गुरुवार, २१ जुलै, २०२२

आखरी ख्वाहिश..

नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!

एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.

मंगळवार, १२ जुलै, २०२२

शिंजो आबे यांची हत्या आणि चीन जपान वैमनस्य ..

नुकतेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरात याचे तीव्र पडसाद 
उमटले. हेच चित्र सर्वत्र दिसले अपवाद होता चीनचा! आबेंच्या हत्येनंतर चीनी सोशल मीडियावर अक्षरशः दिवाळी साजरी केली गेली. 'वन प्लेट मोअर राईस' असं म्हणत चिन्यांनी वाढीव कल्ला केला. चिनी इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी आबेंचा मारेकरी यामागामीचा गौरव करत त्याला हिरो म्हटलंय. जगभरातल्या माध्यमांनी चिनी विकृतीची दखल घेतली. खुद्द चीनने मात्र याविषयी ठोस भूमिका न घेता लोकभावनांना एकप्रकारे मूक संमतीच दिली. अनेकांनी चिनी मानसिकतेमागची कारणमीमांसा मांडली. त्यांचा सूर असा होता की, शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. आबेंच्या पुढाकाराने चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा समूह सुरु झाल्यावर चीनचा तिळपापड झाला होता. आबेंनी चीनच्या महत्वाकांक्षी 'ओबोर' या बहुराष्ट्रीय रस्ते प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यामूळे आबे चिन्यांच्या डोळ्यात सलत होते. वास्तवात चीन जपानमधलं वैमनस्य अधिक गहिरं, जुनं नि कडवट आहे ज्याबद्दल भारतीय माध्यमे क्वचित लिहितात. अशी मांडणी अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेण्यासारखे असले तरी हा इतिहास आहे जो बदलता येणार नाही.

रविवार, १० जुलै, २०२२

बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.

गुरुवार, ७ जुलै, २०२२

क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या

क्रिप्टोक्वीन रुजा इग्नाटोवा

सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि 
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक  स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे  पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ  आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो  परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार  असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !

मंगळवार, २८ जून, २०२२

प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश ..

sameerbapu, समीरबापू,  समीर गायकवाड, #sameerbapu
प्रगतीच्या वाटेवरचा बांगलादेश  

ढाका एक्सप्रेसमध्ये 5 जून रोजीच्या अंकात बांगलादेशचा गौरव करणारा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याची बांगलादेशची घौडदौड आणि भविष्याच्या दृष्टीने सुरू असलेली व्यापक उभारणी हा त्या लेखाचा विषय होता. सद्यकाळातील सरकारी तोंडपूजेपणाच्या भूमिकेत पुरत्या गुरफटलेल्या भारतीय मीडियाने याची अपेक्षेप्रमाणे दखल घेतली नाही. कॉँग्रेस नेते शशी थरूर यांनी या  लेखनविषयाच्या संदर्भात याच लेखातील आकडेवारी देत ट्विट केले. बांगलादेशी माध्यमांनी त्यांच्या ट्विटला ठळक प्रसिद्धी दिली. भारतातील सरकार धार्जिण्या मंडळींनी मात्र याकडे कानाडोळा केला आणि उलटपक्षी आपणच कसे प्रगतीच्या मार्गावर सुसाट निघालो आहोत याचे जोरकस दावे सुरू ठेवले, अर्थातच गत आर्थिक वर्षापेक्षा भारताची सद्यवर्षातील स्थिति दिलासादायक अशीच आहे यात शंका नाही मात्र कोरोनापूर्व काळातील प्रगतीपथावर आपण अद्यापही पोहोचलो नाहीत हे वास्तव आहे. कोविडबाधेमुळे आपल्या विकासाला आणि प्रगतीच्या आलेखाला खीळ बसली हे कुणीही अर्थतज्ज्ञ मान्य करेल, किंबहुना जगभरातील सर्वच देशांना याची थोडीफार झळ बसली आहे हे सत्य नाकारता येणार नाही. मग याच स्थितीतून गेलेल्या बांगलादेशने मात्र त्यांच्या अर्थविषयक चढत्या प्रगतीच्या आलेखास गवसणी घातली हे कसे काय शक्य झाले याचा परामर्श घेतलाच पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत आणि त्यांच्या प्रशंसनीय अनुकरणीय भूमिका कोणत्या यावर साधकबाधक चर्चा झाली पाहिजे कारण त्याद्वारे योग्य धोरणांना खतपाणी मिळू शकेल.

रविवार, २६ जून, २०२२

खऱ्या समानतेच्या शोधात..


'जातीसाठी माती खावी' किंवा 'जात नाही ती जात' ह्या आपल्याकडच्या पॉप्युलर टॅगलाईन्स आहेत. एकीकडे सातत्याने जातीयवादाविरुद्ध कंठशोष करायचा आणि त्याचवेळी हस्ते परहस्ते आपल्या जातीच्या 'अहं'ला गोंजारत रहायचं ही भारतीय माणसाची खासियत बनून गेलीय. सद्यकाळात आपले विचार आपल्या व्यक्तीमत्वाइतके दुभंगत चाललेत हे कटूसत्य आहे, गतशतकातली जातीनिर्मूलनाची साधीसोपी चळवळ आपण पूर्णतः स्वीकारू शकलो नाही हे वास्तव आहे. मागील आठ शतकांत अगदी संतपरंपरेपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंत अनेकांनी यावर प्रबोधन केले आहे मात्र आपल्यावर त्याचा परिणाम शून्य झालाय. गत शतकात वा अगदी या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत लोकांच्या वागणुकीत जातीयता स्पष्ट दिसून यायची, त्यावर प्रहार करणं सोपं असायचं. लोक याची दखल घेत असत, अगदी राजसत्तेपासून ते मीडियापर्यंत याची नोंद घेतली जायची. परिणामी जे जातीभेद करत असत ते अगदी उघडे पडत असत, अशांची बाजू घ्यायला फार कुणी पुढे येत नसत. अर्थातच अशांना समर्थन देण्याची खुमखुमी काहींच्या ठायी असायची मात्र लोकलज्जेस्तव तसेच वाढत्या सामाजिक दबावापुढे असे लोक वचकून राहत आणि जातीभेद करणाऱ्याला खुले समर्थन मिळत नसे.

मंगळवार, ७ जून, २०२२

जॉली एलएलबी व्हाया सीबीआय

#sameerbapu, sameerbapu, समीर गायकवाड, sameer gaikwad
बदामीदेवी त्यांच्या नातलगांसह न्यायालयात आल्या तो क्षण ...   

2013 साली प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' या चित्रपटामध्ली ऍडव्होकेट जगदीश त्यागीची मध्यवर्ती भूमिका अभिनेता अर्शद वारसी याने साकारली होती. या चित्रपटाला भरपूर यश लाभले होते खेरीज क्रिटिक्सचे उत्तम शेरे मिळाले होते. त्यानंतर चारच वर्षात याचा सिक्वेल देखील निघाला होता ज्यात अक्षयकुमार नायकाच्या भूमिकेत होता. हे दोन्ही सिनेमे कोर्टरूम ड्रामा होते. एका हिट अँड रन केसमध्ये एक अमीरजादा मस्तवाल मद्यधुंद तरुण आपल्या अलिशान गाडीखाली सहा लोकांना चिरडून मौका ए वारदात वरून पळून जातो. फुटपाथवर झोपलेले जीव निष्कारण बळी पडतात. मात्र व्यवस्था इथे अपराध्याच्या बाजूने उभी राहते त्यासाठी बरेच मोठे आर्थिक व्यवहार होतात, जीवांची बोली लागते अन सौदे होतात. वकिलांपासून ते पोलिसांपर्यंत सगळी तपास यंत्रणा यात सामील असते. सगळ्यांचे उखळ पांढरे होते, कारण जे मृत्युमुखी पडलेले असतात तेच मुळात बेसहारा असहाय गरीब लोक असतात, त्यांच्यासाठी कोण लढणार ? मुळात यात सहाजणांचा मृत्यू झालेलाच नसतो, पाच जण जागीच ठार झालेले असतात आणि रमाकांत शुक्ला नावाचा अपंग गंभीर जखमी झालेला असतो. वास्तवात तो एकटाच या गुन्ह्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, गाडी चालवणाऱ्या राहुल दिवाणने त्याची मदत करण्याऐवजी त्याच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्यात रमाकांत बचावतो मात्र इन्स्पेक्टर सतबीर राठीच्या कचाट्यात सापडतो. त्याची आयुष्यभराची कमाई हडप करून राठी त्याला हाकलून लावतो, जोडीस सज्जड दम भरतो. रमाकांत शुक्ला हा देखील अपघातात मरण पावल्याची नोंद करून मोकळा होतो. अपघातातील मृतांची संख्या पाचऐवजी सहा होते ! खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात गबरगंड वकील तेजिंदर राजपाल त्यांना हव्या त्या दिशेने तपास वाकवतात ! मात्र जगदीश त्यागी अगदी ऐन मोक्याच्या समयी रमाकांत शुक्लाला हजर करतो. ज्याला व्यवस्थेने मृत घोषित केलेले असते तो स्वतः चालत येऊन न्यायालयात साक्ष देतो आणि मग कुठे खरा न्याय होतो अशी कथा 'जॉली एलएलबी'मध्ये होती. हे सर्व इथे का लिहिलेय असा प्रश्न अनेकांना पडला असेल, कारण हा काही सिनेमाविषयक लेखनाचा स्तंभ नाहीये हे सर्वश्रुत आहे. मात्र घटनाच अशी घडली आहे की या चित्रपटाची आठवण व्हावी ! व्यवस्थेने मृत जाहीर केलेली वयाची ऐंशी वर्षे पार केलेली एक वृद्धा थेट न्यायालयात अवतरते आणि न्यायमूर्तींना खऱ्या न्यायासाठी विनवणी करते, ही घटना या शुक्रवारी ३ जून रोजी घडलीय ! बातम्यांच्या गदारोळात या घटनेची नोंद नीट घेतली गेलेली नाही कारण एका वृद्ध निराधार शोषित महिलेसाठी मीडिया रान पेटवेल असे दिवस आता राहिले नाहीत. त्याच घटनेचा हा धांडोळा.

मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

'अल-अक्सा'च्या संघर्षाची रक्तरंजित पार्श्वभूमी...


‘अल-अक्सा’ मस्जिदीवरून उद्भवलेला संघर्ष जाणून घेण्याआधी तिथला इतिहास जाणून घेणं अनिवार्य आहे. या भूमीचा इतिहास सांगतो की ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. गत दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी ज्यू ! सद्यकाळी ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या संघर्षाची इतिश्री कशी व कधी असेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगभरातल्या ज्यूंनी जेरुसलेमजवळची भूमी बळकावत, काबीज करत इस्राईलला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, अरब जगतात खळबळ उडाली. १९४६ ते १९५० या काळात नित्य चकमकी होत राहिल्या आणि पॅलेस्टाईनच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहत राहिले. मुस्लिमांनी ज्यूंना कधीकाळी विस्थापित केलं गेलं होतं त्याची ती दाहक, संहारक आणि सुनियोजित प्रतिक्रिया होती, जी एका ठाशीव आकृतीबंधातून आकारास आली होती. तर इस्राईलचा बिमोड करण्यासाठी तत्कालीन युनायटेड अरब रिपब्लिकने (आताचे ईजिप्त, सीरिया आणि जॉर्डन) कंबर कसली. त्यांच्यात सातत्याने युद्धे होत राहिली.

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी



अलेक्झांडर पुश्किन

अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे पोहोच व्हायची, साहजिकच या खात्याशी सर्वांचा स्नेह असे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासमार्गांवर इथे वाटसरूला थांबण्याची, आराम करण्याची, अल्पोपहाराची सोयही असे. खेरीज आर्थिक व्यवहारदेखील डाकमाध्यमातून होत असल्याने पहारेकऱ्याची नेमणूक असे. तिथे येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींना जेंव्हा तो दाद देत नसे तेंव्हा त्याला दमदाटी व्हायची वा त्याच्याशी वाद व्हायचे. त्याच्या जागी स्वतःची तुलना केल्यासच त्याचे दुःख कळू शकते. पोस्टचौकीचा पहारेदार नेमका कसा असायचा हे गतकाळाच्या संदर्भांतूनच उमगते. दिवस असो की रात्र त्याला शांतता नसे. अलेक्झांडर पुश्किन यांनी संपूर्ण रशियामध्ये प्रवास केल्याने सर्व महामार्ग त्यांच्या परिचयाचे ! पुश्किनना ओळखत नसावा असा पोस्टऑफिसचा एखादाच पहारेकरी असावा. जनतेत यांची प्रतिमा चुकीची होती. वास्तवात ते शांतताप्रिय, सेवाभावी, मनमिळाऊ, नम्र, पैशाचा लोभ नसणारे असत. अशाच एका पहारेदाराची ही गोष्ट. सॅमसन वॉरेन त्याचं नाव.

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

पन्नाशी पार केलेल्या 'पिंजऱ्या'च्या काही नोंदी -


आमच्या इकडे 'पिंजरा' हा एक कोडवर्ड आहे.थेट कर्नाटकमधील गुलबर्ग्यापासून ते पुणे जिल्ह्यातील चौफुल्यापर्यंत आणि बसवकल्याणपासून ते थेट नगर जिल्ह्यातल्या राहुरीपर्यंत आणि इकडे शेजारी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात देखील सढळ हाताने याचा वापर होतो.

रिकाम्या पिशवीची घडी घालून दुमडून हाती घेऊन एकट्या दुकट्याने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या महिला सर्रास दिसतात. हायवेवर ढाब्याजवळ या अधिक दिसतात. भिरभिरत्या नजरेने या रस्त्याकाठी उभ्या असतात. यांना 'नेमकं' ओळखून एखादं वाहन थांबलं की या पुढे होतात. वाहनचालकाशी वा आतील इसमांशी त्यांचं बोलणं होतं. डील झाली की ती बाई त्या वाहनात बसून निघून जाते.
कधी कधी बोलणं फिसकटतं, कधी बोलणं होतच नाही मग उन्हे उतरल्यावर त्या माघारी फिरतात.
वाहनासोबत गेलेली बाई रात्री बऱ्याच उशिरा वा दुसऱ्या दिवशी तिच्या घरी परतते. हायवेवरचं लोअर ग्रेड ट्रॅफिक या बायकांना 'पिंजरा' म्हणतं !
'डायवर' 'किन्नर' यांच्या देहाची आग शमवणारा 'पिंजरा' !

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

राजपक्षे प्रायव्हेट लिमिटेड'स् श्रीलंका !


आपल्या देशाच्या शेजारील काही देशांत बऱ्याच दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे लोकनियुक्त सरकार उलथवून तिथे लष्कराने कमांड सांभाळलीय. बांग्लादेशमध्ये हिंसक कारवायांना ऊत आलाय, नेपाळमधील राजकीय अस्थिरता कधीही देशाला गर्तेत नेऊ शकते, मालदीवमधले संकट काहीसे निवळताना दिसतेय तर पाकिस्तानमध्ये अकस्मात सत्तांतर झालेय आणि श्रीलंकेमधील विविध स्तरावरची अनागोंदी दिवसागणिक वाढतेय. याचे परिणाम दक्षिण आशियाई देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्तरांवर होणार आहेत. चीनसह अमेरिकेचेही या भूभागावर लक्ष असल्याने इथल्या अस्थिरतेला खूप महत्व आहे. पाकिस्तानमधली समस्या जुनाट व्याधीसारखी आहे ती सातत्याने अधूनमधून तोंड वर करते, तिथे लोकशाही नावालाच आहे प्रत्यक्ष लष्कराचा हस्तक्षेप ठरलेला आहे. अन्य देशांतली स्थिती आगामी काळात पूर्वपदावर येईल, अपवाद श्रीलंकेचा आहे ! कारण इथले संकट न भूतो न भविष्यती असे आहे. जगभरातील आर्थिक राजकीय घडामोडींवर 'इकॉनॉमिस्ट'मध्ये काय भाष्य केले गेलेय हे पाहून आपली विचारधारा ठरवणारे देश आहेत यावरून या नियतकालिकामधील मांडणीचे महत्व कळावे. यंदाच्या इकॉनॉमिस्ट'च्या आवृत्तीत आशिया विभागात श्रीलंकेवर जळजळीत लेख प्रकाशित झालाय ; हे संकट राजकीय, मानवनिर्मित असल्याचे ताशेरे त्यात ओढलेत.

बुधवार, ३० मार्च, २०२२

एक देश ..आनंदाच्या शोधात !


‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...’ जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग ठाऊक नसेल असा रसिक, भाविक मराठी माणूस नसेल. आनंदाचं इतकं श्रेष्ठ वर्णन, इतकी सुंदर व्याख्या खचितच कुणी केली असेल. तुकोबांना जो आनंद अभिप्रेत आहे तो अंतर्मनाचा आहे. या अनुभूतीसाठी आपण आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोह व्हायचं म्हणजे त्यात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. यातून जे काही सुख लाभतेय ते काहीच्या बाही अफाट आहे. त्याचे कसे वर्णन करता येईल ? कारण ब्रम्हानंदाच्या ओढीने इतर लोभ लोप पावतात. पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. आनंदानुभवाचा ठसा अंत:करणात उमटायला पाहिजे मग तो वाणीद्वारे प्रकट होतोच ! आनंदाचे हे सूत्र त्रिकालाबाधित आहे.

"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे" बालकवींच्या या कवितेविषयी अखिल मराठी जनमानसात अपार प्रेम आहे. आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी अगदी ताल लावून ही कविता कधीतरी म्हणवून घेतलेली असतेच. किशोरवयात गायलेले बडबडगीत 'चला चला, गाऊ चला आनंदाचे गाणे !' हे आपल्या सर्वांच्या आनंदी बाल्यावस्थेचे साक्षीदार आहे. म्हणजेच आनंदी असण्याचे वा राहण्याचे संस्कार शिशुअवस्थेतील बडबडगीतापासून ते थेट पोक्तपणी येणाऱ्या विरक्तिअवस्थेपर्यंत संतांच्या अभंगांपर्यंतच्या रचनांमधून झाले आहेत. इतकेच नव्हे तर फिल्मी गांधीगिरी करणारा मुन्नाभाई देखील आपल्याला सांगतो की, "टेन्शन नही लेने का, बिंधास रहने का !" तरीदेखील आपण आनंदी राहण्यात जगाच्या तुलनेत खूपच मागे पडत आहोत. काय झालेय आपल्याला ? नेमकं कुठं बिनसलंय ? खरे तर स्वातंत्र्योत्तर काळखंडातला हा असा डिजिटल काळ आहे जो सर्वाधिक भौतिक साधनांनी, सुख सुविधांनी लगडलाय. कुठली इच्छा करायचा अवकाश वा कुठले नवे साधन संशोधित करण्याची मनीषा जरी व्यक्त केली तरी ती लगेच पुरी होते इतका हा अधिभौतिक समृद्ध काळ आहे. सुखसाधने वारेमाप झालीत, फुरसतीच्या काळापासून ते रुक्ष दैनंदिन जीवनापर्यंतच्या गरजेच्या, चैनीच्या वस्तूंनी अवघा भवताल सजला आहे. रोजच मानवी सर्जकतेचे नवनवे परिमाण दिसताहेत. सातही खंडांत हे परिवर्तन वेगाने होतेय त्यानुरूप तिथे सुख समाधानही नांदतेय. तुलनेने आपल्याकडेही खूप सारे बदल झालेत, बरंच भलंवाईट घडून गेलंय त्याला आपणही टक्कर दिलीय, तुलनेने अन्य राष्ट्रांपेक्षा आपण अनेक पातळ्यांवर पुढारलेले असूनही आनंदी वृत्तीविषयी मात्र खूप पिछाडलेले आहोत.

मंगळवार, २९ मार्च, २०२२

हाँगकाँगला काय झालेय ?


'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. ‘नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन’, ‘क्वार्ट्झ’ आणि ‘गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह’ ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकतंच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना विकलीय. तेंव्हापासून तर यातील निर्भीड आणि लोककल्याणकारक भूमिकेस धार आलीय. यातील हाँगकाँगविषयीच्या आर्टिकलने चीनमध्ये मोठी खळबळ माजवून दिली. याद्वारे तिथे सर्व काही आलबेल असल्याच्या चिन्यांच्या दाव्याच्या पार ठिकऱ्या उडाल्या. टिमोथी मॅक्लॉफ्लिन हे ऍटलांटिकसाठी लेखन संशोधन करतात त्यांनी हे आर्टिकल लिहिले आहे. मागील तीन आठवड्यात हाँगकाँगमध्ये काय घडलंय याचं हृदयद्रावक चित्र त्यांनी जगापुढे आणलं.

फेब्रुवारी संपला आणि हाँगकाँगचे दिवस फिरले. कोरोना व्हायरसची साथ सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी हाँगकाँगमधली खेळाची मैदाने दक्षतेचा इशारा करणाऱ्या लाल-पांढऱ्या टेपमध्ये गुंडाळली गेली, मुलांना इथे येण्यास मज्जाव करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंपणाने बॅरिकेड उभारण्यात आले. कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने मनोरंजनाचे कसलेही कार्यक्रम होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी स्विंग क्रॉसबार वापरण्यात आले. संभाव्य लॉकडाऊनबद्दल सरकारच्या विनाशकारी सार्वजनिक संदेशामुळे मोठ्या प्रमाणावर घबराट उडून प्रचंड खरेदी केली गेली. सर्व रेस्टॉरंट्स संध्याकाळी 6 वाजता बंद होत होती. बार अजिबात उघडले जात नव्हते. काही रेस्टॉरंट्स हॅप्पी-अवर डील ऑफर करत होती. जिम, चित्रपटगृहे, कॅम्पसाइट्स आणि समुद्रकिनारे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. देशातील एखाद्या दुर्गम उद्यानात फिरायला जायचे असल्यास सर्व नियमांचे कठोर पालन अनिवार्य होते. 2020 च्या सुरुवातीला हाँगकाँग कोविड लाटेत संक्रमण दरात मागे होते मात्र चौथ्या लाटेतील रहस्यमय विषाणूची बातमी येताच मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन सुरु झाले तरीदेखील अघटीत घडलेच !

रविवार, २० मार्च, २०२२

गाणी इंडिया आणि भारतामधली !



हेअरकटींग सलूनमध्ये नेहमी गाणी सुरु असतात त्यांचा क्लास वेगळाच असतो.
ऑटोरिक्षा, वडाप - टमटम, टॅक्सीमध्ये एफएमवर किंवा पेनड्राईव्हवर गाणी वाजत असतात ती बहुत करून करंट हिट्स असतात किंवा रेट्रो ओल्ड गोल्ड कलेक्शनपैकी असतात. त्याचवेळी टेम्पो ट्रॅवलरसारख्या वाहनातील गाणी वेगळीच असतात, बहुधा गझल्स किंवा सुफी वाजतं.

ऊस वा मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर स्थानिक भाषांमधली 'चालू' गाणी कानठळ्या बसेल अशा आवाजात सुरु असतात.

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

हरवलेली धुळवड...



खेड्यांनी धुळवडीचा दणका भारी असतो.
आदल्या दिवशीच्या होळीचा आर विझत आलेला असला तरी त्यात विस्तवाचे निखारे असतात, त्या निखाऱ्यांवर पाण्याने भरलेली घरातली पातेली, हंडे ठेवले जातात. मग पाणी किंचित कोमट होतं. त्याच पाण्याने राहिलेला आर विझवला जातो. चांगला रग्गड चिखल केला जातो. उरलेलं गरम पाणी घरी नेलं जातं. या पाण्याला विशेष गुणधर्म असतो अशी एक जुनाट बात यामागे असते.

दरम्यान घरोघरी लाल रश्श्याचा बेत होतो. पूर्वी हरेक घरी चुली असत तेंव्हा अख्ख्या गावात पिसाळलेल्या वासाचा जाळ व्यापून असे. आता सिलेंडर महाग झाल्याने पुन्हा सरपण आणि चुली दिसू लागल्यात, मातीचा लेप लावलेल्या पातेल्यात आधण ठेवलं जातं. सकाळीच पडलेले वाटे रटरटून शिजतात.

गुरुवार, १७ मार्च, २०२२

गावाकडची रानफुलं...



उन्हं मोकार पडलीत. सुन्या आणि दत्त्या एरंडाच्या माळापर्यंत आलेत. अजून कोसभर चालत गेलं की पारण्याची टेकडी येईल मग ते तिथेच थांबतील.

मानेवर आडवी काठी घेतलेला सुन्या पुढे आहे आणि त्याच्या दोन पावलं मागं दत्त्या. त्या दोघांच्या मागून जाधवाची म्हसरं.
साताठ जाफराबादी म्हशी, दोन आटलेल्या गायी, एक निबार हेला, दोन दुभत्या गायी, दहाबारा दोनदाती खिल्लार वासरं, वीसेक शेरडं.
सगळे एका लयीत चालत निघालेत. चालताना वाटेत येणारं हिरवं पिवळं गवत कधीच फस्त झालेलं असल्यानं कुठल्याही हिरव्या पानांसाठी त्यांच्या जिभा वळवळतात.

सुन्या आणि दत्त्या दोघेही चौदा पंधराच्या दरम्यानचे. कोवळी मिसरूड ओठावर उगवलेले. उन्हात फिरून गोरं अंग तांबूस रापलेलं.
बारमाही कष्ट करून गोटीबंद अंगातले पिळदार स्नायू सदऱ्याबाहेर डोकावू लागलेले, रुंद होऊ लागलेल्या छातीवरची हलकी तांबूस लव आताकुठे उन्हात चमकू लागली होती.
शाळा अर्ध्यात सोडून घरासाठी राबताना त्यांची जिन्दगानी म्हसरांच्या संगतीत रानोमाळच्या चिलारीत तुकड्या तुकड्यात भिर्र होत होती.
तीन साल झाले त्यांचं हे नित्यनेमाचं झालं होतं, त्या जित्राबांना त्यांची सवय झाली होती आणि त्यांना त्या मुक्या जीवांची सय जडलेली.

मंगळवार, १५ मार्च, २०२२

प्रिस्टच्या बाहुपाशातले अखेरचे श्वास – एका अद्भुत फोटोची गोष्ट...


सोबतच्या छायाचित्रात अनेक भावनांची गुंतागुंत आहे. मृत्यूपूर्वीचे अंतिम श्वास आहेत, भय आहे, धीरोदात्त उदारता आहे, अफाट धाडस आहे, श्रद्धा आहे आणि हतबलताही आहे. मरणासन्न सैनिकास आपल्या बाहूपाशात घेणाऱ्या प्रिस्टचा हा फोटो आहे. याला १९६३ सालचा पुलित्झर पुरस्कार लाभला होता. या फोटोची कथा मोठी विलक्षण आणि कारुण्यपूर्ण आहे.

युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमागचे मिडल ईस्टचे नेक्सस...


रशियाने युक्रेनवर हल्ला करून जगातली शांतता धोक्यात आणली या घटनेला आता आठवडा पूर्ण होईल. मागील कित्येक दिवसा ज्या शक्यतांचे अनुमान लावले जात होते ते यामुळे खरे ठरले. या युद्धात जे देश प्रत्यक्षात सहभागी असतील ते याचे थेट परिणाम भोगतील आणि युद्धात थेट भाग घेत नसूनही जगभरातील विविध खंडातील अनेक देशांना याची झळ पोचणार आहे हे देखील एक वास्तव आहे. कारण निव्वळ जागतिकीकरणाचे नसून परस्परावलंबित्व, विविध गरजांची पूर्तता, भवतालातील राजकीय भौगोलिक सामाजिक आणि धार्मिक समीकरणे या सर्व बाबींपायी याची झळ कुठल्या न कुठल्या प्रकारे सर्वच देशांना बसणार आहे. युरोपीय देश, अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचे युक्रेन रशिया युद्धाकडे पाहण्याचे दृष्टीकोन तीव्र निषेधाचे, प्रतिकाराचे व युक्रेनच्या समर्थनाचे आहेत हे सर्वश्रुत आहेच. याच्या उलट भारतासह काही देशांनी सावध पवित्रा घेत कोणतीही ठोस भूमिका घेणं टाळलं आहे, तर चीनने रशियाचे छुप्या पद्धतीने समर्थन केलं आहे कारण चीनचा अमेरिकेस कडवा विरोध आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे तर युद्ध सुरु होतानाच्या दिवशी पुतिन यांच्या भेटीस गेले होते. हे असं काहीसं धूसर आणि काहीसं ठळक विरोधाचं चित्र समोर असताना केवळ सीरियाने रशियाला सक्रिय  पाठिंबा देत युक्रेनची कठोर शब्दात निर्भत्सना केली हे विशेष होते. जगभरातील माध्यमांनी याची आपआपल्या परिप्रेक्ष्यातून दखल घेतली, आशियाई देशात तुलनेने यावर कमी लिहिले गेले. सिरियन मीडियामध्ये या दृष्टीकोनाविषयी दुमत नाही, मात्र एकवाक्यता असणारे समर्थनही आढळत नाही.

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

द ब्लड इन द बॅरल्स – दशकांच्या इस्त्राईली भ्रमकथांचा भंडाफोड..

हत्याकांडाआधीचे  टँतुरा गावाचे दृश्य 


'द पॅलेस्टाईन क्रॉनिकल'हे लोकवर्गणीद्वारा चालणारं न्यूजपोर्टल आहे. इस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षाची धग किती ज्वलंत आहे हे यातील बातम्या वाचून उमगते. आपल्याकडे ज्याप्रमाणे उजव्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून वर्षानुवर्षे काही कंड्या पिकवल्या जातात नि त्याआधारे बुद्धीभेद करत जनतेमध्ये भ्रम पैदा करून आपली राजकीय पोळी भाजून घेत वर्चस्व वाढवायचं असा फंडा राबवला जातो. याला प्रत्युत्तर देताना समोरून देखील नेमकी माहिती दिली जात नाही. सत्य शोधायची जबाबदारी अर्थातच व्यक्तिसापेक्ष उरते. यातून समाजाच्या शोषणाचे सत्तासारीपाट मांडले जातात. वर्णजातधर्म यांचे वर्चस्ववादी आणि सत्तातुर राजकारणी यांचे साटेलोटे वाढते. एकच कोहराम माजून राहतो. मात्र या सर्व गदारोळात सत्याचा गळा घोटला जातो. सत्य वा शोध पत्रकारिता करणाऱ्या लोकांवर या पाखंडाचा मुखभंग करण्याची जबाबदारी येते. अलीकडे देशोदेशीच्या राजकीय पटलांवर हे चित्र पाहावयास मिळतेय. राजरोस युद्धाच्या झळा सोसणारे पॅलेस्टाईन याला अपवाद कसे असेल ? तिथे वर्षानुवर्षे पेश केल्या जाणाऱ्या एका मोठ्या असत्याचा पर्दाफाश केला गेलाय. त्याची ही बिटवीन द लाईन न्यूज.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

रिअल लाईफ पुष्पा - आयुष्याची लक्तरे झालेल्या मुलीची दास्तान

real life pushpa
हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी !

दिनांक २६ जून २०२१.
गुंटूर. आंध्रप्रदेश.
स्वर्णकुमारी वय वर्षे पस्तीस. पेशा दलाली नि विभ्रम.

देशात कोविडच्या डेल्टा व्हेरीयंटची साथ (दुसरी लाट) ऐन भरात होती तेंव्हाचा काळ. लोक कोविड रुग्णांना अक्षरशः वाळीत टाकत होते. खेड्यांनी संसर्ग वेगाने पसरत होता आणि माणसं किड्यामुंग्यांगत मरत होती. नानाविध अफवा आणि नेमक्या माहितीचा अभाव यामुळे सारेच भयभीत होते. याचा फायदा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि नैतिकतेला बाजारात उभं करून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. यात विविध स्तरावरील भल्याभल्या गणल्या गेलेल्या पेशांमधली मंडळी होती. यात ह्युमन ट्राफिकिंग करणारी मंडळी मागे कशी असतील ? कोविडकाळातील स्त्रियांचे दमण, शोषण याविषयीची जी भीती व्यक्त केली होती तिला पुष्टी मिळाल्याचे अनुभवतोच आहे. मात्र या सर्व घटनाचक्राचं शिखर ठरावं अशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उजेडात आलीय. ही घटना जिच्या आयुष्याचं मातेरं करून गेली त्या मुलीचं नाव इथे पुष्पा लिहितोय कारण आपल्याला खोट्या नायकांची ओढ फार असते आणि खऱ्यांना आपण किंमत देखील देत नसतो.

आठवीत शिकणारी पुष्पा पंधरा वर्षांची होती. तिचं मूळ गाव गुंटूरमधल्या क्रोसूर तालुक्यातलं. पोटाची खळगी भरायला तिचे कुटुंब गुंटूरमध्ये स्थायिक झालेलं. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या या दर्यावर्दी जिल्ह्याच्या सीमेवरून कृष्णेमाई वाहते. पुष्पाने तिच्या बालपणी कृष्णेपाशी आपले अश्रू अर्पण केलेले. कारण ती शैशवावस्थेत असतानाच तिची आई तिची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली. वडील मोलमजुरी करायचे आणि पुष्पा आपलं शिक्षण सांभाळून घरातली सगळी कामे करायची. कोविडच्या लाटेत तिलाही बाधा झाली. तिला बऱ्यापैकी त्रास होऊ लागला. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने गुंटूरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं. रूग्णापाशी कुणी थांबायचं नाही असा दंडक असल्याने तिच्यापाशी घरचं कुणी नव्हतं, तसेही तिच्याजवळ थांबू शकेल असं तिच्या कुटुंबात कुणी नव्हतंच मुळी. याचा फायदा स्वर्णकुमारीने उचलला. बायकांची ने-आण करणाऱ्या वा त्यांना गुमराह करणाऱ्या टोळ्यांमधली माणसं (?) कुठेही कसल्याही रुपात वावरत असतात. स्वर्णकुमारी गुंटूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सावज हेरण्याच्या मोहिमेवर होती. यासाठी तिने परिचारिका असल्याचा आव आणला होता. बिनाआईची नि कोलमडल्या कुटुंबाची कोवळी पोर असलेली पुष्पा तिने अचूक हेरली. तिने पुष्पाचा विश्वास संपादित केला. तिच्या वडिलांना तिने कळवले की पुष्पाला विशेष देखरेखीची निकड असल्याने ती आपल्या घरी घेऊन जातेय आणि तिची प्रकृती बरी होताच तिला घरी सोडलं जाईल. परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीने पोटावर मारलेल्या पुष्पाच्या अल्पशिक्षित पित्याचा स्वर्णकुमारीवर सहजी विश्वास बसला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता.

चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..


एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'इन्कार'च्या यशातून शिरपेच खोवला. हेलेनचं 'मुंगळा मुंगळा' गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते. चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. 'मेरे अपने' ते 'कुर्बानी' हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...



कोलकात्यातील कालीघाटापाशी अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका कोठेवालीने हे गाणं ऐकवून, सिनेमा पाहायला सांगितला होता. तोपर्यंत केवळ यातली गाणीच ऐकली होती. शामश्वेत रंगछटेतला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा ‘अदालत’ माझ्या पाहण्यात यायचा एरव्ही प्रश्नच नव्हता. वेश्यांचे आणि तवायफांचे उंबरठे झिजवताना अनेक स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकताना निशब्द झालो, अस्वस्थ झालो नि कोलमडूनही पडलो. तशीच कथा या सत्तरीपार वयातल्या कोठेवालीची होती. तिची दास्तान विचारल्यावर ती फार काही बोलली नव्हती, सोबतच्या बंगाली मित्रापाशी ती त्राग्याने मोजकेच काही पुटपुटली. तिने सांगितले होते म्हणून नंतर आवर्जून हा सिनेमा पाहिला आणि अक्षरशः बधीर होऊन गेलो होतो.

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...



आजपावेतो परवीन नावाच्या तीन स्त्रियांनी मनावर भुरळ घातली होती. पहिली होती पाकिस्तानची प्रसिद्ध कवयित्री शायरा परवीन शाकीर, दुसऱ्या म्हणजे विख्यात भारतीय गायिका परवीन सुल्ताना आणि तिसरी म्हणजे आयुष्याची वीण विस्कटून गेलेली प्रेमभुकेली अभिनेत्री परवीन बाबी. या तीन नावांत गत सप्ताहात भर पडली त्या म्हणजे परवीन रहमान. पाकिस्तानच्या कराचीमध्ये परवीन रहमान या नागरी हक्क चळवळीविषयी जितक्या ओळखल्या जातात. त्याहून अधिक त्यांची ओळख शहर टाऊनप्लॅनर अशी होती. परवीन रहमान यांचा जन्म बांग्लादेशमधला. बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला. परवीन यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन त्यावर नंतर बरेच लेखन केले गेलेय. बांग्लादेशच्याही आधी फाळणीपूर्व ब्रिटीश राजवटीत त्यांचे कुटुंब प्रगत विचारसरणीचे होते आणि कट्टरतावादापासून काहीसे अलिप्त राहण्याकडे त्यांचा कल होता. कालपरत्वे भारतीय उपखंडात भौगोलिक राजकीय बदल होत गेले तरीही त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाले नाहीत. भारताची फाळणी झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रत्यक्ष फाळणीनंतर भारत पाक यांच्यात झालेलं नागरी स्थलांतर याविषयी आपल्याकडे खूप काही लिहिलं गेलेलं आहे. तद्वतच पूर्व पाकिस्तानचा बिमोड करून तेथे बांग्लादेशची निर्मिती झाली. १९७१ च्या या अस्वस्थ कालखंडात काही महत्वाची स्थलांतरे पूर्व पाकिस्तान ते पाकिस्तान अशी झाली. याच रेषेचा एक बिंदू म्हणून बांग्लादेश निर्मिती दरम्यान रहमान कुटुंबियांस ढाक्यात असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी पाकिस्तानात आपल्या आप्तेष्टांकडे जाण्याचे निश्चित केले. कराची मधली त्यांची सुरुवातीची काही वर्षे हलाखीत गेली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. किंबहुना अशाच लसलसत्या जखमा भारताने फाळणी आणि बांग्लादेश निर्मितीवेळीही झेलल्या आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा भागात याची झळ अधिक प्रमाणात बसली. आजही भारतीय राजकारणात आणि समाजकारणात या मुद्द्यांचे प्राबल्य टिकून आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या साहित्यांत यावर नाट्यमय लेखन आढळते.

रविवार, २३ जानेवारी, २०२२

फारच सिम्पल होतं ते !

SAMEER GAIKWAD SAMEERBAPU
फारच सिम्पल होतं ते ... 

मॅटिनीची क्रेझ ओसरत गेली आणि प्रेमकथांचे रंग भडक होत गेले..
आता इतकं गुंतागुंतीचं नव्हतं ते !
दोघांत एक पॉपकॉर्न. एखाद्या महिन्यांत तिच्यासाठी 'गोल्डस्पॉट' त्यात माझ्या वाट्याचे दोनच घोट,
तर कधी लालकाळं थम्सअप इंटरव्हलला !
ती कावरीबावरी होऊन मान खाली घालून बसलेली
अन् मी इकडे तिकडे पाहत मध्येच तिच्याकडे पाहणारा !
फारच सिम्पल होतं ते !

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

डेथ ऑफ गॉडमदर


जगभरात रोज इतक्या घटना घडत असतात की त्यांचा आवाका कळून येत नाही. खेरीज आपल्यापर्यंत बातम्या घटना पोहोचवणारी माध्यमे आपल्या सोयीच्या आणि समविचारी धारणेच्या अनुषंगाने काम करतात त्यामुळे गाळणी लागते. परिणामस्वरूप आपण ज्या माध्यमांवर अवलंबून असतो ती माध्यमे आपल्याला ज्या घटना दाखवतात वा ज्या बातम्या सांगतात तेव्हढाच आपला स्त्रोत मर्यादित होतो. त्या परिघा पलीकडच्या बातम्यांना, घटनांना आपण मुकतो. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेशी आपला तसा थेट संबंध नसतोच मात्र कुठे तरी त्यांचा संदर्भ रोजच्या जगण्याशी कधीतरी निगडीत असतो. रोजच्या घटनांच्या गदारोळात तळाशी जाऊन एखादी घटना निवडून आपल्या जीवनाशी असणारा तिचा संदर्भ खऱ्या अर्थाने उमगतो तेंव्हा आपण थक्क होतो. अशी अज्ञात असणारी घटना आपल्याला कळली नाही तरी फारसे बिघडत नसते मात्र आपल्या जाणीवा समृद्ध होण्यात यांची जी मदत असते त्यापासून आपण वंचित राहतो हे नक्की ! अशीच एक घटना गत महिन्यात घडून गेली जी भारतीय प्रसारमाध्यमात औषधाला देखील आढळली नाही. माफिया जगताची पहिली लेडी बॉस असंता मारेस्का हिचे निधन झाले. तिच्या निधनाची दखल युरोपियन देशातील माध्यमांनी घेणं साहजिक होतं. मात्र मेक्सिकोसह अन्य काही लॅटिन अमेरिकन देशांतही त्याची दखल घेतली. याखेरीज इंडोनेशिया, सोमालिया या देशांनीही दखल घेतली कारण ड्रगतस्करीशी असलेलं या देशांचं नातं. भारतीय माध्यमांत कोणत्या बातम्यांना स्पेस द्यायची याची गणिते ठरलेली आहेत त्यात ही बातमी बसत नसावी सबब आपल्याकडे ती सर्वदूर पोहोचली नाही. असंता मारेस्काचं आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी भरलेलं होतं. तिच्या राईज अँड फॉलची कहानी अगदी फिल्मी आहे.

रविवार, १६ जानेवारी, २०२२

समानतेच्या वाटेवरचा पाकिस्तान...

समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान #sameergaikwad #sameerbapu #समीरगायकवाड
न्यायमूर्ती आयेशा मलिक   

पाकिस्तानबद्दल आपल्या समाजमनात तिथल्या सर्वंकष जाणीवांप्रती एक विशिष्ट द्वेषमूलक प्रतिमा आहे ; तिला बळकटी देण्याचे काम आपली प्रसारमाध्यमे आणि आपला सोशल मीडिया इमानेइतबारे करत असतो. पाकला शत्रूराष्ट्र समजण्यास कुणीच हरकत घेणार नाही मात्र तिथे सारंच प्रतिगामी आणि बुरसटलेलं आहे, तो देश मध्ययुगाहून मागे जातोय, तिथे कमालीची धर्मांधता सर्वच क्षेत्रात नांदते असं चित्र आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. हे खरं वाटण्याजोग्या काही घटना तिथे अधूनमधून घडतही असतात हे नाकारून चालणार नाही मात्र हेच बारोमास असणारे एकमेव सत्य नाहीये हे देखील मांडायला हवे. तिकडे काही सकारात्मक घटना घडली तर आपल्या माध्यमांचा कल ती बातमी लपवण्याकडे असतो. या गृहितकाला बळ देणारी एक विलक्षण मोठी घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडलीय. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायमूर्तींना मंजुरी लाभलीय हीच ती सकारात्मक घटना होय. या अभूतपूर्व घटनेनंतर पाकिस्तानी सोशल मीडिया त्या न्यायमूर्तींच्या कौतुकाने ओसंडून वाहत होता हे विशेष होय !

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

उन्हांचं इर्जिक...



गेल्या वर्षी पौषात वाऱ्यावावदानाने पाण्याच्या दंडावरची चिंचेची झाडे मोडून पडली होती. त्यातली घरटी उध्वस्त झाली.दंडाच्या कडेला दोन सालाधी चतुरेला पुरलेलं होतं. चतुरा जिवंत होती तेंव्हा तिच्यासह तिच्या वासरांच्या पाठीवर पक्षांची सगळी फलटण स्थिरावलेली असे. चतुरेला जाऊन दोन साल झाले, गेल्या साली पक्षांची घरटीही मोडली. साल भर येड्यावाणी पाऊस पडला. दंडाखाली तण उगवलं. काही झाडं तगली, काही मुळातून उपसलेली जळून गेली. दंडाजवळचं कंबरेइतके वाढलेलं तण उपसून काढलं, तेंव्हा चिंचेचं नवं झाड रुजलेलं दिसलं. दंडावरच्या झाडांत आता लवकरच पक्षीही परततील. दोनेक सालात चिंचेला गाभूळलेलं फळ येईल तेंव्हा चतुरेच्या दुधाचा गोडवा त्यात उतरलेला असेल. मी असाच चिंचेखाली सावलीत बसलेला असेन आणि भवताली दरवळ असेल पौषातल्या उन्हांचा ! उन्हे जी माझ्या वाडवडलांचा सांगावा घेऊन येतात, झाडांच्या पानात सांगतात, झाडांखाली उभी असलेली गुरे तो ऐकतात, सांजेला गुरं गोठ्यात परततात, माझ्या गालांना हातांना चाटतात तेंव्हा उन्हांचे सांगावे माझ्या देहात विरघळलेले असतात. मी तृप्त झालेला असतो...

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

देह दाह ... @सिगारेट्स


सिगारेट पिणाऱ्या लोकांची एक वेगळीच दुनिया असते.
काही पट्टीचे धूरसोडे असतात, काही स्ट्रेसपायी ओढतात,
काही चोरून पिणारे तर काही हौशी तर काही थ्रिलपायी पिणारे असतात.
काही आहारी गेलेले गंजेडी सिगारेटी असतात !
काही किक बसावी म्हणून पितात तर काहींना पूर्ण ब्लँक झाल्यागत वाटते तेंव्हा तलफ येतेच !
काही मात्र निव्वळ रिबेलर असतात, मात्र हे काही बंडाचे खरे प्रतीक नव्हे हे त्यांना पचनी पडत नसते !

भकाभका धूर सोडणारे वेगळे आणि शांतपणे धुम्रवलये सोडणारे वेगळे.
पिवळा हत्ती, चारमिनार, फोर स्क्वेअर यांचे जग वेगळे आणि मर्लबोरो, डनहिल, नेव्ही कट, रेड अँड व्हाईट यांचे जग वेगळे.
काही दारू पिताना सिगारेट्स ओढतात तर काही पिऊन झाल्यावर ओढतात तर काही सिपगणिक कश मारतात. काही दारूच्या लास्ट सिपमध्ये सिगारेट संपवून टाकतात !

सोमवार, १० जानेवारी, २०२२

देहगंध - मधू नारंग... @रेड लाईट डायरीज



नोंदी - कोठ्यांमध्ये नर्तिका नाचत असते तेंव्हा हिंदी सिनेमात दाखवतात तसं मद्य पिता येत नाही, तेंव्हा पान खाण्यास अनुमती असते. दोन कडव्यांच्या मध्ये पिकदाणीत थुंकणे हा तेहजीबचा भाग समजला जातो, जो केंव्हाही अधेमधे थुंकतो तो बदतमीज नालायक समजला जातो.
गाणं संपल्यानंतर केवळ वाद्यांचा साज जेंव्हा रंगू लागतो तेंव्हा मद्याचे प्याले ओठास लावता येतात, तेंव्हा नर्तिका ठुमके देखील लावत नाही.

'हमरी अटरियां पे..' हे बेगम अख्तर यांनी गायलेलं गाणं गाण्याचा आग्रह अनेक ठिकाणी होताना मी पाहिलाय. मात्र यातला अटरी म्हणजेच कोठा हे अनेकांना ठाऊक नसते, एक छोटेखानी घर आणि त्याच्या वरच्या भागातील सज्जावजा छोटीशी खोली म्हणजे अटरी, जिथे दुमजली घर नसते तिथे पहिल्या मजल्यावरील व्हरांडावजा भागास अटरी संबोधण्यावाचून पर्याय नसतो. या अटरीमध्ये खाजगी मैफिली रंगत. म्हणून तिचं लडिवाळ आमंत्रण असे की, "हमरी अटरियां पे आ जाओं सजनवा..."
या आवतणातली मिठास कातिल असे..

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

इतकी श्रीमंती हवी ...

घेणाऱ्या हरेक हातांना देता यायला पाहिजे इतकी श्रीमंती हवी !

'प्रभात'जवळील सिग्नलपाशी एक जर्जर वृद्धा आणि तिची गतिमंद मुलगी नेहमी दिसे. आज दुपारची कातरगोष्ट.
सिग्नलपाशी भीक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या.
त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती.
त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले.
त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या.
काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती.
त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते.
त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते.

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

समृद्धी याहून काय वेगळी असते ?



आप्तेष्ट, गणगोत, घरदार, जगरहाटी याही पलीकडे एक जग आहे.
ज्यात झाडं आहेत, शेतं आहेत, पानं फुलं आहेत,
मधुर स्वरांची रुंजी घालणारा वारा आहे, मन चिंब करून जाणारा पाऊस आहे,
अंगांग जाळून काढणारं रखरखीत ऊन आहे, डेरेदार सावल्या आहेत,
गहिवरल्या डोळ्यात पाणी आणून मायेनं बघणाऱ्या गायी आहेत,
रात्री निशब्द होणारे गोठे आहेत,
बांधाबांधावरच्या अबोल बोरी बाभळी आहेत,
खोल खोल विहिरीत घुमणारे निळेकरडे पारवे आहेत,
पायाशी मस्ती करणारी काळी माती आहे.

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

साडी मनामनातली आणि अंधाराच्या सांदीतली...



हरेकाच्या घरात एखादी तरी जुनी साडी असतेच जी गतपिढीतील कुणीतरी नव्या पिढीच्या वारसदारांसाठी जपून ठेवलेली असते.
साडी नेसणारी स्त्री अनंताच्या प्रवासाला गेल्यावर तिच्या साड्यांचे काय करायचे हे त्या त्या घरातले लोक ठरवतात. कुणी आठवण म्हणून नातलगांत वाटून टाकतात तर कुणी कुलूपबंद अलमारीत घड्या घालून ठेवतात.
अलमारी खोलली की त्या साड्या समोर दिसतात, त्यांच्यावर त्या स्त्रीने किती प्रेमाने हात फिरवलेला असेल नाही का ! किती आनंदाने तिने त्या साड्या नेसलेल्या असतात, किती मिरवलेले असते त्यात !
त्यांच्यावरून हात फिरवला की तिच्या स्पर्शाची अनुभूती मिळते.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास जेंव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं तेंव्हा कपाटात घडी घालून ठेवलेली आईची साडी पांघरून झोपी जातो ; 
सारी दुःखे हलकी होतात, सल मिटतात आणि आईच्या कुशीत झोपल्याचे समाधान मिळते !

जगण्याचे पसायदान



शास्त्र इतकं पुढे चाललंय की गांडुळालाही फणा लावता येईल. पण त्याने काय साध्य होईल ? डंख मारण्याची प्रवृत्ती उपजतच असावी लागते. ती कुठून पैदा करणार ?
प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला एक प्रवृत्ती असते. ती कळायला हवी त्यातून जग कळण्यास मदत होते.

मोगऱ्याच्या कळ्यांनी बिछाना सजवता येईल, सखीच्या केसात गजरे माळता येतील, मनगटावर लफ्फे बांधता येतील, शृंगाराच्या प्रत्येक पायरीवर मोगरा चुरगळता येईल. तिथं तुळशीच्या मंजुळा कधीच कामी येणार नाहीत !
मात्र ईश्वरासाठी हार विणताना मोगऱ्याचा विचार कमी होईल आणि मंजुळा जास्ती कामी येतील !

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी..

ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी.. #समीरगायकवाड #समीरबापू #sameergaikwad
ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी - पूर्वप्रसिद्धी दैनिक सामना 

ऑनर किलिंगच्या घटना आपल्या देशात मागील दोन दशकांपासून घडताहेत. सुरुवातीला त्याविरोधात देशभरात आक्रोश दिसायचा. आता केवळ हतबलता दिसते आणि धक्का बसलेला जाणवतो. समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत गढून जातो. मागील दशकांत घडलेल्या बहुतांश घटनांत घरच्या मंडळींचा विरोध पत्करून परधर्मीय वा परजातीय जोडीदाराशी विवाह केलेल्या युगुलासच याला सामोरे जावे लागले होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत सजातीय विवाह करून देखील केवळ आर्थिक विषमतेपायी जीवे मारण्याचा अमानुष नीचपणा दिसून येतोय. समाजात विषमतेचा, जातीयतेचा, अस्मितेचा नि अभिनिवेशाचा अभिमान अहंकार आता किळसवाण्या विखारात बदलत चाललाय ज्यामुळे सामाजिक समतेची मुळे अधिकाधिक कमकुवत होताहेत. इथे वानगीदाखल मागच्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन गोष्टींचा ओघवता परामर्श घेतलाय.

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

निस्सीम प्रेमाची अमरकथा.. रवींद्रनाथ ठाकूर आणि नलिनी !




प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बऱ्याचदा प्रेमाचे काही आदर्श असतातच. जे की त्याने वाचलेले, ऐकलेले वा पाहिलेले असतात. लैलामजनू, हिर रांझा, रोमिओ ज्युलियेट ही यातली जुनी नावे. फिल्मी जोड्या आणि त्यांच्या भूमिकांची नावे जसे की वासू सपना, वीर झारा यांचाही प्रभाव असतो. याहून भिन्न प्रकृतीचाही एक महत्वाचा घटक असतो ज्याचा प्रेमी युगुलांवर प्रभाव जाणवतो तो म्हणजे साहित्य. त्यातही प्रेमकवितांचा ठसा अधिक. यात पुन्हा व्यक्तीसापेक्ष कवितांची नि कवीची नामावली वेगळीच समोर येते. त्यातही रवींद्रनाथ ठाकूर यांचे नाव बहुश्रुत असेच आहे. त्याचे कारण त्यांच्या काव्यरचनेच्या वैशिष्ट्यांत आणि त्यामागच्या पार्श्वभूमीमध्ये आहे.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

सुलोचना, मीना आणि काळजावरचे भळभळते घाव..



काही घाव कधीच भरून येत नाहीत...
मीनाच्या मध्यस्थीतून सुलोचनाने भेटीसाठी निरोप दिलेला असल्याने तिला भेटायचे होते मात्र लॉकडाऊनच्या काळात तिला भेटता आलं नाही.
२००६ मध्ये तिच्यावर बलात्कार झालेला. आरोपी पकडले गेले. खटला भरला गेला आणि त्यांना चौदा वर्षांची सक्तमजूरीची सजा लागली.
बलात्कार झाल्यानंतर पती अरुणचं तिच्यासोबतच वर्तन हळूहळू बदलत गेलं.
सुरुवातीला लढा, संघर्ष इत्यादी शब्दांनी तिला खूप भारी वाटायचं, मात्र नंतर आपल्या अरुणचं बदलतं स्वरूप पाहून ती घाबरून गेली.

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHOने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेंव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेंव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला ? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर !

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

झुलवा - अंधार वेगाने वाढतो आहे...



सुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ या चौकडीचं नशीब अगदी भुस्नाळ होतं. सशानं बिळातनं बाहेर यावं नि नेमकं त्याच वक्ताला शिकारी कुत्र्यानं हगवणीसाठी पाय आखडून घ्यावं तसं त्यांचं भाग्य !
सुलीचं पूर्ण नाव मला अजूनही ठाऊक नाही. थोराड बाया तिला सुली म्हणतात तर कुणी समवयीन तिला सुलू म्हणतात. पुरुष मात्र लोचना नाहीतर सुलोचना या नावांनीच तिला पुकारतात. सुलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख नवरात्र होय ! तिला नेहमी वाटतं की नवरात्र कधीच संपू नये. सालभर नवरात्र असावी असंच तिला वाटतं. अश्विन पौर्णिमा सरली की दमून गेलेली सुली अगदी निपचित होई. हे चौघेही दुसऱ्या दिवशी दुपारून धुम्मस मारून तानीबाईच्या खोपटात बसत. माणिकरावच्या अड्ड्यावरून दत्त्या देशी थर्रा घेऊन येई. तानी स्वतःच्या हाताने वाडगं भरून थोडं लालभडक रश्श्याचं आणि थोडं सुकं मटन करायची. राम्या खिमा उंडे नि तिखट बुंदी घेऊन यायचा. काशिनाथची बायको त्याला चपात्याची चळत देई. सुली पिताना बडबडत नाही. शून्यात नजर लावून बसते. तिचं गुमान राहणं हेच तिचं बोलणं हे बाकीच्यांना माहिती होतं. स्टीलच्या ताटांनी मटन, खिमा वाढून झाला की तानीचं काम संपे. मग ती प्यायला सुरुवात करे. जाम बरळायची ती. दत्त्या एकदम हरामी. किती जरी ढोसली तरी त्याला फरक पडत नसे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

इर्शाद आणि विषाद ..




सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..

इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

नथीचा दुखरा कोपरा...

सामान्य स्त्रीच्या जीवनात नथीला खूप महत्व आहे. मात्र सभ्य स्त्रीच्या जगापलीकडे एक जग आहे जे पांढरपेशी विश्वाशी फारकत घेऊन आहे. या जगात देखण्या बायकांची भेसूर दुःखे आहेत. या दुःखांचा परमकाल या नथीशी संबधित आहे म्हणूनच यावर विचार झाला पाहिजे.

स्त्री काही दागिने परंपरा रिवाज म्हणून घालते तर काही दागिने हौस म्हणून तर काही दागिने शृंगारासाठी घातले जातात. यातील काही दागिने स्त्रीच्या शरीर सौष्ठवात भर घालतात तर काहींनी तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. माथ्यावरच्या बिंदी, भांगसरने सुरुवात होते आणि पैंजण जोड्व्याने इतिश्री होते.

अग्रफूल, गोंडे, केकत (केवडा), बेसर, मुरकी, मोहनमाळ, बोरमाळ, डोरलं, खोड, बाजूबंद, मणदोरा (कंबरपट्टा), कोल्हापुरी साज, अंगठी, छल्ला, पैंजण, अनवट, जोडवी असे एक ना अनेक दागिने आहेत तरीही नथीला महत्व आहे. याचं कारण काय असावं ?

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...

सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल. 

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

वेश्यांच्या जागांवर कुणाचा डोळा ?..

हजारो किमी अंतरावरील अफगाणी महिलांचा आपल्या लोकांना कळवळा आलाय यात वाईट नाहीये मात्र आपल्या बुडाखाली काय होतेय याचीही जरा माहिती ठेवायला हवी. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरातील 'गंगा जमुना' या रेड लाईट एरियात कर्फ्यू लावलेल्या घटनेस आता आठवडा होईल.
इथल्या बायकांचा आक्रोश कुणाच्या कानी पडत नाहीये कारण हा मुद्दा चलनात आल्याने कुणाचीच पोळी भाजली जाणार नाहीये.
उलटपक्षी या बायका देशोधडीला लागल्या तर लाखो कोटीहून अधिक किंमतीच्या जागा हडपण्याचे पुण्यकाम आपसात वाटून घेऊन करता येतं हे आपल्या लोकांना पक्कं ठाऊक आहे .

पोलिसांचे म्हणणे आहे की या भागात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातंय. गुन्हेगारांचा वावरही आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहेत. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्रीही होत आहे, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. परिसरातील नगरसेवक आणि संबंधितांनी गंगाजमनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गत बुधवारी रात्री गंगा-जमुना सील केली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली असं पोलीस सांगतात.

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

मैत्रीची अनोखी दास्तान : मार्टिना - ख्रिस



आपल्यापैकी किती जण टेनिसचे चाहते आहेत ठाऊक नाही आणि कितीजण या दोघींना ओळखतात याची कल्पना नाही. मात्र जे ह्या दोघींबद्दल जाणतात त्यांच्या लेखी या दोघीजणी म्हणजे टेनिसकोर्टवरच्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी होत. या दोघींनी तब्बल सोळा वर्षे नेटच्या दोन्ही बाजूंनी लढत टेनिसचं युद्ध खेळलं. त्या इतक्या त्वेषाने लढायच्या की प्रेक्षकांना स्फुरण यायचं. विशेषतः अंतिम सामन्यात या आमने सामने आल्या की क्रिडारसिकांना मेजवानी लाभे. त्या अक्षरशः तुटून पडत. दोघींना अफाट पाठीराखे लाभले होते. दोघींनाही मोठ्या संख्येत प्रेक्षक चिअरअप करायचे.
महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.

शनिवार, २४ जुलै, २०२१

पाऊस कुठे चुकलाय ?


लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय.. वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय. असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ? पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा. शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा,
ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा. आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,
काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा. आभाळमाया करायचा,
सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा, वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,
त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..