शनिवार, २३ जून, २०१८

निर्वासितांच्या प्रश्नावरील विनाशकारी मौन..


यंदाच्या जूनमध्ये जागतिक स्थलांतरितांच्या विश्वात दोन महत्वाच्या घटना घडल्या. बेकायदेशीर मार्गाने युरोपात घुसखोरी करण्याच्या एका प्रयत्नांत स्थलांतरितांची एक बोट भूमध्य समुद्रात उलटली. त्यात जवळपास ५० लोकांना जलसमाधी मिळाली. त्यातील ४७ मृतदेह ट्युनेशीयाच्या किनाऱ्यावर आढळून आले आहेत. ६८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेतील सर्व मृत अस्थिर असलेल्या आखाती देशातील होते. बोटीत नेमके किती लोक होते याची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाही. या नंतरची दुसरी घटना जीवितहानीची नव्हती पण त्याने जगाचे लक्ष वेधले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आपल्या आईची झडती घेताना भेदरलेल्या अवस्थेतील रडणाऱ्या बालिकेच्या फोटोला जगभरातील माध्यमांनी प्रसिद्धी दिली. टर्कीच्या सीमेवर वाहत आलेल्या चिमुकल्या सिरीयन मुलाच्या मृतदेहाच्या फोटोने जगात जशी खळबळ उडवून दिली होती तशीच खळबळ याही घटनेने उडाली. या दोन घटनांमुळे जगभरातील स्थालांतरितांचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले. विशेष म्हणजे मागचं वर्ष याच मुद्द्यावर एक निराशाजनक नोंद करून गेलं. गतवर्षीची जगभरातील निर्वासितांची संख्या तब्बल सोळा दशलक्षाहून अधिक झाली. ही आकडेवारी जाहीर व्हायला आणि या दोन घटना एकाच वेळी समोर आल्याने यावर सुंदोपसुंदी सुरु झालीय.

मंगळवार, १२ जून, २०१८

जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !



#ओवी_गाथा - १०

"संगत करं नारी दुरल्या देशीच्या पकशा

खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकशा."

एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या 'दूर देशाच्या पक्षाचं' नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो !!
________________________________________

#ओवी_गाथा - ११


"गुणाच्या माणसा गुण केलेस माहेरी

धन्याची कोथिंबीर वास मळ्याच्या बाहेरी."

रानात धने पेरले तर त्याची कोथिंबीरच उगवते. रानात उगवलेली कोथिंबीर कितीही झाकून पाकून ठेवली तरी तिचा वास दूरवर जातो आणि माणूस लांबूनच ओळखतो की मळ्यात धनं पेरलंय. त्यासाठी कुणाच्या कानात सांगावं लागत नाही ते कळतंच. तसेच एखाद्या स्त्रीचे / पुरुषाचे लग्नाआधी काही गुण उधळून झाले असले तरी ते उघड होतातच. त्याचा दरवळ कधी ना कधी होतोच ...
________________________________________

#ओवी_गाथा - १२

"ऊठवळ नार बसती इथतिथ

भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"

संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
________________________________________

#ओवी_गाथा - १३

"पिकली पंढरी पंढरी, दिसते लई हिरवीगार

देवा इठ्ठालाच्या तुळशीला, सदाचाच बहर ....."
________________________________________

#ओवी_गाथा - १४

रुक्मिणीची चोळी, अभंगाने भरली दाट
देवा विठ्ठलाला जवा, लाविला हरिपाठ..
________________________________________

#ओवी_गाथा - १५

इंद्रायणीचा देवमासा, देहूला रे आला कसा
जात नव्हती माशाला, होता भक्तीचा वसा.
________________________________________

#ओवी_गाथा - १६

कुणबी निघालं शाहू, मला वांग्याचा तोडा
थोरलं माझं घर, मला येईना एक येढा,
काहूर नाही तरी, मनी आनंदाचा ओढा !

दैवाने काहीही सांगितले असले तरी माझे पती हे कुणबी निघाले. थोडक्यात माझ्या नशिबी कष्टच आलॆ. अशा वेळी धनी तरी काय करणार ? कधी चुकून दागिने मागितले तर जास्तीत जास्त तो वांग्याचा तोडा देईल. माझा पती घरातला सर्वात थोरला आहे म्हणून की काय त्याच्या वाट्याला कष्ट जास्ती आले आहेत, आम्ही नुसतेच श्रम करतो आहोत. अन आजतागायत त्याने मला सोन्याचा एक वेढा (सर) देखील दिलेला नाही. पण म्हणून काय मी नाखूष नाही, मी माझ्या संसारात सुखी आहे.
____________________________________

"लई चांगुलपण घेते पदराच्या आड
बाळायाची माझ्या सूर्यावाणी परभा पडं..'

माझे बाळ खूप लोभस आहे, खूप देखणे आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगी खूप सद्गुण आहेत. पण कधीकधी अति देखणं असणं किंवा चांगलं असणं अंगाशी येऊ शकतं म्हणून त्याला लोकांपासून वाचवण्यासाठी मी त्याला पदराआड घेते. पदराआड घेतले की तो छातीला बिलगून शांतपणे झोपी जातो. त्याला पदराआड ठेवल्याचे कुणाला कळलेही नसते पण तसे होत नाही. कारण माझ्या बाळाचं तेज इतकं आहे की त्याची प्रभा पदराआडून बाहेर येते आणि माझ्या सर्वांगावर विलसते....
_____________________________________
#ओवी_गाथा - १८

बाळाला म्हण बाळ बाळ दिसत बेगड

सांगते बाई तुला फुटली अंगणी दगड

काही बायका माझ्या बाळाच्या देखणेपणावर मत्सर भाव मनात राखून टोमणे मारतात. खरे तर त्यांना माझ्या बाळाचा चांगुलपणा, त्याचं कमालीचं सुंदर रुपडं सहन होत नसतं. त्या उद्विग्नतेतून त्या काहीबाही बोलत राहतात. मग एखादी माझ्या बाळाला बेगड (खोटं नाटं सौंदर्य) म्हणतात. पण काय सांगू तुम्हाला, तिने असं टोचून बोललेलं देवालाच सहन होत नाही. तिच्या बोलण्यावर तो नाराजी दाखवतो आणि तिचे बोलणे पूर्ण होते नाही होते तोवर अंगणातला मोठाला आपसूक दगड फुटतो. जणू काही तो तिला सांगतो की, 'बये, तोंड आवर, बाळाला नावं ठिवू नकासा'....

________________________________________
#ओवी_गाथा - १९

काजवे फुलले फुलले बाई लाख लाखाचं

सांगते बाई बाळायाच माझ्या मुख राजसाचं

माझ्या बाळाचे तेज कसे आहे म्हणून सांगू तुम्हाला ? त्याचा प्रकाश माझ्या मुखी पडतो हे तर मी सांगितलेच आहे. पण जगाला कसं सांगू की नेमका प्रकाश आहे तरी किती आणि कसा ? तर, सांगतेच. ऐका, माझ्या बाळाचा मुखडा खूप लोभस आहे. तो राजस आहे. त्याच्या तेजाची तुलना करायची झाली तर अंगणी लाख लाख काजवे प्रकाशमान झाल्यावर जितका उजेड पडेल तितकी आभा त्याच्या चेहऱ्याची आहे. मग माझे बाळ किती तेजस्वी आहे याचा तुम्हीच अंदाज घाला ...

___________________

#ओवी_गाथा - २१

बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया

वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या... 
______________________________

निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !

_______________________________
#ओवी_गाथा - २२
आली आगोटी रेटूनी घेते अधुली हातात
डेाई बियाची पाटी मैना जाती शेतात


मनासारखा पाऊस सगळीकडे झाला की बळीराजा पेरणीच्या कामांची घाई करतो. त्याची कारभारीण देखील त्याच्या हातात हात घालते. बळीराजा रामप्रहरीच उठून रानात जातो, त्याच्या मागोमाग त्याची कारभारीण देखील बेगीनं घरातली कामं आवरून जाते. घरातली कामं वेळेत पुरी करण्यासाठी ती दोघं लवकर उठलेली असतात. सकाळीच तिचा स्वयंपाक आटोपलेला असतो. मुलांच्या आंघोळी पांघोळी उरकून ती एका फडक्यात भाकरी गुंडाळून घेते, चुलीला नमस्कार करून तिच्या पोटातली आगटी आत सारते, समोर साठलेल्या राखेला मागे सारून त्यावर थोडं पाणी शिंपडते. स्वतःचं आवरून घेते आणि कोनाड्यात ठेवलेली अधुली (शेर, पायलीसारखे माप) हातात घेते. शेजाऱ्याला घराकडे लक्ष द्यायला सांगून डोक्यावर उतळी घेऊन ती शेताकडे झपाझप पावले टाकू लागते. तिच्या डोक्यावरच्या उतळीत (दुरडी / पाटी) पेरणीचं बियाणं आणि दुपारसाठीची भाकरी असते. वाटंनं येणाऱ्या जाणाऱ्याकडे न बघता ती तडक शेत गाठते आणि कारभाऱ्याला कामात मदत करू लागते. 
पावसानंतर पेरणीची लगबग सुरु होताच पूर्वी खेडोपाडी हे चित्र ठरलेले असे. आता काळ पुष्कळ बदललाय पण सुविधा आल्यात, शेतीची पद्धतही बदललीय पण त्या काळात जी अवीट गोडी होती ती या शेतीतही नाही, पिकातही नाही, गावकुसात नाही आणि आताच्या माणसांत तर नाहीच नाही. जात्यावरच्या या ओव्यातून गतकालीन स्मृतींना पुन्हा पुन्हा जगता येतं हे ही काही कमी सुख नाही ! होय ना ?
_________________________

#ओवी_गाथा २४ -

'आला आला रुखवत त्यात होता तवा; विहीणीनं पेटवली चूल, सरपणात चंदन जाळत हुतं तवा !'

या उखाण्यात चूल आहे ! तेंव्हा उखाण्यात अतिशोयक्ती असे. यांचं द्वंद्व चाले आणि जी हरत असे तिला आपल्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागे असा ग्रामीण भागात तेंव्हा रिवाज होता. अजूनही नाव घेण्याची प्रथा काही ठिकाणी आहे पण असा नखरेल मुकाबला आता होत नाही आणि आला आला रुखवताची जादूही उरली नाही. या उखाण्यातली विहिण सांगते की, कधी काळी व्याही खूप श्रीमंत होते, तेंव्हा चुलीत चंदन जाळलं जायचं, तेंव्हाच काय ते विहीणीने तेंव्हाच काय तो स्वयंपाक केला आहे. आताच्या काड्या काटक्यांच्या सरपणावर चूल पेटवताना तिची दमछाक होते ! ...
आता तो काळ निघून गेलाय. लग्न आकसत गेलीत, रुखवत मोडीत निघालेत आणि चूलही गेलीय. बदल चांगला असतो.

चुलीबद्दलच्या आठवणी काळजाला घर पाडणाऱ्या आहेत, एकदा जुन्या जखमांची खपली निघाली की त्यातून सावरायला खूप त्रास होतो. चुलीपुढे बसून धग लागल्यागत होते. स्मृतींचे सरपण धडाडून उठते आणि डोळ्यात गेलेल्या धुराने पाणी येण्याऐवजी फुकारी फुंकणारे तळहाताच्या रेषा झिजलेले निस्तेज मलूल हात आता उरले नाहीत या जाणीवांनी डोळे ओले होतात.

आज सोशल मीडिया 'चूलमय' झालाय पण आपल्या सासर माहेरच्या गतकाळातील बायकांनी काय काय सोसले असेल हे चुलीला जेव्हढे माहित असेल तेव्हढे कुणाच्याच बापजाद्यांनाही माहिती नसेल, कारण त्या काळातल्या बायका कुणापुढेच व्यक्त होत नव्हत्या, त्यासाठी त्या चूल पेटवायची वाट बघायच्या. चूल धडाडून पेटली की त्या उबेने त्यांना कधी बरे वाटायचे कारण मायेच्या उबेच्या त्या भुकेल्या असत तर कधी आवर्जून पश्चात्तापासाठी धग लागून घ्यायच्या. सर्वात महत्वाचे म्हणजे आर पेटण्याआधी जो धूर यायचा ना तेंव्हा या आयाबाया खूप रडून घ्यायच्या ! सर्वांना वाटे की धुरामुळे यांच्या डोळ्यात पाणी आलंय, मग चुलीलाच यांची दया यायची आणि ती आस्ते कदम जळत रहायची.

डोईवरचा पदर सावरत घामेजल्या अंगाने अन उपाशी पोटानं या मायमाऊल्या हात चालवायच्या. पेटलेलं सरपण चुलीला चटके द्यायचं आणि घरादारातल्या माणसांच वागणं या बायकांना चटके द्यायचं ! तरीही कुणीच तक्रार केली नाही. चुलीनेही नाही आणि त्या बायकांनीही नाही !

चुलीत घाला म्हणणे सोपे आहे पण त्या साठी आधी चुलीतलं जळणं जगलेलं असावं !
तो काळच भारलेला होता आणि त्यातली सच्चाई, साधेपणा मनाला भावणारा होता याची प्रचीती वरील ओव्यातून पुन्हा पुन्हा येते. 
_______________________________________     
दसरा, दिनांक - ०८/१०/१९
                                 
पहिल्या पंगतीला माझ महिरळ जेवू द्या
तुरण्याच्या दुरड्या इड पानाच येऊ द्या

पहिल्या दसऱ्याच्या दिवशी सुनेच्या माहेरची माणसं आलेली असतात, माहेरावरून आलेली मंडळी प्रवासाने दमलेली असतात. शिवाय त्यांना लगेच माघारी जायचं असतं. तेंव्हा ती सासुरवाशीण पोर तिच्या सासरच्या मंडळींना विनविते की जेवणाच्या पहिल्या पंगतीस माझ्या माहेरची मंडळी जेवू द्यात. दुरडयातली सामग्री आणि विडेही संगे घेऊन या. 

पुढच्या ओवीत ती म्हणते, 
थोरली जाऊबाई टाक पानात येलदोडा
बंधूच्या बरोबर पान खातो माझा चुडा 

आपल्या ज्येष्ठ जाऊबाईस ती सांगते की तिच्या पतीसाठी (ज्याला ही आपला भाऊ मानते) जो पानविडा बनवत आहे त्यात थोडेसे वेलदोडेही टाक कारण तुझ्या पतीसॊबत माझा पतीही (माझा चुडा) ते पान खाणार आहे. 

जेवणं उरकतात, तिच्या माहेरची मंडळी तिचा निरोप घेऊन निघतात. मग ती हळदओल्या अंगाची सून आपल्या पतीला आणि धाकट्या नणंदेला घेऊन शेतात जाते. कारण दसऱ्याचा सण असला तरी तिथेही औजारांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर उरलं सुरलं काम करायचं आहे. ते तिघं जण रानात जातात. औजारांची सफाई होते, पूजन होते मग तिचा नवरा कंबर कसून काम करतो. तोवर उन्हं कलायला येतात. दिवसभरच्या श्रमाने तिच्या गोऱ्यापान नवऱ्याचा रंग लालबुंद होऊन जातो. तो थकून जातो आणि बांधावर बसून थंड पाणी पिऊ लागतो, तेंव्हा तिची धाकटी नणंद हातातल्या पंख्याने वारा घालू लागते, यावर ती म्हणते -           
माझ्या चुड्याचं सोनं उन्हानं होता लाल
लाडाची नणंद कामीनी बाई वारा घालं 

ओव्यात जे स्नेह प्रेम, जी माया उत्कटता अनुभवता येते ती अन्य काव्यप्रकारात इतक्या आर्ततेनं क्वचित अनुभवास येते.


#ओवीगाथा  २५
___________________________________ 

पाभार बाईचा चाक जोड जाईचा
आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा

आजही बहुतांश भागात पाभर वापरून पेरणी केली जाते. जात्यावरच्या ओव्यात माझ्या मायमाऊल्या या पाभरीला बाईचं संबोधन देतात.       
पाभर स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून नव्हे तर माती ही आई आहे, तिच्या कुशीत बीज रोवण्याचं काम पाभर पार पाडते. 
एका अडलेल्या स्त्रीची सहज सुलभ प्रसूती एक निष्णात दाई अधिक चागल्या प्रकारे करू शकते कारण तिला त्यातले बारकावे आणि खाचाखोचा माहिती असतात, अगदी तसंच मातीच्या गर्भात बीज रोवताना तिची काळजीपूर्वक हाताळणी होणं हे मोठं कसबाचं काम आहे. 
म्हणून पाभरीला जात्यावरच्या ओवीत स्त्रीरूप दिलंय. 
पाभरीच्या तोंडापाशी चाकासारखं दिसणारं चाडं असतं ज्यातून मूठ मूठ दाणे टाकले जातात जे पाभरीच्या नळीतून फणावर येतात आणि मातीत विसावतात. दिंडावर पाय टाकून उभं असलं की पाभरीचे फण खोल रुतून असतात, रूमण्याचा आधार घेऊन बळीराजा दिंडावर उभा राहतो. बैलजोड पाभर ओढत जाते आणि बघता बघता वावर पेरून होतं.

ओवीतली ओळ अशी आहे की पाभार बाईचा चाक जोड जाईचा ! - म्हणजे काय ?
तर या पाभरीचं जे जाक जोड (चाडे) आहे ते जाईच्या लाकडापासूनचे आहे असं ती सांगते. आता जाईच्या लाकडाचे काय ते विशेषत्व ? 
खरे तर दिंड, फण आणि चाडे हे सगळेच बहुतांश करून बाभळीच्या लाकडापासून बनवले जाते. मात्र इथे ओवीत जात्यावर दळणारी माऊली जाईच्या लाकडाची गोष्ट करतेय. 
जाईच्या लाकडाचा पृष्ठभाग खरमरीत असला तरी कालांतराने ते मऊ होत जातं, नंतर त्याला एक विशिष्ठ गंध प्राप्त होतो. हा गंध त्या पेरणीतल्या बियांना लाभावा आणि पाभरबाईच्या हातांनी पेरलेलं बीज सुगंधित व्हावं !

ओवीत ती पुढे म्हणते की, आता माझ्या बाळा नंदी घरच्या गायीचा. 
जात्यावर भल्या सकाळी उठून धान्य दळताना आपल्या मुलाची थोरवी सांगतानाची ही ओवी आहे. 
माझ्या मुलाकडे आता जी बैलजोड आहे ती काही बाजारातून विकत आणलेली नसून घराच्या गायीच्या पोटी जन्मलेल्या गायीची तो वंश आहे असं ती मोठ्या खुबीने सांगते. याचा तिला कोण आनंद आहे !
पाभरबाई, चाक जोड जाई आणि गायी असं यमकही यात जुळवलं आहे. 
वरवर ही यमक जुळवणी वाटत असली तरी या ओवीला मातीचा अमीट सुगंध आहे जो आईच्या स्निग्ध मायेच्या तोडीचा आहे. 
कसलंही शालेय शिक्षण न झालेल्या माय माऊल्यांनी या अवीट गोडीच्या ओव्या कशा रचल्या असतील या कोड्याचे उत्तर काही केल्या सापडत नाही हे खरेच आहे.. 

#ओवीगाथा  २५
______________________________________

( मागील दोन वर्षात #_ओवीगाथा या tag मधून अनेक जुन्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून झालेत. याचे पुस्तक काढावे का, याचे पुस्तकरूप कुणी प्रकाशित करेल का आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचे वाचन होईल का या प्रश्नांवर थोडासा गोंधळून गेलोय. गावाकडच्या जात्यावरच्या ओव्या जात्या पाठोपाठ कालबाह्य झाल्या पण त्यातला अर्थ आणि गोडवा कधीच कालबाह्य न होणारा आहे. यामुळे या दुर्लक्षित विषयावरही बऱ्यापैकी लिहून झालंय. ही शब्दशिदोरी पुढे कशी पोहोचवायची याचे नेमके उत्तर मात्र माझ्याकडे नाही.)

सोमवार, ११ जून, २०१८

लालूप्रसाद यादव - बिहारी बाबूंचा जिव्हाळयाचा माणूस ...


वक्त का पता नही चलता अपनों के साथ,
पर अपनों का पता चलता हैं वक्त के साथ…

बिहारी जनता अजूनही लालूंवर प्रेम करते. 
हा माणूस सगळीकडे आपल्या बोलीत, आपल्या लेहजात बोलतो. साधं राहतो याचंसगळं दिनमान आपल्यासारखं आहे याचं बिहारच्या ग्रामीण जनतेस अजूनही अप्रूप आहे. बिहारी माणूस लालूंचा अजूनही पुरता द्वेष करत नाही, कुठे तरी सिम्पथी अजूनही आहे. लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ चा. आपल्या भावाबहिणींत सर्वात लहान असलेले लालू लहानपणीही गोलमटोल होते, यामुळेच घरच्यांनी त्यांचे नाव लालू ठेवले होते.

मंगळवार, ५ जून, २०१८

जुना पाऊस..


प्रत्येक पावसाळा तिची आठवण घेऊन येतोच.  
खिडकीतून दिसणारया शाममेघांत तिचा भास  होतोच......
"भिजलेली ती आणि तिला भिजवण्यात आनंद मानणारा रमत गमत पडणारा पाऊस. 
रुणझुणत्या पावसात छोट्याशा हातगाड्यावर सुगंधी चॉकलेटी वाफाळता चहा
पिताना तिच्या किनकिणाऱ्या बांगड्या, तिनें मान डोलवली की हेलकावे खाणाऱ्या इअररिंग्ज.
ओलेते कपडे नीटनेटके करताना कपाळावर पुढे येणाऱ्या कातिल बटा.

शनिवार, २ जून, २०१८

रक्त पेटवणारा कवी – नामदेव ढसाळ



विश्वाला कथित प्रकाशमान करणाऱ्या दांभिक सूर्याची खोट्या उपकाराची किरणे नाकारून आपल्या सळसळत्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात अगणित सुर्य प्रज्वलित करून क्रांतीची मशाल पेटवित सर्वत्र विद्रोहाची आग लावण्याची भाषा कुणी कवी जर करत असेल तर त्या कवीच्या धगधगत्या प्रतिभेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जातेच. अशा कवीची आणि त्याच्या कवितांची दखल घेणे अनिवार्य ठरते. किंबहुना कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही या उक्तीनुसार अशा कवितेस प्रस्थापितांनी डावं ठरवण्याचा यत्न केला तरी व्हायचा तो परिणाम होतोच. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातली 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.....' ही कविता असाच इतिहास मराठी साहित्यात घडवून गेली. या कवितेसकट समग्र 'गोलपिठा'वर आजवर अनेकांनी चिकित्सा, टीकासमीक्षा केली आहे. रसग्रहण केले आहे. तरीही व्यक्तीगणिक वैचारिक बदलानुसार त्यात नित्य नवे काहीतरी तत्व सत्व सापडतेच. त्यात ही छोटीशी भर ठरावी. विद्रोही कवितांचा विषय निघावा आणि कविवर्य नामदेव ढसाळांचा उल्लेख त्यात नसावा असं होऊ शकत नाही. ढसाळ हे या विद्रोही कवींचे शीर्षबिंदू ठरावेत आणि त्यांचा 'गोलपिठा' हा या कवितांचा प्रदिप्त ध्वजा ठरावा इतपत या विद्रोही काव्यात नामदेव ढसाळांच्या कवितेचा ठसा उमटला आहे.

दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....



'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'


काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली. 

गोष्ट आधार कार्डच्या मृत्यूची ...

अन्नावाचून मेलेली बुध्नी  

अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या व मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणारया 'द न्यूयॉर्कर' या नियतकालिकाच्या १६ मे च्या आवृत्तीत एक लेख प्रकाशित झालाय. 'हाऊ इंडियाज वेल्फेअर रिव्हॉल्युशन स्टार्व्हिंग सिटीझन्स' असे त्याचे शीर्षक आहे. यात झारखंडमधील उत्तम कुवर महतोच्या आईच्या मृत्युच्या घटनेचा हवाला देऊन अनेक गंभीर आरोप केले गेलेत. लेखातील काही बाजू महत्वाच्या आहेत पण लेखाचा मुख्य आधार असणारी घटना काही अंशी आपला रंग बदलत गेली. त्यामुळे यावर प्रकाश टाकणे हिताचे ठरते. भारतातील धान्य वितरण व्यवस्थेतील साठेबाजी, काळा बाजार आणि दडपशाही यावरही या लेखात प्रकाश टाकला गेलाय.