रविवार, ३० एप्रिल, २०१७

रेड लाईट डायरीज - एक रात्र 'दिवाली नाईट'ची.....


आमचं सोलापूर शहर कर्नाटक आणि आंध्रच्या सीमेवर आहे. या दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील नजीकच्या शहरात आणि उस्मानाबाद, कोल्हापूर, नगर या सीमासलग जिल्ह्यातील ज्या भागात बांधकामे चालू आहेत तिथे सर्वत्र बिहारी मजूर मोठ्या प्रमाणावर आहेत. यांचे ह्युमन एस्कॉर्ट ठेकेदार असतात, वर्षाकाठी दर दिवाळीला या लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून छुप्या पद्धतीने भोजपुरी गायिका, नर्तिका (छे छे, डान्सबार बंद झाल्यामुळे कुठेही नाचायला तयार असणाऱ्या मुलीच ह्या) आणि डीजे सहित आधुनिक वाद्यांनी सुसज्ज ऑर्केस्ट्रा आणून एकच कल्ला केला जातो. या मुली प्रोव्हाईड करणारी एक चेन असते. त्यातल्याच एकाने माहितीपूर्वक आवतन दिल्याने आणि मी ज्या वसंतविहार भागात राहतो तिथेही बांधकामांना ऊत आलेला असल्याने, तिथल्या एका बिहारी ठेकेदाराच्या आग्रहाने दिवाळीच्या रात्री एका सीमावर्ती डीप इंटेरियरच्या मात्र हायवेलगतच्या भागात झालेल्या अशाच एका बेभान मैफीलीत सामील झालो. दिवाळीचा हा अनुभव व्यक्तीसापेक्ष भिन्न जाणिवा देणारा होता. काहींनी याचा आनंद लुटला काहींनी ऐश केली तर काहींचे शोषण झाले तर माझ्यासारखा भणंग गोठून गेला. त्या रात्रीची ही चित्तरकथा.

शनिवार, २९ एप्रिल, २०१७

अनुवादित कविता - ए. के. रामानुजन ; तमिळ कविता

बांगडया...

सख्यांनो तो ज्या समुद्रात जातो, तो गगनभेदी रोरावतो, प्रलयंकारी फुगतो.
शंख शिंपल्यांना उधळतच किनाऱ्यावर आणतो, कधी त्यात आवाज शिटीचा घुमवतो.
पण माझा नावाडी त्याच्या लाकडी होडक्यातून पुढेच जात राहतो. लाटांच्या थंड फटक्यांना वल्ह्यांचे गतिमान संगीत देतो.

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

कसदार 'जयवंत' साहित्यिक .....


कोकणच्या लाल मातीला आपल्या दर्जेदार साहित्यातून उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख सांगता येतील, ते म्हणजे जयवंत दळवी. जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

'लिओ टॉलस्टॉय' - कादंबरीकार ते तत्ववेत्ता .... पूर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध



काही काळापूर्वी अभिनेता रजनीकांतचा एक किस्सा वाचनात आला होता. रजनीकांत मंदिराबाहेर थांबलेला असताना एका महिलेने त्याला भिकारी समजून दहा रुपये दिले आणि त्याने ते भीक म्हणून स्वीकारले ! असाच किस्सा लिओ टॉलस्टॉय यांच्याबाबतीत पूर्वी घडलाय. टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होता. तो आपल्या काही सैनिकांची मॉस्को स्टेशनवर वाट पाहत होता. मॉस्कोत नेहमीच रक्त गोठवणारी थंडी असते त्यामुळे अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच उमगत नव्हतं. तेव्हढ्यात एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ हमाल आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय गोंधळला. पण पुढच्याच क्षणी त्यानं ते सगळं सामान उतरवलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना ! हे सैनिक एका हमालाला का सॅल्यूट मारतायत ? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्यावर बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर उभ्या असलेल्या सार्वकालीन महान कादंबरीकाराने आपलं सामानही उतरवून दिलं या कृतीनं बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनंच त्यांचे आभार मानले, ते तिने दिलेल्या कामाबद्दल. हमालाला देय असलेली रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

कल्पवृक्ष ....



बघता बघता पावसाच्या बातम्या हळूहळू कमी झाल्यात, कवींच्या कविता करून झाल्यात... आणि बघता बघता पाऊस थबकलाय देखील... इकडे काळ्या मातीने सगळे पाणी अधाशासारखे गटागटा पिल्येय... काही ठिकाणी कोवळे हिरवे कोंब आलेत तर मातीच्या सांदीत दडून बसलेल्या चुकार बीजाला कुठे तरी अंकुर देखील आलेत.. वाळून काडी कामटी झालेल्या खोडाला पालवी देखील फुटलीय... पण हे सारं कुठं होतंय ? .. हे सारं लगोलग फक्त काळ्या मातीतच होतंय... मात्र बरड रानात, मुरमाड जमिनीत हे इतकं सहजासहजी होत नाहीय....

'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू..

सिंहासन .. 

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेलं दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलाय.
काही वेळापूर्वी त्याला दस्तुरखुद्द 'सीएम'चा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्याच फोनच्या विचारात आहे.
इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडिओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण मोलकरीण छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी!
तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो.

ती आत येते. रेडिओवर मंद स्वरात गाणे सुरु असतं - 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गं, हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा गं, अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… '
दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो.
बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते.
दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे.
त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची रिंग वाजते.
पलीकडून संवाद सुरु होतो -
"श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं? काय म्हणत होते श्रीमंत?"
दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचं विचारत होते…"
पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?"
बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोऱ्या असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो,
"काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...



१९८२ चा सुमार असावा. फिल्मसिटीत 'सौतन'चे शुटींग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम (राजेश खन्ना) सैरभैर होऊन जातो. आपल्या मनातले वादळ शांत करण्यासाठी ऑफिसमध्ये स्टेनो असणाऱ्या गोपालकाकांच्या (श्रीराम लागू) घरी त्यांच्या मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) भेटायला येतो असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले. चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तर त्याने तिथेच हलका 'डोस' लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ निशब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली. तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्या नंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला. कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला....

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

वियोगकविता ...



लढाईवर गेलेल्या एका तरण्याबांड वीराचा मृतदेह घरी आणलाय आणि त्याच्या पाठी आता त्या घरात त्याची तरूण विधवा पत्नी व तान्हुले मूल मागे राहिले आहेत. आपल्या पतीच्या कलेवराकडे शोकमग्न अवस्थेत दग्ध झालेली ती स्त्री स्तब्ध झाली आहे. तिने आपले दुःखावेग मोकळे करावेत मनातले अश्रुंचे बांध फुटू द्यावेत यासाठी तिचे स्वकीय प्रयत्न करताहेत. काहीही केले तरी अतीव दुःखामुळे समाधिस्त स्तब्धतेत गेलेली ती स्त्री काही बोलत नाही. हे पाहून तिथे असणारी एक वृद्धा उठते अन त्या वीरपत्नीच्या मांडीवर तिचे तान्हुले ठेवते. तिच्या मांडीवर ते तान्हुले येताच तिला वास्तवाचे भान येते आणि तिच्या अश्रूंचा बांध आता फुटतो. कवी लॉर्ड टेनिसन यांच्या 'Home they Brought her Warrior Dead' या वियोगकवितेतली ही काव्यकथा आपल्या डोळ्याच्या कडा ओल्या करते...

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ....अत्रेंच्या कविता


सिनेमागृहातल्या पडद्यावर दृश्य दिसतेय - 'देव्हारयासमोर बसलेली तिशीतली ती प्रसन्न मुद्रेतली तेजस्वी स्त्री निरंजनासाठी, समईसाठी कापूस वळून त्याच्या नाजूक वाती तयार करत्येय. कानातली कुंडले, गळ्यात काळ्या मण्यांची सर, सैल अंबाडयात खोवलेले फुल तिच्या सध्या सोज्वळ व्यक्तिमत्वास खुलून दिसते आहे. तिच्या समोरच्या लाकडी देव्हारयातील देवांच्या मूर्तींवर पिवळसर आभा पसरलेली आहे. समईची मंद ज्योत तेवते आहे, तिचा उजेड सारया खोलीत पसरलेला आहे. तिच्या मागे असणारया भिंतीवर देखील देवांच्या तसबिरी डकवलेल्या आहेत. तिच्या शेजारी एक विधवा वृद्धा एका मुलाचे डोके मांडीवर घेऊन बसलेली आहे. काही वेळापूर्वीच तिथे भावंडांत पाय दाबण्यावरून भांडण झालेलं आहे, 'घरातली सगळी लहान सहान कामे एकानेच का करायची ? एकानेच का ऐकायचे ?" असा सवाल एका गोजिरवाण्या मुलाने केला आहे. इतक्यात आपला अभ्यास संपवलेला दुसरा एक साजिरा मुलगा त्या वृद्धेस लाडाने म्हणतो की, "ए आजी एखादं गाणं म्हण की गं !". त्यावर ती वृद्धा हसून म्हणते की, 'मी जर गाणं गायलं तर सगळी आळी गोळा होईल हो ! मग त्या सुहास्यवदनेकडे बघत ती म्हणते, "यशोदे तूच म्हण की गं गाणं !" आणि ती विचारते, "ते चिंधीचं गाणं म्हणू का ?"तो गोजिरवाणा सोडून सारे जण तिला होकार देतात आणि ती गाऊ लागते- 'द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी गं पितांबर दिला फाडून..." आता खोलीत बसलेले सगळेच जण एका तालात हळुवार टाळी वाजवून तिला साथ देतायत...' सिनेमागृहात हे दृश्य पाहणारया सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. साल होते १९५३. चित्रपट होता 'शामची आई'. हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

मैत्र जीवांचे .....



शाळा म्हणजे फक्त बहुमजली इमारती नसतात,
नक्षीदार आकाराच्या रंगीबेरंगी ढंगाच्या इमारतीदेखील शाळा नसतात..
शाळा म्हणजे नुसत्या खोल्या आणि मुले- माणसे नसतात, न केवळ मोठे प्रवेशद्वार अन शिस्तबद्ध आवाज ! शाळा असतात तरी काय ?
पोपडे उडालेल्या,जागोजागी गिरवागिरवी केलेल्या,विटक्या रंगाच्या वर्गाच्या चौकोनी भिंती !
अन त्यावर लटकणारे वेगवेगळ्या चित्रांचे फळांचे, फुलांचे अन विज्ञानाचे गोल चौकोनी तक्ते.