शनिवार, २७ ऑक्टोबर, २०१८

सत्तेच्या विरोधातील आवाजाच्या दडपशाहीचे नवे स्वरूप



'द वॉशिंग्टन पोस्ट'साठी काम करणाऱ्या आणि सौदी सत्ताधीशांवर कडवट टीका करणाऱ्या पत्रकार जमाल खाशोगींची हत्या सौदी अरेबियास किती महागात पडेल हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र या निमित्ताने सत्तेविरुद्ध विद्रोहाचा नारा बुलंद करणाऱ्या निस्पृह लोकांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सत्तेविरुद्ध आपली लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेचा खरा अर्थ समजलेला असतो असं म्हटलं जातं. अशा पत्रकारांनी चालवलेली लेखणी कित्येकदा थेट सत्ताधीशांच्या सिंहासनाला हादरवून सोडते. त्यामुळे बहुतांश राजसत्तांना असे पत्रकार नकोसेच असतात. असा निधड्या छातीचा पत्रकार कुठे विद्रोह करत राहिला तर तिथली सत्ता त्याचा सर्वतोपरी बंदोबस्त करत अगदी यमसदनास धाडण्याची तयारी ठेवते. पत्रकारच नव्हे तर आपल्याविरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा संशय आला तरी सत्ताप्रवृत्ती त्याच्या जीवावर उठते असे चित्र आजकाल पाहण्यात येते.

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

#MeeToo #मीटू ची वर्षपूर्ती आणि बदललेला कल...

हॉलीवूडचा विख्यात चित्रपट निर्माता हार्वे वीनस्टीन याच्याकडून झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो हिने #मी_टू चे पहिले ट्विट केलं त्याला आज एक वर्ष झालं. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्री १ वाजून ५१ मिनिटांनी तिने ट्विट केलं होतं की 'तुमचे लैंगिक शोषण झालं असेल वा तुमचे दमण केलं गेलं असेल तर 'मी टू' असं लिहून तुम्ही या ट्विटला रिप्लाय द्या.' सोबत तिने तिच्या मित्राने दिलेली सूचना शेअर केली होती - या मजकूराचा मतितार्थ होता की, 'लैंगिक शोषण झालेल्या वा अत्याचार झालेल्या सर्व महिलांनी 'मी टू' असं लिहिलं तर जगभरातल्या लोकांना या समस्येचं गांभीर्य आपण लक्षात आणून देऊ शकू..'

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

ग्लोबल वॉर्मिंग : अर्थकारणात नव्या संकल्पना

ग्लोबल वॉर्मिंग - अर्थकारणात नव्या संकल्पना

दरवर्षी नोबेल पुरस्कार जाहीर झाले की नवनव्या विषयावरील चर्चांना वाव मिळतो वा कधी कधी वादाला नवा विषय मिळतो. यंदा साहित्यातील कामगिरीबद्दलचा नोबेल जाहीर झालेला नाही हा वादाचा विषय होता होता राहिला तर यंदाच्या अर्थशास्त्रातल्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे वाचून काहींच्या भुवया उंचावल्या तर काहींनी समाधान व्यक्तवले. तांत्रिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 'स्वेरिजेस रिक्सबँक प्राइज' नावाने ओळखला जातो. यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार विल्यम नॉर्डस, पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांत विभागून दिला जाणार आहे. पुरस्काराच्या रुपाने त्यांना ९० लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे ७.३५ कोटी रुपये) मिळतील. अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेत्यात अमेरिकनांचा दबदबा कायम राहिलाय, हे वर्षही त्याला अपवाद नाही. विल्यम नॉर्डस आणि पॉल रोमर हे दोघेही प्रज्ञावंत अमेरिकन आहेत. नॉर्डस हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. आपले पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण दोन्हीही त्यांनी येल विद्यापीठातूनच घेतले आहे. तसेच प्रतिष्ठित मॅसॅचुसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधून त्यांनी पीएचडी केली आहे. तर पॉल रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक आहेत. नॉर्डस आणि रोमर या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो या विषयावरती संशोधन केलं आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडीने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवले आहेत. या मोलाच्या कार्यासाठी त्यांना नोबेलने सन्मानित करण्यात आलं आहे. यांच्या नावाची घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रस्तावना महत्वाची आहे. त्यात म्हटलंय की, "जगापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या या जटील आणि महत्वाच्या प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. सर्वंकष व्यापाराच्या बाजाराचं आर्थिक आकलन आणि निसर्गाचे स्वरूप यांच्यातल्या पूरक नात्याचा आर्थिक सूत्रांचा आराखडा यांनी मांडला आहे. या क्षेत्रातील समस्यांचे निर्दालन करताना शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल."

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

'स्तन', दिनकर मनवर आणि आपण सारे जण...



राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली'मध्ये एक सीन आहे. मुरब्बी राजकारणी असलेला भागवत चौधरी (रझा मुराद) पेशाने उद्योगपती असलेला आपला भावी व्याही जीवाबाबू सहाय (कुलभूषण खरबंदा) याचा मुलगा नरेन सोबत आपली मुलगी राधा हिचा विवाह पक्का करतो. विवाहासाठीची खरेदी सुरु होते. दोन्ही घरात लगबग उडालेली असते. 'एकुलती एक मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्यामागे आपलीही काही तरी सोय बघितली पाहिजे याचा विचार मी केला आहे' असं भागवत चौधरी जीवाबाबूला सांगतो. 'एक बच्चे की मां हैं तो क्या हुंआ ? गाहे बहाये आपका भी दिल लगायेगी.." असं सांगत जीवाबाबूला आपण एक सावज कैद करून ठेवल्याची माहिती देतो..

बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

रेड लाईट डायरीज - झोपेतून जागे होणार तरी कधी ?


रोजच्या गदारोळात काही सत्ये झाकोळून जावीत अशी सर्वच राजकारण्यांची इच्छा असते.
युनायटेड नेशन्सच्या unodc (मादक पदार्थ आणि गुन्हे विषयीचे कार्यालय) यांचे वतीने जाहीर केलेल्या अहवालानुसार आपल्या देशातील महिलांची नवी गुलामगिरी (स्लेव्हरी), कुमारिका - कोवळ्या मुलींची विक्री याचा देशातील केंद्रबिंदू आता झारखंडकडे सरकला आहे.
त्यातही धनबाद, बोकारो आणि हजारीबाग हे मुख्य पुरवठादार जिल्हे आहेत आणि मुंडा, संथाल व ओरावो या आदिवासी जमातीतील बायका मुली प्रामुख्याने खरीद फरोक्त केल्या जातात.

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

#रेड लाईट डायरीज - मुन्नीबाई ...


अशीच एक दास्तान मुन्नीबाईची आहे. ती मराठवाडयातल्या नांदेडची. बाप लहानपणीच मेलेला. पाच भावंडे घरात. चुलत्याने आईला मदत केली पण रखेलीसारखं वागवलं. चार पोरी आणि एक अधू अपंग मुल यांच्याकडे बघत ती निमूट सहन करत गेली. माहेरची परिस्थिती इतकी बिकट की तेच अन्नाला महाग होते. मग ही पाच तोंडे घेऊन तिकडे जायचे तरी कसे. त्यापेक्षा मिळेल ते काम करत देहाशी तडजोड करत मुली मोठ्या होण्याची वाट बघण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. एकदा चुलत्याने आईपाठोपाठ मुलीवरही हात ठेवला.

ती अजून न्हाती धुती देखील झाली नव्हती. घाबरलेल्या आईने त्याला हाकलून दिले. पण हे मरणच होते केंव्हा न केंव्हा येणारच होते. मग मुन्नीनेच यातून मार्ग काढला. ती घर सोडून पळून आली. तिने मुंबई गाठली. मुंबईने तिला धंद्याला लावले.

रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

बदनाम गल्ल्यांचा अक्षर'फरिश्ता' - मंटो !


सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...




भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.