शुक्रवार, २९ जुलै, २०१६

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....



काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणाऱ्या लाटा आणि त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर आणि कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध. नाकात सोन्याची लखलखती मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्यांनीच माणूस घायाळ व्हावा आणि तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...

मंगळवार, २६ जुलै, २०१६

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....



आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय). 

मंगळवार, १९ जुलै, २०१६

निरभ्र ......



बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....

शनिवार, १६ जुलै, २०१६

बैलगाडीच्या रम्य वाटा .......



बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....

शुक्रवार, १ जुलै, २०१६

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता



आई मी बचावलेय गं,
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला तू पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं,
माझं प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी
काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं,
वा ऑनर किलिंगसाठी मी कामी आले असते !

मात्र आता हरेक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडिलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर
माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच,
माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि
आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मी बचावलेय गं, आई मी बचावलेय गं
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

रेड लाईट डायरीज - 'रेड लाईट एरिया'तल्या मातीमोल मौती ....



काही महिन्यांपूर्वी कामाठीपुऱ्यातील एका प्रौढ वेश्येच्या करुण मृत्यूवर एक पोस्ट लिहिली होती. कालपरवा तिच्या मुलींबद्दलची माहिती मिळाली..
ती माहिती ऐकून वाटले की हे पहायला वा ऐकायला 'ती' आज हयात नाही हे बरे झाले कारण या घटनेने ती रोज तीळतीळ तुटत राहिली असती अन खंगून खंगून मेली असती...

ही सत्यघटना आहे मुमताजची..
एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची अन भारतमातेच्या एका निष्पाप मुलीची, कस्पटासमान जगून कुत्र्याच्या मौतीने मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची..

आपल्या देशात रोज लाखोने माणसे मारतात त्यामुळे कोण कुणासाठी मेले याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.

मरणारी व्यक्ती वर गेल्यावरदेखील कधी कधी तिचे कवीत्व दीर्घकाळ सुरु असते तर काही अभागी असेही असतात की मृत व्यक्तीच्या आसपासचे लोक त्या दुःखद वेळीही शय्यासोबतीत मश्गुल असतात !

रविवार, १९ जून, २०१६

शिवसेना - वाघाची पन्नाशी ! - एक आलेख ....



५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.

विठ्ठलभक्तीची पाऊसवारी...


आषाढी वारीतलं कुंद पावसाळी वातावरण, टाळमृदंगाचा तालबद्ध नाद, वारकऱ्यांची एका लयीत पडणारी पावले आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्षेत तिकडे पंढरपुरात कंबरेवर हात टेकवून विटेवर उभं असलेल्या विठ्ठलाच्या जीवाची होणारी तगमग हे सारंच अद्भुत असतं. याचा सर्वात मोठा आणि सर्वकालीन साक्षीदार असतो तो पाऊस. या पावसाचं आणि आषाढीचं नातं मायलेकरासारखं आहे. हा पाऊस पेशाने शेतकरी असलेल्या वारकऱ्याच्या जीवनांत अनन्यसाधारण स्थानी आहे. कारण त्याचं अवघं जीवन त्याच्याभोवती गुंफलेलं आहे. कदाचित यामुळेही ऐन पावसाळ्यातल्या आषाढी वारीस दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येतेय.

गुरुवार, १६ जून, २०१६

आता वंदू कवीश्वर ..



अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)        

सुरेश भट -

क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !

गुरुवार, ९ जून, २०१६

अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .


साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....