बुधवार, २८ जून, २०१७

दाग देहलवी - आईच्या अधुऱ्या प्रेमाची गझल.....

daag dehlavi


एखाद्याची कविता वा शायरी खूप टोकदार असली की ओळखून घ्यावं की त्यानं खूप कठीण काळ पाहिलेला आहे, अशांच्या आयुष्यात डोकवलं की अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. जगात अशीही माणसं जन्माला येतात की त्यांना नको ती दुःखे अनुभवावी लागतात, नको ती दृश्ये पाहावी लागतात, बदनामीचा डाग नाहक आयुष्यभर माथ्यावर मिरवावा लागतो. त्यातही हा सल आपल्या सर्वात जवळच्या म्हणजे आईच्या नात्याचा असला की जगणं असह्य होऊन जातं आणि उरतो तो अथांग वेदनांचा काळाकभिन्न भवसागर. 
ही दास्तान एका विख्यात शायराची आहे. आयुष्यभर त्याला आपल्या जन्मदात्या आईची अखंड फरफट पहावी लागली. कळत्या वयापासून त्याच्या आईला जगाने दिलेली दुषणे त्याने काळजात दफन करून ठेवली होती, ज्याच्या जखमांचे नासूर होत गेले आणि त्यातून शायरी प्रसवली.

वझीर खानूम ही दिल्लीतल्या मोठया सुवर्णकाराची, हस्तकलाकाराची अत्यंत देखणी मुलगी होती. फेरोझपूर झिर्काच्या नवाब लोहारुंचे भाऊ नवाब शमसुद्दीन यांच्या व्यक्तीमत्वावर सौंदर्यावर भाळून तिने हट्टाने त्यांच्याशी निकाह लावला. खरे तर हे तिचे दुसरे लग्न होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ती इंग्रज अधिकारी मार्स्टन ब्लेक याच्या सोबत पळून गेली होती. (अठराव्या शतकात एक मुस्लीम युवतीने केलेलं हे जिगरबाज धाडस अत्यंत सनसनाटी होतं) मात्र काही वर्षांनी मार्स्टन ब्लेकचा खून झाला (त्याच्या खूनाची करणे अज्ञात असली तरी सौंदर्यवती पत्नी खानूमपायीच त्याला प्राण गमवावे लागल्याचा कयास इतिहासकार बांधतात). तरुण वयात वझीर खानूम बेवा झाली....

पतीचा खून झाल्यावर त्याच्यापासून झालेल्या दोन मुलांसह ती दिल्लीला परतली. दिल्लीला आल्यावर दुसरा निकाह नवाब शमसुद्दीन खाँशी केल्यावर आता तरी सुखाचा संसार होईल असे तिला वाटत होते. नवाबासोबत दिल्लीत असताना तिच्या पोटी एक देखणा मुलगा जन्मास आला. तिची प्रसूती चांदणी चौक परिसरात झाली. काही काळ लोटल्यानंतर तिला वाटले आता सारे स्थिरस्थावर झाले पण नियतीला ते मंजूर नव्हते. नियतीने वझीर खानूमच्या संसारात दुसऱ्यांदा विष कालवले. विल्यम फ्रेझर ह्या अत्यंत उमद्या व देखण्या ब्रिटीश एजंटच्या खुनाच्या कटाच्या आरोपाखाली नवाब शमसुद्दीन खाँ यांना फासावर लटकावण्यात आले. विल्यम फ्रेझरचे आपली पत्नी वझीर खानूम हिच्यावर प्रेम असावे या संशयातून नवाबाकडून हे कृत्य घडले. नवाबाच्या पश्चात चौतीस वर्षाची खानूम आणि तो चार वर्षाचा मुलगा यतीम होतील असे वाटत होते पण नियतीने लपंडाव खेळत त्यांना पुन्हा एकदा साथ दिली.

दिल्लीचा अखरेचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा मुलगा मिर्झा मुहंमद फकरु याच्याशी वझीर खानूमचा निकाह झाला, ती त्यांची दुसरी पत्नी होती. हे लग्न तिने आपल्या मर्जीने केले खरे पण तिचे मन लाल किल्ल्यात फारसे रमत नव्हते. इथे वास्तव्यास असताना तिच्या मुलाला मात्र शायरीचे वेध लागले. त्याच्या लेखणीची सर्वत्र चर्चा होऊ लागली. पुढे जाऊन तो मोठा शायर झाला. दाग देहलवी त्याचं नाव !  दाग देहलवींचे खरे नाव नवाब मिर्झा खाँ. त्यांचे वडील नवाब शमसुद्दीन खाँ हे फेरोझपूर झिर्काच्या नवाब लोहारुंचे भाऊ होते. आजोबा बहादूरशहा यांना असणारे शेरोशायरीचे व्यसन त्याच्या रोमारोमात भिनले. विख्यात प्रतिभावंत शायर 'जौक' यांना त्याने गुरु मानले. मिर्झा गालिबजींनी त्याला काही सल्ले दिले. आता आपण खरोखरचे स्थिर होत आहोत असं वाटत असतानाच वझीर खानूमवर पुन्हा संकटाची कुऱ्हाड कोसळली.

१८५६ च्या सुमारास तिचा तिसरा पती मिर्झा फकरु वयाच्या चाळीशीच्या आतच मरण पावला. मिर्झा फकरुच्या मृत्यूनंतर काही दिवस वझीर खानूम दागसह तिथेच राहत होती पण पुढच्याच वर्षी (१८५७) देशात बंडाचा एल्गार झाला आणि लाल किल्ला सोडून ते रामपूरला रवाना झाले. या वेळी दाग २५ वर्षांचे होते तर त्यांची आई ५५ वर्षांची होती. वृद्धत्वाकडे कलत असूनही तिचे सौंदर्य कमी झाले नव्हते ! रामपूरचे युवराज नवाब कल्ब अली खाँ च्या आश्रयास ते राहू लागले. (भारतीय नवाबांच्या इतिहासात सर्वात जास्त वासनांध आणि ऐय्याशी नवाब म्हणून या कल्ब अली खाँचे नाव काळ्या अक्षरात नोंदले गेलेले आहे. त्याच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा निकाह झाला तर पतीच्या आधी त्याच्या सोबत तिला रात्र काढावी लागे. हा मेल्यानंतर त्याच्या कबरीतून दोन वेळा बाहेर लोटला गेला होता शेवटी त्याची उभी कबर बांधली गेली. आजही रामपूरमध्ये ही उभी कबर अस्तित्वात आहे.)

या लिंगपिसाट नवाबापाशी दाग आणि त्यांची आई तब्बल तीस वर्षे राहिले. त्यांचे नवाबाला शायरी सुनावण्याचे काम चाले. या काळात वझीर खानूमची मानसिक अवस्था फार विमनस्क झाली होती. तिला भास होत राहायचे. आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या पुरुषांवर तिने मनस्वी प्रेम केलं होतं. १८८७ मध्ये या नवाबाचा मृत्यू झाल्यावर दाग देहलवी तिथून पुन्हा दिल्लीला आले, दिल्लीहून हैदराबादला गेले. हैदराबादच्या निजामाचे ते काव्यगुरु झाले. इथे त्यांनी प्रदीर्घ काव्यलेखन केलं. १९०५ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

दाग जन्मले तेंव्हा त्यांच्या आईला समाजमान्यता उरली नव्हती. जन्मापासून त्यांना सावत्र भावंडे होती. पुढे जाऊन सावत्र वडील लाभले. शिवाय कल्ब अली खाँचा 'तसला' दरबारही त्यांनी अनुभवला. इथे त्यांची आई सैरभैर झाली. आपल्या आईची अवस्था त्यांना बघवत नव्हती, तिचं प्रेमव्याकुळ होत राहणं आणि एकेक करून तिचे जोडीदार हिरावून घेतलं जाणं दागच्या मनावर आघात करून गेलं. हैदराबादेत असताना आपल्या आईच्या या व्याकुळ अवस्थेचं शब्दांकन करताना त्यांना सुचलेली गझल म्हणजे - 
"तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था
न था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था। "

आईच्या नावाने नियमित काळाच्या अंतराने आलेल्या प्रेमाच्या अध्यायात (पैगाममध्ये) नवे नाव कोरलेले असे, ते नाव विधात्याने धाडलेले होते म्हणून ते प्रेमिकाचे नाव नव्हते, ते तिच्या जोडीदाराचे नाव होते. आपल्या मातेस तिला हवे असणारे प्रेम चिरंतन स्वरूपात कधीही लाभू शकले नाही. कुमार वयापासून ते जरठ अवस्थेपर्यंत तिला प्रेमव्याकूळ जिणं जगावं लागलं याचं टोकदार दुःख या गझलेतून दाग देहलवींनी मांडलं गेलंय. "गुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहें, ख़याल दिल को मेरे को सुबह-ओ-शाम किस का था।"

"अगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थे, तबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था।" या ओळी वाचताना अंगावर काटा येतो. आपण (आपली आई) बेवफा कधीच नव्हतो पण नियतीचे गुलाम होतो याची टोचणी शेवटच्या ओळीत व्यक्त केली आहे. एका शायराने आपल्या कमनशिबी आईच्या फरफटीचे केलेलं हे वर्णन काळजाचा ठाव घेऊन जातं..
दाग देहलवी यांच्या गझला वाचताना नशिबाची लक्तरे झालेली त्यांची आई आपल्यासमोर उभी ठाकते, काही तरी हरवल्यासारखं वाटत राहतं. आपल्या आईच्या आयुष्यातील काळाकुट्ट अंधार दागजींनी आपल्या लेखणीत जतन केला पण त्याचे शब्दरूप उमटले तेंव्हा तो अंधार लाव्ह्यात परिवर्तित झाला होता !          

तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था
न था रक़ीब तो आख़िर वो नाम किस का था।

वो क़त्ल कर के हर किसी से पूछते हैं
ये काम किस ने किया है, ये काम किस का था।

वफ़ा करेंगे, निबाहेंगे, बात मानेंगे
तुम्हें भी याद है कुछ, ये कलाम किस का था।

रहा न दिल में वो बेदर्द और दर्द रहा
मुक़ीम कौन हुआ है, मुक़ाम किस का था।

न पूछ-ताछ थी किसी की वहाँ न आवभगत
तुम्हारी बज़्म में कल एहतमाम किस का था।

हमारे ख़त के तो पुर्जे किए पढ़ा भी नहीं
सुना जो तुम ने बा-दिल वो पयाम किस का था।

इन्हीं सिफ़ात से होता है आदमी मशहूर
जो लुत्फ़ आप ही करते तो नाम किस का था

तमाम बज़्म जिसे सुन के रह गई मुश्ताक़
कहो, वो तज़्किरा-ए-नातमाम किसका था।

गुज़र गया वो ज़माना कहें तो किस से कहें
ख़याल दिल को मेरे को सुबह-ओ-शाम किस का था।

अगर्चे देखने वाले तेरे हज़ारों थे
तबाह हाल बहुत ज़ेरे-बाम किसका था।

हर इक से कहते हैं क्या ‘दाग़’ बेवफ़ा निकला
ये पूछे इन से कोई वो ग़ुलाम किस का था।

आजही कधी ही गझल ऐकताना दाग आणि त्यांच्या मातेच्या वेदनांचा इंद्रधनुष्यी कॅनव्हास डोळ्यापुढे येतो. एका मनस्वी बंडखोर तरुणीचे आयुष्य कसे चुरगाळत गेले आणि तिच्या मूक वेदना तिच्या मुलाच्या काळजात कशा पाझरत गेल्या याचे चित्र तरळत राहते...

कवीचे अनुभव जितके सच्चे आणि दाहक तितके त्याचे काव्य मनाला थेट भिडत जाते, अगदी अणकुचीदार शस्त्राने घायाळ करावे तसे त्याचे काव्य आघात करून जाते. 

- समीर गायकवाड.

टीप - प्रसिद्ध गझल अभ्यासक श्री. प्रदीपजी निफाडकर यांच्या लेखनाच्या आधारे दाग देहलवींच्या गझलेवर लिहिण्याचं धाडस केलंय.        

(एडीटेड मजकूर - मुळात दाग देहलवी यांच्यावर लिहायचं नव्हतं... लखनौमधल्या शेवटच्या खानदानी मुजरेवालीच्या संदर्भातल्या इतिहासाचा सध्या अभ्यास करतोय. त्यात रामपूरच्या नवाबाचा उल्लेख अत्यंत क्रूर विकृत पद्धतीने समोर आल्यावर वझीर खानूम आणि दागजींच्या आयुष्यावर लिहावं वाटलं. या TRAGEDY मध्ये जे दुःख आढळलं त्याहून शतपटीनं अधिक टोकदार आणि आर्त दुःख त्या मुजरेवालीच्या आयुष्यात आढळलं. जेंव्हा कधी दोनेक ओळी तिच्यावर लिहून होतात पुढे लिहावं वाटत नाही. दिवस उदास जातो.. पण नेटाने लिहीन आणि मांडीन... सुखावर सगळेच लिहितात आपण दुःखात जगण्याचा अर्थ शोधू !... तूर्तास त्या मुजरेवालीचं नाव फक्त सांगतो - अदालती बाई तिचं नाव ! ... तिच्याच आयुष्यातले काही तुकडे राजकपूरजींनी 'राम तेरी गंगा मैली हो गयी'मधल्या मुजरेवाल्या गंगाच्या भूमिकेत जोडले आहेत...)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा