शुक्रवार, २५ मे, २०१८

अनुवादित कविता - ओबेदुल जाबिरी : इराक, उर्दू कविता

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

मंगळवार, २२ मे, २०१८

औरंगजेब.. कडवा धर्मवादी सम्राट



बादशहा होताच औरंगजेबाने स्वत:ला आलमगीर म्हणजे जगज्जेता व गाझी म्हणजे धर्मयोद्धा घोषित केले. सुन्नी धर्माचा प्रसार करण्यास तो कटिबद्ध झाला. हिंदुस्थान या ‘दार ऊल हरब’ म्हणजे मुस्लीम राजवट नसलेल्या देशाचे ‘दार ऊल इस्लाम’ बनवणे हे त्याचे ‘फर्जे ऐन’ म्हणजे अटळ धार्मिक कर्तव्य बनले. हे कर्तव्य बजावताना झालेले अन्याय-अत्याचार धर्माच्या दृष्टीने क्षम्य असतात. सुन्नी नीतिमत्ता अमलात आणण्यासाठी त्याने ‘मुहनासीब’ हे धर्माधिकारी नेमले. अकबराने हटवलेला जिझिया कर पुन्हा लादला. देवळे पाडण्याचा हुकूम जारी केला. दारूबंदी कडक करून दरबारात संगीताला मनाई केली. त्यामुळे इस्लामी जगतात त्याचे नाव झाले...."

औरंगजेबचे पूर्ण नाव अबुल मुज़फ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर असे होते. त्याला दिल्या गेलेल्या ‘आलमगीर’, ‘औरंगजेब’ या खिताबांचा अर्थ विश्‍वविजेता असा होतो. अकबर व ताजमहल-शाहजहानवरील अनेक लेखांत औरंगजेबाचे उल्लेख वारंवार येऊन गेले आहेत. भारतातील कडव्या मुस्लीम वृत्तीचा जनक व हिंदू-मुस्लीम वैराच्या कारणीभूत घटकापैकी एक औरंगजेब होय. त्याच्या आयुष्यातील घटनाचक्र विचारात टाकणारे आहे. धर्मसंशोधक इतिहासकारांसाठी तो एक विलक्षण चिंतनविषय आहे. औरंगजेबचा जन्‍म ४ नोव्‍हेंबर १६१८ रोजी गुजरातेतील दाहोदमध्‍ये झाला. शाहजहाँ आणि मुमताजचा तो सहावा मुलगा होता. त्‍याने अरबी आणि फारसीचे शिक्षण घेतले होते. औरंगजेब दिर्घायुषी निघाला. तो ८९ वर्षाचे आयुष्य जगला (१६१८ – १७०७). संपूर्ण सतराव्या शतकावर एक प्रकारे त्याची छाया पसरलेली आहे. खुर्रम म्हणजे शाहजहाँ व मुमताज या असामान्य जोडप्याच्या हयात असणारया चार पुत्रांपैकी तो नंबर तीन. दाराशुकोह आणि शाहशुजा हे त्याच्यापेक्षा मोठे होते तर मुराद हा धाकटा होता.

शनिवार, १२ मे, २०१८

मलेशियातील निवडणुकीचे अन्वयार्थ


मलेशिया हा आशिया खंडातील बलाढ्य देश म्हणून ओळखला जातो. त्याची आर्थिक ताकद अफाट आहे. विकासाची भूक देखील मोठी आहे. मुस्लीमबहुल देश असला तरी कट्टरपंथी अशी आपली ओळख होऊ नये याची तो काळजी घेतो, सोबत मुस्लिमांचे मर्जी सांभाळताना त्यांचे हितही जपतो. ‘आसियान’ समूहातील मलेशियाचे स्थान सर्वोच्च आहे. भारताचे मलेशियाशी संबंध नेहमीच अंतर राखूनच राहिले आहेत. आशिया खंडात महासत्ता व्हायचे हे भारतीयांचे स्वप्न आता लपून राहिलेले नाही. कदाचित यामुळेही अन्य बलवान आशियाई राष्ट्रे भारताविषयी सावध भूमिका घेतात. दोन्ही देशांची एकमेकाविषयी धोरणे आणि प्रतिमा बऱ्याच प्रमाणात निश्चित आहेत. भाजप सत्तेत आल्यावर मात्र मलेशियाच्या भूमिकेत काहीसा बदल झाला. दहशतवाद्यांना निधी पुरवत असल्याचा, चिथावणीखोर भाषणे करत असल्याचा आरोप असलेला वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रचारक झाकीर नाईक हा मलेशियात आश्रयाला आहे हे आता कुणापासून लपून नाही.

सोमवार, ३० एप्रिल, २०१८

राजसत्तेवरचा अंकुश !


मागील काही काळापासून आपले राजकीय नेते निवडणूकांचा मौसम जवळ आल्यावर विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांना, मठांना, पूजास्थानांना भेटी देतायत. विविध जाती धर्माचे बाबा, बुवा, महाराज यांच्या चरणी लोटांगण घालताहेत. धर्मखुणा अंगावर वागवाताहेत. याला हरकत असायचे कारण नाही, असं करणं ही त्यांची अपरिहार्यता असू शकते. पण एकाही राजकीय पक्षाचा नेता ज्या शहरात धर्मस्थळांना भेटी देतो तिथल्या मोठ्या वाचनालयास, शास्त्र प्रयोगशाळेस वा संशोधन केंद्रास भेट देत असल्याचे कुठे दिसले नाही. बाबा, बुवा, महाराज यांच्या पायाशी बसून चमकोगिरी करणारे नेते त्या शहरातील एखाद्या शास्त्रज्ञास, सामाजिक विचारवंतास, तत्ववेत्त्यास भेटल्याचे औषधालाही आढळले नाही. असे का होत असावे यावर थोडासा विचार आणि निरीक्षण केलं तर एक तर्कट समोर आलं. मुळात लोकांनाच या गोष्टींची किंमत नाही. शास्त्रज्ञ, तत्ववेत्ते, समाजसुधारक हवेत कुणाला ? लोकांनाच बुवा, बाबा, महाराज यांचे इतके वेड लागलेय की अमुक एक नेता आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळाला भेट देऊन आला, तमक्या बाबाच्या चरणी लीन झाला याचे लोकांना कमालीचे अप्रूप असते. असं न करणारा आता मागास ठरतो की काय अशी विदीर्ण स्थिती आपल्याकडे निर्माण झालीय.

हरवलेले राजकीय दिवस ...



आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे छायाचित्र भारतीय राजनीतीचे अनेक पैलू आपल्या समोर अलगद मांडते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरतानाचा हा सोनेरी क्षण आहे. हिमालयाएव्हढ्या उत्तुंग कर्तुत्वाचा शास्त्रज्ञ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो हे देखील एक विशेषच म्हणावे लागेल. भारतीय लोकशाहीचा हा लोकोत्तर विजयाचा अनोखा अन लोकांप्रती असणाऱ्या सजीवतेचा विलोभनीय दार्शनिक क्षण होता….

पुरुषांच्या लैंगिक शोषणाचे मौन !



आयआयटी दिल्लीचा २१ वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने १२ एप्रिल २०१८ च्या दिवशी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १० एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल ५० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. या दरम्यान त्याच्या भावाने त्याला खूप समजावून सांगितले. त्याचे कौन्सेलिंग केले. तो थोडासा सेटल झाला आहे असे वाटताच त्याला पुन्हा होस्टेलवर आणून सोडले. मालो गुरुवारीच होस्टेलमध्ये परतला होता. आल्या दिवसापासून तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याचा भूतकाळ त्याच्यापुढे आ वासून उभा राहत होता.

लोककलेची ढासळती कमान ...


पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या'  वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....


एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते ! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा ! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते जेंव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते ! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढले होते त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, त्याच्या मृत्यूनंतर लोकदर्शनासाठी तब्बल दोन दिवस त्याचे पार्थिव ठेवावे लागले इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत व सन्मानाने दफन केले गेले. आजदेखील त्या माणसाची कबर तिथे आहे अन आजही त्या कबरीवर फुल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात !

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

शायरीची ताकद..

Image result for habib jalib poetry

१९७३ मधील ही घटना आहे. पाकिस्तानात जुल्फीकार अली भुट्टो यांचे सरकार स्थापन झाले होते. आपल्या यशाचा आणि सत्तेचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी आपल्या होम टाऊनमध्ये म्हणजे लरकानामध्ये एका मेजवानीचे आयोजन केले होते. अर्थातच अत्यंत उच्चस्तरीयांकरिता निमंत्रण होते. या मेजवानीत सर्व शाही बडदास्त राखण्याचे त्यांचे आदेश होते. पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरांना विशेष आदेश दिला गेला की या प्रसंगी नृत्याची अदाकारी पेश करण्यासाठी लाहौरची प्रसिद्ध नर्तिका मुमताज हिला वर्दी देण्यात यावी. गव्हर्नर साहेबांनी याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल गनी यांच्यावर सोपवली. त्यांनी मुमताजला गळ घातली पण पाकिस्तानी मैफलीत होणारे शोषण ठाऊक असल्याने तिने कानावर हात ठेवले. पोलिस युपी बिहारचे असोत की पाकिस्तानच्या सिंध पंजाबचे असोत त्यांचा एकच खाक्या असतो तो म्हणजे दडपशाही.

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...


एक आनंदाची बातमी.
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.