बुधवार, ३० मे, २०१८

लेफ्टनंट कर्नल ते शायर ....फैज अहमद !



रावळपिंडी कटातील आरोपींची सुनावणी सुरु होती. आरोपीच्या पिंजऱ्यात फ़ैज उभे होते. सरकारी वकिलांनी त्यांच्याकडे तिरकी नजर टाकत सवाल केला त्यावर फ़ैज तल्लखतेने उत्तरले - "सुगंध कसा पसरवला जावा याची देखील सुन्नाह आहे ( प्रेषित पैगंबरांच्या आज्ञा - सुन्नाह sunnah ) त्यामुळे तुम्ही इथे जे काही खोटेनाटे पसरवत आहात ते तर खूप गैर आहे !" फ़ैज यांनी केलेल्या या अनपेक्षित बचावापुढे सरकारी वकील हडबडून गेले. बरेच दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं मात्र अखेरीस रिहा करावंच लागलं. फ़ैज अहमद फ़ैज यांची शायरी उस्फुर्त अशा प्रकारची होती !

भारत आणि पाक स्वतंत्र झाल्यावर पाक सरकारने फ़ैज यांना रावळपिंडी कटाचे आरोपी जाहीर करून तंब्बल पंचवीस वर्षे तिथल्या तुरुंगात डांबले. लष्करात राहूनही कवीहृदय असणाऱ्या या कमालीच्या हळव्या माणसाचे तिथे अतोनात हाल झाले. तिथल्या तुरुंगात राहून त्यांनी शायरी केली, लेखन केले. सहा भाषा अवगत असलेल्या, कर्नलच्या हुद्द्यावर काम केलेल्या या शायरला १९६२ मध्ये तत्कालीन रशियन सरकारने लेनिन शांतता पुरस्कार दिला होता. प्रगतीशील लेखन चळवळीचे फ़ैज सक्रीय सदस्य होते. मात्र पाकचे पंतप्रधान लियाकत अली खानांना फ़ैज भारतीय हेर असल्याचा संशय होता. फ़ैज यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित झाले आणि एका प्रतिभावंत शायराचा बहुआयामी परिचय जगाला झाला. अनेक वर्षे कारावासात झिजवत ठेवल्यानंतर पाकिस्तान सरकारला पुढे उपरती झाली आणि १९९० मध्ये कर्नल फैज अहमद फैज यांना निशान- ए- पाकिस्तानचा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. काहींची खरी कदर त्यांच्या मरणानंतर केली गेलीय अशा लोकांत दुर्दैवाने फ़ैज यांचेही नाव आहे ही मोठी क्लेशदायक बाब होय.

नशा आणणाऱ्या 'कैफी" गीतांचा इतिहास...



दुपारचे चार वाजले होते. फतेह हुसेन रिझवी आपले मित्र बाबू खान यांच्याशी गप्पा मारत बसले होते. फतेहचा मुलगा अतहर, बाहेरून खेळत थेट घरात आला. बाबू खान गप्पा मारून निघून गेले. फतेह रिझवींनी अतहरला हाक मारून विचारले, ‘‘ बाबू खान यांना सलाम न करता तू थेट आत कसा काय गेलास?’’ अतहरने डोके खाजवत म्हटले, ‘‘अब्बा, मी त्यांना पाहिलेच नाही.’’ अब्बा म्हणाले, ‘‘ आता असं कर, समोर जी ताडाची झाडं दिसतात ना त्या प्रत्येकाला ‘सलाम’ करून ये.’’ बिचारा लहानगा अतहर नावाप्रमाणे खूपच पवित्र आणि निरागस होता. तो गेला आणि प्रत्येकाला सलाम ठोकत बसला. ताडाची झाडं किती होती ? दीडशेपेक्षा जास्त !

मंगळवार, २९ मे, २०१८

प्रणवदांच्या भेटींचे अन्वयार्थ...


राजकारण करताना अनेक बाबी मुद्दाम दुर्लक्षिल्या जातात तर जाणीवपूर्वक काही बाबींचे चुकीचे चित्र निर्माण केले जाते. एखाद्याचा वापर करायची वेळ येते तेंव्हा अनेक घटकांचं विस्मरण केलं जातं. आरएसएस आणि त्यांचे समर्थक कायम आणीबाणी काळातील घटनांवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजरयात उभं करण्याची संधी शोधत असतात.

शनिवार, २६ मे, २०१८

गर्भपाताचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या धोरणाबद्दल नुकतेच एक विधान केले आहे.  डोनल्ड ट्रम्प यांनी जेंव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता तेंव्हा त्यांनी काही महत्वाची आश्वासने देताना तीच आपली मुलभूत धोरणे आणि विचारधारा असेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यात 'अमेरिका फर्स्ट' अग्रस्थानी होते, इस्लामी मुलतत्ववाद्यांना लगाम घालणे हे दुसऱ्या क्रमांकाचे धोरण होते आणि तिसरा मुद्दा होता गर्भपातांना रोखण्याचा. मागील कित्येक टर्मपासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत गर्भपाताच्या मुक्त धोरणाला विरोध वा पाठिंबा आणि विनापरवाना बंदुका बाळगण्यास विरोध वा पाठिंबा हे दोन मुद्दे कायम चर्चेत असतात. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आलटून पालटून या मुद्द्यांवर फिरून फिरून येतात. पण किमान या धोरणात फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. वारंवार अज्ञात माथेफिरू बंदूकधाऱ्याने गोळीबार करून अनेकांच्या हत्या केल्याच्या बातम्या येतात. त्रागा व्यक्त होतो पण धोरण बदलले जात नाही. गर्भपाताचेही असेच होते. पण डोनल्ड ट्रम्प हे हेकट, हट्टी स्वभावाचे आणि धोरणांचे दूरगामी परिणाम काय होतील याकडे लक्ष न देता आपल्या विचारांना साजेशा धारणांची पाठराखण करतात.

शुक्रवार, २५ मे, २०१८

अनुवादित कविता - ओबेदुल जाबिरी : इराक, उर्दू कविता

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.

शनिवार, १२ मे, २०१८

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

राजसत्तेवरचा अंकुश !


मागील काही काळापासून आपले राजकीय नेते निवडणूकांचा मौसम जवळ आल्यावर विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना, मठांना, पूजास्थानांना भेटी देतायत. विविध जाती धर्माचे बाबा, बुवा, महाराज यांच्या चरणी लोटांगण घालताहेत. धर्मखुणा अंगावर वागवाताहेत. याला हरकत असायचे कारण नाही, असं करणं ही त्यांची अपरिहार्यता असू शकते. पण एकाही राजकीय पक्षाचा नेता ज्या शहरात धर्मस्थळांना भेटी देतो तिथल्या मोठ्या वाचनालयास, शास्त्र प्रयोगशाळेस वा संशोधन केंद्रास भेट देत असल्याचे कुठे दिसले नाही. बाबा, बुवा, महाराज यांच्या पायाशी बसून चमकोगिरी करणारे नेते त्या शहरातील एखाद्या शास्त्रज्ञास, सामाजिक विचारवंतास, तत्ववेत्त्यास भेटल्याचे औषधालाही आढळले नाही. असे का होत असावे यावर थोडासा विचार आणि निरीक्षण केलं तर एक तर्कट समोर आलं. मुळात लोकांनाच या गोष्टींची किंमत नाही. शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, समाजसुधारक हवेत कुणाला ? लोकांनाच बुवा, बाबा, महाराज यांचे इतके वेड लागलेय की अमुक एक नेता आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला भेट देऊन आला, तमक्या बाबाच्या चरणी लीन झाला याचे लोकांना कमालीचे अप्रूप असते. असं न करणारा आता मागास ठरतो की काय अशी विदीर्ण स्थिती आपल्याकडे निर्माण झालीय.

हरवलेले राजकीय दिवस ...



आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे छायाचित्र भारतीय राजनीतीचे अनेक पैलू आपल्या समोर अलगद मांडते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरतानाचा हा सोनेरी क्षण आहे. हिमालयाएव्हढ्या उत्तुंग कर्तुत्वाचा शास्त्रज्ञ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो हे देखील एक विशेषच म्हणावे लागेल. भारतीय लोकशाहीचा हा लोकोत्तर विजयाचा अनोखा अन लोकांप्रती असणाऱ्या सजीवतेचा विलोभनीय दार्शनिक क्षण होता….

पुरुषांच्या लैंगिक शोषणाचे मौन !



आयआयटी दिल्लीचा २१ वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने १२ एप्रिल २०१८ च्या दिवशी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १० एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल ५० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. या दरम्यान त्याच्या भावाने त्याला खूप समजावून सांगितले. त्याचे कौन्सेलिंग केले. तो थोडासा सेटल झाला आहे असे वाटताच त्याला पुन्हा होस्टेलवर आणून सोडले. मालो गुरुवारीच होस्टेलमध्ये परतला होता. आल्या दिवसापासून तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याचा भूतकाळ त्याच्यापुढे आ वासून उभा राहत होता.

लोककलेची ढासळती कमान ...


पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या'  वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....


एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते ! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा ! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते जेंव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते ! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढले होते त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, त्याच्या मृत्यूनंतर लोकदर्शनासाठी तब्बल दोन दिवस त्याचे पार्थिव ठेवावे लागले इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत व सन्मानाने दफन केले गेले. आजदेखील त्या माणसाची कबर तिथे आहे अन आजही त्या कबरीवर फुल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात !

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

शायरीची ताकद..

Image result for habib jalib poetry

१९७३ मधील ही घटना आहे. पाकिस्तानात जुल्फीकार अली भुट्टो यांचे सरकार स्थापन झाले होते. आपल्या यशाचा आणि सत्तेचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये म्हणजे लरकानामध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थातच अत्यंत उच्चस्तरीयांकरिता निमंत्रण होते. या मेजवानीत सर्व शाही बडदास्त राखण्याचे त्यांचे आदेश होते. पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरांना विशेष आदेश दिला गेला की या प्रसंगी नृत्याची अदाकारी पेश करण्यासाठी लाहौरची प्रसिद्ध नर्तिका मुमताज हिला वर्दी देण्यात यावी. गव्हर्नर साहेबांनी याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल गनी यांच्यावर सोपवली. त्यांनी मुमताजला गळ घातली पण पाकिस्तानी मैफलीत होणारे शोषण ठाऊक असल्याने तिने कानावर हात ठेवले. पोलिस युपी बिहारचे असोत की पाकिस्तानच्या सिंध पंजाबचे असोत त्यांचा एकच खाक्या असतो तो म्हणजे दडपशाही.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...


एक आनंदाची बातमी.
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

शूद्रांचा भूतकाळ काय सांगतो ?




पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे महाभारतात जे वर्णन आलेले आहे त्यावरून राज्याभिषेक सोहळ्याचे ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्यांबरोबरच शूद्रांनाही निमंत्रण दिले जात होते हे सिद्ध होते. राजाच्या अभिषेक समारंभात शुद्रसुद्धा सहभागी होत होते. प्राचीन लेखक नीलकंठ यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार प्रमुख मंत्री नवीन राजाला अभिषेक करीत. नंतर प्रत्येक वर्णाचा नेता व जातीचा नेता पवित्र नद्यांच्या पाण्याचा अभिषेक राजाला करीत असत. त्या नंतर ब्राम्हण हे त्या राजाचा जयजयकार करत असत. मनूच्या आधी वैदिकपूर्व काळात राज्याभिषेक समारंभात रत्नींचा महत्वपूर्ण सहभाग होता. रत्नी म्हणजे विविध जातींच्या लोकप्रतिनिधींचा समूह होय. त्यांना रत्नी म्हटले जायचे कारण, त्यांच्याजवळ एक रत्न असायचे. हे रत्न सार्वभौमत्वाचे प्रतिक मानले जात होते. रत्नींकडून राजाला हे रत्न दिले जाते व त्यानंतरच त्या राजाला सार्वभौमत्व प्राप्त होई. हे सार्वभौमत्व प्राप्त झाल्यावर राजा प्रत्येक घरी जाऊन त्यांना दान देत असे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या रत्नींमध्ये शूद्रांचा समावेश असे.
जनपद आणि पौर या दोन प्राचीन काळच्या राजकीय दरबारचे शुद्र हे मान्यताप्राप्त सदस्य होते, अविभाज्य घटक होते व ते सदस्य असल्याने त्यांचा ब्राम्हणसुद्धा आदर करीत होते.

रविवार, ८ एप्रिल, २०१८

माझा राजकीय दृष्टीकोन



माझा राजकीय दृष्टीकोन जाणून घेणाऱ्यांसाठी...

"माझे म्हणाल तर मी सदसदविवेकबुद्धीला अधिक प्राधान्य देतो न की धर्मजाती द्वेष आधारित राजकीय मूल्यांना ! कॉंग्रेस ही आपल्या विचारांशी सामावून घेणाऱ्या लोकांचे आर्थिक लाभार्थीकरण करणारी राजकीय विचार प्रणाली आहे जिने या करिता भूतकाळात मुस्लीम तुष्टीकरण केले होते.... तर भाजप ही मुसलमान द्वेषी उजवी विचार प्रणाली आहे जी आपल्या समर्थक व्यक्तींना लाभार्थी न बनवता आपल्याला पोषक संघटना आणि व्यक्तीविशेष यांचे सबलीकरण करते आहे ... भारतीय राजकारणात या दोन मुख्य विचारधारा आहेत... कम्युनिस्ट म्हणजे या दोन्हींची खिचडी आहे ... अन्य छोटे छोटे पक्ष याच झाडांची वेगवेगळी कलमे आहेत .... सबब सदसदविवेक बुद्धीने काम करणे मला क्रमप्राप्त वाटते.. "

'विकास' आणि 'प्रगती' हे दाखवायचे दात असतात खायचे प्रत्येकाचे दात वेगवेगळे असतात. तरीही राजकीय पक्षांनी फेकलेल्या बाह्य आवरणाच्या जाळ्यात लोक अलगद अडकत जातात, नंतर त्यात जाम गुरफटून जातात आणि आपली स्वतःची एक स्वतंत्र भूमिका असू शकते याचाही त्यांना विसर पडतो. किंबहुना मतदान केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपल्याला वैरभाव वा मित्रभाव न राहता तटस्थभाव अंगीकारता आला पाहिजे याचा लोकांना विसर पडत चालला आहे, यामुळेच गल्ली ते दिल्ली लोक राजकीय अभिनिवेशात जगत राहतात. आपलं रोजचं सामान्य जीवन आणि आपल्या मर्यादा याचा विसर पडून राजकारण्यांनी दिलेल्या अफूच्या गोळीवर आपली उर्जा खर्चत राहतात. असो ज्याची त्याची मर्जी आणि ज्याचे त्याचे विचार ...

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

काकाणी केस सलमान का हरला ?


बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे. गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते. बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.

शनिवार, ३१ मार्च, २०१८

अण्णांचे फसलेले आंदोलन..


कधी काळी लष्करी सैनिक असलेल्या आणि त्या नंतर ग्रामीण भागात सामाजिक प्रश्नांची नव्याने प्रेरणादायी उकल करणाऱ्या अण्णांनी पहिले आंदोलन १९८० मध्ये केले होते. गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांनी एका दिवसातच यंत्रणेला झुकविले. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता.

शनिवार, १७ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....



आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.

२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !

पत्रकारिता आणि राजकारण



काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी  यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - झुबेदा




रेडलाइटमधली अर्धीकच्ची झुबेदा
एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून
उभी असते तेव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि
पोपडे उडालेल्या भिंतीचा
लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट,
मोडकळीला आलेली कवाडे अन्

त्यावरचे खिळे उचकटलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात
अधाशी पुरुषी चेहऱ्यांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरीपासून सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे
घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात.

मंगळवार, ६ मार्च, २०१८

स्तनत्यागिनी...


ज्येष्ठ प्रौढा, नाव - ज्युलिएट
फिट्ज पॅट्रिक. वयाच्या चोपन्नाव्या वर्षी जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले. शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याने स्तन काढून टाकण्याचा मास्टेक्टॉमी करण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. ते ऐकताच स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे दिसू आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याच बाबी त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या. आपले स्तन आपण रिकंस्ट्रक्ट करायचे का हा प्रश्नही त्यांच्या मनात उभा ठाकला. त्यांना तसा सल्लाही दिला गेला. कदाचित नेहमी ऍडमिट होणाऱ्या रूग्णांची तशी डिमांडही तिथल्या स्टाफने अनुभवली असावी. त्यामुळेच ज्युलिएटना देखील तोच सल्ला दिला गेला. शस्त्रक्रियेनंतर आपले स्तन पूर्वीसारखे दिसावेत आणि आपला स्त्रीत्वाचा लुकही तसाच असावा ही भावना त्यामागे असू शकते असं ज्युलिएटना वाटले. कारण स्तन ही स्त्रीत्वाची एक मुख्य खूणही आहे, तसेच तिच्या सौंदर्य लक्षणाचे ते एक अंग आहे अशी धारणा सर्वत्र रुजलेली आहे. या सल्ल्यावर विचार करताना दिवस कसे निघून गेले ते ज्युलीएटना कळले नाही.

शुक्रवार, २ मार्च, २०१८

अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व ..


मानवी शरीराची आणि शरीराच्या गरजांची, रचनेची जसजशी उकल होत चाललीय त्यातून नवनवी माहिती समोर येते आहे. तिला आधारभूत मानत त्या गरजांची पूर्तता करताना आधुनिक शरीरविज्ञानशास्त्राने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. यातले सर्वात अलीकडच्या काळातील संशोधन मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या संशोधनाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील असंख्य प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन  येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहेत त्यातील माहिती थक्क करणारी आणि अनेक रुग्णांच्या जीवनदानाच्या आशा पल्लवित करणारी आहे. या पेपर्सनुसार मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..



काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते. हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

पीएनबी घोटाळयाची जबाबदारी कुणावर ?



१९ मे १८९४ रोजी लाहोरच्या अनारकली बाजारात मुख्य कार्यालयासह पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी झाली होती. हा काळ फाळणीपूर्व भारतातला संघर्षकाळ होता. वसंत पंचमीच्या एक दिवस आधी १२ एप्रिल १८९५ रोजी बँकेची शाखा सुरू झाली. त्या काळातील भारतीय जनमानसाची छाप या संचालक मंडळावर आणि कार्यप्रणालीवर होती. संपूर्णतः भारतीयांच्या पैशाने कामाला सुरुवात करणारी ही पहिली बँक होती. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन एक शीख, एक पारसी, एक बंगाली आणि काही हिंदूंनी मिळून बँकेचा पाया रचला होता. यातही लोककल्याणाचा विचार करत बँकेचे नियंत्रण इतर शेअरधारकांकडे असावे याकरिता सात संचालकांनी अत्यंत कमी शेअर घेतले होते. या कामी महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचे पहिले उद्योगपती लाला हरकिशन लाल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना ट्रिब्यूनचे संस्थापक दयालसिंह मजेठिया सुलतानचे श्रीमंत प्रभूदयाल यांच्यासह अनेक विख्यात लोकांनी स्वतःला सामील केलं होतं. या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यासह जालियनवाला बाग समितीचेही खाते होते.

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...



आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

राजाच्या दरबारी - दुखवटा !



मिशावर ताव देत भालदार आरोळी देतो, "सावधान, मेहरबान, कदरदान, राजाधिराज सिंहासनाधिश गप्पेश्वर संस्थांननरेश राजा अर्धचंद्रजी यांचे आगमन होत आहे !! "
चोपदार ( भालदाराला ढूसणी देत बारीक आवाजात ) - "ते बारदाण म्हणायचं विसरलास की !"
भालदार - (ओठात जीभ चावत) - "खरंच की राहिलं गड्या."
जबडा हलवत पोटावरून हात फिरवट महाराज आपल्या आसनावर आरूढ होतात.
चुटकी वाजवून इशारा देतात आणि दरबारातील कामकाजास सुरुवात होते.

प्रधानजी - "महाराज, हे काय आज कामकाजास सुरुवात करायची ?"
महाराज (भुवया उंचावत ) - "त्यात काय गैर ? आम्ही समजलो नाही ?"

वाहनप्रणालीच्या परिवर्तनाची नांदी....



'द इकॉनॉमिस्ट'मध्ये कार उद्योगाच्या बदलत्या चेहऱ्यावर वेधक भाष्य करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. जगभरातील कार उद्योग कशी कात टाकतो आहे यावर प्रकाश टाकतानाच भविष्यातील कारचा चेहरा कसा कॅरेक्टराईज्ड असणार आहे याची एक झलक त्यात दिसून आली. आदिमानवाचा इतिहास पाहू जाता अश्मयुगापासून माणूस स्वतःची हत्यारे बनवताना नजरेस पडतो. ताम्रयुगात त्याची धातुशी जवळीक वाढली. चाकाचा शोध लागेपर्यंत वाहतुकीसाठी चतुष्पाद प्राण्यांचा वापर केला. वेगवेगळ्या खंडात त्या त्या भौगोलिक रचनेनुसार माणसाने प्राण्यांवर हुकुमत मिळवत त्यांचा वापर साधन म्हणून केला. चाकाचा शोध लागल्यावर माणसाने रथांची निर्मिती केली, टांगे, चाकगाड्या निर्मिल्या. विशेष म्हणजे चाके असलेली ही वाहने चालवण्यासाठी त्याने प्राणीच जुंपले. जेंव्हा इंजिनाचा शोध लागला तेंव्हा माणसाने स्वयंचलित वाहने वापरण्यावर भर दिला. प्राणी जुंपून चालवल्या जाणाऱ्या वाहनातील प्रवासात आणि इंजिनाच्या वाहनातील प्रवासात वेळेचा प्रचंड फरक होता.

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

आई गेल्यानंतरचे वडील – दासू वैद्यांची भावकविता


आई गेल्यानंतरचे वडील
अबोल झाले, पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्या त
देवांना न्हावू-जेवू घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो,
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ़ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात,
ओट्यावर बसतात
आभाळाकडे पहातात
जुन्या पोथ्या काढून
पुन्हा बांधून ठेवतात,
वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात,
जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने
खुप वेळ दात कोरतात
मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी,

अंथरुणावर पडल्यावरही
बराच वेळ जागे असतात,
बोटाच्या पेरावर काही तरी मोजतात
हे नाम्स्मरण तर नक्कीच नव्हे
कारण ती शांतता
तेव्हा त्यांच्या चेहर्याववर ओसंडत नसते

मग ते काय मोजत असतील ?

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

स्तनदायिनी ...


१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या 'स्तनदायिनी'ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी. कांगालीचरण हा देवभोळा ब्राम्हण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रम्हच अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं हे ही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीपरमेश्वर समजणारया यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण सहन करू शकते की नाही याचादेखील ती कधी विचार करत नाही. पुढे जाऊन तिचं मातृत्व व्यावसायिक होऊन जातं इतकं जीवघेणं आईपण तिच्या नशिबी येतं आणि ते ती स्वीकारते.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

पांथस्थांचा विसावा ...


रांजणातले पाणी आणि लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता असते. पोटातली आग आणि  चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी असते. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा आणि पितळी तांब्यातलं थंडगार पाणी कुणाचीही तहानभूक भागवण्यास समर्थ असते. यांच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नसतो. निवांत गप्पा मारताना मार्क्स ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासम  गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी गंभीर चर्चाही इथं नसते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

मन चिंब पावसाळी - ना. धों. महानोर



सगळीकडे मेघ नुसते दाटून आलेले आहेत. संततधार धुंद पाऊस एका लयीत शांतपणे पडतो आहे. वातावरण कुंद झालेले आहे. आभाळातून येणाऱ्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद वसुंधरा घेते आहे. झाडे अगदी चिंब ओली झाली आहेत पण तरीही आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि गर्द ढगांच्या दाट सावल्यांचे आकाशच आता वाकून झाडांच्या मनात डोकावते आहे. या हवेने या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या भूमिपुत्राचे मन चिंब झाले आहे. ते नुसते चिंब - झिम्माड झालेले नाही तर झाडांच्या नानाविध रंगात न्हाऊन गेले आहे. झाडांच्या पानांफुलांत पालवीत आलेल्या हिरवाईची ओल अंगी झिरपावी. भवतालातले काळेकुट्ट मेघ इतके दाटून आहेत की त्यांच्या सावल्यांनी आकाश खाली आल्याचे भास व्हावा...

पाऊस पाखरांच्या पंखांवर थेंबथेंबाच्या दाटीने बसून आहे, अधून मधून मध्येच येणारा मोठ्या सरींचा शिडकावा आकाशाच्या निळाईत डोकावणाऱ्या झाडांना कुसुंबात मळवून टाकतोय. हा पाऊस काही थांबणारा नाहीये, कारण ही संततधार आहे. हे जाणून असणारे पक्षी आपले ओलेते पंख घेऊन दाट झाडीत असणाऱ्या आपापल्या घरट्यात परत येतायत. मात्र तिथेही पावसाची हवा घेऊन फिरणारा ओलसर गर्द वारा आहे, या वाऱ्यात सगळी गात्रे गोठून जातील असा गारवा आहे त्यामुळे पक्षांच्या पंखांचा ओला पिसारा अजून धुरकट फिकट होत चाललेला आहे. बाहेर थंडी वाढत चालली आहे, आभाळ अजून काळसर होत चालले आहे, अशा वेळेस मन बेचैन होऊन तिची (प्रियेची) आठवण येणे साहजिक आहे. पण ती तर येथे नाहीये, तर मग या श्रावणी धुंद हवेला घट्ट मिठीत कवटाळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या हवेला कवटाळले की ह्याच ओलेत्या घनगर्द आकाशाचा एक तुकडा बनता येईल आणि हे दाट भरलेले मायेने ओथंबलेले मेघ पांघरोनी तिच्या शोधात दूरदूर जाणे सोपे होणार आहे.