लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय..
वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.
असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय ?
पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.
शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा,
ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा.
आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,
काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा.
आभाळमाया करायचा,
सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा,
वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,
त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा...