शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

उन्हांचं इर्जिक...



गेल्या वर्षी पौषात वाऱ्यावावदानाने पाण्याच्या दंडावरची चिंचेची झाडे मोडून पडली होती. त्यातली घरटी उध्वस्त झाली.दंडाच्या कडेला दोन सालाधी चतुरेला पुरलेलं होतं. चतुरा जिवंत होती तेंव्हा तिच्यासह तिच्या वासरांच्या पाठीवर पक्षांची सगळी फलटण स्थिरावलेली असे. चतुरेला जाऊन दोन साल झाले, गेल्या साली पक्षांची घरटीही मोडली. साल भर येड्यावाणी पाऊस पडला. दंडाखाली तण उगवलं. काही झाडं तगली, काही मुळातून उपसलेली जळून गेली. दंडाजवळचं कंबरेइतके वाढलेलं तण उपसून काढलं, तेंव्हा चिंचेचं नवं झाड रुजलेलं दिसलं. दंडावरच्या झाडांत आता लवकरच पक्षीही परततील. दोनेक सालात चिंचेला गाभूळलेलं फळ येईल तेंव्हा चतुरेच्या दुधाचा गोडवा त्यात उतरलेला असेल. मी असाच चिंचेखाली सावलीत बसलेला असेन आणि भवताली दरवळ असेल पौषातल्या उन्हांचा ! उन्हे जी माझ्या वाडवडलांचा सांगावा घेऊन येतात, झाडांच्या पानात सांगतात, झाडांखाली उभी असलेली गुरे तो ऐकतात, सांजेला गुरं गोठ्यात परततात, माझ्या गालांना हातांना चाटतात तेंव्हा उन्हांचे सांगावे माझ्या देहात विरघळलेले असतात. मी तृप्त झालेला असतो...

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

देह दाह ... @सिगारेट्स


सिगारेट पिणाऱ्या लोकांची एक वेगळीच दुनिया असते.
काही पट्टीचे धूरसोडे असतात, काही स्ट्रेसपायी ओढतात,
काही चोरून पिणारे तर काही हौशी तर काही थ्रिलपायी पिणारे असतात.
काही आहारी गेलेले गंजेडी सिगारेटी असतात !
काही किक बसावी म्हणून पितात तर काहींना पूर्ण ब्लँक झाल्यागत वाटते तेंव्हा तलफ येतेच !
काही मात्र निव्वळ रिबेलर असतात, मात्र हे काही बंडाचे खरे प्रतीक नव्हे हे त्यांना पचनी पडत नसते !

भकाभका धूर सोडणारे वेगळे आणि शांतपणे धुम्रवलये सोडणारे वेगळे.
पिवळा हत्ती, चारमिनार, फोर स्क्वेअर यांचे जग वेगळे आणि मर्लबोरो, डनहिल, नेव्ही कट, रेड अँड व्हाईट यांचे जग वेगळे.
काही दारू पिताना सिगारेट्स ओढतात तर काही पिऊन झाल्यावर ओढतात तर काही सिपगणिक कश मारतात. काही दारूच्या लास्ट सिपमध्ये सिगारेट संपवून टाकतात !

सोमवार, १० जानेवारी, २०२२

देहगंध - मधू नारंग... @रेड लाईट डायरीज



नोंदी - कोठ्यांमध्ये नर्तिका नाचत असते तेंव्हा हिंदी सिनेमात दाखवतात तसं मद्य पिता येत नाही, तेंव्हा पान खाण्यास अनुमती असते. दोन कडव्यांच्या मध्ये पिकदाणीत थुंकणे हा तेहजीबचा भाग समजला जातो, जो केंव्हाही अधेमधे थुंकतो तो बदतमीज नालायक समजला जातो.
गाणं संपल्यानंतर केवळ वाद्यांचा साज जेंव्हा रंगू लागतो तेंव्हा मद्याचे प्याले ओठास लावता येतात, तेंव्हा नर्तिका ठुमके देखील लावत नाही.

'हमरी अटरियां पे..' हे बेगम अख्तर यांनी गायलेलं गाणं गाण्याचा आग्रह अनेक ठिकाणी होताना मी पाहिलाय. मात्र यातला अटरी म्हणजेच कोठा हे अनेकांना ठाऊक नसते, एक छोटेखानी घर आणि त्याच्या वरच्या भागातील सज्जावजा छोटीशी खोली म्हणजे अटरी, जिथे दुमजली घर नसते तिथे पहिल्या मजल्यावरील व्हरांडावजा भागास अटरी संबोधण्यावाचून पर्याय नसतो. या अटरीमध्ये खाजगी मैफिली रंगत. म्हणून तिचं लडिवाळ आमंत्रण असे की, "हमरी अटरियां पे आ जाओं सजनवा..."
या आवतणातली मिठास कातिल असे..

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

इतकी श्रीमंती हवी ...

घेणाऱ्या हरेक हातांना देता यायला पाहिजे इतकी श्रीमंती हवी !

'प्रभात'जवळील सिग्नलपाशी एक जर्जर वृद्धा आणि तिची गतिमंद मुलगी नेहमी दिसे. आज दुपारची कातरगोष्ट.
सिग्नलपाशी भीक मागत फिरणाऱ्या दोन प्रौढ स्त्रिया मागेपुढे करत होत्या.
त्यांच्या पाठीवरच्या झोळीत तान्हुली पोरे होती.
त्या स्त्रियांना कोपऱ्यावरच्या वडापाववाल्याने एका कागदाच्या भेंडोळीत वडे बांधून दिले.
त्यांना भूक खूप लागली असावी, रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या कंपाउंड वॉललगतच्या सावलीत त्या दोघी बसल्या.
काही अंतरावर बसलेली वृद्धा त्या दोघींना आशाळभूत नजरेने पाहत होती.
त्या दोघींचे मात्र तिच्याकडे लक्ष नव्हते.
त्यांचे धुळीत माखलेले, भेगाळलेले अनवाणी पाय त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्षांची ग्वाही देत होते.

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

समृद्धी याहून काय वेगळी असते ?



आप्तेष्ट, गणगोत, घरदार, जगरहाटी याही पलीकडे एक जग आहे.
ज्यात झाडं आहेत, शेतं आहेत, पानं फुलं आहेत,
मधुर स्वरांची रुंजी घालणारा वारा आहे, मन चिंब करून जाणारा पाऊस आहे,
अंगांग जाळून काढणारं रखरखीत ऊन आहे, डेरेदार सावल्या आहेत,
गहिवरल्या डोळ्यात पाणी आणून मायेनं बघणाऱ्या गायी आहेत,
रात्री निशब्द होणारे गोठे आहेत,
बांधाबांधावरच्या अबोल बोरी बाभळी आहेत,
खोल खोल विहिरीत घुमणारे निळेकरडे पारवे आहेत,
पायाशी मस्ती करणारी काळी माती आहे.

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

साडी मनामनातली आणि अंधाराच्या सांदीतली...



हरेकाच्या घरात एखादी तरी जुनी साडी असतेच जी गतपिढीतील कुणीतरी नव्या पिढीच्या वारसदारांसाठी जपून ठेवलेली असते.
साडी नेसणारी स्त्री अनंताच्या प्रवासाला गेल्यावर तिच्या साड्यांचे काय करायचे हे त्या त्या घरातले लोक ठरवतात. कुणी आठवण म्हणून नातलगांत वाटून टाकतात तर कुणी कुलूपबंद अलमारीत घड्या घालून ठेवतात.
अलमारी खोलली की त्या साड्या समोर दिसतात, त्यांच्यावर त्या स्त्रीने किती प्रेमाने हात फिरवलेला असेल नाही का ! किती आनंदाने तिने त्या साड्या नेसलेल्या असतात, किती मिरवलेले असते त्यात !
त्यांच्यावरून हात फिरवला की तिच्या स्पर्शाची अनुभूती मिळते.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास जेंव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं तेंव्हा कपाटात घडी घालून ठेवलेली आईची साडी पांघरून झोपी जातो ; 
सारी दुःखे हलकी होतात, सल मिटतात आणि आईच्या कुशीत झोपल्याचे समाधान मिळते !

जगण्याचे पसायदान



शास्त्र इतकं पुढे चाललंय की गांडुळालाही फणा लावता येईल. पण त्याने काय साध्य होईल ? डंख मारण्याची प्रवृत्ती उपजतच असावी लागते. ती कुठून पैदा करणार ?
प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला एक प्रवृत्ती असते. ती कळायला हवी त्यातून जग कळण्यास मदत होते.

मोगऱ्याच्या कळ्यांनी बिछाना सजवता येईल, सखीच्या केसात गजरे माळता येतील, मनगटावर लफ्फे बांधता येतील, शृंगाराच्या प्रत्येक पायरीवर मोगरा चुरगळता येईल. तिथं तुळशीच्या मंजुळा कधीच कामी येणार नाहीत !
मात्र ईश्वरासाठी हार विणताना मोगऱ्याचा विचार कमी होईल आणि मंजुळा जास्ती कामी येतील !

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी..

ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी.. #समीरगायकवाड #समीरबापू #sameergaikwad
ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी - पूर्वप्रसिद्धी दैनिक सामना 

ऑनर किलिंगच्या घटना आपल्या देशात मागील दोन दशकांपासून घडताहेत. सुरुवातीला त्याविरोधात देशभरात आक्रोश दिसायचा. आता केवळ हतबलता दिसते आणि धक्का बसलेला जाणवतो. समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत गढून जातो. मागील दशकांत घडलेल्या बहुतांश घटनांत घरच्या मंडळींचा विरोध पत्करून परधर्मीय वा परजातीय जोडीदाराशी विवाह केलेल्या युगुलासच याला सामोरे जावे लागले होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत सजातीय विवाह करून देखील केवळ आर्थिक विषमतेपायी जीवे मारण्याचा अमानुष नीचपणा दिसून येतोय. समाजात विषमतेचा, जातीयतेचा, अस्मितेचा नि अभिनिवेशाचा अभिमान अहंकार आता किळसवाण्या विखारात बदलत चाललाय ज्यामुळे सामाजिक समतेची मुळे अधिकाधिक कमकुवत होताहेत. इथे वानगीदाखल मागच्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन गोष्टींचा ओघवता परामर्श घेतलाय.

मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१

निस्सीम प्रेमाची अमरकथा.. रवींद्रनाथ ठाकूर आणि नलिनी !




प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बऱ्याचदा प्रेमाचे काही आदर्श असतातच. जे की त्याने वाचलेले, ऐकलेले वा पाहिलेले असतात. लैलामजनू, हिर रांझा, रोमिओ ज्युलियेट ही यातली जुनी नावे. फिल्मी जोड्या आणि त्यांच्या भूमिकांची नावे जसे की वासू सपना, वीर झारा यांचाही प्रभाव असतो. याहून भिन्न प्रकृतीचाही एक महत्वाचा घटक असतो ज्याचा प्रेमी युगुलांवर प्रभाव जाणवतो तो म्हणजे साहित्य. त्यातही प्रेमकवितांचा ठसा अधिक. यात पुन्हा व्यक्तीसापेक्ष कवितांची नि कवीची नामावली वेगळीच समोर येते. त्यातही रवींद्रनाथ ठाकूर यांचे नाव बहुश्रुत असेच आहे. त्याचे कारण त्यांच्या काव्यरचनेच्या वैशिष्ट्यांत आणि त्यामागच्या पार्श्वभूमीमध्ये आहे.

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

सुलोचना, मीना आणि काळजावरचे भळभळते घाव..



काही घाव कधीच भरून येत नाहीत...
मीनाच्या मध्यस्थीतून सुलोचनाने भेटीसाठी निरोप दिलेला असल्याने तिला भेटायचे होते मात्र लॉकडाऊनच्या काळात तिला भेटता आलं नाही.
२००६ मध्ये तिच्यावर बलात्कार झालेला. आरोपी पकडले गेले. खटला भरला गेला आणि त्यांना चौदा वर्षांची सक्तमजूरीची सजा लागली.
बलात्कार झाल्यानंतर पती अरुणचं तिच्यासोबतच वर्तन हळूहळू बदलत गेलं.
सुरुवातीला लढा, संघर्ष इत्यादी शब्दांनी तिला खूप भारी वाटायचं, मात्र नंतर आपल्या अरुणचं बदलतं स्वरूप पाहून ती घाबरून गेली.

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHOने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्तवण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेंव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेंव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती. असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला ? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्त कंठाने आपल्याकडील सेक्सवर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर !

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

झुलवा - अंधार वेगाने वाढतो आहे...



सुली, दत्त्या, राम्या आणि काशिनाथ या चौकडीचं नशीब अगदी भुस्नाळ होतं. सशानं बिळातनं बाहेर यावं नि नेमकं त्याच वक्ताला शिकारी कुत्र्यानं हगवणीसाठी पाय आखडून घ्यावं तसं त्यांचं भाग्य !
सुलीचं पूर्ण नाव मला अजूनही ठाऊक नाही. थोराड बाया तिला सुली म्हणतात तर कुणी समवयीन तिला सुलू म्हणतात. पुरुष मात्र लोचना नाहीतर सुलोचना या नावांनीच तिला पुकारतात. सुलीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख नवरात्र होय ! तिला नेहमी वाटतं की नवरात्र कधीच संपू नये. सालभर नवरात्र असावी असंच तिला वाटतं. अश्विन पौर्णिमा सरली की दमून गेलेली सुली अगदी निपचित होई. हे चौघेही दुसऱ्या दिवशी दुपारून धुम्मस मारून तानीबाईच्या खोपटात बसत. माणिकरावच्या अड्ड्यावरून दत्त्या देशी थर्रा घेऊन येई. तानी स्वतःच्या हाताने वाडगं भरून थोडं लालभडक रश्श्याचं आणि थोडं सुकं मटन करायची. राम्या खिमा उंडे नि तिखट बुंदी घेऊन यायचा. काशिनाथची बायको त्याला चपात्याची चळत देई. सुली पिताना बडबडत नाही. शून्यात नजर लावून बसते. तिचं गुमान राहणं हेच तिचं बोलणं हे बाकीच्यांना माहिती होतं. स्टीलच्या ताटांनी मटन, खिमा वाढून झाला की तानीचं काम संपे. मग ती प्यायला सुरुवात करे. जाम बरळायची ती. दत्त्या एकदम हरामी. किती जरी ढोसली तरी त्याला फरक पडत नसे.

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

इर्शाद आणि विषाद ..




सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..

इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

प्रेमिस्ते...


विख्यात तमिळ चित्रपट दिग्दर्शक एस. शंकर हे एकदा रेल्वेतून चेन्नैला प्रवास करत होते तेंव्हा एक विलक्षण घटना घडलेली. त्यांच्या कंपार्टमेंटमधील एका प्रवाशाला दुसऱ्या सहप्रवाशाकडून कळले की आपल्या बोगीमध्ये आपल्या सोबत एस. शंकर हे प्रवास करताहेत. काही क्षण त्या प्रवाशाने विचार केला, मग मनोनिश्चय करून तो शंकर यांच्या पुढ्यात जाऊन बसला. त्याने आधी समोरील व्यक्ती शंकर असल्याची खात्री करून घेतली नि  पुढच्याच क्षणाला त्याने शंकर यांचे हात आपल्या हाती घेतले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. त्याने शंकरना विनवणीच्या स्वरात एक प्रश्न केला, "सर मी एक कथा सांगतो तुम्ही त्यावर सिनेमा बनवाल का ?" शंकर बुचकळ्यात पडले. त्यांची द्विधा मनस्थिती त्या प्रवाशाने ओळखली आणि तो बोलता झाला, "ही काही काल्पनिक कथा नाहीये, ही माझ्या जीवनात घडलेली सत्यकथा आहे." त्याच्या उद्गारासरशी शंकरनी मान डोलावली. काही क्षण तो व्यक्ती गप्प झाला, शून्यात नजर लावून थिजून बसला. नंतर तो बोलत राहिला. कथा संपली तेंव्हा त्याच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते. त्या कथेने शंकर स्तब्ध सद्गदित झाले. तो प्रवासी पन्नाशीच्या आसपासचा होता, त्याने सांगितलेली जीवनकथा त्याच्या मुलीच्या बाबतीतली होती. त्या व्यक्तीला आपल्या चुकांचे प्रायश्चित्त करायचे होते आणि आपण केलेली चूक दुसऱ्या कुणी व्यक्तीने करू नये म्हणून त्यावर सिनेमा निर्मिती व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा होती. शंकरनि त्याला शब्द दिला आणि त्यावर २००४ साली सिनेमा बनवला. 'काधल' हे त्याचे नाव. काधल म्हणजे प्रेम. सिनेमाने तिकीटबारीवर अक्षरशः टांकसाळ खोलली. अगदी लोबजेट सिनेमा होता तो, त्याच्या यशाने भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली. याच सिनेमाचा २००५ मध्ये तेलुगुमध्ये रिमेक झाला, त्याचे नाव होते 'प्रेमिस्ते' !

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

नथीचा दुखरा कोपरा...

सामान्य स्त्रीच्या जीवनात नथीला खूप महत्व आहे. मात्र सभ्य स्त्रीच्या जगापलीकडे एक जग आहे जे पांढरपेशी विश्वाशी फारकत घेऊन आहे. या जगात देखण्या बायकांची भेसूर दुःखे आहेत. या दुःखांचा परमकाल या नथीशी संबधित आहे म्हणूनच यावर विचार झाला पाहिजे.

स्त्री काही दागिने परंपरा रिवाज म्हणून घालते तर काही दागिने हौस म्हणून तर काही दागिने शृंगारासाठी घातले जातात. यातील काही दागिने स्त्रीच्या शरीर सौष्ठवात भर घालतात तर काहींनी तिचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. माथ्यावरच्या बिंदी, भांगसरने सुरुवात होते आणि पैंजण जोड्व्याने इतिश्री होते.

अग्रफूल, गोंडे, केकत (केवडा), बेसर, मुरकी, मोहनमाळ, बोरमाळ, डोरलं, खोड, बाजूबंद, मणदोरा (कंबरपट्टा), कोल्हापुरी साज, अंगठी, छल्ला, पैंजण, अनवट, जोडवी असे एक ना अनेक दागिने आहेत तरीही नथीला महत्व आहे. याचं कारण काय असावं ?

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

माणसांचं स्क्रोलिंग आणि टॉलस्टॉयची गोष्ट ...

सोशल मीडियापासून दूर असलेली माणसं अलीकडील काळात दृष्टीपथात नाहीत. अगदी खेडोपाडी देखील याचा बोलबाला आहे. पूर्वीच्या काळातला आर्थिक वर्गवारीचा भेद देखील याला अडवू शकला नाही. जाती, धर्म, वर्ण, वय, लिंग, भाषा, प्रांत, उत्पन्न इत्यादी सर्व बंधने यास रोखू शकली नाहीत हे सत्य आता सर्वमान्य झालेय. दिड जीबीचा डाटा हा आता विनोदाचा आणि मिम्सचा विषय होय पाहतोय. लोकांकडे फोन्स कुठून आले, रिचार्ज कसे परवडते किंवा हे सर्व पेलवते कसे हे सगळे विविध शास्त्रांचे विषय आहेत. खरा प्रश्न हा पडतो की माणूस सोशल मीडिया वापरतोय की सोशल मीडिया माणसाला वापरतोय ? हा प्रश्न म्हणजे निव्वळ शब्दच्छल नाहीये किंवा विभ्रमनिर्मितीचा मुद्दा नाहीये. हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो पुढे जाऊन मानवी समुदायाला एका गंभीर नि धोकादायक वळणावर नेऊ शकतो. थोडंसं सुलभ करूया म्हणजे सहज मतितार्थ उमगेल. 

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

वेश्यांच्या जागांवर कुणाचा डोळा ?..

हजारो किमी अंतरावरील अफगाणी महिलांचा आपल्या लोकांना कळवळा आलाय यात वाईट नाहीये मात्र आपल्या बुडाखाली काय होतेय याचीही जरा माहिती ठेवायला हवी. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरातील 'गंगा जमुना' या रेड लाईट एरियात कर्फ्यू लावलेल्या घटनेस आता आठवडा होईल.
इथल्या बायकांचा आक्रोश कुणाच्या कानी पडत नाहीये कारण हा मुद्दा चलनात आल्याने कुणाचीच पोळी भाजली जाणार नाहीये.
उलटपक्षी या बायका देशोधडीला लागल्या तर लाखो कोटीहून अधिक किंमतीच्या जागा हडपण्याचे पुण्यकाम आपसात वाटून घेऊन करता येतं हे आपल्या लोकांना पक्कं ठाऊक आहे .

पोलिसांचे म्हणणे आहे की या भागात कोरोना नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातंय. गुन्हेगारांचा वावरही आहे. काही दलाल अल्पवयीन मुलींवर देहविक्रीसाठी जबरदस्ती करत आहेत. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सची विक्रीही होत आहे, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात आली. परिसरातील नगरसेवक आणि संबंधितांनी गंगाजमनामुळे होणार्‍या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी गत बुधवारी रात्री गंगा-जमुना सील केली. गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली असं पोलीस सांगतात.

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

मैत्रीची अनोखी दास्तान : मार्टिना - ख्रिस



आपल्यापैकी किती जण टेनिसचे चाहते आहेत ठाऊक नाही आणि कितीजण या दोघींना ओळखतात याची कल्पना नाही. मात्र जे ह्या दोघींबद्दल जाणतात त्यांच्या लेखी या दोघीजणी म्हणजे टेनिसकोर्टवरच्या सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी होत. या दोघींनी तब्बल सोळा वर्षे नेटच्या दोन्ही बाजूंनी लढत टेनिसचं युद्ध खेळलं. त्या इतक्या त्वेषाने लढायच्या की प्रेक्षकांना स्फुरण यायचं. विशेषतः अंतिम सामन्यात या आमने सामने आल्या की क्रिडारसिकांना मेजवानी लाभे. त्या अक्षरशः तुटून पडत. दोघींना अफाट पाठीराखे लाभले होते. दोघींनाही मोठ्या संख्येत प्रेक्षक चिअरअप करायचे.
महिला टेनिसचा तो खऱ्या अर्थाने सोनेरी काळ होता असे म्हटले जाते कारण पुरुषांच्या सामन्यांहून अधिक लोकप्रियता या दोघींच्या सामन्यास लाभे. चुरशीच्या द्वंद्वावरून यांच्यातलं नातं सहज सुलभतेचे नसेल असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. या दोघी बेस्ट फ्रेंड्स होत्या ! आणि आजही त्यांच्यातल्या मैत्रीचा गंध सीमापार दरवळतो आहे.

शनिवार, २४ जुलै, २०२१

पाऊस कुठे चुकलाय ?


लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय.. वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय. असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ? पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा. शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा,
ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा. आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,
काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा. आभाळमाया करायचा,
सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा, वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,
त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

शुक्रवार, २ जुलै, २०२१

मला दिसलेला श्रीमंत माणूस ...

घराकडे जायच्या रस्त्याला जुना पुणे नाक्याच्या वळणाच्या पुढे काही भणंग भटके नेहमी नजरेस पडतात. गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असते तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट होतेच. त्यांचा ठिय्याच आहे तो. असो. आजचीच एक घटना आहे.. 

चार वाजण्याआधी घाईने दुपारी घराकडे जाताना समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता तरीही त्याचं बेदरकार बाईक राइडिंग जाणवलं.

मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं.

आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती.

मंगळवार, ४ मे, २०२१

मासूम - दो नैना एक कहानी...


आज ‘मासूम’विषयी ! पण त्याही आधी या सिनेमाच्या क्लासविषयी. यातील स्टारकास्ट आणि त्या काळातील समांतर सिनेमाची लाट यामुळे या सिनेमासाठीचा प्रेक्षकवर्ग कथित पांढरपेशी उच्च अभिरुचीचा आणि मध्यमवर्गीय असाच असेल असे आडाखे होते. चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस चित्र असेच होते नंतर मात्र चित्र बदलले आणि कॉमन पब्लिक देखील थियेटरमध्ये येऊ लागलं. तरीदेखील तद्दन पिटातले म्हणून ज्यांना हिणवले जाते तो प्रेक्षकवर्ग याला फार लाभला नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या सोलापुरातील प्रेक्षकवर्गाची वर्गवारी आणि जडणघडण होय. कधीकाळी सोलापूर हे एक अत्यंत साधंसुधं गिरणगाव होतं. आजही इथे श्रमिकवर्ग मोठ्या प्रमाणात आढळतो. चतुर्थ- तृतीय श्रेणी कामगार खूप आहेत. विविध भाषीय लोक मुबलक संख्येत आहेत. लोकांचे दरडोई उत्पन्न बरेच कमी आहे, चैन करण्याकडे आणि पैसे खर्च करण्याकडे इथल्या लोकांचा ओढा नाही. आहे त्यात समाधान मानून जगणारा अल्पसंतुष्ट आणि विकासाची ओढ नसणारा काहीसा सुस्त उदासीन असा इथला जनसमुदाय आहे. अशा लोकांची क्लास आणि मास अशी विभागणी केली तर क्लास अगदी अल्प आणि मास अफाट प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ‘मासूम’ काहीशा उशिराने जेंव्हा सोलापुरात प्रदर्शित झाला तेंव्हा त्याची व्ह्यूअर्स काऊंटची अपेक्षा जेमतेमच होती, किंबहुना यामुळेच आसनसंख्या कमी असलेल्या छायामंदिरमध्ये याची वर्णी लागली. पहिल्या दोनेक आठवड्यात पब्लिक कमी होतं नंतर मात्र थियेटर खचाखच भरू लागलं. बिड्या वळणाऱ्या दमलेल्या वयस्क हातापासून ते गल्लीच्या कोपऱ्यावर पडीक असणाऱ्या तंबाखू मळणाऱ्या बेफिकीर तरुण हातापर्यंतचं बहुवर्गीय पब्लिक त्यात सामील होतं. ‘मासूम’ला लोकांनी नितळ निखळ प्रेम दिलं, सिनेमा हिट झाला. गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. १९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. तेंव्हा मी किशोरवयीन असेन. माझ्या आईवडिलांसमवेत सिनेमा पाहिलेला. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखे वाटते ते ! ‘मासूम’ पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय. त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की.

सोमवार, २९ मार्च, २०२१

नापसंत ठरलेली डाकूराणी - बँडिट क्वीन..


दिवाळीचा महिना तोंडावर आला होता. धड पावसाळा नाही आणि उन्हाळाही नाही अशा विचित्र पद्धतीचे हवामान होते. अंगातलं घामटं निघत होतं. नाही म्हणायला रात्र थोडीशी सरल्यावर उत्तररात्रीची सोलापूरी थंडी जाणवत होती. मीना टॉकीजची नऊच्या शोची दोन तिकिटे काढून मित्रासोबत पिक्चरला गेलो. सिनेमा काय बघितला मस्तक दोन दिवस सुन्न झालेलं. तो चित्रपट होता बँडिट क्वीन. उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (कोळींशी समांतर) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म. वसंतोत्सवात जन्मलेली म्हणून तिचे नामकरण ‘फुलन’ ! फुलनचे मायबाप अगदी दरिद्री, असहाय्य होते. वडिलांच्या तुलनेत आई स्वभावानं थोडीशी खाष्ट. फुलन तिच्या आईसारखी होती निडर आणि फाटक्या तोंडाची ! तिला चार भावंडं पैकी तीन बहिणी आणि एक भाऊ. फुलनच्या बापाची सगळी जमीन तिच्या चुलत्याने हडप केलेली. वरतून तो त्यांना छळायचा. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे. फुलनसह चारी भावंडांना ठोकायचा. अनेकदा उपाशी राहणारी फुलन सर्व घरकामे करण्यात तरबेज होती. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तीस वर्षाच्या पुट्टीलाल सोबत लावून देण्यात आलं. फुलनला न्हाण येण्याआधीच तो तिला घरी घेऊन गेला. त्यानं तिच्यावर जबरदस्ती केली. चित्रपटातला हा सीन पाहताना अंगावर काटा आला. लहानग्या फुलनच्या किंकाळ्या कानातून मस्तकात खोल उतरल्या. तिचा अनन्वित छळ होतो, मारझोड होते. त्याच्या जाचाने भांबावून गेलेली फुलन दोनेकदा माहेरी पळून जाते. मात्र तिची कशीबशी समजूत घालून तिला पुन्हा त्याच्या ताब्यात दिले जाते.

सोमवार, २२ मार्च, २०२१

जीवनमूल्यांच्या लढ्याचा नवा चेहरा -


या आठवड्यामध्ये एक विलक्षण घटना घडली तिची नोंद पाश्चिमात्य माध्यमांनी निवडक पद्धतीने घेतली तर अन्य काही देशात त्याबद्दल क्वचित चर्चा झडली. अमेरीकेच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या घोषणापत्राला (डिक्लेरेशन ऑफ इंन्डीपेंडन्स) अनन्यसाधारण महत्व आहे. थॉमस जेफरसन हा विचारवंत राजकारणी त्या घोषणापत्राचा जनक होय. अमेरिकेत असलेल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वसाहती आणि त्याआडून सुरु असलेलं शोषण यांच्याविरुद्ध जेफरसनने आवाज उठवला होता. लोकशाही, संघराज्यवाद, व्यक्तिगत अधिकारांचे रक्षण यांचा तो खंदा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद देखील जेफरसनने भूषवले होते. अमेरिकेत त्याला जनकाची (फाउंडीग फादर) उपमा बहाल केली गेलीय. या थॉमस जेफरसनच्या पत्नीचे नाव होते मार्था वेल्स. तिला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली होती. ती वंशवेल यथावकाश वाढत राहिली. दरम्यान मिश्र वर्णीय संबंधातून जन्माला आलेली सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम स्त्री जेफरसनच्या पदरी होती. या स्त्रीला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली. सुरुवातीची काही दशके या अपत्यांना नाकारलं गेलं होतं ही वस्तुस्थिती होती. मात्र नंतरच्या पिढ्यात जैवशास्त्रीय आधारांच्या बळावर सॅली हेमिंग्जला झालेल्या अपत्यांचे पितृत्व थॉमस जेफरसनकडेच होते हे स्वीकारावे लागले. अर्थात उदारमतवादी आणि खुल्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असणाऱ्या अमेरिकन जनतेने खळखळ न करता हे सत्य स्वीकारले. मागील वर्षी विख्यात अमेरिकन छायाचित्रकार ड्र्यू गार्डनर यांनी काही ख्यातनाम व्यक्तींच्या स्मृतीघटकासह त्यांच्या नव्या पिढीची तसबीर पेश केली होती. याच शृंखलेतले एक पोर्ट्रेट होते थॉमस जेफरसनचे आणि त्याच्या सहाव्या पिढीतील नातवाचे. शेनॉन लेनिअर हा जेफरसनचा सहाव्या पिढीतला बंदा. त्याची वंशवेल ही सॅली हेमिंग्जच्या शृंखलेतील होती. थॉमस जेफरसनसारखी वेशभूषा केलेल्या शेनॉनचे पोर्ट्रेट खूप काही चर्चिले गेले नव्हते. काही निवडक पोर्टल्सवर याविषयी अल्पकालीन चर्चा झाली आणि विषय मागेही पडला. मात्र या आठवड्यातील टॉप ट्रेंडींग फोटोजमध्ये ही तसबीर आली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला पार्श्वभूमी होती ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी सम्राज्ञी मेगन मार्कल यांनी केलेल्या खळबळजनक विधानांची. त्यामुळेच हा पोर्ट्रेटवजा फोटो इतका चर्चेत आला की त्याखालच्या कमेंट्सवरून वादविवाद झडू लागले. यात नेटिव्ह अमेरिकन विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांनी कोणत्याही देशाचे प्रवासी वा परकीय नागरीक आमचा हिस्सा असूच शकत नाही या ट्रम्पवादी भूमिकेचा पुनरुच्चार केला तर उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी हीच खरी अमेरिकेची ओळख असल्याचं म्हटलं. कारण थॉमस जेफरसन श्वेतवर्णीय होते, सॅली हेमिंग्ज मिश्रवर्णीय होती तर शेनॉन लेनिअर हा देखील मिश्रवर्णीय शरीर लक्षणे असणारा आहे. त्याचं मूळ दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन असं असल्याने त्यात समावेशकता दिसते. श्वेतवर्णीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्याने ब्रिटिश वसाहतवादाचे जोखड फेकून दिले होते त्याच्या नव्या पिढीचं तुलनात्मक वैचारिक उदात्तीकरण करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्यातील राजपुत्र आणि स्नुषा यांचं सनसनाटी विधान पूरक ठरलं हे विशेष होय.

रविवार, १४ मार्च, २०२१

बॉक्स ऑफिसची देवी - जय संतोषी माँ


ऐंशी नव्वदच्या दशकात पत्रव्यवहार तगून होता. पोस्टकार्ड, अंतरदेशीय यांचा मुबलक वापर व्हायचा. तातडीच्या निरोपासाठी तार जिवंत होती. मनीऑर्डर देखील वापरात होती. तेंव्हा ठराविक पद्धतीचा पत्रव्यवहार जास्ती चाले. कुटुंबातल्या परगावी गेलेल्या सदस्याने पाठवलेली प्रेमपत्रे, मित्रांची - प्रेमाची पत्रे, ख्याली खुशालीची पत्रे, कामकाजाची, शासनाची पत्रे असा सगळा मामला होता. यात काही आगंतुक पत्रे देखील असत. आपल्या घरच्या लोकांनी कुठं कपडे खरेदी केली असेल तर त्या दुकानदाराने आपली आणि आपल्या खिशाची आठवण काढलेली पत्रे असत, नानाविध ऑफर्सची पत्रे असतं. अगदी 'फाडफाड इंग्लिश बोला'  पासून ते 'घरबसल्या ज्ञान आणि पैसे कमवा' अशीही आवतने त्यात असत. पैकीच एक पत्र संतोषी मातेच्या भक्ती परीक्षेचं असे ! ज्यांना हा प्रकार ठाऊक नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही. आपल्यावर अधिकचा जीव असणाऱ्या कुणी तरी एका आपल्याच हितचिंतक व्यक्तीने वा परिचिताने ते पाठवलेलं असे. संतोषी मातेचा कृपाप्रसाद हवा असेल तर अशाच मजकुराचे पत्र आपल्या परिचयाच्या एकवीस व्यक्तींना पाठवावे अशी विनंती त्यात असे, असं न करता पत्र फाडून फेकून दिल्यास मातेचा प्रकोप होईल अशी धमकी देखील त्यात असे. पत्राच्या सुरुवातीसच 'जय संतोषी  माँ' असे लिहिलेलं असल्याने नंतर नंतर ही पत्रे लगेच ओळखता येऊ लागली आणि पूर्ण न वाचता फेकून दिल्याचं, फाडल्याचं समाधान लोक मिळवू लागले. ही जय संतोषी माँ पत्रे महिन्यातून किमान एकदोन तरी येत असत, इतका त्यांचा पगडा होता. हे खूळ कुणी काढलं हे सांगता येणार नाही मात्र संतोषी मातेला देशभर कुणी आणि कधी प्रकाशझोतात आणलं हे निश्चित सांगता येईल. त्यासाठी चार दशके मागं जावं लागेल.

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

गोष्ट एका मास्तरांची ...


मराठीला धुमाळ मास्तर होते. पोरांना जाम कुटून काढायचे. कवितेची कुठलीही ओळ म्हणायचे आणि पुढची ओळ वाच म्हणून बोटात पेन्सिल घालून बोटं पिरगाळायचे. समास शिकवताना चिमटीत कान पिळण्याची 'संधी' ते सोडत नसत, त्यांच्या मारझोडीच्या 'क्रियां'ना कुठलेही 'पद' चाले ! पोरांना शेलकी 'विशेषणे' लावून हाक मारण्यात त्यांचा हातखंडा होता, लिहिताना 'कानेमात्रे' एक झाले तर आईबहीण एक करत ! मागच्या बाकावर बसलेल्या अवगुणी 'विशेषनामां'ना ते नेम धरून डस्टर फेकून मारत !

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

न झुकलेला माणूस..


चुकीच्या आणि अन्याय्य गोष्टीपुढे न झुकण्यासाठी निडर बाणा हवा, मुख्य म्हणजे कोणतीही किंमत मोजायची तयारी हवी. मग तो विरोध, तो संघर्ष आभाळाहून मोठा होतो. ही हकीकत अशाच एका सामान्य माणसाची. तो एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. त्याच्या स्मारकाचं नाव अगदी विशेष आहे - 'द अनकॉन्कर्ड मॅन' - शरण न गेलेला माणूस ! न झुकलेला माणूस !

रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

पौष...

हरेक मराठी महिन्याला एक वलय आहे. त्याची स्वतःची अशी महती आहे मात्र पौष त्याला अपवाद आहे. पौषची कुख्यातीच अधिक आहे.
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना

समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

दिव्या चेकुदुराई - जिथे मृत्यूचाही थरकाप उडाला

लॉकडाउनने माणसांची काय आणि किती दुरावस्था केली हे पाहायला कुणाला वेळ नव्हता कारण ज्याला त्याला स्वतःची भ्रांत पडली होती. यात काही वावगं नाही. मात्र लॉकडाउन सरल्यानंतर एकमेकाला पायाखाली घेऊन पुढे जाण्याची चढाओढ सुरु झालीय तेंव्हा तरी आपण भवतालात डोकवून पाहण्यास हरकत नसावी. मन सुन्न करणाऱ्या या घटना होत्या. यातलीच एक दास्तान दिव्याची आहे. दिव्या चेकुदुराई. वय 22.
जून २०२० मध्ये आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये तिची हत्या झाली. जगभरातील लॉकडाउनमधला सर्वात ह्रदयद्रावक मर्डर असं तिच्या मृत्यूचं वर्णन करता येईल.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

नागम्मा @रेड लाईट डायरीज - लॉकडाउन स्टोरीज

नागम्माचं मूळ नाव नागपार्वती.
हैदराबादमधील बशरतनगर मध्ये तिचं किरायाचं घर होतं.
काला पत्थर रोड परिसरात हा भाग येतो.
ती सादमूद हेमामालिनी सारखी दिसे. सौंदर्याहून अधिक जादू तिच्या रसिल्या आवाजात होती.
तिला तेलुगू, कन्नड चांगलं येई. काही हिंदी भजनं देखील ती गायची. ठुमरीवर तिचा विशेष जीव होता.
उमर ढळलेली असूनही तिच्या अदा कातिल होत्या.

सत्तरी पार केल्यानंतर तिची गात्रे साहजिकच शिथिल झाली होती. तिच्या ढिल्या झालेल्या कातडीने कैक मौसम झेलले होते.
नागम्मा तिच्या तरुणपणात अगदी जहरी कहर असणार यात काहीच शंका नव्हती.
ओल्ड हैदराबादमधलं तिचं वास्तव्य तीस वर्षापासूनचं होतं.
त्याआधी ती समुद्रतटाशी लागून असलेल्या कृष्णा जिल्ह्यातील मछलीपटणमध्ये वास्तव्यास होती.
तिच्या डोळ्यात एक तहानलेला समुद्र दिसे.
तिची गुजराण कशावर चाले हे काहींसाठी कोडे होते मात्र त्यात तथ्य नव्हते. ती स्वाभिमानाने जगणारी बाई होती.
कमालीची संवेदनशील आणि निश्चयी.

अर्थ जगण्याचा..

ढलाण निसटलेल्या बांधावरल्या दगड मुरुमाच्या बेचक्यात सांजेपासून बसून असलेल्या सागवानी म्हाताऱ्याने आपल्या जास्वंदी नातवाला मांडीवर घेतलं होतं. अंधारून येऊ लागल्यावर पायाला रग लागलेला म्हातारा धोतर झटकत अल्लाद उठला. पुढं होत त्यानं नातवाला उचलून कंबरेवर घेतलं. निघताना नातवानं आज्ज्याला विचारलं, "आबा आता पुन्ना कदी यायचं ?"

गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

साखरीबाई @रेड लाईट डायरीज

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत १९९८ साली घडलेल्या घटनेचे एक वर्तुळ गतसालच्या लॉकडाउनमध्ये पूर्ण झाले. बुधवार पेठेतील पिंपळाच्या झाडानजीकच्या छोटेखानी मंदिराला लागून बहुमजली चांदणी बिल्डिंग आहे. या इमारतीत साखरीबाईचा कुंटणखाना होता. साखरीबाईचं मूळ नाव शकुंतला मुंदळा नाईक. पस्तिशीतली ही बाई अत्यंत कठोर निर्दयी आणि कमालीची व्यावहारिक होती. पैसा तिचं सर्वस्व होतं. साखरीबाईकडे घटनेच्या दोनेक वर्षांपूर्वी शांता नावाची एक तरुणी रिप्लेसमेंट मध्ये आली होती. साखरीने तिला तिच्या अड्ड्यात सामावून घेतलं आणि त्या बदल्यात तिच्या धंद्यात पाती केली. शांता दिसायला अप्सरा मदनिका वगैरे नसली तरी तिचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य होतं आणि तिचे काही आशिक देखील होते. पैकी एक दल्ला तिचा नवरा असण्याची बतावणी करायचा. शांतेने देणी चुकवण्यासाठी म्हणून साखरीबाई कडून सात हजार रुपये उचल घेतले आणि तिथून तिचे दिवस फिरले. सतत पैशावरून टोमणे बसू लागल्यावर मारहाणीच्या भीतीने शांतेने एका दिवशी पोबारा केला. साखरीबाईने शांताचा खूप शोध घेतला मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर जूनच्या मध्यावधीत साखरीबाईला कुणकुण लागली की शांता इथेच बुधवारपेठेत आलीय आणि नव्या ठिकाणी धंदा करू लागलीय. ही खबर कानी पडताच साखरीबाईचा पारा चढला. अवघ्या काही दिवसात तिने शांताचा ठावठिकाणा शोधून काढला. शांता बुधवारपेठेतच परतली होती मात्र तिचा पत्ता होता प्रेमज्योती बिल्डिंग पहिला मजला !

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

केरसुणी...

गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.

केरसुणी तयार करण्यासाठी शिंदीची पानं नाहीतर मोळाचं गवत वापरलं जातं.
आमच्या सोलापूर जिल्ह्यात मायबाप पुढाऱ्यांच्या कृपेने काही अधिकृत तर मोकार वावरभरून अनधिकृत शिंदीची झाडं आहेत.
आमच्याकडं मजूर मंडळी आणि विडी कामगारांसाठी शिंदी आणि ताडी अजूनही फर्स्ट प्रेफरन्सवर आहे.
शिंदी चवीला आंबूस लागते, रिकाम्या पोटी ढोसू नये लागते. पोट डरंगळतं. ढंढाळ्या लागतात.
स्वस्तातली नशा म्हणून लोक शिंदी पितात, आजकाल केमिकल वापरून खोटी बनावट शिंदी विकली जाते. खिसे हलके झालेले आणि जिन्दगानी हरलेले लोक त्यातदेखील अमृत शोधतात.
त्याच शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करतात.
आज तिची पूजा होते. मात्र वर्षभर गावाकडे केरसुणी हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.
"कुठं गेली ती केरसुणी गतकाळी ? " असा उध्दार होत असतो.

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

मुक्या लेकीचं दुःख...



कालपरवाच्या पावसात जगूनानाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली.
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नवरंग 2020 - रेड लाईट डायरीज


पहिला रंग - राखाडी 
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ 
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा  
तुमची सुटका तुम्हालाच करून घ्यायची आहे, तुमच्यातल्या दुर्गेला बळ लाभो...
आदिशक्ती उत्सवाचा अर्थ असाही जाणून घेऊया.. 

In her teen age pregnant Kamini fled with an escort agent, later she was forced for prostitution. She was blackmailed by brothel owner making theat to her little angel daughter Meena. Three decades passed. Now Kamini is nomore, but Meena is still in the sink of slavery by means of skin currency. With help of Darbar ngo She will likely to return in this December 20. This is her own fight, and she faught it very well.
I pray for my all sisters and mothers for their freedom and rights..
amen..

_________________________________________

दुसरा रंग केशरी..

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चित्रीचं वासरू



चित्रीचं वासरु पोटातच मेलं.
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

प्रेमचंदांची फाटकी चप्पल...



तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ? 
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो. 
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ? 
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो.. 

ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. 
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते. 
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं. 
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

गावाकडच्या पाऊसम्हणी...


गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल...
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

रविवारची दुपार आणि तू ...


सुट्टीच्या दिवशीची दुपार जरा खासच असते
अगदी तुझ्यासारखी
बेफिकीर, बेजबाबदार, मुक्त !
मी देखील स्वतःच्या पद्धतीने ती व्यतित करतो.
पण का कुणास ठाऊक
पण मागच्या काही दिवसापासून हा फुरसतीचा वेळ स्वतःसोबत घालवण्याचा प्रयत्न जरी केला
तरी कुठल्या तरी ज्ञात अज्ञात घटिकातून मोकळं होत तू माझ्यासमोर येऊन बसतेस.
माझ्या हातातलं पुस्तक मिटवतेस,
आणि आपले बहारदार किस्से सुनावत बसतेस.
डिसेंबरमधली ती गुलाबी थंडी,
पावसाचे ते टपोरे थेंब,
आणि सुट्टीची ती अमीट दुपार !
तो किस्सा जो तू कधी काळी जगली होतीस
माझ्या सोबत.
कित्येक आठवडे झालेत तू याचीच पुन्हा उजळणी करते आहेस.
आणि तोवर मला जाणवतही नाही की
काही उत्कट प्रेमळ क्षणांच्या बेड्यात मी कायमचा कैद झालोय !

- समीर गायकवाड

ही कविता विख्यात तरुण कवयित्री गीतांजली रॉय यांच्या 'इतवार की दोपहर' या रचनेवर आधारित आहे.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

माधव कोंडविलकर - माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या...



एका विलक्षण कवितेची ही गोष्ट आहे. गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत जगातला एक कोवळा मुलगा आणि त्याला कथित जगरीत समाजावून सांगणारी आई यांच्यातला संवाद कसा असू शकतो याचं हे शब्दचित्र थक्क करून जातं आणि कित्येक दिवसांनी हे पुन्हा वाचलं तरी मनाला एक सल देत राहतं.

माधव कोंडविलकरांना पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्यांचा एक शब्द डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसलेला. 'बोंदरं' हा तो शब्द. फाटायच्या बेतात आलेल्या जुन्या पोत्याच्या चवाळयांचे तुकडे, चिंधड्या उडालेल्या घोंगडीचे तुकडे आणि मायमावशीच्या जुनेर साड्याचे तुकडे एकत्र करून दाभणीने विणलेलं पांघरूण म्हणजे बोंदरं. कोंडविलकर चांभार जातीत जन्माला आलेले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे हे त्यांचं जन्मगाव. सोगमवाडी या नावानेही हे गाव परिचित आहे. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचं सर्रास शोषण केलं जायचं. कोंडविलकर याला अपवाद नव्हते. गद्य वाङ्मयावर त्यांनी अधिक लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या पद्य रचनांना फारशी ओळख लाभली नाही. तरीही ही कविता नेहमीच खुणावत राहिली.

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

'मंडूवाडीह'च्या आडचे वास्तव ...


अलाहाबादचे प्रयाग नामकरण होऊन आता बरेच दिवस उलटून गेलेत. याच अलाहाबादमध्ये मीरगंज मोहल्ला नावाचा एक छोटासा भाग आहे. इथे वेश्यावस्ती होती आणि अजूनही आहे. याच मीरगंज मोहल्ल्यात पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला होता. जन्मानंतर नेहरू इथेच दहाच दिवस होते. १९३१ मध्ये त्यांचा जन्म झालेली इमारत पाडली गेली. तरीदेखील या भागातील वेश्या वस्ती हटवण्यासाठी नेहरूंच्या नावाचा सतत आधार घेण्यात येत होता. या बायका बधत नाहीत हे लक्षात आल्यावर इथून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेचा आधार घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणारे धनंजय चंद्रचूड तेंव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयातले मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी कायद्यावर बोट ठेवत मार्च अखेर पर्यंत ही वस्ती हटवण्यात यावी असा आदेश दिला. मात्र यासोबतच मीरगंजमध्ये चालणाऱ्या सज्ञान नसलेल्या कोवळ्या मुलींच्या विक्री व्यवहाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तेंव्हा उत्तरप्रदेश सरकारने मीरगंज मोहल्ला ही बेकायदेशीर वेश्यावस्ती असल्याचं शपथपत्र न्यायालयात दाखल केलं. वस्ती थोडीफार हटली. मात्र तिथल्या घरात बायका शोधणारी गिधाडं फिरू लागली. बायका पुन्हा आल्या. त्यांचे पत्ते बदलले मात्र व्यवसाय तोच राहिला. नंतर अलाहाबादचं प्रयाग झालं मात्र शहराचं काय ? शहरांतल्या लोकांचं काय ? लोकांच्या मानसिकतेचं काय ? असो. हे प्रश्न विचारायचे नसतात. हे सर्व आता इतक्या दिवसानंतर उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मंडूवाडीह !

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

'नारी आत्मसन्मान' खरेच हवाय का ?..


विख्यात मानसशास्त्रज्ज्ञ सिग्मंड फ्रॉईड यांनी एकदा मनोविश्लेषणाच्या अभ्यासासाठी समान वयाच्या, समान सामाजिक श्रेणीच्या पुरुषांचे दोन गट केले होते. त्यांच्या समोरील स्क्रिनवर काही वाक्ये दाखवली जातील आणि त्यांनी ती वेगाने वाचून दाखवायची असा तो प्रयोग होता. फ्रॉईडनी प्रयोगाचा हिस्सा म्हणून पुरुषांच्या एका गटात अग्रणी (मॉनिटर) म्हणून साजशृंगार केलेल्या एका देखण्या तरुण स्त्रीला अत्यंत उत्तान वेषभूषेत पाठवलं. वाचनाचा प्रयोग सुरु झाला. अगदी साधी वाक्ये त्यांनी दिली होती. जसे की एक गोड केक, आम्ही केस धुतो, वेगाने जाणारी कार इत्यादी. मात्र यांचं वाचन करताना बऱ्याच जणांनी चुका केल्या. काहींनी सांगितलं की एक गोड स्तन, एक गोड लिंग, आम्ही नग्न होतो, वेगाने जाणारी तरुणी इत्यादी. पुरुषांच्या ज्या गटात ललना शिरली नव्हती तिथेही काही चुका झाल्या होत्या मात्र त्या सेक्सशी वा स्त्रीजाणिवा विषयक नव्हत्या हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या पुरुषांनी उच्चारात चुका केल्या होत्या त्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की काहींच्या स्त्रीविषयक जाणीव सन्मानजनक नाहीत तर काहींच्या स्त्रीविषयक जाणिवा सेक्सपुरत्या मर्यादित आहेत तर काही पुरुष केवळ स्त्रीलंपट होते, तर काही खरेच प्रेमळ होते. यात ज्यांनी हिंस्त्र शब्द वापरले त्यांचं वैयक्तिक मानसिक आरोग्य ठीक नव्हतं आणि सामाजिक परीघ विस्कटलेला होता. फ्रॉईडचा हा प्रयोग आजही बोलका आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे आजची एक घटना.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

वाहिन्या आणि समाजमाध्यमांच्या ट्रेंडमागचे गणित...



देशभरात जेंव्हा फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाच्या केसेसचे हॉटस्पॉट झाले होते, करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता तोपर्यंत हिंदी, इंग्रजी आणि मराठी (होय मराठीही) वृत्तवाहिन्यांच्या स्क्रीनवर चोवीस तासाची स्पेस केवळ आणि केवळ करोनाच्या बातम्यांना होती. अन्य बातम्यांना अगदी नगण्य स्थान होते.
देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि वाहिन्यांचं विशेष प्रेम असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये 5 मार्च ते 11 जून या 99 दिवसात करोनाच्या केवळ 12088 केसेस होत्या. दिवसाला सव्वाशे अशी याची सरासरी होती. 12 जूनला यूपीमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात पाचशेहून अधिक रुग्ण आढळले. त्यानंतर हा आलेख चढता राहिला.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

दाढीपुराण...

दाढीपुराण समीर गायकवाड

गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.

दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय...


सध्या जगभरातल्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सरकारांची वैचारिकता पाहू जाता अर्धवट सोफिस्टांचं जोरदार पुनरागमन होताना दिसतं. फॅसिझमच्याही आधीचा हा जीवनविचार जाणून घेण्यासाठी इसवीसनपूर्व कालखंडात जावे लागेल.
सोफिस्टपासून विस्तारित झालेल्या सोफेस्टिकेटेड या शब्दाचा आपण सर्रास उल्लेख करत असतो.
सोफेस्टिकेटेडचा आपला प्रचलित अर्थ 'सुसंस्कृत सवयी व अभिरुची असलेला' असा आहे.
सोफिस्ट म्हणजे कोण ? तर याचे उत्तर जाणताच आपल्या अवतीभवती अशी अगणित माणसं आढळतील.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मुन्नाभाई एमबीबीएस - प्रकाशाची अदृश्य ओंजळ..




आमच्या सोलापूरमधील मीना चित्रपटगृहात 2003 साली डिसेंबरमध्ये लागला होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. विधू विनोद चोपडा लिखित निर्मित मुन्नाभाईचे दिग्दर्शन केले होते राजकुमार हिरानीने. संजय दत्त, अर्षद वारसी, ग्रेसी सिंह, बोम्मन इराणी, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. खेड्यातील एका सेवाभावी दांपत्याचा शहरात राहणारा तरुण मुलगा मुन्नाभाई हा अपहरण, खंडणी अशा अवैध धंद्याचा बादशहा असतो, त्याच्या साथीला सर्किट हा त्याचा मित्र अख्ख्या टोळीसह काम करतो. आईवडील भेटीस यायचे कळताच ही मंडळी मुन्नाभाईच्या ठिय्याचं रुपांतर इस्पितळात करत असतात, मुन्ना डॉक्टर आणि बाकीची मंडळी रुग्ण असल्याची बतावणी करत असतात. पुढे जाऊन मुन्नाला खरेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याच्या बालमैत्रिणीवरील प्रेमापोटी तो तिथे रमतो. तिथल्या बऱ्यावाईट गोष्टींवर आपल्या स्टाईलने व्यक्त होतो. अखेरीस त्याचे बिंग उघडे पडते मात्र त्याच्यातला माणूस त्याच्या वाईटपणावर मात करतो जो सर्वांना भावतो अशी रम्य कथा यात होती. ‘मुन्नाभाई’ देशभरात सुपरहिट झाला तसा सोलापुरातही झाला. मात्र इथे त्यावर पब्लिकने अंमळ जास्त जीव लावला कारण त्यातलं वातावरण, त्यातली माणसं, त्यातलं खुलेपण, जिंदादिल तरुणाई या शहराशी मेळ खाणारी होती. सोलापूरची जडणघडणच अशी झालीय की इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर जाऊन पाहिलं तर इथे निवांतपणा अधिक आढळतो, फुरसत असलेली रिकामटेकडी मनमिळाऊ माणसं खंडीभर दिसतात. इथल्या बोलीत एक तऱ्हेचा रफटफ अंदाज आहे आणि इथली तरुणाई काहीशी बेभान नि आव्हानात्मक वाटते, इथे एक प्रकारचा संथपणा आहे जो माणसाला एकमेकाशी व्यक्त व्हायला भाग पाडतो. श्रमिकापासून ते गर्भश्रीमंतापर्यंतचे लोक इथे असले तरी एक सोलापुरी बेपर्वाई आणि कमालीची आपुलकी इथे सर्रास जाणवते. ‘मुन्नाभाई’मध्ये हे घटक ठासून भरलेले असल्याने इथल्या लोकांनी त्यातल्या पात्रात स्वतःला शोधले तर त्यात नवल ते काय ? असो. फिल्मी मुन्नाभाई संजयदत्तच्या असली आयुष्यातला एक योगायोग इथे सांगावा वाटतो.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

कृष्णशोध...



रामायणात एक कथा आहे. श्रीराम आणि लक्ष्मण गंगा नदी पार करतात तेंव्हाचा तो प्रसंग आहे. नदी पार करून नावेतून उतरल्यावर नावाड्याच्या लक्षात येतं की रामचंद्रांच्या स्पर्शाने आपली नाव सोन्याची झाली आहे. तत्क्षणीच त्याच्या मनात एक विचार येतो. तो धावतच आपल्या घरी जातो. काही वेळातच आपल्या पत्नीसह घरातल्या सर्व लहान मोठ्या जिनसा तिथे घेऊन येतो आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की त्यांनी त्या वस्तूंना स्पर्श करावा. श्रीराम त्याच्या इच्छेचा आदर करतात आणि स्पर्श करतात. त्या सर्व वस्तू सोन्याच्या होतात. हे पाहून लक्ष्मणास विस्मय वाटतो. काहीशा विशादानेच तो त्या नाविकास म्हणतो, तुला त्यांच्या स्पर्शाचा खरा अर्थच कळला नाही, नाहीतर तू त्यांना आपल्या घरी नेलं असतंस आणि आपलं घरच त्यांच्या स्पर्शाने पावन करून घेतलं असतंस. तात्पुरत्या भौतिक सुखाचीच तू अपेक्षा केलीस आणि महत्वाचं सुख तू गमावून बसलास !

बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

बैरुत स्फोटाच्या निमित्ताने...



मध्यपूर्वेतील देश म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे अरबी वेशातील (थ्वाब) टिपिकल मुस्लिमांचे दृश्य तरळते आणि आपल्याकडे माध्यमांनी दृढ केलेली कडवट मुलतत्ववादाची छबीही दिसते. वास्तवात हे सार्वत्रिक आणि एकमेव सत्य नाही. मध्यपूर्वेतील महत्वाचा देश असणाऱ्या लेबॅनॉनबद्दलची एक विशेष बाब अशी आहे की लेबॅनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व 18 धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळते. असो...