गुरुवार, २१ मे, २०१५

मातीचे पाईक - फ.मु.शिंदे



चंद्र थकला होता रात्रभर जागला होता,
रात्रभर एकटाच चंद्र जागला होता

मामा मामा म्हणणारे दिवस नव्हते ;
ढगात तोंड खूपसून चंद्रच रडत होता……

चंद्राचे चिमुकले गेले, मामाचे वाडे गेले,
पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले…

एक काळ देशभरात आढळणारी एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळात मात्र बहुतांश करून ग्रामीण भागातच अस्तित्वात आहे. त्यामानाने शहरात तिचा अस्त झाला आहे. पूर्वी प्रत्येकाला मामा, मावशी, काका, काकी ही नाती विपुल असायची. जोडीला चुलत, मावस भावंडे असायची. या नात्यांचे सुख काही और असायचे. दिवाळीच्या वा उन्हाळी सुट्टीत मुले आवर्जून मामाच्या गावाला जायची वाट बघायची. एक अनामिक प्रेमाची, मायेची ओढ त्यात असायची. नात्यांमधला आस्थेचा संस्कार घट्ट विणेचा असायचा. एखाद्या वर्षी आजोळी जाऊन मामा, मावशीला भेट झाली नाही तर जीवाची उलघाल व्हायची. आता परिस्थिती बदलली आहे. आता चंद्रच एकटा पडला आहे कारण त्याच्याकडे पाहून अंगाईगीत गाणारी आईदेखील लुप्त झाली आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन वा मातेचा अपत्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन यामुळे हा बदल झालेला नसून परिस्थितीने काळवेळ यांच्यावर नियंत्रण मिळवून माणसाला यंत्रवत बनवले आहे. परिणामी कुणाजवळही फुरसत नाही. आईकडे बाळासाठी नाही आणि बाबांकडे तर कुणासाठीच वेळ नाही ! मग निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला गं बाई ही तर फार लांबची गोष्ट आहे.

गुरुवार, १४ मे, २०१५

ओढ आषाढीची ....


माघ वारी झाली की पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो, माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. पीकपाण्यातून हाती काय आले याचा हिशोब हा महीना देऊन जातो. मग हळूहळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात. येणारा दिवस उन्ह वाढवतच राहतो त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुनासवे वसंताचे आगमन होते अन निसर्गाला उधाण येते, पानाफुलातील रंगांची, गंधाची उधळण मन मोहते ! फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हातही बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते, तिच्यातही वसंताचे उधाण दिसते. काहीसे सुसह्य ऊन, झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन होळी ! हल्ली पाण्याची ओढाताण वाढल्यामुळे सर्वत्र लहान मुले वगळता मोठी माणसे अपवादानेच रंगपंचमीचा आनंद लुटतात. होळीनंतर येणारी धुळवड मात्र बेजान गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते ! पीक हाती न आल्याचे दुःख माणसे धुळवडीच्या निमित्ताने विसरतात, विहिरी तळाकडे गाळात रुतत चालल्याचे शल्य बाजूला सारतात, मातीला पडत चाललेल्या भेगा नजरेआड करतात, कणगीतले धान्य खाली चालल्याची व्यथा आपल्या पोटात ठेवून मातीशी एकरूप होतात ! मातीने कितीही छळले, कितीही वेळा दुष्काळ आला तरीही हे भूमीपुत्र धूळवडीला मातीला अंगाखांद्यांवर खेळवून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात. तिच्यात न्हाल्याशिवाय वर्ष संपू शकत नाही अशा भावना धुळवडीतून प्रकटतात !

मंगळवार, १२ मे, २०१५

दोस्त, बिवी और शायरी - नात्यांचे एक अनोखे सत्यकथन ....



दोन मित्रांचे त्यांच्या हयातीतच एकाच स्त्रीशी आलटून पालटून लग्न होऊ शकते का ? असे झाले तर त्यांच्यातले सामंजस्य अबाधित राहू शकते का ?
खऱ्या मैत्रीत स्त्री-संबंध कधीच दुरावा आणू शकत नाहीत याचा प्रत्यय देणारी मित्रप्रेमाची नशिल्या शायरीने सजलेली रोमांचक सत्यगाथा..

दोन जिवलग मित्र. दोघेही अप्रतिम प्रतिभावंत शायर.
त्यापैकी वयाने मोठा असणारा असगर आणि कमी वयाचा जिगर.
जिगरची आई १० व्या वर्षी वारलेली तर वडील १५ व्या वर्षी निवर्तलेले. शिवाय त्याचा निकाह जिच्यासोबत झाला होता ती देखील लवकर वारली.
वाहिदन असं त्या अभागी स्त्रीचं नाव होतं.
या नंतर तो आग्र्याच्या एका वेश्येच्या प्रेमात पडला होता, शिराज तिचं नाव. 

सोमवार, ११ मे, २०१५

माझ्या मातीच्या माय भगिनी ....



चाफा,मोगरा,जाई-जुई अन सदाफुलीने हातात हात गुंफून एकत्र बाहेर पडावे तशा या माझ्या मायभगिनी सकाळ झाली की घरातलं सगळं आवरून सावरून कामाला बाहेर पडतात. भल्या पहाटे उठून झाडलोट सारवण करून चुलीवर चहाचे आधण चढवीत न्हाणीत हजर होतात. घरातली जाणती माणसे जागी झाली की मग तान्हुले कुणी असतील तर त्यांना जागे केले जाते. काठवटीत पीठ मळून चुलीवर त्याच्या खमंग भाकऱ्या करून एखादे कालवण करून भांडी कुंडी आवरुन ह्या मोतियांच्या माळा घराबाहेर पडतात…

रविवार, १० मे, २०१५

अस्सल नटरंगाची कहाणी .....



चित्रपटात त्यांनी नाच्याचीच भूमिका केली पण जीव ओतून केली अन ती भूमिका त्यांच्या जीवनावर जणू आक्रमणच करून गेली. त्यांची मुले मोठी झाली पण त्यांच्याशी कोणी सोयरिक जुळवायला तयार नव्हते कारण 'अशा' माणसाला मुलेबाळे कशी असतील असा प्रश्न जिथे तिथे समोर येऊ लागला. अभिनयाने पदरात विशेष काही पडले नाही मात्र आयुष्य उध्वस्त होणे म्हणजे काय हे त्यांना अनुभवास आले त्या अस्सल पण अभागी नटरंगावरची ही पोस्ट...

नेटमुशाफिरीत विख्यात दिग्दर्शक रवि जाधव यांची जुनी मुलाखत वाचनात आली अन 'त्यां'च्या त्या घटनेची आठवण झाली…….
दूरदर्शनवरील ती मुलाखत काल पाहिल्यासारखी डोळ्यापुढे तरळून गेली…
त्या मुलाखतीत एक ज्येष्ठ प्रतिभावंत अभिनेते धाय मोकलून रडत होते अन मुलाखतकर्ते निवेदक स्तब्ध होऊन गेले होते. त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नांवर त्या अभिनेत्याच्या भावना अनावर झाल्या अन अश्रूंचा बांध फुटला इतकेच त्या घटनेचे महत्व नव्हते तर अभिनयाच्या तपस्येमुळे व्यक्तिगत आयुष्याची वीण कशी उसवत गेली, त्यातून एका कलाकाराची जिंदगानी कशी उध्वस्त होत गेली याचे ते टोकदार उदाहरण होते.

रविवार, ५ एप्रिल, २०१५

आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?


आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
अरे यार, आयपीएल मध्ये कसला ड्रामा आहे त्यावरच मस्त बोलायचं का ?
फोर-जीच्या फुकट स्ट्रीमींगमध्येच रुतत जायचं का ?
पूर्वी तुला नोकरी नव्हती, महागाई वाटायची तेंव्हा तर तू रस्त्यावर यायचास ना ?
आता तुला स्वतःतून बाहेर पाहायला वेळ मिळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. तू आंदोलनेही आता ऑनलाईनच करतोस का ?
तुला खऱ्या खोट्यातला म्हणे फरक कळत नाही कारण ते जे काही दाखवतील तेच तर तू वाचतो आहेस, पाहतो आहेस. हे खरं आहे का ?
आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

शेवंता.....


शेवंता म्हणजे अजब रसायन होतं. लिंबाच्या बुंध्यागत भरल्या अंगाची ठसठशीत बाई ! गाजरासारखा रंग अन नितळ काया. अंगणात बसली तर केळीच्या खोडासारख्या तिच्या तराट गोर्‍यापान पिंडर्‍याकडे जादू झाल्यागत नजर जायचीच. तटतटलेल्या पायावर रंगीत घुंगरांचे सैलसर चांदीचे पैंजण उगाच चाळा करत रहायचे अन बघणारा गपगार व्हायचा. काजळ घातलेल्या तिच्या पाणीदार मोसुळी डोळ्यात सदोदित एक आवतण असायचं. मोठ्या कपाळावर आडवी रेष अन त्यावर बारीक गोलाकार गंध असायचा. जो तिच्या उभट चेहऱ्याला फारच खुलून दिसायचा. कानातले लंबुळके झुबे सतत डुलत रहायचे. ओठाच्या पाकळ्या उघडल्या की पांढर्‍याशुभ्र मोगर्‍याच्या कळ्यासारख्या दंतपंक्ती बेचैन करत. क्वचित कधी ती मोकळया केसानिशी उभी असली की अजूनच जालीम दिसायची. बहुतकरून सैलसर अंबाडा बांधून त्यावर तिने एखादा गजरा माळलेला असायचा. गळ्यात मोहनमाळ आणि काळ्या मण्यांची सैलसर बारीक सोनेरी तारेतली सर असायची. पाठीवर लाल रेशमी गोंडा असणारी ही काळी सर तिच्या गळ्यावर अशी काही रूळायची की समोरचा सतत तिच्या भरदार छातीकडे चोरून बघायचाच. आवळ पोलके नेसल्यानं गच्च दंडावर करकचून बांधलेल्या काळ्या दोर्‍यातली बारीक काळपट पितळी पेटी अधिकच चेमटलेली वाटायची. तिच्या गुटगुटीत मनगटालाही काही दोरे गुंडाळलेले असायचे. लुसलुशीत पोटाला बांधलेली चांदीची साखळी अन दुहेरी गुंफलेला कटदोरा इतका घट्ट असायचा की कधीकधी तिच्या पोटाच्या कोपऱ्यावर लालसर वळ दिसायचे. तिचं सारं अंगांग गाभूळल्या चिंचेसारखं होतं, बघणार्‍याच्या तोंडालाच लाळ सुटायची.

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

रुबाई - उमर खय्याम ते माधव ज्युलियन ..

'मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवाला,
‘किस पथ से जाऊँ?’ असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
‘राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला ।

हरिवंशराय बच्चन यांनी अनुवादित केलेली उमर खय्यामची ही एक प्रसिद्ध रुबाई आहे. उमर खय्याम फावल्या वेळात रुबाया (रुबाइयाँ) लिहीत असे. ह्या रुबायांमुळेच त्याची कीर्ती अजरामर झाली. त्याच्या रुबायांमुळे अनेक देशांत उमर खय्याम क्लब स्थापन झाले. तेथे त्याच्या रुबायांचे मोठ्या आवडीने अध्ययन अध्यापन केले जाते. जगातील अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. अर्थात त्यांतील उमर खय्यामच्या रुबाया किती व प्रक्षिप्त रुबाया किती हे सांगणे खरोखरीच कठीण आहे.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

‘गायी पाण्यावर काय म्हणून आल्या’ - कवी बी ....



गाय आणि तिचे वासरू, तिची माया, तिचं दयाळू वर्तन, तिची करुण प्रतिमा यांचा यथार्थ वापर साहित्यिकांनी गद्यपद्य या दोन्ही साहित्यप्रकारात केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पानोपानी आढळतील. आईची माया दर्शविण्यासाठी कवितांत तर गायीची उपमा अत्यंत खुबीने वापरली गेलीय. काही कवितांनी गायीच्या ममतेवर असे काही अप्रतिम भाष्य केलं आहे की रसिक वाचकांच्या मनाचा त्यांनी अचूक ठाव घेतला आहे. ही अशीच एक कविता ..