सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !



‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !



"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......" 

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

रेड लाईट डायरीज - शिल्लक



गिलटाचे वाळे, चांदीचे पाणी दिलेलं काळपट पैंजण
आणि बेन्टेक्सचे खोटे दागिने.
छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या
पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्या.
डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले
नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर.
समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले,
वीण उसवलेले दोन ब्लाऊज.
एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण
ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडी.
गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला,
पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो.
कुठली तरी जुन्या जमान्यातली
बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर.
हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी.
स्पंज निघालेली बेरंग झालेली राखी.
ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया,
मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी.
काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम,
बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे.
कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती.
वरचे अस्तर खरवडून गेलेली,
पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स.
फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी.
मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे.
इतकं सारं सामावून घेणारी कडी कोयंडा मोडलेली, गंजून गेलेली, फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची संदूक.
देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं, चहा कँटीनची किरकोळ उसनवारी.
करपून गेलेल्या इच्छा, चक्काचूर झालेली स्वप्ने,
मरून गेलेल्या वासना, घुसमटुन गेलेलं मन,
खंगलेलं कलेवर.

बुधवारातली शांताबाई
वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत
तडफडून मरून पडली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती...

- समीर गायकवाड.

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...



ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.

पोळा- मुक्या जीवाचे ऋण...

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

गावाकडची रम्य सकाळ ....


वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. 


शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

बिनकामाचे शहाणे...



पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणा' माणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेला, सखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली.
एक उचापतखोर, कुरापतखोर, कपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धी, कुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

सच्च्या प्रेमाची अदुभूत गाथा - अमृता - इमरोजची लव्ह स्टोरी !



शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.
ती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

रंग 'हरवलेली' रंगपंचमी ...

'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसतेमात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतोहे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतातत्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होतेआपणही त्या क्षणांत हरखून जातोप्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंगकाही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतातत्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतातअशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.