सुरुवातीला विरोध करणारी ताहिरा नंतर सरावली. जुन्या भाद्या बायकांनी तिला तिथली रीत समजावली. कालांतराने ती रुळली. तरीही ती काहीशी दक्ष असायची मात्र अरुण परदेशीकडे कॅशकाऊंटरवर बसणाऱ्या संदीप नावाच्या तरुणाच्या आणाभाकांना ती भुलली आणि गर्भार राहिली. पुढे व्हायचे तेच झाले.
काही महिन्यांनी त्याने पोबारा केला. तोवर हिने इकडे मुलीला जन्म देऊन ठेवला होता. ताहिराच्या या पोरीचं नाव होतं आयेशा. आपल्याला फसवलं हे ताहिराला काही महिन्यांनी कळालं. मात्र आयेशाला याची झळ बसू दिली नाही. तिच्यासाठी आपला पान्हाही आटू दिला नाही. मध्यमचणीची, ठसठशीत अंगाची, गव्हाळ रंगाची ताहिरा आयेशाच्या जन्मानंतर काहीशी संथ झाली. त्याचे चटके पोटाला बसू लागताच तिने मीराबाईला बोलावणं धाडलं. गल्लीतल्या इतर पोरांबरोबर आयेशा वाढत गेली. मीराबाईचा पेशाच होता पोरं सांभाळण्याचा. दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत सगळी चिल्लर तिच्यापाशी राही. 2006 मध्ये सडक दुर्घटनेत मीराबाई मरण पावली आणि ती सगळी पोरंबाळं खऱ्या अर्थानी अनाथ झाली. मीराबाईने त्यांना आपल्या छातीला लावलेलं नसलं तरी काळजाच्या तुकड्यागत माया केली होती. मीराबाईच्या मृत्यूनंतर ही घडी विस्कटली, पोरं मोकाट सुटली. एकीकडे त्यांच्या आया उताण्यापालथ्या होत होत्या तर दुसरीकडे ही पोरं छिलून निघत होती. यातच एक होता मणी. हा मणी म्हणजे शेजारच्या अस्लमच्या इमारतीतल्या पार्वथीचा मुलगा. मीराबाईपाशी एकत्र राहताना त्यांच्यात दोस्ताना झालेला. आता तो तोंडावरचं सवळ काढलेल्या खोंडासारखा बेफाम होता. त्याचं वय असावं नऊदहा वर्षाचं आणि आयेशा होती सात आठ वर्षांची.
लाकडाला भिरूड लागावं तसा तो आयेशाच्या मागोमाग राहू लागला. ताहीराला यात काही वावगं वाटलं नाही मात्र अधून मधून ती त्याला डाफरत राही. तिचा मूड खराब असला की हाकलून देई. तरीही तो तिथेच राही. आयेशाच्या ताटातला पाचुंदा खाऊन तिथंच मस्करी करत राही. 2007 च्या रणरणत्या उन्हाळ्यात एके दिवशी ताहिराकडे भर दुपारी कस्टमर आलेलं. दारू ढोसून गडी फुल्ल टाईट. चार तासाची बोली करून त्यानं तिला फळकुटाच्या खोलीत रेमटून नेली. हवी तशी कुस्करली. काही वेळानं ताहिराच्या शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये आयेशा आणि मणीचा धिंगाणा सुरु झाला. यमुनाबाईने दोनतीनदा त्यांना हाकलून लावलं तरी नजर चुकवून ते आत आलेले, बाहेर प्रचंड उन्हं होती आणि सावलीचा पत्ता नव्हता. काही वेळ टिवल्या बावल्या केल्यानंतर मणीने दरवाजा लावला आणि आत त्यांचा निराळाच रंग रंगू लागला. ताहिराला थोडासा अंदाज आल्यावर ती सावध होत अंगावरच्या कस्टमरला लोटून देऊन वेगाने बाहेर आली आणि एका लाथेत तिने शेजारचा दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून तिच्या काळजाचं पाणीपाणी झालं. त्या दोघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. संतापाने बेभान झालेल्या ताहिराने आयेशाला गुरासारखं मारलं. अक्षरशः तुडवून काढलं. मणीने कशीबशी सुटका करून घेतली आणि धूम ठोकली. कितीतरी वेळ ताहिरा आयेशाला तुडवत होती. शेवटी आयेशाच्या किंकाळ्या थांबल्या तेंव्हा ती थांबली, यमुनाबाईने मध्ये पडत तिला शांत केलं आणि आयेशाला उचलून कडेवर घेत आपल्या खोलीत नेलं. ताहिरा पुन्हा कस्टमरपाशी गेली आणि अनावृत्त झाली. थोड्या वेळाने तिच्या कंपार्टमेंटचा दरवाजा वाजला. तिने आतूनच विचारलं. बाहेर यमुनाबाई होती. उसनं हसू तोंडावर आणत ती ताहिराला सांगत होती, "चिंता नको करू रे ताहिरा बेटी.. तेरी आयेशा की नथ नही उतरी.. खुदा मेहेरबान है.. " तिचे उद्गार ऐकताच ताहिराने मोठमोठ्याने ओरडत आक्रोश करत छाती पिटून घ्यायला सुरुवात केली.
काही वर्षांनी तिची भेट झाल्यावर तिला नेमकं कशाचं दुःख झालं होतं हे सांगताना ती पुन्हा त्याच तीव्रतेने रडत होती, आपल्या मुलीचं बाईपणाचं सत्व शाबूत आहे याचं दुःख करावं की आनंद मानावा हे तिला उमगलं नव्हतं. मुलीशी अभद्र व्यवहार झाल्याचं दुःख कुणालाच झालं नव्हतं आणि आपलंच अनुकरण करून मुलीनं ते कृत्य केलं होतं यात नेमका दोष कुणाचा याचं उत्तर तिला गवसत नव्हतं. खरं तर त्याचं नेमकं उत्तर माझ्यापाशीही नव्हतं. मुकाट खाली मान घालून ऐकताना नकळत डोळ्यांचा कडा पाणावल्या. बाईपणाच्या सत्वाला तिने अंतःकरणापासून शिव्या दिल्या त्या ऐकताना भडभडून आलं. मुलं अनुकरणशील असतातच मात्र भवतालाचा आणि जन्मदात्यांचा अमीट प्रभाव त्यांच्यावर पडतो. यात काही कमनशिबी ठरतात तर काहींना हे विनासायास लाभते. आपण ज्या भवतालात राहतो तो आपल्याला निवडता येत नाही मात्र आपली जडणघडण बऱ्यापैकी त्यावरच अवलंबून असते ही किती दुःखद बाब आहे ना !
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा