शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

शैलेंद्र - एक सुरेल शोकांतिका

एका शापित राजहंसाची दास्तान..    


शैलेंद्र म्हटलं की त्यांची अप्रतिम अर्थपूर्ण गाणी आणि चटका लावणारी अकाली एक्झिट आठवते. वरवर भरजरी वाटणाऱ्या शैलेंद्रच्या आयुष्यास एक अधीर नि अखंडित वाहणारी कारुण्यकिनार होती जी क्वचितच समोर आली. खरं तर ही माहिती कमी लोकांपर्यंत सीमित राहिल्याने भारतीय समाजमनाला केवळ गीतकार शैलेंद्रच उमजले. त्या महान गीतकाराच्या उत्तुंग प्रतिमेखाली दफन झालेला एक पिचलेला, नाकारलेला, काळीजकोवळ्या हृदयाचा माणूस जगाला फारसा दिसलाच नाही. शैलेंद्रांच्या गाण्यात इतकं आर्त कारुण्य नि टोकदार वेदना का पाझरल्यात हे जाणून घ्यायचं असेल तर त्यांच्या जीवनातील काहीशा अपरिचित अशा पार्श्वभूमीचा धांडोळा घेणं गरजेचं आहे, निदान त्यांच्या या जन्म शताब्दी वर्षात तरी हे केलंच पाहिजे तरच अधिकाधिक लोकांपर्यंत एका नाकारलेल्या तरीही न हरलेल्या हळव्या दिलदार माणसाची दास्तान पोहोचेल.
त्यांच्या गीतांविषयी लिहिलंच पाहिजे मात्र त्यांच्या दमलेल्या, हिणवलेल्या आयुष्याविषयीही बोललं पाहिजे. त्यांच्या कारकिर्दीविषयीचं विपुल लेखन सहजी उपलब्ध आहे मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काळीजकथा तुलनेने कमी प्रकाशात आलीय. एखाद्याच्या आयुष्यात फरफट जितकी अधिक असते तितके त्यात अतिव कारुण्य असते, वेदना व्यथांचा सल असतो. मुळात जे जगाला उमजलेले नसतं ते कवीला आकळलेलं असतं. त्यात तो होरपळून निघालेला असेल तर त्याच्या रचनांत ती धग आपसूक प्रसवते. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि विख्यात गीतकार कवी शैलेंद्र हे याचे उत्तम उदाहरण ठरावेत.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

निळे घर ... – 'ब्ल्यू हाऊस' ए स्टोरी बाय इमॅन्यूएल एरेन


इमॅन्यूएल एरेनच्या काकांनी त्यांच्या आयुष्यातली ही हकीकत एरेनला सांगितलेली. अर्थार्जनासाठी त्यांना फ्रान्समध्ये खूप भटकंती केली होती. चाळीसेक वर्षांपूर्वी एका सफरीमध्ये ते दीजो जिल्ह्याजवळील ब्लेझी-बा या लहानग्या स्टेशनवर गेलेले. तिथे त्यांना निळ्या रंगात रंगलेलं एक सुंदर छोटंसं घर दिसलं. पाऊस आणि बर्फाच्या वादळामुळे घराचा निळा रंग काहीसा फिका झाला होता. पहिल्यांदा ते घर त्यांनी पाहिलं तेंव्हा घरासमोरील बागेत गुलाबी चेहऱ्याची एक दहाएक वर्षांची मुलगी बॉल खेळत होती. तिने पिवळा पोशाख घातला होता. तिचे रेशमी केस निळ्या रेशमी रिबनने बांधलेले होते. ती एखादी आनंदमूर्ती भासत होती. खरे तर त्या दिवशी सकाळी काकांना अस्वस्थ वाटत होते. खेरीज त्यांचा व्यवसायही यथातथाच असल्याने भविष्याच्या भीतीसह ते पॅरिसला परतत होते. मात्र या क्षणीच्या दृश्याने त्यांच्या मनातले द्वंद्व संपुष्टात आणलेलं. पळभर त्यांना वाटलं की अशा ठिकाणी राहणारी माणसं नक्कीच सुखी असतात कारण त्यांना कसलीही चिंता नसते, वेदना नसतात. आनंदमूर्ती असलेल्या त्या मुलीचा साधेपणा पाहून त्यांना हेवा वाटला. तिच्यासारखं आपलंही चिंतेचं ओझं उतरवता आलं तर काय बहार येईल या विचाराने ते रोमांचित झाले. क्षणात ट्रेन निघाली आणि तितक्यात कोणीतरी त्या निळ्या घराच्या खिडकीतून हाक मारली, "लॉरिन!"... आणि क्षणात ती मुलगी घरात गेली. लॉरीन ! हे नाव काकांना खूप गोड वाटलं. ते शांतपणे ट्रेनमध्ये बसून लॉरीन, तिचा चेंडू, ती बाग आणि ते निळे घर कल्पनाचक्षुंनी पाहू लागले. काळासोबत घर, बाग, चेंडू, लॉरिन हे सर्व अदृश्य होऊन त्यांच्या काळजात विलीन झाले. यानंतर खूप काळ तिकडे जाणे त्यांना जमले नाही.

बॉलिवूडमधल्या देशप्रेमाची ऐंशी वर्षे!


मागील दोन वर्षांपासून आपल्या देशात काही मोहिमा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणासाठी राबवल्या गेल्यात. त्यात छुपे अजेंडे आहेत आणि आर्थिक स्वार्थाचे गणितही आहे, वर्चस्वाच्या साठमारीतून अशा कैक मोहिमा राबवल्या गेल्यात. या मोहिमांसाठी सोशल मीडिआचा वापर शस्त्रासारखा केला गेलाय. त्यात आयटीसेलचं चाळीस पैशांवर राबणारं भाडोत्री पब्लिक मोठ्या संख्यने कामी आलंय. द्वेष, तिरस्कार पसरवणं आणि त्याआडून वर्चस्वाची खेळी खेळत सामान्यांना हिंसेच्या आगडोंबात ढकलून देणं हे यामागचं प्रयॊजन होतं नि आहे. या मोहिमांपैकीच एक मोहीम होती - '#बॉयकॉट बॉलिवूड!'

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

तर आपली मान झुकलेली राहील..



आपण जर शरद पवार यांचे समर्थक असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या भाजपचा कट्टर विरोध करतात त्यांच्या नेत्यांशी वेळ येताच युती कशी काय करतात?

आपण जर आशिष शेलार, फडणवीस यांचे चाहते असू तर आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की, आपले नेते ज्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांचा प्रचंड तिरस्कार करतात त्यांच्याशी आघाडी कशी काय करतात?

आपण शिंदे, ठाकरे वा गांधी नि आणखी कुणाचे जरी समर्थक असलो तरी आपल्या पक्षाने ज्यांना विरोध केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याविषयी आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत?
इथे मुद्दा एमसीएचा आहे त्यामुळे आपल्या चाणाक्ष नेत्यांचे उत्तर असते की आम्ही राजकारणातले विरोधक आहोत मात्र इथे खेळांत आम्ही मित्र आहोत!

मग एक सुजाण नि परिपक्व नागरिक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खेळात राजकारण्यांचे काय काम? त्यांना त्यांतले नेमके काय ज्ञान वा अनुभव याचा सवाल पडला पाहिजे!

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

अजूनही जिवंत आहेत रोमन साम्राज्यातील राजप्रवृत्ती!

काही माणसं अधुरी असतात, त्यांची पात्रता एक असते आणि भलतेच काम ते करत राहतात. त्यांच्या आवडत्या प्रांतात त्यांना स्पेस लाभत नाही, त्याहीपलीकडे जाऊन काहींच्या वाट्याला अधिकचे भोग येतात. त्यांच्या नावावर अशा काही विलक्षण नकोशा गॊष्टींची नोंद होते ज्यात त्यांचा महत्वाचा रोल नसतो! रोमन सम्राट टायबिरिअस हा अशांचा शिरोमणी ठरावा. पराक्रमी रोमन सम्राट ऑगस्ट्स आणि विकृत रोमन सम्राट कॅलिगुला या दोघांच्या मधला कार्यकाळ टायबिरिअसच्या वाट्याला आला.

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

श्रद्धा वालकरच्या निमित्ताने - मुलींना समजून घेतलेच पाहिजे!



श्रद्धा वालकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झालेय. त्याने मुंबईतील एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी घेतली. व्यवसायाने तो फूड ब्लॉगर आहे, तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवतो.
मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाशी भेट झाली. आरोपी आफताब हा श्रद्धा जिथे राहत होती त्याच परिसरात राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघांचे प्रेम झाले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

लोकसंस्कृतीचे परस्पर प्रेम - यात्रा आणि तमाशा


मराठी माणसाला मुळातच उत्सव आणि सणवारांचे अतिशय अप्रूप आहे. त्याच्या जोडीने हरेकाची कुलदैवते, ग्रामदैवते आणि कुळपुरूषांचे देवदेव इत्यादींचे सोहळे असतातच. याखेरीज विविध बुवा, महाराज, साधू बैरागी यांचेही उत्सव असतात, हे सर्व एकीकडे आणि गावोगावच्या यात्रा एकीकडे! यात्रा म्हटलं की गावाला नवं उधाण येतं, माणसं खडबडून कामाला लागतात आणि त्यांच्या जोडीला पंचक्रोशीतलं चराचर देखील कामाला लागतं. घरोघरी यात्रेचा खुमार वाढू लागतो.  साधारणतः यात्रांचेदेखील ठराविक मौसम असतात. मार्गशीर्ष संपून पौषाची चाहूल लागताच पाऊस आणि थंडी जोडीने येतात, हळूहळू पाऊस ओसरतो आणि थंडीचे साम्राज्य सुरू होते. याच हंगामात खेडोपाड्यांत जत्रा यात्रांचा मौसम  सुरु होतो. कुठे ग्रामदैवताची जत्रा भरते तर कुठे पीरबाबाचा उरूस भरतो. अद्यापही हे दोन्ही यात्रा उत्सव हिंदू मुस्लीम एकत्रितपणे साजरा करतात. कैक वर्षांपासून राज्यभरातील अनेक गावांत तशी परंपराच आता रूढ झाली आहे. आजकाल ज्या यात्रा साजऱ्या होतात त्यांचे स्वरूप आणि गतकाळातील स्वरूप यात प्रचंड फरक होता. गावकरी मंडळी आपआपल्या नातलगांना, पैपाहुण्यांना आवतण धाडतात. घरोघरी माणसांची लगबग वाढू लागते.  गल्ल्या माणसांनी फुलून जातात. फर्मास जेवणाचे बेत होतात, जेवणावळी होतात, पंगतीच्या पंगती उठतात. जिकडं तिकडं घमघमाट होतो. प्रत्यक्ष यात्रेच्या दिवसापर्यंत हा माहौल टिकून असतो. हे सर्व करण्यामागे भिन्न प्रकारच्या श्रद्धा असल्या तरी आजकाल आणखी एक कारण असते आणि ते म्हणजे यात्रांच्या निमित्ताने भेटी गाठी होतात सबब यात्रा जोरातच झाल्या पाहिजेत असा सूर सगळीकडे दिसतो. 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

नंदूची शाळा



प्राचार्य दत्तात्रेय कदम अत्यंत बेचैन होऊन एकसारखं मोबाईलवरून एक कॉल करत होते. पण फोन काही लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर एकदाचा त्यांचा फोन लागला. अधीर होऊन त्यांनी विचारलं, "काय साळे सर! केंव्हापासून प्रयत्न करतोय फोन लावायचा, पण काही केल्या कॉलच कनेक्ट होत नव्हता..."

त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत पलीकडून रामचंद्र साळे उद्गारले, "अहो सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे. गावाकडे आता दर सांजच्याला हा घोटाळा होतोय."

त्यांना थांबवत कदमांनी पुन्हा आपलं संभाषण जिथून तुटलं होतं तिथून सुरु केलं, "ते असू द्यात. मला सांगा नंदूचं काय झालं? भेटला का तो? त्याच्या घरी गेला होतात का तुम्ही? त्याचे आजोबा भेटले का? काय अडचण काही कळलं की नाही? शेवटी काय ठरलं त्यांचं?" कदमांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.

त्यांच्या प्रश्नांना दमाने घेत साळेंनी सगळी माहिती पुरवली. ती ऐकून कदमांचा चेहरा उतरला. ते उदास होऊन मटकन सोफ्यावर बसले आणि 'फोन ठेवतो साळे सर' म्हणत त्यांनी फोन कट केला.
इतक्या वेळापासून त्यांचं संभाषण ऐकत, त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असणारा त्यांचा मुलगा सिद्धार्थ गोंधळून गेला. त्याने वडिलांच्या जवळ जात विचारलं, "बाबा काय झालं? नंदूच्या शाळेचं काही कळलं का? तुम्ही इतके उदास का झाले?" आपल्या चिमुरड्या मुलाचे ते कोमल उद्गार ऐकून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. काही वेळ शांत राहून मग म्हणाले, "आता नंदूची शाळा बहुतेक कायमचीच बंद होणार की काय असे वाटू लागलेय."

टिकली, कुंकू आणि सुधा मूर्ती!



सुधा मूर्ती या विख्यात उद्योगपती नारायण मूर्तींच्या पत्नी आहेत. नारायण मूर्तींची 'इन्फोसिस' ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक दिग्गज रोजगार निर्मिक आहे. 'इन्फोसिस'च्या तगड्या सात आकडी पगाराचे अनेकांना आकर्षण असते.मध्यमवर्गास आर्थिक सुबत्ता, आयुष्यभर वंचित राहावं लागलेल्या ऐश आरामी जीवनशैलीचं अत्यंत तीव्र नि छुपं आकर्षण असतं. त्यामुळे नारायण मूर्ती आणि तत्सम लोक यांच्यासाठी अत्यंत प्रातःस्मरणीय आदर्श असतात. वास्तवात या दांपत्याने औद्योगिक जगतात जे करून दाखवले आहे त्याला तोड नाही. आयटी सेक्टरमध्ये इन्फोसिसचा दबदबा अजूनही कायम आहे. या बाबतीत मूर्ती दांपत्य निश्चितच कौतुकास पात्र आहेत, त्यांचे हे कार्य उत्तुंग पातळीवरचे आहे हे कुणीही मान्य करेल.        

सुधा मूर्तींच्या संवादात, भाषणात वा व्यक्त होण्यात एक उल्लेख नेहमी येतो. तो म्हणजे आपल्या पतीच्या उद्योगासाठी आपले दागिने विकण्याच्या घटनेचा. जोडीनेच पतीच्या मेहनतीस सकारात्मक साद दिली वगैरे वगैरे.

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२

विधवा स्त्री भारतमाता नसते का?



"विधवा स्त्री भारतमाता नसते.
विधवेने कुंकू लावू नये!"
किती गरळ आहे यांच्या मनात!

23 जानेवारी 1664 रोजी शहाजी राजे निवर्तले.
6 जून 1674 रोजी शिवबांचा शपथविधी झाला तेंव्हा जिजाऊ मां साहेब हयात होत्या. राज्याभिषेकानंतर अकराच दिवसांत त्यांचे दुःखद निधन झाले.
शहाजी राजांच्या मागे उर्वरित दहा वर्षात वा पुढच्या इतिहासात त्यांचं महत्त्व कमी झालं का?
कधीच नाही!

आपण अजून मागे जाऊ या.
दशरथ राजाची पत्नी कैकेयी हिच्या अट्टाहासापायी राम, सीता, लक्ष्मण वनवासाला गेले. पुत्रविरहाने दशरथ राजे व्याकुळ होऊन मरण पावले.
दशरथांच्या पश्चात कौशल्येस हीन लेखले गेले का?
नाही!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

जानकी के लिए ..

sameerbapu
जानकी के लिए..  

देह गतप्राण झलाय रावणाचा 
स्तब्ध झालीय लंका सारी
सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी
कुठे कसला उत्साह नाही
नाही तेवला दिवा कुणाच्या घरी
घर बिभिषणाचे वगळता!

समुद्र किनारी बसलेले विजयी राम
बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत
जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक
सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत
आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत
चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

तो रडला तेंव्हा.. @रॉजर फेडरर




आपल्याकडे एक समज आहे की फक्त लहानगी चिमुरडीच हमसून हमसून रडतात. बहुत करून मोठ्यांचं रडणं हे रुमालाने डोळ्यांच्या कडा पुसून घेणारं असतं वा एखाद्या दुसऱ्याचा आवेग जास्तीचा असेल तर एखादा हुंदका येतो नि कढ सरतात.मात्र परवा त्याला रडताना पाहिलं आणि नकळत मीही रडलो!इतकं काय होतं त्याच्या अश्रुंमध्ये? त्यातली सच्चाई, त्यातलं नितळ प्रेम, शालीनता, नम्रता आणि वात्सल्य हे सारं थेट मनाला भिडणारं होतं. होय मी रॉजर फेडररबद्दलच बोलतोय!

फेडररने त्याची निवृत्ती १५ सप्टेंबरलाच जाहीर केली होती. निवृत्तीविषयीच्या घोषणेचा त्याचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत जगभर व्हायरल झाला होता. आपल्या मोठेपणाचा कुठलाही अभिनिवेश त्यात जाणवत नव्हता. त्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नव्हता.

त्याची निवृत्ती रॉलें गॅरो वर किंवा विम्बल्डनसारख्या मोठ्या विख्यात मैदानांवर होईल असे वाटले होते. मात्र निवृत्तीसाठी त्याने निवडलेली स्पर्धाच मुळात तुलनेने काहीशा बारीक परिघाची होती!
रॉड लेव्हर कप स्पर्धेत त्याने निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.
चकचकाट आणि झगमगाट कमी असलेली ही स्पर्धा त्याने निवडली तेंव्हाच त्याचं हळवं मन ठळकपणे समोर आलं होतं. या स्पर्धेत जागतिक पातळीवरचे आताचे बिनीचे तरुण खेळाडू आणि आपला कट्टर पारंपारिक जुनाच प्रतिस्पर्धी हजर असणार होते.
शिवाय ज्या प्रेक्षकांनी त्याला दोन दशकाहुन अधिक काळासाठी सातत्याने पाठींबा दिला ते ही तिथं उपस्थित असणार होते.
याहून भारी गोष्ट त्याच्या अखेरच्या मॅचची आहे!

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

वो जो हम में तुम में क़रार था .. - मोमीनची भळभळती जखम




अनेकदा असे वाटते की अंतःकरणापासून लिहिलेल्या हरेक कवितेला, गझलेला एक पार्श्वभूमी असावी.
'वो जो हम हम में तुम में करार बाकी था..'या गझलेविषयी असेच काही वाटत आलेय.
ही गझल लिहिलीय मोमीन ख़ान मोमीन यांनी.
 
मोमीन यांचे वडील गुलाम नबी खान हे पेशाने हकीम होते. कोवळ्या वयातच मोमीनला आपल्या कौटुंबिक व्यवसायाचे बाळकडू मिळाले. तारुण्यात पदार्पण करताच त्यांनी आपला पारपांरिक पेशा स्वीकारला. मात्र त्यांचे मन त्यात लागत नव्हते.
तो काळ ग़ालिब आणि ज़ौक़ यांचा होता. युवा मोमीनचे मन त्यांच्या शायरीकडे ओढ घेई. त्याचा ओढा कवितेकडे अधिक होता.
अस्सल प्रेम अनुभवल्याशिवाय वा प्रेमात धोका खाल्ल्याशिवाय शायरीला खऱ्या अर्थाने वजन प्राप्त होत नाही असं आजही मानलं जातं. मोमीनच्या मनातले प्रेमपाखरू भिरभिरण्याआधीच त्यांचा निकाह झाला.

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२

देश म्हणजे कागदाचा नकाशा नसतो - देश कागज पर बना नक्शा नहीं होता



जर तुमच्या घराच्याएका खोलीत आग लागली असेल
तर तुम्ही दुसऱ्या खोलीत झोपू शकता का?
जर तुमच्या घराच्या
एका खोलीत प्रेतं
सडत असतील
तरी ही तुम्ही
दुसऱ्या खोलीत प्रार्थना करू शकता का?
जर उत्तर होय असेल
तर मला तुमच्याशी
काही बोलायचे नाही.

देश म्हणजे कागदावर बनवलेला
नकाशा नसतो
ज्यातला एक भाग फाटला गेला तरी
बाकी भाग तसेच शाबूत राहतील
आणि नद्या, पर्वत, शहर, गाव
पूर्ववत आपल्याच जागी दिसतील
खिन्न नसतील.
जर तुम्ही असं मानत नसाल
तर मला तुमच्या सोबत
राहायचे नाही.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

दिखाई दिये यूं कि बेखुद किया - 'बाजार'च्या काही नोंदी

काही इच्छा असतात अर्ध्या राहिलेल्या, काही व्यथा असतात ज्यांना कुणी जाणलेलं नसतं. काही चेहरे असतात ज्यांना कुणी वाचलेलं नसतं, काही पुस्तके अशीच मिटलेली राहून जातात ज्यांची पाने कुणी उघडलेलीच नसतात आणि काही स्वप्ने असतात आयुष्याच्या अर्ध्यामुर्ध्या टप्प्यावर अवेळी आलेल्या पावसातल्या पाण्यात कागदी नावेबरोबर सोडून दिलेली!

हरेकाच्या आयुष्यात खूप काही निसटून गेलेलं असतं, आयुष्य संपत आलं तरी जगणं खऱ्या अर्थाने बरंचसं बाकी असतं!

साधीसुधी माणसं कथाविषय होती. त्यांचे सरळसाधे गुंते होते. निरलस मने आणि नितळ संघर्ष. लेपविरहित चेहरे, ओढाळ गाणी. शांत रात्री नि बेजान दिवस यांचं कॉम्बीनेशन असणारी तरल आयुष्ये. डामडौल नसणारा भवताल आणि डोळ्यांची भाषा बोलणारी कॅरेक्टर्स, न कसला कोलाहल ना कुठला प्रबोधनाचा बाज, सरळसुबक मांडणी! यांची गुंफण असणाऱ्या निव्वळ सरस जीवनकथा! केवळ उत्तुंग हिमशिखरांना पाहूनच छाती भरून येते असं काही नसतं काही गवताची पातीही अशी टोकदार नि चिवट असतात की त्यांनीही मन भरून येतं.

अभिव्यक्तीचे विद्रुपीकरण करणारे 'अनसोशल' अल्गोरिदम...

इथे सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱ्या मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षात अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. तुम्हीदेखील केवळ नि केवळ राजकीय भूमिका इथे मांडत असाल वा तुमच्या मित्रयादीत केवळ राजकीय पालख्या उचलणारे भोई असतील तर तुम्ही हे वाचावं.

इथं सोशल मीडियावर राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की फेसबुकच्या अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडी निवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्यसंस्कृती, वस्त्रांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱ्या नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम फेसबुक करते.

सोशल मीडिया, वाचन आणि पुस्तकांचा खप - नवे परस्परावलंबी सूत्र

या विषयावर बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरील पुस्तक विषयक चर्चा वा पुस्तकांच्या अनुषंगाने इथे होणारा लेखन संवाद यांना केंद्रस्थानी ठेऊन काही निष्कर्ष वा मते मांडली आहेत. तर काहींनी इथे कोणत्या पद्धतीचे वाचन जास्त पसंत केले जाते, कोणत्या लेखन शैलीकडे युजर्सचा कल आहे, सोशलमीडिया युजर्स कोणत्या लेखकांना अधिक पसंत करतात वा कोणत्या लेखकांवर / पुस्तकांवर बोलतात, कुठल्या कालखंडातील पुस्तके अजूनही वाचली जातात, कोणत्या लेखकांचा साधा नामोल्लेखही होत नाही वा कोणत्या वर्गवारीतील पुस्तकांविषयी किमान चर्चा देखील केली जात नाही इत्यादी मुद्द्यांवर मत प्रकटन केलं आहे.

*** *****

सोशल मीडियापैकी फेसबुक हे अन्य प्लॅटफॉर्म्सपैकी काहीसे अधिक लेखनविस्तृत माध्यम आहे. तुलनेने इन्स्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन इथे लेखनासाठी कमी स्पेस आहे. त्यामुळे सदर पोस्टकर्त्यांनी सोशल मीडियावरील चर्चा वा इथल्या पोस्ट्समधील सूर याविषयी निष्कर्ष मांडताना फेसबुक याच माध्यमाचा मुख्यत्वे विचार केला असावा असे मी गृहीत धरतो. याबाबतचे काही बिंदू लक्षात घेणं अनिवार्य आहे ज्यान्वये काहीसे नेमके अंदाज व्यक्त करता येतील.

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

भितीवर विजय - 'द कराटे किड'चे सार



'द कराटे किड' २०१० मध्ये रिलीज झाला होता. त्याने तिकीटबारीवर तुफान टांकसाळ खोलली. जॅकी चेन आणि जेडन स्मिथच्या मुख्य भूमिका त्यात होत्या.
एका शाळकरी मुलाचं भावविश्व त्यात अत्यंत भेदक पद्धतीने साकारलं होतं.

कोवळया ड्रे पार्करच्या विधवा आईची शेरीची कार कंपनीत बदली होते.
ती डेट्रॉईटवरून थेट चीनमध्ये दाखल होते.
खरे तर ड्रे पार्कर डेट्रॉईटमध्येच झळाळून उठला असता, पण तसे घडत नाही.
चीनमध्ये आल्यानंतर त्याला त्याच्या वेगळेपणाचं, बॉडी शेमिंगचं शिकार व्हावं लागतं.

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

'तो' अखेरचा माणूस मेला तेंव्हा..


मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही वा त्याच्याविषयी त्रोटक माहितीशिवाय काहीच ठाऊक नाही. तरीही तो मरण पावल्याची बातमी ऐकून खूप अस्वस्थ वाटलं.त्याच्या मृतदेहापाशी एका ब्राझीलियन पक्षाचे पंख आढळलेत, कदाचित आपला इथला प्रवास संपला असल्याची जाणीव त्याला झाली असावी.
ते पंख त्याला कुठे घेऊन जाणार होते हे त्यालाच ठाऊक असावे!
की त्याला ते पंख कुणाला द्यायचे होते?
की त्या पंखांना आपल्या अंतिम क्षणांचे साक्षीदार म्हणून त्यानं सोबत ठेवलं असावं?
काय वाटलं असेल त्याला एकट्याने मरताना?

शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२

जेंव्हा मृत्यू हवा असतो..

एक असतो मृत्यूदूत. त्याचं काम असतं जीवांना मृत्यू बहाल करण्याचं.


तो फिरतो जंगलांतून, माळांमधून. असो ससा की असो गरुड, कोल्हा वा कुणी वन्य जीव.
हरेकास त्याच्या नुसत्या स्पर्शाने यायचा मृत्यू.
एकदा त्याच्या मोहिमेवर असताना दिसतं त्याला एक कोवळं देखणं तरतरीत हरीण. तो जातॊ हरिणापाशी त्याला स्पर्श करण्यास.
कसा कुणास ठाऊक पण हरणास लागतो सुगावा मृत्यूदूताच्या हेतूचा, तो जवळ येण्याआधीच सावध होतं हरीण.
त्याच्याकडे नजर देत पाहतं, क्षणेक थबकून उभं राहतं नि धूम ठोकून पळून जातं.

त्याच्या डोळ्यातली जगण्याची आशा नि मृत्यूची भीती पाहून मृत्यूदूतास येते निराशा. तो पाहू लागतो स्वतःच्याच हातांकडे.
आपण इतके कसे वाईट आहोत मनी येतो विचार त्याच्या.
न राहवून तो हरणाच्या दिशेने उडत जातो माग काढत. हरीण गेलेलं असतं त्याच्या कळपात हुंदडायला.
दुरून त्याला पाहताना मृत्यूदूताचा हात लागतो झाडांच्या पानांना, पाने जातात करपून सुकून!
वाईट वाटते मृत्यूदूताला.
तो तिथेच राहतो रेंगाळून.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

तू कायम जिवंत असशील!

मुंबईत तुला भेटायला आलेलो तर
तू निघून गेलेली.
मध्ये एकदा तू भलतीकडेच भेटलीस
विलक्षण म्लान थकलेली,
तू नाव बदलले होतेस.
 
खरे सांगायचे म्हटलं तर
तू पुरती संपत आलेली..
माझा पडेल चेहरा पाहून
डोळ्यातलं पाणी लपवत म्हणालीस
इट्स ओके,
आणखी काही दिवस तरी असेन ना..
 
खूप दिवस झाले या भेटीला
पुन्हा तुझी चौकशी नाही केली मी
 
निदान माझ्या स्मृतीत तरी तू कायम जिवंत असशील!

- समीर गायकवाड.

❤🤎🖤

कवितेच्या नोंदी - 

काही शोध न संपलेलेच बरे असतात. शोध पुरे होतात आणि शोकाच्या डागण्या कायमस्वरूपी राहतात.
आपलं जीवश्च कंठश्च माणूस मरणपंथाला लागलेलं असतं. आपण असहाय असतो, त्याच्यासाठी काही करावं असं वाटत असतं मात्र तो जीव दुनियेच्या गर्दीत नाहीसा होतो. मग कुठे जरी चौकशी केली तरी ती वाईट बातमीच कळणार असते, अशा वेळी विचारपूस न केलेली बरी, निदान ते जीवाचं माणूस आपल्या विश्वात तरी सचेत असतं. सगळ्याच जिवाची किंमत सर्वांनाच नसते!

खऱ्या घटनेत न राहवून तिची चौकशी केली तर सारं संपलेलं होतं. हैदराबादला तिचा ठावठिकाणा असल्याचं कळलेलं. तिथेही तिने नाव बदललं होतं, त्याच्यासाठी! तिचा मृत्यू होऊन दीडेक वर्ष झालेलं. हा तिथे गेला, तिची कबर तरी पाहता येईल म्हणून कबरस्तानमध्येही गेला. मात्र तिथे नुकतीच माती खालीवर केलेली. आपल्याला दहन केलं तर आपल्या अस्थीदेखील कुठे तरी विसर्जित केल्या जातील म्हणून तिने नाव बदललेलं. शेवटी तिच्या अस्थीदेखील मिळाल्या नाहीत. असहाय अवस्थेत आलेलं बेवारसासारखं मरण कवटाळून ती गेली. मृत्यूआधी तीन आठवडे निपचित पडून होती मात्र अखेरच्या क्षणी पूर्ण ताकद एकवटून तिने याचंच नाव घेतलेलं. मग दोन आचके नि खेळ खल्लास. आता त्याला वाटतं की तिची विचारपूस केली नसती तर बरे झाले असते. काही दुःखे काळजात खोल खोल रुततात!

आपल्या सर्वांना निदान रक्ताची माणसं, मित्र, नातलग तरी असतात मात्र ज्यांचं कुणीच नसतं त्यांच्यातलं कुणी असं मरणपंथाला लागल्यावर त्या व्यक्तीच्या मनात गतकाळात आयुष्यात येऊन गेलेल्या माणसांच्या भेटीची अनिवार इच्छा असते, किमान एक क्षणतरी हव्याशा व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःला पाहावं आणि मग श्वास सोडावेत असं वाटत असतं. ही तगमग मी पाहिलीय. खोटं बोलून आपणच तिच्या हातात हात द्यायचा, ग्लानीत असणाऱ्या जीवाला वाटतं 'तो'च आलाय! मग त्या जिवाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहू लागतात आणि काही क्षणातच तो जीव हे जग सोडून गेलेला असतो, मरतुकड्या अशक्त हातात आपला हात घट्ट धरून! अशांचे मरणसोहळे होत नाहीत नि त्यांच्यासाठी कुणी रडत नाही. मग घट्ट धरलेल्या हाताचे ठसे अनेक वर्ष आपल्याला एकट्यालाच दिसत असतात! हे फार भीषण दुःखद असतं!

आजाराने ग्रासलेल्या एखाद्या अश्राप जीवाच्या अकाली जाण्याची बातमी आपल्या कानी येऊ नये अशीच बहुतेकांची इच्छा असते. तिकडून एखादा फोन आला तरी तो घ्यावा वाटत नाही. मेसेज आला तर वाचला जात नाही. एखाद्याचं असणं आधारदायी असतं, आजारी असलं म्हणून काय झालं आपलं माणूस हयात आहे याचंही एक सुख असतं. त्यातलीच ही एक चटका लावून गेलेली एक्झिट, जिचा मी कधीच सामना करु शकलो नाही...

गुरुवार, २१ जुलै, २०२२

आखरी ख्वाहिश..

नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!

एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.

मंगळवार, १२ जुलै, २०२२

शिंजो आबे यांची हत्या आणि चीन जपान वैमनस्य ..

नुकतेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरात याचे तीव्र पडसाद 
उमटले. हेच चित्र सर्वत्र दिसले अपवाद होता चीनचा! आबेंच्या हत्येनंतर चीनी सोशल मीडियावर अक्षरशः दिवाळी साजरी केली गेली. 'वन प्लेट मोअर राईस' असं म्हणत चिन्यांनी वाढीव कल्ला केला. चिनी इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी आबेंचा मारेकरी यामागामीचा गौरव करत त्याला हिरो म्हटलंय. जगभरातल्या माध्यमांनी चिनी विकृतीची दखल घेतली. खुद्द चीनने मात्र याविषयी ठोस भूमिका न घेता लोकभावनांना एकप्रकारे मूक संमतीच दिली. अनेकांनी चिनी मानसिकतेमागची कारणमीमांसा मांडली. त्यांचा सूर असा होता की, शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. आबेंच्या पुढाकाराने चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा समूह सुरु झाल्यावर चीनचा तिळपापड झाला होता. आबेंनी चीनच्या महत्वाकांक्षी 'ओबोर' या बहुराष्ट्रीय रस्ते प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यामूळे आबे चिन्यांच्या डोळ्यात सलत होते. वास्तवात चीन जपानमधलं वैमनस्य अधिक गहिरं, जुनं नि कडवट आहे ज्याबद्दल भारतीय माध्यमे क्वचित लिहितात. अशी मांडणी अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेण्यासारखे असले तरी हा इतिहास आहे जो बदलता येणार नाही.

रविवार, १० जुलै, २०२२

बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.

गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !

मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

रविवार, २६ जून, २०२२

खऱ्या समानतेच्या शोधात..


'जातीसाठी माती खावी' किंवा 'जात नाही ती जात' ह्या आपल्याकडच्या पॉप्युलर टॅगलाईन्स आहेत. एकीकडे सातत्याने जातीयवादाविरुद्ध कंठशोष करायचा आणि त्याचवेळी हस्ते परहस्ते आपल्या जातीच्या 'अहं'ला गोंजारत रहायचं ही भारतीय माणसाची खासियत बनून गेलीय. सद्यकाळात आपले विचार आपल्या व्यक्तीमत्वाइतके दुभंगत चाललेत हे कटूसत्य आहे, गतशतकातली जातीनिर्मूलनाची साधीसोपी चळवळ आपण पूर्णतः स्वीकारू शकलो नाही हे वास्तव आहे. मागील आठ शतकांत अगदी संतपरंपरेपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंत अनेकांनी यावर प्रबोधन केले आहे मात्र आपल्यावर त्याचा परिणाम शून्य झालाय. गत शतकात वा अगदी या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत लोकांच्या वागणुकीत जातीयता स्पष्ट दिसून यायची, त्यावर प्रहार करणं सोपं असायचं. लोक याची दखल घेत असत, अगदी राजसत्तेपासून ते मीडियापर्यंत याची नोंद घेतली जायची. परिणामी जे जातीभेद करत असत ते अगदी उघडे पडत असत, अशांची बाजू घ्यायला फार कुणी पुढे येत नसत. अर्थातच अशांना समर्थन देण्याची खुमखुमी काहींच्या ठायी असायची मात्र लोकलज्जेस्तव तसेच वाढत्या सामाजिक दबावापुढे असे लोक वचकून राहत आणि जातीभेद करणाऱ्याला खुले समर्थन मिळत नसे.

मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.

मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

'अल-अक्सा'च्या संघर्षाची रक्तरंजित पार्श्वभूमी...


‘अल-अक्सा’ मस्जिदीवरून उद्भवलेला संघर्ष जाणून घेण्याआधी तिथला इतिहास जाणून घेणं अनिवार्य आहे. या भूमीचा इतिहास सांगतो की ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. गत दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी ज्यू ! सद्यकाळी ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात नित्य चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. मुस्लिमांनी ज्यूंना कधीकाळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका ठाशीव आकृतीबंधातून आकारास आली होती. तर इस्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिकने (आताचे ईजिप्त, सीरिया आणि जॉर्डन) कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी



अलेक्झांडर पुश्किन

अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

पन्नाशी पार केलेल्या 'पिंजऱ्या'च्या काही नोंदी -


आमच्या इकडे 'पिंजरा' हा एक कोडवर्ड आहे.थेट कर्नाटकमधील गुलबर्ग्यापासून ते पुणे जिल्ह्यातील चौफुल्यापर्यंत आणि बसवकल्याणपासून ते थेट नगर जिल्ह्यातल्या राहुरीपर्यंत आणि इकडे शेजारी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात देखील सढळ हाताने याचा वापर होतो.

रिकाम्या पिशवीची घडी घालून दुमडून हाती घेऊन एकट्या दुकट्याने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या महिला सर्रास दिसतात. हायवेवर ढाब्याजवळ या अधिक दिसतात. भिरभिरत्या नजरेने या रस्त्याकाठी उभ्या असतात. यांना 'नेमकं' ओळखून एखादं वाहन थांबलं की या पुढे होतात. वाहनचालकाशी वा आतील इसमांशी त्यांचं बोलणं होतं. डील झाली की ती बाई त्या वाहनात बसून निघून जाते.
कधी कधी बोलणं फिसकटतं, कधी बोलणं होतच नाही मग उन्हे उतरल्यावर त्या माघारी फिरतात.
वाहनासोबत गेलेली बाई रात्री बऱ्याच उशिरा वा दुसऱ्या दिवशी तिच्या घरी परतते. हायवेवरचं लोअर ग्रेड ट्रॅफिक या बायकांना 'पिंजरा' म्हणतं !
'डायवर' 'किन्नर' यांच्या देहाची आग शमवणारा 'पिंजरा' !

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

राजपक्षे प्रायव्हेट लिमिटेड'स् श्रीलंका !


आपल्या देशाच्या शेजारील काही देशांत बऱ्याच दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे लोकनियुक्त सरकार उलथवून तिथे लष्कराने कमांड सांभाळलीय. बांग्लादेशमध्ये हिंसक कारवायांना ऊत आलाय, नेपाळमधील राजकीय अस्थिरता कधीही देशाला गर्तेत नेऊ शकते, मालदीवमधले संकट काहीसे निवळताना दिसतेय तर पाकिस्तानमध्ये अकस्मात सत्तांतर झालेय आणि श्रीलंकेमधील विविध स्तरावरची अनागोंदी दिवसागणिक वाढतेय. याचे परिणाम दक्षिण आशियाई देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्तरांवर होणार आहेत. चीनसह अमेरिकेचेही या भूभागावर लक्ष असल्याने इथल्या अस्थिरतेला खूप महत्व आहे. पाकिस्तानमधली समस्या जुनाट व्याधीसारखी आहे ती सातत्याने अधूनमधून तोंड वर करते, तिथे लोकशाही नावालाच आहे प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप ठरलेला आहे. अन्य देशांतली स्थिती आगामी काळात पूर्वपदावर येईल, अपवाद श्रीलंकेचा आहे ! कारण इथले संकट न भूतो न भविष्यती असे आहे. जगभरातील आर्थिक राजकीय घडामोडींवर 'इकॉनॉमिस्ट'मध्ये काय भाष्य केले गेलेय हे पाहून आपली विचारधारा ठरवणारे देश आहेत यावरून या नियतकालिकामधील मांडणीचे महत्व कळावे. यंदाच्या इकॉनॉमिस्ट'च्या आवृत्तीत आशिया विभागात श्रीलंकेवर जळजळीत लेख प्रकाशित झालाय ; हे संकट राजकीय, मानवनिर्मित असल्याचे ताशेरे त्यात ओढलेत.

बुधवार, ३० मार्च, २०२२

एक देश ..आनंदाच्या शोधात !


‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...’ जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग ठाऊक नसेल असा रसिक, भाविक मराठी माणूस नसेल. आनंदाचं इतकं श्रेष्ठ वर्णन, इतकी सुंदर व्याख्या खचितच कुणी केली असेल. तुकोबांना जो आनंद अभिप्रेत आहे तो अंतर्मनाचा आहे. या अनुभूतीसाठी आपण आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोह व्हायचं म्हणजे त्यात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. यातून जे काही सुख लाभतेय ते काहीच्या बाही अफाट आहे. त्याचे कसे वर्णन करता येईल ? कारण ब्रम्हानंदाच्या ओढीने इतर लोभ लोप पावतात. पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. आनंदानुभवाचा ठसा अंत:करणात उमटायला पाहिजे मग तो वाणीद्वारे प्रकट होतोच ! आनंदाचे हे सूत्र त्रिकालाबाधित आहे.

"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे" बालकवींच्या या कवितेविषयी अखिल मराठी जनमानसात अपार प्रेम आहे. आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी अगदी ताल लावून ही कविता कधीतरी म्हणवून घेतलेली असतेच. किशोरवयात गायलेले बडबडगीत 'चला चला, गाऊ चला आनंदाचे गाणे !' हे आपल्या सर्वांच्या आनंदी बाल्यावस्थेचे साक्षीदार आहे. म्हणजेच आनंदी असण्याचे वा राहण्याचे संस्कार शिशुअवस्थेतील बडबडगीतापासून ते थेट पोक्तपणी येणाऱ्या विरक्तिअवस्थेपर्यंत संतांच्या अभंगांपर्यंतच्या रचनांमधून झाले आहेत. इतकेच नव्हे तर फिल्मी गांधीगिरी करणारा मुन्नाभाई देखील आपल्याला सांगतो की, "टेन्शन नही लेने का, बिंधास रहने का !" तरीदेखील आपण आनंदी राहण्यात जगाच्या तुलनेत खूपच मागे पडत आहोत. काय झालेय आपल्याला ? नेमकं कुठं बिनसलंय ? खरे तर स्वातंत्र्योत्तर काळखंडातला हा असा डिजिटल काळ आहे जो सर्वाधिक भौतिक साधनांनी, सुख सुविधांनी लगडलाय. कुठली इच्छा करायचा अवकाश वा कुठले नवे साधन संशोधित करण्याची मनीषा जरी व्यक्त केली तरी ती लगेच पुरी होते इतका हा अधिभौतिक समृद्ध काळ आहे. सुखसाधने वारेमाप झालीत, फुरसतीच्या काळापासून ते रुक्ष दैनंदिन जीवनापर्यंतच्या गरजेच्या, चैनीच्या वस्तूंनी अवघा भवताल सजला आहे. रोजच मानवी सर्जकतेचे नवनवे परिमाण दिसताहेत. सातही खंडांत हे परिवर्तन वेगाने होतेय त्यानुरूप तिथे सुख समाधानही नांदतेय. तुलनेने आपल्याकडेही खूप सारे बदल झालेत, बरंच भलंवाईट घडून गेलंय त्याला आपणही टक्कर दिलीय, तुलनेने अन्य राष्ट्रांपेक्षा आपण अनेक पातळ्यांवर पुढारलेले असूनही आनंदी वृत्तीविषयी मात्र खूप पिछाडलेले आहोत.

मंगळवार, २९ मार्च, २०२२

हाँगकाँगला काय झालेय ?


'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. ‘नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन’, ‘क्वार्ट्झ’ आणि ‘गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह’ ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकतंच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना विकलीय. तेंव्हापासून तर यातील निर्भीड आणि लोककल्याणकारक भूमिकेस धार आलीय. यातील हाँगकाँगविषयीच्या आर्टिकलने चीनमध्ये मोठी खळबळ माजवून दिली. याद्वारे तिथे सर्व काही आलबेल असल्याच्या चिन्यांच्या दाव्याच्या पार ठिकऱ्या उडाल्या. टिमोथी मॅक्लॉफ्लिन हे ऍटलांटिकसाठी लेखन संशोधन करतात त्यांनी हे आर्टिकल लिहिले आहे. मागील तीन आठवड्यात हाँगकाँगमध्ये काय घडलंय याचं हृदयद्रावक चित्र त्यांनी जगापुढे आणलं.

फेब्रुवारी संपला आणि हाँगकाँगचे दिवस फिरले. कोरोना व्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हाँगकाँगमधली खेळाची मैदाने दक्षतेचा इशारा करणाऱ्या लाल-पांढऱ्या टेपमध्ये गुंडाळली गेली, मुलांना इथे येण्यास मज्जाव करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंपणाने बॅरिकेड उभारण्यात आले. कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने मनोरंजनाचे कसलेही कार्यक्रम होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी स्विंग क्रॉसबार वापरण्यात आले. संभाव्य लॉकडाऊनबद्दल सरकारच्या विनाशकारी सार्वजनिक संदेशामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट उडून प्रचंड खरेदी केली गेली. सर्व रेस्टॉरंट्स संध्याकाळी 6 वाजता बंद होत होती. बार अजिबात उघडले जात नव्हते. काही रेस्टॉरंट्स हॅप्पी-अवर डील ऑफर करत होती. जिम, चित्रपटगृहे, कॅम्पसाइट्स आणि समुद्रकिनारे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. देशातील एखाद्या दुर्गम उद्यानात फिरायला जायचे असल्यास सर्व नियमांचे कठोर पालन अनिवार्य होते. 2020 च्या सुरुवातीला हाँगकाँग कोविड लाटेत संक्रमण दरात मागे होते मात्र चौथ्या लाटेतील रहस्यमय विषाणूची बातमी येताच मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन सुरु झाले तरीदेखील अघटीत घडलेच !

रविवार, २० मार्च, २०२२

गाणी इंडिया आणि भारतामधली !



हेअरकटींग सलूनमध्ये नेहमी गाणी सुरु असतात त्यांचा क्लास वेगळाच असतो.
ऑटोरिक्षा, वडाप - टमटम, टॅक्सीमध्ये एफएमवर किंवा पेनड्राईव्हवर गाणी वाजत असतात ती बहुत करून करंट हिट्स असतात किंवा रेट्रो ओल्ड गोल्ड कलेक्शनपैकी असतात. त्याचवेळी टेम्पो ट्रॅवलरसारख्या वाहनातील गाणी वेगळीच असतात, बहुधा गझल्स किंवा सुफी वाजतं.

ऊस वा मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर स्थानिक भाषांमधली 'चालू' गाणी कानठळ्या बसेल अशा आवाजात सुरु असतात.

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

हरवलेली धुळवड...



खेड्यांनी धुळवडीचा दणका भारी असतो.
आदल्या दिवशीच्या होळीचा आर विझत आलेला असला तरी त्यात विस्तवाचे निखारे असतात, त्या निखाऱ्यांवर पाण्याने भरलेली घरातली पातेली, हंडे ठेवले जातात. मग पाणी किंचित कोमट होतं. त्याच पाण्याने राहिलेला आर विझवला जातो. चांगला रग्गड चिखल केला जातो. उरलेलं गरम पाणी घरी नेलं जातं. या पाण्याला विशेष गुणधर्म असतो अशी एक जुनाट बात यामागे असते.

दरम्यान घरोघरी लाल रश्श्याचा बेत होतो. पूर्वी हरेक घरी चुली असत तेंव्हा अख्ख्या गावात पिसाळलेल्या वासाचा जाळ व्यापून असे. आता सिलेंडर महाग झाल्याने पुन्हा सरपण आणि चुली दिसू लागल्यात, मातीचा लेप लावलेल्या पातेल्यात आधण ठेवलं जातं. सकाळीच पडलेले वाटे रटरटून शिजतात.

गुरुवार, १७ मार्च, २०२२

गावाकडची रानफुलं...



उन्हं मोकार पडलीत. सुन्या आणि दत्त्या एरंडाच्या माळापर्यंत आलेत. अजून कोसभर चालत गेलं की पारण्याची टेकडी येईल मग ते तिथेच थांबतील.

मानेवर आडवी काठी घेतलेला सुन्या पुढे आहे आणि त्याच्या दोन पावलं मागं दत्त्या. त्या दोघांच्या मागून जाधवाची म्हसरं.
साताठ जाफराबादी म्हशी, दोन आटलेल्या गायी, एक निबार हेला, दोन दुभत्या गायी, दहाबारा दोनदाती खिल्लार वासरं, वीसेक शेरडं.
सगळे एका लयीत चालत निघालेत. चालताना वाटेत येणारं हिरवं पिवळं गवत कधीच फस्त झालेलं असल्यानं कुठल्याही हिरव्या पानांसाठी त्यांच्या जिभा वळवळतात.

सुन्या आणि दत्त्या दोघेही चौदा पंधराच्या दरम्यानचे. कोवळी मिसरूड ओठावर उगवलेले. उन्हात फिरून गोरं अंग तांबूस रापलेलं.
बारमाही कष्ट करून गोटीबंद अंगातले पिळदार स्नायू सदऱ्याबाहेर डोकावू लागलेले, रुंद होऊ लागलेल्या छातीवरची हलकी तांबूस लव आताकुठे उन्हात चमकू लागली होती.
शाळा अर्ध्यात सोडून घरासाठी राबताना त्यांची जिन्दगानी म्हसरांच्या संगतीत रानोमाळच्या चिलारीत तुकड्या तुकड्यात भिर्र होत होती.
तीन साल झाले त्यांचं हे नित्यनेमाचं झालं होतं, त्या जित्राबांना त्यांची सवय झाली होती आणि त्यांना त्या मुक्या जीवांची सय जडलेली.

मंगळवार, १५ मार्च, २०२२

प्रिस्टच्या बाहुपाशातले अखेरचे श्वास – एका अद्भुत फोटोची गोष्ट...


सोबतच्या छायाचित्रात अनेक भावनांची गुंतागुंत आहे. मृत्यूपूर्वीचे अंतिम श्वास आहेत, भय आहे, धीरोदात्त उदारता आहे, अफाट धाडस आहे, श्रद्धा आहे आणि हतबलताही आहे. मरणासन्न सैनिकास आपल्या बाहूपाशात घेणाऱ्या प्रिस्टचा हा फोटो आहे. याला १९६३ सालचा पुलित्झर पुरस्कार लाभला होता. या फोटोची कथा मोठी विलक्षण आणि कारुण्यपूर्ण आहे.

युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमागचे मिडल ईस्टचे नेक्सस...


रशियाने युक्रेनवर हल्ला करून जगातली शांतता धोक्यात आणली या घटनेला आता आठवडा पूर्ण होईल. मागील कित्येक दिवसा ज्या शक्यतांचे अनुमान लावले जात होते ते यामुळे खरे ठरले. या युद्धात जे देश प्रत्यक्षात सहभागी असतील ते याचे थेट परिणाम भोगतील आणि युद्धात थेट भाग घेत नसूनही जगभरातील विविध खंडातील अनेक देशांना याची झळ पोचणार आहे हे देखील एक वास्तव आहे. कारण निव्वळ जागतिकीकरणाचे नसून परस्परावलंबित्व, विविध गरजांची पूर्तता, भवतालातील राजकीय भौगोलिक सामाजिक आणि धार्मिक समीकरणे या सर्व बाबींपायी याची झळ कुठल्या न कुठल्या प्रकारे सर्वच देशांना बसणार आहे. युरोपीय देश, अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचे युक्रेन रशिया युद्धाकडे पाहण्याचे दृष्टीकोन तीव्र निषेधाचे, प्रतिकाराचे व युक्रेनच्या समर्थनाचे आहेत हे सर्वश्रुत आहेच. याच्या उलट भारतासह काही देशांनी सावध पवित्रा घेत कोणतीही ठोस भूमिका घेणं टाळलं आहे, तर चीनने रशियाचे छुप्या पद्धतीने समर्थन केलं आहे कारण चीनचा अमेरिकेस कडवा विरोध आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे तर युद्ध सुरु होतानाच्या दिवशी पुतिन यांच्या भेटीस गेले होते. हे असं काहीसं धूसर आणि काहीसं ठळक विरोधाचं चित्र समोर असताना केवळ सीरियाने रशियाला सक्रिय  पाठिंबा देत युक्रेनची कठोर शब्दात निर्भत्सना केली हे विशेष होते. जगभरातील माध्यमांनी याची आपआपल्या परिप्रेक्ष्यातून दखल घेतली, आशियाई देशात तुलनेने यावर कमी लिहिले गेले. सिरियन मीडियामध्ये या दृष्टीकोनाविषयी दुमत नाही, मात्र एकवाक्यता असणारे समर्थनही आढळत नाही.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

द ब्लड इन द बॅरल्स – दशकांच्या इस्त्राईली भ्रमकथांचा भंडाफोड..

हत्याकांडाआधीचे  टँतुरा गावाचे दृश्य 


'द पॅलेस्टाईन क्रॉनिकल'हे लोकवर्गणीद्वारा चालणारं न्यूजपोर्टल आहे. इस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षाची धग किती ज्वलंत आहे हे यातील बातम्या वाचून उमगते. आपल्याकडे ज्याप्रमाणे उजव्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून वर्षानुवर्षे काही कंड्या पिकवल्या जातात नि त्याआधारे बुद्धीभेद करत जनतेमध्ये भ्रम पैदा करून आपली राजकीय पोळी भाजून घेत वर्चस्व वाढवायचं असा फंडा राबवला जातो. याला प्रत्युत्तर देताना समोरून देखील नेमकी माहिती दिली जात नाही. सत्य शोधायची जबाबदारी अर्थातच व्यक्तिसापेक्ष उरते. यातून समाजाच्या शोषणाचे सत्तासारीपाट मांडले जातात. वर्णजातधर्म यांचे वर्चस्ववादी आणि सत्तातुर राजकारणी यांचे साटेलोटे वाढते. एकच कोहराम माजून राहतो. मात्र या सर्व गदारोळात सत्याचा गळा घोटला जातो. सत्य वा शोध पत्रकारिता करणाऱ्या लोकांवर या पाखंडाचा मुखभंग करण्याची जबाबदारी येते. अलीकडे देशोदेशीच्या राजकीय पटलांवर हे चित्र पाहावयास मिळतेय. राजरोस युद्धाच्या झळा सोसणारे पॅलेस्टाईन याला अपवाद कसे असेल ? तिथे वर्षानुवर्षे पेश केल्या जाणाऱ्या एका मोठ्या असत्याचा पर्दाफाश केला गेलाय. त्याची ही बिटवीन द लाईन न्यूज.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

रिअल लाईफ पुष्पा - आयुष्याची लक्तरे झालेल्या मुलीची दास्तान

real life pushpa
हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी !

दिनांक २६ जून २०२१.
गुंटूर. आंध्रप्रदेश.
स्वर्णकुमारी वय वर्षे पस्तीस. पेशा दलाली नि विभ्रम.

देशात कोविडच्या डेल्टा व्हेरीयंटची साथ (दुसरी लाट) ऐन भरात होती तेंव्हाचा काळ. लोक कोविड रुग्णांना अक्षरशः वाळीत टाकत होते. खेड्यांनी संसर्ग वेगाने पसरत होता आणि माणसं किड्यामुंग्यांगत मरत होती. नानाविध अफवा आणि नेमक्या माहितीचा अभाव यामुळे सारेच भयभीत होते. याचा फायदा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि नैतिकतेला बाजारात उभं करून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. यात विविध स्तरावरील भल्याभल्या गणल्या गेलेल्या पेशांमधली मंडळी होती. यात ह्युमन ट्राफिकिंग करणारी मंडळी मागे कशी असतील ? कोविडकाळातील स्त्रियांचे दमण, शोषण याविषयीची जी भीती व्यक्त केली होती तिला पुष्टी मिळाल्याचे अनुभवतोच आहे. मात्र या सर्व घटनाचक्राचं शिखर ठरावं अशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उजेडात आलीय. ही घटना जिच्या आयुष्याचं मातेरं करून गेली त्या मुलीचं नाव इथे पुष्पा लिहितोय कारण आपल्याला खोट्या नायकांची ओढ फार असते आणि खऱ्यांना आपण किंमत देखील देत नसतो.

आठवीत शिकणारी पुष्पा पंधरा वर्षांची होती. तिचं मूळ गाव गुंटूरमधल्या क्रोसूर तालुक्यातलं. पोटाची खळगी भरायला तिचे कुटुंब गुंटूरमध्ये स्थायिक झालेलं. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या या दर्यावर्दी जिल्ह्याच्या सीमेवरून कृष्णेमाई वाहते. पुष्पाने तिच्या बालपणी कृष्णेपाशी आपले अश्रू अर्पण केलेले. कारण ती शैशवावस्थेत असतानाच तिची आई तिची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली. वडील मोलमजुरी करायचे आणि पुष्पा आपलं शिक्षण सांभाळून घरातली सगळी कामे करायची. कोविडच्या लाटेत तिलाही बाधा झाली. तिला बऱ्यापैकी त्रास होऊ लागला. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने गुंटूरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं. रूग्णापाशी कुणी थांबायचं नाही असा दंडक असल्याने तिच्यापाशी घरचं कुणी नव्हतं, तसेही तिच्याजवळ थांबू शकेल असं तिच्या कुटुंबात कुणी नव्हतंच मुळी. याचा फायदा स्वर्णकुमारीने उचलला. बायकांची ने-आण करणाऱ्या वा त्यांना गुमराह करणाऱ्या टोळ्यांमधली माणसं (?) कुठेही कसल्याही रुपात वावरत असतात. स्वर्णकुमारी गुंटूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सावज हेरण्याच्या मोहिमेवर होती. यासाठी तिने परिचारिका असल्याचा आव आणला होता. बिनाआईची नि कोलमडल्या कुटुंबाची कोवळी पोर असलेली पुष्पा तिने अचूक हेरली. तिने पुष्पाचा विश्वास संपादित केला. तिच्या वडिलांना तिने कळवले की पुष्पाला विशेष देखरेखीची निकड असल्याने ती आपल्या घरी घेऊन जातेय आणि तिची प्रकृती बरी होताच तिला घरी सोडलं जाईल. परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीने पोटावर मारलेल्या पुष्पाच्या अल्पशिक्षित पित्याचा स्वर्णकुमारीवर सहजी विश्वास बसला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता.

चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..


एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'इन्कार'च्या यशातून शिरपेच खोवला. हेलेनचं 'मुंगळा मुंगळा' गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते. चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. 'मेरे अपने' ते 'कुर्बानी' हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...



कोलकात्यातील कालीघाटापाशी अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका कोठेवालीने हे गाणं ऐकवून, सिनेमा पाहायला सांगितला होता. तोपर्यंत केवळ यातली गाणीच ऐकली होती. शामश्वेत रंगछटेतला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा ‘अदालत’ माझ्या पाहण्यात यायचा एरव्ही प्रश्नच नव्हता. वेश्यांचे आणि तवायफांचे उंबरठे झिजवताना अनेक स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकताना निशब्द झालो, अस्वस्थ झालो नि कोलमडूनही पडलो. तशीच कथा या सत्तरीपार वयातल्या कोठेवालीची होती. तिची दास्तान विचारल्यावर ती फार काही बोलली नव्हती, सोबतच्या बंगाली मित्रापाशी ती त्राग्याने मोजकेच काही पुटपुटली. तिने सांगितले होते म्हणून नंतर आवर्जून हा सिनेमा पाहिला आणि अक्षरशः बधीर होऊन गेलो होतो.

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...



आजपावेतो परवीन नावाच्या तीन स्त्रियांनी मनावर भुरळ घातली होती. पहिली होती पाकिस्तानची प्रसिद्ध कवयित्री शायरा परवीन शाकीर, दुसऱ्या म्हणजे विख्यात भारतीय गायिका परवीन सुल्ताना आणि तिसरी म्हणजे आयुष्याची वीण विस्कटून गेलेली प्रेमभुकेली अभिनेत्री परवीन बाबी. या तीन नावांत गत सप्ताहात भर पडली त्या म्हणजे परवीन रहमान. पाकिस्तानच्या कराचीमध्ये परवीन रहमान या नागरी हक्क चळवळीविषयी जितक्या ओळखल्या जातात. त्याहून अधिक त्यांची ओळख शहर टाऊनप्लॅनर अशी होती. परवीन रहमान यांचा जन्म बांग्लादेशमधला. बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला. परवीन यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन त्यावर नंतर बरेच लेखन केले गेलेय. बांग्लादेशच्याही आधी फाळणीपूर्व ब्रिटीश राजवटीत त्यांचे कुटुंब प्रगत विचारसरणीचे होते आणि कट्टरतावादापासून काहीसे अलिप्त राहण्याकडे त्यांचा कल होता. कालपरत्वे भारतीय उपखंडात भौगोलिक राजकीय बदल होत गेले तरीही त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाले नाहीत. भारताची फाळणी झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रत्यक्ष फाळणीनंतर भारत पाक यांच्यात झालेलं नागरी स्थलांतर याविषयी आपल्याकडे खूप काही लिहिलं गेलेलं आहे. तद्वतच पूर्व पाकिस्तानचा बिमोड करून तेथे बांग्लादेशची निर्मिती झाली. १९७१ च्या या अस्वस्थ कालखंडात काही महत्वाची स्थलांतरे पूर्व पाकिस्तान ते पाकिस्तान अशी झाली. याच रेषेचा एक बिंदू म्हणून बांग्लादेश निर्मिती दरम्यान रहमान कुटुंबियांस ढाक्यात असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी पाकिस्तानात आपल्या आप्तेष्टांकडे जाण्याचे निश्चित केले. कराची मधली त्यांची सुरुवातीची काही वर्षे हलाखीत गेली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. किंबहुना अशाच लसलसत्या जखमा भारताने फाळणी आणि बांग्लादेश निर्मितीवेळीही झेलल्या आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा भागात याची झळ अधिक प्रमाणात बसली. आजही भारतीय राजकारणात आणि समाजकारणात या मुद्द्यांचे प्राबल्य टिकून आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या साहित्यांत यावर नाट्यमय लेखन आढळते.

रविवार, २३ जानेवारी, २०२२

फारच सिम्पल होतं ते !

SAMEER GAIKWAD SAMEERBAPU
फारच सिम्पल होतं ते ... 

मॅटिनीची क्रेझ ओसरत गेली आणि प्रेमकथांचे रंग भडक होत गेले..
आता इतकं गुंतागुंतीचं नव्हतं ते !
दोघांत एक पॉपकॉर्न. एखाद्या महिन्यांत तिच्यासाठी 'गोल्डस्पॉट' त्यात माझ्या वाट्याचे दोनच घोट,
तर कधी लालकाळं थम्सअप इंटरव्हलला !
ती कावरीबावरी होऊन मान खाली घालून बसलेली
अन् मी इकडे तिकडे पाहत मध्येच तिच्याकडे पाहणारा !
फारच सिम्पल होतं ते !

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

डेथ ऑफ गॉडमदर


जगभरात रोज इतक्या घटना घडत असतात की त्यांचा आवाका कळून येत नाही. खेरीज आपल्यापर्यंत बातम्या घटना पोहोचवणारी माध्यमे आपल्या सोयीच्या आणि समविचारी धारणेच्या अनुषंगाने काम करतात त्यामुळे गाळणी लागते. परिणामस्वरूप आपण ज्या माध्यमांवर अवलंबून असतो ती माध्यमे आपल्याला ज्या घटना दाखवतात वा ज्या बातम्या सांगतात तेव्हढाच आपला स्त्रोत मर्यादित होतो. त्या परिघा पलीकडच्या बातम्यांना, घटनांना आपण मुकतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेशी आपला तसा थेट संबंध नसतोच मात्र कुठे तरी त्यांचा संदर्भ रोजच्या जगण्याशी कधीतरी निगडीत असतो. रोजच्या घटनांच्या गदारोळात तळाशी जाऊन एखादी घटना निवडून आपल्या जीवनाशी असणारा तिचा संदर्भ खऱ्या अर्थाने उमगतो तेंव्हा आपण थक्क होतो. अशी अज्ञात असणारी घटना आपल्याला कळली नाही तरी फारसे बिघडत नसते मात्र आपल्या जाणीवा समृद्ध होण्यात यांची जी मदत असते त्यापासून आपण वंचित राहतो हे नक्की ! अशीच एक घटना गत महिन्यात घडून गेली जी भारतीय प्रसारमाध्यमात औषधाला देखील आढळली नाही. माफिया जगताची पहिली लेडी बॉस असंता मारेस्का हिचे निधन झाले. तिच्या निधनाची दखल युरोपियन देशातील माध्यमांनी घेणं साहजिक होतं. मात्र मेक्सिकोसह अन्य काही लॅटिन अमेरिकन देशांतही त्याची दखल घेतली. याखेरीज इंडोनेशिया, सोमालिया या देशांनीही दखल घेतली कारण ड्रगतस्करीशी असलेलं या देशांचं नातं. भारतीय माध्यमांत कोणत्या बातम्यांना स्पेस द्यायची याची गणिते ठरलेली आहेत त्यात ही बातमी बसत नसावी सबब आपल्याकडे ती सर्वदूर पोहोचली नाही. असंता मारेस्काचं आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं होतं. तिच्या राईज अँड फॉलची कहानी अगदी फिल्मी आहे.

रविवार, १६ जानेवारी, २०२२

समानतेच्या वाटेवरचा पाकिस्तान...

समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान #sameergaikwad #sameerbapu #समीरगायकवाड
न्यायमूर्ती आयेशा मलिक   

पाकिस्तानबद्दल आपल्या समाजमनात तिथल्या सर्वंकष जाणीवांप्रती एक विशिष्ट द्वेषमूलक प्रतिमा आहे ; तिला बळकटी देण्याचे काम आपली प्रसारमाध्यमे आणि आपला सोशल मीडिया इमानेइतबारे करत असतो. पाकला शत्रूराष्ट्र समजण्यास कुणीच हरकत घेणार नाही मात्र तिथे सारंच प्रतिगामी आणि बुरसटलेलं आहे, तो देश मध्ययुगाहून मागे जातोय, तिथे कमालीची धर्मांधता सर्वच क्षेत्रात नांदते असं चित्र आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. हे खरं वाटण्याजोग्या काही घटना तिथे अधूनमधून घडतही असतात हे नाकारून चालणार नाही मात्र हेच बारोमास असणारे एकमेव सत्य नाहीये हे देखील मांडायला हवे. तिकडे काही सकारात्मक घटना घडली तर आपल्या माध्यमांचा कल ती बातमी लपवण्याकडे असतो. या गृहितकाला बळ देणारी एक विलक्षण मोठी घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडलीय. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायमूर्तींना मंजुरी लाभलीय हीच ती सकारात्मक घटना होय. या अभूतपूर्व घटनेनंतर पाकिस्तानी सोशल मीडिया त्या न्यायमूर्तींच्या कौतुकाने ओसंडून वाहत होता हे विशेष होय !