शनिवार, २३ जानेवारी, २०२१

साखरीबाई @रेड लाईट डायरीज

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत १९९८ साली घडलेल्या घटनेचे एक वर्तुळ गतसालच्या लॉकडाउनमध्ये पूर्ण झाले. बुधवार पेठेतील पिंपळाच्या झाडानजीकच्या छोटेखानी मंदिराला लागून बहुमजली चांदणी बिल्डिंग आहे. या इमारतीत साखरीबाईचा कुंटणखाना होता. साखरीबाईचं मूळ नाव शकुंतला मुंदळा नाईक. पस्तिशीतली ही बाई अत्यंत कठोर निर्दयी आणि कमालीची व्यावहारिक होती. पैसा तिचं सर्वस्व होतं. साखरीबाईकडे घटनेच्या दोनेक वर्षांपूर्वी शांता नावाची एक तरुणी रिप्लेसमेंट मध्ये आली होती. साखरीने तिला तिच्या अड्ड्यात सामावून घेतलं आणि त्या बदल्यात तिच्या धंद्यात पाती केली. शांता दिसायला अप्सरा मदनिका वगैरे नसली तरी तिचं स्वतःचं एक वेगळं सौंदर्य होतं आणि तिचे काही आशिक देखील होते. पैकी एक दल्ला तिचा नवरा असण्याची बतावणी करायचा. शांतेने देणी चुकवण्यासाठी म्हणून साखरीबाई कडून सात हजार रुपये उचल घेतले आणि तिथून तिचे दिवस फिरले. सतत पैशावरून टोमणे बसू लागल्यावर मारहाणीच्या भीतीने शांतेने एका दिवशी पोबारा केला. साखरीबाईने शांताचा खूप शोध घेतला मात्र तिचा काही थांगपत्ता लागला नाही. काही महिन्यानंतर जूनच्या मध्यावधीत साखरीबाईला कुणकुण लागली की शांता इथेच बुधवारपेठेत आलीय आणि नव्या ठिकाणी धंदा करू लागलीय. ही खबर कानी पडताच साखरीबाईचा पारा चढला. अवघ्या काही दिवसात तिने शांताचा ठावठिकाणा शोधून काढला. शांता बुधवारपेठेतच परतली होती मात्र तिचा पत्ता होता प्रेमज्योती बिल्डिंग पहिला मजला !

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

केरसुणी...

गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.

केरसुणी तयार करण्यासाठी शिंदीची पानं नाहीतर मोळाचं गवत वापरलं जातं.
आमच्या सोलापूर जिल्ह्यात मायबाप पुढाऱ्यांच्या कृपेने काही अधिकृत तर मोकार वावरभरून अनधिकृत शिंदीची झाडं आहेत.
आमच्याकडं मजूर मंडळी आणि विडी कामगारांसाठी शिंदी आणि ताडी अजूनही फर्स्ट प्रेफरन्सवर आहे.
शिंदी चवीला आंबूस लागते, रिकाम्या पोटी ढोसू नये लागते. पोट डरंगळतं. ढंढाळ्या लागतात.
स्वस्तातली नशा म्हणून लोक शिंदी पितात, आजकाल केमिकल वापरून खोटी बनावट शिंदी विकली जाते. खिसे हलके झालेले आणि जिन्दगानी हरलेले लोक त्यातदेखील अमृत शोधतात.
त्याच शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करतात.
आज तिची पूजा होते. मात्र वर्षभर गावाकडे केरसुणी हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.
"कुठं गेली ती केरसुणी गतकाळी ? " असा उध्दार होत असतो.

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

मुक्या लेकीचं दुःख...



कालपरवाच्या पावसात जगूनानाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली.
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

नवरंग 2020 - रेड लाईट डायरीज


पहिला रंग - राखाडी 
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ 
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा  
तुमची सुटका तुम्हालाच करून घ्यायची आहे, तुमच्यातल्या दुर्गेला बळ लाभो...
आदिशक्ती उत्सवाचा अर्थ असाही जाणून घेऊया.. 

In her teen age pregnant Kamini fled with an escort agent, later she was forced for prostitution. She was blackmailed by brothel owner making theat to her little angel daughter Meena. Three decades passed. Now Kamini is nomore, but Meena is still in the sink of slavery by means of skin currency. With help of Darbar ngo She will likely to return in this December 20. This is her own fight, and she faught it very well.
I pray for my all sisters and mothers for their freedom and rights..
amen..

_________________________________________

दुसरा रंग केशरी..

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चित्रीचं वासरू



चित्रीचं वासरु पोटातच मेलं.
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

प्रेमचंदांची फाटकी चप्पल...



तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ? 
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो. 
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ? 
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो.. 

ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. 
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते. 
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं. 
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

गावाकडच्या पाऊसम्हणी...


गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल...
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

रविवारची दुपार आणि तू ...


सुट्टीच्या दिवशीची दुपार जरा खासच असते
अगदी तुझ्यासारखी
बेफिकीर, बेजबाबदार, मुक्त !
मी देखील स्वतःच्या पद्धतीने ती व्यतित करतो.
पण का कुणास ठाऊक
पण मागच्या काही दिवसापासून हा फुरसतीचा वेळ स्वतःसोबत घालवण्याचा प्रयत्न जरी केला
तरी कुठल्या तरी ज्ञात अज्ञात घटिकातून मोकळं होत तू माझ्यासमोर येऊन बसतेस.
माझ्या हातातलं पुस्तक मिटवतेस,
आणि आपले बहारदार किस्से सुनावत बसतेस.
डिसेंबरमधली ती गुलाबी थंडी,
पावसाचे ते टपोरे थेंब,
आणि सुट्टीची ती अमीट दुपार !
तो किस्सा जो तू कधी काळी जगली होतीस
माझ्या सोबत.
कित्येक आठवडे झालेत तू याचीच पुन्हा उजळणी करते आहेस.
आणि तोवर मला जाणवतही नाही की
काही उत्कट प्रेमळ क्षणांच्या बेड्यात मी कायमचा कैद झालोय !

- समीर गायकवाड

ही कविता विख्यात तरुण कवयित्री गीतांजली रॉय यांच्या 'इतवार की दोपहर' या रचनेवर आधारित आहे.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

माधव कोंडविलकर - माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या...



एका विलक्षण कवितेची ही गोष्ट आहे. गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत जगातला एक कोवळा मुलगा आणि त्याला कथित जगरीत समाजावून सांगणारी आई यांच्यातला संवाद कसा असू शकतो याचं हे शब्दचित्र थक्क करून जातं आणि कित्येक दिवसांनी हे पुन्हा वाचलं तरी मनाला एक सल देत राहतं.

माधव कोंडविलकरांना पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्यांचा एक शब्द डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसलेला. 'बोंदरं' हा तो शब्द. फाटायच्या बेतात आलेल्या जुन्या पोत्याच्या चवाळयांचे तुकडे, चिंधड्या उडालेल्या घोंगडीचे तुकडे आणि मायमावशीच्या जुनेर साड्याचे तुकडे एकत्र करून दाभणीने विणलेलं पांघरूण म्हणजे बोंदरं. कोंडविलकर चांभार जातीत जन्माला आलेले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे हे त्यांचं जन्मगाव. सोगमवाडी या नावानेही हे गाव परिचित आहे. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचं सर्रास शोषण केलं जायचं. कोंडविलकर याला अपवाद नव्हते. गद्य वाङ्मयावर त्यांनी अधिक लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या पद्य रचनांना फारशी ओळख लाभली नाही. तरीही ही कविता नेहमीच खुणावत राहिली.

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

'मंडूवाडीह'च्या आडचे वास्तव ...


अलाहाबादचे प्रयाग नामकरण होऊन आता बरेच दिवस उलटून गेलेत. याच अलाहाबादमध्ये मीरगंज मोहल्ला नावाचा एक छोटासा भाग आहे. इथे वेश्यावस्ती होती आणि अजूनही आहे. याच मीरगंज मोहल्ल्यात पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला होता. जन्मानंतर नेहरू इथेच दहाच दिवस होते. १९३१ मध्ये त्यांचा जन्म झालेली इमारत पाडली गेली. तरीदेखील या भागातील वेश्या वस्ती हटवण्यासाठी नेहरूंच्या नावाचा सतत आधार घेण्यात येत होता. या बायका बधत नाहीत हे लक्षात आल्यावर इथून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेचा आधार घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणारे धनंजय चंद्रचूड तेंव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयातले मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी कायद्यावर बोट ठेवत मार्च अखेर पर्यंत ही वस्ती हटवण्यात यावी असा आदेश दिला. मात्र यासोबतच मीरगंजमध्ये चालणाऱ्या सज्ञान नसलेल्या कोवळ्या मुलींच्या विक्री व्यवहाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तेंव्हा उत्तरप्रदेश सरकारने मीरगंज मोहल्ला ही बेकायदेशीर वेश्यावस्ती असल्याचं शपथपत्र न्यायालयात दाखल केलं. वस्ती थोडीफार हटली. मात्र तिथल्या घरात बायका शोधणारी गिधाडं फिरू लागली. बायका पुन्हा आल्या. त्यांचे पत्ते बदलले मात्र व्यवसाय तोच राहिला. नंतर अलाहाबादचं प्रयाग झालं मात्र शहराचं काय ? शहरांतल्या लोकांचं काय ? लोकांच्या मानसिकतेचं काय ? असो. हे प्रश्न विचारायचे नसतात. हे सर्व आता इतक्या दिवसानंतर उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मंडूवाडीह !