मंगळवार, २५ मार्च, २०२५

माती आठवणींच्या थडग्याची!


लिंगायत समाजाचा मित्र आहे. त्याच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. विधिवत घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मल्लिकार्जुन मंदिराला वळसा घालून अंतिम दर्शन घेऊन लिंगायत स्मशानभूमीत दाखल झाली. तिथं आधीच निर्धारीत केलेल्या जागी खड्डा खोदून ठेवला होता. अखेरचे विधी सुरु झाले नि मित्र कासावीस झाला. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या अपरोक्ष आईने लहानाचे मोठे केले होते. तिच्या परीने तिने सर्वोच्च योगदान दिले होते. तिचे आता कुठे सुखाचे दिवस आले होते नि ती चटका लावून निघून गेली. उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्राचं लग्नही उशिरा झालं नि अपत्य व्हायलाही बराच वेळ लागला. परिणामी अंगणात सानुली पाऊलं खेळण्याची त्या वृद्ध माऊलीची इच्छाही विलक्षण लांबली. मित्राची मुलगी जस्ट पाच वर्षांची. तिची आणि आज्जीची दोस्ती जिवाशिवासारखी! आज्जी गेली नि ती पोरगी पार हबकून गेली. स्मशानभूमीत ती टक लावून म्हाताऱ्या शेवरीला पाहत होती! मांडी घालून बसलेल्या अवस्थेत त्यांना माती देण्यात आली. दफनविधी पूर्ण झाल्यानंतर सारे आप्त स्नेही पुन्हा कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळा झाले. तिथे महंत गुरव लोकांची काही बोलणी झाली. काहींनी श्रद्धांजली वाहिली. हे सर्व होत असताना त्या चिमुरड्या मुलीचे लक्ष आज्जीला जिथे दफन केलं होतं त्याच जागेकडे होते. खरेतर बहुतांश मंडळी इथे लहान मुलांना आणत नाहीत मात्र मित्राचं म्हणणं असं आलं की मुलीच्या मनात आज्जीच्या अंतिम स्मृती खोट्या वा लपवलेल्या स्थितीतल्या नसलेल्या बऱ्या, तिच्या आज्जीचा एकेकाळी शेतीवाडीवर फार जीव होता अखेर ती मातीतच विलीन झाली हे तिला कधीतरी योग्य पद्धतीने आकळण्यासाठी तिला तो तिथे घेऊन आला होता. आता आणखी काही वर्षे तरी ही जागा आणि ही वेळ त्या मुलीच्या विस्मरणात जाणं शक्य नाही. मात्र कधी कधी या गोष्टींचा त्रासही होतो. 

सोलापुरात व्हीआयपी रोडवर सात रस्त्या नजीक मुस्लिम कब्रस्तान आहे. तिथे मागे एका कौटुंबिक जिव्हाळ्याच्या व्यक्तीच्या तरुण पत्नीच्या अंतिम विदाईसाठी गेलो होतो. जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यानंतर महिन्यात तिचा मृत्यू झाला होता. तिच्या इंतकालची बातमी त्यानेच कळवली होती. दोन वर्षे वयाची जुळी मुलं मागे ठेवून ती निघून गेली. त्यादिवशी त्याच्या नजरेला नजर देता आली नाही. काळ पुढे जात राहिला. घटनेच्या दुसऱ्या वर्षी शब-ए- बारातला त्याने खूप आग्रह केल्याने जाऊन आलो तर त्याची मुलं थोडीशी मोठी वाटत होती नि ती त्या आईच्या कबरीला अगदी बिलगून बसली होती.

कबर तरी काय म्हणावी! मातीचा एक ढिगारा ज्याच्या चार दिशांना खुणा म्हणून काही दगड ठेवलेले. त्यावर फुलांची चादर अंथरलेली. एक रेशमी तलम वस्त्रही अंथरलेलं. त्यांचे नातलगही आले होते. ती लहानगी मुलं त्या मातीच्या ढिगाऱ्यात त्यांची आई शोधत असावीत! तिची ऊब अनुभवत असतील. तिला अम्मी अम्मी म्हणून हाका मारत असतील. इतर समवयीन मुलांच्या आईला पाहून त्यांना वाटत असेल की आपली अम्मीही असायला पाहिजे होती. त्यांची समजूत कोण आणि कशी घालणार? तिथून आल्यानंतर तो प्रसंग आणि ती मुलं बरेच दिवस डोळ्यापुढे तरळत राहिले.

यंदाच्या वर्षीच्या शब-ए-बारातसाठी आठवड्यापूर्वी मित्राने फोन केलेला. फोनवर जाणवत होतं की तो शोकाकुल झाला होता. त्याची अडचण विलक्षण होती. किती जरी झाले तरी कब्रस्तानच्या मूळच्या आरेखित जागेबाहेर जाऊन त्यात बदल होणं अशक्यच, म्हणजेच आहे त्याच जागेत दरवर्षी जितके म्हणून मयत येतील त्यांचे दफन करावेच लागते. असं करता करता जागा संपून जाते मग पुन्हा त्याच त्या जागी रोटेशन पद्धतीने दफनविधी केले जातात. यात अपवाद वगळता बहुतांश कबरीची माती विधिवत खालीवर करून त्यात नव्याने दुसऱ्याचे दफन केले जाते. मित्राच्या पत्नीची कबर आता लोप पावली होती. तिचे नामोनिशाण उरले नव्हते. मुलांना आता आईची ओढ लागली होती. त्यांना त्या जागी नेऊन निराश करणं त्याला झेपत नव्हतं. त्यांची आई जिथे निद्रिस्त झाली होती ती जागा त्यांच्या मनात कोरली गेली होती त्याचे आता काय करायचे हा त्याच्या पुढचा यक्षप्रश्न होता. त्याला सांगितलं की सर्व वास्तव त्यांना आहे असे सांग आणि प्रत्यक्ष नेऊनही दाखव. तिथली माती तरी असेलच, ती त्यांना पाहू देत!

त्यानंतर दोन दिवसांनी मित्र हिरमुसला होऊन सांगत होता की त्याच्या जुळ्या मुलांपैकी एकाने तिथली माती गुपचूप खिशात घालून आणली. नंतर घरी आल्यावर रुमालात बांधून ठेवली, ती माती आता त्याच्या दप्तरात असते! न जाणो उद्या मातीही नाहीशी झाली तर अम्मीला कुठे शोधायचे हा त्या लहानग्या जिवाला पडलेला प्रश्न! ऐकताना गलबलून आलं, काळीज डोळ्यातून वाहू लागलं!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा