शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...

गुरुवार, २८ जुलै, २०१६

वो शाम कुछ अजीब थी ....


'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं होतं गुलजारच्या 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध क्रिटीक्सने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात ? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्यावर प्रेम करते हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्यातून सावरण्यासाठी एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात त्याच्या मानसिक आजारातून बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया होती. हे कळल्यावर तिचं भावविश्व हरवून बसते. तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला आता तिच्या बरया होण्याची आस लागून राहते.

मंगळवार, २६ जुलै, २०१६

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....



आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय). 

मंगळवार, १९ जुलै, २०१६

निरभ्र ......



बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....

शनिवार, १६ जुलै, २०१६

बैलगाडीच्या रम्य वाटा .......



बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....

रविवार, ३ जुलै, २०१६

रमण राघव - मनोविकृतीचा अपुरा थरार...



हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अन् भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग.

त्याला जमीन, रस्ते सारं काही ह्या काळ्या रंगातच दिसतात. तो यातल्या फक्त काळ्या चौकोनांवरून चालतो ! त्याला वाटते की पांढऱ्यावरून चाललो की आपण आऊट ! मात्र या काळ्या पटातून चालताना मध्ये कुणी आडवा आला तर ? मग मात्र तो त्याचा अडथळा संपवतो पण काही केल्या पांढऱ्यात पाय ठेवत नाही. तो स्वतःला कधी रमण म्हणवतो तर कधी सिंधी दलवाई ! त्याचं रक्त आणि मेंदू कमालीचे थंड आहेत. लोक त्याला मानसिक संतुलन गमावलेला दुर्दैवी माणूस म्हणून बघतात अन् तो लोकांच्या आतड्या कातड्यात आरपार उतरत राहतो, खोल उतरत जातो, काळ्या पांढऱ्याचा खेळ खेळत राहतो. आड येणाऱ्या लोकांना थंड डोक्याने संपवत जातो. तो कुणालाही कसंही मारतो, त्याला त्याची ना खंत ना खेद. तो हे खून का करतो, हे देखील त्याला ठावूक नाही. त्याने सख्ख्या बहिणीवर देखील अत्याचार केलाय. तिचा सारा परिवार खलास केलाय.

शुक्रवार, १ जुलै, २०१६

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता



आई मी बचावलेय गं,
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला तू पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं,
माझं प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी
काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं,
वा ऑनर किलिंगसाठी मी कामी आले असते !

मात्र आता हरेक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडिलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर
माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच,
माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि
आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मी बचावलेय गं, आई मी बचावलेय गं
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

रेड लाईट डायरीज - 'रेड लाईट एरिया'तल्या मातीमोल मौती ....



काही महिन्यांपूर्वी कामाठीपुऱ्यातील एका प्रौढ वेश्येच्या करुण मृत्यूवर एक पोस्ट लिहिली होती. कालपरवा तिच्या मुलींबद्दलची माहिती मिळाली..
ती माहिती ऐकून वाटले की हे पहायला वा ऐकायला 'ती' आज हयात नाही हे बरे झाले कारण या घटनेने ती रोज तीळतीळ तुटत राहिली असती अन खंगून खंगून मेली असती...

ही सत्यघटना आहे मुमताजची..
एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची अन भारतमातेच्या एका निष्पाप मुलीची, कस्पटासमान जगून कुत्र्याच्या मौतीने मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची..

आपल्या देशात रोज लाखोने माणसे मारतात त्यामुळे कोण कुणासाठी मेले याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.

मरणारी व्यक्ती वर गेल्यावरदेखील कधी कधी तिचे कवीत्व दीर्घकाळ सुरु असते तर काही अभागी असेही असतात की मृत व्यक्तीच्या आसपासचे लोक त्या दुःखद वेळीही शय्यासोबतीत मश्गुल असतात !