शुक्रवार, २८ मार्च, २०२५

गावाकडचे उन्हाळ्यातले दिवस..


आमच्या भागात उन्हाळा संपेपर्यंत पारा आता चाळीस डिग्रीहून खाली येत नाही. आणखी अडीच महीने सूर्य आग ओकत राहतो. दुपारी रस्ते ओस पडतात. गावाकडे शेतशिवारं रखरखीत वाटू लागतात. ज्यांची बागायत असते तेही घायकुतीला येतात, काही तालेवार यातही हात मारतात! जिरायतवाल्यांच्या तोंडाचे पाणी पळते. रान भुसभुशीत होऊन जातं. खुरटी झुडपंही मान टाकतात. दूरवरच्या माळांनी सगळं गवत शुष्क पिवळं करडं होऊन जात. बांधावरच्या बोरी बाभळी मौन होतात. शेतांच्या कडेने असणाऱ्या वडाच्या झाडांपाशी सावल्यांची झिल्मील अव्याहत जारी राहते.

आओगे जब तुम साजना..


2007 साली 'जब वी मेट' हा सिनेमा आला होता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या प्रेमाची केमिस्ट्री त्यात जबर जमली होती. सिनेमा हिट झाला होता आणि गाणीही गाजली होती, बाकी गाण्यांच्या तुलनेत 'आओगे जब..' हे गाणं जास्त गाजलं नव्हतं; ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक! असो.
 
हे गाणं फर्माईश म्हणून अनेक प्रेमभंग झालेल्या तरुण पोरांनी गायला सांगितलेलं अजूनही पक्कं स्मरणात आहे. त्याहीआधी 1991 मध्ये नाना पाटेकर, डिम्पल, माधुरी यांच्या 'प्रहार'मध्ये शुभा गुर्टू यांनी गायलेली 'याद पिया की आये..' ही ठुमरी खूप जीव लावून ऐकलेली! तिच्याशी जसे एकरूप होता येत होतं तसेच 'आओगे जब तुम साजना'बाबतीत व्हायचे!

बुधवार, २६ मार्च, २०२५

एक दिवस शोषित जिवांच्या आनंदाचा!

'क्रांती महिला संघ' स्नेहमेळावा 

आपल्याकडे वेश्यांकडे अजूनही अत्यंत तिरस्काराने पाहिले जाते. समाज त्यांना आपला घटक मानत नाही हे वास्तव आहे. वेश्या म्हणजे किटाळ, नीच आणि व्यभिचारी स्त्रिया असंच मानलं जातं. मात्र त्याच बरोबरीने त्यांच्याकडे जाणाऱ्या म्हणजेच वेश्यागमन करणाऱ्या पुरुषांना समाज फारशी नावे ठेवताना दिसत नाही. जुगार खेळणाऱ्यास जुगारबाज म्हटले जाते, दारू पिणाऱ्यास दारूबाज म्हटले जाते परंतू वेश्येकडे जाणाऱ्यास रंडीबाज म्हटले जाते ही बाब आपल्याला खटकत नाही कारण अन्य वेळी व्यसनावरून नावे ठेवणारा समाज इथे मात्र त्या पुरुषाला नावं ठेवण्याऐवजी त्या स्त्रीलाच रंडी म्हणतो आणि तिच्याकडे येणाऱ्यास नाव ठेवताना तिलाच शिवी देऊन रंडीबाज म्हणतो! रंडी ही एक शिवी आहे जी समाज व्यभिचारी स्त्रियांना देतो, वास्तवात या बायका कुणाच्या घरी येऊन जोरजबरदस्ती करत नाहीत तरीही यांनाच नावे ठेवली जातात कारण आपल्या समाजात या स्त्रियांना छदामाचीही किंमत नाही. अशा समाजात एखादी तरुणी अक्षरश: क्रांती करावी तसे काम करते नि त्यांच्यात एकी घडवून आणते, त्यांच्या समस्यांसाठी लढते, अल्पवयीन मुलींना यातून बाहेर पडण्यास मदत करते, ज्यांच्या मुली मोठया आहेत त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करते नि या स्त्रियांच्या बेसिक गरजांसाठी संघटन उभं करते तेव्हा निश्चितच काही चांगल्या गोष्टी घडतात.

मंगळवार, २५ मार्च, २०२५

माती आठवणींच्या थडग्याची!


लिंगायत समाजाचा मित्र आहे. त्याच्या आईचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. विधिवत घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. मल्लिकार्जुन मंदिराला वळसा घालून अंतिम दर्शन घेऊन लिंगायत स्मशानभूमीत दाखल झाली. तिथं आधीच निर्धारीत केलेल्या जागी खड्डा खोदून ठेवला होता. अखेरचे विधी सुरु झाले नि मित्र कासावीस झाला. त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वडिलांच्या अपरोक्ष आईने लहानाचे मोठे केले होते. तिच्या परीने तिने सर्वोच्च योगदान दिले होते. तिचे आता कुठे सुखाचे दिवस आले होते नि ती चटका लावून निघून गेली. उमेदीच्या काळात आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मित्राचं लग्नही उशिरा झालं नि अपत्य व्हायलाही बराच वेळ लागला. परिणामी अंगणात सानुली पाऊलं खेळण्याची त्या वृद्ध माऊलीची इच्छाही विलक्षण लांबली. मित्राची मुलगी जस्ट पाच वर्षांची. तिची आणि आज्जीची दोस्ती जिवाशिवासारखी! आज्जी गेली नि ती पोरगी पार हबकून गेली. स्मशानभूमीत ती टक लावून म्हाताऱ्या शेवरीला पाहत होती! मांडी घालून बसलेल्या अवस्थेत त्यांना माती देण्यात आली. दफनविधी पूर्ण झाल्यानंतर सारे आप्त स्नेही पुन्हा कोपऱ्यातल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोळा झाले. तिथे महंत गुरव लोकांची काही बोलणी झाली. काहींनी श्रद्धांजली वाहिली. हे सर्व होत असताना त्या चिमुरड्या मुलीचे लक्ष आज्जीला जिथे दफन केलं होतं त्याच जागेकडे होते. खरेतर बहुतांश मंडळी इथे लहान मुलांना आणत नाहीत मात्र मित्राचं म्हणणं असं आलं की मुलीच्या मनात आज्जीच्या अंतिम स्मृती खोट्या वा लपवलेल्या स्थितीतल्या नसलेल्या बऱ्या, तिच्या आज्जीचा एकेकाळी शेतीवाडीवर फार जीव होता अखेर ती मातीतच विलीन झाली हे तिला कधीतरी योग्य पद्धतीने आकळण्यासाठी तिला तो तिथे घेऊन आला होता. आता आणखी काही वर्षे तरी ही जागा आणि ही वेळ त्या मुलीच्या विस्मरणात जाणं शक्य नाही. मात्र कधी कधी या गोष्टींचा त्रासही होतो. 

गुरुवार, २० मार्च, २०२५

होळी, प्रेमाला आसुसलेल्या जिवांची!

 

   

काल धुलिवंदनानिमित्त शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमातील कार्यक्रमास गेलो होतो. बऱ्याच मोठ्या संख्येत वयोवृद्ध तिथे वास्तव्यास आहेत. तिथल्या काहींची देहबोली अगदी हतबलतेची तर काही चेहरे पूर्णतः निर्विकार, टोटल ब्लॅंक! तर काही चेहऱ्यांवरती उसन्या अवसानाची ग्वाही देणारं केविलवाणं हास्य तर काही मात्र रसरशीत वार्धक्यास संघर्षासह सामोरे जाणारे नितांत प्रसन्न चेहरे! तरीही एकुणात ते सारे ओकेबोकेसे लोक ज्यांना त्यांच्याच कुणीतरी जिवलगाने तिथं भरती केलेलं कधी काळी. कुठल्या तरी दिवशी आणून सोडलं असेल.

साऱ्यांच्या चेहऱ्यांवर सुरकुत्यांची नक्षी होती, भाळीच्या आठ्यांचं जाळे कोरीव झालेलं. काहींच्या डोईची चांदी विरळ होऊ लागलेली तर काहींची नजर क्षीण झालेली तर काहींची नजर पैलतीरी लागलेली स्पष्ट दिसत होती. तर काहींची देहबोली अजूनही आव्हानांना छातीवर झेलणारी! काही कंबरेत वाकलेले तर काहींना पाठीवर पोक आलेला! अंगी जुनेच तरीही स्वच्छ कपडे. परिसरातही काटेकोर स्वच्छता आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग.

मंगळवार, ११ मार्च, २०२५

शौचालयाचे नागरिकशास्त्र!

समीरगायकवाड समीर गायकवाड
जगापुढे मान खाली घालावी लागणारी गोष्ट! 


शिकागोहून दिल्लीला नॉनस्टॉप येणारे एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरवावे लागल्याची लाजिरवाणी घटना काल उघडकीस आली. या विमानातील १२ टॉयलेट्सपैकी अकरा टॉयलेट्स / कमोड चोकअप झाल्याने विमान माघारी फिरवावे लागल्याने ही घटना अत्यंत लज्जास्पद म्हणावी लागेल. या टॉयलेट सीट्समध्ये प्रवाशांनी पॉलिथिन बॅग्ज, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरविअर्स आणि बॉटल्स टाकल्याचे उघड झालेय. या घटनेमुळे आपल्याकडील काही लोक एअरइंडियाला ट्रोल करत आहेत. खरेतर अपवाद वगळता समग्र भारतीय माणूसच यासाठी ट्रोल व्हायला हवा! कारण आपल्याकडील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स मधील टॉयलेट्स अत्यंत गलिच्छ घाण अवस्थेत असतात. चुकून कधी अशा ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तर केवळ दरवाजा उघडून पाहिला तरी माणूस ओकारी करेल असे दृश्य दिसते. इतकेच नव्हे तर अशा कमालीच्या घाणेरड्या ठिकाणी गेल्याची एक घृणास्पद स्मृती मनात अकारण ठासून राहते त्याचा पुनर्स्मरण देखील शरमेने मान खाली घालायला लावते!