शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तैमुरलंग ..



तैमूरलंग अत्यंत क्रूर, कपटी व दुष्ट होता आणि केवळ अमुक एका धर्माचा द्वेष्टा होता हे सांगण्याची चढाओढ काही लोकात लागली आहे. तैमूर फक्त तेव्हढाच सीमित होता की अजून कसा होता याविषयी थोडे लिहिले जाणे क्रमप्राप्त आहे. साम्राज्याच्या रक्तपिपासू विस्ताराची भूक असणाऱ्या सम्राटास आवश्यक असणारे सर्व गुण तैमूरच्या अंगी होते. त्याच्या विषयी अधिक बारकाईने पाहण्याआधी त्याचा एक प्रसिद्ध किस्सा जाणून घेतला तर त्याचे कंगोरे कळण्यास मदत होईल.

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संभाजीराजे - वादग्रस्त मुद्द्यांची एक चिकित्सा ....



आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो !

शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

रेड लाईट डायरीज - कोरं पत्र..



तू कुठे आहेस मला नेमकं ठाऊक नाही,
तुझ्याकडे पोस्टमन येतो का याचीही माहिती नाही.
पत्र आलंच तुझ्या नावाचे तरी ते तुला पोहोच होते का तेही ज्ञात नाही.
मागच्या दोन दशकात खरंच तुला कुणाचं पत्र आलं का हे तरी कसं विचारू ?
तुझं नाव तेच आहे की, शहर बदलल्यावर नावही बदलते ?
तू आता कोणती भाषा बोलतेस, पैशाची तर नक्कीच नाही !
तुला पत्र पाठवलं तर ते तुझ्याच जीवावर तर बेतणार नाही ना ?
तसं मी तुला खूप खूप शोधलंय पण तू पुन्हा एकदाही दिसली नाहीस...

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

क्रांतिकारी भीमगीतांचे रचेते – वामनदादा कर्डक


आंबेडकरी चळवळीतला माणूस वा सर्वसामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण वामनदादांनी लिहिलेली अवीट गोडीची आवेशकारक भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते ! वामनदादा कर्डर्कांची भीमगीते आंबेडकर जयंतीचा अविभाज्य घटक झालीत. ही गीते सामान्य माणसाच्या मनाला भावलीत. नुकतेच मिसरूड फुटलेल्या मुलांपासून ते संघर्षमय जीवनाचा अखेरचा काळ व्यतित करणारे वृद्ध असोत, सर्वांना ही गाणी तोंडपाठ आहेत. वामनदादांनी लिहिलेल्या गाण्यात असे कोणते रसायन आहे की ज्याने माणसाचे रुपांतर भीमसैनिकात होते हे पाहण्यासाठी त्यांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की ही लोकांची बोली आहे, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे, हा जल्लोषही आहे अन वेदनेचा हुंकारही आहे, हा मनामनात दफन केलेल्या उपेक्षेचा आक्रोश आहे, हा धगधगत्या अग्नीकुंडाचा निखारा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा बुलंद नारा आहे !

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

हिंदुस्थानच्या अखेरच्या बादशहाची दर्दभरी दास्तान .....



बाबरच्या रूपाने मुघल ज्या क्षणी हिंदुस्थानात दाखल झाले त्या क्षणापासून त्यांनी ह्या भूमीकडे केवळ लुटमार, साम्राज्यविस्तार व अय्याशीच्या हेतूने पाहिले. त्यांच्यातल्या एकाही बादशहाने ह्या भूमीला आपले सरजमीन-ए-वतन मानले नाही की ह्या मातीचे त्यांना ऋण वाटले नाही. पण ह्या सर्व मुघल बादशहांना अपवाद राहिला तो हिंदुस्थानचा अखेरचा बादशहा, बहादूरशहा जफर. आधीच्या सम्राटांनी हिंदुस्थानची लयलूट केली तर याचे प्राणपाखरू ह्या भूमीसाठी रुंजी घालत निशब्दतेने भयाण अवस्थेत मरून पडले. ज्या मुघलांनी हिंदुस्थानला कधी आपला वतनमुलुख मानला नाही त्यांचा अखेरचा शिलेदार मात्र ह्या भूमीत दफन केले जावे म्हणून तडफडत राहिला ! किती हा दैवदुर्विलास !

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

छायाचित्रकाराची अनोखी दास्तान ....केविन कार्टर !



संवेदनशील व्यक्तीने काळजाला हात घालणारी एखादी कलाकृती बनवली आणि त्यातून त्याच्या मनात अपराधीत्व दाटून आले तर त्याच्या मनातील भावनांचा कडेलोट होतो. अशाच एका सहृदयी व्यक्तीबद्दल, केविन कार्टरबद्दल जेंव्हा कधी विचार करतो तेंव्हा डोळ्यात नकळत पाणी येतेच....

छायाचित्रकाराच्या मनात भावनांचे कल्लोळ दाटतील अशा काही क्षणांचे त्याला साक्षीदार व्हावे लागते अन त्यातून जन्माला येते एक अप्रतिम छायाचित्र. त्यात कधी दुःख असते तर कधीवेदना, राग, आक्रोश, शृंगार, प्रेम, आनंद, द्वेष, मोह अशा अगणित भावनांचे हुंकार त्यात व्यक्त होतात. छायाचित्रकारासाठी त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च ध्येय पुलीत्झर पुरस्कार ठरावा. या पुरस्काराच्या वेडाने झपाटलेले छायाचित्रकार जगाच्या पाठीवर कुठेही अन कसल्याही परिस्थितीमध्ये जातात.ताजी उदाहरणे म्हणजे सिरीयाचे गृहयुद्ध असो वा इबोलाचा आउटब्रेक असो आपल्याला खरी आणि नेमकी परिस्थिती तंतोतंत माहिती छायाचित्रकारच पोहोचवतात.त्यासाठी प्रसंगी ते जीवसुद्धा धोक्यात घालतात.....

सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

वेध 'शिशिरागमना'चा ......


जगाला भले बहारदार 'वसंत' अतिप्रिय वाटत असेल पण मला 'शिशिर' भावतो...
शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जातात, जणू सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी सगळी पाने गळून पडतात...
झाड निष्पर्ण होऊन जाते आणि उरते त्याचे अस्सल देहमूळ !
आपल्या विचारांच्या पुनर्विलोकनात दंग असणारे खोड राहते.
थंड वाऱ्यास आपला पूर्वेतिहास विचारणाऱ्या, टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या फांदया विचार करायला भाग पाडतात.
'वर्षा' झाडांच्या तृषार्तमुळांना तृप्त करून गेलेली असते,
पानझडीमुळे शिशिरात झाडांना पाणी कमी लागते त्यामुळे शिशिरात झाडे जणू उपवासाची तपश्चर्या करतात.
शिशिरातल्या झाडांना रंग, गंध, आकार आणि स्पर्श यातील कशाचेही अप्रूप नसते. जणू ध्यानस्थ ऋषी मुनीच !

गुरुवार, ३० जुलै, २०१५

परीकथेतील राजकुमारा …


'परीकथेतील राजकुमारा… 'हे एकेकाळी रेडीओवर अफाट गाजलेले गीत. या गीताची सुरुवातच जादुई शब्दांनी होती. ज्या पिढीने परीकथा वाचल्या होत्या अन त्यातील राजकुमार - राजकुमारीचे स्वप्न पाहिले होते त्यांना यातील आर्त प्रतीक्षा भावली होती. ज्या पिढीला ह्या परीकथा अन त्यातील राजकुमाराचे आकर्षण उरले नाही, त्याची ओढ राहिली नाही त्या पिढीला यातील सहवेदना कदाचित जाणवणारच नाहीत. कारण आजची पिढी एका आभासी जगात जगते. खेळाच्या मैदानावर लहान मुलांचे दिसणे दुरापास्त होऊ लागलेय. मोबाईल - कॉम्प्यूटरवरील व्हिडीओ गेमपासून ते दुरचित्रवाहिन्यातील ‘डोरेमॉनच्या जंगलात’ ही मुले हरवून गेलीत. तरुणांची अवस्था त्यांच्यापेक्षा वाईट आहे, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या कृत्रिम मायाजालात ही पिढी अशी काही हरवून गेलीय की त्यांना त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा, ध्येय धोरणांचाही विसर होतोय. लहानग्या वयापासून पीसी गेमच्या जाळ्यात गुरफटलेली अन व्हॉटसेप ते फेसबुकच्या फेऱ्यात अडकलेली ही मुले. त्यांना परीकथेचे स्वाभाविक वावडे असणार. पूजेचे ताट उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे फिरवायचे हे ज्यांना ठाऊक नाही, दंडवत अन नमस्कार यात काय फरक आहे किंवा आपले लोकसाहित्य कधी ढुंकूनही ज्यांनी पाहिले नाही अशीही मुले यात आहेत. फास्ट फुड ते हायटेक शिक्षण व्हाया ब्रेकअप इन माईंड एण्ड कल्चर हे ठायी असणाऱ्या पिढीस भावगीतांचा एक हृदयस्पर्शी जमाना होता यावर कसा विश्वास ठेवावासा वाटेल ?

परीकथेतिल राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का ?

शनिवार, २५ जुलै, २०१५

हरवलेली गाणी....



फेसबुकवरच्या मायभगिनींनो, मैत्रिणींनो तुम्ही हातात बांगड्या घालता का ? स्वतःच्या हाताने घालता की कासाराकडे जाऊन घालता ? कासाराकडे जाताना एकटयाने जाता की मैत्रिणीसवे, नात्यागोत्यातल्या महिलांसवे ग्रुपने जाता ? तिथे गेल्यावर त्याने एका पाठोपाठ एक रंगीबेरंगी फिरोजाबादी बांगडया मनगटातून पुढे नजाकतीने सरकावताना हाताला रग लागलीय का ? बोटं रटरटलीत ? ढोपर अवघडले ? त्या त्रासाकडे लक्ष जाऊ नये म्हणून माझ्या गावाकडच्या मायभगिनी काही दोन ओळींची गाणी गुणगुणत तुम्ही तसं कधी गायलात का ? एकीचे झाले की दुसरी गाई, मग तिसरी असं करत पुन्हा पहिली गात असे. लग्नघरी कासार आल्यावर मग तर एकीच्या ओळींना जोडून दुसरी उस्फुर्त काव्य रचत असे. भलीमोठी कविता तिथे जन्म घेई. यातल्याच काही जणी मग जात्यावरच्या ओव्याही रचत आणि मग काय आपला क्रम कधी येतो याची प्रत्येकजण हरीणीगत वाट बघे. ह्या साऱ्या जणी म्हणजे गावोगावच्या बहिणाबाईच की ! की तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही ? चला तर मग मी काही अशी ओव्यांची / द्विरूक्तीची ओळख करून देतो. तुम्हाला आवडतात का बघा. एखादी छानशी कॉमेंट करा. तुम्हालाही एखादी ओळ सुचली तर लिहा, तुमच्या घरी आता कोणी बांगडया भरतात की नाही हे मला माहिती नाही, पण घरी पोरीबाळी असतील तर त्यांना ह्या पोस्टबद्दल, गावाकडच्या ह्या गोड रिवाजाबद्दल सांगा. त्यांना नक्कीच बरं वाटेल. जमलंच तर चाल लावून सांगा, खूप गोड आहेत हो ही बांगडयांची गाणी. एकदा गाऊन तरी बघा....

शनिवार, १८ जुलै, २०१५

मराठे - एक युद्धज्वर !


मराठयांनी एखाद्या माणसाचा सूड घ्यायचा ठरवलं की ते बेभान होऊन, जीवावर उदार होऊन, कुठलाही मागचापुढचा विचार न करता वर्षानुवर्षे आपल्या काळजात सुडाग्नी धगधगता ठेवतात. संधी मिळताच वचपा काढतात. याची अनेक उदाहरणे इतिहासाच्या पानावर जागोजागी आढळतात. इथे उदाहरण दिले आहे, इतिहासातील महापराक्रमी अजरामर काका पुतण्यांचे ! याउलट असणारे किस्सेही इतिहासात घडलेले आहेत. पेशवाईत तर काकाच पुतण्याच्या जीवावर उठला होता. मात्र पोस्टमधले उदाहरण आगळे वेगळे आणि अलौकिक आहे !