’ असं हाक मारणं म्हणजे कानडी बाईने मराठीत मुरके घेतल्यासारखे असे.

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

शिवाजीराजांचे नव्या दमाचे 'नवे किल्लेदार'.....



दिवाळीची आम्ही वाट बघतो आपल्या शिवाजी राजांसाठी ! दिवाळीतल्या फराळ फटाक्यापेक्षा राजांचे आगमन जास्त दणक्यात अन अगदी उत्कंठेने साजरे होते ! सिंहासनाधीश राजे दिवाळीच्या आधी किल्ल्यात स्थानापन्न होतात तोच दिवस खरा दिवाळीचा दिवस !! प्रत्येक अंगणात उभे राहतात गडकोट ! छातीचा कोट फुलून यावेत असे देखणे गडकोट !! काळ्या - करड्या मातीतून बनलेले हे किल्ले कधीच भग्नावस्थेतल्या खंडहरासारखे नसतात , ना यांना खिंडारे असतात, ना चिरे ढासळलेले राजवाडे ना पडलेले महाल !! या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या राजाचे धगधगते चैतन्य ओसंडून वाहत असते. नवीन आस मनी घेऊन चिमुकल्या हातांनी नव्या उमेदीने जीव लावून बांधलेले ते काळजाचे बुरुजच असतात, त्याला शोभिवंत करण्यासाठी रोशनदाने, मशाली, टेंभे, चिरागदाने, शामदाने ना उंची झुंबरे यापैकी काही लागत नाही ! या किल्ल्यांना प्रकाशमान करण्यासाठी पुरेशा असतात काळजाच्या पणत्या, ज्यात घामाचे तेल असते अन डोळ्याच्या फुलवाती !

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

दुसरा प्रवास ....



रेल्वे स्टेशन असो बस स्थानक वा अन्य कुठले सार्वजनिक गर्दीचे स्थान असो...
अशी मलूल, ओशाळवाणी, करपलेली अनाथ मुले आपल्याला हटकून दिसतात..
त्यांना पाहून आपण काय विचार करतो ? ...आपली संवेदनशीलता तेंव्हा नेमका काय प्रतिसाद देते ? हा प्रश्न अनाठायी आहे कारण त्यांचा आपल्याशी थेट संबंध काहीच नसतो. आपण त्यांच्या जगात नसतो आणि ते आपल्या जगात नसतात.