शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...

मंगळवार, २६ जुलै, २०१६

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....



आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय). 

मंगळवार, १९ जुलै, २०१६

निरभ्र ......



बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....

शनिवार, १६ जुलै, २०१६

बैलगाडीच्या रम्य वाटा .......



बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....

शुक्रवार, १ जुलै, २०१६

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता



आई मी बचावलेय गं,
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला तू पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं,
माझं प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी
काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं,
वा ऑनर किलिंगसाठी मी कामी आले असते !

मात्र आता हरेक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडिलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर
माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच,
माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि
आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मी बचावलेय गं, आई मी बचावलेय गं
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

रेड लाईट डायरीज - 'रेड लाईट एरिया'तल्या मातीमोल मौती ....



काही महिन्यांपूर्वी कामाठीपुऱ्यातील एका प्रौढ वेश्येच्या करुण मृत्यूवर एक पोस्ट लिहिली होती. कालपरवा तिच्या मुलींबद्दलची माहिती मिळाली..
ती माहिती ऐकून वाटले की हे पहायला वा ऐकायला 'ती' आज हयात नाही हे बरे झाले कारण या घटनेने ती रोज तीळतीळ तुटत राहिली असती अन खंगून खंगून मेली असती...

ही सत्यघटना आहे मुमताजची..
एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची अन भारतमातेच्या एका निष्पाप मुलीची, कस्पटासमान जगून कुत्र्याच्या मौतीने मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची..

आपल्या देशात रोज लाखोने माणसे मारतात त्यामुळे कोण कुणासाठी मेले याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.

मरणारी व्यक्ती वर गेल्यावरदेखील कधी कधी तिचे कवीत्व दीर्घकाळ सुरु असते तर काही अभागी असेही असतात की मृत व्यक्तीच्या आसपासचे लोक त्या दुःखद वेळीही शय्यासोबतीत मश्गुल असतात !

रविवार, १९ जून, २०१६

शिवसेना - वाघाची पन्नाशी ! - एक आलेख ....



५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.

विठ्ठलभक्तीची पाऊसवारी...


आषाढी वारीतलं कुंद पावसाळी वातावरण, टाळमृदंगाचा तालबद्ध नाद, वारकऱ्यांची एका लयीत पडणारी पावले आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्षेत तिकडे पंढरपुरात कंबरेवर हात टेकवून विटेवर उभं असलेल्या विठ्ठलाच्या जीवाची होणारी तगमग हे सारंच अद्भुत असतं. याचा सर्वात मोठा आणि सर्वकालीन साक्षीदार असतो तो पाऊस. या पावसाचं आणि आषाढीचं नातं मायलेकरासारखं आहे. हा पाऊस पेशाने शेतकरी असलेल्या वारकऱ्याच्या जीवनांत अनन्यसाधारण स्थानी आहे. कारण त्याचं अवघं जीवन त्याच्याभोवती गुंफलेलं आहे. कदाचित यामुळेही ऐन पावसाळ्यातल्या आषाढी वारीस दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येतेय.

गुरुवार, १६ जून, २०१६

आता वंदू कवीश्वर ..



अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)        

सुरेश भट -

क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !

गुरुवार, ९ जून, २०१६

अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .


साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....

गावाकडचा पाऊस ....



गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापूरात. इथला पाऊस अगदीच अरसिक.
त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते...
गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. पावसाच्या स्वागतासाठी पेज होते. त्यासाठी माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृद्गंधाचा वास सारं कसं मस्तकात भिनत जातं....

मंगळवार, ७ जून, २०१६

मायेचं कष्टाळू गणगोत - बैल


मऊसुत रेशमी अंगाचं पांढरं शिफट खोंडं होतो तेंव्हा धन्याने घोडेगावच्या बाजाराहून आणलं होतं तो दिवस अजून आठवतो. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. दावणीत तेंव्हा कधी टाचकं पडलेलं नसं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा धन्याने कधीकधी गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती.

सोमवार, ३० मे, २०१६

'आमच्या काळी असं नव्हतं (?)......'



आताच्या तरुण पिढीचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्वतःचे असे स्वतंत्र आणि स्वागतार्ह आहेत. यासाठी कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो. पण काही चाळीशी गाठलेली वा चाळीशी पार केलेली मंडळी याच मुद्द्यावर बोलताना थोडा कद्रूपणा करतात.
'ही पिढी फार नशीबवान बघा नाहीतर आमच्या पिढीला असली सुखं नव्हती' असा सूर जनरली ते आळवत असतात.
मित्रांनो हे तद्दन खोटं असतं, ही धूळफेक असते.

'औदुंबर' - बालकवी



औदुंबर...
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

औदुंबर ही बालकवींची ओळख म्हणून ख्याती पावलेली कविता. ही एक अनुभवदायी प्रचीती देणारी कविता आहे, तिला समजावून घेण्यासाठी दुसऱ्याच्या संदर्भांची, स्पष्टीकरणांची गरज भासत नाही. अत्यंत प्रवाही, कमालीची सोपी, साधी नादमधुर अशी ही कविता आहे. तिच्यात गेयता आहे, तिला ताल आहे. लय आहे. ती यमकांची वा प्रतिमांची चतुरस्त्र जुळवाजुळवी नाहीये. विशाल कॅनव्हासवर चितारलेल्या एखाद्या टुमदार गावकुसाबाहेरच्या मनोहारी निसर्गरम्य दृश्यांच्या पोट्रेटची परिणामकारकता या कवितेतून बालकवींनी साधली आहे. निसर्गाचे इतके देखणे वर्णन एक अभिजात प्रतिभावंत कवीच करू शकतो, बालकवी हे तर प्रतिभेचे अलौकिक देणे लाभलेले सौंदर्यदृष्टीची जादुई पारख असणारे कवी होते.

गुरुवार, २६ मे, २०१६

आठवणीतले विलासराव...



विलासरावांच्या ६०व्या वाढदिवशी ज्येष्ठ पत्रकार श्री.मधुकर भावे यांचे 'राजहंस' हे पुस्तक मुद्रा प्रकाशनने प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन त्यावेळचे राज्यपाल रा.सु. गवई यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाची कल्पना भावेंनी विलासरावांना दिली. त्यावर विलासराव त्यांना फोनवर म्हणाले की, " तुम्हाला त्यात ज्या कोणत्या मान्यवरांचे फोटो द्यायचे असतील ते द्या; पण दोन फोटो द्यायला विसरू नका, एक वसंतदादा पाटील यांचा आणि दुसरा माधवराव शिंदे यांचा. पुढे राजहंसचे थाटात प्रकाशन झाले. त्या पुस्तकाची प्रत भावेंनी विलासरावांना दिली. वसंतदादा आणि माधवरावांचे फोटो पाहून ते काहीसे हळवे झाले. कारण तेंव्हा हे दोन्ही नेते जगात नव्हते आणि विलासराव म्हणाले, "तुम्हाला हे दोन फोटो टाकायला सांगितले त्याचे कारण म्हणजे मला वसंतदादांनी राज्यमंत्री करून गृहखाते दिले आणि कॅबिनेट मंत्र्याला देतात त्याप्रमाणे मी राज्यमंत्री असताना मला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री केले."

मंगळवार, १७ मे, २०१६

आदय क्रांतिकारक उमाजी नाईक - क्रांतीचा गौरवशाली इतिहास...



३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...

~~~~~~~~

ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे 

नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.

शुक्रवार, १३ मे, २०१६

वढू तुळापूरची गाथा .....



राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते,
हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे !
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात !
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो !
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय !

मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -



मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.

गुरुवार, १२ मे, २०१६

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..

अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.

शिंदेशाहीचा देदिप्यमान इतिहास .....


शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणाऱ्या  विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....

बुधवार, ११ मे, २०१६

गोब्राम्हण - जुन्या वादाला नवी फोडणी !



"आजवर शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने शिकवला गेला. ज्ञान देण्याची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे असल्याने त्यांना अभिप्रेत असलेला इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी होते, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. आजही विशिष्ट भूमिका समाजासमोर मांडण्याचे आणि तरुणाईच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना मिळणारे यश अस्वस्थ करते", अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली आणि राज्यात एकच धुरळा उडाला.

मंगळवार, १० मे, २०१६

मराठ्यांच्या इतिहासातील भाऊबंदकी ... कोल्हापूर - सातारा गादी !


#१२जानेवारीचे दोन संदर्भ - एक अतिव सुखाचा तर एक भाऊबंदकीचा...
१२ जानेवारी हा जिजाऊ मांसाहेबांचा जन्मदिवस, ज्या जिजाऊनी शिवराय घडवले, स्वराज्याची आस जागवली अन एक भव्य दिव्य स्वप्न नुसते पाहिलेच नाही तर प्रत्यक्षात आणले त्यांचा जन्मदिवस म्हणजे तमाम मराठी माणसांचा आनंदोत्सव !! हा खरा सण, ज्यांनी आपल्या सर्वांचे स्वराज्य निर्मिले त्यांचा हा जन्मदिन !! त्यामुळे आजच्या या १२ जानेवारीचे महात्म्य कैक पटीने वाढले ! १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा (आजच्या बुलढाणा जिल्ह्यातले) इथे लखुजी जाधवरावांच्या घरी त्यांचा जन्म झाला अन सह्याद्रीपासून ते भीमा-गोदाच्या प्रवाहावर आनंदाचा रोमांच आला. जिजाऊ मांसाहेबांच्या जन्मामुळे १२ जानेवारीचा संदर्भ आत्यंतिक आनंदाचा होऊन गेला आहे. पण ज्या जिजाऊनी मराठ्यांच्या शौर्याचे बीज रोवले, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ज्यांनी स्वराज्यनिर्मितीसाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या जन्मदिनाच्याच तारखेला ११० वर्षांनी मराठी स्वराज्यात दुही माजली, भाऊबंदकी झाली ! या दिवशी झालेल्या घटनेतून बोध घेऊन प्रत्येक मराठी माणसाने आपसातले वाद नक्कीच टाळले पाहिजेत नाहीतर १२ जानेवारीचा हा दुसरा संदर्भ आपल्याला आयुष्यभर अणकुचीदार दुहीचे भाले टोचवत राहतील....
काय झाले होते १२ जानेवारी १७०८ ला ? ह्याची माहिती घ्यायला आपल्याला इतिहासात जावे लागेल. पण नुसते मागे जाऊन चालणार नाही तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे तरच भाऊबंदकीचा लकडा आपला पिच्छा सोडेल ..

स्त्रीत्वाची कोंडी - 'आई' ! प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या 'आई' पुस्तकाचा रसास्वाद ...



"जायची चार वाजताची वेळ होत आली. ती हट्टानं अधिकच बेभान झाली. मी जाणार नाही हं !- तिचा पक्का निश्चय. तिच्या लक्षात आलं, बाळाला हे सोडून मला नेणार. तिला तिचा कुक व 'तो' दोघांनी दोन्ही बखोट धरून बेडरूमच्या दारापर्यंत खेचून आणलं. तिने दोन्ही पायाचे पंजे उंबरयाला घट्ट टेकवून दोन्ही हात दाराच्या चौकटीला दाबून धरले. "मला बाळाला टाकून नाही जायचं...मी नाही जाणार." दोघांनी सारी त्यांची ताकद पणाला लावली.तिला बाहेर काढली अन अक्षरशः फरफटत ओढीत बाहेरच्या दारापर्यंत आणली. ते सारं पाहून मी जमिनीवर कोसळलेच. तिची गाडी जसलोकच्या गेटपर्यत पोहोचली अन ती कोमात गेली ती अखेरपर्यंत. तिला कृत्रिम लंग्जवर ठेवून, १३ तारीख उलटली आणी बाळाच्या बारश्यापासूनची त्याची स्वप्नं पाहणारी एक बाळवेडी 'आई' त्याला सोडून कायमची निघून गेली. दुःखाचा डोंगर कोसळला, बाळाला क्षणभरही पापणीआड न करणारी. आईपणाला अखंड आसुसलेली ही थोर आई तिच्या बाळासाठी फक्त एक स्वप्न बनून राहिली.....

सोमवार, ९ मे, २०१६

शहीद भगतसिंह आणि हिंदुत्व - एक विरोधाभास ...

"एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल,
भगतसिंह 
एखादा मुसलमान किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.

मंगळवार, ३ मे, २०१६

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन


प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही.
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे,
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परि हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

कंदहार - हिंदूकुश पर्वतरांगा . एक रोचक शोध - इतिहास ...


क़ीमत, क़ुरबानी हे जसे खालच्या बिंदूचे उर्दू उच्चारण असलेले उर्दू शब्द आहेत तसाच क़ंदहार हा शब्द देखील आहे. आपले काही इतिहास अभ्यासक आणि संशोधक कंदहार शहर - प्रांत म्हणजे आपल्या ग्रंथ पुराणात उल्लेख असलेले काही हजार वर्षापूर्वीचे गांधार हे राज्य समजतात. तसेच उर्दू - पर्शियन इतिहास अभ्यासक या शहराला सिकंदरने (द ग्रेट वॉरियर) स्थापन केलेले सिकंदरिया हे शहर मानतात. आजच्या घडीला हे शहर तालिबानी कट्टरवाद्यांचे प्रमुख आश्रयस्थान आहे. अफगाणीस्तानच्या दक्षिणेकडील हा सर्वात अस्थिर प्रांतापैकी एक आहे, याची दक्षिणेकडील सीमा पाकिस्तानच्या उत्तरेस लागून आहे. पश्तून ही इथली मुख्य भाषा आहे. कंदहार येथील उत्खननात सापडलेल्या चीजवस्तूंना मोठे ऐतिहासिक मुल्य आहे कारण त्याचा कालखंड !

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

राणी चेन्नम्मा असीम शौर्याची धीरोदात्त स्त्री ....



आपल्या सर्वांना झाशीची राणी आणि तिचे असीम शौर्य याविषयी माहिती आहे पण तिच्या कालखंडाहून आधी व तिच्याइतकेच शौर्य- धैर्य यांचे अलौकिक प्रदर्शन करून इंग्रजी सत्तेविरुद्ध शस्त्र उचलणारया पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक चेन्नम्माविषयी फारशी माहिती बहुधा नसते. १८५७च्या बंडाच्या ३३ वर्षे आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष खरे तर भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य संग्रामाच्या गाथेतील एक सोनेरी पान आहे पण आमचे दुर्दैव असे की बहुतांश लोकांना त्यांचे कार्य आणि शौर्य याबाबत अनभिज्ञता आहे. बहुधा झाशीच्या राणीचे 'मराठी'पण आणि अलीकडील काही दशकातील कन्नडिगांप्रतीचा राग याचीही झालर या अनास्थेमागे असू शकते..

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

क्रूरकर्मा नादिरशहा ...



पुर्वीच्या उत्तरपुर्व पर्शियामधील आणि आत्ताच्या इराणमधील खोरासनमध्ये १६८७ सालीं एका धनगरी मेंढपाळाच्या अफ्शराच्या घरी जगात इतिहास घडवणारा एक मुलगा जन्माला आला. किझीबाश आणि अफ्शर या दोन्हीही भटक्या पण पराक्रमी पर्शियन प्रजाती होत्या. त्याच्या जन्मानंतर काही वर्षातच त्याच्या आईला उझबेकी गनिमांनी पळवून नेले. त्याचे वडिल मेंढपाळ असल्याने ते मेंढ्यांच्या चामड्यांचे कोट, टोप्या वगैरे करून विकीत असत. १३व्या वर्षी त्याचे वडिल मृत्युमुखी पडले. आजूबाजूची युद्धग्रस्तता आणि वडिलांचे निधन या अस्थिरतेमुळे लहानपणापासून त्या मुलाचे आयुष्य अनेक प्रकारच्या साहसांत गेले. सतरा वर्षांचा असतांना तो उझ्बेकांच्या कैदेत सांपडला, याचवेळेस त्याच्या आईला बंदी बनवण्यात आले आणि कालांतराने तिचेही निधन कैदेत असताना झाले.१७०८ मध्ये तो उझ्बेकांच्या तावडीतून निसटला आणि खोरासनला परतला. या सर्व घटनांचा त्याच्या युवा मनावर विपरीत परिणाम झाला आणि त्याचा स्वभाव क्रूर, विध्वंसक, परहिताविषयी निष्ठुर व मानवी संस्कृतीला विरोधी असा बनला.

भगिनी निवेदिता - एका योगिनीची कथा ....



कोलकात्त्यातील बागबाजार या जुन्या शहरी भागातली ती एक छोटीशी घरवजा शाळा होती. उन्हाळ्याचे धगधगते दिवस होते. अंगाची लाही लाही करणारया त्या हवामानात महिला,मुले आणि वृद्ध शक्यतो घरी बसून राहत. अशा वातावरणात विदेशी महिलांना फार शारीरिक हाल अपेष्ठा सोसाव्या लागत. मात्र कोलकात्त्यातील त्या छोट्याशा शाळेत एक विदेशी स्त्री अशा विषम वातावरणात आनंदात राहत होती.

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

संयुक्त महाराष्ट्र आणि शाहीर अमरशेख .....


दिल्लीतल्या रस्त्यांवरचा मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता अन त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास एका हाताने डफ वाजवत आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता आणि हे अद्भुत दृश्य बघून हैराण झालेले दिल्लीकर तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते !
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित होऊन बोलले -
"शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर ‘शाब्बास शाहीर’ अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं...."
ती सभा होती संयुक्त महाराष्ट्रासाठीची !
अन 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते - 'शाहीर अमर शेख' !
या अमरशेखांच्या कर्तुत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा ....

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

माणसातला 'देव' ...

 
वाढत्या वयाबरोबर काळ माणसाच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची नक्षी काढायला स्रुरुवात करतो तेंव्हा त्याच्या मनातला भक्ती भाव अधिक तीव्र होतो. पैलतीरीचा तट जेंव्हा खुणवू लागतो तंव्हा देव -देवत्व याविषयी अधिक ओढ लागते. अंगावरची कातडी जसजशी ढिली होत जाते तसतशी ती अधिक नरम पडत जाते अन मनातला ताठा देखील तोवर गळून पडलेला असतो, उरलेली असते ती काळजी, भीती अन त्यातून जन्मलेली श्रद्धा. काळजी राहिलेल्या आयुष्याची असते तर भीती मरणाची असते अन श्रद्धा देवावरची ! काहींची श्रद्धा पूर्वापार असते तर काहींची समयोचित असते तर काहींची गरजेतून उत्पन्न झालेली असते मात्र क्वचित काही लोकांचीच श्रद्धा अंतःकरणातून पाझरलेली असते. पण बहुतांश करून वयपरत्वे अशी श्रद्धा दाटून आलेलेच जास्ती असतात.
श्रद्धा जेव्हढी उत्कट आणि प्रामाणिक असते तितकी काळजी आपसूक कमी होते अन काळजी कमी झाली की मरणाची भीतीही कमी होते म्हणून उतारवयात माणसे परमार्थाकडे सहजच झुकतात. 'शेवटचा दिस सुखाचा व्हावा' हा स्वार्थही त्यात असतो. आयुष्यभर केलेल्या चांगल्या वाईट कर्मांनी ज्याची त्याची श्रद्धेची शिदोरी तयार होते, कधी आयुष्यात आई वडीलांची सेवा केलेली नसेल अन त्यांच्या पश्चात कोणी काशीत उंबरठे झिझवत असेल तर त्याला आईबापही कळले नाहीत अन देव तर नाहीच नाही.

बुधवार, २० एप्रिल, २०१६

काव्यमय पितापुत्र - 'राना'-माधव !


एखादया प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा बहुतांश करून डॉक्टरच होतो तर राजकारणी माणसांची मुले सर्रास राजकारणी होतात. त्याच चालीवर मोठया वकिलांची अपत्ये वकिली करताना आढळतात तर बिल्डरची मुले वडिलांचा कित्ता गिरवतात. कलाक्षेत्रात ही बाब सिनेमा वा नाट्य क्षेत्रात कमीअधिक लागू होते, तिथे मातापिता जे कुणी सिनेमा नाटकाच्या क्षेत्रात असतात त्यांचा सहज पाठिंबा मिळतो. त्यांचे वलय, त्यांची साधने यांचा फायदा होतो अन पुढच्या पिढीला पाय रोवणे तिथं सोपे जाते. मात्र पुढच्या पिढीचे नाणे खोटे असेल तर मात्र ते आपोआपच मागे पडते. इतर कलाक्षेत्रात मात्र असे घडताना दिसून येत नाही. चित्रकाराचं अपत्य चित्रकारच होईल किंवा शिल्पकाराचं अपत्य पत्थराला आकार देईल असे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. अशीच अवस्था क्रिडाक्षेत्रातही पाहायला मिळते. असंच काहीसं साहित्यिकाचं असतं. उत्तम साहित्यिकाचं अपत्य देखील प्रतिभावंत साहित्यिकच झाल्याचं अपवाद वगळता दृष्टीस पडत नाही. मराठी साहित्यात अशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत जिथे मायबापापैकी कुणीतरी साहित्यिक आहे अन त्यांची दुसरी पिढी देखील साहित्यात रममाण झाली आहे. अशा दुर्मिळ साहित्यिक पितापुत्रात सोलापूरचे ज्येष्ठ कवीश्रेष्ठ रा.ना.पवार व त्यांचे प्रतिभावंत कवी पुत्र माधव पवार यांची नोंद होते. गिरणगांव म्हणून परिचित असणाऱ्या व कलाक्षेत्रात काहीसं बकालपण असणाऱ्या सोलापूरसारख्या शहरास या पवार पितापुत्रांच्या लेखनाने एक नवी ओळख प्राप्त करून दिली असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

'बाप'कवी - इंद्रजित भालेराव



इंद्रजित भालेराव हे अस्सल काळ्या मातीचे कवी महाराष्ट्राला कसे गवसले त्याची कथा मोठी सुरस आहे. १९८५ च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं एक नवलेखक शिबीर कोल्हापूरच्या पन्हाळगडावर सुरू होतं. त्यात भालेराव शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले होते. कवितांचं सादरीकरण सुरू होतं. भालेरावांची पाळी आली. त्यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेत नवशिक्षित शेतकरी दाम्पत्याचं वर्णन होतं. नवविवाहित कुळंबीण आपल्या काबाडाच्या धन्याला सांजच्या पहारी लवकर घरी येण्याचं निमंत्रण कसं देते, हा प्रसंग भालेराव कवितेतून मांडत होते.

रविवार, १० एप्रिल, २०१६

'पंत गेले, राव चढले' आणि नाट्यछटाकार 'दिवाकर' - एक आकलन...



नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत. हा साहित्यप्रकार मराठीत दिवाकरांनी ईतका समर्थपणे हाताळलाय त्याला तोड नाही. 'पंत मेले, राव चढले' ही दिवाकरांची एक प्रसिद्ध नाट्यछटा आहे.

शनिवार, २ एप्रिल, २०१६

रणरागिणी ताराराणी ...


दख्खन जिंकायचीच ह्या मनसुब्याने औरंगजेबाने जेंव्हा दिल्ली सोडली तेंव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला, कळसूबाईच्या शिखरावर रोमांच उठले. मावळच्या खोऱ्यात वारा बेभान होऊन वेड लागल्यागत हसत सुटला. संतांच्या ओव्या थरारून गेल्या. काहीशी मरगळून गेलेली सृष्टी टक्क सावध होऊन बघत राहिली. गडकोटांना स्फुरण चढले. कडयाकपारया उल्हासित झाल्या, नदीनाल्यांना भरून आले. तिन्ही ऋतूंना गहिवर दाटून आला. काळवंडलेल्या आभाळात पिसाळलेले ढग जमा झाले, सौदामिनींचा चित्कार सुरु झाला अन काळाला उधाण आले ! कारण सावज आपण होऊन मृत्युच्या दाढेत जणू चालतच आले ! काळाहून क्रूर असणाऱ्या औरंगजेबाने आधी कपटाने शंभूराजांचा काटा काढला त्याला वाटले मरगट्टे संपले. पण तिथूनच एका विलक्षण चमत्कारक अध्यायास सुरुवात झाली. भद्रकाली रणरागिणी ताराराणी कोपली आणि तिने औरंग्यास पुरते नेस्तनाबूत केले. त्याला इथल्याच मातीत चिरनिद्रा घ्यावी लागली. पण त्या नंतर जे काही घडले त्यामुळे मराठी मातीस भाऊबंदकीचे रक्तरंजित इतिहास घडताना मूक रुदन करण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. त्या इतिहासाची ही पोस्ट .....

बुधवार, ३० मार्च, २०१६

फोटोची गोष्ट - तपकीरवाली मावशी .....



काही क्षणच असे असतात की एका झटक्यात काही वर्षे मागे घेऊन जातात, तसाच हा क्षण होता...."विटून गेलेल्या हिरव्या रंगाचे काठापदराचे नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं होते....."

सोमवार, २८ मार्च, २०१६

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !



महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात.

गुरुवार, २४ मार्च, २०१६

गोष्टीवेल्हाळाची बाराखडी - साहित्यिक वर्कशॉप !



एखादं गाणं विविध गायकांनी कसं गायलं असतं याचं सादरीकरण आपण अनेकदा ऐकतो, पाहतो. मात्र एक समान रचना विविध लेखकांनी कशी सादर केली असती याची अनुभूती आपल्याला क्वचित लाभते. त्यादृष्टीने हा खटाटोप.
इथे एका वाक्यात एक घटना नमूद केलीय. या एकपंक्तीय घटनेची मांडणी विविध साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेच्या नि कल्पनाविलासाच्या आधारे कशी केली असती याचे हे प्रकटन.
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." – हे ते वाक्य !

व्यंकटेश माडगूळकर –
ती वैशाखातली रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या माळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत होते. वारं पिऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखं दिसायचे. आजूबाजूला भरड मुरमाची जमीन अन डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकरी खायला तिथंच यायचे पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची गरम हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंदी जाफराबादी म्हैस अन तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेले मरतुकडे काळे कुत्रे वगळता भवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरडयांचा थवा अन वाऱ्यावर डुलणारी गवताची पाती इतकीच काय ती हालचाल होत होती. दिस जाता जात नव्हता अन डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला, तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता !

मंगळवार, २२ मार्च, २०१६

पाऊलवाट…



पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......

बुधवार, १६ मार्च, २०१६

चक्रव्युहातले भुजबळ ….



बालपणीचे हलाखीचे दिवस काढणाऱ्या भुजबळांपासून ते आताच्या अब्जाधीश भुजबळांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा लेख …
छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिक जिल्ह्यातला. भुजबळ चार वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील वारले . त्यांच्या आईच्या मावशीने त्यांचा व त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीचे गेले. माझगावला पत्रा चाळीत ते वाढले. पुढे पोटापाण्यासाठी भायखळा भाजी मंडई बाजारात ते भाजीपाला विकू लागले. मात्र, नंतर तेथील जागा, दुकान गावगुंडांनी ताब्यात घेत हडप केले. पुढे काहीतरी करायचे म्हणून स्थानिक नेत्यांच्या मदतीने आपल्या जागेचे दिवसाला दोन रुपये भाडे गोळा करण्याचे काम सुरु केले. २ रुपये घ्यायचे व जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर विकत बसायचे. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. शिक्षण घेत असताना त्यांनी आपला व्यवसाय बंद केला नव्हता ह्या बाबीचा इथे उल्लेख करावा वाटतो. भाजी मंडई, नातेवाईकांची शेती व या शेतीवर आधारित व्यवसाय भुजबळांनी सुरु केला. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस निर्माण झाला व त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दरम्यान त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण सुरु होते अन तरीही ते सक्रीय शिवसैनिक झाले ! ते सेनेत शाखाप्रमुख झाले. ७० - ८० च्या दशकातला सेनेचा शाखाप्रमुख काय चीज असायची हे वेगळे लिहायचे गरज नाही !

मंगळवार, १५ मार्च, २०१६

भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा. तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाच्या काव्यजन्माची एक कथा आहे. आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्यांना जाणवत होते. त्या दरम्यानच्या काळातच त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.

तांबेंनी लिहिलेली ती कविता म्हणजे मृत्यूकडे केलेली एक तक्रारवजा कैफियत आहे ! अंथरुणाला खिळलेल्या तांबेंनी आपल्या मित्राची विनंती पुरी करताना आर्त शब्दात स्वतःच्या वेदना भावबद्ध केल्या अन एक अजरामर कविता जन्मास आली ती म्हणजे, 'मधु मागसी आता …"

गुरुवार, १० मार्च, २०१६

मर्मकवी - अशोक नायगावकर !



मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते. मंचावरील निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात आणि मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !
एकामागून एक फुलबाज्या उडाव्यात तसे तडतडणारे काव्यात्मक रचना ते लीलया पेश करत जातात. ऐकणाऱ्याच्या कानाखाली जाळ निघावा अशा आशयाच्या कवितांना ते हास्यरसाच्या रुपेरी वर्खात बेमालूमपणे गुंडाळून समोरच्यांना सुपूर्द करतात. मधूनच मिशीवरून हात फिरवत समोरच्या श्रोत्यांकडे मिश्कील नजरेने बघत समोरच्या श्रोत्यांची तल्लीनता किती रंगली आहे याचा अंदाज घेतात. त्यानंतर ते नकळत सभागृह ताब्यात घेतात आणि शब्दांच्या शस्त्राने गुदगुल्या करत करत अंतर्मनावर घावही करून जातात. ते हे कसे आकारास आणतात ते भल्या भल्यानाही उमगत नाही.

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

आयसीस, हेजबोल्लाह आणि हमास - तीन वेगळ्या धारणा...



कालच्या तारखेस १६ फेब्रुवारीस स्थापन झालेली हेजबोल्लाह (अरबी: حزب الله) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. अत्यंत कडवी लढाई करणाऱ्या आणि हार न मानणाऱ्या माथेफिरू देशप्रेमी तरुणांची संघटना असे या संघटनेचे वर्णन केले जाते

१९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हेजबोल्लाहची स्थापना केली. हेजबोल्लाहचे पुढारी इराणचे अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी ह्यांचे अनुयायी होते. इराणी सैन्याने हेजबोल्लाहला लष्करी प्रशिक्षण दिले. १९८२ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील काही भूभाग बळकावला होता. १९८५ ते २००० दरम्यान हेजबोल्लाहने इस्रायली सेनेविरूद्ध गनिमी कावा वापरून लढाई चालू ठेवली आणि इस्त्राईलच्या नाकात नऊ आणले. केल्यानंतर अखेर मे २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधून माघार घेतली.

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ...


"लहान मुलीसारखी कविता कोणासमोर उभी करणे आणि अनुकूल अभिप्रायासाठी कटोरा पुढे उभे करणे म्हणजे कवितेचा अपमान आहे" - कुसुमाग्रज आपल्या या मताशी ठाम राहिले आणि त्यांनी कवितेच्या शैशवात लिहिलेल्या अशा जवळपास दीडशे 'कुमारकविता' आपल्या संग्रहातून वगळल्या !

कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या 'म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !' या कवितेने पिचलेल्या मनगटात शंभर हत्तींचे बळ दिले. मायबाप रसिक आजही त्यांना लवून कुर्निसात करतात ! ही कविता आजही मराठी माणसासाठी अखंड प्रेरणास्त्रोताचे काम करते तर 'माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा' असं मातीचं गौरवगानही त्यांची कविता करते. 'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’! असं सांगत जगण्याची लढाई जिंकायची अनामिक ताकद त्यांची कविता देते. त्यांनी लिहिलेली 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कविता त्यांच्या प्रतिभाशक्तीची दार्शनिक ठरावी अशी आहे.

कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना - निदा फाजली ...



२००१ चे साल असेल. प्रीतीश नंदी, पूजा भट्ट आणि तनुजा चंद्रांना तेलुगु सुपरहिट 'स्वाती किरणम'वर बेतलेला हिंदी चित्रपट बनवायचा होता. हळव्या मनाच्या संगीत शिक्षकाच्या आयुष्यावर हा चित्रपट होता. त्यामुळे गाणी आणि संगीत ह्यातच सिनेमाचा प्राण होता. प्रीतिशजींना यासाठी निदा फाजलींचे नाव अधिक योग्य वाटले. त्यांनी निदांना गाणी देण्याची विनंती केली. काही तासात त्यांनी आठ गाणी लिहून दिली. तनुजा चंद्रा अवाक झाल्या कारण प्रत्येक गाणं अप्रतिम होतं. निदांनी आपल्या हृदयातील सारं तुफान ह्या गाण्यात रितं केलं होतं. चित्रपट तिकीट बारीवर सणकून आपटला पण गाणी सुपरहिट झाली. 'कभी शाम ढले तो मेरे दिल में...' हे यातलं सर्वाधिक गाजलेलं गीत. एके काळी सर्व संगीत वाहिन्यांवर याचा कब्जा होता. मात्र 'कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना, कभी चाँद खिले तो दिल में आ जाना.... मगर आना इस तरह तुम कि यहाँ से फिर ना जाना..." असं निदा कुणाला आणि का म्हणत आहेत याचा अर्थ ध्यानी आला की आपल्याही डोळ्याच्या कडा ओलावतात.

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

आठवणी जयवंत दळवी आणि प्रवीण बर्दापूरकर यांच्या ......



ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या कालच्या पोस्टच्या निमित्ताने दिग्गजांच्या आठवणींचा एक अनोखा पुनर्प्रत्यय या पोस्टमधून आपल्यापुढे मांडताना मला विलक्षण आनंद होतोय. .
प्रख्यात संपादक, लेखक व ज्येष्ठ विचारवंत श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी 'नोंदी डायरीनंतरच्या' (प्रकाशक -ग्रंथाली) या त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकांत त्यांच्या काही आठवणी, काही प्रसंग व त्यांच्या प्रदिर्घ वृत्तपत्रीय कारकिर्दीत आणि दैनंदिन जीवनात संपर्कात आलेल्या काही व्यक्तीविशेषांवर त्यांच्या ओघवत्या, रसाळ, प्रवाही शैलीत लेखन केले आहे. यातीलच एक प्रकरण आहे 'अनुभवसंपन्नता'....

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

बाळासाहेब आणि पवार साहेब - एक दिलदार यारीदुष्मनी !



बाळासाहेबांचे आणि पवारसाहेबांचे आपसातील नातेच वेगळे होते. वैयक्तिक जीवनात मैत्री आणि  राजकारणात वैमनस्य असं असूनही त्यांनी आपसातले संबंध तुटूपर्यंत कधीच ताणले नाहीत. 'मैद्याचे पोते' म्हणून बाळासाहेब ज्यांची टिंगल करायचे ते शरद पवार हे त्यांचे पाच दशकाचे सोबती आणि मैत्र होते. 'ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे  माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये' अशा शब्दात पवारसाहेबदेखील त्यांच्यावर सभांमधून बोलायचे. सभा - भाषणे यातून दोघे जरी एकमेकावर राळ उडवत असले तरी त्यांनी त्यांच्यात आपसात असलेले एक ट्युनिंग कधी बिघडू दिले नाही अन ते दोघे कधी एकही झाले नाहीत अन आपसातल्या मैत्रीतून विभक्तही झाले नाहीत. ही दोन ब्रम्हफुले महाराष्ट्राच्या एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याचे दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले. त्यापैकीच एक किस्सा शरद पवारांनी २०१७ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत सांगितला होता. डॉ.जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले होते, या मुलाखतीत त्यांनी अनेक मजेशीर गोष्टी प्रकाशात आणल्या. त्यातली एक गोष्ट बाळासाहेब आणि पवारांनी एकत्र येऊन काढलेल्या मासिकाच्या जन्मकथेची होती….