शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

विंदानुभूती - आनंददायी जीवनाची समृद्ध अनुभूती !


आयुष्य जगताना अनेक समस्या, संकटे येत राहतात ; जगण्याचे नेमके मार्ग अशा वेळी सन्मुख येत नाहीत आणि डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जाते. मग जगणे परावलंबी होऊन जाते. अशा विमनस्क अवस्थेत मनाला उभारी मिळणे खूप गरजेचे असते. अन्यथा दैनंदिन जीवनशैलीतली व्यावहारिक रुक्षता मनात खोल रुजते. परिणामी माणूसपणच हरवून जाते. अशा स्थितीत जीवनाला वळण देणारी एखादी भव्य कविता समोर आली तर जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीही बदलून जातात. विंदा करंदीकरांची अशीच एक कविता आहे जी जगणे सुसह्य करते अन जीवनातले विविधार्थ नव्या संदर्भाने समोर मांडते. कवितेचे नावच आहे 'घेता'. यावरून यातील आशयाची कल्पना यावी. ही कविता वाचकाला समृद्ध करून जाते यात संदेह नाही...

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०१५

गदिमा पर्व...



काही शाळांमध्ये मराठी हा विषय 'ऑप्शनल सब्जेक्ट' झाला आहे. त्यामुळे तिथली मुले मराठी वाचन लेखनाच्या मुलभूत मराठी शालेय संस्काराला मुकतात हे कटूसत्य आहे. इतर शाळातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे 'वैकल्पिक' म्हणून बघण्याचा दृष्टीकोन चिंताजनक आहे. त्यात भरीस भर म्हणून मराठी हा ‘स्कोअरिंग’चा विषय नसल्याची गुणात्मक आवई ‘पैकीच्या पैकी' छाप शिक्षण पद्धतीत उठवली गेल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी विषयाच्या नुकसानाचे खरे मूल्यमापन काही वर्षांनी अचूक होईल. बालभारतीच्या प्राथमिक व माध्यमिक इयत्तामधील क्रमिक पुस्तकातून मराठी साहित्याचे वाचन-लेखनाचे जे संस्कार मुलांच्या मनावर होत होते त्याला आता तडा जाऊ लागला आहे. ज्या प्रमाणे भक्तीसाहित्य म्हटले की ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग आपसूक डोळ्यापुढे उभे राहतात तद्वत कविता म्हटले की केशवसुत, गदिमा, मर्ढेकर, बालकवी डोळ्यापुढे येतात. नुसते हे कवी चक्षुसापेक्ष येतात असं नव्हे तर त्यांच्या कविता वयाच्या सत्तरीत देखील तोंडपाठ असणारी माणसं आजही भवताली सापडतात. या कवितांचं बालमनावर इतकं गारुड आहे. 'आनंदी आनंद गडे' पासून ते 'पिपात पडले मेल्या उंदीर..' पर्यंत ही काव्यमाला विविध विषयात आणि आशयात बहरत जाते, इथूनच कवितेचं वेड डोक्यात शिरते. या काव्य संस्कारातून पुढे गेलेली मुले कोणत्याही शाखेतून पदवीधर होऊन कोणत्याही प्रांतात कोणत्याही क्षेत्रात चरितार्थासाठी रुजू झाली तरी डोक्यात ठाण मांडून बसलेल्या या कविता काही केल्या हटत नाहीत. शाळेतील मराठीचे शिक्षक, मराठीचे तास आणि चाल लावून म्हटलेल्या कविता मनाच्या एका कप्प्यात प्रत्येक विद्यार्थी खास आठवणी म्हणून जतन करतो कारण या कविता त्याला आपल्याशा वाटतात. या कवितांमध्ये प्रत्येकजण आपले बालपण कायम धुंडाळत असतो. इतकी परिणामकारकता या कवितांमध्ये आहे.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

आधुनिक कवी – बा. सी. मर्ढेकर



आजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनात यंत्रवत आयुष्यात परावर्तीत झालेलं जिणं तकलादू आहे, त्यात जीवनातील रसरशीतपणा हरवला आहे. जीवनातील खरी आसक्ती सरून गेली आहे आणि उरली आहे ती निरस जीवन जगण्याची सक्ती. अगदी मर्मभेदक आणि परिणामकारक अशी शब्दरचना हे मर्ढेकरी काव्यवैशिष्ट्य इथेही आहे. कवितेत न वापरले जाणारे, रुढार्थाने दुर्बोध समजले गेलेले गद्याच्या अंगाने जाणारे शब्द लीलया कवितेत वापरण्यात मर्ढेकरांचा हातखंडा होता. सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कवितेत वर्णिलेली जीवनातील शुष्कता आजच्या काळात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.

'पिपांत मेले ओल्या उंदिर; माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले; माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले, पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं गात्रलिंग अन धुऊन घेउन.
जगायची पण सक्ती आहे; मरायची पण सक्ती आहे...'
ही कविता जरी वाचली तरी मनःचक्षुपुढे बा.सी.मर्ढेकरांचे नाव येतेच ! या कवितेच्या योगाने मर्ढेकरांविषयी रसिक वाचकांच्या मनात एका विशिष्ट प्रतिमेचे घट्ट नाते तयार झाले आहे.

मंगळवार, १० नोव्हेंबर, २०१५

दिवाळीतले 'अर्धे आकाश' ....



दिवाळीच्या रात्री साखरझोपेत आपण जेंव्हा मऊ दुलईत झोपलेलो असतो तेंव्हा रानोमाळ कष्ट करत फिरणारया ऊसतोड कामगारांचे जत्थे थंडीत कुडकुडत असतात. अंगावर शहारे आणणारया अशा लोकांच्या दुर्दैवी अपूर्वाईची ही गाथा.. जिथे या बायकांपैकी दहा मागे सात स्त्रियांचे गर्भाशय काढलेले असते, तीसपेक्षाही कमी वयाच्या तरुण स्त्रियांचे देखील गर्भाशय काढले जातात. कशासाठी, तर मासिक पाळीच येऊ नये, तिला विटाळ येऊ नये म्हणून ! ही काळजी तिच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी नव्हे तर कामाचा खाडा होऊ नये म्हणून ! ऊसतोड कामगारांच्या टोकदार दुःखांच्या जाणिवांची अनुभूती देणारा हा लेख अवश्य वाचा.......

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

उन्हातले चांदणे - दत्ता हलसगीकर


दिलेल्या शब्दांसाठी एके काळी लोक स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेत असत, वाट्टेल ती किंमत मोजून शब्द पूर्ण करीत. कारण दिलेल्या शब्दाला तितकी किंमत असायची. 'चले जाव' हे दोनच शब्द होते पण ब्रिटीश महासत्तेला त्यांनी घाम फोडला होता, 'स्वराज्य' या एका शब्दाने अनेकांच्या हृदयात चैतन्याचे अग्निकुंड प्रदिप्त झाले होते. इतकेच नव्हे तर शब्दांची महती सांगताना तुकोबा म्हणतात "आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे । यत्नें करू ।" शब्द हे जीवनाच्या प्रारंभापासून आपली साथसोबत करतात ते थेट श्वासाची माळ तुटल्यावरच थबकतात. शब्द कधी चांदण्यासारखे शीतल असतात, तर कधी पाण्यासारखे निर्मळ असतात, तर कधी कस्तुरीसारखे गंधित असतात तर पाकळ्यांसारखे नाजूक असतात, निखाऱ्यांसारखे तप्त असतात तर कधी ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखे दग्ध असतात, तर कधी आईच्या मायेसारखे सोज्वळ असतात तर कधी गायीच्या डोळ्यासारखे दयाशील असतात तर कधी देव्हाऱ्यातील निरंजनाच्या ज्योतीसारखे मंगलमय असतात. शब्द आहेत म्हणून जीवन आहे आणि शब्द आहेत म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. ह्या सर्व शब्दकळांचे प्रकटन म्हणजे मानवी जीवनाचा जणू आत्मा बनून गेला असावा इतके महत्व या शब्दांना आहे.

"कळ्यांची फुले व्हावीत तसे शब्द उमलतात
खडकातून झरे फुटावेत तसे भाव झुळझुळतात
हाक यावी अज्ञातातून शब्द साद घालतात मला
माझ्या ओळीओळीतून नाजूक मोगरे फुलतात ...
..शब्द मनाचे आरसे ....शब्द ईश्वराचे दूत
माझ्या कवितांमधून मीच होतो आहे प्रसूत !"
शब्द आणि जीवन व शब्द आणि आत्मा यांचे परस्परसंबंध उधृत करणारी ही कविता आहे कवी दत्ता हलसगीकरांची ! ज्यातल्या शब्दकळां आपल्या मनाला स्पर्शून जातात व त्याचबरोबर कवीच्या काव्यप्रेरणांना उत्तुंग स्वरूप देऊन जातात.

इंदिराजी ....काही आठवणी ...



आजपासून बरोबर ३३ वर्षापूर्वीची ही घटना आहे. ३० ऑक्टोबर १९८४, भुवनेश्वर, ओरिसा. दुपारी ३ वाजताची रणरणती दुपार. निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. समोर गर्दीचा सागर उसळलेला होता आणि व्यासपीठावरून त्या नेहमीच्या तडफदार शैलीत बोलत होत्या. त्यांच्या भाषण माध्‍यम सल्लागार एच.वाय.शारदा प्रसाद यांनी तयार केलेल्या नोट्सचा कागद बोलता बोलता त्यांनी बाजूला सारला आणि त्याऐवजी दुसरेच काहीतरी त्या बोलून गेल्या. "मैं आज यहां हूं। कल शायद यहां न रहूं। मुझे चिंता नहीं मैं रहूं या न रहूं। मेरा लंबा जीवन रहा है और मुझे इस बात का गर्व है कि मैंने अपना पूरा जीवन अपने लोगों की सेवा में बिताया है। मैं अपनी आखिरी सांस तक ऐसा करती रहूंगी और जब मैं मरूंगी तो मेरे ख़ून का एक-एक क़तरा भारत को मजबूत करने में लगेगा।" त्यांच्या या भाषणाने सगळेच जण अवाक झाले अन दुसऱ्याच दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची निर्घृण हत्या केली...

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

अनुवादित कविता - कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा : कन्नड कविता

हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा,
सर्व आकारांच्या पार जा.

सर्व अस्तित्वांच्या पार जा.
आर्त भावनांनी हृदयाच्या चिरफाळ्या केल्या तरी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
शेकडो जातींची भुसकटं हवेत उडवून दे
तत्वज्ञानांच्या मर्यादा लांघून पार जा
अन दिगंतापार जाऊन उगव,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
तू कुठेही थांबू नकोस
चिंचोळ्या भिंतीत गुंतू नकोस
अंतास जाईपर्यंत कुणाचेही साधन होऊ नकोस
तू अमर रहा,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
जो अक्षय असतो तो सदैव अनंत असतो,
एका विमुक्त तपस्वीगत.
तू अमर आहेस, अनंत आहेस.
अन अमर अनंत राहण्यासाठी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !

उच्चवर्णाच्या झुली पांघरणारया मठ्ठ कर्मठांसाठीचे अंजन...



१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो.१९५६मध्‍ये दस-याच्या दुस-या दिवशी बाबासाहेबांनी लाखो बौध्द उपासकांसमोर अत्यंत उद्बोधक भाषण केले होते. त्या ऐतिहासिक भाषणात.समाजाच्या साक्षरतेचे महत्व, महिला सन्मान, मासाहार विरोधातील चळवळ, माध्यमांनी केलेली टीका, नागपूरमध्‍येच सभा घेण्याचे कारण असे विविध विषय त्यांनी मांडले होते. यावेळी झालेल्या भाषणात बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला, 'एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणुन सांगता. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय?"

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०१५

मामाचा सांगावा ...



माझ्या लाडक्या सोनुल्यांनो तुम्हाला मामाचा आशीर्वाद. तुमच्या परीक्षा संपल्या असतील. आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुटीचे वेध लागले असतील.
मी लहान असताना परीक्षा झाल्या की माझ्या मामाच्या गावाला जायचो. झाडांच्या गर्दीत वसलेल्या रम्य नगरीत, चिरेबंदी वाड्यात जाऊन राहायचो. तुम्हीही काही वर्षे माझ्याकडे आलात. याही वर्षी तुम्हाला आपल्या लाडक्या मामाच्या गावाला जावेसे वाटत असेल होय की नाही ? पण जरा अडचण आलीय बाळांनो.
काळजावर दगड ठेवून एक गोष्ट सांगतो. तुम्ही यंदा माझ्याकडे येऊ नका असं माझं सांगणं आहे.
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही आपल्या लाडक्या मामाच्या घरी यायचं नाही बरं का छकुल्यांनो...

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

यादवाडच्या शिल्पाआड दडलेला शिवबांचा जाज्वल्य इतिहास....



शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे फार कमी लोकास ज्ञात असेल. अश्वारूढ शस्त्रसज्ज छत्रपती शिवरायांचे शिल्प वा जिजाऊ मांसाहेबासोबतचे शिल्प / चित्र आपण अनेक ठिकाणी पाहतो. मात्र शिवबा मांडी घालून बसलेले आहेत, त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, त्याच्याकडे ते प्रेमाने पाहत आहेत असंही एक शिल्प आहे. विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेलं आहे ! शिवबांनी मेहुण्यास दिलेली सजा आणि हे अनोखं शिल्प यांचा परस्पराशी संबंध आहे. या दोन्ही घटनामागे एक जाज्वल्य इतिहास आहे. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत गेल्यामुळे या गोष्टी ठळकपणे समोर आल्या नाहीत.