शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

कवितेचे बंड - ज्योती लांजेवार


‘घर काळोखात उभे
आत तान्हुला रडतो
देह सजवी माऊली
पान्हा चोळीत गळतो’
स्त्रियांचे नेहमीच शोषण होत गेले पण स्त्रियांनी त्यामुळे आपला स्त्रीत्वाचा धर्म कधीही सोडला नाही. स्त्रियांनी आपल्या अंगभूत कर्तव्यांशी कधी बेईमानी केली नाही, प्रसंगी शील विकले पण आपल्या कर्तव्यांना त्या सन्मुख राहिल्या. मनाला स्पर्श करणाऱ्या मोजक्याच पण हळव्या शब्दात स्त्रीत्वाचे दुःख आणि स्त्रीची कर्तव्य सापेक्षता या कवितेत समोर येते. कवयित्री प्रा. डॉं.ज्योती लांजेवार यांची ही कविता.

"स्त्रियांना संरक्षण तीस टक्के आरक्षण
एक क्रांतिकारी पाऊल आहे-
भ्रष्टाचाराच्या जंगलात चोरांची चाहूल आहे. .... "
आपलं म्हणणं मांडताना ते थेट लक्ष्यावर घाव घालणारे मर्मभेदी असलं पाहिजे याची पुरेपूर जाणीव कवयित्री लांजेवार यांना आहे. दलितांच्या आरक्षणाबद्दल आणि हक्काबद्दल तर अगदी आक्रमक व अभ्यासू पद्धतीने त्या आपले म्हणणे मांडतातच. खेरीज महिलांच्या हक्काबद्दलही त्या सजग आहेत. स्त्रीत्वाचा हुंकार त्या गर्जनेच्या स्वरुपात देतात, त्यात उपेक्षित भिक्षुकीच्या छटा न येऊ देता आपला मुलभूत हक्काचा रेटा उतरवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची जी काही टक्केवारी आहे त्यावर भाष्य करताना या तरतुदीतून निर्माण झालेल्या समस्येवर त्या अचूक बोट ठेवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची ही योजना निश्चितच क्रांतिकारी आहे हे मान्य करून त्यातली उणीव पुढच्याच पंक्तीत अधोरेखित करतात. कारण या स्त्री आरक्षणाच्या आडून पुरुषच पत्ते पिसतात आणि त्यातून सोयीस्कर लोकांची वर्णी हव्या त्या जागी लावून भ्रष्टाचाराची नवी कुरणे निर्माण करतात.

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

विद्रोही 'फिर्याद' - हिरा बनसोडे



सखी, आज प्रथमच तु माझ्याकडे जेवायला आलीस,
नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस.
सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत
परंतु तु आभाळाचे मन घेऊन आलीस,
माझ्या वीतभर झोपडीत,
वाटले, जातीयतेचा तु कंठच छेदला आहेस,
माणसाला दुभंगणाऱ्या दऱ्या तु जोडत आली आहेस.
खरेच सखे, फार फार आनंदले मी,
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझे ताट सजविलं,
किती धन्य वाटलं मला !
पण ....पण ताट पाहताच तुझा चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तु म्हणालीस,
" इश्श ! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का ?
अजून पान वाढायला तुला येत नाही
खरच, तुमची जात कधीच का सुधारणार नाही ?"
माझा जीव शरमून गेला ....
मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात
खटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले,
मी गप्प झाले ...
जेवण संपता संपता तु मला पुन्हा विचारलेस,
" हे गं काय ? मागच्या भातावर दही, ताक काहीच कसं नाही ?
बाई गं, त्याशिवाय आमचं नाही हो चालत.......?"
माझं उरलंसुरलं अवसानही गळालं
तुटलेल्या उल्केसारख,
मन खिन्न झालं,सुन्न झालं पण ....
पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं
पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो,
तसं सारं पुर्वायुष्य हिंदकळून समोर आलं,
" सखे, दही- ताकाच विचारतेस मला ! कसं सांगू गं तुला ?
अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दुध मिळत नव्हतं,
तिथं कुठलं दही अन कुठलं ताक ?
लाकडाच्या वखारीतून आणलेल्या टोपलीभर भुश्श्यावर
माझी आई डोळ्यातला धूर सारीत स्वैपाक करायची
मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधीमधी,
नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही,
सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्शनरीत नव्हता तेंव्हा,
लोणकढी तुपाचा सुगंध घेतला नव्हता कधी माझ्या नाकाने,
हलवा, बासुंदी चाखली नव्हती कधी या जिभेने,
सखी, तुझी परंपरा तु सोडली नाहीस,
तर तिची पाळेमुळे तुझ्या मनात रुजलेली आहेत
हेच त्रिवार सत्य आहे ....
मैत्रिणी, मागच्या भातावर दही नाही
म्हणून रागावू नको गं .....!
तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला
यात माझा काय दोष, हे मला सांगशील का ?
माझा काय दोष मला सांगशील का ?'
कवयित्री हिरा बनसोडे यांची 'फिर्याद' या काव्यसंग्रहातली ही कविता.

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

ग्लॅमरचा भयाण अंत - परवीन बाबी .....

paraveen babi


१९ जानेवारी २००५. मध्यरात्र उलटून गेलीय. रात्रीचे दोन वाजलेले. जुहू परिसरातल्या इमारतीतले दिवे मालवलेले होते, रस्त्याला किंचित पेंग येत होती. तिथल्याच पाम बीचवरील रिव्हीएरा ह्या बहुमजली

इमारतीतील चौथ्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅटमध्ये मात्र लाईट्स चालू होत्या. या फ्लॅटमधील लाईटस मागील पंधराएक वर्षात रात्री क्वचितच बंद व्हायच्या...फ्लॅटच्या दर्शनी हॉलमध्येच 'तिने' आपला बिस्तरा लावला होता. तिच्या समोरच्या भिंतीवर दोन मोठे पोट्रेट होते. उजव्या दिशेला कोपरयातील मेजावर एक कोरा कॅनव्हास होता. या भिंतीलगत आतल्या खोलीत जाण्याची एक चौकट होती, तिच्या डाव्या हाताला एक छोटीशी बेडरूम होती.

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

दोन पावले मागे सरलेला 'वाघ' ...


आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

'अनसोशल' मीडियावरवरचा 'भगवा' मुळचा आहे तरी कसा ?



मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण .



गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते. रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच असे. बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत.
पारायणात रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

मला उमगलेला 'मराठयांचा मूकमोर्चा'....


शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

अखिल बिरादरीचा बापवृक्ष .....



माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

शुक्रतारा - मंगेश पाडगावकर


'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........

घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'

सर्वांच्या मनामनात एक अवखळ, निष्पाप निरागस असं शैशव दडून बसलेलं असतं, प्रत्येकाला अखेरपर्यंत ते जाणवतं मात्र ते कधी व्यक्त करता येत नाही. जनमानसाच्या मनातील भावनांच्या प्रकटीकरणाचं हे काम कवी मंडळी करतात. सर्वच कवींना हे जमतं असं नाही. काही कवी ते वैयक्तिक अनुभव म्हणून मांडतात मग तो त्यांच्यापुरता मर्यादित होऊन जातो. मात्र अद्वितीय प्रतिभा लाभलेला एखादा कवी अगदी सहजतेने, उत्कटतेने अशा काही शैलीत हा अक्षरगंध रेखाटतो की त्या भावना वैयक्तिक कवीपुरत्या सीमित न राहता सर्वंकष स्वरूप धारण करतात. ते काव्य वाचताच रसिक उद्गारतात की नेमके माझ्या मनातले भावच कवींनी मांडले आहेत. ही किमया करतानाच जर त्या कवींनी बालकवितांपासून प्रेमकविता, गूढकविता, निसर्गकविता, सामाजिक आशयाच्या कविता, बडबडगीते, विरहगीते, चित्रपटगीते, भावगीते अशा सर्व प्रकारचे विपुल काव्यलेखनातून एक अलौकिक श्रेष्ठ दर्जाची साहित्यनिर्मिती केली असेल तर त्या कवीला कविश्रेष्ठच म्हटले पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव यामुळेच मराठी साहित्यात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....



आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं,
कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून
राहायचं पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.

‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...