शनिवार, ३१ मार्च, २०१८

अण्णांचे फसलेले आंदोलन..


कधी काळी लष्करी सैनिक असलेल्या आणि त्या नंतर ग्रामीण भागात सामाजिक प्रश्नांची नव्याने प्रेरणादायी उकल करणाऱ्या अण्णांनी पहिले आंदोलन १९८० मध्ये केले होते. गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांनी एका दिवसातच यंत्रणेला झुकविले. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता.

शनिवार, १७ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - बायकांचे एस्कॉर्ट असेही ....



आपल्याकडे बायका पोरींना ‘धंद्याला’ लावणे वा त्यांची खरेदी विक्री करणे किती सहज सोपे आहे याचे हे आदर्श उदाहरण ठरावे. आपले कायदे किती कुचकामी आहेत आणि जी काही कलमं आहेत ती किती तकलादू आहेत हे यातून प्रकर्षाने ध्यानात यावे.

२००३ सालच्या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या (अवैध मानवी तस्करी) एका खटल्यात पतियाळा येथील एका न्यायालयाने मार्च २०१८ मध्ये पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवले. पोलिसांच्या कर्तव्य तत्पर शिताफीने आणि न्यायालयातील वकिलांच्या न्यायिक दलालीने आय मीन दलीलांनी हा खटला १५ वर्षे रखडवला गेला आणि शिक्षा झाली फक्त दोन वर्षे !

पत्रकारिता आणि राजकारण



काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या उमेदवारीसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे नाव घोषित केले आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुमार केतकर हे मराठीतील प्रतिथयश पत्रकार, विचारवंत आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. दैनिक 'लोकसत्ता'चे ते निवृत्त प्रमुख संपादक होत. तसेच 'महाराष्ट्र टाईम्स' आणि 'लोकमत' या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली ऑब्झर्व्हर'चे निवासी संपादक तसेच 'इकॉनॉमिक टाइम्स'चे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दैनिक दिव्य मराठी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. राज्यसभेच्या उमेदवारीचा हा निर्णय अनपेक्षित नव्हता तसेच ही वाटचालही इतक्या सहजासहजीची नव्हती. काँग्रेसमधील अन्य इच्छुकांनी  यावर दबक्या आवाजात चर्चा आरंभण्याचा प्रयत्न केला तर काहींनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे काँग्रेसने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कुमार केतकर यांच्या नावाला राहुल गांधींनीच पुढे आणल्याने यावर व्यक्त होणे काहींनी शिताफीने टाळले. काही ज्येष्ठ निष्ठावंत काँग्रेसजनांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करत केतकर यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा, भाषाप्रभुत्वाचा, पत्रकारितेतील वर्तुळातील अनुभवाचा आणि चौफेर व्यासंगाचा चांगला उपयोग होईल अशी प्रतिक्रिया दिलीय. अन्य राजकीय पक्षांनी यावर सावध प्रतिक्रिया दिल्या तर पत्रकार जगतातून अनेकांनी या निर्णयासाठी काँग्रेस आणि केतकर यांचे अभिनंदन केले. इथेही काहींनी नाराजीचा सूर आळवण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसे यश लाभले नाही. या निर्णयाची सोशल मिडीयाच्या सर्व अंगांवर रंगतदार चर्चा पाहावयास मिळाली. काहींनी टवाळकी केली, काहींनी पाठराखण केली तर काही नेहमीप्रमाणे तटस्थ राहिले. तरीदेखील एक मोठा वर्ग असा आढळून आला की जो या घटनेच्या आडून पत्रकार आणि त्यांचे राजकारण व पत्रकारांच्या राजकीय भूमिका यावर टिप्पण्या करत होता. ही संधी साधत अनेकांनी सकल पत्रकारांना दुषणे दिली. काहींनी प्रिंट मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया याची गल्लत करत पत्रकारांवर हात धुवून घेतले. पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये असा धोशा या लोकांनी लावून धरलेला होता. वास्तविक पाहता ही काही पहिली घटना नव्हती की लोकांनी इतकी आदळआपट करावी. अशा घटना या आधी राज्यात,देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.

बुधवार, १४ मार्च, २०१८

रेड लाईट डायरीज - झुबेदा




रेडलाइटमधली अर्धीकच्ची झुबेदा
एक हात चौकटीला लावून दाराच्या फळकुटाला टेकून
उभी असते तेव्हा
तिचे टवके उडालेले नेलपेंट आणि
पोपडे उडालेल्या भिंतीचा
लाल-निळ्या रंगाचा शिसारी काँट्रास्ट होतो.
कपचे उडालेली चौकट,
मोडकळीला आलेली कवाडे अन्

त्यावरचे खिळे उचकटलेले भेसूर कडी कोयंडे
मान मोडल्यागत शेजारीच लोंबकळत असतात.
तिच्या थिजलेल्या डोळ्यात
अधाशी पुरुषी चेहऱ्यांची अनेक प्रतिबिंबे दिसतात,
सत्तरीपासून सतरा वर्षापर्यंतची सर्व गिधाडे
घिरट्या घालून जातात
काहीतर चोची मारून घायाळही करून जातात.

मंगळवार, ६ मार्च, २०१८

स्तनत्यागिनी...


ज्येष्ठ प्रौढा, नाव - ज्युलिएट
फिट्ज पॅट्रिक. वयाच्या चोपन्नाव्या वर्षी जानेवारी २०१६ मध्ये त्यांच्या स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले. शेवटच्या टप्प्यातला कॅन्सर असल्याने स्तन काढून टाकण्याचा मास्टेक्टॉमी करण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला. ते ऐकताच स्तन काढून टाकल्यानंतर आपण कसे दिसू आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे याच बाबी त्यांच्या डोळ्यापुढे तरळल्या. आपले स्तन आपण रिकंस्ट्रक्ट करायचे का हा प्रश्नही त्यांच्या मनात उभा ठाकला. त्यांना तसा सल्लाही दिला गेला. कदाचित नेहमी ऍडमिट होणाऱ्या रूग्णांची तशी डिमांडही तिथल्या स्टाफने अनुभवली असावी. त्यामुळेच ज्युलिएटना देखील तोच सल्ला दिला गेला. शस्त्रक्रियेनंतर आपले स्तन पूर्वीसारखे दिसावेत आणि आपला स्त्रीत्वाचा लुकही तसाच असावा ही भावना त्यामागे असू शकते असं ज्युलिएटना वाटले. कारण स्तन ही स्त्रीत्वाची एक मुख्य खूणही आहे, तसेच तिच्या सौंदर्य लक्षणाचे ते एक अंग आहे अशी धारणा सर्वत्र रुजलेली आहे. या सल्ल्यावर विचार करताना दिवस कसे निघून गेले ते ज्युलीएटना कळले नाही.

शुक्रवार, २ मार्च, २०१८

अवयव प्रत्यारोपण शास्त्रातील नवे पर्व ..


मानवी शरीराची आणि शरीराच्या गरजांची, रचनेची जसजशी उकल होत चाललीय त्यातून नवनवी माहिती समोर येते आहे. तिला आधारभूत मानत त्या गरजांची पूर्तता करताना आधुनिक शरीरविज्ञानशास्त्राने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. यातले सर्वात अलीकडच्या काळातील संशोधन मानवी जीवनाला नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. या संशोधनाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील असंख्य प्रश्न चुटकीसरशी सुटणार आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ऑस्टिन  येथे झालेल्या अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या वार्षिक परिषदेत अवयव विकसक संशोधनावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पॅनलने जे रिसर्च डॉक्युमेंट सादर केले आहेत त्यातील माहिती थक्क करणारी आणि अनेक रुग्णांच्या जीवनदानाच्या आशा पल्लवित करणारी आहे. या पेपर्सनुसार मानवी अवयव आता मानवी शरीराबाहेर नैसर्गिक पद्धतीने निर्मिले जाऊ शकतील.

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..



काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते. हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

पीएनबी घोटाळयाची जबाबदारी कुणावर ?



१९ मे १८९४ रोजी लाहोरच्या अनारकली बाजारात मुख्य कार्यालयासह पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी झाली होती. हा काळ फाळणीपूर्व भारतातला संघर्षकाळ होता. वसंत पंचमीच्या एक दिवस आधी १२ एप्रिल १८९५ रोजी बँकेची शाखा सुरू झाली. त्या काळातील भारतीय जनमानसाची छाप या संचालक मंडळावर आणि कार्यप्रणालीवर होती. संपूर्णतः भारतीयांच्या पैशाने कामाला सुरुवात करणारी ही पहिली बँक होती. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन एक शीख, एक पारसी, एक बंगाली आणि काही हिंदूंनी मिळून बँकेचा पाया रचला होता. यातही लोककल्याणाचा विचार करत बँकेचे नियंत्रण इतर शेअरधारकांकडे असावे याकरिता सात संचालकांनी अत्यंत कमी शेअर घेतले होते. या कामी महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचे पहिले उद्योगपती लाला हरकिशन लाल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना ट्रिब्यूनचे संस्थापक दयालसिंह मजेठिया सुलतानचे श्रीमंत प्रभूदयाल यांच्यासह अनेक विख्यात लोकांनी स्वतःला सामील केलं होतं. या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यासह जालियनवाला बाग समितीचेही खाते होते.

शुक्रवार, १६ फेब्रुवारी, २०१८

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...



आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०१८

राजाच्या दरबारी - दुखवटा !



मिशावर ताव देत भालदार आरोळी देतो, "सावधान, मेहरबान, कदरदान, राजाधिराज सिंहासनाधिश गप्पेश्वर संस्थांननरेश राजा अर्धचंद्रजी यांचे आगमन होत आहे !! "
चोपदार ( भालदाराला ढूसणी देत बारीक आवाजात ) - "ते बारदाण म्हणायचं विसरलास की !"
भालदार - (ओठात जीभ चावत) - "खरंच की राहिलं गड्या."
जबडा हलवत पोटावरून हात फिरवट महाराज आपल्या आसनावर आरूढ होतात.
चुटकी वाजवून इशारा देतात आणि दरबारातील कामकाजास सुरुवात होते.

प्रधानजी - "महाराज, हे काय आज कामकाजास सुरुवात करायची ?"
महाराज (भुवया उंचावत ) - "त्यात काय गैर ? आम्ही समजलो नाही ?"

वाहनप्रणालीच्या परिवर्तनाची नांदी....



'द इकॉनॉमिस्ट'मध्ये कार उद्योगाच्या बदलत्या चेहऱ्यावर वेधक भाष्य करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. जगभरातील कार उद्योग कशी कात टाकतो आहे यावर प्रकाश टाकतानाच भविष्यातील कारचा चेहरा कसा कॅरेक्टराईज्ड असणार आहे याची एक झलक त्यात दिसून आली. आदिमानवाचा इतिहास पाहू जाता अश्मयुगापासून माणूस स्वतःची हत्यारे बनवताना नजरेस पडतो. ताम्रयुगात त्याची धातुशी जवळीक वाढली. चाकाचा शोध लागेपर्यंत वाहतुकीसाठी चतुष्पाद प्राण्यांचा वापर केला. वेगवेगळ्या खंडात त्या त्या भौगोलिक रचनेनुसार माणसाने प्राण्यांवर हुकुमत मिळवत त्यांचा वापर साधन म्हणून केला. चाकाचा शोध लागल्यावर माणसाने रथांची निर्मिती केली, टांगे, चाकगाड्या निर्मिल्या. विशेष म्हणजे चाके असलेली ही वाहने चालवण्यासाठी त्याने प्राणीच जुंपले. जेंव्हा इंजिनाचा शोध लागला तेंव्हा माणसाने स्वयंचलित वाहने वापरण्यावर भर दिला. प्राणी जुंपून चालवल्या जाणाऱ्या वाहनातील प्रवासात आणि इंजिनाच्या वाहनातील प्रवासात वेळेचा प्रचंड फरक होता.

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

आई गेल्यानंतरचे वडील – दासू वैद्यांची भावकविता


आई गेल्यानंतरचे वडील
अबोल झाले, पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्या त
देवांना न्हावू-जेवू घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो,
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ़ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात,
ओट्यावर बसतात
आभाळाकडे पहातात
जुन्या पोथ्या काढून
पुन्हा बांधून ठेवतात,
वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात,
जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने
खुप वेळ दात कोरतात
मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी,

अंथरुणावर पडल्यावरही
बराच वेळ जागे असतात,
बोटाच्या पेरावर काही तरी मोजतात
हे नाम्स्मरण तर नक्कीच नव्हे
कारण ती शांतता
तेव्हा त्यांच्या चेहर्याववर ओसंडत नसते

मग ते काय मोजत असतील ?

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

स्तनदायिनी ...


१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या 'स्तनदायिनी'ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी. कांगालीचरण हा देवभोळा ब्राम्हण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रम्हच अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं हे ही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीपरमेश्वर समजणारया यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण सहन करू शकते की नाही याचादेखील ती कधी विचार करत नाही. पुढे जाऊन तिचं मातृत्व व्यावसायिक होऊन जातं इतकं जीवघेणं आईपण तिच्या नशिबी येतं आणि ते ती स्वीकारते.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

पांथस्थांचा विसावा ...


रांजणातले पाणी आणि लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता असते. पोटातली आग आणि  चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी असते. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा आणि पितळी तांब्यातलं थंडगार पाणी कुणाचीही तहानभूक भागवण्यास समर्थ असते. यांच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नसतो. निवांत गप्पा मारताना मार्क्स ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासम  गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी गंभीर चर्चाही इथं नसते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

मन चिंब पावसाळी - ना. धों. महानोर



सगळीकडे मेघ नुसते दाटून आलेले आहेत. संततधार धुंद पाऊस एका लयीत शांतपणे पडतो आहे. वातावरण कुंद झालेले आहे. आभाळातून येणाऱ्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद वसुंधरा घेते आहे. झाडे अगदी चिंब ओली झाली आहेत पण तरीही आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि गर्द ढगांच्या दाट सावल्यांचे आकाशच आता वाकून झाडांच्या मनात डोकावते आहे. या हवेने या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या भूमिपुत्राचे मन चिंब झाले आहे. ते नुसते चिंब - झिम्माड झालेले नाही तर झाडांच्या नानाविध रंगात न्हाऊन गेले आहे. झाडांच्या पानांफुलांत पालवीत आलेल्या हिरवाईची ओल अंगी झिरपावी. भवतालातले काळेकुट्ट मेघ इतके दाटून आहेत की त्यांच्या सावल्यांनी आकाश खाली आल्याचे भास व्हावा...

पाऊस पाखरांच्या पंखांवर थेंबथेंबाच्या दाटीने बसून आहे, अधून मधून मध्येच येणारा मोठ्या सरींचा शिडकावा आकाशाच्या निळाईत डोकावणाऱ्या झाडांना कुसुंबात मळवून टाकतोय. हा पाऊस काही थांबणारा नाहीये, कारण ही संततधार आहे. हे जाणून असणारे पक्षी आपले ओलेते पंख घेऊन दाट झाडीत असणाऱ्या आपापल्या घरट्यात परत येतायत. मात्र तिथेही पावसाची हवा घेऊन फिरणारा ओलसर गर्द वारा आहे, या वाऱ्यात सगळी गात्रे गोठून जातील असा गारवा आहे त्यामुळे पक्षांच्या पंखांचा ओला पिसारा अजून धुरकट फिकट होत चाललेला आहे. बाहेर थंडी वाढत चालली आहे, आभाळ अजून काळसर होत चालले आहे, अशा वेळेस मन बेचैन होऊन तिची (प्रियेची) आठवण येणे साहजिक आहे. पण ती तर येथे नाहीये, तर मग या श्रावणी धुंद हवेला घट्ट मिठीत कवटाळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या हवेला कवटाळले की ह्याच ओलेत्या घनगर्द आकाशाचा एक तुकडा बनता येईल आणि हे दाट भरलेले मायेने ओथंबलेले मेघ पांघरोनी तिच्या शोधात दूरदूर जाणे सोपे होणार आहे.

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

पावसाचा सांगावा.....



उन्हाळा जसजसा संपत यायचा तसे कधी कधी आभाळ दाटून येई अन वडिलांची ओढ त्या आभाळाकडे असे. आभाळ थोडे जरी झाकाळून आले तरी ते गावाकडे शेतात असणाऱ्या गडयाला फोन करत. तिकडे काय हालहवाल आहे याची चौकशी करत त्यातूनही त्यांना समाधान मिळत नसे. मग ते गावाकडे असणाऱ्या त्यांच्या लहान भावंडाना म्हणजे सदाशिव काका किंवा नेताजी बाबा नाहीतर क्वचित बापूकाकांकडेही ते विचारणा करत. शेतातला गडी नानू राठोड हा अक्कलकोट तालुक्यातल्या कडबगावचा होता, त्याचं मराठी अगदी तिखट शेंगाचटणी सारखं तरतरीत आणि लवंगी फटाक्यासारखं कुरकुरीत होतं. सोलापुरात थोडा जरी पाऊस झाला तरी वडील त्याला विचारत, "काय नानू पाऊस आहे का रे गावाकडे ?". थोडाफार पाऊस जर झालेला असेल तर त्याचे उत्तर असे - "तात्या ह्यो कसला वो पाऊस ? पाखराची पखं सुद्धा भिजली नाहीत बगा, उगं रडणारयाचे डोळे पुसून गेलाय !", आमचं सारं घरदार, गणगोत अन गाव शिवार माझ्या वडिलांना तात्या या नावानेच हाक मारी. पण नानूचं ‘अवो तात्या’ असं हाक मारणं म्हणजे कानडी बाईने मराठीत मुरके घेतल्यासारखे असे.

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

शिवाजीराजांचे नव्या दमाचे 'नवे किल्लेदार'.....



दिवाळीची आम्ही वाट बघतो आपल्या शिवाजी राजांसाठी ! दिवाळीतल्या फराळ फटाक्यापेक्षा राजांचे आगमन जास्त दणक्यात अन अगदी उत्कंठेने साजरे होते ! सिंहासनाधीश राजे दिवाळीच्या आधी किल्ल्यात स्थानापन्न होतात तोच दिवस खरा दिवाळीचा दिवस !! प्रत्येक अंगणात उभे राहतात गडकोट ! छातीचा कोट फुलून यावेत असे देखणे गडकोट !! काळ्या - करड्या मातीतून बनलेले हे किल्ले कधीच भग्नावस्थेतल्या खंडहरासारखे नसतात , ना यांना खिंडारे असतात, ना चिरे ढासळलेले राजवाडे ना पडलेले महाल !! या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या राजाचे धगधगते चैतन्य ओसंडून वाहत असते. नवीन आस मनी घेऊन चिमुकल्या हातांनी नव्या उमेदीने जीव लावून बांधलेले ते काळजाचे बुरुजच असतात, त्याला शोभिवंत करण्यासाठी रोशनदाने, मशाली, टेंभे, चिरागदाने, शामदाने ना उंची झुंबरे यापैकी काही लागत नाही ! या किल्ल्यांना प्रकाशमान करण्यासाठी पुरेशा असतात काळजाच्या पणत्या, ज्यात घामाचे तेल असते अन डोळ्याच्या फुलवाती !

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - पोलीस, प्रशासन आणि कुंटणखाने - उत्तरार्ध.


कुंटणखान्याच्या टिप्स मिळाल्यावर धाडी टाकल्या जातात. पोलीसांची ही 'रेड' कधी कधी आपले नाव ठराविक कालावधीनंतर रेकॉर्डवर यावे म्हणून 'पाडून' घेतल्या जातात. या पूर्वनियोजित धाडींची कुंटणखान्याच्या मालकिणीला वा चालकाला पूर्वकल्पना असते, त्यांनी याला व्यवस्थित मॅनेज केलेलं असते. या धाडीत रेकॉर्डवर काय आणायचे हे आधीच निश्चित केलेलं असतं. वर्षदोन वर्षाला एखादी धाड पाडून घेऊन त्यात केवळ मुद्देमाल हाती लागू द्यायचा, बायका पोरींना अन्यत्र हलवायचे अशी सोय करून ठेवली की त्या लॉजेसची, रिसॉर्टची, ठिकाणांची नावे ब्लॅकलिस्टमध्ये येत नाहीत. धाड पडून गेल्यानंतर दोनेक वर्षे जोमात धंदा करायचा असे गणित असते. सर्वच धाडी अशा बनावट नसतात. बऱ्याचदा सेक्सवर्कर्ससाठी काम करणाऱ्या एनजीओज, समाजिक कार्यकर्ते यांनी पुराव्यासहित तक्रारी दिल्यावरही धाडी टाकल्या जातात. यात मात्र फारशी बनवाबनवी करता येत नाही. अनेकदा अशा धाडींचीही माहिती पोलीस खात्या कडून लीक करण्याचा प्रयत्न केला जातो. माहिती लीक झाली तर अड्डेवाले सावध होतात आणि मुली दडवल्या जातात. छापा टाकायला गेलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागते. बऱ्याचदा छापे टाकताना सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांसोबत काही सामाजिक सुरक्षा शाखेचे विशेष पोलीस, महिला पोलीस, तक्रारदार एनजीओचे प्रतिनिधी, महिला पुनर्वसनच्या कर्मचारी यांनाही पथकात सामील करून घेतले जाते.

शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - पोलीस, प्रशासन आणि कुंटणखाने....


देशाची राजधानी दिल्ली असो वा मुख्य आर्थिक नाडी असणारं महानगर मुंबई वा सिटी ऑफ जॉय म्हणून लौकिक असणारं महानगर कोलकता असो तिथे ज्या गोष्टी सामाईक आहेत त्यातली एक बाब म्हणजे कुंटणखाने. भिंतींची चळत एकावर एक चढलेली, वेडेवाकडे अस्वच्छ जिने, लोखंडी ग्रील्सनी बंदिस्त केलेले अरुंद सज्जे, काचेची तावदाने फुटलेल्या जाळ्या ठोकलेल्या खिडक्या, कळकटून गेलेले दरवाजे आणि या सर्वाआडून डोकावणारे चेहरे. भडक लिपस्टिक लावून ओठांची मादक हालचाल करत येणाऱ्या जाणाऱ्यास नेत्रपल्लवी करणाऱ्या, हातवारे करून नजर वेधून घेणाऱ्या चौदा ते चाळीस वयोगटाचे हे चेहरे बाकी कोणतीच भाषा बोलत नाहीत. हे इथला कॉमन नजारा.

कट्टरवादयांच्या अराजकाची नांदी ...


बंगालच्या माल्डाहून आलेल्या ४७ वर्षीय मुहम्मद अफराजुल या ठेकेदारास राजस्थानातील राजसमंद येथे आयसीसच्या हत्याऱ्याप्रमाणे आधी गळा चिरून, नंतर मारहाण करून जिवंत जाळून मारले गेले. शंभूलाल रेगर या नराधमाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली हे निर्घृण कृत्य केले. इतके करून त्याचे समाधान झाले नाही, आपली दहशत बसावी, या घटनेमुळे मुसलमानांनी भ्यावं यासाठी त्याने या कृत्यादरम्यान याचा व्हिडीओ एका अल्पवयीन नातेवाईकास काढायला लावून तो व्हॉट्सअपवर पोस्ट केला. काही क्षणांमध्येच संपूर्ण देशभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्या व्हॉटस्अप ग्रुपवर तो पोस्ट करण्यात आला, तो भाजपाच्या नेत्याने तयार केलेला होता. त्यामुळे याचे तार भाजपाशी जोडले गेले. या घटनेनंतर भाजपच्या त्या नेत्याने 'शंभूलालशी आपला कसलाही संबंध नाही' अशी भूमिका घेतली.

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - चॉकलेट...



दोन दशकापूर्वी अंडरएज म्हणजे सज्ञान नसलेल्या मुलींना लपवून ठेवण्याच्या विविध क्लृप्त्या देशभरातल्या कुंटणखाण्यात अवलंबल्या जायच्या. आता त्यात नवनवी भर पडतीय. पण तरीही 'लाईन'मध्ये असलेल्या टीन एज मुलीच राजरोस बाजारात उभ्या दिसतात.
मुद्दा आहे चाईल्ड सेक्स वर्कर्सचा. २००१ सालानंतर आपल्या देशातल्या मेट्रो सिटीजमधून हे फॅड आले आणि बघता बघता सर्व उपनगरीय आणि मध्यम - मोठ्या शहरात चाईल्ड सेक्स वर्कर्सचा छुपा उपभोग सुरु झाला.
पोलिसांच्या रेडमध्ये या मुली आढळून येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ते अत्यल्प का आहे याचे कारण अर्थातच 'अर्थ'पूर्ण आहे.
या मुली लपवून ठेवणं किती सोपं आहे आणि यांना कसं आणलं जातं. कसं, कधी व कुठं लपवलं जातं यावरती मागे स्वतंत्र ब्लॉगमधून प्रकाश टाकला असल्याने इथे पुनरुक्ती टाळतोय.

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण...




अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी 'आपण अध्यक्ष झालो तर इस्त्राईलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू' असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांना तेंव्हा ट्रम्प निवडून येतीलच याची हमी नव्हती त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासनांकडे कानाडोळा केला गेला. निवडून येताच इस्लामी राष्ट्रातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादले होते. मुस्लिमांना कट्टरतावादी वा फंडामेंटालिस्ट म्हणून सातत्याने टोमणे मारणारे आणि त्यांना डिवचण्याची एकही संधी न सोडणारे ट्रम्प हे  खरे तर केवळ उजव्या विचारसरणीचेच नसून पक्के मुस्लीमद्वेष्टेही आहेत हे आता यथावकाश स्पष्ट होतेय. अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर 'अमेरिका फर्स्ट' अशी साखरपेरणी करताना त्यांनी नाझीझमच नव्या रुपात अंगीकारला होता. याची अगदी ताजी उदाहरणे ब्रिटीश पीएम थेरेसा मे यांच्याशी झडलेले ट्विटरवॉर आणि दुसरे म्हणजे जेरुसलेममधे दूतावासाच्या स्थलांतराची घोषणा.

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...


मागच्या आठवड्यात आपल्या देशात तीन घटना घडल्या ज्यांचे परिघ भिन्न होते पण त्यांची त्रिज्या स्त्रियांशी संबंधित होती. स्त्री विषयक तीन भिन्न जाणिवांची प्रचीती या घटनांनी दिली. आपल्या देशातील जनतेचा आणि राजकारण्यांचा स्त्रीविषयक संकुचित दृष्टीकोन यातून उघडा पडला. आपल्या इतिहासात डोकावून पाहताना एकेकाळच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे दाखले नेहमी दिले जातात. मातृसत्ताक कुटुंब पद्धती प्राचीन काळी भारतात सर्वत्रच अस्तित्वात होती का यावर देखील मतभेद आहेत. पण सिंधू संस्कृती आणि द्रविड संस्कृतीत देखील याच्या पाऊलखुणा आढळतात. आजघडीला ही पद्धत जवळपास नामशेष झालीय अन कधी काळी कुटुंबप्रमुख असणारी स्त्री आता भोगदासी अन वस्तूविशेष होऊन राहिली आहे. नाही म्हणायला ईशान्येकडील राज्यांपैकी मेघालयातील गारो या मुळच्या इंडोतिबेट आणि खासी या माओ- ख्येर लोकांच्या वंशज असलेल्या आदिवासी जातीतच ही मातृसत्ताक पद्धती अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे जे आदिम काळापासून निसर्गाचा पोत जपत आलेत, ज्यांनी अजूनही माणुसकी निभावताना डिजिटल युगाला आपलेसे केले नाही त्यांनी मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची कास सोडलेली नाही अन जे महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतात, टेक्नोसेव्ही जगाचे जे पाईक होऊ इच्छितात त्यांनी मात्र स्त्रीला मातृसत्ताक पद्धतीतील शीर्ष स्थानावरून खाली खेचून थेट पायाखाली रगडायचेच बाकी ठेवले आहे. असो.

मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - 'आज्जी' आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स !



अलीकडील काळात आपल्याकडील चित्रपटांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होते आहे. हिंदी चित्रपटात कथेची मराठी पार्श्वभूमीही वापरली जातेय. ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारा देवाशीष मखीजा दिग्दर्शित 'अज्जी' (मराठीतलं आजी / आज्जी) हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चित्रपटाची कथा एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. या बलात्कार पीडित मुलीला कुणी न्याय देऊ शकत नाही आणि ती विवशतेच्या गर्तेत खोल बुडू लागते तेंव्हा अखेरचा न्याय देण्यासाठी तिची आज्जी पुढे सरसावते. ती अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आरोपीचा सूड उगवते असे या चित्रपटात दाखवले गेलेय. आपल्या आई बाबा व आज्जीसोबत राहणारी दहा वर्षाची मंदा एक निरागस गरीब मुलगी. या आज्जी आणि नातीचा एकमेकीवर प्रचंड जीव असतो. मंदाची आज्जी शिवणकाम करते. तर पुष्कळदा मंदा तिच्यासाठी ब्लाऊज पोहचविण्याचे काम करत असते.

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...


सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व तिथले सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारियाचा कायदा चालतो. सलमान हे सौदीचे सध्याचे राजे आहेत. सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. सध्या हा देश चर्चेत आहे त्याचे कारण म्हणजे तिथल्या राजवटीने स्वीकारलेले परिवर्तनाचे वारे ! मागील तीन दशकात जगभरात इस्लामी मुलतत्व वादयांना छुपे पाठबळ देणारा हा देश एके काळी मागील दाराने केल्या जाणाऱ्या टेरर फंडींगसाठी ओळखला जायचा. पेट्रोडॉलरची भाषा बोलणारा हा देश आपल्या राजेशाहीच्या छानछौकीसाठी आणि अमर्याद ऐश्वर्यासाठी जितका ज्ञात होता तितकाच कर्मठ इस्लामी कायद्यांच्या, रिवाजांच्या अंमलबजावणीसाठीही परिचित होता. ओसामाबिन लादेन पासून ते आयसीसपर्यंतच्या कट्टरतावादयांचे अप्रत्यक्ष पालकत्व सौदीच्या पेट्रोडॉलरमध्ये होतं. पण सौदी राजवटीने कधीही खुले समर्थन देऊन आपल्या अंगावर राळ उडवून घेतली नाही. सौदीविरुद्ध जगभरातील बलाढय देशांनीही कधी कठोर शब्दांत निर्भत्सना केली नाही कारण तिथल्या तेलसाठ्यांचे आमिष आणि तेलाची निकड ! मात्र या देशात आता बदलाचे वारे वाहू लागलेत ज्याचे अनेक मतितार्थ आहेत.

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

दुसरा प्रवास ....



रेल्वे स्टेशन असो बस स्थानक वा अन्य कुठले सार्वजनिक गर्दीचे स्थान असो...
अशी मलूल, ओशाळवाणी, करपलेली अनाथ मुले आपल्याला हटकून दिसतात..
त्यांना पाहून आपण काय विचार करतो ? ...आपली संवेदनशीलता तेंव्हा नेमका काय प्रतिसाद देते ? हा प्रश्न अनाठायी आहे कारण त्यांचा आपल्याशी थेट संबंध काहीच नसतो. आपण त्यांच्या जगात नसतो आणि ते आपल्या जगात नसतात.

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - अकराव्या लेनमधली सावित्री ..



अकराव्या लेनमधली सावित्री मेली
तिच्या तिरडीचे सामान आले आणि
जगाने रांडा ठरवलेल्या तिच्या सगळ्या पोरीबाळींनी एकच गलका केला.
बांबूंचे तुकडे बांधून त्यावर कडब्याचे पाचट अंथरले गेले.
सावित्रीची अखेरची अंघोळ सुरु झाली,
पारोशा अंगाने विटाळल्या हाताने तिच्यावर पाणी ओतले जात होते.
पाण्यासोबत बायकांचे अश्रू मिसळत होते.

सगळ्या खिडक्या दारं, सगळे सज्जे, सगळ्या आडोशात
जिकडं पाहावं तिकडं पाणावल्या डोळयाच्या धुरकट बायका उभ्या होत्या.

सावित्रीचे डोळे स्वच्छ चोळले गेले, तिच्या स्वप्नांना धक्का न लावता.
सावित्रीच्या डोळ्यात मासे राहत असावेत असे वाटे,
इतके ते मासुळी पाणीदार होते.

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

अजून याद येते गावाची - एक आठवण नामदेव ढसाळांची .....



दिवस असे अधून-मधून मला शहरातून गावाकडे घेऊन जातात. आता तिथं सावलीचा विटाळ धरत नाहीत, आता महारवाडय़ाचं रुपांतर राजवाडय़ात झालं आहे. सुगीसराई-अलुत्याबलुत्याचे मोसम संपले आहेत. मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवणं, फाटय़ा फोडणं, महसुलाचा भरणा करणं, वीर नाचवणं, शिमग्याची सोंगं घेणं, महाराच्या होळीच्या विस्तवानं गावाची होळी पेटवणं.. आता सर्वच गेलं आहे बदलून. गाववस्ती, नदी-नाले पूर्वीचे राहिले नाहीत गावात गेलो की, महाराचं पोर आलं, असं आता म्हणत नाहीत. गाव किती बदलतं? पण बदलत नाहीत आठवणी….

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - रेड लाईट एरियातील नोटाबंदीची वर्षपूर्ती....


८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी झाली आणि देशभरात हल्लकल्लोळ झाला. अनेक क्षेत्रात याचे बरेवाईट परिणाम झाले. तीनेक दिवसापूर्वी या घटनेला वर्ष पूर्ण झाले आणि कोणकोणत्या क्षेत्रात कसे साधक बाधक फरक पडले याचे आढावे अनेकांनी आपआपल्या परीने मांडले. समान्य लोकांनीही आपली मते मांडली. त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनीही आपले ठोकताळे सादर केले. सरकारच्या वतीनेही विविध खात्याच्या मंत्र्यांनी सरकारची तळी उचलली जी एक साहजिक बाब होती. केंद्रातील उच्चपदस्थ लोकांनीही काही विधाने केली.

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...


उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटनांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस करावासा वाटतो. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच भ्रष्टाचार किती शिगेला पोहोचला असल्याचे दाखवून देणारी आहे. काही दिवसापूर्वीच गोरखपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. खजनी भागातील धाधूपार येथे पाण्याच्या टाकीचे काम नव्याने करण्यात आले होते. या टाकीत पहिल्यांदाच पाणी भरायला सुरुवात केल्यानंतर टाकी फुटली अन् एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी टाकी फुटल्याने दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. सुमारे दीड कोटी रुपये या टाकीसाठी खर्च करण्यात आले होते. काही दिवसात धूम धडाक्यात ज्या टाकीचे उद्घाटन केलं जाणार होतं त्या टाकीचे हे सर्व पैसे अक्षरश: पाण्यात गेले. गोरखपूर हा मतदारसंघ योगींचाच असूनही प्रसारमाध्यमे चाटूगिरीत मग्न असल्याने याचा फारसा गवगवा झाला नाही.

अनुसरणीय वाटेवरची 'माध्यमातील ती' ...


लग्नाआधी नोकरी करणाऱ्या स्त्रिया लग्न झाले की थोड्याशा धास्तावतात. मातृत्व स्वीकारताना त्यांच्या मनात आणखी घालमेल सुरु होते. तर प्रसूतीपश्चात येणाऱ्या कोंडमारयाच्या दिवसात तिला नोकरीविषयक निर्णय घेणं खूप कठीण वाटू लागतं. नोकरी करावी की नोकरी सोडून दयावी ह्या विचारांच्या चक्रात त्या पुरत्या गुरफटल्या जातात. काही स्त्रिया हल्ली सरकारने उपलब्ध करून दिलेल्या गरोदरपणातील हक्काची रजा वापरून वेळ मारून नेतात पण पुढे काय करायचे याचे नेमके उत्तर त्यांच्याकडेही नसते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते तिथे कर्त्या पुरुषासोबत घरातील स्त्रीला नोकरी करण्याशिवाय गत्यंतर नसते. तिथे स्त्रियांकडे कुठलाच पर्याय उरत नाही. तर कधी विपरीत परिस्थिती असते. काही स्त्रियांना विश्रांती हवी असते, सध्याची नोकरी सोडून संसाराकडे लक्ष दयावे असा त्यांच्या अंतरात्म्याचा सूर असतो. पण त्या हुंकाराला त्या आतच दाबतात. तर काही स्त्रिया अशाही असतात की ज्यांना लग्नाआधीही नोकरी करण्याची इच्छा असते मात्र माहेरच्या प्रतिगामी लोकांनी काहीशी आडकाठी केलेली असते त्यामुळे त्या माहेरी असताना नोकरी करू शकत नाहीत.

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

ऋणानुबंधाच्या गाठी - बाळ कोल्हटकर


एक भारलेला काळ होता, जेव्हा देशभरातल्या बहुतांश घरात सर्व सदस्यांचं एकमेव करमणुकीचं साधन रेडीओ होता. त्या काळातली सकाळ भारलेल्या वातावरणाची असायची. तेंव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीने घराचे अंगण झाडून घेतलेले असायचे, हे अंगण कधीकधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेले असायचे. त्यामुळे अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख्ख स्वच्छ झालेला असायचा. अंगण झाडून झाले की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा. सडासंमार्जन होताच पांढऱ्या शुभ्र रांगोळीचे स्वस्तिक घराच्या उंबरठ्यावर अवतीर्ण होई, अंगणात एखादी सुबक ठिपक्यांची रांगोळी चितारली जाई. मग घरातली लहानगी चिमुरडी जागी केली जात असत, या सर्वांचं आवरून होईपर्यंत देवघरातील समईच्या मंद वाती तेवलेल्या असत, गाभाऱ्यातील निरंजनाचा पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तसबिरीवरून तरळत जात असे. अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिले जाई, पूर्वेच्या देवाला डोळे झाकून, हात जोडून नमन होई. मग माजघरात स्टोव्हचा बर्नर भडकून पेटलेला असला की त्याचा फर्रफर्रचा आवाज लक्ष वेधून घेत असे. त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चर्रचर्र आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असे.

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

'अमृततुल्य'....



चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच ! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय ! चहा म्हणजे भारतीय जनतेचा हळवा कोपराच जणू ! हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत.. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच ! त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते. शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी तो आधणासाठी ऑर्डरप्रमाणे एका ओगराळयाने त्या पातेल्यात ओतत असतो.झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातील चहा - साखर चमचाने काढता डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेतो अन फक्कन पातेल्यात टाकतो.बऱ्याचवेळा चहा पावडरीचे त्या पातेल्यात पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमतो की जणू काही क्षणासाठी दार्जीलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

रेड लाईट डायरीज - सेक्सवर्कर्सचे रॅकेट...


वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आजघडीला देशातील महानगरांना जोडणाऱ्या हायवेंवर याचा मोठा प्रसार आढळतो. ढाबे, हॉटेल्स, लॉजेस, पत्र्याची शेड्स यात हे लोक आसरा घेतात. सर्व मोठ्या शहरांत एखाद्या गल्लीत, तालुक्यांच्या ठिकाणी एखाद्या इमारतीत, पंचक्रोशीतल्या एखाद्या तालेवार गावात एखाद्या खोपटात हा व्यवसाय चालतो. ट्रकचालकासारख्या वाहत्या ग्राहकांसोबत फिरता व्यवसाय करण्याचा प्रवाहही आजकाल आढळून येतोय. पूर्वी एखाद्या वस्तीत मर्यादित असणाऱ्या या लोकांकडून छोट्यामोठ्या शहरात एखाद्या अपार्टमेंटमध्ये एक दोन सदनिका भाड्याने घेऊन त्यात कुंटणखाना चालवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. गर्दीची सार्वजनिक ठिकाणे एसटी स्थानक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थियेटर्स, बागा, अद्ययावत हॉटेल्सचे पार्कींग स्लॉटस अशा ठिकाणी हे मुक्त वा छुप्या पद्धतीने वावरत असतात. स्पा, मसाज सेंटर्सच्या नावाखालीही हा व्यवसाय करण्याचे प्रमाण जाणवण्याइतके वाढलेले आहे. तसेच ग्रामीण भागातही छुप्या पद्धतीने याला उधाण आलेले आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात उघड पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या सेक्सवर्कर्सची संख्या पन्नास लाखाइतकी आहे, आणि छुप्या पद्धतीने काम करणाऱ्यांची संख्या याहून अधिक आहे. या व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात मुली, बायका कोण आणि कुठून पुरवतं याची माहिती वेधक वाटू शकते पण ती खऱ्या अर्थाने धक्कादायक असूनही त्याची तीळमात्र दखल घेतली जात नाही.

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...


सध्याच्या काळात सोशल मिडीया हे अनेकार्थाने एक प्रभावी अस्त्र झाले आहे. सहज सोप्या पद्धतीने हवे तसे व्यक्त होण्याची संधी विनासायास मिळत असल्याने दिवसेंदिवस सोशल मिडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढतेच आहे. राजकीय हेतूने यात सामील झालेल्यांनी आपापल्या पक्षांची, लाडक्या नेत्यांची भलावण करताना आपल्याच विचारांचा उदोउदो करत विरोधी विचारधारांची निंदानालस्तीही सुरु केली. नावडत्या नेत्यांचेचरित्रहनन करत त्यांची मॉर्फ केलेली, प्रतिमोध्वस्त चित्रे वापरणे, मनगढंत कहाण्यातून खोटा मजकूर लिहिणे, बोगस डाटा देणे, अश्लील भाषा वापरून महिलांची मानहानी करणे, इतरांच्या नावाने पोस्ट लिहून व्हायरल करणे अशी नितीभ्रष्ट प्रकटने अहोरात्र होत आहेत. यासाठी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटसऍप यांचा वापर प्रामुख्याने होतोय.
आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावणे, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवणे, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करणे, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालणे यांना ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. परिणामी याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप आलेय. यामुळे दंगली घडल्यात, जातधर्मीय सलोखा धोक्यात येऊ लागलाय. हे सर्व घडत असताना काही ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्यात तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही ट्रोल फेक अकाउंटद्वारे कार्यरत असतात. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम राजकारणी करताना दिसत नाहीत, यात नाव घ्यावे असा अपवादही नाही ही शरमेची बाब आहे.

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...

रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.

सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)


कोणताही उत्सव आला की कुठल्याही भागातील रेड लाईट एरियातील स्त्रियांना थोडीशी धास्तीही वाटते अन काहीसे हायसेही वाटते. कारण येणारा दिवस कशाचे तोंड बघायला लावतो, काय घडवतो याची त्यांना धास्ती असते अन उत्सवामुळे गर्दीत, गिऱ्हाईकात वाढ होऊन कमाईत चार पैशांची वाढ होणार या जाणीवेने हायसे वाटत असते. खरे तर सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो वा पोटजातीचा असो त्याच्या कामांचा जास्त ताण त्या त्या वर्गातील स्त्रियांना पडतो. मग त्या स्त्रिया गरीब वर्गातल्या असोत वा उच्चभ्रू वर्गातील्या असोत, त्यांना ताण हा पडतोच. बहुतांश पुरुष मंडळी त्या त्या सण उत्सवासाठी लागणारं साहित्य आणून दिलं की आपलं काम संपलं अशा अविर्भावात असतात, सणासुदी दरम्यान लहान मुलांचा वा वृद्ध व्यक्तींचा सहयोग कमी अन त्रास जास्त असतो. पण बायका त्याबद्दल कधीही तक्रार करत नाहीत. या सणाउत्सवातला खरा आनंद त्या मिळवतात कारण, त्या आनंद वाटत असतात ! याला रेड लाईट एरियातील स्त्रिया देखील अपवाद नसतात.

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (पूर्वार्ध)


“गणेशोत्सव जवळ आला की आमच्या मनात नानाविध तऱ्हेचे काहूर उठते..” पुण्याच्या बुधवार पेठेलगत असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकी नजीकच्या रेड लाईट एरियाच्या तोंडावर असणाऱ्या चांदणी बिल्डींगमधली वंदना डोळे विस्फारून असंच काहीबाही सांगत राहिली. त्यातलं काही मेंदूत साचून राहिलं तर काहीचा काळानुसार निचरा झाला. दोन वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवात पुण्यातील वेश्यांचा (आताच्या भाषेतील सेक्सवर्कर्सचा) या उत्सवाबद्दलचा मूड टिपून घ्यायचा होता तेंव्हा नानाविध अनुभव आले. त्याच्या मागच्या वर्षी मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचे अनुभव घेतले होते. यंदा महाराष्ट्राच्या सीमेवर असणारया विजापूरात याच कारणासाठी आलो असताना थोडया वेगळया जाणिवांची अनुभूती झाली. बागलकोट रोडलगत असणाऱ्या एका वसाहतीबाहेर एक दिवस आणि नजीकच्या इंडी शहरात एक दिवस भेटी गाठींचे शेड्युल होते.

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

'लांड्या' विचारांचा मुखभंग ...


पंधरा ऑगस्टच्या एक दिवस आधी आपल्या लोकांच्या मेंदूपासून ते बुडख्यापर्यंत राष्ट्रप्रेमाचे झरे वाहत असतात. हा साथीचा आजार फक्त तीन दिवसच असतो. आता तर व्हॉटसएपचे बिनडोक फॉरवर्डछाप पब्लिक देशभरात प्रसरण पावलेलं असल्याने याचे पेव गल्लोगल्ली आढळते. कुणी कच्चा हरभरा खाल्ला तरी त्याचा गंध त्याच्या सोशलमिडीयातून इतरांच्या मोबाईलमध्ये पसरतो. असो. आवड ज्याची त्याची..
तर पंधरा ऑगस्टला आलेल्या देशप्रेमाच्या भरतीत पाण्यात उभं राहून तिरंग्याला सलाम करणारी मुले आणि त्यांचे शिक्षक हा फोटो देशभरात व्हायरल वगैरे झाला. अनेकांनी त्यांना सलाम, त्रिवार वंदन, कडक कुर्निसात, सेल्युटही केला. अनेकांनी त्यासोबत आपल्या बद्धकोष्टी कवितादेखील पोष्टून आपलं काव्योदर साफ करून घेतलं. असो ज्याचं त्याचं पोट...

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

दाभोलकरांच्या पश्चातची चार वर्षे....



२० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विवेकवादाची दिवसाढवळ्या निर्घृणहत्या करण्यात आली. त्या घटनेला आज चार वर्षे पूर्ण झाली. अत्यंत भ्याड हल्ला करून या दिवशी त्यागवादी सजगतेवर नियोजनपूर्वक घाला घातला गेला. नरेंद्र दाभोलकरांची हत्या सनातनी विचारांना वंदनीय मानणाऱ्यांनीच केल्याचा कयास त्या दिवसापासूनच उभ्या महाराष्ट्राने व्यक्त केलाय. ही हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या वसनांवरचा रक्तरंजित डाग आहे ज्याचे सद्य स्थितीत तर कोणत्याच राजकीय पक्षाला कसलेच सोयरसुतक दिसून येत नाही.गांधीवादी विचारांवर श्रद्धा ठेवून आपली चळवळ शांततेच्या मार्गाने पुढे नेणाऱ्या, वृद्धत्वाकडे झुकलेल्या एका निशस्त्र व्यक्तीस मारलं गेलं तेंव्हा राज्यभर नव्हे तर देशभर त्याबद्दल निषेध व्यक्त केला गेला,सर्वत्र एकच कोलाहल माजला तरी तपास यंत्रणांच्या कानात जू रेंगली नाही की कोणा राजकारण्याला याचा खंतखेद वाटला नाही. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, तपास जलदगतीने व्हावा म्हणून राज्यातील विरोधी पक्ष लाजेकाजेने का होईना अधूनमधूनक्षीण आवाज उठवताना दिसतात. त्यांचा आवाज असा क्षीण का आहे याला विविध कारणांची 'भगवी','हिरवी', 'निळी' झालर आहे.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रेड लाईट डायरीज - स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...




देशाला स्वातंत्र्य मिळाले पण देशातील सर्व घटकांना स्वातंत्र्य मिळाले का याचे उत्तर नकारार्थी येते. आपल्या देशात आजही अनेक प्रकारचे वंचित, पीडित, शोषित आहेत, त्यातलेच काही वर्ग आजही खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेले नाहीत. यातीलच एक घटक म्हणजे अलीकडच्या सभ्य जगाच्या ढोंगी शब्दात सेक्सवर्कर वा देशी भाषेत वेश्या होत. त्यांच्या जीवनातील स्वातंत्र्याची ‘खरी’ सकाळ कधी उगवेल की नाही हे नेमके कोणी सांगू शकत नाही. अशाच एका दुर्दैवी मुलीची ही एक करुण कथा.

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....



आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते. दुःख याचं आहे की, अज्ञानाच्या घोषा आड  तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या, गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

वृत्तवाहिन्यातील पत्रकारिता - अस्तंगत होत चाललेले सत्यतत्व.


'हाऊ सेन्सॉरशिप वर्क्स इन ब्लादीमीर पुतीन्स रशिया' या मथळ्याची बातमी अमेरिकेतील सर्वोच्च खपाचे दैनिक असणाऱ्या 'द वॉशिंग्टन टाईम्स'ने ९ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात छापली होती तेंव्हा रशियन प्रशासनाला त्याच्या फार मिरच्या झोंबल्या होत्या, अमेरिकन मिडीयाने वाकुल्या दाखवत याचा आनंद घेतला पण तो फार काळ टिकला नाही जेमतेम वर्षातच अमेरिकेतच याहून वाईट परिस्थिती आली. डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी नावडत्या प्रसारमाध्यमांना व्हाईटहाऊसची दारे बंद केली. जी प्रसारमाध्यमे आपल्यावर आपल्या धोरणावर टीका करतात ती ‘अमेरीकाविरोधी’ असल्याचा कांगावा त्यांनी सुरु केला. टीका कारणाऱ्या प्रसारमाध्यमांना त्यांनी 'अपोझिशन पार्टी' असं हिणवून पाहिलं. यामुळे या माध्यमांच्या नाकात वेसण घातली गेली, काही माध्यमे झुकली तर काही आपल्या तत्वांवर टिकून राहिली. यातून ज्यांनी ट्रम्प प्रशासनापुढे आधीच पायघड्या अंथरल्या होत्या त्यांची मात्र चंगळ झाली. फ्रीलान्स पत्रकार डेरेक थॉम्पसन यांनी 'द अटलांटीक' मध्ये काही दिवसापूर्वी रंजक आढावा घेतला आहे त्यात काही महत्वाची तथ्ये समोर आलीत. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यापासून फॉक्स न्यूज, एमएसएनबीसी आणि सीएनएन यांची किती चंगळ सुरु झाली आहे हे त्यांनी आकडेवारी सहित दिले आहे. त्याच बरोबर प्रिंट मिडीयात आपल्या आवडत्या समूहाला त्यांनी जाहिरातीचा मलिदा कसा वाटला गेला याची रोचक माहिती त्यात आहे. जगभरातील मिडीयाचा आढावा घेताना 'द गार्डियन' या कुरापतखोर दैनिकाने २४ मार्च २०१७च्या अंकात ब्लादिमीर पुतीन त्यांना न आवडणाऱ्या मिडिया समूहाशी कसे वागतात आणि त्यांची पत्रकारीतेबद्दलची भूमिका काय आहे हे खोचक पद्धतीने मांडले आहे.